Monday, April 15, 2019

बदलाला सामोरे जा

ॲरिस्टॉटलने म्हटलेआहे- शिक्षणाची मुळे कडू असली तरी त्याची फळे गोड असतात. आजच्या शिक्षण पद्धती बद्दल बर्‍याच जणांचे मत आहे की ही मुळे अधिकच कडू होत आहेत आणि गोड फळे चाखायला मिळतील की नाही शंका आहे.

 अशी सर्वसामान्य धारणा होण्याची कारणेही तशीच आहेत. लवकरच दहावी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. या परीक्षांचे स्वरूप पूर्वीपेक्षा बरेच बदललेले सध्या दिसते आहे. मेरीट चे नियम, ग्रेड प्रणाली, शाळेचे इन्टरनल मार्क्स, क्रीडा व कला क्षेत्रातील नैपुण्याचे मार्क्स, बेस्ट ऑफ फाईव्ह नियम, इत्यादी निरनिराळे नियम दरवर्षी थोड्याफार प्रमाणात दहावी-बारावीच्या परीक्षांचे  गुणपत्रिकेचे स्वरूप बदलताहेत .नुकतेच दहावीच्या मुलांची कल चाचणी आणि केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असे मोठे बदल शिक्षण विभागाद्वारे अमलात आणले आहेत.

 एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षांमधील गुण हे जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न समजणारे विद्यार्थी पालक आणि दुसरीकडे अगदी काही अर्थ नाही या परीक्षांना व त्यातील गुणांना असेही म्हणणारे विद्यार्थी पालक अशा दोन्ही टोकाच्या भूमिका घेणारे लोक आपल्याला दिसतात. परंतु जेव्हा खरोखर स्वतःला या अभ्यास, परीक्षा ,निकाल प्राप्ती, पुढील प्रवेश प्रक्रियेच्या दिव्यातून जावे लागते तेव्हा भ्रमाचा भोपळा फुटतो .काय निर्णय घ्यावा समजेनासे होते .

मानवाला जन्मताच सभोवताली होणारे बदल आत्मसात करण्यासाठी निसर्गाने संरक्षण संरचना (डिफेन्स मेकॅनिझम) दिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जडणघडणीच्या पद्धतीमुळे या संरक्षण  संरचनेची क्षमता आत्मसात करता येते. त्यामुळे होणारा बदल स्वीकारणे सोपे जाते. शैक्षणिक क्षेत्रातील बदल स्वीकारायला प्रथम स्वतः पाल्य आणि पालकांनी पुढील गोष्टीघ्याव्यात-

 १)वास्तववादी होणे आवश्यक आहे- शैक्षणिक क्षेत्रात बदल हे काळानुरूप घडणारच आहेत ते रोखायला जाण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करा.
 २) ठराविक साचेबद्ध आणि संरक्षित क्षेत्रातून बाहेर पडा .कक्षा विस्तारा .शिक्षकाची मुलगी शिक्षक डॉक्टरचा मुलगा डॉक्टर किंवा सुताराचा मुलगा सुतारच झाला पाहिजे असा विचार कितपत योग्य आहे.
 ३) शैक्षणिक प्रक्रियेबद्दल उदासीन न राहता कुतूहल बाळगा .दहावी बारावी मध्ये मुले गेल्यावर त्यांच्या पुढील वाटचालीचा विचार ठरवण्यापेक्षा लहानपणापासून मुलांचे कुतूहल जागृत राहणे आवश्यक आहे .स्वतः पालकांनीही अधिक सकारात्मकतेने आजूबाजूचे शैक्षणिक क्षेत्र, घटना बघणे आवश्यक आहे .
४)धैर्याने नवीन बदल स्वीकारा. या प्रक्रियेत जुन्या धारणांना -सवयींना फाटा द्यावा लागू शकतो. रोजच्या ठराविक संरक्षित साचेबद्ध आयुष्यातून मोठ्या जगात आपल्याला वावरायचे आहे तेव्हा धीराने ज्ञानाच्या कक्षा रुंदावून या बदलाला सामोरे जा.
 ५)काय करायचे एवढे करुन? इथेच अशाच पूर्वापार पद्धतीने शिक्षण घेत पोटापाण्याची सोय झाली तर बरे. कशाला हवी नसती उठाठेव असा आत्मघातकी विचार बाजूला सारून नवीन गोष्टी स्वीकारणे श्रेयस्कर.
 म्हणतात ना तीच एक व्यक्ती त्याच एका नदीच्या पाण्यात परत कधीच पाय ठेवू शकत  नसते. कुठलाही बदल हाताळण्याची गुरुकिल्ली स्वतः तयार करा .शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे अशा पद्धतीने सूज्ञपणे हाताळल्यास कुठलाही संभ्रम न राहता पार पाडता येऊ शकतात.

Sunday, April 14, 2019

देहदान

................आणि त्या दिवशी फारच भांबावुन गेले ,इतके अचानक घडले की, आता काय  करायच? म्हणून प्रश्न होता,डोक्यातले कोलाहल शांत केले जरा स्तब्ध राहून शांत विचार केला आणि सकाळी सकाळी ७वाजता डॉ.मैत्रिणीला फोन केला.मनात संकोच होता.अशा अवेळी याआधी एकतर मी तिला कधीच फोन केला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची नि तिच्या लेकीची सकाळी शाळेत जाण्याची गडबड असेल हे माहिती होतं .तरीपण मनात ठरवल आणि फोन केलाच ....बोलताच येईना!......रडूमिश्रीत बोलणं तिला कळतही नव्हतं पण तिला बहुदा संदर्भ लक्षात आला! ......अर्चना पहिले शांत हो ! असे म्हणत तिने त्या तेवढ्या घाईच्या वेळात मला आवश्य त्या सुचना, फोन नं दिले आणि परत अडचण आल्यास फोनवर बोलू शकतेस म्हणाली .तिच्याशी बोलून खरच हायस वाटलं .गरजेला पटकन जेव्हा मदत मिळते ना त्यात प्रत्यक्षपरमेश्वरच वास करतो असं वाटत मला नेहमीच ! ......दीर्घ  श्वास  घेतला अश्रुंना आत ढकललं नी पटापट फोनाफोनी सुरु केली कारण वेळ कमी  होता. बाबांनी आधीच देहदानाची तयारी करुन ठेवली होती.पण आता पुढे काय आणि कस कस करायच याची घरी वास्तपुस्त सुरु होती.   

बाबांना मध्यरात्री अचानकच अस्वस्थता जाणवु लागली.आम्ही उभयता त्यांना दवाखान्यात    नेण्यासाठी कपडे चढवत असतानाच एकाएकी पायातले बळ गेले वाचा गेली,नजर गेली. साक्षात यमराज पुढ्यात पण हृदयाचे  ठोके चालू होते   .त्यांना श्वास घेतांना श्रम झाले असतील म्हणून झोपले असावेत असे आम्ही समजलो आणि ते झोपेतच पहाटे गेले.............!               मृत्युंतर तीनतासाच्या आत देह सरकारी इस्पितळात न्यावा लागणार होता. आणि त्यानंतर पुढे आणखी तीन तास ते शवागरात ठेवणार होते .सगळी फोनाफोनी होत नाही तोच गावातले ओळखीचे,आजुबाजुचे  जमले नि ठीक नऊच्या ठोक्याला देह त्यांच्या स्वाधिन केला.आंघोळ नाही,हारतुरे नाही इतकच काय त्यांच्याजवळ बसायलासुद्धा मला वेळ झाला नाही. आणि ते रडणही आल्या आतच राहील. ..............!

देहदान!........म्हंटल्यावर तसाही सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच होता.कारण जिवंतपणी कितीही ठरवल तरी ते तडीस जाण तस कठीणच! .........पण त्यांचा निर्धारच असल्याने मीपण निश्चयापासुन ढळले नाही. .........!पण परत पुन्हा प्रश्नावली! आता पुढे कसं करायच म्हणजे दिवसवार  वगैरे......आल्या गेल्यांची मते घेताली,ब्राह्मण,भटजी तसेच जुने जाणते आपआपली मते ठासुन सांगत होती.सगळ्यांच नीट ऐकुनही घेतलं आपण काय करायच या विचारात आम्ही दोघेही पडलो .कुठलाही धाडसी निर्णय अंगवळणी पडायला पचायला वेळच लागतो तसेच आमच्याही मनाची द्विधामनस्थिती होती.कारण आजपर्यंत माहेरी आणि सासरी सगळच  पारंपारिक पद्धतीचे जरासे कर्मठच वातावरण त्यामुळे निर्णय घेताना होणारी घालमेल. नातेवाईकांची चाललेली कुजबुज या सगळ्यातून निर्णयाप्रत पोहचलो नि सगळ्याच गोष्टिंना फाटा दिला.हा देह मरणानंतरही उपयोगी पडावा म्हणूनच देहदान "! त्याची पुन्हा पुन्हा आसक्ती कशाला!..........हाच त्यांचा भाव होता.पण अजुनही मनात येतं मृत्यु किती अकस्मात येतो नि सजीवचे निर्जीव देह पाहुन जीवनाच अंतिम सत्य सांगून जातं!...

किमया

मागच्या वर्षी साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात अकोल्याहून नाशिकला बदली निमित्ताने आले ,नुकतीच पावसाची
सुरुवात झालेली होती आणि नाशिकला बऱ्यापैकी पाऊस पडून गेला होता. सर्व आजूबाजूची जमीन हिरवीगार झालेली
होती, शेजारच्या घरांमधले बगीचे टवटवीत वाटत होते बाल्कनीतुन दिसणारे डोंगर देखील आल्हाददायक वाटत होते
आणि आसमंतात एक प्रकारचा ओलावा आणि थंडावा भरून राहिला होता. अकोल्यासारख्या पाण्याचा दुष्काळ
असलेल्या शहरातून नाशिकला आल्यामुळे हा बदल प्रामुख्याने जाणवला .आठ दहा दिवसात घर थोडेफार लागले आणि
कार्यालयात रुजू व्हायचा दिवस ऊजाडला. बदलीचा पहिलाच अनुभव असल्यामुळे मनात एक प्रकारची हुरहूर होती .
सतरा वर्ष एकाच ठिकाणी म्हणजे अकोल्यात काढल्यामुळे मला आजचा दिवस नोकरीवर जाण्याचा पहिलाच दिवस आहे
असंच वाटत होत.��
आधी माझ्यासोबत माझी मैत्रीण (अकोला कार्यालयापासून ची घट्टमुट्ट मैत्रीण जी 7-8वर्षांपूर्वीच नाशिक ला बदली घेऊन
आलेली होती) येणार होती. पण काही कारणाने तिला सुट्टी घ्यावी लागली आणि मला एकटेच जायचे आहे हे नक्की झाले
.��तरी बिचारीने 2 दिवस आधी माझी कार्यालया च्या रस्त्याची रंगीत तालीम करून घेतली होती . आणि मी कार्यालयाला
खो देऊन आली होती��
कार्यालयात एकटेच जाण्यासाठी नाईलाज झाल्यासारखी खूप जड अंतःकरणाने मी अॅक्टिवा काढून एकदाची
अपार्टमेंटच्या बाहेर पडले आणि अचानक बाजूच्या बंगल्यात असलेल्या बकुळी चा मंद सुगंध नाकात शिरला .त्याचा
आस्वाद घेते आहे तोच पुढे सोनचाफा पण आपल्या गंधाने मोहित करण्यासाठी उभा होता. ती धुंदी अजून उतरत नाही तो
पुढे पारिजातक आपल्या नाजूक पांढऱ्या आणि केशरी फुलांचा सडा घालून तयार होता आणि तोदेखील सुगंध
वाऱ्याबरोबर इतस्ततः पसरत होता.मी त्या गंधानी एकदम खुळावलेच खूप खोल श्वास घेऊन तो सुवास हृदयात घ्यायचा
प्रयत्न करू लागले .आणि याच्यामुळे माझे लक्ष हे कार्यालयात जाण्याच्या तणावातून सभोवतालच्या निसर्गाकडे वळले
.अरोमा थेरपी मन रिलॅक्स होण्यासाठी वापरतात असा ऐकलं होतं पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला इथला निसर्ग देत होता.
खरोखर त्या सुगंधाने माझं मन पिसासारखं हलकं झालं आणि हळूहळू ते पहिल्या दिवसाचं मनावरचं ओझं उतरायला
लागले. पुढे जात असताना वेगवेगळ्या घरातले, बंगल्यातले बगीचे त्यात असणारे नारळाची,आंब्याची ,आवळ्याची
,सोनचाफ्याची झाडे, गुलाब, अनेक रंगातले जास्वंद ,चमेली जाई जुई चे वेल आणि कित्येक रंगीबेरंगी फुलां ची झाड
ज्यांची नावे ही मला माहिती नव्हती अशी दृष्टीस पडली आणि मन अजूनच प्रसन्न होत गेलं. थोड्या अंतराने घर, दुकान,
शाळा इ. मागे पडल्या आणि मोकळे मोठे मोठे प्लॉटस लागले .त्यात साचलेले पावसाचे पाणी ,हिरवळ,आणि रानफुले
यांच्या मिश्रणातून तयार झालेला एक प्रकारचा मातकट सुवास वाऱ्याबरोबर वाहत येत होता. इथल्या वाऱ्या चे एक
वैशिष्ट्य आहे की सारखा सुई सुई आवाज करत असतो. जवळपास डोंगर असल्यामुळे असेल कदाचित. माझं ऑफिस
एका डोंगराच्या पायथ्याशीच आहे त्याचं नाव पांडवलेणी आहे (पण पांडवांचा आणि या लेण्यांचा काहीएक संबंध नाही बर
का�� )हा डोंगर देखील हिरवागार झालेला होता आणि त्या डोंगराच्या माथ्याजवळ ढगांचे पुंजके दिसत होते एखाद्या हिल
स्टेशनला आल्याचा फील येत होता आणि अशा मनाच्या तरल अवस्थे त मी ऑफिसला केव्हा पोहोचले ते कळलेच नाही.

एकाअज्ञात कवीने लिहिले आहे,

रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे
सरसर येता थेंब टपोरे

पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले
कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले..

आणि तो निसर्गाचा रोमांच माझ्या मनावर पसरल्याने माझ्या मनावरचा तणाव एकदम निवळला होता .खरंच निसर्ग हा एक
मन तणावरहित , शांत करणारा प्रिय सखा च आहे असे मला त्यावेळी वाटले.

------ गौरी

Saturday, April 13, 2019

गोवा डायरी ५ (शेवटचा भाग)

शेजारी कुडकुडणार्‍या अश्विनीच्या चुळबुळीमुळे जाग आली. तिला रजई शेअर केली कारण पल्लवीने नेहमीप्रमाणे सगळं पांघरूण एकटीने ढापलं होतं :-) एकदा जाग आल्यावर पुन्हा झोप येईना. या महालातल्या वरच्या मजल्यावरच्या आलिशान जॅकुझीवाल्या बाथरूम्सची एक विचित्र अडचण होती, कड्या न लागण्याची. त्यामुळे हेराफेरी सिनेमातल्यासारखं आतल्या माणसाला जोरात गात राहाणं किंवा बाहेर रखवालदार ठेवणं आवश्यक होतं. बाथरुम सिंगर या शब्दाचा अर्थ आता वेगळा असला तरी त्याची निर्मिती अशा समस्येतूनच झाली असावी. तर ते साधून भराभर आटोपून, इंद्राणीने तयार ठेवलेला गरमागरम नाश्ता करून, पटापट बॅग्ज आवरून आम्ही तय्यार झालो. बरोब्बर ९ वाजता सोहम गाडी मुक्या चालकासह येऊन दाखल झाली. गाडीत बँगांचा ढीग चढवला आणि रात्री अंधारामुळे टाळलेले परिसराचे फोटोसेशन करून इंद्राणीचा निरोप घेतला.


तिच्या अगदी घराजवळच शांतादुर्गेचं मंदिर आहे. आपल्याकडे गणपतीची असावीत तितकी तिकडे शांतादुर्गेची देवळं. प्रशस्त आवार, तुरळक वाळकी पानं पडलेली, बाजूला देखणी दगडी दीपमाळ. मोकळा स्वच्छ सभामंडप. नेटका गाभारा. छान प्रसन्न वाटत होतं. कुणी म्हापसेकर म्हणून त्याचे यजमान असल्याची ठळक नोंद दिसली. मंदिराच्या आजूबाजूला लागून वस्ती नाही त्यामुळे घंटेचा प्रतिध्वनी कितीतरी वेळ घुमत होता. शांतादुर्गेचं दर्शन घेऊन शांतपणे पायर्‍यांवर येऊन बसलो खरं पण आज घड्याळ्याच्या काटयांच्या तालावर धावणं भाग होतं.
हिंदू मोड मधून आता ख्रिश्चन मोड मध्ये गेलो आणि पोचलो जुन्या गोव्यातल्या बोरिम भागातल्या बाल येशू- सेंट झेवियर्स चर्चला. हे सुघड, तपकिरी रंगाचं, पाहताना टोपी पडेल इतकं उंच दगडी कॅथोलिक चर्च ४०० वर्ष जुनं आहे.
युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून हे नोंदलं आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर्सचा मृतदेह तिथे आजही जतन करून ठेवलेला आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी, ३ डिसेंबर १५५२ ला त्यांचं चीनमध्ये निधन झालं. परंतु त्यांच्या इच्छेनुसार दोन वर्षांनी त्यांचं पुरलेलं शरीर पुन्हा बाहेर काढून इथे आणलं गेलं. ते टिकून कसं राहिलं! यालाच चमत्कार मानला जातो. त्यांना मरणोत्तर म्हणजे १६६२ मध्ये संत म्हणून घोषित करण्य़ात आलं. मदर तेरेसांनाही याच पद्धतीने मरणॊत्तर संत पदवी देण्य़ात आली होती. धर्मप्रसाराच्या हेतूने का होईना, पण त्यांनी केलेल्या समाजकार्यापेक्षा एका ब्राझिलियन आणि एका भारतीय व्यक्तीचा मदरच्या चमत्कारामुळे जीवनदान मिळाल्याचा दावा या पदवीसाठी निकष म्हणून वापरला जावा याचं मला आजही वैषम्य वाटतं. हिंदू धर्मातील भंपक प्रथांवर कडाडून हल्ला चढवणारी माध्यमं तेव्हा मात्र मूग गिळून बसली होती.
वेल, चर्चच्या आत उजव्या बाजूला उंचावर, खिडक्या असलेल्या चांदीच्या पेटीत ठेवलेलं सेंट फ्रान्सिस यांचं शव आणि लगतच्या खोलीत त्यांच्या अवयवांचे जवळून काढलेले फोटो बघताना अस्वस्थ वाटलं. दर १० वर्षांनी हे पार्थिव बाहेर काढलं जातं तेव्हा दर्शनाला रीघ लागते. चर्च आतून अतिशय भव्य आणि नजरबंदी करणारं आहे. बाहेरच्या मोकळ्या भागातला येशूजन्माचा देखावा बघण्यासारखा आहे.

हे चर्च बघून झाल्यावर मांडवी किनार्‍यावरच रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सेंट कॅथेड्रल या अगदी क्लासिक पोर्तुगीज पद्धतीच्या पुरातन चर्चमध्ये आम्ही गेलो. हा रस्ता भारतीय पुरातत्त्व विभागाकडून पुढॆ जात होता. अगदी या पाटीपाशीच मुलांसह मागच्या गोवा भेटीत एक फोटो काढला होता पण तेव्हा मी त्यांना सांभाळण्य़ात इतकी व्यग्र होते की आपण कुठे आहोत आणि काय पाहतो आहोत याकडे फारसं लक्षच नव्हतं. तिथे तसंच बसून आणि पिसाच्या मनोर्‍यासारख्या कलत्या झाडाखाली न विसरता ग्रुप फोटो काढला.

आता जाणवलं, चर्चची जुनी पांढरी शुभ्र इमारत किती ऐसपैस आहे ते. इतकी की आम्हाला प्रवेशद्वार चटकन सापडेना. परिसरही अगदी चकाचक आणि अवाढव्य. आशियातलं हे सर्वात मोठं चर्च आहे असं ऐकलंय. दारातच ’ड्रेस कोड’च्या स्पष्ट सूचना होत्या. आम्हाला याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही अगदी व्यवस्थित कपड्यातच होतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आचरट कल्पनांमुळे कितीतरी जण असे ड्रेस कोड नाकारतात पण आपण जिथे ज्यासाठी जातो आहोत, तिथल्या संकेतांनुसार आणि स्वत:ला अवघडल्यासारखं वाटणार नाही असे कपडे घालावेत ही साधी गोष्ट आहे. आत नीरव शांतता होती. आतली रचना सेंट झेवियर्स 
इतकी खिळवून ठेवणारी नव्हती. शवपेटीमुळे तिकडे जाणवणारे गूढ वलय इकडे नव्हते की वर्दळ नव्हती. लग्न आटोपल्यावर फक्त घरचे उरतात तेव्हा रिकामं कार्यालय जसं दिसतं तसं काहीतरी ओकंबोकं वाटत होतं. अगदी गुडघे टेकून तिथल्या लाकडी बेंचवर बसून प्रार्थना सुद्धा केली. तिथे फार रमावसं मात्र वाटलं नाही शिवाय आज वेळेची मर्यादा होतीच.

पुन्हा हिंदू मोड मध्ये येऊन आता पोंडा तालुक्यातल्या मंगेशीला निघालो. गोव्याला येऊन मंगेशीला न जाऊन कसं चालेल. अर्थात हे मोड आपल्या मनातलेच. ’सबकी पूजा एकसी, अलग अलग है रीत.. मस्जिद जाये मौलवी, कोयल गाये गीत..’ हेच खरं. मंगेशाचं मंदिर बहुतेकींनी या पूर्वीही पाहिलेलं. शुभ्र हस्तिदंती रंगाचं कोरीव मंदिर, त्याला लागून तशीच तुकतुकीत दीपमाळ. अतिशय आल्हादकारक वातावरण. सभामंडपात भरपूर गर्दी तरीही कलकल नव्हती. बाहेरच्या पाटीवरच्या सूचनांमध्ये -पाळीच्या दिवसात महिलांना प्रवेश मनाई असल्याची सूचनाही होती. ती वाचून आमची भुवई चढली. आता समजा एखादीला तशी अडचण असती तर तिने श्रद्धा म्हणून असो किंवा उत्सुकता म्हणून असो, इतकं दूर गोव्याला येऊन मंगेशीला न जाताच परतायचं का! नशीब तिथे काही स्कॅनर वगैरे विनोद नव्हता. सीमाताईने तिथे मंगेशाची अर्थातच शंकराची सुंदर छोटी चांदीची मूर्ती खरेदी केली तेव्हा वाटलं त्याच्यावर गाढ श्रद्धा असणार्‍या जयूसाठी पण घेतली असती. ’मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ असं भक्तिभावाने गाणार्‍या गोड गळयाच्या माझ्या या जीवलग मैत्रिणीकडे मात्र तिच्या मंगेशाने शेवटपर्यंत पाहिलंच नाही. असो.
वेळ कमी असल्याने मंदिरा बाहेरच्या दुकानांमधून काजू सोडून काहीही घ्यायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार कुणीही कुणाचं काहीही न ऐकता कपबशांपासून टियारापर्यंत काय वाट्टेल ती खरेदी धावतपळत करून टाकली. ६०० ते ९०० रु.असे वेगवेगळ्य़ा दराचे काजू उपलब्ध होते. एका दुकानात आमची टोळधाड शिरली आणि ९ जणींनी ’सालाचे नाही हो खारे काजू द्या, आंबावडी तमुक इतकी, भैया ये क्या है, ये भी एक पाकीट दे दो, अरे मैने ८०० वाले काजू बोले थे, पाव किलो नाही ओ दादा अर्धा किलो’ असं एकाच वेळी बोलायला सुरूवात केल्याने बिचारा भैया गोंधळून काहीच्या काही देऊ लागला. शेवटी इंग्रज माणसांसारखी रांग लावून एकेकीने खरेदी केली. बॅगांच्या ढिगार्‍यात थोडी अजून भर पडली. आता मागची काच दिसेनाशी झाली आणि गाडी निघाली ट्रॉपीकल स्पाईस प्लांटेशनला.

पोंडातल्या केरी भागातलं हे मसालोद्यान अक्षरश: निसर्गाच्या कुशीत आहे. पार्किंगपासून जरा चालत जाऊन पाणथळ जागेवरच्या झुलत्या पुलावरुन आत प्रवेश करावा लागतो. दारातच डोक्यावर फुलांच्या पाकळ्या उधळून, कुंकू लावून आमचं स्वागत करण्य़ात आलं. हे सगळं मुळात परदेशी पाहुण्यांना आकर्षित करण्य़ासाठी आहे. तिथे बहुसंख्य परदेशी पर्यटकांचाच भरणा होता. लगेच कोकमचं स्वागतपेय, काजू आणि मुरुक्कू देण्यात आले. मग एक प्रतिभा नावाची गाईड आमच्या जवळ येऊन उभी राहिली. रशियन, इंग्लीश आणि हिंदी अशा ३ भाषांतून बोलणारे गाईड तिथे उपलब्ध असतात. एकूण शेकडो एकर परिसर असला तरी त्यातल्या एकदोन एकरात फक्त डेमोसाठी लावलेल्या मसाल्याच्या दाट झाडाझुडपांमधून फिरवत तिने मिरी, लवंग, वेलदोडे, जायपत्री वगैरे बर्‍याच मसाल्यांची हसत खेळत ओळख करून दिली. वाटेतले एखादे पान चुरडून त्याचा वास देऊन ती ओळखा पाहू म्हणायची, मग आम्ही अकलेचे तारे तोडायचो, कधी तुक्का लागायचा. पाऊण तासात आमच्या मसालाविषयक ज्ञानात बरीच भर पाडून आम्ही प्रशस्त शॅक मध्ये जेवायला परतलो. पॉटचे आईस्क्रीम करताना लहानपणी आपण एकमेकांच्या पाठीमागे जाऊन हळूच कपड्यातून बर्फाचे तुकडे सोडत असू तसं टूर संपवताना तिने पेलाभर लव्हेंडरचे पाणी प्रत्येकीच्या पाठीमागे जाऊन मानेजवळून खाली सोडले.
'इट फील्स सो SS फ्रेश' असं तिने म्हटल्यामुळे आम्ही एकमेकींना कंपलसरी.. आहाहा काय फ्रेश वाटतंय अशी खात्री दिली आणि लाकडी टेबलवर पत्रावळ घेऊन जेवायला बसलो. गोवन शाकाहारी जेवण भीषण होतं. उकडलेल्या वाटाण्याचा रस्सा, जेमतेम वाफवलेला कोबी, हातसडीचा भात आणि कोरडे पाव. सांदणं-सारखा गोड पदार्थ त्यातल्या त्यात बरा होता. चवीला उग्र आणि चमत्कारिक वासाची घोटभर फेणी दिली होती. 'ज्यादा पिओगे तो बिना म्युझिकके डान्स करोगे', अशी तिची सूचना लक्षात ठेवून तेवढाच घोट आम्ही काही जणींनी घशाखाली उतरवला. हो बाबा, गोव्याला येऊन फेणी चाखायची राहून गेली अशी उगाच हुरहूर नको. अरे बापरे, या नादात आमचा अर्धा तास गेला होता आणि प्लॅनिंगनुसार आता हातात बफर वेळ न उरल्याने विद्युतवेगाने १८ किमी अंतरावरचे मडगाव स्टेशन गाठावे लागणार होते. गुगल मॅप लावून स्टेशनकडे निघालो तर नेमकं बोरीमच्या आधी रस्ता बंद करून वळणरस्ता दिला होता. आता आपण वेळेत पोचू का याकडे लक्ष होतं. त्यातच, दिल्लीला एका टॅक्सीचालकाने असंच रस्ता बंद सांगून मुद्दाम उशीर करून स्टॆशनवर पोचवलं आणि घाईत सामान उतरवायला मदत करण्याच्या बहाण्याने वरच्या वर ठेवलेल्या वस्तू लांबवल्याचा किस्सा भाग्यश्रीने सांगितला. या चालकाचा अनुभव चांगला होता पण तो काहीच बोलत नसल्याने सावध राहणे भाग होते. आता मात्र पोपटाच्या डोळ्यासारखे मडगावकडे लक्ष लागून राहिले. सिनेस्टाईल ब्रेकचा आवाज करत आमच्या चालकाने झुपकन गाडी वळवत स्टेशनच्या आवारात आणून उभी केली तसा जीवात जीव आला. पटापट सामान उतरवून त्याचे आभार मानून आम्ही प्लॅटफॉमवर धावत हजर झालो. काही मिनीटांनी आलेल्या गोवा एक्स्प्रेसच्या आमच्या बोगीच्या खिडकीतून (आधीच वास्कोहून बसलेल्या) मीनलने हात केला आणि आम्ही हुश्श केले.

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे’ याचा अनुभव लाल माती, समुद्राच्या फेसाळ लाटा आणि सर्वत्र दाटलेली नारळी-पोफळीची झाडं पाहत मनमुराद घेतलाच होता पण ’कड्या कपारीमधोनी घट फुटती दुधाचे...’ याची प्रचिती देणारा ’दूधसागर’ पाहायचा राहिला होता. कुणीतरी तथास्तु म्हणावं तसं गाडीतून त्याचं अगदी जवळून अनुपम दर्शन झालं. इतकं गोवा बघूनही
’माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन भाव शब्दांवीण बोले...’
अशा मनोवस्थेत तिथली अवर्णनीय दृश्य अजूनही खिडकीतून बघत राहावीशी वाटत होती. पण गाडी तर धावत होती. गोवा राज्य ओलांडलं. मग पुन्हा आमच्या विश्वात आलो. साग्रसंगीत भेळ करून आजूबाजूच्यांना वाटून भरपेट खाऊन झाली. गप्पा, पत्ते, अटीतटीची अंताक्षरी यात प्रवास वेगात संपत होता. अंजू आणि शीतलला आधीच उतरायचंय त्याआधी हिशेब करून टाकूया म्हणून मीनल कॅशियर आणि पल्लवी मुनीमजी त्यात इतक्या दंग झाल्या की त्यांच्या आरडाओरडयामुळे आम्हाला प्रत्येकी ४४३ रू. परत मिळणार असल्याची आनंदवार्ता अख्ख्या बोगीला कळली :-) जळगावला भाग्यश्रीने मागवलेली अप्रतिम चवीची भरीत भाकरी खाऊन भुसावळहून अचानक पॅसेंजरने निघण्याचा निर्णय़ घेतल्याने ठरल्या वेळेआधीच आम्ही अकोल्याला पोचलो. ’चला, आल्या रे बॉ एकदाच्या’ असा भाव चेहर्‍यावर असलेली नवरेमंडळी स्वागताला उभीच होती.

तू फिश खात नाहीस, दारू पीत नाहीस, तुला पोहता येत नाही, मग करणार काय गोव्याला जाऊन? असं मला गमतीने फडके सर म्हणाले होते. काय केलं ..याचं उत्तर आणि एक सुंदर आठवण म्हणून हा डायरीप्रपंच. जाऊन आल्यावरही एकाने म्हटलं, ’हात्तिच्या, म्हणजे तुम्ही साऊथ गोव्याला गेलाच नाहीत की. मग काय मज्जा’. तेव्हा मला ’ये जवानी है दिवानी’ मधला प्रसंग आठवला. आयुष्यात हे करायचंय, ते बघायचंय या भावनेने सतत अस्वस्थ असलेला रणबीर कपूर, नैनाला म्हणजे दीपिकाला म्हणतो,’अगं हा सूर्यास्त काय बघत बसलीयस, चल चल अजून आपले कितीतरी स्पॉट्स राहिलेत’. नैना त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करून दरीत उधळून देते आणि म्हणते, ’बनी, लाईफमे कुछ ना कुछ तो छुटेगाही, तो जहाँ है वही का मजा लेते है।’

------------------------  गोवा डायरी समाप्त  --------------------------------

गोवा डायरी ४

आज अजिबात लवकर उठायचं नाही असं ठरवूनही सवयीने लवकर जाग आली. फ्रेश होऊन कॉफीचे कप घेऊन आम्ही व्हिलाच्या गॅलरीत जाऊन बसलो. रेसॉर्ट्चे सगळे व्हिलाज एकमेकांसमोर तोंड करून असल्याने सगळ्यांना सगळ्या गॅलरीज दिसत होत्या. मधून जाणारा इवलासा रस्ता शेवटी रिसेप्शनला पोचतो. मग डावीकडे रेस्तराँ आणि उजवीकडे स्विमिंग पूल. त्याभोवती आणि दोन व्हिलाजच्या मधल्या पट्ट्यात मखमली हिरवळ, कितीतरी सुंदर झाडं. रंगीत फुलं. गोव्यातली साधी घरं पण टुमदार आणि अंगणातल्या आकर्षक फुलझाडांमुळे खूप सुरेख दिसतात. तिथली बहुसंख्य माणसं पर्यटनावर अवलंबून त्यामुळे फार अगत्यशील. परदेशी मंडळींशी बोलण्याइतपत इंग्लीशही त्यांनी शिकून घेतलेली. निसर्गसौंदर्यामुळे असेल, आनंदी वृत्तीची. उपहारगृहातला वेटर असो की रेसॉर्टमधला सफाईवाला. हसून बोलणार. अशा माणसांमुळे वातावरण आपोआपच प्रसन्न होतं.
रेसॉर्टच्या बहुतेक गॅलर्‍यांमध्ये सगळी परदेशी गोरी मंडळी जोडप्याने हसर्‍या चेहर्‍याने बसलेली. अ‍ॅव्हरेज वयोगट पन्नास. कुणी वाचतंय, कुणी कॉफी घेतंय तर कुणी नुसतंच कोवळ्या उन्हात गार वार्‍याची झुळूक अनुभवत मूकपणे बसलंय. हे लोक कमालीचे शांतताप्रेमी. सगळे व्हिलाज फुल्ल असूनही आवाज नाही कुणाचा. आम्ही अपवाद.
कोपर्‍यातल्या गॅलरीतल्या युरोपियन आजोबांनी हात उंचावून आम्हाला गुडमॉर्निंग म्हटलं. काल त्यांनी कमरेत वाकून हात जोडून ’नॅमस्खार’ म्हटलं होतं आणि परवा गेटपाशी भेटले तेव्हा ’यू नॉईजी गर्ल्स ...’ असं काहीतरी म्हणाले. मला वाटलं, त्यांना आमचा त्रास होतोय की काय! पण आमच्या किलबिलीने (म्हणजे खरं तर कलकलाटानं) जणू त्या नीरव, मख्ख वातावरणात जान आली होती, असा काहीतरी अर्थ आम्ही त्यांच्या कौतुकभरल्या नजरेतून काढला. त्यातून ते ’गर्ल्स’ म्हणाल्याने दहाही बायका त्यांच्यावर बेहद्द खूष होत्या. कुणी आवरून पुन्हा बीचवर चक्कर मारायला गेल्या. कुणी बॅग आवरू लागल्या. आज रात्री इंद्राणीकडे मुक्काम ठरला होता त्यामुळे चेकआऊट करायचं होतं. बीचवर गेलेल्या टीमने येताना रेसॉर्टलगतचा थेट बीचपर्यंत पसरलेला आलिशान जोशी उर्फ किंगफिशर बंगला पाहिला. मूळ मालक विजय मल्ल्या. तो पळून गेल्यावर बँकेने केलेल्या लिलावात सचिन जोशींनी तो बंगला तब्बल ७३ कोटींना विकत घेतल्याचं वाचल्याचं आठवलं.

झकास नाश्ता करून स्विमिंग पूललगतच्या इझी चेअर्समध्ये विसावलो. सगळ्य़ा चेअर्सवर परदेशी मंडळी पोहण्य़ाच्या पोशाखात तासंतास शरीर टॅन करत पहुडलेली असायची. कपड्यांचा बाऊ ते करत नाहीत आणि कुणाकडे विचित्र नजरेने पाहतही नाहीत. सौंदर्य हे बघणार्‍याच्या नजरेत असतं तसंच वासनेचंही असतं. शरीराचा किती आणि कोणता भाग उघडा असेल तर ते अश्लील मानायचं हे स्थळ, काळ आणि संस्कृतीसापेक्ष आहे. चिन्यांमध्ये पाऊल उघडे असणे अश्लील मानतात तर काही आदिवासी समूहात आजही चोळी घालणे अश्लील मानतात. केरळमध्ये सभ्य बायकांना एककेकाळी उत्तरीय वापरण्याची परवानगी नव्हती. आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल्सचा अपवाद सोडला तर आता अशा ठिकाणी भारतीयांनीही पोहण्याचा पोशाख घालणे अनिवार्य असले तरी त्याच पोशाखात चारजणात लोळत पडणे मात्र अद्यापही आक्षेपार्ह मानले जाते. असो. तर तिथे उतरलेलं एकमेव केरळी कुटुंब तिथल्या शांततेचा भंग करत होतं. त्यांची चिमुरडी मुलगी मोठमोठ्याने आरोळ्य़ा देत पाण्यात सूर मारत होती. केस हिरवेपिवळे रंगवलेले वडील तिला पोहोण्याचे धडे देत होते. तिची आई इकडे तिकडे निसटू पाहणार्‍या लहान बाळाला मांडीवर पकडून कावलेल्या चेहर्‍याने आमच्या बाजूला बसलेली. एका पोहोणार्‍या आजींचा अपवाद सोडला तर बाकी गोरी मंडळी जणू मुकी असल्यागत आणि स्टॅच्यू केल्यागत वाचत किंवा आकाशात पाहत चेअर्सवर पहुडलेली. क्वचित कुणी टॅबवर काही करणारे. आपण दोनचार तासांचा प्रवास एकट्याने करुन आलो तरी घरी जाऊन सहप्रवाशांची चिमुकली चरित्रं लिहू शकतो. बाजूचा माणूस पुन्हा जन्मात न का भेटेना, एसी फर्स्टचा अपवाद सोडला तर, आपल्याला त्याच्याबद्दल भोचकपणा करून सगळं जाणून घ्यायचं असतं. पंधरावीस मिनीटं शिक्षा दिल्यागत तिथे असं मुक्याने पडून राहिल्यावर ’यात काय मजा नाय’ हे जाणवून आम्ही तिथून काढता पाय घेतला. शिवाय आपलं विदर्भवासींचं टॅनिंग तर आता पुढचे काही महिने फुकटात होणारच आहे, तेव्हा आराम करायचाच असेल तर एवढं भाडं भरलेल्या एसी खोलीत जाऊन करावा असा सुज्ञ विचारही त्यामागे होता :-)

मनात घर केलेल्या आमच्या या ४ दिवसाच्या घरातून चेकआऊट करून टूर निघाली रेइस मॅगोस किल्ल्याकडे. चकाकत्या उन्हात मांडवी नदीचं वरून दर्शन घडवणार्‍या या मजबूत, देखण्या किल्ल्यावर पहिल्या नजरेतच फिदा झाले. हा पण बार्डॆझ भागातला. (म्हणजे उत्तर गोवा, मधल्या भागाला तिसवाडी आणि दक्षिण गोव्याला साष्टी म्हणतात म्हणे) हा किल्ला पोर्तुगीज व्हाईसरॉय नोरोन्हाने पणजीचं संरक्षण व्हावं म्हणून १५५१ मध्ये बांधला. १७०७ मध्ये त्याचे नूतनीकरण झाले. लिस्बनहून येणारे अधिकारी इथे निवास करत. १७३९ च्या मराठ्यांच्या हल्ल्यानंतर हा आणि अग्वादा हे दोनच किल्ले पोर्तुगीजांना कसेबसे राखता आले. आता हा किल्ला पुरातत्त्वविभागाच्या सहाय्याने पुनरुज्जिवित करुन पर्रीकरांच्या हस्ते २०१२ मध्ये पर्यटकांसाठी खुला केल्याची नोंद प्रवेशद्वारावर आहे.

बाहेर एक प्रचंड वड उभा आहे. आश्चर्य म्हणजे ज्या नारळाच्या झाडावर तो बांडगूळ म्हणून वाढला ते झाड पुढे जळून गेलं तरी वड तसाच उभा आहे. किल्ल्याच्या आत शिरताना छतामध्ये एक पोकळ चौकोन दिसतो. आत घुसणार्‍या शत्रूवर त्यातून उकळते तेल ओतले जाई. तळाचा बराचसा भाग तुरूंग म्हणून वापरला जाई. गोवा मुक्ती संग्रामात ताब्यात घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही इथे डांबून ठेवले होते. तटबंदी, तोफा आणि त्या डागण्यासाठी पाडलेली खिंडारं आजही उत्तम स्थितीत आहेत. मधल्या भागातल्या दालनांमध्ये चित्रप्रदर्शन आहे. मी कुणी कलासमीक्षक नसल्याने त्यांच्या शैलीबद्दल सांगता येणार नाही पण पोर्तुगीज अंमल असलेल्या काळातला गोवा, स्थानिक मंडळींवर त्यांच्या संस्कृतीचा झालेला परिणाम, काही मिश्किल व्यंगचित्रं अशा काही खुबीने चितारलेली आहेत की वाह! चित्रांच्या खाली गोवा मुक्ती संग्रामातल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे नावानिशी फोटो आणि बोरकरांची स्वातंत्र्यावरील कविता लावलेली आहे. आम्ही बाबूजींचा म्हणजे सुधीर फडके यांचा फोटो शोधला पण त्या दालनात तरी दिसला नाही.

दुपारी ’कामत’ मध्ये दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेतला. जवळचे प्रचंड विस्तीर्ण पायर्‍यांचे एक चर्च बाहेरून पाहून, थोडी खरेदी करून निघायचं होतं पोर्तुगीज कॉलनीकडे. वाटेत मला एक छान हँडबॅग स्वस्तात मिळाली, मग दुसरीने घेतली मग तिसरीने. ’ए बघू बघू’ करत गाडीत बसलेल्या काही जणी पुन्हा उतरून तशा बॅग्ज विकत घेऊन आल्या. चेकआऊट केल्याने गाडीत मागे आधीच बॅगांचा ढीग होता, त्यात यांची भर. गाडी पोर्तुगीज कॉलनी पाशी आली आणि जरा भ्रमनिरास झाला. काही पॉइंट्स मोठ्य़ा चतुराईने तयार केलेले असतात. अमृतसरला आम्हाला 'भुयारी हनुमान मंदिर देखा नही तो क्या देखा' म्हणत एकाने नेलं होतं. त्यात फक्त बुटक्या दगडाखालून वाकत वाकत आत शिरायचं, बाकी मंदिर नेहमीसारखंच होतं तसला हा प्रकार. पूर्वी गोव्याचा कारभार पाहणार्‍या पोर्तुगीज अधिकार्‍यांची निवासस्थानं तिथे आजही आहेत. खरं तर तब्बल ४५० वर्ष राज्य केल्याने सगळ्या गोव्यावरच पोर्तुगीज रचनेचा प्रभाव जाणवतो. कॉलनीत खालच्या मजल्यांवर टेलरपासून कॅफेपर्यंत बारकी दुकानं आहेत पण ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी गत.
रविवारमुळे बहुतेक दुकानांना टाळं असावं. कॉलनीतून बाहेर पडताच समोर रांगेने क्रूझचे बुकींग स्टॉल दिसले. त्यातल्या एका स्टॉलवरच्या १६,१७ वर्षाच्या सावळ्य़ा चटपटीत दुकानदार मुलीने आमचे झटपट बुकिंग करुन दिले. इंटरनेटवर मात्र बुकिंग शिल्लक नाही असे दिसत होते पण इंद्राणी म्हणालीच होती की गेल्यावर मिळू शकेल. मीनल तोवर वास्कोला तिच्या मावशीकडे रवाना झाली आणि आम्ही गोवा विद्यापीठाजवळच्या दोना पावला उर्फ लव्ह पॉईंटला निघालो. एका पोर्तुगीज व्हॉईसरॉयच्या मुलीचं हे नाव. तिच्या दानी वृतीमुळे तिच्या पश्चात स्थानिकांनी तिच्या पतीच्या अखत्यारीतल्या या भागाला तिचं नाव दिलं असं म्हणतात. पार्किंगपासून तिथपर्यंत बरच चालावं लागतं. तिथे फिरंगी टोप्यांचीही बरीच दुकानं आहेत. वाटेत काजूच्या दुकानात घुसलेल्या मैत्रिणींना कसंबसं बाहेर ओढून काढत एकदाचे पोचलो पण हाय! दुरुस्तीसाठी ते बंद होतं. मधल्या जाळीतूनच मग प्रसिद्ध दोनापावला पुतळा, त्यासमोरचा बोटींविना आज रिकामा दिसणारा निळाशार किनारा आणि सिंघमफेम कोपरा पाहिला जिथे अजय देवगण लोखंडी पाईप उचकटून दे धमाल हाणामारी करतो. कुलूप पाहून हिरमोड झाल्यामुळे आता आमचीही सटकली होती. लेकिन मूड अपनेआप बन गया कारण आता क्रूझवर जायचं होतं :-)

तपकिरी, लालसर छटा असलेल्या आणि हिरवाईने वेढलेल्या पणजीतल्या सुबक प्रशासकीय इमारती बघत, मीरामार बीचजवळून पास होत अखेर जांबोरी क्रूझच्या कक्षापाशी येऊन पोचलो. विमानासारखं चेकइन करुन गेटपास घेऊन धक्क्याशी उभं राहिलो. अंधार होऊ लागला होता. रांगेत तासभर प्रतीक्षा केल्यावर आमची क्रूझ अवतरली. तोवर आम्ही आजूबाजूच्या इतर हायफाय क्रूझ, त्यावरून ये जा करणारे पर्यटक, आत विहार करणार्‍या क्रूझवरच्या नर्तिकांच्या एकसमान हालचाली, कानावर येत असलेल्या रॉक सुरावटी, मागचे ढिनचॅक कॅसिनो हे सगळं टिपत एकीकडे अखंड वटवट करत उभ्या होतो. एकदाची जांबोरी आली आम्ही धावत जाऊन डेकवरच्या सलग जागा पकडल्या.
काळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर चमकणारे दिवे, रुपेरी कडांच्या काळ्याभोर लाटांवर डुलणार्‍या इतर लखलखत्या क्रूझवरची रोषणाई नजरेत साठवतो तोच खालच्या मजल्यावर बुलावा आला. आधी चिल्ल्यापिल्ल्यांचे, मग हनीमून कपल्सचे मग फक्त बायकांचे आणि मग ज्यांना वाटेल त्यांचे असे नाचाचे राऊंड बॉलीवूड हिट्सच्या दणदणाटात झाले. उघडझाप करणार्‍या दिव्यांमुळे कुणीच कुणाला धड ओळखू येत नव्हतं. हनीमून कपल्स पैकी एका गोबर्‍या गालाच्या मुलीला लेडीज राऊंड मध्ये नाचायला कंपनी हवी होती. ती हळूच आमच्या वर्तुळात शिरली आणि धमाल नाचली. अधूममधून क्रूझतर्फे कोंकणी आणि पोर्तुगीज नाच झाले. त्यांचे तिघंही नर्तक ग्रेसफुली पण फारच मख्ख चेहर्‍याने यांत्रिकपणे नाचत होते. त्यांचा पदन्यास मात्र ताल धरायला लावणारा होता. नंतर पुन्हा वरच्या डेकवर आलो आणि निवांत फेरीची मजा घेतली. वैदेहीला व्हिडिओ कॉल लावून तिथला दीपत्कार दाखवण्याची माझी धडपड सुरू होती पण कॉल सारखा तुटत होता. शेवटी तिने, 'आई तू आता मस्त एंजॉय कर बरं. आपण जाऊ पुन्हा किंवा मी यूट्यूबवर बघेन', म्हणून माझीच समजूत काढली.

क्रूझ सफर करून थेट इंद्राणीकडे म्हणजे पोर्वोरिम भागात गेलो. नयनरम्य वातावरणातला टेकडीवरचा दुमजली प्रशस्त बंगला तिने भाड्याने घेतलाय. दुपारी ती आमच्या जेवणाची बहुतेक तयारी करूनच आली होती, त्यामुळे फक्त गरम पुर्‍या तेवढ्या करून मस्त जेवलो. कितीतरी दिवसांनी घरचं जेवताना बरं वाटत होतं. जेवून तिच्या कॉलनीतलं क्लब हाऊस, तिथला पुस्तकसंग्रह, लगतचा स्विमिंग पूल बघत परिसराला चक्कर मारून आलो. एकांतप्रिय आणि निसर्गप्रेमी माणसांसाठी गोवा अगदी उत्तम जागा आहे. मंजिरीची दंतवैद्य पक्षीप्रेमी बहीण खास त्यासाठीच मुंबई सोडून पणजीच्या उपनगरात नवर्‍यासह स्थायिक झालीय. मंजिरी वाटेत उतरून मुक्कामाला तिच्याकडेच गेली होती. इंद्राणीचं घर आतूनही बघण्यासारखं होतं. मालक भलताच रसिक असावा. निवडक पोर्ट्रेट्स, दुर्मिळ शो पिसेस तर होतेच पण वरच्या मजल्यावर बायकोचे हजारएक पादत्राणांचे जोड मावतील अशी अलमारी त्याने करून घेतलीय. त्यावर आमचे आपापल्या नवर्‍याच्या नावाने बरेच विनोद करून झाले :-) उद्याच्या प्लॅननुसार गुगलवर अंतरं बघून कुठे किती वेळ थांबायचं, केव्हा पोचायचं वगैरे चर्चा करेतो निम्म्या जणी आपापल्या बेडवर गुडूप झाल्या.

Friday, April 12, 2019

मधुशाला: ध्येयाचा ध्यास

हिंदी साहित्यातील सर्वाधिक लोकप्रिय १० कवितांची यादी करायला घेतली तर मला वाटतं,
मधुशालाचा क्रमांक बराच वरचा असेल. १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या हरिवंशराय बच्चन यांच्या ह्या
कवितेने असंख्य रसिक वाचकांना अक्षरश: वेड लावलंय. उमर खैयाम ने पर्शियन भाषेत लावलेलं हे बीज
बच्चनजी (एडवर्ड फित्झगेराल्डच्या इंग्रजी मातीच्या आधाराने) भारतात घेऊन आले आणि हिंदी भाषेच्या
मातीत हे रोपटं छान बहरलं.
मधु म्हणजे मदिरा आणि मधुशाला म्हणजे मदिरालय. ही कविता प्रसिद्ध झाली त्यावेळी अनेक
तथाकथित ‘सोवळ्या’ वाचकांनी आणि साहित्यिकांनी बच्चनजींवर टीका केली. मदिरेसारख्या वाईट द्रव्यावर
कविता करणं कसं चुकीचं आहे हे सांगण्यासाठी चढाओढ सुरु झाली. आणि गंमत म्हणजे अशा
वातावरणात या कवितेचं जाहीरपणे समर्थन केलं ते गांधीजींनी! ही कविता म्हणजे दारू आणि दारुड्यांच
कौतुक नसून ती केवळ प्रतीके आहेत. ही कविता अर्थाचे कितीतरी पदर ल्यालेली एक उच्च दर्जाची
साहित्यकृती आहे, हे गांधीजींनी ठासून सांगितल्यावर ह्या कवितेला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यानंतर ही
कविता रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली. १९३६ आणि १९३७ मध्ये अनुक्रमे मधुबाला आणि मधुकलश
ही हरिवंशरायजींची काव्ये प्रसिद्ध झाली, मात्र त्यांना मधुशालाइतकी लोकप्रियता लाभली नाही.
एकशे एकोणचाळीस कडव्यांची (मूळ १३५ आणि परिशिष्ट म्हणून ४) ही कविता मानवी जीवनाचे
आणि जीवनाच्या विविध पैलूंचे वर्णन करते, जीवनात सतत अग्रेसर होण्यासाठी मार्गदर्शन करते आणि
जीवनातल्या संगती/विसंगतींवर भाष्य करते.
या कवितेची सुरुवातच वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय परंपरेनुसार काव्याच्या सुरुवातीला असते तसे
मंगलाचरण मधुशालेतही आहे. मृदू भावनांच्या द्राक्षापासून मदिरा तयार करून कवी देवाला नैवेद्य अर्पण
करतो; आणि मग जगाला ‘प्रसाद’ द्यायला सिद्ध होतो.
या कवितेतील मुख्य प्रतीके म्हणजे मधु/ मदिरा/ हाला (मद्य), साकी (मद्याचे वितरण करणारी
व्यक्ती), प्यास (तृष्णा), प्याला (चषक) आणि मधुशाला (मदिरालय)! या प्रतीकांचे हवे तेवढे अन्वय
लावण्याचा अधिकार वाचकाला आहे. मधु/मदिरा हे जीवनाच्या ध्येयाचे प्रतीक मानले तर ‘प्यास/तृष्णा’ हे
ध्येयाच्या ध्यासाचे प्रतीक ठरेल. प्याला, साकी ही ध्येयसिद्धीच्या मार्गात पुढे नेणारी साधने आणि
मधुशाला हे त्या मार्गावरचे अंतिम स्थान. मनुष्य आयुष्यात एखादे ध्येय मनाशी ठरवतो आणि त्या दिशेने
मार्गक्रमण करू लागतो. मार्ग ठाऊक नसतो. अनेक लोक अनेक सल्ले देतात. कोणता मार्ग निवडावा, ते
कळेनासे होते. अशा वेळी कवी नि:संदिग्धपणे सांगतो, ‘राह पकड तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला’.
एखादं ध्येय निश्चित केलं तरी ते प्राप्त करणं सोपं नसतं. त्या दिशेने निरंतर मार्गक्रमण करणं
महत्त्वाचं असतं. हा प्रवास कधी कधी इतका मोठा वाटायला लागतो की संयम संपायला येतो. मार्गावर
भेटणारा प्रत्येकजण ‘आणखी दूर’ एवढंच सांगत असतो. कितीही दूरवर नजर टाकली, तरी आपलं ध्येय

दृष्टिपथात येतच नाही. पुढे जाण्याचं धैर्य नसतं आणि पाठी वळायचं नसतं. अशा वेळी आपलं ध्येय
मन:चक्षूंसमोर आणलं, सतत त्याचं स्मरण केलं, तिथपर्यंत पोहोचलोय अशी कल्पना करत राहिलं की ते
दूर वाटेनासं होतं आणि त्याचा सतत ध्यास घेतला की आपण केव्हा येऊन पोहचलो ते कळतही नाही.
‘मुख से तू अविरत कहता जा मधु, मदिरा, मादक हाला,
हाथों में अनुभव करता जा एक ललित कल्पित प्याला,
ध्यान किए जा मन में सुमधुर सुखकर, सुंदर साकी का,
और बढ़ा चल, पथिक, न तुझको दूर लगेगी मधुशाला।’
बरेचदा एखादी गोष्ट हातात आली असं वाटत असतानाच काहीतरी बिनसतं. एखादा प्रयोग
यशस्वी होणार असं वाटेस्तोवर तो फसतो. अशा वेळी न डगमगता चिकाटी ठेवून प्रयत्न सोडायचा नाही,
हे कवी ठासून सांगतो. ‘पथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला|’
बरं, या ध्येयवेड्या लोकांचं ध्येय साधंसुधं नसतं. एकच तारा समोर असला की पायतळी अंगार असणारच!
त्यामुळे ध्येय प्राप्त करायचं तर वैयक्तिक सुखाची राखरांगोळी करायची तयारी हवी. म्हणून कवी आधीच
इशारा देतो, ‘जलने से भयभीत न जो हो, आए मेरी मधुशाला |’ घरादारावर निखारा ठेवून भावांसह काळ्या
पाण्याची शिक्षा भोगायचं धैर्य येतं ते यातूनच. सण आणि उत्सव म्हणजे आनंदाचे क्षण. वर्षातून एकदा ते
येणार आणि आनंद देणार. मात्र या ध्येयवेड्या लोकांना त्याचं ध्येय हे एकमेव आनंदाचं निधान! आणि
सतत कार्यरत असताना हा आनंद सतत मिळत राहणार. कवी म्हणतो, ‘दिन को होली, रात दिवाली, रोज़
मनाती मधुशाला।’
एखाद्याने एखादा ध्यास घेतला, की त्याला सर्वदूर त्याचाच भास होतो. जळी, स्थळी, काष्ठी,
पाषाणी तेच दिसतं. कवीला याची कल्पना आहे. त्यामुळे
‘किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देती हाला
किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देता प्याला,
किसी ओर मैं देखूं, मुझको दिखलाई देता साकी
किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।’
कवीला निसर्गातही मधु, प्याला, साकी आणि मधुशाला यांचच दर्शन होतं. झाड म्हणजे साकी,
मोहोर म्हणजे प्याला आणि त्यातून दरवळणारा मादक सुगंध म्हणजे हाला, अर्थात, मदिरा! रोज
उगवणारी प्रभात म्हणजे मधुशाला, संध्याकाळ मधुशाला आणि अंधारी रात्रही मधुशाला! मधुबन मधुशाला,

उपवन मधुशाला आणि तपोवनही मधुशाला! श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर, वीणेचा झंकार, चित्रकाराचं चित्र
मधुशाला!
एकदा ध्येयाच्या दिशेने निघाल्यावर मार्गात इतर ध्येयवेडेही भेटतातच. एकाच ध्येयाने झपाटलेल्या
या लोकांमध्ये कसलाही भेदभाव उरत नाही. आपल्या सोबत असलेला आपल्यासारखा ध्येयवादी हिंदू आहे
की मुस्लिम हे डोक्यातही येत नाही. मंदिर आणि मशिदीत जाताना हा भेदभाव मनात बाळगणारा मनुष्य
ध्येयाच्या मार्गावर धर्म विसरतो, त्यामुळेच अब्दुल कलाम आणि अरुणाचलम खांद्याला खांदा लावून एकत्र
काम करू शकतात. कवी हे सुंदर शब्दात मांडतो, ‘बैर बढ़ाते मंदिर मस्जिद, मेल कराती मधुशाला|’
धर्मभेदाप्रमाणे आर्थिक, सामाजिक भेदही एकाच ध्येयासाठी धडपडणार्यांना अमान्य असतात. त्यामुळेच,
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती एखाद्या सामान्य मावळ्याला हृदयाशी धरू शकतो.
‘रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला|’
एखाद्या वेळी एखादा संशोधक, चिंतक एखादी नवीन संकल्पना मांडतो. ही संकल्पना, हा सिद्धांत
मांडण्यापूर्वी त्याने जीवाचं रान करून संशोधन, चिंतन, मनन केलेलं असतं. मात्र जग त्या सिद्धांताला
मान्यच करत नाही. अशा परिस्थितीत कवी निःसंदिग्धपणे सांगतो,
‘आज करे परहेज़ जगत, पर, कल पीनी होगी हाला,
आज करे इन्कार जगत, पर, कल पीना होगा प्याला...’
डार्विन आणि कोपर्निकसचे सिद्धान्त अमान्य करणारे काळाच्या पडद्याआड गेलेत, आज आपण
ते सिद्धान्त स्वीकारले आहेत.
ज्ञानप्राप्तीसाठी झपाटलेला एखादा ज्ञानार्थी कितीही ज्ञान मिळालं तरी समाधानी नसतो. अवघं
आयुष्य वेचून कळतं ते हेच की अजूनपर्यंत आपल्याला काहीही कळालेलं नाही. आणि मग खरं ज्ञान
मिळवण्याची ओढ लागते.
‘शान्त सकी हो अब तक, साकी, पीकर किस उर की ज्वाला,
‘और, और’ की रटन लगाता जाता हर पीनेवाला...’
आणि तरीही ध्येय गवसतंच, असं नाही. असे निराश लोकही जगात कमी नाहीत. त्यांचीही मनस्थिती
कवी अचूक पकडतो,
‘हाथों में आने-आने में, हाय, फिसल जाता प्याला,
अधरों पर आने-आने में हाय, ढुलक जाती हाला,

दुनियावालो, आकर मेरी किस्मत की ख़ूबी देखो,
रह-रह जाती है बस मुझको मिलते-मिलते मधुशाला।’
काही लोक असे निराश होतात, तर काही चिकाटीने कार्यरत राहतात. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ते
आपल्या कामात मग्न असतात. ते म्हणतात,
‘मेरे अधरों पर हो अंतिम वस्तु न तुलसीदल प्याला
मेरी जिव्हा पर हो अंतिम वस्तु न गंगाजल हाला,
मेरे शव के पीछे चलने वालों याद इसे रखना
राम नाम है सत्य न कहना, कहना सच्ची मधुशाला।’
एवढचं नाही, तर आपल्या मृत्यूनंतरही आपले कार्य पुढे सुरु राहावे अशी त्यांची इच्छा असते.
एखादा रामकृष्ण भांडारकर प्राच्यविद्या संशोधनासाठी आपलं आयुष्य वेचतो आणि त्याच्या मृत्युनंतरही
इतर संशोधकांसाठी हक्काची मार्गदर्शक यंत्रणा कार्यरत राहते. त्याच्या कार्याला ही खरी आदरांजली
असते.
‘प्राण प्रिये यदि श्राद्ध करो तुम मेरा तो ऐसे करना
पीने वालों को बुलवा कऱ खुलवा देना मधुशाला।’
तर अशी ही मधुशाला. ध्येयाच्या मार्गावर चालत राहण्याचा संदेश देणारी. ध्येयाचा ध्यास कसा
घ्यावा, ते शिकवणारी. ध्येयपथावर अडथळे कसे येतात आणि ते आले तरीही न डगमगता आपली
वाटचाल सुरु कशी ठेवायची त्यावर प्रकाश टाकणारी. ध्येय कोणतेही असू शकेल, एखादा नवीन शोध
लावण्याचं ध्येय, एखादा अज्ञात प्रदेश शोधून काढण्याचं ध्येय, आपल्या मातृभूला परकियांच्या जोखडातून
मुक्त करण्याचं ध्येय, आपल्या देशाचा आणि देशवासियांचा विकास करण्याचं ध्येय, जुन्यापुराण्या
अन्यायकारक परंपरा झुगारून देऊन समाजसुधारणा करण्याचं ध्येय, पददलित-शोषित-पीडितांना मुख्य
प्रवाहात आणण्याचं ध्येय, अध्यात्माच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करण्याचं ध्येय... त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून
आपलं तन, मन, धन त्यासाठी अर्पण करण्याची प्रेरणा देणारी ही मधुशाला. ही कविता नाही, तर जीवनाचं
तत्त्वज्ञान आहे. ही कविता अशीच अनेक पिढ्यांना ध्येयवेडाचे धडे देत राहो आणि ध्येयवेड्यांना
तिच्याकडून प्रेरणा मिळत राहो...
बनें रहें ये पीने वाले, बनी रहे यह मधुशाला।

Thursday, April 11, 2019

हॉगकांग -मकाऊ-शेनजेन

एखादा महिना पायाला भींगरी लागते तस यावेळेस झाल.20 दिवस पुण्या मुम्बई ला लग्नाला हजेरी लाऊन आल्यावर  8 दिवसातच केसरी बरोबर हॉगकांग मकाऊ टूर होता. परत बॅग भरायची,घराबाहेर रहायच ,खायच ,सगळ्याचाच कंटाळा आला होता. त्यामुळे थोड्या अनिच्छेने मुम्बई साठी निघालो.11 ला एयरपोर्ट ला केसरी च्या फ्लॅगपाशी पोचलो.रात्रि 2 ला फ्लाइट होत। एक एक फॅमिली यायला लागल्या,केसरी नी आधी पाठवलेल्या लिस्ट मधले हे कोण कोण असावेत याचा अंदाज बांधण्याचा माझा आवडता खेळ सुरु झाला. तेवढ्यात नाशिकहुन अंजू विनायक पण पोचले. ह्या बाई जरा शिष्ट दिसतायत, ह्या साध्या आहेत,ही फैशनेबल वाटते अस माझ आणी अंजू च लगेच गॉसिप पण सुरु झाल.अर्थात बाकी सगळ्यांच्या नजरां पण एकमेकांना जोखण्याच्या कामाला लागल्या होत्या.

सकाळी 9 ला हांगकांग ला पोचलो.( इकडले 7) आपल्यापेक्षा तिकडली वेळ 2 तास पुढे आहे.इमिग्रेशन लवकर झाल।तिथेच लीना( तीच नाव वेगळच होत केसरीवाल्यानी सोईसाठी बदलल)आमची शेनजेन ची गाइड आम्हाला जॉइन झाली.लीना 32 वर्षाची (लग्नाळू)   चवळीच्या शेंगेसारखी,चेहरा मात्र काहीसा पुरुषी,दांत पुढे आलेले पण हसतमुख अशी होती।
हांगकांग च एयरपोर्ट अतिशय भव्य आहे ,2 मेट्रो बदलून एयरपोर्ट वरच असलेल्या पोर्ट वर पोचलो.तिथुन जेट फॉईल नी आम्ही शेंनजेन ला जाणार होतो. फ्लाइट ,मेट्रो अन वॉटर जेट सगळ एकाठिकाणी असलेला हा कदाचित एकमेव एयरपोर्ट असावा.एयरपोर्ट वर असतानाच विलास (केसरी गाइड) नि सांगितले इथुनच घरी मेसेज करायचा असेल तर करा,शेंनजेन मधे,खरतर सम्पूर्ण चीन मधेच व्हाट्सअप वर बंदी आहे.लगेच सगळ्यांच्या माना खाली गेल्या,(व्हाट्सअप साठी बर) आणि घरच्यांबरोबर लास्ट चॅट असल्यासारखे सगळे मोबाइल ला चिकटले. तिथुन अर्ध्या तासात शेकाऊ पोर्ट शेंनजेन ला पोचलो.लंच करुनच 3 वा. सेंचुरी किंगडम होटल ला गेलो.

फ्रेश होऊन लगेच लुहाउ मार्केट ला गेलो.आपल्या इकडल्या फुटपाथ मार्केट सारख ते मार्केट। तिथे फूटपाथ वर विकायला बंदी असल्याने एका काम्प्लेक्स मधे छोटी छोटी असंख्य दुकान होती. फारस काही घ्यायच नव्हतच,दिलेल्या वेळेच्या आधीच बाहेर आलो.बरेच मेंबर्स वेळ होऊन गेली तरी आले नाही .लीना चांगली गरम झाली,पुढच्या वेळेस कोणी उशिरा आल तर आम्ही निघुन जाऊं तुम्ही टैक्सी नी हाॅटेल ला या असा दम भरला. (त्याचा पूर्ण ट्रिप मधे मात्र काहीच उपयोग झालेला दिसला नाही). नंतर शेंनजेन चा  फेरफटका मारायला निघालो. लीना ची अखंड बड़बड़ सुरु होती.तीच इंग्लिश ठीक ठीक ,बोलण कर्कश्श अन एकसुरी  होत,आम्ही प्रवासामुळे थकलो पण होतो,त्यामुळे तिच्या बोलण्याकडे फारस कोणाच लक्ष नव्हतं पण तीच काम मात्र ती जीव तोडून करत होती।
शेनजेन ला बीजिंग किंवा शांघाई सारखा प्राचीन इतिहास नाही ,1970 मधे वसलेल,अतिशय अत्याधुनिक अस शहर आहे। स्वच्छ रस्ते ,त्याच्या दोन्ही बाजूनी 60 -70 मजली उंचच ऊंच पत्यांच्या बंगल्याप्रमाणे वाटणाऱ्या इमारती  होत्या.जगातल्या ऊंच इमारतींमधे चौथ्या नंबर ची 115 मजली इमारत शेंनजेन ला आहे (1 दिवसात 1मजला बांधून होतो, इति - लीना! ).चीन नि अल्पावधीत केलेली प्रगती खरच थक्क करणारी आहे. मुम्बई मधे पण ऊंच इमारती आंहेत,पण संख्येने अगणित असल्यामुळे की काय इथल्या इमारती मात्र अंगावर आल्यासारख्या वाटत होत्या.
सगळ्या मोठ्या फैक्ट्रीज ,अप्पो ,वीवो, मर्सेडीज़,इथे दिसल्या. रस्त्यानी सगळ्या लेटेस्ट कार्स दिसल्या ,पण दुचाकी मात्र बूटक्या (कारण सगळे चीनी ठेंगणे) अन इलेक्ट्रिक होत्या,एकही पेट्रोल वाली दुचाकी दिसली नाही. रात्री  जागोजागी चौकामधे लोक एकत्र येऊन डांस करत असलेले दिसले. इथले लोक संध्याकाळी लवकर जेवतात, मग रात्री चौकामधे एकत्र जमुन गप्पा ,नाच ,एरोबिक्स करुन स्वतःच मनोरंजन करतात. आपल्या इकडल्या हैप्पी स्ट्रीट सारखा हा प्रकार होता. जेवण मसालेदर ,तेलकट नसत ,भात आणि नूडल्स त्यात वेगवेगळ्या भाज्या ,हेच मुख्य खाद्य त्यामुळे सगळेच स्लिम ट्रिम असतात. तुम्ही पण असच खा म्हणजे लट्ठ होणार नाही असा आगाऊ  सल्ला पण ग्रुप मधल्या लट्ठ लोकांकडे पाहत लीना नी दिला.आणि खरच लट्ठ चीनी फारच कमी दिसलेत.सगळेच सडपातळ,ठेंगणे चपट नाक अन बारीक डोळे असे होते.त्यांच्या अशा शरीरयष्टि मुळे वयाच अंदाज येण मात्र खूपच कठिण आहे.इथे नवरा बायको दोघेही नोकरी करतात, घरातली काम ही दोघ मिळून करतात.चीन मधे लग्न ठरवताना पहिले मुलींचे पाय बघायचे,छोटे नाजुक पाय हे सौंदर्याच लक्षण मानल जायच म्हणुन आईच मुलींचे पाय बांधून किंवा मोडून ठेवते अस लहानपणी ऐकल होत,तेंव्हा वाटायच किती ही क्रूरता !आता मात्र, if u want me to wash cloth then u wash baby ,अस नवऱ्याबद्दलची अपेक्षा सांगणारी  लीना पाहिली आणी ,स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने चीन मधे  रुजतेय हे पाहून आनंद झाला.
दुसऱ्या  दिवशी सकाळी जेड फॅक्ट्री ला गेलो. तिथे एका ac हॉल मधे आम्हाला बसवल, वेलकम ड्रिंक दिल,आणि एका चटपटीत मुलीनी जेड बद्दल सगळी माहिती सांगितली,।ईथे जेड या स्टोन च खुप महत्व आहे जितका जुना स्टोन तितका महाग!जेड ला चीनी खुप शुभ मानतात। आम्हा सगळ्यांना जेड च एक लॉकेट गिफ्ट केल,इतक महाग असून सगळ्यांना कस काय दिल याच आश्चर्य वाटल ,पण ते ओरिजिनल जेड  नसाव,कारण लुहोऊ मार्केट ला 300 ,400 ₹ मिळणार कड़  काल पाहिल होत. त्यांच्या शॉप मधे फेरफटका मारला अन पुढे निघालो। लीना नि सांगितलं आई मुलीला ,सासु सुनेला जेड च कड देते.लहान असताना घातलेल कड पुढे  हाताला घट्ट झाल की ते कापून त्याचे इयरिंग्स ,रिंग किंवा अजुन काही बनवतात,पण ते दुसऱ्या कोणाला देत नाहीत. कड कापून देण्यासाठी तिथे वेगळी दुकान आहेत. सोन्याच्या सुबक दागिन्यांची सवय असलेल्या आपल्या भारतीय मनाला दगडाच कड अन ते पण इतक महाग हे पटायला जरा जडच जात.
तिथुन मग,बाम्बू फैक्ट्री ला गेलो.बाम्बू पासून कापूस बनउन त्याच्या अनेक वस्तु तिथे विकायला ठेवल्या होत्या,टॉवेल्स सॉक्स स्टोल ,शर्ट, पण ते सगळ खूपच महाग होत.
त्यानंतर विंडोज ऑफ वर्ल्ड  ला गेलो. तिथे 7 वंडर्स अन जगभरातल्या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांच्या छोट्या प्रतिकृति आहेत. कंबोडिया च हिन्दू टेम्पल ,नायगारा फाॅल ,आयफेल टाॅवर ,कोलोसियम ,पिरॅमिड ,गोंडोला, विंडमिल्स, आपला ताजमहल तर होताच.पूर्ण दुनिया ची सैर आम्ही इथेच झाली, ति पण ट्राम नी.  (दुनिया की सैर करलो ,अराउंड द वर्ल्ड इन आठ डॉलर्स है गाण नकळत तोंडात आल) ट्राम फ़क्त काही स्पॉट्स ला थांबणार होती, तिथे फ़ोटो काढले ,बाकी जमेल तेवढ पायी फिरुन बघितल।
त्यानंतर "स्प्लेंडिड चायना"ला भेट दिली,तिथे चीन ची पूर्ण संस्कृति,घर ,शेती,लोक त्यांचे पोशाख खाद्यपदार्थ ,पैगोडा ,प्रसिद्ध चायना वॉल इतर प्रसिद्ध स्पॉट्स यांच्या छोट्या प्रतिकृति,( स्वतः ठेंगणे असल्याने चाइनीज लोकांना सगळ्या भव्य गोष्टींच मिनिएचर करावस वाटत असेल का ?) अस सगळ विस्तीर्ण जागेत वसवल आहे.सगळीकडे ,हिरवा गालीचा ,ठिकठिकाणी हटके आकार दिलेली झाड ,रंगीबेरंगी सुंदर फूल होती.एक चिमुकल तळ,तळ्याच्या मध्यभागी लाल पिवळ्या भड़क रंगसंगतीचा भव्य कलश ( कंदील) त्यामधे अफलातून लाइटिंग,त्याची प्रतिमा तळ्यामधे पडलेली, तळ्यालगत उत्कृष्ट वास्तुशिल्पाचा नमुना असलेला पैगोडा,नीरव शांतता, झाडातुन डोकावणारा चंद्र ,काय  दृश्य होत ते ,अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये।
त्याशिवाय चायनीज लैंटर्न चे भव्य,ड्रैगन,विविध मानवीआकृति कार्टून्स ,प्राणी ,कमानी ,ठिकठिकाणी होत्या।ह्या सगळ्यांचे रंग लाल पिवळा ,नीळा असे भड़क पण आकर्षक होते ,त्यात लाइट्स लागल्यानंतरचे दृश्य तर अवर्णनीय होते। तो पूर्ण भाग आम्ही ट्राम नी हिण्डून बघितला.अनेक रेस्टोरेंट्स,होते सगळीकडे विविध नॉनवेज चे कबाब मांडून ठेवले होते,त्यांचा खमंग दरवळ पसरला होता। चिनी फ़ूड मात्र खायची इच्छा झाली नाही ,तो वास सहन होत नव्हता।  एका रेस्टॉरेंट ला फ़्रेश नूडल्स कसे बनवतात ते पण बघितल. इथेच रात्रि जाणता राजा च्या जवळपास जाणारा शो बघितला. शो सुरु व्हायला वेळ होता ,दिवसभर शूज घालून कंटाळा आला म्हणुन शूज काढून आरामात बसलो.समोरच्या  रांगेतली  मुलगी सारख मागे वळून अमच्याकड़े  बघून तिच्या आई ला काहीतरी सांगत होती ,काय आम्हाला कळल नाही .तेवढ्यात लीना कुठून तरी घाईघाईनी उगवली," no one do here like this ,put on ur shoes" अस थोड़ रागातच सांगून चालली गेली .मग आम्हाला कळल चीन मधे आजही पाय उघड़े टाकण अशुभ मानतात. तिथे कोणाच्याही पायात चप्पल ही दिसली नाही. शो मात्र खूपच सुंदर होता, डोळ्याच पारण फिटण म्हणजे काय ते त्यादिवशी कळल।
दुसऱ्या दिवशी हाँगकॉग ला निघायच होता,दिलेल्या वेळेत बरेच लोक यायचे नाहीत ,विलास नी आम्हा सगळ्यांना,तीन तिनदा शार्प 9 ला निघायची हात जोडून विनंती केली.त्याच कारण मात्र आम्हाला इम्मीग्रेशनच्या वेळेला कळल. बस नि तिथे पोचल्यावर काही अंतर हातात सामान घेऊन चालाव लागल. 5 feb.ला चीनी नववर्ष असल्याने,होंकोंग ला शॉपिंग ला जाणारी पण खुप गर्दी होती .त्या गर्दी बरोबर हातात सामान घेऊन चालताना निर्वासितांचे लोंढे कसे एका देशातुन दुसऱ्या देशात जातात ,तसा फील आला.

कस्टम आफिस ला पोचल्यावर ,आम्हा 40 लोकांचे 4 ग्रुप केले .पहिल्या मेंबर जवळ 10 लोकांच्या नावाची  लिस्ट होती. प्रत्येकाचा पासपोर्ट त्यावरचा फ़ोटो माहिती,सगळ बारकाईनी बघण सुरु होत.फ़ोटो मधे साम्य वाटल नाही तर सीनियर ऑफिसर ला बोलऊन कन्फर्म केल्या जात होत.त्यांचे सीनियर ऑफिसर जे बाजूच्या केबिन मधून सगळीकडे लक्ष ठेऊन होते ,मधुनच  आरडा ओरडा करत हिंडत होते.सगळे इमीग्रेशन करणारे  चोर असल्यासारख त्यांच् वागण होत. आमच्या  बरोबर डोंगरे म्हणुन एक फैमिली होती ,त्यांचा ग्रुप वीसा नव्हता कारण ते 2 दिवस आधीच पोचुन मग आम्हाला जॉइन झाले होते,पण माझ्या लिस्ट मधे मात्र त्यांच् नाव होत. आमच्या ग्रुप च ज्या काउंटर वर् इम्मीग्रशन होत ,त्याच काउंटर वर डोंगरे फॅमिली नि आमच्या आधी इमीग्रेशन केल होत. त्या ऑफीसर नी माझ्या जवळची लीस्ट पाहिली त्यात  डोंगरे च नाव दिसल्यावर,त्यांनी आधी इमिग्रेशन केलय हे त्याला बरोबर लक्षात राहिल,त्याला मी सगळ समजून सांगायचा प्रयत्न केला,( त्या लोकाना इंग्लिश पण फारस येत नाही) ,त्याला ते कळल ही( म्हणजे कळल असाव) पण तरी त्यानी मला बाजूला थांबायला सांगितले. लिस्ट मधल्या बाकी मेंबर्स च इमीग्रेशन होईपर्यंत मागे वळून मी थांबली कि नाही हे तो पाहत होता. मग मात्र त्यानी ढूंकून ही पाहिल नाही ,तरी त्यानी थांबायला सांगितले म्हणुन आम्ही तिथेच उभे होतो .विलास आल्यावर त्याला सगळ सांगितल, तुम्ही चला आता काही प्रॉब्लम नाही अस त्यानी सांगीतल्यावर  पुढे निघालो पण तरी त्या ऑफीसर नी जा सांगायच्या आधीच आपण निघुन आलो म्हणुन मनात धाकधुक होती पण सुदैवाने काही झाल नाही।हांगकांग इम्मीग्रशन लगेच झाल।बाहेर  आल्यावर कळल दुसऱ्या 10 जणांच्या ग्रुप ला थांबउन त्यातल्या एकावर प्रश्नांची सरबत्ति केली होती (अस होऊ शकेल अशी  कल्पना विलास नि आधी दिली होती). हुश्श करुन बस मधे बसलो।  मिशन ईमीग्रेशन फत्ते व्हायला 3 तास लागले .हांगकांग हा खर चीनचाच भाग,तरी एवढी सतर्कता !  तुलना करायची नाही अस ठरऊनही आपल्या देशात घूसखोरी करणारे बांग्लादेशी अन नेपाली आठवले।  सगळ्यात किचकट इम्मीग्रशन चीन अन US च आहे ,भरपूर वेळ जातो म्हणुन  तुम्हाला आज वेळेत निघा  सांगत होतो असे अनुभवाचे बोल विलास नि ऐकवले।
शेनजेन ला राम राम ठोकुन आम्ही पुढे निघालो.

हॉंगकॉग ला फ़क्त भोज्या करुन  शेंनजेन ला गेल्या मुळे एखाद्या फ्रेम मधे दिसेल एवढंच हाँगकाँग दिसल होत.आता बस नी जाताना अनेक मूवी मधे पहिलेल्या हाँगकाँग च प्रत्यक्ष दर्शन होत होत।
हाँगकाँग हा चीन चाच भाग आहे ,पण एक देश दोन राज्यपद्धती या चीन च्या धोरणामुळे तीथले नियम,चलन( चीन च युआन तर हांगकांग च हांगकांग डॉलर) फ्लॅग ,सगळ चीन पेक्षा वेगळ आहे। हांगकांग SAR म्हणजे special administrative region आहे। दोन्ही कडल्या लोकांना इकडून तिकडे जायला वेगळा परवाना लागतो। सगळयावर अंतिम कंट्रोल मात्र चीन चा आहे। ब्रिटीशांनी हाँगकाँग चीन ला परत केल पण तिथे अजूनही  बरचस इंग्रजाळलेल वातावरण आहे .बऱ्याच लोकांना हाँगकाँग ब्रिटिश रूल खाली असाव अस अजूनही वाटत।
हॉँगकोंग चा आमचा गाइड जैक,  स्थूल ,ठेंगणा ,मृदुभाषी होता।इंग्लिश छान बोलायचा। त्यानी हॉटेल ला पोचेपर्यंत बरीच   माहिती दिली,त्यात  चीन बद्दल चा रोष च जाणवत होता। हांगकांग हे बेट,त्यात बराच भाग डोंगरानी व्यापलेला ,साहजिकच जागेची कमतरता!त्यामुळे इमारती अन जागेचे भाव , गगनाला भिड़णारे असल्यास नवल नाही। इथे जवळपास 9000 गगनचुंबी इमारती आणि ,LA अन न्यूयॉर्क पेक्षा चढ़े ,जागेचे भाव आहेत।
होंगकोंग च इमिग्रेशन ऑफिस जेंव्हा त्यांच्या हद्दीत होत तेंव्हा टूरिस्ट ना खुप त्रास व्हायचा, चीन हुन इकडे यायच तर 2 ठिकाणी  सगळी प्रोसेस (security ,luggage screening) परत करावी लागायची।आणि चीन काही त्यासाठी खर्च करू ईच्छीत नव्हता ।शेवटी होंगकोग इमीग्रेशनऑफ़ीस त्यांनी चीन च्या हद्दित,त्यांच्या इमीग्रेशन ऑफिस च्या बाजूला आणल.त्यापोटी लाखो रूपयाच भाड़ आता चीनला देतायत,पण  टूरिस्ट चा त्रास  मात्र वाचला।
हाँगकोंग मधे नदी नाही ,पाऊस ही खुप पडत नाही ,पाण्यासाठी ते चीन वर अवलंबून आहेत। करारानुसार  ठराविक रकमेच्या बदल्यात चीन कडून पाणी पुरवठा होतो .एका वर्षी होंगकोंग ला खुप जास्त पाऊस झाला ,पुरसदृश्य स्थिति निर्माण झाली तरी चीन नी तेवढा पाणी पुरवठा केलाच आणि रक्कम वसूल केली। शेवटी ते लाखामोलाच पाणी त्याना समुद्रात टाकून द्याव लागल। चीन च्या अशा हेकेखोर वागण्याचा  अनुभव  आपल्याला ही आहेच .
असे  बरेच किस्से ऐकता  ऐकता  होटल कोर्टयार्ड मॅरियॅट कधी आल कळल नाही।
थोड़ा आराम करुन मग विक्टोरिया पॉइंट ला निघालो. 130 वर्ष जुनी असलेली ट्राम अवघ्या 8 मि.तो डोंगरा चा कुठेही वळण नसलेला चढ़ सरळ ,चढ़ते ।तो चढताना ,खाली दिसणाऱ्या ऊंच इमारती मात्र पिसाच्या मनोऱ्या प्रमाणे  तिरप्या बांधल्या सारख्या दिसत होत्या.विक्टोरिया पॉइंट ला मॅडम तुसॉदस म्यूजियम आहे ( इथल म्यूझियम लंडन च्या म्यूजियम  पेक्षा लहान वाटल).विक्टोरिया पॉइंट हुन हाँगकाँगअतिशय देखण दिसत। ऊंच झगमगत्या इमारतींच जाळ आणि त्याना विळखा घालून जाणारे झगमगते ब्रीज त्याच्या सौन्दर्यता भर घालतात.तिथल्या एकाही इमारतीत अंधार दिसला नाही। ऑफ़ीसेस  बंद झाले तरी  सगळीकडे दिवाळी होती.विक्टोरिया पॉइंट हुन खाली येतांना बस ने आलो,अर्धा तास लागला। एका यू पिन टर्न वर जैकी चैन च घर आहे ते पण बघितल( म्हणजे फ़क्त गेट दिसल)।त्यानी मुद्दाम अशा वळणावर घर बांधलय की जिथे गाड़ी थांबवण  कठिण आहे जेणे करुन त्याचे चाहते तिथे गर्दी करू शकंणार नाहीत.आपल्या  भारतात चाहत्यानी कशालाही न जुमानता तोबा गर्दी केली असती.
खाली उतरल्यावर लगेच रेपल्स बे बीच ला गेलो ।नितांत सुंदर आणि शांत असा बीच आहे।अंधार् पडल्यामुळे  तिथे जास्त रमता आल नाही।
मग बायकांचा वीकपॉइंट असलेल्या लेडीज  मार्केट ला गेलो। लेडीज मार्केट म्हणजे हांगकांग ची तुळशीबाग !पिन टू पियानो सगळ विकायला होत। नुसतच हिंडलो शॉपिंग फार काही केल नाही .
दुसऱ्या दिवशी डिज़्नी लैंड ला जायच होत ।पँरिस च  डिज्नी बघितल होत पण ते एका दिवसात बघून होंण्यासारख नाही ,त्यामुळे उरलेल इथे बघता येईल म्हणुन आनंद झाला।सकाळी लवकरच निघालो। डिज्नीला दोन्ही वेळची परेड ,काही शोज बघितले ,राइड्स घेतल्या। दुपारची परेड तर पॅरिस ला बघितली होती , रात्री ची परेड बघण हा एक अदभुत अनुभव होता।डिज्नी मधले सगळे कैरेक्टर्स अतिशय सुंदर सजवलेल्या रथा मधून एका पाठोपाठ जात होते त्यांच्या पुढे मागे वेगवेगळ्या आकाराच्या दीपमाळा कल्पकतेने लेऊन म्यूजिक च्या तालावर काही मूली  नाचत जात होत्या। प्रत्येक रथाच्या सजावटीत इतक सौंदर्य अन  विविधता होती की  वर्णन करायला शब्द थिटे पडतील।पापणी न लवता ते अदभुत दृश्य नजरेत साठऊन ठेवल।

जंगल सफारी केली ,मिकी एंड द वनडरस बुक आणि द फेस्टिवल ऑफ द लायन किंग हे शो बघितले। मीकी च्या शो ची  कल्पना तर अफलातून होती। मीकी  आणि गूफी ला एक मैजिकल बुक दिसत ( स्टेज  वर लेसर नि एक मोठ पुस्तक बनवल होता) ,ते पुस्तक मिकी उघड़तो अन त्यातला स्नोमैन खाली पडतो बाहेर तो वितळेल, त्याला  त्रास होईल म्हणुन त्याला परत पुस्तकात  ठेवण्यासाठी मिकी एक एक पान पलटतो ,प्रत्येक पानावरच  करैक्टर( बालू ,किंग लुई ,लिटिल मरमेड ,अल्लादीन ,रापुंज़ेल ) सजवलेल्या रथांमधुन नाचत, गात , प्रत्यक्ष स्टेज वर अवतरत .सरते शेवटी स्नोमैन वाल पेज येत ,त्याला तिथे ठेऊन मिकी पुस्तकाच्या च्या बाहेर येतो,किती छान कल्पना आहे न ! हे पहिल्यावर मुलांमधे वाचनाची आवड़ निर्माण नाही झाली तरच नवल!
दुसऱ्या दिवशी ओसियन पार्क ला गेलो। हा पार्क दोन लेव्हल ला आहे ।डोंगराच्या पायथ्याशी,रेस्टोरेंट्स ,एक्वेरियम ,ज़ू । वर गेल्यावर सगळ्या राइड्स ,डॉलफिन शो ,अन 2-3 रेस्टॉरंटस होते। वर जायला ट्रेन आणि केबल कार ही होती। आम्ही जातांना ट्रेन नी गेलो ,येताना केबल कार नी आलो ।
राइड्स मधे , रोलर कोस्टर ,हेयर रेसर ,माइन ट्रैन ,ड्रैगन राइड ,अशा एकसे एक भयानक ( माझ्यादृष्टीनी) राइड्स होत्या,मी त्यातल्या त्यात सोप्या राइड्स घेतल्या। डॉलफिन शो अन एक्वेरियम ,सिंगापुर पटाया च पहिल्यामुळे फारच बाळबोध वाटल। ।पाण्डा ,कंगारू ,गोल्डन मंकी असे प्राणी जे साधारणतः इतर ठिकाणी बघायला मिळत नाहीत ते इथल्या ज़ू मधे पहिलेत. तरी पण एकंदरीत तो दिवस फुकट गेल्यासारख वाटल।
डिज्नी अन ओसियन पार्क दोन्ही ठिकाणी दिवसभर होतो,त्यामुळे जेवणाचे कूपन्स दिले होते ,आपल्या हिशोबने कधी पण जेवायच।दोन्ही ठिकाणी इंडियन फ़ूड च्या नावाखाली जे काही मिळाल ते अगदीच काही तरी होत।पण बाकी सगळीकडे इंडियन रेस्टॉरेंट्स ला जेवलो,नाहीतर उपाशी राहयची वेळ आली असती।
डिज्नी आणि ओसियन पार्क दोन्ही ठिकाणी जवळ जवळ 8-9 km.चालण झाल। खुप थकलो होतो। दुसऱ्या दिवशी सकाळीच मकाऊ ला निघायच होत। जुगार च आगर असलेल मकाऊ  आमच्या  ट्रिप चा शेवटचा पड़ाव !
दुसऱ्या दिवशी  सकाळीच फ़ेरी बोट नी निघालो ,1 तासात मकाऊ ला पोचलो।मकाऊ च पोर्ट एयरपोर्ट एवढंच मोठ अन चकचकीत आहे. तिथे आमची गाइड लीन होती .मकाऊ हे पेनिनसुला अन दोन आइलैंड्स मिळून बनल आहे .हांगकोंग सारखच SAR असलेल मकाऊ ,हांगकांग पेक्षा खुप छोट आहे. इथला 2/3 भाग समुद्रात भर टाकून बनवला आहे.
जुगार अधिकृत असल्याने ,इतर टूरिस्ट बरोबरच ,हांगकांग आणि चिन चे लोक पण गर्दी करतात.पताका इथली करेंसी आहे ,पण ति फ़क्त मकाऊ तच चालते. काही खरेदी केली तरी पैसे परत घेताना हांगकांग डॉलर मधे मागा,पताका घेऊ नका,कारण ते कुठेच एक्सचेंज करता येणार नाही ,अस लीन नी आधीच सांगितल होत.
पोचल्यावर लगेच आ मा टेम्पल ला गेलो. पोर्तुगीज जेंव्हा पहिल्यांदा या बेटावर आले ,तेंव्हा या टेम्पल जवळ असलेल्या लोकांना त्यांनी हा  कोणता प्रदेश आहे अस विचारल, लोकांना वाटल ते टेम्पल बद्दल विचारतायत ,म्हणुन त्यानी सांगितल की हे समुद्र देवता,माझू  जी maa gok म्हणुन ओळखलया जाते ,तीच देऊळ आहे मा -गोक च पोर्तुगालांनी मकाऊ केल अशी आख्यायिका आहे।  400 वर्ष जुन, डोंगराच्या  पायथ्याशी असलेल हे देऊळ ,फारस मोठ नाहीये।  आश्चर्य म्हणजे देवळात चप्पल घालून जाता येत होत।सगळे लोक मोठ्या मोठ्या उदबत्या विकत घेऊन बाहेर लावत होते.गाभाऱ्यात  पण मोठ्या स्पाइरल उदबत्या वर टांगल्या होत्या ,अन राख खाली पडू नये म्हणुन त्याखाली प्लेट्स पण ठेवल्या  होत्या।
 तिथुन सेंट पॉल चर्च ला गेलो.16 व्या शतकात बांधलेल हे चर्च 2 वेळा आगित भस्मसात झाल। परत परत बनवायला पैसा कुठून येणार ? त्यामुळे आता चर्च चा फ़क्त दर्शनी भाग अस्तित्वात आहे,पण, "खंडहर बताते है इमारत कितनी बुलंद थी ,"तस फ़क्त दर्शनी भागावरुन ते चर्च किती भव्य आणि सुंदर असेल याची कल्पना येत होती। तिथुन 338 m.ऊंच असलेल्या मकाऊ टावर ला गेलो, लिफ्ट नी 61 व्या मजल्यवार क्षणात पोचलो । ऑब्जरवेशन डेक हुन मकाऊ चा 360 'नी अप्रतिम व्यू बघितला। तीथल  फ्लोररिंग ग्लास च आहे , त्यातून थेट खाली पाहताना आपण खाली पडू की काय  अशी  भीति वाटत होती। बरेच लोक तिथे स्काई वॉक आणि बंजी जंपिंग करत होते, करण तर दूर बघतांना सुद्धा भीति वाटली.

हे सगळ पाहून मग  मकाऊ च मुख्य आकर्षण असलेल्या वेनीशियन होटल ला गेलो।अतिशय भव्य (भव्य शब्द ही लाजेल) अन सुंदर होटल होता ते! 1मजल्यावार रिसेप्शन, भव्य कैसिनो आणि रेस्टोरेंट्स तर दुसऱ्यावर 500 च्या वर ब्रांडेड शॉप्स असलेल मार्केट!मार्केट च् छत  सूंदर आकाशी रंगाच अन त्यावर तरंगणारे  पांढरे ढग अस खऱ्या आकाशाशी स्पर्धा करणार होत। उरलेले 40 मजले ,मिळून  जवळ जवळ 3000 रूम्स होत्या। रूम्स मोठ्या आणि लक्झुरियस होत्या. रूम मधे जे रेटकार्ड  होत त्यानुसार रूम रेंट 80 k  होता.अर्थात केसरी ला ग्रुप बुकिंग मुळे 22 k पडल ,अस विलास नि सांगितल।वेनेशियन नाव असल्याने सगळीकडे इटालियन आर्किटेक्चर होत ,मार्केट एरिया त वेनिस सारखी गोंडोला राइड पण होती।या होटल ला कनेक्टेड तेवढच मोट्ठ पैरिसियन होटल होत तिथे आइफेल टावर ची मोट्ठी प्रतिकृति  अन आर्किटेक्चर पेरिस च होत .दोन्ही होटल चे  मालक एकच होते.संध्याकाळी हॉटेल मधे हिंडलो।अलीबाबानी आपला खजिना उधळावा तस जागोजागी सौंदर्य उधळलेल होत।मंत्रमुग्ध होऊन फिरत होतो ,कुठून कुठे जातोय कळत नव्हतं।  डिनर ची वेळ झाल्यावर भानावर आलो.तरी पूर्ण होटल हिंडुन झालच नाही। जिथे डिनर साठी जमायच ते रेस्टॉरेंट तरी सापडत की नाही अस वाटल .विचारत विचारत कस बस पोचलो! डिनर   नंतर 10 - 10.30 ला कैसिनो, ला गेलो। 10-12 हजार लोक मावतील एवढा मोठा हॉल,त्यात,वेगवेगळ्या प्रकारचे एकूण  2-3 हजार  टेबल्स न मशीन्स लागले होते।  तिथे आम्ही 2 तास तरी होतो (अर्थात तुम लड़ो हम कपड़े संभालते मोड मधे)। जिंकल्यवार होणारा चीत्कार ,हरल्यावरची चिड़चिड़,त्रागा ,पुढचा डाव तरी जिंकु या आशेवर कफल्लक होणारे लोक ,सगळी दुनियाच वेगळी होती ती!  एक चाळीशीची साधारण परिस्थिति(तिच्या राहणीमाना कड़े बघून वाटत होत) असलेली बाई ,प्रत्येक डाव जिंकत होती ,तिची एक मैत्रीण थोड्या थोड्या वेळाने येऊन तिला घरी चलायल म्हणत होती,म्हणजे असावी, असा आम्ही हावभाव वरुन अंदाज बांधला.अन एक बारीक चष्मीश मुलगा जो सारखा हारत होता ,ते दोघ विशेष लक्षात राहिले।रात्रि 12 नंतर रूम वर आलो । सकाळी ब्रेकफ़ास्ट झाल्यावर परत होटल पाहायला निघालो ,जाता जाता सहज एक चक्कर कैसिनो ला मारली।बघतो तर काय ते दोघ आम्हाला तिथेच दिसली! मुलगा तर कफल्लक झाला असावा ,पैसे न लावता तो केविलवाणा, या टेबल हुन त्या टेबल वर हिंडत होता ,ति बाई मात्र तेवढयाच उत्साहाने पैसे लावत होती ! काल आम्ही ते सगळ वातावरण एन्जॉय केल ,पण आज मात्र त्या दोघांकडे पाहून वाईट वाटल (असे अजुन बरेच असतील,हे दोघ लक्षात राहिले,) ,घरदार ,मूल बाळ  विसरून रात्र रात्र जुगार खेळण्यात काय मजा वाटत असेल काय माहिती? त्या मुलाच्या चेहरयावरची निराशा तर बघवत नव्हती !जुगार हा पण एक नशाच आहे ,परिणाम माहित असूनही लोक त्याच्या आहारी जातात। रूम मधे, हॉटेल मधे असलेल्या सुविधाबद्दल  माहिती दिली  होती  ,त्यात psychologist available आहे अस लिहिल होता। दवा और दारू दोनों यहा मिलेगा ,असच झाल हे! आज तिथे जास्त वेळ थांबायची इच्छा झाली नाही,शिवाय उरलेल हॉटेल  ही फिरायच राहिल होत.1 ला लगेच होंकोंग साठी निघायच होत। पैरिसियन हॉटेल ला पण फ़ास्ट फारवर्ड चक्कर मारली ,तरीही बरच काही बघायच राहून गेल!

मग परतीचा प्रवास सुरु झाला ,वॉटर जेट नी  होंकोंग ,तिथुन संध्याकाळी 7 च्या फ्लाइट नी 12.30 ला  मुम्बई ला पोचलो ।केसरी नी पाठवलेल्या लिस्ट वरचे परकी नाव अन चेहरे 6 दिवसात चांगलेच परिचयाचे झाले होते,सगळयांचा निरोप घेतला परत एकत्र ट्रिप ला नक्की जाऊ वगैरे असे वादे करुन बाहेर पडलो।बाहेर प्रियदर्शिनी वीमेन ड्रिव्हन प्रीपेड टैक्सी चा बूथ होता ,टैक्सी बुक केली ,बाहेर आलो तर 15- 20 जणी चहा पित गप्पा मारत बसल्या होत्या।त्यातलीच एक आमची ड्राइवर होती।हसतमुखाने पुढे  आली सामान  टाकायला पण मदत केली।रस्त्यात त्यांच्याशी छान गप्पा झाल्या।जवळ जवळ 150 जणी ड्राइवर म्हणुन इंटरनेशनल   एयरपोर्ट वर काम करतात ,रात्रभर जागरण होत घरी दुपारी काही झोप होत नाही ,पण घराला हातभार म्हणुन हे काम करते अस त्यांनी सांगितल ,सगळ्यांची थोड़ी बहुत अशीच कथा असेल। पुणे ,गाेवा ,अस बाहेरगावी पण रात्री जाव लागत म्हणाली। होटल ला पोचेपर्यंत 2.30 वाजले ,आम्हाला सोडून त्या एवढ्या रात्री परत एयरपोर्ट वर गेल्या ,खुप कौतुक वाटल त्या सगळ्यांच।
जेमतेंम 2 तास झोपत नाही तर गीतांजलि ची वेळ झाली,दुपारी 3 ला अकोल्याला पोचलो।
डिज्नी च्या शो मधला स्नो मैन आपल्या बर्फाळ् घरी पोचल्यावर "फीलिंग कोजी " असे उदगार काढतो ,तस हांगकांग च्या थंडीतुन गरम अकोल्यात आल्यावर मला मात्र "दिल को ठंडक पहुची "अस म्हणावस वाटल.

Wednesday, April 10, 2019

बहरीन 98

७ सप्टेंबर १९९८, वेळ- सकाळी ८.३०, मुंबईच्या सहारा  विमानतळावरून गल्फ एअर च्या विमानाने आम्हा तिघांना घेऊन आकाशात झेप घेतली नी  साधारण तीन तासानंतर बहरीन च्या  धावपट्टीवर अलगद उतरवले. त्यावेळी तेथे सकाळचे ९ वाजले होते . बहरीन हा ६२५ sq.km क्षेत्रफळ असलेला आखाती प्रदेशातला छोटासा देश आहे. त्यावेळी तिथली लोकसंख्या ५ लाख होती. त्यापैकी ३ लाख बहरिनी  तर २ लाख परकीय होते.त्यावेळी तेथे राजवट होती. शेेेख  इसा बिन सलमान अल  खलिफा हा तेथील राजा होता. 

   माझा हा पहिलाच परदेश प्रवास नी  छोट्या सलिल चा तर परदेश आणि विमानप्रवास दोन्ही पहिलेच. उत्सुकतेपोटी त्याने विचारलेले असंख्य प्रश्न आणि आमची त्यावरची उत्तरे ह्यामुळे बाजूच्यांचीही छान करमणूक होत होती. 'हे विमान मधेच बंद पडले तर ?' ह्या त्याच्या चिंतेने विचारलेल्या प्रश्नावर बाजूच्या व्यक्तीने टाकलेला कटाक्ष अजूनही चांगला लक्षात आहे . विमानातून बाहेर पडण्यापूर्वी सलिलने पायलटला भेटण्याचा हट्टही पूर्ण करून घेतला. 

 
 विमानतळावर उतरल्याबरोबरच तिथल्या सुबत्तेची कल्पना येऊ लागली. तिथला झगमगाट, सजावट आणि स्वच्छता यासर्वांपुढे  आपले विमानतळ फारच साधे व बिचारे वाटू लागले .
   बाहेर पडल्यावर पहिले सामना करावा लागला तो तिथल्या हवामानाशी. इतकी प्रचंड आर्द्रता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. 
   'मर्सिडीझ ' ला टॅक्सी स्वरूपात बघून खूप आश्चर्य वाटले. पण 'चल पल्लू कर ले मजा'  म्हणत आम्ही टॅक्सी ने 'अल मुहर्रक 'कडे निघालो. हे एक छोटेसे आयलंड आहे असे म्हणता येईल.चारपदरी रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या गाड्या आणि तरीही हॉर्नचा एकदाही आवाज नाही हे दुसरे आश्चर्य ! आखाती  प्रदेश असुन रस्त्यावर dividers मध्ये असलेली रंगीबेरंगी फुलझाडे बघुन खूप ताजेतवाने  वाटले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली व खजुरांनी लगडलेली झाडे बघतांना खूप मजा वाटली. साधारण अर्ध्या तासात आम्ही आमच्या बिल्डिंगपाशी येऊन पोहोचलो. सेन्सर असलेले ग्लास door बिल्डिंगच्या entrance ला असलेले बघून खूप भारी वाटले. 
   तिसऱ्या मजल्यावर असलेला दोन बेडरूम, हॉल किचन चा नवा कोरा फ्लॅट व किचन ला लागुन असलेल्या गॅलरी तुन दिसणारा निळेशार पाणी असलेला शांत समुद्र बघुन खूप फ्रेश वाटले. अमितने काही जुजबी वस्तुंची खरेदी आधीच करून ठेवली होती.त्यामुळे आता स्वतः ला हवे तसे घर लावण्याचा कार्यक्रमच बाकी होता.
   आल्याआल्या मला काम नको म्हणुन त्यादिवशी च्या लंच व dinner चे आमंत्रण माझ्या तिथल्या नव्या मैत्रिणीने प्राचीने आधीच देऊन ठेवले होते.त्यामुळे पहिला दिवस आराम करण्यात आणि सामानाची हवी तशी मांडणी करण्यातच गेला.

    संध्याकाळी बिल्डिंगच्या अगदी समोर असलेल्या Babasons सुपर मार्केट ला जाऊन grocery घेऊन आलो.सुपर मार्केट ही संकल्पना त्यावेळी आपल्याकडे सुद्धा प्रचलीत नव्हती.टूथब्रश पासून तर धान्या पर्यंत,दह्यादुधापासून तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पर्यंत सर्व गोष्टी तिथे उपलब्ध होत्या.एकेक वस्तु घेऊन ट्रॉली त जमा करण्याची सलिल ला तर खुप गंमत वाटत होती.
  तर अशी तिथली माझ्या नवीन संसाराची सुरवात होती.
  तिथे सूर्योदय सकाळी ५ वाजता नी सुर्यास्त संध्याकाळी ५ वाजता होतो.पण सकाळी ४ वाजताच जाग आली ती एका मशीन च्या आवाजाने. खिडकीतुन बाहेर बघितले तर मशीन च्या मागच्या बाजूची क्रेन रस्त्यावरील कचराकुंडीत ला कचरा garbage bag मध्ये टाकण्याचे काम आणि मशीन चा समोरचा भाग चक्क रस्ता स्वच्छ करीत होता.मला आपल्या येथील कचराकुंडी सोडुन तिच्या आजूबाजूला टाकलेल्या कचऱ्याचे कित्येक दिवस न उचललेले ढीग आठवले.
  अमितला कॉलेजची गाडी सकाळी ६.१० ला घ्यायला यायची व दुपारी २.१० ला drop करायची. पुर्ण वर्षभरात त्या गाडीची वेळ एकदाही चुकली नाही आणि अमितने देखील ती एकदाही स्वतः कडून चुकू दिली नाही.याबद्दल वर्षाच्या शेवटी त्याचे certificate देऊन विशेष कौतुक करण्यात आले होते.
   रोज सकाळी गॅलरीत बसुन शांत समुद्र बघत,खजुराची साखर घालुन केलेला चहा पिणे आणि समोरच्या सुपर मार्केट मध्ये येणाऱ्या सामानाची ने आण करणाऱ्या गाड्या न्याहाळणे हा माझा दिनक्रम च होऊन बसला. सकाळी ७ वाजता सुपरमार्केट,पोस्ट ऑफिसेस, बॅंका सर्वांचे कामकाज सुरू होते.पोस्टमन च्या येण्याची वेळ सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यानची होती. ISD calls प्रचंड महाग होते,त्यामुळे महिन्यातून एकदाच आम्ही घरी फोन करीत असू.बाकी गोष्टी सविस्तर पत्रातूनच कळवल्या जात.रोज सकाळी ८ वाजता दूध व दुधाचे पदार्थ, भाज्या,फळे घेऊन गाडी येत असे आणि आतला expiry झालेला माल नियमित बाहेर आणून ठेवला जात असे.

   तिथे वापरण्याच्या पाण्याची काहीच कमतरता नव्हती.पण पाणी इतके खारे की चुळ भरणे पण नको वाटायचे.हळूहळू सवय झाली.पिण्याचे गोड पाणी आम्ही विकत घेत असू. तिथे गोड पाण्याच्या कॅन्स असलेल्या गाड्या सगळीकडे फिरत.मी २० लिटर ची कॅन दाराबाहेर ठेवायची आणि त्यावरच १०० फिल ठेवायची. कॅन वाला बिल्डिंग मध्ये येऊन दाराबाहेर ठेवलेली कॅन व पैसे घेऊन जायचा आणि भरून आणून ठेवायचा.जर कधी can वाला आला नाही तरी कॅन व पैसे दोन्ही तसेच सुरक्षित रहात, हा प्रकार अनेकदा अनुभवता आला.

     मुंबई,पुणे,कोल्हापूर व बंगलोर अशा विविध ठिकाणाहून आलेल्या कुटुंबीयांशी आमची चांगली गट्टी जमली.मुलंही साधारण एकाच वयाची होती त्यामुळे सलिलचे मित्रमंडळ सुद्धा मोठे होते.
     सुट्टीच्या दिवशी सर्व कुटुंबीय बरेचदा एकत्र फिरायला जात असू.बहरीन दर्शन,मार्केट ला जाणे, महिन्यातून एकदातरी get-together ह्यामध्ये तेथील दिवस भराभर जात होते.
     बहरीन मध्ये कुठेही फिरताना मुंबईत फिरत असल्याचा भास व्हायचा.मनामा हा तेथील मुख्य भाग होता.तेथे अनेक कपड्यांची,electronics वस्तूंची मोठमोठी दुकाने होती.मनामाला गेल्यावर आम्ही ' jufri' मध्ये अवश्य जात असू. शेंगदाणा तेल, ऑस्ट्रेलियन आटा व उसाची साखर ह्या वस्तू फक्त तेथेच मिळत. लुलू मार्केट, सना, अल अली आणि सिफ मॉल अशा अनेक ठिकाणी सुट्टीच्या दिवशी हिंडायला जाणे हा आमचा विरंगुळा होता.
    आखाती प्रदेशातील पहिली तेल विहीर( oil well)  Bahrain येथे आहे.

   
'Tree of life ' बघितल्यावर तर सुरवातीला विश्र्वासच बसत नाही. आजूबाजूला कितीतरी किलोमीटर अंतरावर फक्त आणि फक्त वाळूच नजरेस पडते आणि अशा ठिकाणी ४०० वर्षांपूर्वीचे एकमेव हिरवेगार झाड दिसते.ज्याच्या फांद्या सर्व दिशेने पसरलेल्या दिसतात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते झाड अजूनही  उभे आहे म्हणूनच त्याला Tree of life किंवा अरेबिक भाषेत शजरत- अल् - हयात म्हणतात.         
    बहरीन मध्ये अनेक ठिकाणी असलेली विविध आकाराची pearl monuments बघण्यासारखी होती. बहरीनला पूर्वी मोत्याचा व्यवसाय होता असे समजले. तिथला काळा मोती जगप्रसिद्ध होता. मोती हा शिंपल्यात असलेल्या अवस्थेतच असतो, एकदा कुठला घ्यायचा हे नक्की केले की ते आपल्यासमोर आपल्याला शिंपल्या तून काढून देतात. डोळे दिपणे हे काय असते ह्याचा अनुभव तेथील गोल्ड सुक (सोन्याचे मार्केट) बघितल्यावर आला.त्या मार्केट मध्ये फक्त सोन्याच्या दागिन्यांची दुकाने होती.
     तिथे फिरण्यासाठी आम्ही कधी टॅक्सी तर कधी बस चा उपयोग करीत असू.तिथे बस मध्ये कंडक्टर नसायचाच. बसमध्ये चढल्यावर ड्रायव्हरला ५० fils द्यायचे आणि शुक्रान म्हणून आपल्या जागेवर बसायचे.तिथे नियम काटेकोरपणे पाळले जायचे. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या  जागेवर ती रिकामी असली तरी कुणी पुरुष बसत नसे. बसमध्ये फक्त ९ लोक उभ्याने प्रवास करू शकतील हा नियम होता.


बहरीन ची हद्द जिथे संपते आणि सौदी अरेबिया जिथे सुरू होतं त्याठिकाणी एक glass tower आहे. असेच टॉवर दुसऱ्या बाजूला सौदी मध्येही आहे. रोज संध्याकाळी तेथे lights लागतात. तो एक टुरिस्ट स्पॉट आहे. तेथे जाण्यासाठी असणारा रस्ता हा २५ km समुद्रातून बांधला आहे त्याला cause way म्हणतात. आम्ही व माझी मैत्रीण वर्षा आणि तिची फॅमिली असे सगळे गाडीने तेथे गेलो होतो. संध्याकाळचे ५ वाजत आले होते.प्रचंड धुकं असल्यामुळे गाडीचे head lights सुरू केले होते. गाडी पार्क करतांना ते सुरूच राहिल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. Glass च्या  capsule lift ने आम्ही वर गेलो. सगळं बहरीन आणि सौदी दिव्यांमुळे चमकत होते. मुंबईत सुद्धा उदयास न आलेल्या  मॅकडोनाल्ड च्या बर्गर व फ्रेंच फ्राईज ची चव आम्ही तेथे चाखली. वरती बराच वेळ घालवून खाली उतरलो.हळूहळू सगळे लोकं आपापल्या गाडीत बसून रवाना होत होती. Head lights सुरू राहिल्यामुळे गाडीची बॅटरी down झाली होती. ढकलून सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर सुरू झाली पण २,३ km गेल्यावर पुन्हा बंद पडली. सुसाट वेगाने गाड्या भरधाव जात होत्या. चारपदरी रस्त्यांवरून गाडी एका बाजूला नेऊन उभी करणे हे सुद्धा जिकरीचेच काम होते. पण ते कसेबसे पार पडले. आता प्रश्न होता इथून घरी जायचे कसे? डिसेंबर महिना,त्यामुळे कडाक्याची थंडी आणि भयंकर गार वारं. बहरीन ला दोन्ही ऋतु अगदी टोकाचे असतात. प्रचंड थंडी आणि प्रचंड गर्मी व humidity. उन्हाळ्यात तर  ५२° तापमान पोहोचत. तर, अनेक गाड्यांना लिफ्ट साठी हात दाखवून झाला, पण कुणीच थांबेना. थंडी व वाऱ्यामुळे काही सुचत नव्हतं. डोळ्यातून पाणी येत होतं.मुलं लहान होती त्यामुळे जास्तच काळजी वाटत होती. अखेर एक pick up गाडी आमच्याजवळ थांबली. तो केरळी माणूस होता. त्याला आमची अडचण समजली. पण तिथे नियम खूप कडकपणे पाळले जातात. Pick up मध्ये मागच्या बाजूला माणसांना बसवलेले जर पोलिसांनी बघितले असते तर त्याचे लायसन्स जप्त झाले असते. तरी त्या देव माणसाने एका अटीवर आम्हाला गाडीत बसवून घेतले की वस्ती  लागण्यापूर्वी मी तुम्हाला उतरवेल,पण तिथून तुम्हाला टॅक्सी मिळेल.थोडा वेळ लागेल,पण नक्की मिळेल. त्यावेळी त्याची ती अट मान्य करण्याशिवाय आमच्याजवळ काही पर्याय नव्हता. त्याच्या केबिन मध्ये तो,मी, वर्षा,तिची दोन मुले व सलिल कसेबसे बसलो व अमित आणि सुरेंद्र प्रचंड गारठयात मागच्या उघड्या लॉरी त कुडकुडत बसले.अखेर त्याने आम्हाला एका ठिकाणी उतरवले. आम्ही त्याचे मनापासून आभार मानले व मोबदला देण्यासाठी अमितने खिश्यात हात घातला त्यावर हात जोडून त्याने नकार दिला व आम्हाला योग्य मार्गदर्शन करून त्याने आमचा निरोप घेतला. प्रचंड थंडीमुळे हे दोघेही कुडकुडत होते. नशिबाने लगेच टॅक्सी मिळाली. गाडीत heater लावल्यावर जरा वेळाने बरं वाटू लागलं. आजही तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.

    खरं तर बहरीन ला जातांना आपल्याला अरेबिक भाषा शिकत येईल असे वाटले होते. पण माझा तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्कच आला नाही. अमितला मात्र ही संधी मिळाली. अमितचे सहकारी जॉर्डन,अमेरिका, भारत फिलिपिन्स अशा विविध ठिकाणाहून आले होते. जॉर्डन चा सहकारी व वर्गातील मुलं यांच्यामुळे अमितला अरेबिक भाषा समजू लागली होती व संवाद साधणे सुद्धा जमायला लागले.वर्गातील मुलांचे मात्र वर्ग सुरू असताना बर्गर खाणे, पेप्सी पिणे,एकमेकांच्या गळ्यात हात घालुन बसणे असे प्रकार पचवणे खूपच कठीण गेले.कारण आपली ह्या बाबतची शिकवण खूप वेगळी असते. ह्याबाबत त्यांना समज दिली परंतु त्यांना आपलं गुरु शिष्य नातं समजणं कठीण होतं. ते अमितला उस्ताद किंवा मिस्टर अमित असे संबोधत.

   आमच्या फ्लॅटचा किंबहुना पुर्ण बिल्डिंग चा मालक मि. गुलम महम्मद खूपच सभ्य व्यक्ती होता.खूप अदबीने बोलायचा. कित्येक दिवस तो अमितला हमीद व सलिल ला सलीम समजायचा. माझ्याबद्दल मात्र त्याला प्रश्नचिन्ह व कुतूहल होते  गळ्यात मंगळसुत्र व कपाळावर टिकली लावणारी ही ' हमीद ' सोबत कशी? एकदा मात्र त्याने त्याच्या शंकेचे निरसन करूनच घेतले आणि त्यानंतर आम्ही तिघे बराच वेळ पोट धरून हसत बसलो 
   ह्या एक वर्षाच्या कालावधीत आणखी काही मराठी कुटुंबांना भेटलो.त्यांच्याकडे येणे जाणे सुद्धा झाले.
   समोरच्या Babasons मध्ये आम्ही अगणित वेळा गेलो असू. इथला एक अनुभव खुप भावनिक आहे. अगदी पहिल्या दिवसापासून तिथला सेक्युरिटी गार्ड मोहम्मद सलिल चा चाहता बनला होता. आम्ही गेलो की तो सलिल ला उचलुन कडेवर घेऊन सगळीकडे फिरत असे. तो बहरिनी होता. अरेबिक शिवाय कुठलीच भाषा त्याला येत नव्हती.पण त्या दोघांमध्ये कधीच भाषेचा अडसर आला नाही. तो स्वखर्चाने सलिल ला खाऊ देत असे. आम्ही त्याला असे करण्यापासून खूपदा अडवले पण त्याने कधी ऐकले नाही. सलिल बोलका असल्यामुळे  इतर मल्याळी कर्मचारी सुद्धा त्याच्याशी खूप गप्पा मारीत. मोहम्मद ची सलिल शी जवळीक खुप वेगळी होती.आम्ही जर एक दोन दिवसात तिकडे फिरकलो नाही तर तो आमच्या शेजारी मित्रांबरोबर निरोप पाठवित असे. एक दिवस तो खुप emotional झाला होता आणि त्याने अमित जवळ सलिल ला घरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली. आम्ही स्तब्धच झालो पण भानावर येऊन त्याला जड अंतःकरणाने नकार दिला. त्याच्या डोळ्यांतले पाणी बघुन हृदयात कालवाकालव झाली पण परकीय ठिकाणी कुठलीच रिस्क घेण्यास आम्ही तयार नव्हतो. ' सलिल मध्ये मला माझा मुलगा दिसतो ' असे त्याच्याकडून ऐकल्यावर मन खुप हळवे झाले. सलिल ची व स्वतः च्या बायकोची भेट करून देण्याची त्याची इच्छा होती पण आमचाही नाईलाज होता.

    असे विविध अनुभव घेण्यात, सर्वांनी एकत्र येऊन सर्व सण साजरे करण्यात, हिंडण्या फिरण्यात वर्ष कसे संपत आले कळलेही नाही आणि आमचा भारतात परत येण्याचा दिवस ठरला.
    आम्ही परत जाणार हे ऐकल्यावर Babasons मधल्या सलिल च्या मित्रांनी तर त्याच्यावर प्रेमाच्या भेटवस्तू चा वर्षाव केला. ' तू अपने मुलुख जायेगा? ' ' फिर कब आयेगा?'  असे त्याला विचारत त्याच्यासोबत फोटोसेशन केले. मोहम्मद ने पण सलिल ला अश्रू भरल्या डोळ्यांनी जवळ घेतले व आशिर्वाद देऊन बाय केले.

    ११ मे ला सलिल चा ५ वा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला आणि १४ मे ला रात्री  ११ च्या flight  ने मी व सलिल मुंबईला येण्यासाठी गल्फ एअर च्या विमानात बसलो. सलिल अगदी सराईता सारखा स्वतः च्या सीटवर सीटबेल्ट लाऊन तयार होता.
    बहरीन सोडतांना वाईट नक्कीच वाटत होतं, पण अनेक सुंदर आठवणींचा, अनुभवांचा खजिना मी सोबत घेऊन निघाले होते. त्या आठवणींमध्ये प्रवास केंव्हा संपला आणि विमान केंव्हा मुंबईच्या धावपट्टीवर उतरले कळले सुद्धा नाही.

 - पल्लवी