अक्षरा

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे? त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?

Labels

अंजली अर्चना अश्विनी नवी सखी भाग्यश्री मधुमती माणिक मीनल मेधा मोहिनी वर्षा श्रुती सीमा स्वाती

Thursday, August 15, 2019

गप्पा....



तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय..बायकांच्या जरा जास्तच...विज्ञान म्हणतं बायकांच्या मेंदूतलं भाषाकेंद्र हे पुरुषांपेक्षा जास्त विकसित असतं, त्या प्रचंड भावनाशील असतात, त्यांचा शब्दसंग्रह अफाट असतो वगैरे वगैरे...'बायका तर जिथे जातील तिथे गप्पा मारत बसतील' असे टोमणे ऐकायची नाहीतरी आपल्याला सवय आहेच, अर्थात आपण ते फारसं मनावर घेत नाही आणि आता तर हा स्त्री पुरुषांमधला फरक विज्ञानानीच सिद्ध केलाय,  so don't worry, keep talking. 
         आत्ता मागच्या आठवड्यात मी माझ्या मैत्रिणींना भेटायला गेले होते , सगळ्या वेगवेगळ्या ग्रुपमधल्या होत्या त्यामुळे एकत्र जमून चालणार नव्हतं, माझी तर त्यादिवशी त्रिस्थळी यात्रा झाली. 17,18 वर्षांनी आम्ही एकमेकींना भेटत होतो , (आता मध्ये इतकी गॅप कशी ? ,असं विचाराल तर ह्या गप्पा वेगळ्या track वर जातील तेव्हा ते पुन्हा कधीतरी👍) पण काहीही फरक पडला नाही, मधल्या वर्षातल्या आवश्यक तेवढ्या रिकाम्या जागा आम्ही भरून घेतल्या आणि गप्पा मागील पानावरुन पुढे चालू केल्या..वेळ अर्थातच पुरला नाहीच मग गाडीवरच्या गप्पा, दुसरीची वाट बघता बघता उभ्या उभ्या मारलेल्या गप्पा, एक आत चहा करत असतांना तेवढ्यात whatsapp वरच्या गप्पा असे सगळे प्रकार झाले. गप्पीष्ट फक्त स्त्रियाच असतात असे नाही तर पुरुष सुद्धा असतात, आमच्या ओळखीचे एक गृहस्थ असेच फार गप्पीष्ट आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलणं कंटाळवाणे होत नाही अर्थात त्यांची बायको  गप्पीष्ट असेल तर तिची मात्र कुचंबणा होत असेल. माझा भाऊ काही फार गप्पीष्ट म्हणता येणार नाही पण 10वी नंतर पहिल्यांदा एकट्याने बाहेरगावी जाऊन आल्यावर त्या रात्री आम्ही जवळजवळ 3 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो, मुलाला मात्र गप्पा मारायला किंवा ऐकायला आवडतं तो लहान असताना माझी आई आणि मावशी राहायला आल्या होत्या, मावशी फार गप्पीष्ट आणि छान रंगवून किस्से सांगण्यात अगदी माहीर.. माझा मुलगा तेव्हा लहान होता आणि रात्री माझ्याशिवाय कोणाजवळ झोपायचा नाही पण ह्या दोन्ही आज्यांजवळ आवडीने झोपायचा, त्या आजीला परत बोलाव असं तो नंतर कितीतरी वेळा मला म्हणायचा. आत्तासुद्धा माहेरी गेल्यावर तो रात्री आम्हा दोघींना आधी गप्पा मारायला लावतो आणि मगच आमच्या दिवसाची सांगता होते. आता तो शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी आहे तर त्याच्या आणि माझ्या गप्पा फोनवर चालू असतात. 
         मैत्रिणींच्या गप्पा ह्या अर्थातच प्रत्येकीसाठी खास असतात, त्यांना अंत नसतो, त्यात विषयांचं बंधन नसतं. एका विषयावरून गप्पांचा मोर्चा अचानक दुसऱ्या विषयाकडे वळतो किंबहुना ते वळवण्याचं बायकांचं कसब खास असतं ह्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे त्या कुठेही पटकन connect होऊ शकतात , एक ग्रुप उठून गेला की लगेच दुसऱ्या गृप ला जॉईन होतात. निघण्याची वेळ आली की मात्र ,' अगं ते तर तुला संगायचंच राहिलं, शी बाई , काई बोलणंच नाही झालं आपलं ' असं म्हटल्याशिवाय ती भेट पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नाही . जेवणाच्या ताटावरच्या, वाळलेले हात तसेच धरून मारलेल्या गप्पा किंवा फाटकाशी उभं राहून ' निघते निघते ' म्हणत लांबलेल्या गप्पा ह्या कायमच अपूर्ण असतात. माझ्या सासुबाई आणि त्यांच्या दोघी बहिणी सुद्धा फार गप्पीष्ट. उन्हाळ्यात त्या माहेरपणाला म्हणून एकत्र जमायच्या , सकाळी उठून स्वैपाकपाणी आटपायच्या अर्थात हा पूर्णवेळ गप्पा अखंड चालू असायच्याच पण स्वयंपाकघरातलं काम आटोपलं की हुश्श करत पदराला घाम पुसत 'ऐ चल बाई आपण आता जरा गप्पा मारुया' असं म्हणत बाहेर यायच्या आणि मग तिथे त्यांच्या गप्पांचा फड जमायचा.
         बोलण्याच्या ह्या शक्तीमुळे बायका कुठेही लवकर मिक्स होतात, ह्याचं उदाहरण म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर माझे आईवडील दुसऱ्या शहरात स्थायिक झाले तिथे गेल्यावर आई पटकन तिथे रुळली, तिचं माहिलामंडळ सुरु झालं, बाबांना मात्र जरा वेळ लागला. बोकण्याच्या ह्या शक्तीमुळेच कदाचित आपलीकडे शिक्षिका जास्त दिसतात. 
        गप्पा हे खरंतर बायकांसाठी एक टॉनिक आहे. त्यांचे छोटेमोठे प्रॉब्लेम्स त्यामुळे दूर व्हायला मदत होते . प्रसिद्ध लेखिका शांताबाई शेळके त्यांच्या एका लेखात म्हणतात की 'कधीकधी अनोळखी माणसाशी सुद्धा आपण गप्पा मारतो नव्हे त्या जास्त रंगतात'  त्यामुळे 'गप्पा मारो और सेहत बनाओ ' असे काहीतरी नवे घोषवाक्य असायला हवे. पहा , पुस्तक वाचत होते त्या कथेत  गप्पा आल्या आणि माझी गाडी कुठे वळली , चला... पुष्कळ झाल्या ना ब्लॉग गप्पा !!.....भेटू या लौकरच....प्रत्यक्ष गप्पा मारायला .
ReplyForward
at August 15, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: अश्विनी

सोन्याची नाव

( 7 ऑगस्ट, गुरूदेव रवींद्रनाथ ठाकूरांचा स्मृतिदिन, त्यानिमीत्ताने हा लेख)


एक होतं पाखरू. गाणी गायचं पण शास्त्रांचा अभ्यास नाही करायचं. उड्या मारायचं पण नियम कशाला म्हणतात ते त्याला नाही कळायचं. राजाला वाटलं,'असं पाखरू काय कामाचं? उलट यांच्यामुळे फळबागेचं, बाजाराचं नुकसान होतंय.' राजाने मंत्र्यांना बोलावलं. "पाखराला चांगलं शिक्षण द्या." 
शिकविण्याची जबाबदारी राजाच्या मेव्हण्याने घेतली. समिती बसली. खूप विचार केला नि निष्कर्ष काढण्यात आला की, पाखराच्या काड्याकुड्याच्या घरट्यात विद्या मावत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी पिंजरा बनवायचा. कारागिर कामाला लागले. त्यांनी आपले सारे कसब पणाला लावून सुंदर पिंजरा बनवला. लेखनिकांनी त्यात ठेवायला भरपूर पोथ्या लिहिल्या. आता पिंज-यात सगळीकडे विद्याच् विद्या होती. पिंजरा रोज स्वच्छ लखलखीत करायला विशेष नोकर नेमले होते. कारागिर, लेखनिक, नोकर सगळ्यांना घसघशीत मोबदला दिल्या गेला. सगळे खुश!
"पाखरू कसे आहे?", राजाने मेहुण्याला विचारले.
"महाराज, कारागिर-लेखनिक, नोकरचाकर सगळ्यांना विचारा...तेच सांगतील की पाखरू कसे आहे", मेहुणा उत्तरला.
प्रत्येकाला भरपूर मोबदला मिळालेला होताच. त्यांनी एकमुखाने सांगितले की," पाखरू उत्तम आहे. प्रगती करतंय."
प्रत्यक्षात पाखराच्या पिंज-यात सगळीकडे पोथ्याच पोथ्या होत्या. पाखराचं स्वातंत्र्य पिंज-यात बंद होतं. गाण्याच्या ऐवजी ते तडफडत होतं. गज तोडण्याच्या प्रयत्नात रक्तबंबाळ होत होतं. एक दिवस पाखरू मरून गेलं. कोणाला कळलंच नाही.
      ही आहे दृष्टान्त कथा,"पोपटाची  गोष्ट!" बदलत्या शिक्षणपद्धतीवर परखड भाष्य करणा-या या कथेचे लेखक आहेत, रवींद्रनाथ ठाकूर!
'बंधमुक्ती, आनंद आणि सौंदर्यबोध', या गोष्टींचे बीज लहानपणापासून मुलामुलींच्या मनात रूजावे म्हणून प्रचलित शिक्षणपद्धती बदलण्याचा प्रयत्न करणारे रवींद्रनाथ! 
त्यातूनच साकारले त्यांचे बालसाहित्य! 

पाडे पेरू हरीहर
मधुराय बांधे घर

होडी हाके पातुपाल
धान्य आणे जयलाल

धरे सुकाणू दीनानाथ
अविनाश रांधे भात

हे त्यांचे सहजपाठ! शाळेच्या भिंती आणि अभ्यासाचं ताठरपण, पुस्तकाशी बांधलेलं ज्ञान आणि औपचारिक यांत्रिकता यापलीकडेे असलेलं काही तरी...मातीशी मिळून आकाशाची निळाई शोधणारी प्रेरणा त्यांनी शांतीनिकेतनच्या स्वरूपात साकारली. हीच त्यांच्या बालसाहित्य निर्मितीची प्रेरणा होती. चैतन्याशी असलेला हा त्यांचा अंतःसंवाद हा बालपणापासून पाझरत आला होता. 1831 साली कोलकत्ता येथे जन्माला आलेले रवींद्रनाथ पंधरा भावंडात सगळ्यात धाकटे होते. वडील महर्षी देवेन्द्रनाथांच्या  उत्तम बंगाली, इंग्रजी, फारसी, संस्कृतचे संस्कार कळतनकळत रवींद्रनाथांवर पडलेत. तशीच अध्यात्मचिंतनाची ओढही वारसा म्हणून मिळाली. आजीच्या गोष्टी ऐकतच त्यांचं लहानपण सरलं. जत्रानाटकांच्या खेळातून लोकपरंपरेचा धागा पक्का झाला. जोडासांको या खानदानी वाड्यातील 'विद्वज्जनसमागम' सभेने ज्ञानचर्चेचा खजिना खुला झाला. त्यांच्या आसपासच्या वातावरणात एकप्रकारची गुढरम्यता होती. ती गुढरम्य उदासी घेऊन रवींद्रनाथ आयुष्यभर लिहित राहिले. त्या अफाट नि अथांग लिखाणातील महत्वाचा भाग आहे, त्यांच्या बालसाहित्याचा!
'ज्या भाषेमध्ये उत्तम बालसाहित्य  असेल ती भाषा परक्या भाषेच्या आक्रमणानी सहजासहजी मरत नाही', असे वीणा आलासे म्हणतात. ते इथे पटते. बांगला भाषेत रवींद्रनाथांनी भरपूर बालसाहित्य लिहिले. भाषेची बंधने ओलांडून ते जगभर पोहोचले आणि विविध वयाच्या बालकांनी आवडीने वाचलेत. त्यांचे 'सहजपाठ' मुलांची निरागसता व्यक्त करणारे तर 'शिशू' भवतालाशी सुंदर तल्लीनता साधणारे आहे. त्यांचे 'रवींद्रचिंतन' माणसातील उत्सवप्रियता जपणारे आहे. आपली संस्कृती आणि अभिरूची साकारणारे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून, रवींद्रनाथ शांतीनिकेतन पाठशाळेत आगळे प्रयोग करत असत. शांतीनिकेतनमध्ये मुलांवर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कार करण्यासाठी दर श्रावणात एक उत्सव साजरा केल्या जायचा. वटवृक्षाच्या रोपांची पालखी सजायची. ती पालखी चार विद्यार्थी खांद्यावर उचलायचे. पुढे पूजेचं साहित्य घेऊन पाच विद्यार्थीनी चालायच्या. पालखीच्या मागे केशरी साड्या नेसून विद्यार्थीनी तर केशरी कुडते परिधान करून विद्यार्थी सुस्वरबद्ध गाणी म्हणत चालायची. साग्रसंगीत पूजा होऊन वृक्षाचे रोपण व्हायचे नि वृक्षआरतीने सांगता व्हायची. यामागे रवींद्रनाथांचा उद्देश असा होता की, स्वतः नत्र शोषून माणसांसाठी प्राणवायू उत्सर्जित करणारे हे आधुनिक परोपकारी 'देव' मुलांना माहिती व्हावेत. या श्रावण-आरती प्रमाणेच 'पौष-मेळा' आणि होळीउत्सव मुलांमध्ये निसर्ग भान निर्माण करणारे असत. ही शांतीनिकेतनची परंपरा होती. 

जगते आनंदयज्ञे आभार निमंत्रण 
धन्य हल धन्य हल मानव जीवन
नयन आमार रूपेर पुरे 
साथ मिटाये बेडाय घुरे
श्रवण आमार गभीर सुरे
हयेछे मृगन 
धन्य हल धन्य हल मानव जीवन 

विश्र्वाच्या या आनंदयज्ञी धन्य जाहले मानव जीवन, स्वर नादांनी मग्न जाहले भाग्यवान श्रवण....या मानव्य भावनेचे रोपण आपल्या साहित्याद्वारे, अखिल मानवजातीवर ज्यांनी केले, त्या रवींद्रनाथांचे पंचावन्न कवितासंग्रह आणि दोन हजारपेक्षा जास्त गाणी नि तितक्याच कविताही प्रसिद्ध आहेत. आयुष्यभर जे जे उत्तम वाटलं ते ते करणारे रवींद्रनाथ,"आमि कवी आमि शुधू एक्सप्रेशन देई" असे म्हणत असत.
पु. ल. देशपांडे यांच्या सारखे सिध्दहस्त लेखक, रवींद्र साहित्य अभ्यासता यावे म्हणून, केवळ यासाठीच बंगाली शिकले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरूणा ढेरे, यादेखील रवींद्र साहित्याच्या ओढीनेच बंगाली साहित्याकडे वळल्यात. 
प्रतिभेचे मूर्तीमंत इंद्रधनुष्य म्हणजे रवींद्रनाथांचे साहित्य! पिढ्यानुपिढ्या ते वाचले जात आहे. शब्द-रूप-रस-रंग-गंधाचे हे साहित्य वाचकांना मंत्रमुग्ध करत आहे. 1831 ते 1941 या  समृद्ध जीवनपटाने रवींद्र चित्र, रवींद्र संगीत, रवींद्र नाटक, रवींद्र काव्य, रवींद्र गीतं, रवींद्र कादंबरी, रवींद्र ललितबंध असे विविध पारंबी-बहर मनुष्य जीवनास सुखकर केले आहे. आजही ते कालातीत भाषावैभव लेऊन दिमाखात झळकत आहे. केवळ बांगला किंवा नुसतेच भारतीय नव्हे तर जागतिक वाड्•मयाच्या अवकाशात त्याचा स्पंदन झंकार निनादत आहे.

     त्यांच्या गितांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला. दोन देशाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य त्यांच्या दोन काव्यांना लाभले. 
"काळजाने कवी आणि वृत्तीने आई असणा-या रवींद्रनाथांचे बालसाहित्य वात्सल्यरसाचा परमोत्कर्ष गाठतं", असे लेखक प्रवीण दवणे म्हणतात, ते उगीच नाही.अनाथांचे भावबंध उकलून दाखविणारी त्यांची 'बलाई' कथा असो की ग्रामीण भागातील निसर्ग वात्सल्य आणि शहरातील यांत्रिक कृत्रिमतेचा वेध घेणारी,'सुटी'! 'कथा ओ काहिनी'तील ऐतिहासिक वीरत्वाच्या गोष्टी छंदोबद्ध तर गौतम बुद्धाच्या जीवनकथा आनंदबद्ध करणा-या आहेत. या कथा, कविता जशा बालविश्वाचा भाग आहेत तशीच लहानांपासून तर थोरांपर्यंत  शतकापासून मनामनात तरल भावानुबंधाचे उत्कट रेखाटन करणारी आहे,'काबुलीवाला'!
मिनीमध्ये स्वतःच्या मुलीचे भावविश्व पाहणारा काबुलीवाला, त्याच्या मनाची व्याकुळता समजून घेणारे मिनीचे वडील! आणि बच्ची चिमुकली मिनी ते नववधू मिनीचे आंतरभाव! सगळं कसं माणूसपणाचा एक एक पापुद्रा अलगद उलगडवत मनामनात पाझरणारं! रवींद्रनाथांचे सगळंच साहित्य असंख्य गंध-रंगाचं लेणं ल्यायलेलं आहे. काळ बदलला. संदर्भ बदलले. तरीही परिपूर्ण वाटणा-या या कथा आहेत. खरं पाहता बालसाहित्य निर्माण करणे, ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. "बच्चों का साहित्य लिखने के लिये आपको सचमुच घुटनो के बल चलना पडता है, दसबार गिरना पडता है, तब कही एक कविता बन पाती है। जिसमें आप खेल सके और बच्चो को खिला सके। वो उछलती कुदती रबड़ की गेंद है, आसानी से हाथ नही आती और कहानियाँ मनघडंत नही होती। बहुत रियाज चाहिए।", असं गुलजार म्हणतात. तेच तत्व आपल्याला रवींद्र साहित्यात जाणवतं. मनोविस्ताराचा आणि अध्यात्मबोधाचा स्तर सांभाळत वैश्विक सौंदर्याचा रचनाबंध निर्माण करतांना मुलांचे भावविश्व अचूक उभे करणारे, आनंदाचा बोध देणारे साहित्य रवींद्रनाथांनी कलात्मकतेनी लिहिले आहे. त्यांची ही 'सोन्याची नाव' पिढ्या दर पिढ्यांना तारून नेण्यास सक्षम आहे. गरज आहे ती फक्त सर्वांना त्यात सामावून घेऊन संस्कृतीच्या काठाने फिरवून आणण्याची!

- सीमा शेटे (रोठे), अकोला.
(फोटो सौजन्य : गुगल)
at August 15, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: सीमा

Wednesday, August 14, 2019

एक चौक, दोन अनुभव

सकाळी अकराची वेळ. बस स्टँडजवळच्या चौकात नेहमीप्रमाणे भरपूर रहदारी.
प्रत्येकच जण प्रचंड घाईत. आणि चौकात पोहचत नाही तोच लाल सिग्नल लागला. कोणी
मनातल्या मनात चुकचुकत तर कोणी मनातल्या मनात चार शिव्या हासडत करकचून ब्रेक
दाबला. तेवढ्यात झूप झूप करत मागून एक बाईक आली. तिच्यावर तीन तरुण बसलेले.
सिग्नलची पर्वा न करता त्यांनी बाईक दामटली. क्षणार्धात ती बाईक चौक ओलांडून दिसेनाशी
झाली. मागे राहिला तो त्या तरुणांचा विजयी चित्कार आणि त्यांनी आम्हा नियम पाळणाऱ्या
लोकांकडे पाहून टाकलेला तुच्छतादर्शक कटाक्ष! त्यांच्यामुळे एक सायकलवाला धडपडला, एका
बाजूने पायी चालत जाणारे दोन तीन म्हातारे अडखळले, मुलीला शाळेत सोडायला स्कूटरवर
निघालेली एक महिला दुसऱ्या एका स्कूटरस्वार पालकावर आदळता आदळता जेमतेम
बचावली. वाहतूक पोलीस (नेहमीप्रमाणे) एका फळविक्रेत्याशी कसलीतरी गहन आणि
आंतरराष्ट्रीय महत्त्वाची चर्चा करत असल्यामुळे त्याने (नेहमीप्रमाणेच) हे सर्व पाहून न पाहिलेसे
केले आणि तेवढ्यात हिरवा दिवा लागल्यामुळे आम्ही आपापल्या रस्त्याला लागलो.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेळ, तोच चौक आणि लालच सिग्नल. आता तीन मुली एका
स्कूटरवर आल्या. चेहरे स्टोलने झाकलेले. स्कूटर चालवणारी मागे वळून बोलण्यात दंग,
मधलीची दूरवर काहीतरी शोधत असल्यासारखी भिरभिरती नजर आणि मागची पहिलीच्या
बोलण्यात गुंतलेली. या चौकात या वेळी सिग्नल असतो वगैरे क्षुद्र विचार त्यांच्या मनाला
शिवलेही नसावेत. त्यामुळे मागे बघून बोलता बोलता आपण लाल सिग्नलला न जुमानता गाडी
पुढे टाकलीय याची जाणीव वगैरे असण्याचे कारण नाही. गप्पा सुरु असल्याने वेग जरा कमी
होता. त्यामुळे तर रहदारीला जास्तच अडथळा आला. एक मध्यमवयीन बाईकवाला
त्यांच्यावर आदळला. तोही खूप वेगात नसल्यामुळे मुली पडल्या तरीही कोणाला दुखापत वगैरे
झाली नाही. तो लगेच थांबला. तशी त्या ‘ओ काका, मुलींकडे पाहत चालण्यापेक्षा रस्ता पाहत
जा जरा’ वगैरे बोलू लागल्या. चोराच्या ह्या उलट्या बोंबा पाहून तोही संतापला. लोक गोळा
झाले. नेहमीप्रमाणे सिम्पथी मुलींच्याच बाजूने होती. चौकातली वाहतूक खोळंबली आणि
पोलीसदादाला आपली जागतिक महत्त्वाची चर्चा सोडून यावं लागलं. त्यामुळे तो सर्वांवरच
संतापला. एकेकाला आत टाकायची भाषा करू लागला. (वाहतूक पोलीसाने सामान्य
नागरिकाला कोणताही गुन्हा केलेला नसताना असं ‘आत टाकणं’ हे कायद्यात बसतं का, वगैरे
विचार न करताच) वर्दीला घाबरून बघे पांगले. आता ‘आपण विदाऊट लायसन्स, ट्रिपल सीट
जाताना सिग्नलही तोडलाय’ हे लक्षात आल्याने त्या मुलींनी त्या पोलीसला ठेवणीतल्या मधाळ
आवाजात ‘थँक्यू सर’ म्हणत काढता पाय (की चाक!) घेतला. तो पोलीस त्या आभाराच्या

भाराखाली दबून भारावलेल्या नजरेने त्या गेल्या त्या दिशेकडे बघत राहिला. बाईकवाला
केव्हा निघून गेला, कुणास ठाऊक!
at August 14, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: श्रुती

हा छंद जीवाला लावी पिसे ...

आज पन्नाशी ओलांडल्यावर खरोखरच ह्या ओळींची प्रचीती येतेय. आणि सारखं  मनात आल्यावाचून राहवत नाही की इतके  दिवस  का आपण ह्या आनंदा पासून कसे काय  वंचित राहिलो?  लहानपणी drawing आवडायचं . खंर तर तेव्हापासूनच abstract (अमूर्त शैलीतील चित्र) बद्दल एक खास आकर्षण वाटायचं. वेड्यावाकड्या ओढलेल्या रेघोट्या आणि त्यातून व्यक्त  होणारे वेगवेगळे आकार मोहवून टाकायचे. रिकाम्या वेळात वह्यांच्या मागच्या पानावर काहीबाही चित्र मी बरेचदा काढायची. पण बस्स तेवढेच. नंतर मग अभ्यास , पुढच शिक्षण, नंतर लग्न, नोकरी, मुलं, त्यांचं सगळं करणं, घर संसार इ. इ. हे सगळं करण्यात आपल्याला काही आवड होती हेच मुळी विसरून गेली होती. काही दिवसांपूर्वी मात्र माझी भाची अमृता, जी स्वतः छान पेंटिंग करते तिच्याजवळ मी सहज बोलून गेली कि मलाही खूप पेंटिंग करावेसे वाटते तर तिने इतक्या उत्साहाने स्वतः जवळचे रंग , ब्रशेस , कॅनव्हास  सगळं माझ्यासमोर ठेवले अन म्हणाली  "आत्या, तुला नक्की जमेल, करून तर बघ". झालं. अश्यारितीने माझ्या पेंटिंग चा श्रीगणेशा झाला. अन बघताबघता मी त्यात इतकी गुंतून गेले कि एकामागून एक पेंटिंग करण्याचा सपाटाच लावला. मनापासून आवडणारी गोष्ट करायला मिळाली कि मग आपसूकच मार्ग मिळतो , वेळही  काढता येतो हे लक्षात आले. 

 एकदा नवीन पेंटिंग सुरु केल्यावर मग ते पूर्ण होत पर्यंत सतत डोक्यात ते वेगवेगळे आकार, ते रंग, त्यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या त्या वेगवेगळ्या शेड्स हे सगळं  चक्र फिरत राहतं. मनसोक्त रंगांशी खेळायला मिळतं.  कॅनव्हास वर रंग एकमेकांमध्ये मिसळून तयार होणारी रंगांची उधळण अक्षरशः वेड लावते आणी पेंटिंग पूर्ण झाल्या वर मग जे समाधान मिळते त्याला तर खरच तोड नाही. कुठल्याही निर्मितीचा आनंद बाकी खरच शब्दातीत असतो. तेव्हापासून सतत कितीतरी  पेंटिंग्ज  केलेत. आणि हे करतांना अकोल्यातील प्रथितयश  कलाकार श्री. प्रतापसिंग राठोड तसेच राज्यपुरस्कार प्राप्त आर्टिस्ट श्री. सतीश पिंपळे ह्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्याने माझा उत्साह आणखी वृद्धिंगत झाला. श्री. पिंपळे सरांच्या सहकार्याने अकोल्यात माझे एक छोटेसे प्रदर्शन पण झाले आणि नंतर मुंबईला आर्ट्स प्लाझा येथे दुसरे प्रदर्शन झाले. त्यावेळेला  जहांगीर आर्ट गॅलरीत खूप चांगल्या कलाकारांचे प्रदर्शन पाहायला मिळाले. फोर्ट ला फूटपाथवर काही सुंदर चित्रकलेसंबंधी  पुस्तकं विकत घेतली, तिथल्या काही गॅलरीत सुंदर सुंदर चित्रांचा अगदी मनसोक्त आस्वाद घेतला. प्रत्येक चित्र तुम्हाला काहीतरी नवा अनुभव देतं, नवीन शिकायला मिळतं  हा अनुभव आला.  नंतर नागपूरला लालित्य फाऊंडेशन च्या एका आर्ट कॅम्प ला जाण्याचा योग आला तेथे असचं  एक अब्स्ट्रॅक्ट काढलं. आणि आश्चर्य म्हणजे मला त्यात उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं! त्यावेळी झालेला आनंद खरोखरच अवर्णनीय होता. त्याने एक वेगळाच  हुरूप आला. आणखी उत्साहाने चित्र काढायला लागली. त्याच आर्ट कॅम्प मध्ये नागपूरच्या प्रसिद्ध आर्टिस्ट बेसेकर मॅडम शी ओळख झाली आणि त्यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रा बद्दल माहिती दिली. त्या केंद्रा तर्फेच मग नागपूरच्या राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत ६ दिवसांचा एक सोलो शो  झाला. त्या प्रदर्शनात मी तब्बल ६५ पेंटिंग्ज ठेवले होते. त्या दरम्यान राजा  वर्मा आर्ट गॅलरी ला लागूनच ऑरेंज सिटी महोत्सव सुरु होता. त्यामुळे तेथे येणाऱ्या लोकांपैकी जे कलासक्त होते  त्यांची पाऊले आपसूकच गॅलरी कडे वळायची. तेथे आलेले सगळे पत्रकार पण डोकावून गेलेत.  त्यावेळेला नागपूरच्या पत्रकारांचा खूपच  छान अनुभव आला. त्यांनी आपणहुन इतके छान कव्हरेज दिले कि काहीही जाहिरात न करता भरभरून प्रसिद्धी मिळाली. तरुण भारत, लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया, नागपूर टाइम्स, हितवाद, दैनिक भास्कर सगळ्या वृत्तपत्रात पेंटिंग्ज च्या फोटोसह  सविस्तर बातमी आली. सगळ्यांनी खूप कौतुक केले. मला तर सगळं स्वप्नवतच वाटत होतं. त्यानंतर तेथे ओळख  झालेले काही कलाकार  मिळून पुण्याला कोथरूडच्या  यशवंतराव चौव्हाण आर्ट गॅलरीत ग्रुप शो केला तेव्हा पुण्याच्या काही प्रसिद्ध कलाकारांची ओळख झाली. त्यांचे  काम बघता आले. त्यातूनही अर्थातच खूप नवीन गोष्टी कळल्या. त्यानंतर श्रीलंकेला कोलंबो येथे  होणाऱ्या एका प्रदर्शनात सहभागी व्हायची संधी मिळाली. तो अनुभवही खूप काही देऊन, खूप काही शिकवून गेला.

 हे सगळं  इतकं झपाट्याने झाले की मलाच माझ्या आयुष्यातल्या ह्या अचानक घेतलेल्या वळणाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. मधल्या कालावधीत आम्ही माझ्या मुलाकडे कॅलिफोर्नियाला जवळपास ३  महिने गेलो  होतो.  तेव्हा त्याने अगदी सगळं ईस्ट कोस्ट,  वेस्ट कोस्ट मनसोक्त फिरवलं.सगळचं किती सुंदर! सेव्हन्टीन माईल नावाने प्रसिद्ध असलेल्या  एका  नितांतसुंदर रस्त्यावरून जातांना निळ्याशार सुमुद्राचे दर्शन अक्षरशः भान हरवून गेले.  जेथे नजर जाईल तेथे विधात्याने निर्मिलेले भव्य दिव्य अप्रतिम लँडस्केपच दिसत होते जणू! काय आणि किती सांगावे हेच कळत नाही. ते प्रवासवर्णन हा एक वेगळा स्वतंत्र विषय होईल. विषयाला धरून सांगायचे तर त्या सगळ्या प्रवासात मला सगळ्यात मनापासून  आवडलेली गोष्ट म्हणजे सॅनफ्रॅन्सिस्कोचे ‘डी यंग आर्ट म्युझिअम’ आणि SFMOMA म्हणजे ‘सॅनफ्रान्ससिस्को म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्ट’ ह्या दोन्ही ठिकाणी मी मनसोक्त वेळ घालवला. एक एक पेंटिंग बघतांना भान हरपून जात होतं. मात्र काही पेंटिंग्ज मात्र अनाकलनीय वाटले. अर्थात तो माझ्या कुवतीचा भाग नसावा कदाचित. माझी आवड बघून मुलाने नंतर  वॉशिंग्टन चे ‘नॅशनल आर्ट म्युझिअम’ पण दाखवले. हे सगळं बघत बघत नकळतच काही गोष्टी आतमध्ये उमटत गेल्या, चित्र बघण्याची एक नवीन दृष्टी मिळाली हे मात्र नक्कीच. आणि तसंही प्रत्येकाच्या आत  शिकण्याची एक सूक्ष्म क्रिया अखंड  चालूच असते म्हणतात. त्या न्यायाने प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकायला मिळाले हे निश्चित! हा माझा आतापर्यंतचा छोटासा चित्र प्रवास! परमेश्वर कृपेने शेवटपर्यंत ही कलेची ओढ, नवनिर्मितीची क्षमता अशीच राहो  आणि प्रत्येक निर्मितीतून माझ्याबरोबरच इतरांना सुद्धा आनंद मिळो हीच प्रार्थना!

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे 
अकोला 
at August 14, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मधुमती

Tuesday, August 13, 2019

श्रावण आणि जेवण

माझी एक मैत्रिण हॉंगकॉंगला राहते. ती श्रावणातल्या शुक्रवारी तिथल्या तिच्या कोणत्याही एका मैत्रिणीला जेवायला बोलावते. मग ती मैत्रिण चिनी, जपानी, अमेरिकन किंवा भारतीय असल्यास कोणत्याही जातीधर्माची, विवाहित- अविवाहित कुणीही असते. हल्लीच्या इतक्या धबडग्यात माणसं- विशेषत: बायका एकमेकांकडे वेळ काढून जातात ही या व्रतवैकल्याची सर्वात मह्त्वाची बाजू. मलाही श्रावण महिना आला की जेवण किंवा एकूणच खाणं हे कर्मर्कांडं फार इंटरेस्टींग वाटायला लागतं. सोमवारच्या साबुदाणा खिचडीपासून शुक्रवारच्या पुरणापर्यंत कितीतरी प्रकारचे पदार्थ हटकून केले जातात. या दिवसातल्या पदार्थांना एक वेगळीच रूची, रूप, गंध लाभलेला असतो. त्यातून कुणी काही ना काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त जेवायला बोलावलं तर आयतं मिळत असल्याने ’सोने पे सुहागा’.

लहानपणी कुमारिका म्हणून जेवायची बरीच आमंत्रणं येत. लहान असले तरी मी वाढणार्‍या बाईचं नीट निरिक्षण करत असे. त्या कर्तव्यभावनेने पदार्थ पानात पटकत असतील तर मी पुन्हा त्या घरी जात नसे. एका खास आजींकडे बोलावलं की मात्र धाराच्या जाहिरातीतला मुलगा त्याचे भोकराएवढे डोळे विस्फारून ’जलेबी!!!’ असं म्हणायचा तसं माझं व्हायचं. मग मी अगदी नवीन झगा वगैरे घालून, ’पानात काही टाकायचं नाही’ टाईप आईच्या सूचनांना हो हो करून धावत त्यांच्याकडे पोचत असे. जेमतेम दोन खोल्यांचं पण नेटकं घर. गोर्‍यापान, बेताच्या उंचीच्या, मोठं लालचुटूक कुंकू लावणार्‍या, फुलांचं सुरेख लुगडं नेसलेल्या त्या प्रसन्नवदना आजी कानडी हेल काढून ’आलीस! ये हो’ म्हणत माझं गोड हसून स्वागत करायच्या. लाकडी पाट, पाण्याचा पेला, सुबक रांगोळी अशी तयारी असायचीच. मी पाय धुवून येऊन बसले की त्या मला कुंकू लावून, दक्षिणा देऊन, बाकी पदार्थ वाढून गरम पुरणपोळ्या करायला बैठ्या ओट्यावर बसायच्या. एकीकडे त्या घोसाळ्याची गरमागरम, खुसखुशीत भजी तळायला घेत तर दुसरीकडे काठोकाठ पुरण भरलेली गोलमटोल पोळी मऊ हाताने सरसर लाटत आणि सोनेरी रंगावर टम्म भाजून तशीच माझ्या पानात ठेवून तीवर तुपाची धार धरत. मी त्यांच्या हालचाली पाहण्य़ातच दंग होऊन जाई. मग वाढता वाढता त्या माझी शाळेची बिळेची चौकशी करत, काय हवं नको विचारत. सट्ट जेवून मी अगदी खुशीत उड्या मारत घरी येत असे.
तेच आजीच्या दुसर्‍या एका मैत्रिणीकडे बोलावणं आलं की मी नाक उडवत असे. पण त्या आजी पण खूप गोड होत्या आणि माझा गालगुच्चा घेऊन त्या मला काहीतरी छान वस्तू देत असत त्यामुळे त्या मोहाने का होईना मी जायचे. त्यांचं घर मोठं आणि अगदी मोकळं होतं. त्यांची सून नोकरी करायची त्यामुळे स्वयंपाकाला बाई होती. तिने केव्हातरी केलेले अगोड श्रीखंड, वातड पुर्‍या आणि गोटा झालेली अळणी भजी एक वाजेतो गारढोण होत असत. या आजी काही जोशी आजींसारखा लोड न घेता मी येईतो पेपर वाचत बसत. त्यांची नात अबोल होती. मी गेले की ती पलंगावर लांब बसून पाय हलवत माझं नुसतं निरिक्षण करायची, तिचे बाबा लंच ब्रेकमध्ये आलेले असले तर अतिशय शुष्क आवाजात ’काय म्हणते शाळा’ असा एक औपचारिक प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता भिंतीकडे बघत मुकाट्याने जेवत राहायचे, मग कुणीच काही बोलायचे नाही, जुन्या पंख्याचा कंटाळवाणा आवाज येत राहायचा आणि डायनिंग टेबलवर आधीच झाकून ठेवलेल्या ताटात आजी त्या गार गार पदार्थांचा आग्रह करायच्या जे माझ्या घशाखाली उतरत नसत. पुढे पिना, बांगड्यांचे आकर्षण संपले तसं मी त्यांचं आमंत्रण टाळू लागले.
आईच्या एक मावशी पण मला नेहमी बोलावत, रूचकर स्वैपाक करत आणि प्रेमाने गरम गरम वाढत सुद्धा परंतु त्यांचे मिस्टर म्हणजे आजोबा मला फार पीडत असत. म्हणजे तसं तर जगालाच पीडत असत. ते वयाच्या मानाने फारच खुटखुटीत होते आणि याचा त्यांना कोण अभिमान. मग ते सतत, माझं वय काय असेल सांग पाहू, दात बघ माझे, अजून अक्रोड फोडून खाऊ शकतो.. इ. बोलत असत. मी वय साठ म्हटले की खूश होऊन, ’हॅ सत्त्यात्तर पूर्ण, किती?’ मी- सत्त्यात्तर. ’वाटत नाही की नाही!’ मी- अज्जिबात नाही. पण दरवेळा हीच प्रश्नोत्तरं. मला वैतागून एकदातरी शंभर वय सांगावेसे वाटायचे पण मग आपले आमंत्रण बंद झाले तर काय घ्या म्हणून मी आपली माना डोलवत अक्रोडकथा ऐकत बसायचे.

लग्नानंतर सवाष्ण म्हणून, मेहूण म्हणून जेवायची बरीच आमंत्रण यायला लागली. सुरूवातीला ओळख व्हावी म्हणून मी आपली सगळीकडे जात असे. नंतर (काही घरी) माझे जमेनासे झाले. का ते वाचा. एका घरी त्या बाईंना मला (एकदाचे) जेवू घालून बँकेची वेळ गाठायची असायची. त्या तशा चटपटीत आणि सुगरण होत्या पण कर्मकांडं आणि नोकरी या घोळात त्यांचा कल उरकण्याकडे जास्त असायचा. मी बरीच वेगाने जेवते तरीही मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहून बकाबका जेवावे लागायचे. मीही वर्किंग असल्याने मी म्हटलंही, की मी रविवारी येत जाईन तर त्या शुक्रवारवर ठाम होत्या. जरा तिखट लागले की भर्रकन पाणी देत, पाठ ठोकत, घड्याळाकडे एक डोळा ठेवून भराभर वाढत. मला आपण पुण्य़ातल्या हॉटेलमध्ये जेवत असून आपल्या पाठीला वेटिंगवाल्यांचे डोळे टोचत असल्याचा किंवा कुणीतरी ’बापरे हिचा तर अजून भात खाऊन व्हायचाय, किती जेवते ही बया’ असं काही तरी पुटपुटत असल्याचा फील येई आणि घास घशात अडकत असे.
दुसर्‍या एका घरी त्या बाई फारच सुंदर स्वैपाक करत, निगुतीने वाढत. केळीच्या पानावर वाफवलेले शुभ्र कळीदार सुबक उकडीचे मोदक त्या फारच सुरेख करत. त्या सासवासुनांचे आपसात मात्र अजिबातच पटत नसे. मग जेवणपूर्व काळात सासूबाई मला त्यांच्या खोलीत नेऊन सुनेच्या आणि जेवणोत्तर सूनबाई त्यांच्या खोलीत नेऊन सासूबाईंच्या तक्रारी बारीक कुजबुजत्या स्वरात ऐकवत. मला कोणतीच पार्टी निवडून चालणार नसल्याने मी गंभीर चेहर्‍याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेई (पण मत मात्र मोदकांना देई). पुढे सासूबाई देवाघरी आणि सूनबाई त्यांच्या सुनेकडे पुण्याला गेल्या. आता पुढील एपिसोड पाहण्य़ासाठी त्यांच्याकडच्या पुण्याच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षा आहे.
एका सुगरण बाईंनी मात्र मला चांगलंच जेरीस आणलं. त्यांना सार्‍या मुलुखाची घाई. माणसं उठून आन्हिक आवरतायत तोवर या बाई स्वैपाक करून नैवेद्य दाखवून मोकळ्या. मला मात्र वेळ द्यायच्या त्यांच्या नवर्‍याच्या सोयीनुसार म्हणजे एक वाजता. सोबत आणखी एखादे मेहूण असे. त्या सगळं छान गरम करून या मंडळींना वाढत असत आणि मला मानाचं म्हणून ते रामप्रहरी दाखवलेल्या नैवेद्याचं ताट समोर ठेवत, बरं ते पण इतकं वाढलेलं की पुन्हा काही मागायची सोयच नाही. त्यातल्या पालेभाजीने गारगुट्ट होऊन पापुद्रा धरला असे. भाताची मूद कुडकुडीत झालेली असे. त्यावरचे वरण वाळून त्रिकोणी होत असे. कढीचे आळून पिठले झालेले असे. पापड कोशिंबीरीतून ओघळलेल्या पाण्य़ात भिजून मान टाकून निजलेला असे. त्या ऐवजी पोळीचाच पापड झालेला असे आणि कोरडा लाडू बोटाने सरकवला तरी ताटात डंगडंग करीत धावत असे. बाकी लोक मात्र वाफाळत्या भातात ताजे वडे कुस्करत, गरमागरम कढीचे भुरके मारत, लुसलुशीत लाडूंच्या आग्रहाला नको नको, पुरे पुरे करत माझ्या जखमेवर मीठ चोळत असत. शेवटी मी नाना हिकमती लढवून ते आमंत्रण कायमचे परतवून लावण्य़ात आता यशस्वी झाले आहे.
अर्थात कर्मकांडाचा बाऊ न करता मोजका पण सुग्रास स्वैपाक करणार्‍या, मायेने वाढणार्‍या सुगरणींच्या आठवणी तुलनेने खूप जास्त आहेत (म्हणूनच तर जग सुरू आहे) म्हणून त्या लिहिल्या नाहीत. तुम्ही त्यात आहातच याबाबत दुमत नाही पण खात्री करून घ्यायला मला एकदा तरी यावं लागेल ना! मग कधी बोलावताय? :-)

- मोहिनी

at August 13, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मोहिनी

Monday, August 12, 2019

मोरनगर

इंदा च जामनगर ला पोस्टिंग झाल्याचं कळलं अन ते तीथे पोचायच्या आधीच आमचं जामनगर ला जायचा प्लॅन आखून झाला पण!
त्यांना क्वार्टर मिळालं,जेमतेम सामान लागलं असेल अन 'वायू' च्या पाठोपाठ (वायू तर चकमा देऊन निघून गेला) आम्ही जाऊन धडकलो!
अहमदाबाद हुन गाडी लेट झाल्याने रात्री दोन ला घरी पोचलो.
सकाळी जागआली ती मोराच्या आवाजाने! 

कॉफी घेऊन बाहेर येऊन बसले अन अगदी समोर,बगीच्यात पिसारा फुलवलेला देखणा,रुबाबदार मोर दिसला.
इंदा नलिया ला असताना त्यांच्या एअरफोर्स कॅम्पस मध्ये खुप मोर बघितले होते.आपल्याकडे रस्त्यांनी जसे कुत्री,डुक्कर हिंडतात तसे तिथे मोर फिरत होते.
पण या जामनगर च्या मोराची बातच काही और होती!इतक्या जवळून,भरगच्च पिसारा फुलवलेला मोर बघण्याचा हा पहिलाच प्रसंग!
बगीचा खूप मोठ्ठा आहे,सगळीकडे त्याचा मुक्त संचार होता,पिसारा मात्र हक्काची जागा असल्यासारखा त्या विशिष्ट ठिकाणीच फुलवायचा.कदाचित त्या जागेच्या बरोब्बर समोर सोफा,खुर्च्या असल्याने त्याने ती जागा निवडली असावी.शेवटी त्यालाही आपल्या भरगच्च फुललेल्या पिसाऱ्याच कौतुक करायला प्रेक्षक लागत असतीलच न!आम्ही अगदी 5 फुटावरून त्याचा विडिओ काढला तरी तो घाबरला नाही की निघून गेला नाही.आमच्याकडे ढुंकूनही न बघता त्याचा नाच सुरू होता. दोन तीन दिवस तिथे होतो,त्यात हे अवर्णनीय दृश्य दिवसातून तीन चारदा तरी बघितलं,पण मन भरलं नाही.दिल मांगे मोअर(मोर)!
खिडकीतून,त्या जागी मोर आलेला दिसला की लहान मुलासारखं धावत जाऊन तो पिसारा कधी फुलवतो याची वाट बघत बसायचे.त्याची रुबाबदार चाल,डौलदार पदन्यास,ऐटीत घेतलेली झेप,सगळं सगळं अगदी मनसोक्त अनुभवलं आणि कॅमेऱ्यात कैद पण केल.जामनगर च नामकरण मी माझ्यापुरतं तरी 'मोरनगर' अस करून टाकलं.

जामनगर हे गुजरातमधलं पाचव्या नंबरच मोठं शहर.रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावाने आहे ते महाराज रणजितसिंगजी जडेजा यांच हे (नवानगर) संस्थान.आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे हे पहिले भारतीय खेळाडू!त्यांचे वारस दिग्विजयसिंह,हे पण क्रिकेटर होते.खूप आधी सुनील गावस्करांनी केलेली 'दिगजाम सुटिंग'ची जाहिरात येत होती,ती दिगजाम फॅक्टरी जामनगरचीच! दिग्विजयसिंग अन जामनगर याची आद्याक्षर घेऊन हे नाव दिल.तिथे बऱ्याच ठिकाणी दिगजाम चे होर्डिंग्स दिसले. पण ही फॅक्टरी आता मात्र बंद होण्याच्या मार्गावर आहे.
रिलायन्स ची जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी जामनगर ला आहे।रिलायन्स नी आपलं एक वेगळं शहरच तिथे वसवलय.
महाराजा दिग्विजयसिंग जे जामसाहब म्हणून ओळखले जायचे त्यांचा समर पॅलेस जामनगर हुन 30km.वर असलेल्या बालाचडीलाआहे.भारतात ज्या काही 50-60 सैनिक शाळाआहेत त्यातली एक सैनिक शाळा आता त्याजागी आहे.त्याचे प्राचार्य (जे सैन्यातीलऑफिसर च असतात) प्रशांत चे बॅच मेट!त्यांनी आम्हाला शाळा बघायला बोलावलं होत.गावापासून बरच दूर,आत ही शाळा आहे.तिथे शिकणारी मुलं ,शिक्षक,त्यांचा परिवार,येवढीच तिथे वस्ती .
संध्याकाळी त्यांच्या कडे गेलो.महाराजा दिग्विजयसिंग यांचा जो राजवाडा होता,ते आता प्रचार्यांचं क्वार्टर!घर उंचावर,अतिशय भव्य(राजवाडाच तो) अन दोन बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे.घराच्या दिवाणखान्यातून,समोरच्या अंगणातून अन मागच्या गॅलरीतुनअथांग समुद्र नजरेस पडत होता.मागच्या गॅलरीतुन खाली पायऱ्या होत्या,ज्या थेट समुद्रात उतरायच्या.इतका प्रचंड अन थंड वारा होता तिथे की बस! त्यांनी सांगितलं,जेंव्हा ओहोटी येते समुद्राचं पाणी एक दीड किमी.मागे जात,तेंव्हा आम्ही बरेच वेळा तिथे पायी फिरायला जातो.काय खास अनुभव असेल नाही!  ऐकून त्यांचा हेवा वाटला. पण रात्री,एवढ्या मोठ्या घरात, लाटा अन भणाणत्या वाऱ्याच्याआवाजात,वस्तीपासून दूर राहण मात्र फारस आनंददायक नसावं. 
त्यांचा पाहुणचार घेऊन शाळा बघायला निघालो.शाळेची जुनी इमारत जी भूकंपामधे ढासळली ती बाजूलाच आहे.ही नवीन इमारत आणि आजूबाजूचा परिसर मात्र स्वछ आणि नीटनेटका होता।रविवार असल्याने सगळं सामसूम होत. 
या शाळेतून कोण कोण ऑफिसर झालेत कोण कोणत्या उच्च पदावर पोचलेत,त्यांच्या नावाची यादी दर्शनी भागात लावली होती.अनेक फोटो होते।त्यापैकी एक फोटो आठ-दहा पोलिश नागरिक अन क्रिकेटर अजय जडेजा जो रंणजितसिंग जडेजांचा वंशज आहे,यांचा होता.त्या फोटोबद्दल विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते अस....

1939 साली दुसऱ्या महायुद्धात जर्मनी ने पोलंड वर हल्ला केला ,दुसऱ्या बाजूने USSR नी आक्रमण केलं।हजारो पोलिश नागरिकाना USSR मधे अनेक ठिकाणी, त्यात सायबेरिया पण होत लेबर कॅम्प मध्ये नेण्यात आल.पुढे जेंव्हा जर्मनी ने USSR वर हल्ला चढवला बऱ्याच पोलिश बायका व मुलांना तिथून निघायची परवानगी देण्यात आली.बोटीत बसून हे सगळे आश्रयाच्या शोधात निघाले.या खडतर प्रवासात अनेक जणाचा मृत्यू झाला,अनेक मुलं अनाथ झाले.भटकत भटकत अनेक देशांचे नकार घेत ते मुंबई बंदरात पोचले.ब्रिटिश गव्हर्नर नी पण नकारघंटा वाजवली।हे जेंव्हा महाराजा दिग्विजय सिंग यांना कळले त्यांना खूप वाईट वाटले.त्यांनी लगेच जामनगर बंदरावर बोटीला जागा दिली आणि त्यातील शरणार्थींना बालाचडी येथे आश्रय दिला.एवढा मोठा प्रवास करून आलेले ते शरणार्थी अतिशय थकलेले अन कुपोषित झाले होते।महाराजांनी फक्त त्यांची राहण्या खाण्याची सोय केली नाही तर त्यांचे शिक्षण पण सुरू केले .त्यांना परकं वाटू नये म्हणून त्यांच्या रूढी परंपरा जपल्या,ख्रिसमस  साजरा केला. ब्रिटिश गव्हर्नर नी जेंव्हा या शरणार्थी ना ठेवून घेण्यावर आक्षेप घेतला ,तेंव्हा महाराजा दिग्विजयसिंगनी त्या सगळ्या मुलांना दत्तक घेतल अन आपलं नाव दिलं। 
जवळ जवळ  सहा वर्ष हे शरणार्थी  तिथे राहिलेत.
पोलंड स्वतंत्र झाल्यावर मग ते आपल्या देशात परतले.
महाराजां प्रती कृतज्ञता म्हणून, पोलंड ची राजधानी असलेल्या वारस्वा(Warswa) येथील अनेक रस्त्याना(good maharaja square)  तसेच एका शाळेला महाराजांचे नाव दिले आहे.तिथल्या अनेक योजना महाराजांच्या नावाने आहेत.दरवर्षी तेथील वर्तमानपत्रात  त्यांच्याबद्दल लेख लिहून येतात.
एवढ्या दूर अंतरावरचे देश केवळ,'अतिथी देवो भव' या भारतीय संस्कारामुळे कायमचे प्रेमाच्या बंधनात बांधले गेले.
ह्या शरणार्थींपैकी सहा जण,जे आता नव्वदीचे आहेत, जवळ जवळ 70 वर्षांनी जामनगर ला भेट द्यायला आले होते.तेंव्हाचा तो फोटो होता.
तिथून आल्यावर किती तरी वेळ ही घटना सारखी डोळ्यासमोर येत होती.

इंदा नुकतीच जामनगर ला गेल्यामुळे ,तिथे अजून काय काय बघण्यासारखं आहे हे तिलाही माहिती नव्हतं।इतकंच काय, जामनगर बांधणी साठी प्रसिद्ध आहे,म्हणून शॉपिंग ला गेलो तर तिथलं मार्केट 1ते 4 बंद असत हे तिथे गेल्यावरच कळलं.सगळीच दुकान बंद होती ,जी काही उघडी होती त्याचे मालक आरामात गाद्यावर पहुडले होते।
क्षणभर पुण्याला आल्याचा फील आला।
एक होलसेल दुकान (म्हणजे त्याचा मालक) जाग दिसलं म्हणून तिथे शिरलो। सगळीकडे रंगीबेरंगी बांधणीच्या कापडांचे ढीग लावलेले होते,उभं राहायला जेमतेम जागा होती.बांधणीच्या त्या ढिगाच्या मधे उभं राहिल्यावर शे दोनशे इंद्रधनुष्यांमध्ये उभं आहोत अस वाटलं.खूप विविधता होती बांधणी ची! बांधणी इथून एक्स्पोर्ट पण होते.
जामनगर ला मरीन पार्क ,एक हनुमानाचे देऊळ (जिथे पन्नास वर्षांपासून अविरत राम नामाचा जप सुरू आहे),ज्याची गिनीज बुक मध्ये नोंद घेतली आहे, बघण्यासारखं आहे अस इंदा ला कुठून तरी कळलं, द्वारका सोमनाथ ही राहील होत पण आता जाण्याचा दिवस जवळ आला .
यासगळ्या गोष्टींसाठी अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे देखण्या पिसारा फुलवलेल्या मोरासाठी ' एक जामनगर ट्रिप तो बनती ही है'.
बघू कधी जमतंय!
at August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: भाग्यश्री

Sunday, August 11, 2019

घालमेल

"काकू, मुंबईहून  अकोल्याला  यायला  किती वेळ लागतो?त्या पेक्षा  कमी  वेळात तुम्ही  मुंबईहून Frankfurt ला पोचता!इतकं काही, तुम्हाला  वाटतं  तितकं  लांब  नाहीये  Germany!"--इति नचिकेत--(जावईबुवा)
            मला खूप  मजा  वाटली, असेच  काहीसे,  माझ्या  नवर्‍याने,माझ्या  आईला  समजावले होते. "इतकं  काही  लांब  नाहीये  अकोला,रात्री  मुंबईहून निघालात, की सक्काळी अकोला!"
"History repeats" म्हणतात, ते  उगाच  नाही. 
मी एकदम फ्लॅशबॅक मोडमध्ये गेले. 
माझी  आजी: कर्नाटकातील विजापूरची! (आता  ते  बर्‍यापैकी  मोठे  शहर  झालेय) लग्न झालं,  तेव्हा ती  फक्‍त  12  वर्षांची  होती.तिथून दूरवर  असलेल्या,  महाराष्ट्रातल्या भुसावळ  या  गावी  आली,तेसुद्धा  कायमची! त्या काळात फोनचा  प्रश्नच  नव्हता. डाकसेवाही आतासारखी  जलद  नव्हती. काय झालं  असेल माझ्या  पणजीचं? (अव्वा म्हणायचो आम्ही  तिला! )तिलाही  आता 
 मला  वाटतंय, तसच  वाटलं  असणार!वेगळाच प्रदेश,भाषेची अडचण, अगदी  कोवळं  वय, काय  घालमेल  झाली  असेल  तिच्या  जिवाची,पोरीला सोडून  जाताना!
मध्यंतरी जेव्हा मोहिनीच्या आईची भेट झाली, जुन्या आठवणी निघाल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुझ्या पणजीने मोहिनीच्या आजोबांना (गोविंद काका) सांगितलं होतं की,आता तुम्हीच तिचे खरे नातेवाईक आहात, लक्ष ठेवा. कारण ते विजापूरला राहून आले होते व त्यांना कानडी भाषाही येत होती. त्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत त्यांनी वडील भावाच्या नात्याने संबंध जपले होते. (तो काळ खरंच वेगळा होता, असे म्हणावे लागेल, नाही का?)

माझी आई: तिचेही अगदी विसाव्या वर्षी लग्न झाले आणि ती भुसावळहून मुंबई नगरीत आली. पुन्हा बदल! भुसावळला मोठ्या जागेची सवय, मुंबईत तेव्हा लहान लहान घरं असायची, मुंबईचे धावपळीचे आयुष्य, adjustment  आलीच,  मुंबई  कल्चरला रुळायला तिलाही वेळ लागला असणारच! पण तिथे आमचे काही  जवळचे नातेवाईक होते, तर त्यामानाने ती लवकर मुंबईकर झाली.
मी:  माझं तर काही विचारूच नका, जन्मापासून मुंबईत राहिलेली मी, अचानक लग्न करून (विसाव्या वर्षी) अकोल्या सारख्या छोट्या शहरात आले.. मला आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी विचारलय की,तू मुंबई सोडून, अकोल्यात यायला कशी तयार झालीस? इसका जवाब,मुझेही  अबतक नही  मिला........ वो कौनसी जबरदस्त डोर थी, जो  मुझे बम्बईसे अकोला तक खी़ंच लाई????
            मुंबईचं प्रचंड फास्ट लाइफ, कॉस्मोपॉलिटन कल्चर ची सवय, इथे अकोल्यात सगळंच निवांत, शांत........, मोठ्या प्रमाणात साजरे होणारे सणवार, सोवळं -ओवळं, वैदर्भीय भाषा हे मला खूप नवीन होतं. 35 वर्षांपूर्वीचं अकोला, प्रत्येक गोष्टीत प्रचंड तफावत होती. तिथे सहज केव्हाही हॉटेलिंगची सवय, (आवड नव्हे) तर इथे होटेलच  नव्हतं! (केवढा मोठा प्रॉब्लेम नं?)
करून घेतली सगळ्या गोष्टींची सवय!

 ‌         पण आता माझी मुलगी आपली चूल-बोळकी घेऊन परदेशात संसार मांडायला निघालीय म्हटल्यावर, वेगवेगळ्या विचारांनी गर्दी केलीय मनात! कसं करेल? स्वयंपाकाची इतकी सवय नाही, सांगायला कोणी नाही, तिथे अगदी वेगळी भाषा, पूर्णपणे वेगळी संस्कृती, आपल्या देशापासून, आपल्या माणसांपासून दूर, कसं वाटेल तिला?
        तरी आता मोबाईल, व्हाट्सअप, स्काईप, ई-मेल इत्यादी सुविधा असल्याने कम्युनिकेशन सोपे झाले आहे. फेसबूक ,युट्युब वर सर्व रेसिपीज मिळतात. मुलीही आधीपेक्षा वयाने मोठ्या असतात. तरीही अशावेळी होणारी एका आईच्या मनाची घालमेल मला नाही वाटत, पिढ्यान पिढ्या कमी होईल! कारण एका मातीत लावलेलं रोपटं, दुसऱ्या मातीत रुजणं इतकं सहज-सोपं नाही. हां, जर बेसिकच बदल झाला, म्हणजे लग्नानंतर मुलीने मुलाच्या घरी राहायला जायचे, ही प्रथा बदलली तर.......?
at August 11, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मेधा

Saturday, August 10, 2019

पाकीट

"तुम्हाला  इथे सही आणि शिक्के आणावे लागतील मॅडम,अमरावतीच्या ऑफीसमधून ।त्याशिवाय तुमच्या  इनक्रीमेंटचं काम होणार नाही।"
मला असा निरोप मिळाला आणि मी अमरावतीला एका क्ष ऑफीस मध्ये जाण्याची तयारी केली।
कुठलेतरी इनक्रीमेंट माझ्या पगारात जोडले न गेल्यामुळे कसला तरी घोळ झालेला होता।आणि माझ्या अगाध अज्ञानामुळे हा घोळ जवळपास सात वर्ष मला कळला नव्हता।माझं एकवेळ जाऊ द्या।ऑफीसमध्ये माझं सर्विस बुक अपडेट करणाऱ्या कोणालाच ते कळलं नव्हतं।एरवी माझा आणि सर्विस बुकचा संबंधच नव्हता।आणि मी त्यात डोकावून पाहायचं असतं असं मला कधी वाटलंच नव्हतं।
         मला सर्विसबुक घेऊन क्ष ऑफीसला जायचंय ही गोष्ट  मी माझ्या घरी सांगण्याआधी सर्वत्र पसरली।जो तो कामाचं स्वरूप विचारु लागला।मी माझ्यापरीनी सांगितलं। "कमालै तुम्ची !तुम्च्या पगारात इंक्रीमेंट लावलं नाई,हे म्हाईतच नाई तुम्माला ?"असं जो तो आश्चर्यानं विचारु लागला।"मग किती फरक पडतोय पगारात?"हा प्रश्न आला।" मागल्या इंक्रीमेंटांचे अॅरियर्स मिळतील की " ही गोड माहिती मिळाली।मला कशाचाच अंदाज नव्हता।कमालै खरी!
        यथावकाश माझी अमरावती फेरी झाली।"झालं की नै काम ?"हा प्रश्न आल्याआल्या ।
        " झालं "  माझं साधंसं उत्तर।
       "  कमालै! एकाच फेरीत कस्काय झालं?"
       किती वेळा ती कमाल!आणि अमरावतीच्या ऑफीसवाल्यांनी माझा प्रश्न समजावून घेऊन सर्विस बुक नुसतं इनवर्ड करून ठेवून घेतलं।त्यात काय कमाल?मला काही समजेना।
     मी तसं सांगितल्यावर माझे सहकारी पिंजऱ्यातल्या प्राण्याकडे पाहावं तसं पाहू लागले।
" म्हंजे?तुमी आणलं नाय  सर्विस बुक तुमच्यासोबत वापस?" त्यांचा प्रश्न।
    " नाही!ते म्हणाले खूप कामं आहेत ।साहेबांच्या सही शिक्क्याला आठ दिवस लागतील ।नंतर या।"मी सांगून टाकलं।
      " मग आता ?"
       "आता आठ दिवसांनी जाईन पुन्हा आणि घेऊन र्यइन " मी माझ्या परीने संवादाला पूर्णविराम दिला।
        " मग वाढलेल्या इन्क्रीमेंटची पार्टी लागेल  ब्वा" म्हणत माझ्या भोवतालच्या सगळ्यांनी प्रचंड हसून एकमेकांना टाळ्या दिल्या ।
        " कमालै " असं म्हणण्याची आता माझी पाळी होती।यात टाळ्या  देऊन हसण्यासारखं काय्यै?
      " अहो मॅडम,वास्तवात या जरा।सही शिक्कयाला आठ सेकंद लागतात।तिथे आठ दिवस काय करायचे?' कोणीतरी म्हणालं।
       खरंच की।मला का नाही वाटलं आधी तसं?
       " आज्चा दिवस ज्या ऑफीसरला वेळ मिळत नाई,त्याला आठ दिवसानंतरही मिळतच नाई।"
     कोणीतरी स्पष्टीकरण केलं।
      " म्हणजे ?"
      "म्हंजे वाघाचे पंजे" 
      " भेटून आल्या का केबिन मध्ये जाऊन सायबांना? "
       "नाही। त्यांना कशाला भेटायचं?"
      "  मग तर तुमचं सर्विस बुक आठ वर्षही यायचं नाई ।"
     मी बुचकळ्यात तर पडलेच पण जरा सटपटून ही गेलेच।
     " घ्या!भेटायचं कशाला म्हणे!अहो नुसतं भेटायचं नाई तर पाकीट द्यावं लागतंय सायेबांना।तेवा मिळतो सही शिक्का ।"माझ्या ज्ञानात मोलाची भर घातली गेली। 
     आता पाकीट द्यायचं का कसं ते नंतर बघू पण आधी सगळी माहिती तर विचारून घेऊ असा विचार करून मी कसं कोणाला कशा प्रकारे किती वगैरे सगळे  "ककारार्थी "प्रश्न विचारून टाकले।
       मग माझे "सौंगडी" अहमहमिकेनी मला स्वानुभव सांगू लागले ।
      " तुमी है नं गेल्याबरोबर सायबांना भेटून टाका।सही पायजे म्हणा । जे काय असेल ते पाहून घेऊ असं म्हणा।"
    हा प्रकार मला जरा  रिस्की वाटला। "काय असेल ते पाहू " म्हणजे काय?
     " तसं नाई।तुमी केबिन मधे जाऊन भेटा ।आणि सरांना म्हणा मी  यापूर्वी दोन वेळा आले।तर आता सही करून टाका।दोन वेळा आले असं म्हणताना त्यांना दोन बोटं दाखवा ।ते समजून जातात।"
         मी सेल्फी काढताना दोन बोटांनी व्ही करतात तसा करून पाहिला।हे ट्राय करायला जमेल वाटतं।
       "  त्यापेक्षा तुमी है नं तयार ठेवा पाकीट ।बोलताना साधंसंच बोला ।पण है नं, हे पाकीट  असं शर्टच्या वरच्या खिशातून काढ़ायचं  ठेवायचं परत काढ़ायचं ठेवायचं ।म्हंजे बरोब्बर लक्षात येत्तंय।" एकाने बोलताना  तसं करून पण दाखवलं।
       त्यांचं सांगणं त्यांच्या दृष्टीनी सुसंगत असलं तरी एक तपशील ते विसरले होते की मला वरचा खिसा नाही आणि त्यातून पाकीट काढा ठेवा परत काढा म्हणजे............अरे देवा!
       मग एक म्हणाले की "सर्विस बुक मदीच ठेवा ओ पाकीट। आमी तर असंच केलंय।सहीला उघडलं की दिसतंय त्याला बरोब्बर।की झालं काम।"
         "  किंवा  सरळ पाकीट दाखवा त्याला नि द्या ठेवून पर्स मधे ।सही शिक्का झाला की देऊन टाका परत आत जाऊन।" हा आणखी एक मार्ग। " आम्ही असंच केलं " ही आणखी एक अनुभवाची जोडणी।
     शेवटी एका व्यक्तीने सांगितलं की अमूक ठिकाणी तर लोकांनी "हे दहा सर्विस बुक आणि हे सर्वांचे मिळून अमूक पाकीट ",असं सांगून सगळ्यांचे सही शिक्के मिळवले।
      त्यावर कन्सेशन पण दिले का ? दहा पाकीटांवरअकरावे बुक फ्री नाई का? हा प्रश्न मी मूग गिळतात तसा गिळून टाकला।
      एक नक्की कळलं की सरळ काम होण्यासारखं नाही।खूप फेऱ्या होऊ द्याव्या,वेळ लागू द्यावा की सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे पाकीट तयार करावं हा सध्या  माझ्यासाठी प्रश्न क्रमांक एक आहे। 
      आणि पाकीट तयार केलं तर वरीलपैकी कोणत्य "मोड" ने ते द्यावे हा प्रश्न क्रमांक दोन आहे।
     या प्रश्नांच्या मुळाशी अनेक प्रश्नांच्या भेंडोळ्याही आहेत ।ज्यांचे विळखे सावकाश  पण सतत पडतायत आणि आवळतायत   आपल्या सगळ्यांनाच।

at August 10, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: स्वाती

बे एक बे..

स्थळ  - कॉलेज
वर्ग - १२ वा
विषय - मानव विकास
पाठ  - बुध्यांक काढणे
     उदा. राजुचे  शारीरिक वय 15 आणि मानसिक वय 12 तर त्याचा बुध्यांक किती ?
सूत्र
बुध्यांक =मानसिक वय/शारीरिक वय × 100 
 = 12/15×100
मी "चला मुलींनो आधी 15 ने 100 ला भागा "
एक मुलगी "बापरे मॅडम 15 ने 100  ला कसे भागणार"
मला वाटले पूर्णांकात उत्तर येतंय म्हणून हिला जमत नाहीये ,म्हणून मी 100 भागीले 15 असा भागाकार फळ्यावर मांडून मुलींना 15 चा पाढा म्हणायला सांगितला तर सगळ्या मुली कोरस मध्ये " 15 चा पाढा येत नाही मॅडम " 
"बरं मग आपण 15 च्या ऐवजी शारीरिक वय 10 घेऊन वरील गणित सोडवू " इति मी.
" हे अगदी सोपं आहे" (मी - मनातल्या मनात)  100 ला आता 15 ऐवजी 10 ने भागायचे होते . "मुलींनो आता 10 ने 100 ला भागा"
 सगळ्या जणी एकमेकांकडे बघू लागल्या. 
मी पुन्हा विचारले "किती दाहे 100" 
पुन्हा blank चेहऱ्याने सगळ्या माझ्याकडे बघू लागल्या . 
"बरं जाऊ द्या ,तुम्ही रेष ट्रिप खेळल्या का कधी?" 
" हो मॅडम " कोरस मध्ये उत्तर आलं . 
"बरं मग त्यात 10,20,30... असं म्हणत होत्या का " 
"हो मॅडम"
 "किती पर्यंत" 
" 100 पर्यंत" 
" अग मग हाच तर 10 चा पाढा आहे " 
मुली आश्चर्याने "हो का?"
मी आनंदून "बरं मग आता सांगा बघू 100 ला 10 ने भागल्यावर किती उत्तर येईल" 
मुली उत्साहाने "100" 
मला धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं. 
मी नव्याने 10 चा किंवा कोणताही पाढा कसा बेरीज करून तयार होतो हे पायरी पायरीने शिकवण्याचा प्रयत्न केला . मग पुन्हा मूळ गणितावर येऊन "आता सांगा 100 ला 10 ने भागले तर किती उत्तर येईल?"
"90"
आता माझा patience संपत आला ,तरी विचारले "90 उत्तर कसे आले?"
" मॅडम ,तुम्ही नाही का सांगितले 100 मधून 10 वजा करायचे "
आता मला माझी चूक कळली की या मुलींना 10 ने 100 ला भागता का येत नाही ते. तुम्ही म्हणाल की यात माझी चूक काय ? तर माझी चूक ही की मी 12 वीच्या मुलींना टक्केवारीचे गणित येत असावे ,पूर्णांकाचा भागाकार येत असावा आणि तेही नाही तर किमान 2,5,10,15 चे पाढे तरी येतंच असावे ! असे गृहीत धरले ! 

भलें ! या छोट्या छोट्या 12 वि च्या विद्यार्थिनींकडून किती या अवास्तव अपेक्षा?  आता तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्य जनतेला यात अवास्तव काहीच वाटणार नाही ,कारण वीस पर्यंतचे  पाढा किमान चौथी पर्यंत सगळ्यांनी पाठ केलेले असतात असंच आपल्याला माहीत आहे. पण विश्वास ठेवा मी गेल्या 22 वर्षात टक्केवारीचं हे गणित शिकवायला घेतलं की दरवर्षी मला दगडावर डोकं आपटून जीव  द्यावासा वाटतो.तरी यांना कसे येत नाही बघतेच असं म्हणून मी नव्या दमाने त्यांना पूर्ण patience ने शिकवण्याचा अट्टाहास करते. मात्र दिवसेंदिवस विद्यार्थिनींना पाढे पाठ असलेली संख्या खाली खाली येतेय .एवढी की आज 15 च्या पाढ्याने 8 वाजता सुरू झालेला वर्ग 10 वाजता बेच्या पाढ्यावर येऊन थांबला . आणि मी थकून हरून, उद्या बेचा पाढा पाठ असल्याशिवाय मी शिकवणार नाही याने सांगता केली . बरं शिक्षणाची करुण कहाणी  इथेच नाही थांबत .विद्यार्थ्यांचं सोडा  पण एक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका गेली 21 वर्ष वर्षातून दोन वेळा निकाल लावतांना  सहकाऱ्यांच्या मदतीने percentage काढून घेतात . सुरुवातीला पहिल्या वर्षी जेव्हा या प्राध्यापिकेने "2 विद्यार्थिनींपैकी एक पास एक नापास झाली तर कागदावर percentage काढून द्या "असे जेव्हा म्हटले तेव्हा एक सहकारी म्हणाले " मॅडम आमची चेष्टा करता का ? तुमचा 50% result आहे म्हणून " त्यावर त्या भडकल्या आणि म्हणाल्या " मला कागदावर काढून दाखवा 50%कसे येतात?" सांगा आता !
at August 10, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मीनल

Thursday, August 8, 2019

आठवणीतलं आजोळ!

            चंद्रपूर !माझं आजोळ !.........
झरपट नदी.....ईरई नदी........महाकाली मंदीर अंचलेश्वर,कन्यकापरमेश्वरी मंदीर,निकालस मंदीर, गोविंदस्वामीच मंदीर,जनता बाजार आणि जयंत टॉकीज अशा नावांनी परिचीत असलेल चंद्रपूरच माझ्या परिचयाच. लाल मातीचे रस्ते ,परकोटाच्या आतील वार्ड किंवा पेठा आणि गरमीचा उच्चांक! ही चंद्रपूरची ओळख!...........
        भैय्याजी गहाणे! म्हणजे बड नसलं तरी नामांकीत प्रस्थ!.....  वे.शा.सं.रुग्वेदी ब्राम्हण! .......हा मुद्दाम उल्लेख कारण ते भिक्षुकी करायचे .लग्न ,वास्तु,मौंजी आणि तत्सम पुजाउपचार करणारे नामांकीत ब्राह्मण म्हणून नावलौकीक मिळवलेले. नुसत्या चंद्रपुरातच नाही तर पार मुल,साकोली चिमुर,नवरगाव, ब्रम्हपुरी ते वरोरा भांदक पर्यंत त्यांचे नाव. !........... 

          जवळ जवळ ६०००स्क्वे. फुट अशा    लांबलचक पसरलेल्या जागेत उंच भिंतींच्या  कंपाऊंडच्या आत असलेलं घर. लाकडी दरवाजातून अंगणात प्रवेश करताच बाहेरच छोटीशी मोअरी आणि त्यात  दगडी पाण्याची टाकी !,....पायावर पाणी घेऊन आणि चुळ भरुनच घरात प्रवेश हा रिवाज ठरलेला!....  चांगल्या ७/८पायर्या उंचावर असलेल्या  घरात प्रवेश करताच नजरेस पडते ती  छपरी !(व्हरांडा) अगदी लांबोळकी त्यातच उजव्या हाताला लाकडी पाळणा लाकडी मयालीला ( लाकडी नाटा)लोखंडी कड्यांनी फिट केलेला. त्याचबाजूने खाली दोन पायर्या उतरुन न्हाणीघर  आणि त्याला खेटूनच वर जाणारा आजोबांचा जीना. वर माडीवरपण ऐसपैस दोन खोल्या त्यात आजोबांची सगळी पोथ्या पुराण ,पंचागांचा ढीग ,दर्भ,पुजेची तांब्या पितळीची भांडी आणि आजोबांची आरामखुर्ची जेवणझाल्यावर निवांतपणा व वाचनासाठी.. वर माडीवरच त्यांचा बराचसा वावर.  तर खाली न्हाणी घर म्हणजे जवळपास वनरुम किचन इतकं मोठ .आतच पाण्याच भलमोठ विटासिंमेंटच टाक ं त्यात बाहेरील बाजूने असलेल्या विहिरीच ओढलेलं पाणी बाहेरच्या गोमुखाच्या पन्हाळीतून थेट टाक्यात पडेल अशी सोय केलेली. एका कोपर्यात भलीमोठी चूल त्यावर तांब्याचा भलामोठा हांडा पाणी तापवण्याचा  आणि बाजूलाच दररोजच्या कपड्यांची दांडी. आंघोळीसाठी घंगाळ ,आंघोळ झाली की तिथेच कपडे बदलावयाची कोरडी खोली ते बदलूनच खोलीबाहेर यायचं इतकी सोय आतल्याआत.लहानपणी तर आम्ही दोघी तिघी बहिणी मिळून सोबतच केलेली आंघोळही आठवते इतकी ऐसपैस जागा .आता ओसरीच्या मधोमध 'माजघर '!ज्याला बोलीभाषेत 'मावद' पण म्हणायचे काळाशार मजबूत कोरीव दरवाजा ., कडी कोयंडापण तितकाच मजबूत आणि खास दणकट असा. ही खोली म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही रुतुतील ऊबदार खोली म्हणूनच बाळंतिणीची खोली म्हणून सुद्धा अतिशय उपयोगी. याच  माजघराच्या डाव्या हाताला स्वयंपाक घर !तेपण चांगलं लांबलचक अघळपघळ .स्वयंपाकघरात एका कोपर्याला छानस भिंतीतल देवघर  आणि उजव्या हाताला मातीचा बसका ओटा, त्यात मातीच्या दोनतीन चुली रोवलेल्या .दररोज पहाटेच चुलींना चुलीच्या लगतच्या भिंतीला आणि त्या बसक्या मातिच्या ओट्याला पांढर्या मातीच सारवण. अगदी स्वच्छ माती शेणाचा टिपीकल वास!.......सकाळ्या कोवळ्या ऊन्हाच्या कौलातून आलेल्या तिरीपीमाध्ये आणखीणच ऊजळून निघालेलं ते रुपडं अगदी मनमोहक. बाजुलाच पाण्याची   सतेली ,घागर  हांडे, कळशा अशी भरलेली दणकट पितळीची चकचकीत भांडी आणि वापरायचे तांबेभांडे सुद्धा छोट्या घागरीएवढे आणि विविध घडणावळीचे होते. आज जर असते तर अगदी ॲन्टीक पीस म्हणून वाखाणल्या गेले असते. जेवायची  ताट वाट्या पेले पण  पितळीचीच कल्हई केलेली .एक दोन काय ती स्टीलची ताट होती त्यासाठीही आम्ही भावंड भांडत असु. आजोळी गेलं की ,ताटपाट मांडणे मीठ पाणी वाढणे ही आम्हा मुलींची कामं होती. पाटसुद्धा मजबूत लाकडाचा  पितळी फूलांनी सुशोभित केलेली आठवतात मला..वाढण मात्र मोठेच करायचे. उष्टविटाळ होतो, खरकट बरकट काहीच मूलांना कळत नाही आणि सोवळ्यातला स्वयंपाक दररोजचाच त्यामुळे तिथे लुडबुड करण्याचा प्रश्नच नव्हता. दररोज आजोबांच जेवण झालं की त्यांना खलबत्त्यात कुटलेल पान लागायच ते कुटून द्यायला आवडायच कारण त्यांच्या वाटीत तांबूल काढून दिल्यावर खलबत्त्यात मुद्दाम थोडा ठेवायचा आणि तो खलबत्ता धुवायला नेतांना सगळ्यांच्या नकळत तेवढाच चिमुटभर तोंडात टाकायचा कारण पान लहान मुलांनी खाऊ नये म्हणून सगळा  हा लपाछपीचा कारभार.आजोबा तसे कमीच बोलायचे पण त्यांचा धाक मात्र जबरदस्त !......बाहेरच्या दरवाज्याची कडी वाजली की सगळे शांत .पण एक मजा राहायची बाहेरुन पुजेवरुन आजोबा आले की ,कधी फळ ,कधी सत्यनारायणाचा प्रसाद. ....खारका ,बदामा तर रोजच्या ठरलेल्याच .आम्ही सगळी नातवं गोल त्यांच्या भोवती बसायचो की ते सगळ्यांना वाटणीने खाऊ द्यायचे. लहानपण खरच किती  निरागस असतं नाही.. 

.....स्वयंपाक घर म्हणजे घराचा आत्मा .जिला जिवंत खोली म्हणते मी .दुपारी लवंडायचसुद्धा आजीने तीथच. डोक्याला घेतलेला पाट  तीच तीची उशी .सतत कामात व्यस्त असणारी आजी  मला आठवते . आम्ही तिला मोठीआई म्हणायचो. सडसडीत बांधा गोरा वर्ण सतत कामाचा ऊत्साह ओसंडून वाहणारा! नको गं आता राहू दे तुझ्याने होत नाही गं!... तरी धडपडा करुन आपल्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालणार .प्लेन मोठ्या लोखंडी तव्यावरचे आयते(धीरडे) भरपूर लसुण घातलेले घरातल्या १५/२०जणांना गरमागरम  करुन खायला घालायची. याऊपर तिळाच्या कोसल्या,ज्वारिची पातळ आंबिल. दुपटीची साखर घालूनकेलेल्या तवाभर मोठ्या   पुरणाच्या पोळ्या.ही तिची खासियत !.आग्रहाचा तर तिचा हात कोणी धरुच नये.वरतुन आजकालचे पोरं नुसते मिचके खाणारे  अगदीच तोळामासा अशी म्हणायची. मला आठवत ते तिच्या घरातल्या असलेल्या अगदी आमच्या उंचीच्या भल्यामोठ्या लोणच्याच्या बरण्या.आंब्याच   तिखट मोहरीच लोणच, गोड गुळाच,गुळाचच लसुण घातलेल ,तक्कू, टूटूमाईच्या शेंगाच आणि भोकराच.असे सगळे प्रकार अतिशय भरपूर करायची .करायचा आणि द्यायचा  दोन्हीहींचाही भरपूर उरक ! .....भोकराच तर डेरेदार झाडच आमच्या मागच्या अंगणात होत.त्याच झाडावर आम्ही लपाछपीपण खेळायचो.मागच अंगणही  मोठ्ठच होंत!....आजीकडची एक पद्धत म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल वाचून प्रत्येक दारासमोर रांगोळी असायची तुळशीजवळ वेगळी घराच्या समोर दोन दार त्या प्रत्येकासामोर!.. तर बाहेर म्हणजे बंदीस्त कम्पाऊंडबाहेर पुन्हा अंगण तीथे पण रांगोळी बाहेर तिथेच रहाटासह ऊंच विहीर .चंद्रपूरच्या दुष्काळात आमच्यासह वेटाळातल्या लोकांना साथ करणारी. तीथेच दगडावर धुणीपण व्हायची. अरे परसदार तर राह्यलच तीथेपण रांगोळी आणि हो बंगल्यासमोरपण रांगोळी .हुश्श!........

आता हा बंगला काय प्रकार आहे ब्वॉ !असं नक्कीच वाटेल पण आमच घर इंग्रजी उलट्या Lआकाराचं सरळ मुख्य घर हे चुनामातीत बांधलेल साध्या कवलाच  तर बंगला म्हणजे प्लीन्थवर बांधलेल सीमेन्टमधल्या बांधकामाच. इंग्रजी कवेलू शाकारलेल्या दोन मोठ्या खोल्या त्यातही बंगई(पाळणा)खोलीभर त्याकाळातले  रवी वर्मांच्या क्ॲलेंडरचे फोटो.कुठे मण्यांची फ्रेम,मिठ्ठूची फ्रेम असं बरच काही. पाहुणे आले की खास बैठक व्यवस्था करुन बसावयाची ही खोली. अशा ह्या सगळ्या आठवणी बालपणाकडे नेतात तेव्हा जाणवतं की आजही चंद्रपूरी भाषेचा तो लहजा ,हेल काही   टिपीकल चंद्रपुरी शब्द अजुनही आपल्या स्मरणात आहेत.. ..आजोबांची खासियत म्हणजे  ते उत्तम तबलापटू होते आणि वेळ प्रमाणनुसार लगेच जन्म टिपण करायचे. माझ्या मुलीची जन्मवेळ कळवताच उलट टपाली सविस्तर टिपण हजर .पत्र तर इतक नीटनेटक लिहायचे  की, घरची शेजारपाजार्यांची ख्यालीखुशाली अगदी सविस्तर ! अगदी वयाच्या सत्तरीपर्यंतही फक्त आणि फक्त पायी चालणे हा कटाक्ष आणि तिनशे पासष्ट दिवसही कामात व्यग्र असणारे आजोबा . ते गेल्यानंतरही त्यांच्या पुढील कामाच्या तारखांच्या नोंदी डायरीत  होत्या. असच    व्यस्त आणि मस्त जगायला  मलाही नक्कीच आवडेल म्हणून हा शब्दप्रपंच!..........

@...अर्चना मुळ्ये.
at August 08, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: अर्चना

बातमी

बातमी काढणं ह्याचा अर्थ माहिती मिळवणं असाही होतो. आणि  जेव्हा "बातम्या" शब्द वापरला जातो, तो जरा विस्तृत स्वरूपात येतो. "बातमी"--मग ती कुठलीही, कोणतीही असू शकते. घरातली, शेजार पाजारची, गावातली,देशातील----बातम्या ऐकणं हा काहींचा छंद असतो. म्हणजे काही लोक (हे बहुदा बरंच रिकामंपण असलेले) दिवसभर त्याच त्याच बातम्या ऐकत, पहात रहातात. घरगुती बातम्यांना आपण घरातील परिस्थिती जाणून घेणं म्हणूया. शेजार पाजारची बातमी काढणं, ऐकायला आवडणं हा गॉसिपिंग चा भाग झाला.आणि विस्तृत स्वरूपात म्हणजे आपल्याच शहरात, देशात काय चाललंय? कुठे काय घडतंय?  ह्या विषयी बातम्या पाहणं म्हणजे थोडीफार उत्सुकता, काही प्रमाणात राष्ट्रप्रेम, किंवा सजग, सुजाण नागरिक असल्याची जाणीव असणं.  बातम्या देण्याची माध्यमे म्हणजे आपण स्वतः, t. v. वरील न्युज चॅनल्स, वर्तमानपत्रं, रेडिओ, आणि इंटरनेट वरील विविध sources. 
     खरोखर किती लोकांना देशातील (परदेशातील बातम्यांमध्ये इंटरेस्ट असणारे फार क्वचित असतील) घडामोडी विषयी जाणून घेण्यात मनापासून इंटरेस्ट असतो? आणि बातम्या पाहिल्यावर वा ऐकल्यावर वा वाचल्यावर  नेमकी प्रतिक्रिया काय असते? ती किती वेळपर्यंत टिकून राहते? त्याचा कुणाच्या आयुष्यावर, वागणुकीवर किती आणि कसा परिणाम होतो? होतो तरी का?  हे सगळे प्रश्न जेव्हा मनात घर करू लागले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपण बातम्या अशाच पाहतो, वाचतो, ऐकतो ज्याला "न्युज व्हॅल्यू" आहे. सनसनाटी बातम्या आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागत नाही.  आपल्यालाही फार खोलात जाण्याची गरज वाटत नाही. आपण सविस्तर पेक्षा "थोडक्यात" वर जास्त भर देणारा वर्ग. म्हणूनच विस्तृत बातम्या, संपादकीय यापेक्षा बातम्या 20-20, सुपरफास्ट बातम्या, एका मिनिटात 50/ 100 बातम्या, टॉप टेन --- असं सगळं पहायला आवडतं. (अपवाद असतातच)  आयुष्य हे "कसोटी" पेक्ष्या "वन डे आयपीएल" म्हणून अधिक रुचकर झालंय, असं कुणीतरी म्हटल्याचे आठवले. 
      हा विषय घेण्यामागच कारण म्हणजे नुकतंच वाचण्यात आलं की "निर्भया" प्रकरणावर आधारित "दिल्ली क्राईम" म्हणून नेटफ्लिक्स ने एक वेब सिरीज तयार केलीये. निर्भया प्रकरणात काय घडले, कुणाला काय शिक्षा झाली, जनता कशी पेटून उठली, याबद्दल सविस्तर माहिती बहुतेकांना आहेच.;पण या घटनेचा तपास कशा रितीने केला गेला, कुणाला ह्याचं खरं श्रेय जातं ह्या बाबतीत मात्र आपण अनभिज्ञ असतो. 
  16 डिसेंम्बर ला ही घटना घडली.पांढऱ्या रंगाची खाजगी बस, तिचे ढोबळ वर्णन नी आरोपीच्या संभाषणातून ऐकलेली त्यांची नावे या व्यतिरिक्त हातात काहीच नसताना एवढ्या मोठ्या दिल्ली शहरात , एवढ्या प्रचंड लोकसंख्येत ते सहा आरोपी शोधणं किती जिकिरीचं असेल? तरीही पोलीस यंत्रणेने घटनेच्या केवळ 2 दिवसात चार आरोपींना जेरबंद केलं  आणि पुढचया दोन दिवसात उर्वरित  दोन आरोपीतील  एकाला दिल्लीतून आणि एकाला बिहारमधून अटक केली. केवळ अटक करून चालणार नव्हतं
 सर्वांचे आरोप निश्चित व्हावेत, कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सबळ पुरावे गोळा करण्याचे कामही पोलिसानी केले.

देशातील जनतेच्या मनातली ,त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,ही इच्छा न्यायाधीशांच्या  निकालातून स्पष्ट झाली, त्याचे सर्वात मोठे  श्रेय जाते, पोलिसांच्या अथक परिश्रमाला. परंतु आजवर आपल्याला तयांचया मेहनती बद्दल तर सोडाच, त्या तपास कार्याच्या प्रमुखबद्दल सुद्धा माहिती नाहीये.  साऊथ दिल्लीच्या डी सी पी छाया शर्मा ह्यांच्या स्पेशल टास्क फोर्स द्वारे ही सर्व शोध  मोहीम पूर्ण झाली. त्या नेतृत्वाला, त्या टीम च्या दिवासरात्री च्या मेहनतीला सलाम म्हणूनच नेटफ्लिक्स ने ही वेब सिरीज सुरू केली आहे, जिचे नाव आहे "दिल्ली क्राईम". 
       ह्या घटनेची आठवण येण्यामागचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले "ऊंनाव " प्रकरण.कितीही कठोर कायदे केले, कितीही कठोर शिक्षा सुनावली गेली तरी स्त्रियांवरील अत्याचार कमी का होत नाहीत,असा प्रश्न प्रत्येक सज्जन, पापभिरू माणसाच्या मनात कायमच निर्माण होत आलाय. ह्या प्रकरणाच्या खोलात न शिरता इतकेच म्हणावेसे वाटते, की बलात्कार असो, अत्याचार असो, खून, दरोडा,वा कायदे भंगाची घटना असो, अशा प्रत्येक गुन्ह्यामागे असते ती त्या व्यक्तीची मानसिकता. जशी मानसिकता असेल तसे कृत्य घडते. सर्वसाधारणपणे क्रिमिनल केसेस मध्ये आपण एकतर पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा ह्यावर सर्व सोपवून मोकळे होतो किंवा त्यांना दोष देऊन मोकळे होतो; पण प्रत्यक्ष केस solve करत घडताना त्यांनाही बऱ्याच अडचणीतून जावे लागते हे आपल्या लक्षात च येत नाही
 इतकेच काय, प्रत्यक्ष गुन्हा घडत असतानाही एकीकडे गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा धाकच राहिला नाही म्हणत आपणही गुन्हेगारांच्या धाकाने सोयीस्कर रित्या आपले अंग काढून घेतो. जिवाच्या भीतीने साक्ष द्यायला घाबरतो.  एक जागरूक नागरिक म्हणून आपण इतके तर नक्कीच करू शकतो, की एखादी घटना (वाईट) घडत असताना पळून जाणे, video शूटिंग करत बसणे, फोटोज काढणे यापेकशा गरज असेल ती मदत करणे आणि योग्य तो निर्णय घेणे.  एरवी आपण " मी" मधून कधीही बाहेर येऊ शकत नाही. मी असा मी तसा, मला हे चालत नाही, मला ते आवडत नाही---- पण हाच "मी" जर आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून विचारात घेतला, जसे , मी रस्त्यावर कचरा करणार नाही, मी पर्यावरण संतुलन ठेवण्यामागे मोलाची भूमिका निभावेंन, मी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळीन, मी समोर होत असलेला अन्याय सहन करणार नाही----- तर बरेच सकारात्मक बदल घडू शकतील.   
     समाजात रहायचे तर समाज भान विसरून चालत नाही. प्रत्येक वेळी सरकारला, पोलीस यंत्रणेला, न्याय व्यवस्थेला दोष देऊन उपयोगाचे नाही. प्रत्येकाने स्वतापासूनच सुरुवात करावी, चांगल्या कामाची. म्हणजे आपोआप समाजाची सुधारणा होईल. असंतुष्ट आणि निष्क्रिय जनता तक्रार करत रहाते; पण ज्यांना काही चांगले बदल घडवून आणायची इच्छा आहे ते त्या दृष्टीने पावलं उचलतात.  जगात साधन संपन्न आणि साधन हीन अशी दोन प्रकारची समुदायातील व्यक्ती वावरत असतात. प्रत्येक वर्गाला कधी ना कधी कशाची तरी कमतरता जीवनात भासतेच. ही कमतरता काहींना सृजनशील बनवते तर काहींना गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळवते.  रशियन लेखक " फह्योदोर दोसतोयवस्की" ह्यांच्या क्राईम अँड पनिशमेन्ट आणि आयन रँड ह्यांच्या 1939 मधील "द फौंटेन हेड" ह्या कादंबरया मधेही हा विचार मांडण्यात आला आहे.
एका चित्रपट समीक्षकाने म्हटलंय की कायदा हा दोन प्रकारचा बनवला गेला पाहिजे. सामान्य लोकांसाठी एक आणि सृजनशील लोकांसाठी दुसरा. समस्या ही आहे की समाज अत्यंत सृजनशील असल्याचे काही ठिकाणी पहायला मिळते. अगदी विषम परिस्थितीतही जीवन जगण्याची आशा, मार्ग शोधले जातात. मुंबईतील एका टॅक्सी ड्रायव्हर ला लवकर गाडी चालव असे वारंवार सांगितले गेले तेव्हा तो काय म्हणाला असेल? घाई सगळेच करत असतात; पण कोणी कुठे पोचलेले पाहिले नाही कधी . सॉक्रेटिस,  aristotle पेक्षाही मोठी गोष्ट हा टॅक्सी ड्रायव्हर सांगून गेला.  हा फक्त एक किस्सा झाला; पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, माणूस कुठे रहातो, कोणत्या परिस्थितीत रहातो याही पेक्ष्या तो कसा रहातो, अर्थात, त्याची जीवन जगताना ची मानसिकता कशी आहे, तो सकारात्मक, नकारात्मक गोष्टींकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहणे महत्वाचे. 
         आपल्या भोवताली जे काही घडतं, ते आपल्या समोर बातमी च्या स्वरूपात येतच असतं. नुकतीच घडलेली ताजी पण अत्यंत वाईट घटना आणि बातमी म्हणजे,  सुषमा स्वराज यांच्या दुःखद निधनाची बातमी. बातमी ऐकून सगळे हळहळले. त्यावर कित्येकांनी लिखाण केलं, सोशल मिडिया वर खप साऱ्या पोस्ट्स आल्या------पण आल्या आणि 8 दिवसाचया आत विरल्याही. जो तो आपापल्या कामाला लागलाही. आयुष्य कुणासाठी थ।बत नसते, हे जरी खरं असलं तरी अशा चांगल्या व्यक्तींना फक्त श्रद्धांजली वाहून हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या तील गुण अंगिकरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा आदर्श ठेवून वागण्याचा प्रयत्न केला तर ते स्वागतार्ह ठरेल. "मी आण्णा" म्हणून डोक्यावर टोपी मिरवल्याने कुणी आण्णा होत नाही, आणि "गांधीगिरी' केल्याने इच्छित साध्य होतेच असेही नाही. असो. 
    शेवटी इतकेच की बातमी चांगली असेल, सकारात्मक असेल तर त्यापासून काही शिकता यायला हवं आणि नकारात्मक असेल तर त्यापासूनही धडा घेता यायला हवा. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, मग ती कोणतीही असो आपल्याला काहींना काही शिकवून जातच असते. 🙏
        माणिक नेरकर.
at August 08, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: माणिक

Tuesday, August 6, 2019

घरपोच सेवा

पुलंनी दारावर विकायला येणाऱ्या विक्रेत्यांचे इतके मस्त वर्णन केले आहे. दारावर येणाऱ्या विक्रेत्यांचे विशिष्ट आवाज, शब्दोच्चार आणि  मालाची विक्री करणाऱ्यासाठी त्यांनी त्यांच्या पध्दतीने जुळवलेली यमकं असलं अफलातून वर्णन की वाचून हसता हसता पुरेवाट होते. अकोल्याच्या गल्लीत येणारे हे विक्रेते मला आठवू लागले,तिथे घरं बैठे फारतर एक, दोन मजली. त्यामुळे त्यांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू यायचे.  मोठ्या शहरात, टोलेजंग इमारतींच्या गर्दीत हे सर्व हरवले आहे. 
 खरंतर रोज अगदी घराशी ताजी ताजी भाजी, फळ घेऊन खाण्याला उत्तम चव असते. हे मी बरेच वर्ष अनुभवल आहे. मग आपली पाककला थोडी डावी असली तरी 'धकून" जातं. 😊तर असे हे भाजीवाले, फळवाले त्यांचाशी अनेक वर्षांचा ऋणानुबंध जुळला होता. भाजीवाला जवळपास १९-२० वर्ष मला इमानाने भाजी देत होता. आणि फळवाला २४-२५ वर्ष फळ देत होता. इतके वर्षाचा ऋणानुबंध विसरणे तर शक्यच नाही.
भाजीवाला त्याच्या भसाड्या आवाजात" हां जी भाजीवाला" अशी सुरुवात करून हातगाडीवर असलेल्या नसलेल्या सगळ्या भाज्यांची नावे क्रमवार घ्यायचा ते पण लांब लांब वाक्य म्हणून. आलं, लसूण, हरीमिर्ची, सांबार पासून तर भरताचे वांगे, बरबटीच्या शेंगा... पालक, मेथी, चवळी पासून तर कोहळ्यापर्यंत... कोथिंबीरीला विदर्भात सांबार का म्हणतात काय माहित?सांबार म्हटलं की मला हसू यायचं.
सुरुवातीला मी खाली उतरून भाजी घ्यायची नंतर नंतर तसं न करता दोरीला पिशवी बांधली होती त्यात पैसे सोडायचे आणि गजानन भाऊंनी दिलेली भाजी वर ओढायची. फिरून फिरून पाय दुखायचे माझे इतकं मोठं घर. इतक्या खालीवर चकरा व्हायच्या की जितकं जमेल तितकं मी टाळतच असे. भाजी पहायची आवडली नाही तर लगेच बदलवून घ्यायची 😁असा थाट होता. आजूबाजूचे शेजारी मला हसत पण असतील मी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले. पावसाळ्यात खास करुन भाजीबाजारात जाऊन भाजी घेण्याचं दिव्य करणे केवळ अशक्य होते. अशावेळी ही घरपोच सेवा फारच सुखावह वाटायची. . नाही म्हणायला हिवाळ्यात मी बाजारात जाऊनच भाजी आणायचे बरं!
असाच एक फळवाला देखिल अतिशय आस्थेने, आपुलकीने फळं द्यायचा. फळवाल्याकडून जाऊबाई चिक्कू घ्यायच्या दिड वर्षाच्या पुतणीसाठी. तेव्हा तो फळवाला टोपलीत फक्त चिक्कू विकायचा. अवीट गोडीचे ते चिक्कू अजूनही आठवतात. शाक के चिक्कू है दिदी ले लो। असं म्हणायचा. मला समजेना शाक के चिकू काय भानगड आहे? मग खोलात जाऊन विचारल्यावर कळलं शाख पर पके हुए है। झाडाच्या फांदीवर पिकलेले चिक्कू चवीला अतिशय उत्तम, गोड असतात हे तेव्हा मला कळलं. असा हा फळवाला तेव्हा (1990) पासून  तर आज अकोला सोडेपर्यंत (2018) मोठा प्रवास... आता थांबला आहे.
 नंतर त्या फळवाल्याने बरेच फळं विकायला सुरुवात केली होती. टोपली जाऊन हातगाडी घेतली. तरीही फळं द्यायला सवयीने वर यायचा. मी त्याला वर येऊ नको म्हटलं तरी यायचाच. मग मी आथीच त्याला म्हणायचे रूको मैं आ रही हूँ नीचे. मला वाटायचं रस्त्याने जाणारे येणारे उनाड पोर, गाई त्याचा माल खराब न करें. म्हणून त्याला रोज सांगून सांगून थांबवल होत. सिझनचे प्रत्येक  फळ  संत्री, मोसंबी, सफरचंद, चिकू, द्राक्षे, जांभळ, आंबे बब्बूघोशा (पिअर) घेऊन यायचा. टरबूज, पपई, केळी, अननस हे फारसं आणलं नाही.त्यातल्या त्यात टरबूज, खरबूज, पपई कधीतरी आणायचा. माझ्यासाठी उत्तम फळं तो वेगळे काढून ठेवायचा. ये लो दीदी तुम्हारे लिए बचाके रखे थे. असं म्हणून मोठ्या प्रेमाने देत असे. माझ्या शंकेखोर मनात यायचं हा आपल्याकडून भाव तर जास्त घेत नसेल न? मग बाजारात गेली की मी क्रॉसचेक करायचे. पण भाव जास्त घेत नव्हता. मी त्याच्याशी भाव करायला लागले की म्हणायचा - दे दो नं दीदी जो तुम्हारे मन में है। मैं आपसे मुनाफा नहीं कमाता। जो देना है वो दे दो बस खुश। वजनकाटा पण कायम जास्तच असायचा. वजनाच्या वर एक, दोन फळं जास्तच असायचे. जास्त देवू नको म्हटलं तरी ऐकायचाच नाही. दुपारी १.३०-२ च्या सुमारास यायचा. त्या आधी अर्धा तास त्याचा आवाज इतर गल्ल्यां मधून येत राहायचा इतका मोठा, खडा आवाज होता. 'मिठो मिठो' हे खास त्याचे शब्द. खाली गेलं की जे फळ असेल ते आख्ख खायला लावायचा प्रेमाने. अगदी डाळिंब सुध्दा अलगदपणे सोलून द्यायचा. डाळिंब सोलण्याची अद्भूत सोपी कला मी त्याच्याकडूनच शिकली आहे. हाताला एक थेंबही रस लागू न देता, दाण्याला बोटही न लागू देता ते डाळिंब सोलून द्यायचा. दुपारी जेवण झालेले असायचे आणि या फळवाल्याचा आग्रह खाओ न दिदी मी म्हणायचे नहीं मैं सोफ खा के आयी हूँ तर म्हणायचा तो क्या हुआ उपर जा के फिरसे खा लेना सोफ.
हा फळवाला स्वतः होता अशिक्षित पण त्याच्या तिनही मुलांना त्याने चांगले शिकवले. B. Ed. करून शिक्षकाच्या नोकरीला शाळेत लावले. मुलगी पण शिक्षिका आहे. त्याचं मला अप्रूप वाटलं.
घराजवळ आला की जोरजोरात "मिठो मिठो" ओरडायचा. कितना चिल्लाते हो जरा कम आवाज करो। कि लगेच वरमायचा. कधी मी घरी नसायचे  बाकी गल्लीत फिरताना चुकून भेटला तर पुन्हा फळं द्यायला यायचा. फळं नको असले तरी बाहेर जाऊन सांगावे लागायचे, भैय्या आज नहीं चाहिये. मगच जायचा.
आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे की समजा आज मला फळं दिली आणि दुसर्‍या दिवशी त्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटी ची फळं आली तर हा स्वतःच म्हणायचा दिदी वो कल के फल दे दो मुझे उसके बदलें में ये लो। बहुत मिठे है ये। आणि चक्क बदलवून द्यायचा. कोण करतं एवढं मला सांगा? आजकाल  हे निर्व्याज प्रेम, ग्राहकाप्रती आदरभाव   कुठे पहायला मिळतं? इतक्या वर्षांच्या सहवासातून हे आपोआप येतं असावं नाही का! तुषार पुण्याहून आला की म्हणायचा मुन्ना आया है दिदी अच्छे फल खिलाओ मुन्ना को वहाँ पुना में कहाँ खाने को मिलता होगा उसको? त्याचे एक एक वाक्य आठवले की आश्चर्य वाटतं इतकं प्रेम कोणी कसं करु शकतं?
अकोल्याच्या उन्हात भर दुपारी आला की मी त्याला पाणी द्यायचे थंडगार पाणी पिऊन म्हणायचा दीदी पानी के लिए तो कोई पूछता भी नहीं हमको। मग कधी काही प्रसंग, मुलांचे वाढदिवस असले की मिठाई, केक खायला द्यायची तो आवडीने खायचा.
माझ्या दादांशी पण त्याची मैत्री होती. बाबूजी बाबूजी करून त्यांच्याशी पण गप्पा मारायचा. बाबूजी कब आ रहे है? बहुत दिन हुए आये नहीं। आमचे सर्व नातेवाईक पण त्याला ओळखायचे.  असं सगळं असतांना हा फळवाला अचानक येईनासा झाला. काय झाले असेल? आम्ही रोज वाट पहात होतो. आजारी तर नसेल? नाही नाही ते विचार मनात येऊन गेले. बरं त्याचा अतापता तर सोडाच मला त्याचं नाव देखिल माहीत नव्हतं. अजूनही माहीत नाही. कोणाला विचारावे? त्याच्या बरोबर बर्‍याच वेळा एक शहाळी विकणारा त्याला ओळखणारा, तोपण येतं नव्हता. चार, पाच महिन्यांनी एक दिवस त्याच्या भावाबरोबर पुन्हा फळं विकायला आला. आम्हाला मनापासून आनंद झाला. कहाॅं थे भैया इतने दिन? तर म्हणाला बरं नव्हतं. फळं विकता विकता त्याला पॅरालिसीस चा अटॅक आला होता.  ज्यांना तो फळं देत होता त्यांनी लगेच त्याला डॉक्टर कडे नेलं. लगेच उपचार मिळाल्याने लवकर बरा झाला. एकदम थकलेला दिसतच होता. चेहरा अजूनही थोडा वाकडा होता. पण काही दिवसात पूर्ववत झाला. मुलांनी किराणा मालाचे दुकान टाकून दिलं पण तिथे तो काही रमला नाही. सब गिर्‍हाईक मेरी राह देख रहे होंगे इसलिए मै आया। वो दुकान में कुछ मन ही नहीं लगता। तुम लोगों से मिलूंगा तो ही अच्छा रहूंगा और जल्द ठीक हो जाऊँगा। तर असा हा नाव माहीत नसलेला फळवाला भैय्या! त्याचा आणि आमचा ऋणानुबंध आता संपलाय परंतु आठवणीतला त्याचा ऋणानुबंध मात्र कधीही संपणार नाही.
आणखी एक नारळपाणी विकणारा मुस्लिम भैय्या. "नारिsssयल पानी वाला " असा आवाज द्यायचा. भर दुपारी यायचा मग त्याचं ते नारिsssयल पानीवाला म्हणून झालं की आम्ही घरात म्हणत असू इतक्या दुपारी कशाला आला?😀 अगदी गोड, भरपूर पाणी, खोबरं असलेले चांगले शहाळे तो द्यायचा. फळवाल्या भैय्या सोबत यायचा बरेच वेळा. फळवाल्याला "मामू" म्हणायचा हा नारळवाला. कारमेल शाळेसमोर पण उभा रहायचा. सुरुवातीला त्याच्याशी फारशी ओळख नव्हती तेव्हा मी त्याला १००, २०० रुपयाची मामूली मदत केली होती. म्हटलं दिले तर दिले नाहीतर गेले. फारसं काही बिघडणार नव्हतं. पण त्याने ते खूप लक्षात ठेवून परत केले, मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं त्याचं. तेवढ्या पैशांचे शहाळे त्याने मला देऊ केले. घरी नारळाचे झाड होते त्याचे शहाळे सोलून द्यायचा खुषीने. स्वतः हून विचारायचा इस बार नारियल छिलना नहीं क्या? लाओ न! मी त्याला सोलून द्यायचे पैसे देत होते  कारण इतर नारळवाले अजिबात तयार नसायचे सोलून द्यायला. कसे बसे सोलून दिले तर काहीच्या काही पैसे मागायचे. जुन्या शहरातून यायचा हा. इतके प्रेमळ लोकं मला भेटले देवाचे आभार मानलेच पाहिजे.
असाच एक पेरूवाला. पेssssरू असं बसक्या आवाजात तो म्हणायचा. सिझनप्रमाणे बरेच वेगवेगळे फळं विकायचा तो पण मी फक्त पेरू घ्यायची त्याच्या कडून. इतके गोड पेरु की त्याची चव आजही पक्की स्मरणात आहे. अवीट गोडीचे ते पेरू खाल्यानंतर खात्री पटली हिंदीत पेरु ला अमरुद का म्हणतात याची. अगदी ताजे डायरेक्ट फ्राॅम बगीचा! जेवणं आटोपल्यावर थंडीच्या दिवसात अंगणात उन्हात बसून हा अवीट गोडीचा पेरु खात आम्ही कुटुंबीय गप्पा मारत बसायचो.
आता नंतर नंतर अजून एक पपई, टरबूज, केळी विकणारा फळवाला. तो पण वर येऊन बेल वाजवून पपई, टरबूज द्यायचा. अवंतीसाठी रोज दोन केळी द्यायचा. ये बिटिया के लिए. आणि त्याचे पैसे ही घ्यायचा नाही. पण मी असे घेणे शक्य नव्हते. मी द्यायचीच त्याला पैसे. मला पेपरमध्ये वाचलेली बातमी आठवली. मुंबई ला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन केळांची किंमत चक्क 442 रुपये लावली! प्रेमाखातर रोज दोन केळी देणारा फळवाला कुठे आणि व्यावसायिकतेचा बाजार मांडणारे हे पंचतारांकित हॉटेल कुठे! ग्राहकांच्या तक्रारी वरून हॉटेल मालकाला दंड झाला ते बरच झालं. समाजमाध्यमांवर बरीच खिल्ली उडवली गेली यावर. 
दिदी मिठा नहीं निकला तो पैसे वापस. असे  तो फळवाला म्हणायचा. असे सर्वच विक्रेते म्हणतात. पण ज्या आपुलकीने तो थेट वर फळं  द्यायला यायचा ते महत्वाचे. हे विक्रेते सगळ्यांशी असेच वागतात का? कि त्यांचे ठराविक ग्राहक असतील त्यांच्याशीच असे चांगले वागत असतील? अर्थात माल विकायचा म्हणजे जिभेवर साखर तर ठेवावीच लागते. आणि धंद्याचा हा मूलमंत्र ते जपत असतील का? कुठल्याही स्पेशल शिक्षणा शिवाय! नक्कीच जपतात.
 *अंजली*
at August 06, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: अंजली
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Labels

अंजली अर्चना अश्विनी नवी सखी भाग्यश्री मधुमती माणिक मीनल मेधा मोहिनी वर्षा श्रुती सीमा स्वाती

पाण्यासारखेच, वाहते सदाचे आयुष्य नावाचे, खुळे गाणे

My photo
अक्षरा
View my complete profile

इथे लिहिणार्‍या अक्षरा सख्या

  • अंजली
  • अर्चना
  • अश्विनी
  • नवी सखी
  • भाग्यश्री
  • मधुमती
  • माणिक
  • मीनल
  • मेधा
  • मोहिनी
  • वर्षा
  • श्रुती
  • सीमा
  • स्वाती

आजवरचे लेख

  • ►  2022 (21)
    • ►  July (2)
    • ►  June (2)
    • ►  May (2)
    • ►  April (5)
    • ►  March (2)
    • ►  February (4)
    • ►  January (4)
  • ►  2021 (32)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (3)
    • ►  September (1)
    • ►  August (4)
    • ►  July (3)
    • ►  June (3)
    • ►  May (3)
    • ►  April (4)
    • ►  March (5)
    • ►  February (2)
  • ►  2020 (73)
    • ►  December (3)
    • ►  November (2)
    • ►  October (3)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (3)
    • ►  June (6)
    • ►  May (5)
    • ►  April (13)
    • ►  March (12)
    • ►  February (11)
    • ►  January (7)
  • ▼  2019 (136)
    • ►  December (7)
    • ►  November (8)
    • ►  October (8)
    • ►  September (8)
    • ▼  August (12)
      • गप्पा....
      • सोन्याची नाव
      • एक चौक, दोन अनुभव
      • हा छंद जीवाला लावी पिसे ...
      • श्रावण आणि जेवण
      • मोरनगर
      • घालमेल
      • पाकीट
      • बे एक बे..
      • आठवणीतलं आजोळ!
      • बातमी
      • घरपोच सेवा
    • ►  July (9)
    • ►  June (13)
    • ►  May (6)
    • ►  April (13)
    • ►  March (15)
    • ►  February (15)
    • ►  January (22)

लेख शोधा..

  • Home
अक्षरा. Awesome Inc. theme. Powered by Blogger.