Sunday, November 14, 2021

अक्षरांच्या वाटा

 


'टाॅलस्टाॅयला वाटायचं की, 'यास्नाया पोल्यानाच्या गर्द हिरवाईत, द-याखो-यात कुठेतरी दूर एक हिरवी फांदी असते, धरतीच्या पोटात पुरून ठेवलेली अन् त्या फांदीला रसरशीत अक्षरांचे घोस लागलेले असतात...', किती सुंदर कल्पना आहे नं? अक्षरांचे घोस! झाडाझाडांवर लटकलेले! संपर्कात येणा-या प्रत्येकाला ज्ञानरसपान करवणारे!...

 अक्षरांचे असे पीक घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे पण "घेता आले तर...", ही कविकल्पना आहे. वास्तवापेक्षा वेगळी असली तरी मनाला सुखावणारी! 
सुखावते यासाठी की, लहानपणी  जे वाक्य ऐकलेलं असतं..., "सुंदर जगण्याचा मार्ग अक्षरांच्या वाटेवरून जातो"..., त्याच्याशी ही कल्पना नातं निर्माण करणारी वाटते. अक्षरांचा असा सुसंगत मेळ शब्दाची निर्मिती करतो. या शब्दाला शब्द जोडून साहित्य निर्माण होतं नि मनाला मन जोडून जीवनगाणं आकाराला येतं.

एक इवलासा शब्द
त्याच्या मुठीत असेल
एखाद्या कवितेचा प्रहर अविनाशी
म्हणून त्याच्या गालांपाशी, डोळ्यांपाशी
माझे काळीज ठेवते मी, 
किती वेडी आहे ना मी!
 असं अरूणाताई ढेरे यांनी लिहिलंय. शब्द हे असे वेड लावणारे असतात. भावनांना व्यक्त करणारे असतात. ते विलक्षण बोलके असतात आणि समाजाच्या सांस्कृतिक स्थित्यंतराचे दर्शन घडविणारे माध्यम असतात. आयुष्य सुखकर करणारे हे 'शब्द मळे' रसिकांसाठी जे फुलवितात, ते असतात साहित्यिक! आपल्या प्रतिभेनं शब्दसृष्टी उभी करणारे हे प्रतिभावंत! ते निर्माण करतात नवनव्या साहित्य वाटा! 
पण... त्यांच्याबद्दल आपल्याला कितपत माहिती असते? त्यांचं लिखाण आपण कितीसं वाचलेलं असतं? हा प्रश्न आपण कधी आपला आपल्यालाच विचारून पहा... उत्तर नकारार्थी येईल. कधीकधी साहित्य वाचनापेक्षा त्या साहित्यिकाबद्दलची ऐकीव माहितीच बरं वाईट मत तयार करत असते. आम्ही वाचनाबद्दल किती गंभीर असतो? मराठी आमची मातृभाषा आहे...त्यातील लेखकांची आम्ही किमान नावं तरी ऐकलेली असतात पण इतर भाषांमधील लेखकांची फार तुटपुंजी माहिती आम्हाला असते. त्याविषयी त्या त्या भाषेच्या प्राध्यापकांना देखिल कधीकधी काहीच सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे. 

 आता हेच बघाना...आम्हाला विसाव्या शतकातील 'मिलोराद पावीच' हा पूर्व युरोपीय कादंबरीकार, ज्याने कुठूनही- कुठेही - कशाही वाचता येतील अशा कादंब-या लिहिल्या, तो माहित नसतो. शब्दकोड्याचा आकृतीबंध स्विकारून त्यानं कादंबरीची रचना केली होती. त्या रचना नि तो लेखक आपल्यासाठी अज्ञात असतो. 
आम्ही कधी 'पेस्सोआ' या पोर्तुगीज लेखकाबद्दल, ज्यानं पन्नासहून अधिक टोपणनावाने लिखाण केलेलं आहे, त्याच्याबद्दल ऐकलेलं नसतं. स्वतःच्या लेखनाबद्दल अतिशय तटस्थ असणाऱ्या या लेखकाच्या लेखनाचा मराठीत एकही अनुवाद नाही पण हिंदीत मात्र, 'एक बेचैन का रोजनामचा' उपलब्ध आहे. ही माहिती नीतीन रिंढेंचं पुस्तक वाचलं की आपल्याला कळते, तोवर ही नावंही आपल्यासाठी अनोळखी असतात.  'हायकूचा संत' जपानचा महाकवी बाशोबद्दल आम्हाला दिवाळी अंकातून तरी कळतं. परदेशी लेखकच काय भारतीय लेखकांचे साहित्य सुद्धा आपल्याला क्वचित वाचायला मिळतं.   
उदाहरणं द्यायची तर.... 'जगणं आणि लिहिणं हे समानार्थी शब्द आहेत. लेखक हा स्वप्न दाखवणारा आणि जगण्यावर प्रेम करणारा असतो', या तत्वानं लिखाण करणारी उडिया लेखक प्रतिभा राय यांच्या साहित्यापासूनही आपण अनभिज्ञ असतो. 

'लेखन हा एक शोध असतो. लेखकासाठी लेखन हा एक नवे प्रदेश धुंडाळण्याचा प्रयत्न असतो', हा दृष्टिकोन जपत लेखन करणा-या कन्नड लेखिका, वैदेही यांचे लेखनही आपण क्वचित वाचले असते.
अशी कितीतरी नावं आणि साहित्य आपल्यापासून दूर आहे. आमच्या वाचनाला मर्यादा आहेत, हे खरं आहे शिवाय महत्वाची अडचण आहे, भाषेची! आणि त्यासाठी गरज आहे, प्रभावी अनुवादाची!

    नीतीन रिंढे म्हणतात तसं, गेल्या चाळीस वर्षातले जगातले मोठे लेखक मराठीत माहित नाहीत तर त्यांचे अनुवाद होणं दूरच राहिलं आहे. हिंदी त्याबाबतीत मराठीच्या पुढे आहे. तिथे जगातले बहुतेक मोठे लेखक-कवी वाचायला मिळतात. मराठीतही ती यायला हवीत.
म्हणून असं वाटतं की, टाॅलस्टाॅयच्या कल्पनेतील 'अक्षरांचे घोस' जगातल्या अनेक भाषारूपी फांद्यांवर लटकलेलेे आहेत. फक्त गरज आहे ती त्यापर्य॔त पोहोचण्याची...! नि त्या वाटा धुंडाळण्याची! 

-सीमा शेटे (रोठे), अकोला.

No comments:

Post a Comment