2 ऑक्टोबर--- नुकतीच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री ह्यांची जयंती साजरी झाली. सरकार मान्य सुट्टी जाहीर असल्याने " ती कुणी, कोणत्या प्रकारे साजरी केली, हा अर्थातच चर्चेचा भाग आहे. दोघेही नेते आपल्या आपल्या परीने तितकेच महान; पण गांधीजींचा जितक्या मोठ्या प्रमाणावर आणि विस्तृत लेव्हल वर उदो उदो झाला,अजूनही होतो आहे--(माफी मागते, उदो उदो हा शब्दप्रयोग वापरल्याबद्दल--पण दुर्दैवाने ते खरंय.) तेवढ्याच प्रमाणात शास्त्रीजींना मात्र "उपेक्षित" ठेवलं गेलंय किंवा ते उपेक्षित राहिलेत ,कायमच,असे म्हणता येईल.वर्तमानपत्रातही गांधीजींविषयी रकानेच्या रकाने भरून भरभरून लिहिलं जातं; पण त्याच पेपरमध्ये शास्त्रीजींसाठी मात्र एखादे पान देखील उपलब्ध नसावे? नाही म्हणायला सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या कार्याविषयी, घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांविषयी, त्यांच्या देशाविषयीच्या श्रद्धा आणि निष्ठेविषयी, सरळ, साध्या, निगर्वी आणि निरिच्छ स्वभावधर्माविषयी एक विशिष्ट पोस्ट फिरत असते, तीही वर्षातून एकदा----हेही नसे थोडके. अत्यंत सालस, कायम जमिनीवर पाय असणाऱ्या ह्या व्यक्तीमध्ये देशाचा पंतप्रधान झाल्यावरही तसुमात्र देखील फरक पडला नाही. व्यक्तिगत सुख-दुःखाचा, "पोझिशन" चा किंचितही विचार न करता ज्याने फक्त देश बांधव आणि देशाप्रतीच विचार केला त्याचे कर्तृत्व, त्याची महानता मात्र दुर्लक्षितच राहिली.
शास्त्रीजींना जयंतीच्या शुभेच्छा देखील विभागूनच मिळाल्या, तिथेही वाटेकरी----पूर्णपणे त्यांचं असं नाहीच काही. इतकंच काय, नेहरुजींवर "खास त्यांच्यासाठी" गाणं लिहिलं गेलं---
-" करती है फरीयाद ये धरती, कई हजारो साल
तब् जाके पैदा होता है एक जवाहर लाल---"
गांधीजींवरही खास त्यांच्यासाठी गाणं लिहिलं गेलंय---
" दे दी हमे आजादी, बिना खड्ग,बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल---"
वास्तविक पहाता, हातात शस्त्र न घेता स्वातंत्र्य मिळालं, निव्वळ अहिंसेचा मार्ग पत्करून----हे कोण, कोणत्या आधारावर ठासून म्हणू शकेल? स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं जीवन सर्वस्व वाहून दिलं, भारतमातेच्या चरणी---त्यांचं काय?एका व्यक्तीच्या बलिदानामागे संपूर्ण कुटुंब होरपळून निघाले, त्याचं काय? आणि इतकं करूनही खरा रक्तपात तर स्वातंत्र्यानंतरच झाला. खऱ्या अर्थाने शस्त्रे वापरली गेली, अगणित अत्याचार झालेत, माणूसपणाची विटंबना झाली, त्या सगळ्याचा हिशोब कशात मांडायचा? असो. तर गाणं देखील शास्त्रीजींना विभागूनच मिळालं, हे देखील दुर्दैवच नाही का?----
" एक का नारा अमन एक का जय जवान, जय किसान ---धरतीपर दो फुल खिले, जिनसे मेहेका हिंदुस्तान----"

2 ऑक्टोबर चा दिवस आला की आपल्याला गांधीजीच प्रकर्षाने आठवतात, अर्थात गांधीजींना फक्त त्या दिवसापूर्ती आठवायची गरज नाही, हे देखील तितकेच खरे म्हणा. ते कायमच लोकांच्या स्मरणात आणि मनात अधिराज्य करत असतात. हे भाग्य शास्त्रीजींच्या वाट्याला आले नाही ह्याचे वाईट वाटते. खरे तर "ताशकंद करार" आणि भारत-पाक (1965) युद्धाच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका ह्या दोन्ही घटना अत्यंत महत्वाच्या असल्या तरी-----त्या गोष्टींची हवी तशी दखल कुणाला घ्यावी वाटली नाही. ज्यांचं थोरपण प्रकाशात येत नाही, प्रशंसनीय असूनही----ते "उपेक्षितांच्या यादीत" मोडले जातात.; पण मला वाटतं, त्यांच्या उपेक्षित असण्यातच त्यांची महानता दडलेली असावी का?
रामायणात "उर्मिला", महाभारतात " महामंत्री विदुर, कर्णपत्नी वृषाली", शिवाजी महाराजांच्या इतर पत्नी जशा पुतळाबाई, सकवार,सगुणा बाई-- ही सगळी व्यक्तिमत्वे उपेक्षितच म्हणायला हवीत.--- सई बाई महाराजांची प्रथम,लाडकी पत्नी म्हणून, दुर्दैवी समजल्या गेलेल्या शंभूराजांची आई म्हणून तर सोयराबाई कट-कारस्थानी म्हणून लक्षात राहिल्या. बाकी सगळ्या उपेक्षितच.तसेच स्वातंत्र्य प्राप्तीच्या यज्ञात प्राणार्पण करणाऱ्या महान व्यक्तींच्या पत्नी----- अशी उपेक्षितांची यादी बरीच वाढेल, साहित्य क्षेत्रात, सामाजिक कार्यक्षेत्रात , कला क्षेत्रात आणि अजून बऱ्याच क्षेत्रात----
ह्या सर्वांविषयी मनात आदरभाव असूनही ,"उपेक्षित" ह्या संज्ञेच्या संदर्भात मला दुसरी आणि ठळक बाजू मांडायचा मोह आवरता येत नाहीये, हेही तितकेच खरे----ती बाजू अशी---
ही जी कुणी महान मंडळी उपेक्षित म्हणून राहिली असे आपल्यासारख्याना वाटत असते, त्यामागे ती स्वतःच कारणीभूत असतात असे वाटते. कारण ही सर्व मंडळी ज्या काळात जगली,वागली तो काळ वेगळा होता आणि तो काळ लोटूनही आता दीर्घ काळ लोटला आहे.जगात इतकं साधं,सरळ, प्रामाणिक राहून चालतं का? निदान आजच्या ह्या आधुनिक युगात? झपाट्याने विकसीत होऊ पहाणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात? दिवसागणिक बदलत जाणाऱ्या जीवनशैलीला अनुसरून होत रहाणाऱ्या बदलत्या काळात?
कॉर्पोरेट क्षेत्रात तर तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करत रहावं लागतं. तुमच्याजवळ बुद्धिमत्ता नुसती असून चालत नाही,तर ती दाखवावी लागते, वेळप्रसंगी तिचं प्रदर्शनही करावं लागतं. तुमच्या "आतले गुण" जे कधीही "बाहेरच्या जगाला कसे दिसत नाहीत" म्हणून तुम्ही रडगाणं गाऊ शकत नाही. कुणाला इतका वेळ ही नाही आणि गरज तर मुळीच नाही, तुमच्यातले सुप्त गुण ओढून बाहेर काढायला. नसलेल्या गुणांची बढाई मारावी लागते, असलेले दोष जाणीवपूर्वक लपवावे लागतात. स्पर्धेच्या युगात टिकून रहायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं.जाणीव करून दिल्याशिवाय जाणीव होत नाही,हे मान्य करावेच लागेल तुमच्यातील आत्मविश्वास, चिकाटी, संयम आणि पुढे जाण्याची धडपड ह्याच गोष्टी तुम्हाला स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहात, हे ठरवतात. आणि आजची तरुण पिढी ह्या बाबतीत पूर्णपणे जागरूक आहे असे वाटते. आजच्या तरुणाईला, अर्थात, ज्यांच्या नजरेसमोर एक विशिष्ट ध्येय आहे आणि ते गाठण्याची जिद्द आहे त्यांना "स्वतःला सिद्ध कसे करायचे" हे सांगावे लागत नाही. नवी पिढी विलक्षण वेगाने सगळे जगणे कवेत घेते आहे. नव्या धारणा आणि धोरणांशी नियोजनपूर्वक समायोजन करत आहे. कोणतीही पिढी ही मागच्या पिढ्यांच्या खांद्यावरच उभी असते. मात्र आजची पिढी हा केवळ त्या पिढ्यांचा परिपाक नव्हे. मागच्या पिढीच्या कैकपट पुढे आजची पिढी आहे.आजच्या तरुणाईला कोणताही "वाद" नकोय,वा कोणत्याही "आदर्शवादाशी" बांधिलकी नकोय.त्यांना कोणाच्यातरी चष्म्याने जग पहायचे नाही,मग तो चष्मा मार्क्स चा असो, वा हेडगेवारांचा. त्यांना खरे म्हणजे चष्म्यानेच जग पहायचे नाही. त्यांना त्यांच्या लख्ख, स्वच्छ डोळ्यांनीच हे जग बघायचे आहे. त्यांना या जगावर स्वार व्हायचे आहे, जग जिंकायचे आहे. ह्या पिढीला अतिसंवेदनशील असूनही खरे तर चालणार नाहीये. एकवेळ "प्रॅक्टिकल" असणं मान्य; पण फार भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणे हे त्यांच्या आयुष्याच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने घातक ठरणारे असते.
"सानेगुरुजी" त्या काळातले आदर्श असले तरी त्यांचा हळवा, संवेदनशील स्वभाव,अति वैचारिक क्षमता हेच त्यांच्या आयुष्यात अडथळे ठरले. अशी हळव्या मनाची माणसं त्यांच्याही नकळत "आत्महत्येसारख्या" अत्यंत चुकीच्या निर्णयापर्यंत कधी येऊन पोचलेले असतात, त्यांना देखील कळत नाही. आणि शेवटी कुणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही; पण आपण स्वतः कसे वागावे हे तर आपणच ठरवू शकतो. आजच्या काळात तर "तू फक्त" लढ" म्हणणारे शिक्षक हवेत आणि त्याच जिद्द आणि चिकाटीने ध्येय उराशी बाळगून लढणारे विध्यार्थी हवेत. नेत्यांच्या बाबतीत विचार केला तर आज "मोदीजी" सारखे नेतृत्व हवे. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ह्या गुणांसोबतच
आजूबाजूच्या (विशेषतः शेजारच्या) देशांना "हलवून, हादरवून" सोडेल अशी करणी,
शांत दिसत असले वरकरणी
तरी खऱ्या अर्थाने धोरणी--राजकारणी, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आज तरी अशाच "नेत्यांची" जास्त गरज आहे देशाला. जे "योग्य दिशेने योग्य ती पावले टाकतील आणि इतरांना त्याची उघड उघड जाणीवही करून देतील".
आपण "शास्त्रीजींपासून" सुरुवात केली त्यामुळे शेवटही त्याच मुद्द्याला धरून करावा लागेल. शास्त्रीजींसारखी जी मोजकीच; पण खरोखर महान व्यक्तिमत्वे। आहेत, त्यांना स्वतःला आपण उपेक्षित ठरल्याचे कधी जाणवले ही नसेल. कारण त्यांनी जे काही कार्य केले ते कुठल्याही अपेक्षेविना, निःस्वार्थ भावाने आणि स्वेच्छेने केलेलं असणार; आपल्यासारखी सामान्य मंडळी त्यावर उलट सुलट चर्चा करत रहाते, इतकंच.
पण म्हणूनच मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की आजच्या युगात फार प्रामाणिक, सरळ, साधं असून चालत नाही. अती चांगुलपणा म्हणजे बावळटपणा समजला जातो. व्यक्त न होऊ शकण्याला मुखजड आणि खरे असले तरी स्पष्ट बोलू न शकण्याला भित्रेपणा किंवा कमकुवतपणा समजला जातो. "पाणी फक्त निर्मळ अन खरे हवे" हे तत्व काही खऱ्याखुऱ्या आयुष्यात कामी येत नाही. अर्थात, ह्याचा अर्थ चुकीने वा अन्यायाने वागावे असा मुळीच नाही. पण किमान जशास तसे आणि योग्य व न्याय्य बाजू कायम ठेवत बदलत्या परिस्थिती नुसार स्वतःमध्ये बदल करायला शिकणे इतके तरी हवेच.
पण शेवटी प्रत्येक व्यक्तीचा स्वभावधर्म वेगळा असतोच आणि ती व्यक्ती ज्या वातावरणात "घडलेली" असेल,ज्या आंतरिक संस्कारात विकसित झालेली असेल त्यानुसारच तिचे वागणे ठरते.
फक्त आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, ते बाहेर यायला हवेत, नव्हे आपणच ते जगासमोर आणायला हवेत आणि "उपेक्षितांच्या" यादीत आपले नाव जोडले जाऊ नये, किंबहुना कुणाच्याही वाट्याला उपेक्षित जगणे येऊ नये ,(उपेक्षित हा शिक्का कुणाच्याही नावासमोर लावला जाऊ नये)हीच प्रामाणिक इच्छा.

माणिक
No comments:
Post a Comment