Wednesday, October 13, 2021

इतना गहराईमें सोचो मत......

 त्याचं असं झालं की, आम्ही इथे पुण्यात डायनिंग सेट पहायला दुकानात गेलो होतो, तिथे एक मार्बलचा सेट आवडला. ते नवीन प्रकारचं मार्बल होतं, तर माझ्या मनात आलं की,ह्यावर हळदीचे, तेलाचे डाग पडले तर कसे जातील? आणि ते किती खराब दिसेल! मी त्या दुकानदाराला म्हटलं की, भगवान के मंदिर मे जो मार्बल लगा है, उसपे हल्दी कुमकुम के दाग जल्दी निकलते नही है( तो मुस्लिम होता) पुणेरी असल्यामुळे, त्याला मी काय म्हणते, ते थोडं तरी समजलं असावं. तेव्हा तो म्हणाला, अरे,हमने इतनी गेहराईमें कभी सोचा ही नहीं, आपभी मत सोचिए! मुझ पर भरोसा रखके ले जाइये!

            मला त्याचं ते वाक्य खूपच आवडलं! खरंच उगाच किती छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करत बसतो. मी अगदी  फ्लॅशबॅकमध्ये गेले. लहानपणी शाळेत असताना मित्र-मैत्रिणी वहयांच्या मागच्या-पुढच्या बाजूला त्यांचे क्रिएटिव वर्क करायचे. मी मात्र वहयांच्या दोन्ही बाजू अगदी स्वच्छ व कोऱ्या ठेवायचे. बोअर पिरियड चालू असताना, वह्यांच्या मागे मेसेजेस लिहून वही फॉरवर्ड व्हायची. पण तसे करतानाही मी विचारपूर्वकच करायचे.दर वर्षी वर्ष संपल्यावर ,पुस्तके विकताना दुकानदार खुश होऊन थोडे जास्तच पैसे द्यायचा मला !कारण ती पुस्तकं अगदी कोरी वाटावी इतकी छान असायची. कॉलेजमध्ये सुद्धा पॉकेट मनी मिळत नसला तरी बॅग मध्ये थोडेफार पैसे नक्की असायचे. पण कधी उशीर होतोय म्हणून, कंटाळा आला म्हणून ऑटो रिक्षा केली नाही. कॉलेजला, स्टेशन पर्यंत चालतच जायचे. खूप थंडीत सकाळी पावणेसातला कॉलेज सुरु व्हायचे तर मस्त चहा प्यावासा वाटायचा. पण तोही कटिंग प्यायचा.स्टेशनसमोरच फेमस उडपी हॉटेल होते. पण कधी आत जाऊन एखादी डिश खाल्ली नाही.हॉटेलमध्ये जायचं ते कुटुंबाबरोबरच !शॉपिंग साठी बांद्राचं एल्को मार्केट प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही मैत्रिणी ठरवून एकत्र शॉपिंग ला जायचो. तेव्हाही दिलेले पैसे पूर्ण खर्च न करता,परत आणलेले! नेहमी असंच विचार करत राहायचं....
.कुठलीही वस्तू घेताना खरच ती उपयुक्त आहे का? त्याची किंमत, आपलं बजेट ,आता घेणे खरच गरजेचे आहे का की नंतर घेतलं तरी चालेल आणि मग घरात आहे त्या वस्तूचं काय करायचं असं सगळं मनात येतं नेहमीच!

मुलं लहान असताना शाळेचे मिडीयम बाबतचा निर्णय, मुलांना वाचनाची गोडी लागावी त्यांनी शैक्षणिक, खेळ, वक्तृत्व सगळ्यात प्रगती तर करावी, पण त्यांना कुठेही आपल्यावर हे लादलं जातय असं तर वाटत नाही ना ?असं काही काही मनात यायचं. घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींबाबतही तेच !नेहमी त्यांचे वय, त्यांचा स्वभाव ,आवडी-निवडी, त्यांनी वर्षानुवर्ष जपलेली मूल्ये, देवाधर्माबाबतचे यमनियम व्यवस्थितपणे पाळले जात आहेत ना याची चिंता!

          घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा कुठला छोटा मोठा कार्यक्रम असेल तरी घराची स्वच्छता इतर गोष्टींबाबतचा  काटेकोरपणा जपण्यासाठी तडफड! कामवाल्या बाईकडून ,स्वयंपाकीण बाई कडून काही जास्तीची कामे करून घेताना फक्त पैशाचा असं नव्हे, तर मग आपण आळशी होऊन जाऊ  आपली सवय तुटेल कामाची !असे काही काही (गहन विचार ).आजही संध्याकाळी साधं हॉटेलमध्ये जायचं असेल तर, सकाळचा स्वयंपाक नेमका व्हायला हवा ,तो उरायला नको याचा विचार!
      
 प्रवासाला निघण्यापूर्वी बॅग भरताना ट्रॅव्हल लाईट हे नेहमीच मनात असतं .आपल्याला किंवा कुणालाही उचलायला बॅग जड होऊ नये (अगदी हमालालाही )असं वाटतं.ट्रेन मध्ये कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस , जेवणाचा डबा, आणि आधार कार्ड वगैरे इतर आवश्यक बाबी सगळ्याचच खूप प्लॅनिंग असतं.

बरं, जेव्हा आजूबाजूला आपण बघतो ,अनुभवतो ,की लोक किती बेफिकिरीने वागतात.खुशाल पाणी वाया घालवतात! आपल्याकडून जर असं झालं चुकून, किंवा आपण जर पाणी वाया गेलेलं जरी पाहिलं,तरी लगेच आपल्याला पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे ,हे कसं समजवायचं या मंडळींना म्हणून कासावीस व्हायला होतं. सार्वजनिक ठिकाणी गाडीतून किंवा बसमधून कुठलेही wrapper, बाटल्या लोक सहज फेकताना पाहिलं की वाटतं, अरे आपण तर चॉकलेटचा साधा कागदही पर्समध्ये ठेवून घरी आणतो!

 सध्या सोशल मीडियामुळे फारच अलर्ट राहावं लागतं.चुकून एखाद्याच्या पोस्टला रिप्लाय केलं गेलं नाही किंवा विश केलं गेलं नाही तर समज गैरसमज तर होणार नाही ना याची काळजी! मस्त मनात येईल ते बोलणाऱ्या ,मनात येईल तसं बेधुंद आयुष्य जगणाऱ्या ,बेफिकीर ,बेदरकार व्यक्ती पाहिल्या की असं वाटतं ,असं मनमुराद जगण्यात एक वेगळाच आनंद असेल !आपल्याला केव्हा जमेल असं?

           साधं या महिन्यात एम सिरीज असताना,ब्लॉग लिहिणं मला जमणार नाही असं सांगणंही तर जमलं नाही ना मला!
        उसके लिये भी गहराई में सोचती रही.

No comments:

Post a Comment