परवा अचानक माझा मुलगा विचित्र वागायला लागला. काही कारण नसताना चिडचीड, संताप वगैरे सुरु झाला. मग काहीतरी खाणं झालं आणि तो अचानक नॉर्मल झाला. तेव्हा त्याला भूक लागली होती हे लक्षात आलं. मग विषय निघाला TV वर सतत येणाऱ्या जाहिरातीचा. गेल्या काही वर्षांत ही जाहिरात नेहमी पाहायला मिळतेय. एखादी व्यक्ती सर्वांशी भांडायला उठते, अगदी मारायच्या तयारीत येते. आणि अचानक कुणाच्या तरी लक्षात येतं, तिला भूक लागलीय. मग एक चॉकलेट खाऊन ती लगेच नॉर्मल होते.
मुलाला आणि मला एकाच वेळी ती जाहिरात आठवली. मुलगा म्हणाला, “हं, म्हणजे हे असं होणं नॉर्मल आहे. त्याशिवाय का त्यांनी अशी जाहिरात बनवली असती?” मी चमकले. TV वर दिसतं ते नॉर्मल, ते प्रातिनिधिक, तेच खरं हे असं किती लोकांना वाटत असेल? मग मला दुसऱ्या एका चॉकलेटची जाहिरात आठवली. त्यात मोठ्या वयाच्या मुली सगळं तोंड भरवून चॉकलेट खातात. ते बघायलाही किळसवाणं वाटतं. पण हीच खरी खाण्याची पद्धत, हे अचूक प्रेक्षकांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न यातून केला जातो. असं खाल्लं तरच तुम्ही ते ‘एन्जॉय’ केलं, नाही तर आपलं उगीचच ‘गिळलं’. काय साधलं जातं यातून? कुठे जातोय आपण ? कुठल्याही सभ्यपणा , सुसंस्कृतपणाशिवाय आदिमानव जसा वागत किंवा खात असेल, तसं आपण वागणं अपेक्षित आहे? मग आठवलं की, आजकाल तेच जगणं खरं, नैसर्गिक आणि प्रामाणिक म्हणायची फ़ॅशन आली आहे. आणि आपण जे संयमित, सभ्य पद्धतीने जगतो, ते कृत्रिम, खोटं, आणि अँबनॉर्मल ठरवलं जातंय. म्हणजे जे आपण इतकी वर्ष अँबनॉर्मल समजत आलो, ते आता न्यू नॉर्मल असणार आहे आणि आपलं वागणं अँबनॉर्मल!
मग TV वरची एकेक गोष्ट आठवत राहिली. जवळजवळ सगळ्याच मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध दिसतात. अगदी अवंतिका, आभाळमाया पासून ते आता थेट एकीच्या नवऱ्याची दुसरी, तिसरी बायको घरात येऊन बसेपर्यंत. मग हा विषय मांडण्यातला फरकही जाणवत गेला. अवंतिका मध्ये हे असं वागणं चूक आहे हे तिचं ठाम मत होतं आणि तिच्या नवऱ्यालाही पुढे ते पटलं, तरी त्याची शिक्षा त्याला मिळालीच. आभाळमाया मध्ये नवर्याचं असं वागणं दुर्लक्षून नायिकेने त्याला नाही, तरी त्याच्या मुलीला स्वीकारलं. मात्र ह्या लोकांचं हे असं वागणं नॉर्मल नाही, हा विचार कुठेतरी मनात यायचाच (सीरियलवाल्यांच्याही). पुढे हे चित्र सरसकट दिसू लागलं आणि आता तर घरात गुणी बायको असताना नवरा राजरोस लफडी करताना दिसतो. ही लफडी साऱ्या कुटुंबासमोर सुरु असतात. सर्वांना ठाऊक असतात. आणि सर्वांनी ती स्वीकारलेली दिसतात. हाही प्रवास कुठल्या दिशेने जातोय?
भूक, मग ती पोटाची असो कि शरीराची, अशा असंयमित, असंस्कृत, खरंतर बीभत्स पद्धतीनेच भागवली जावी, हेच आता नॉर्मल असणार. आदिमानवाला तरी कुठे कुटुंब वगैरे संकल्पना ठाऊक होत्या?आदिमानव कपडे तरी कुठे घालत होता? म्हणजे आता कमी होत चाललेली कपड्यांची लांबी, कपडे न घालण्याची दिसू लागलेली इच्छा, हेही नैसर्गिक, न्यू नॉर्मल असणार आहे. आदिमानव खऱ्या अर्थाने ‘स्वतंत्र ‘ होता. त्यासाठी काही गोष्टींची किंमत त्याला मोजावी लागत असेलही, पण ते त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अगदीच नगण्य असणार. तुम्ही ओल्ड नॉर्मल संकल्पनांना चिकटून बसणारे जुनाट, प्रतिगामी असाल तर तुम्हाला हे अँबनॉर्मल वाटू शकेल, पण हेच न्यू नॉर्मल आहे.
मग मधली हजारो वर्षं मानवाने जी सभ्यता, संस्कृती निर्माण केली, जोपासली, जपली, ते काय होतं? म्हणजे एवढी वर्षं प्रयत्नपूर्वक जो बदल मानवाच्या वागण्यात, व्यवहारात होत गेला, किंवा मानव जाणीवपूर्वक करत गेला, ते सर्व विनाकारण, व्यर्थ होतं? दोन तास खपून एखादं काम केलं आणि ते निरुपयोगी होतं असं कळलं तरी आपल्या जीवावर येतं. मग ही हजारो वर्षे मानव सुसंस्कृत बनण्यासाठी जे काही करत होता, ते निरुपयोगी ठरवताना जग इतकं नॉर्मल असू शकतं? कुठेतरी काहीतरी घोळ होतोय. माझ्याच डोक्यात काहीतरी केमिकल लोच्या झालाय.
न्यू नॉर्मल जगात हा लोच्या दूर करण्यासाठी उपाय आहे का?
No comments:
Post a Comment