Sunday, December 15, 2019

माझे कार ड्रायव्हिंग

एखादा विद्यार्थी फास्ट लर्नर असतो पटकन एखादी गोष्ट आत्मसात करतो एखादा स्लो लर्नर असतो त्याला
कुठलीही गोष्ट शिकायला जरा वेळ लागतो पण मला नेहमी असं वाटतं की मी या दोघांच्या मधली आहे ,
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्या बद्दलचा माझा उत्साह अगदी फसफसत असतो, सुरवात जोरदार होते पण ती
नंतर शेवटाला जाईपर्यंत तिची चाल मंदावली असते.म्हणजे काय की कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात मला
विराट सारखी आणि शेवट हा माही सारखा करायचा असतो पण मी धवन च्या देखील आसपास नसते
नमनालाच घडीभर बॅट बॉल I mean तेल झाले असो मी माझ्या कार ड्रायव्हिंग च्या अनुभवाबद्दल बोलते आहे

1994 साली पहिल्यांदा ड्रायव्हिंग स्कूल मधून ड्रायव्हिंग शिकले तेव्हा खूप उत्साह होता आणि आत्मविश्वास होता
कधी एकदा बाबा कार घेतात आणि मी ती चालवते असे झाले होते त्याच काळात एकदा श्रीनरसिंह सरस्वती
मंदिर कारंजा येथे दर्शनाला जाण्यासाठी टॅक्सी केलेली होती टॅक्सी म्हणजे ती टेम्पो ट्रक्स होती . नुकतीच
कार ड्रायव्हिंग शिकून लायसन्स देखील मिळाल्यामुळे गाडी चालवायची खूप उत्सुकता होती आणि टॅक्सी
वाला ओळखीचा असल्यामुळे त्याला मी गाडी चालवू देण्याची विनंती केली त्याने पण हसून हो म्हटले आणि
मुर्तीजापुर फाटा ओलांडल्यावर कारंज्याकडे जाणारा थोडा कमी वर्दळीच्या रस्त्यावर आल्यावर त्याने
गाडी माझ्या हातात दिली आई बाबा बहिण भाऊ मागे बसले होते . बाबांचे टेन्शन एकदम वाढले होते,
मागून येणारी आणि जवळपास चाळीस-पन्नास फूट अंतर असणारी बस त्यांनी मला तीन-चार दा हळूच
सांगितले बस येते आहे ,समोर दूर काहीतरी वाहन दिसते आहे आणि मी बिनधास्त ,” हो बाबा , काळजी
करू नका मी व्यवस्थित नेते “ असे सांगून त्यांना शांत करायचा प्रयत्न करीत होते. आणि ड्रायव्हर
माझ्यासारखाच बिंदास होता तो नुसता गालातल्या गालात हसत होता पण आता लक्षात येतं की त्याने
हॅन्डब्रेक वर एक हात ठेवला होता. शेवटी जास्तीत जास्त दहा एक किलोमीटर गेल्यावर बाबांनी मला कडक
शब्दात सांगितले की गाडी थांबवा आणि ड्रायव्हरला चालवायला दे उशीर होतोय .माझ्या लक्षात आलं की आता
जास्त ताणण्यात अर्थ नाही .

पुढे काही कारणामुळे बाबांचे कार् घेणे पुढे ढकलले गेले आणि मधल्या काळात मी ड्रायव्हिंग पूर्णपणे विसरले
नंतर ८ -१० वर्षांनी बाबांनी गाडी घेतली पण तोपर्यंत माझ्याजवळ एक वर्षाचे बाळ होते आणि त्याचे संगोपन
माझ्यासाठी कार ड्रायव्हिंग शिकण्यापेक्षा ही जास्त एक्सायटिंग आणि थ्रिलिंग होते नंतर मधल्या काळात कार
शिकायची आहे असे स्वतःशीच घोकणे घरातल्यांना सांगणे चालूच होते पण त्यासाठी 2017 चा मुहूर्त यावा
लागला. दिवाळीच्या मुहूर्तावर कार घ्यायची या हिशोबाने मी जुलैमध्ये घराजवळचा ड्रायव्हिंग क्लास लावला. मला
काय पटकन कार येईल असे मला वाटायचे कारण या आधी शिकली होती ना पण क्लास ला आल्यावर कळलं
की आपण एबीसीडी पण विसरलो आहे जुलैचा माझा क्लास ज्यात फक्त 26 पिरिएड्स होते तो ऑक्टोबर
मध्ये संपला आणि पहिले लायसन एक्सपायर झाल्यामुळे नवीन लायसन काढणे क्रमप्राप्त होते त्यासाठी
आरटीओ ऑफिस मध्ये लर्निंग लायसन चा फॉर्म इंस्ट्रक्टर सोबत भरून आले पण सहा महिन्याची मुदत
संपायला आली तरी ड्रायव्हिंग स्कूल वाले परमनंट लायसन साठी अपॉइंटमेंट घेईना मला टेन्शन यायला लागले.
शेवटी एकदाचा मुहूर्त लागला आणि मी फेब्रुवारी २०१८ च्या पंधरा-वीस तारखेकडे परमनंट लायसन
मिळण्यासाठी टेस्ट द्यायला गेले ,परत माझ्या ड्रायव्हिंग शिकून दोन महिन्याची गॅप झाली होती. गाडी चालू
व्यवस्थित केली आणि पहिल्या गियरमध्ये क्लच सोडतांना गाडी बंद पडू द्यायची नाही असेही ठरवले होते
(कारण शिकतांना माझी अनेकदा बंद पडली होती ) मात्र त्याप्रमाणे गाडी बंद पडली नाही ही पण पहिल्या
गियर मध्ये टाकतांना गाडी थोडी जास्त रेझ झाली आणि तिथल्या इन्स्पेक्टरला माझे ड्रायव्हिंग smooth नाही
आहे असे जाणवले ते मला परत चार दिवसानंतर ची अपॉईंटमेंट देतो म्हणाले पण माझ्या लर्निंग लायसन ची
मुदत त्याच्या आधीच संपणार होती कसेबसे त्यांना रिक्वेस्ट करून ड्रायव्हिंग टेस्ट पास करून घेतली त्यांनी
माझ्याकडं वदवून घेतले की चांगले ड्रायव्हिंग आल्याशिवाय रस्त्यावर गाडी चालवणार नाही मनात म्हटले मला
नुसती लोकांचीच नाही तर माझी देखील माझी पर्वा आहे .मी असे बिलकुल करणार नाही, ठरवले की आता
उन्हाळ्यात गाडी घ्यायची आणि चांगली प्रॅक्टिस करायची आणि नवीन गावी बदली होणार आहे तिथे ड्रायव्हिंग
करत कार न्यायची पण हाय रे दैवा तिथे पण माशी शिंकली माझा छोटासा एक्सीडेंट झाला आणि पायाचे स्नायू
दुखावले गेले त्यामुळे डॉक्टरांनी तीन आठवडे रेस्ट सांगितली आणि गाडी घेणे पुढे ढकलले गेले.

पुढे बदली मुळे नाशिकला आली तेव्हा पावसाळा जोरात होता पाऊस संपल्यावर कार घेऊ असे ठरले .इथे
माझ्या कार्यालयातील मैत्रिणीने नुकतीच कार घेतली होती. आणि ती रोज तिच्या यजमानांबरोबर कार चालवत
कार्यालयात जायची आणि परत ते कार घेऊन त्यांच्या कार्यालयात जायचे आणि संध्याकाळी परत आणायचे की
ही चालवत घरी न्यायची अशी तिची प्रॅक्टिस महिनाभर चालली , ते पाहून मला टेंशन यायला लागले की मी
कसे करणार माझ्या सोबत तर कोणीही नाही मदतीला , नंतर ती कार्यालयात कार आणू लागली , मी तिच्या
घरी जायचे आणि आम्ही दोघी सोबत कार्यालयात जायचो, तेव्हा नवीन नवीन तिची प्रॅक्टिस , पार्किंग ला कार
लावतांना होणारी तारांबळ पाहून मला खूप टेंशन यायला लागले, की मी कसे करणार? पण थोड्याच दिवसात ती
खूप यशस्वीरीत्या कार चालवू लागली आणि त्यामुळे माझा देखील आत्मविश्वास वाढला.

नवरात्रात कारचे बुकिंग करावे असे वाटत होते पण नंतरच जाणे झाले .एकदा कार पाहिल्यावर कंपनी मॉडेल
फिक्स केल्यावर केव्हा एकदा कार घरी येते असे झाले होते दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कार घरी
आणावी असे ठरले . परत कार ड्राईविंग करून 5-6 महिने झाले होते ,त्यामुळे नवीन कार घरी यायच्या आधी
,कुठेतरी परत क्लास लावावा आणि हात साफ करावा असे वाटत होते म्हणून परत ड्राईविंग क्लास प्रॅक्टिस साठी
लावला , परत क्लच गियर शी झटापट सुरू झाली, पण यावेळेस जास्त त्रास नाही झाला.8- 10 पिरिएड्स मध्ये
गाडी स्मूथ चालवता येऊ लागली, तरी पण गाडी रिव्हर्स टाकणे, अरुंद पार्किंग मध्ये कार लावतांना जागेचा
बरोबर अंदाज घेणे , पेट्रोल पंप वर पेट्रोल भरायला जाणे इ. गोष्टी मला जमतील का हे प्रश्न मला पडतच होते,
पण आता मलाच हे सगळे करायचे आहे ,असे म्हणून मनाची तयारी करणे पण चालू होते. शेवटी एकदाची कार
घरी आली,शोरूम मधून मैत्रिणीचा मुलगा कार चालवत घरी घेऊन आला आणि दिवाळीचे 5 दिवस सुट्टी चा
सदुपयोग करून कार प्रॅक्टिस करायची असे ठरवले. एक पर्सनल इन्स्ट्रुक्टर म्हणून 65 वर्षाचे काका मैत्रिणीने
सुचवले.त्याच्या सोबत 1 तासाचा 1 पिरियड या प्रमाणे 3 दिवस 5 तास सराव केला आणि खूप च आत्मविश्वास
वाढला. त्यांना गावाला जायचे होते म्हणून नंतर येतो म्हणाले पण आता मला धीर धरवत नव्हता , मी हळू हळू
कार पार्किंग मधून काढणे नंतर जवळच्या परिसरात छोटीशी चक्कर मारणे सुरू केले. मग कधी मामा बरोबर पण प्रॅक्टिस केली, आणि 1 महिन्यातच कार्यालयात कार ने जाणे सुरू केले , घराच्या पार्किंग मध्ये ठेवतांना एकदा कार ला स्क्रॅच पडले आणि एकदा ऑफिस पार्किंग मध्ये कार रेझ झाली आणि थोडक्यात दुसऱ्या कार वर
आदळता आदळता वाचली एवढा प्रसंग सोडला तर ,मला कार चालवणे यशस्वी रित्या जमले.

यात अजून एक झाले, माझा आत्मविश्वास खूप दुणावला. कोणी म्हणेल त्यात काय एवढं ,पण माझा स्वतः
बद्दलचा एकंदरीत अनुभव बघता मी उशीरा का होईना हे काम तडीस नेले आणि वय पण त्याच्या आड नाही
आले ,हे माझे मलाच एक प्रकारे बक्षीस दिल्यासारखे वाटले. प्रसिद्ध लेखक शिव खेरा म्हणतात ना ,” Yes YOU
Can Do It.तसे मी आता म्हणू शकतो YES I DID IT.

----------गौरी

फुलायचं म्हणते!

Saturday, December 14, 2019

आशियाना (भाग-१)

4  अॉगस्ट रविवार - सकाळी नेहमीप्रमाणे हाॅलची खिडकी उघडली. फ्रेश हवा, ऊन घरात आलं की सकाळ कशी ताजी टवटवीत वाटते. थोड्याच वेळात बुलबुल पक्षी हाॅल मध्ये आले जणू वाटच बघत होते खिडकी उघडण्याची. बरोबर मध्यभागी असलेल्या झुंबरावर जाऊन बसले. मला जरा आश्चर्य वाटले इतके थेट घरात कसे काय आले? हाॅलभर उडत होते आणि खूप गोड आवाजात काही तरी गाऊ लागले. जणू खूप खुशी झाली आहे आणि आपल्या जोडीदाराला ती खुशी तो आनंद व्यक्त करून सांगत होते. बुलबुल ची इतकी गोड सुस्वर किलबिल ऐकून मला वाटलच मामला गोड बातमीचा असणार. इतकं प्रेमाने, लाडलाड आवाज काढत होते कि दो पंछी दो तिनके कहो ले के चले हैं कहाँ ये बनायेंगे एक आशिया... ह्याच गाण्याच्या ओळी मी अगदी सहज गुणगुणू लागले. पण नंतर कामात, स्वयंपाकात पार विसरले.

 दुपारी पुन्हा ते बुलबुल आले. आम्हाला खूप मजा वाटली. इतक्या वर्षात असे घरात कधीच पक्षी आले नव्हते. त्यामुळे आम्ही चांगलेच उत्साही झालो. पण गंमत बघा आता दुपारी फक्त एकच पक्षी आत येत होता. त्याचा जोडीदार बाहेर जिन्याच्या रेलिंगवर बसून तिथूनच त्या आतल्या पक्ष्याशी बोलत होता. नंतर मला जाणवलं घरात येणारा पक्षी "ती" असावी "तो" बाहेरून, लांबून "मम" म्हणत होता. म्हणजे पक्षांच्या काही प्रजातींमध्ये पण असचं असतं तर!(तू जो बोले हा तो हां) एकदा जागेची पाहणी करायला "तो" स्वतः घरात आला प्लॉट तपासून आवडल्याचं सांगितलं. प्रेमाने तिला संमती दिली आणि महाशय बसले बाहेर रेलिंगवर जाऊन. संभाषणाचा/गोड बोलण्याचा निर्णय झाला आशियाना इथेच बनवायचा! प्लॉट ठरला ठरला मग बांधकामाला कितीसा वेळ लागतो? अक्षरशः 5 दिवसात फ्लॅट बांधून तय्यार! हॉलच्या मधोमध असलेल्या झुंबराच्या चार बारीक रॉडला कोळ्याचं जाळ, लाळ आणि तुळशीच्या सुकलेल्या काड्या असं घट्ट लपेटलं कि बरोबर मोठ्या वाटी सारखं तयार झालं. मला बहिणाबाईंची कविता आठवली. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, तिची इलूशी चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवान दोन हात दहा बोटं.

मला तर बुलबुल पक्षांचे निरीक्षण करायचा छंदच लागला. काम आटोपलं कि मी हॉलमध्ये कॅमेरा घेऊन बसू लागले. सुरूवातीला झूम करून फोटो काढले, व्हिडिओ काढले. मग माझी आणि तिचीही भीड चेपली. आमची चांगली ओळखच झाली म्हणा ना! पक्षांना उपजत ज्ञान असावं की इथे आपण आणि आपली पिल्लं सुरक्षित राहू. याची खात्री पटल्यावरच ते घर बनवत असतील.
 घरटं कोण बांधतय तो की ती हे नक्की कळत नव्हते. एक पक्षी कायम बाहेर बसलेला आणि एक आत घरटं बांधणी करायचा...

अंजली

नसतोस घरी तू जेव्हा..

सोमवारची धावपळीची सकाळ. रोजच्यासारखी पीकेव्ही मधून फिरुन आले. तिथे आज मस्त दाट धुकं होतं, परत येईतो त्यात उगवत्या सूर्याचा केशरट प्रकाश मिसळला होता, मुख्य चौकात दोन मैत्रिणी अचानक भेटल्या, एक मोर अगदी जवळून दिसला आणि तिथल्या पुलावरच्या भाजीवालीकडे ताजी कोथिंबीर फारच स्वस्त मिळाली, चला आता कोथिंबीर समोसे करता येतील, त्यामुळे दिल एकदम गार्डन गार्डन हो गया था. छान मूडमध्ये घरात शिरताना वळून फाटक बंद करायला गेले. समोर कुणीतरी नवीन भाडेकरु बाई राहायला आली आहे. तिने ’आली मोठी स्टाईलमारु, माझ्याकडे नसतो फिराबिरायला रिकामा वेळ पण घर पाहा माझं, चकाचक असतं’ असा मला लुक कम कॉम्प्लेक्स देऊन गॅलरीवर हातातल्या कापडाचे फटके मारणं सुरू ठेवलं. सायन्स के बोझ का मारा लेक एका क्लासहून आला होता आणि दुसर्‍या क्लासला जायच्या गडबडीत होता. आधी घाईने त्याला नाश्ता करुन दिला. तेवढ्या गोंधळात जोकरच्या जागी कोणता नवा कलाकार घेतलाय याचा व्हिडिओ त्याच्या फोनवर त्याच्या आग्रहास्तव हातातल्या चिमट्यात पातेलं तसंच पकडून पाहिला. त्याला बाय करून वाचायच्या राहिलेल्या कालच्या पुरवण्या जमा करुन ठेवल्या. आजच्या हेडलाईन्स पाहिल्या. समोरच्या बाईचा फटक्यांचा म्हणजे साफसफाईचा आवाज ऐकून अचानक आपले अंगण पाचोळ्याने भरल्याचे आठवले आणि तरातरा झाडायला गेले. अंगण चकाचक झाल्यावर तिच्या गॅलरीकडे हळूच एक कटाक्ष टाकला पण ते पाहायला ती एरवी गॅलरीतच पडीक असलेली बयाबाई नेमकी गॅलरीत थांबली नव्हती, जाऊदे. मग आजची कामं क्रमाने आठवत मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ’त्याची’ कडकडून आठवण आली....  म्हणजे मोबाईलची.

चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्‍याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अ‍ॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?

तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’

चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्‍याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. अ‍ॅप्स तेवढे पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. हा, मग ठीकंय पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतीलच मग फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं!
शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.

मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्‍याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्‍या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्‍या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अ‍ॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!

’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’

मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअ‍ॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्‍यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.

२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी टोमणे मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)

- मोहिनी



Friday, December 13, 2019

फुकेट- क्राबी टूर

ट्रिप आणि घोळ हे नक्कीच जुळे भाऊ असावेत. आधीच्या ट्रिप वरून धडा घेऊन कितीही काळजी घेतली तरी नवीन  काही तरी घोळ होतातच. घोळ लाइटली घेतले तर ट्रिप ची रंगत वाढवतात, नाही तर सगळी ट्रिप स्पॉइल होते.
आमच्या फुकेट क्राबी टूर ची सुरुवातच घोळाने झाली.
आम्ही 4 कपल  होतो. नाशिक हुन  अंजु-विनायक अन डॉक्टर क्षत्रिय कपल,आम्ही अकोला अन संजीव भाई अन इशा भाभी कर्नाल हुन येणार होते. आमचे तिघांचे रिझर्व्हेशन बॉम्बे - फुकेट तर कर्नाल वाल्यांचं दिल्ली - फुकेट करायचं होतं. नाशीक कंपनी बुकिंग च सगळं पाहणार होते। 
सांगण्यात / ऐकण्यात काय चूक झाली माहीत नाही ,आमच पण बुकिंग दिल्ली -फुकेट केल्या गेलं. आमचं अकोला बॉम्बे रिझर्व्हेशन ऑलरेडी झालं होतं, ते कॅन्सल करून ,अकोला- नागपूर ट्रेन ,नागपूर- दिल्ली फ्लाईट असा द्राविडी प्राणायाम आम्हाला करावा लागला.तिकिटांचा भुर्दंड बसला तो वेगळाच!
दिल्ली - फुकेट फ्लाईट रात्री 1.20 ला होत। 10 ला दिल्ली ला पोचलो ,संजीव भाई ,भाभी पोचले होतेच. एअरपोर्ट वरच डिनर केलं,रमत गमत 12.30 ला गेट जवळ पोचलो. काही लोकांची धावपळ सुरू होती ,ते बघून ,किती निष्काळजी असतात लोक ,3 तास आधी येऊनही फ्लाईट साठी  धावपळ करावी लागते,अस आम्ही बोलत होतो.तेवढ्यात फुकेट फ्लाईट ,लास्ट कॉल ,असा आवाज ऐकला,बघतो तर काय तो कॉल आमच्यासाठीच होता ,बाकी सगळे पॅसेंजर फ्लाईट मधे बसले होते ,आमच्यासाठी सगळ काम खोळंबल होते.मग मात्र वॉशरूम ला जायलाही वेळ न देता आम्हला फ्लाईट मध्ये रवाना केलं. आम्ही,त्यांच्या 'काय बावळट लोक आहेत' अश्या नजरेला तोंड देत धावत पळत आमच्या सीट वर बसलो (नंतर काही कारणांनी फ्लाईट 1 तास लेट निघालं ती गोष्ट वेगळी).दुसऱ्यांना नाव ठेवता ठेवता आम्ही पण तेच केलं होतं!
 अस कस झालं याचा विचार करताना लक्षात आलं की आमचं फ्लाईट रिशेड्युल झालं होतं ,बोर्डिंग पास वर पण 12.45 वेळ होती पण ते बघण्याचे कष्ट आम्ही घेतले नव्हते (कारण तिकिटावर 1.20 ची वेळ हाती ) फ्लाईट रिशेड्युल झाल्याचा मेसेज आला होता तो पण गप्पांच्या नादात आम्ही बघितला नव्हता. अजून 5,10 min.उशीर झाला असता तर फ्लाईट चुकलं असत! असो..
सकाळी 7.30 ,ला फुकेट ला पोचलो (आपल्या इकडे तेंव्हा 6 वाजले असतील).नाशिक कंपनीच फ्लाईट त्याच दरम्यान पोचणार होत.आत गेल्या गेल्या ते लोक भेटलेच. व्हिसा ऑन अरायव्हल असल्याने ,फॉर्म भरण वगैरे सुरू केलं.
फोटो लावायच्या वेळेला लक्षात आलं की आमचे फोटो बुक केलेल्या सामानात आहेत! फोटो लावल्याशिवाय व्हिसा मिळणार नव्हता ,अन व्हिसा मिळाल्याशिवाय ,समानापर्यत पोचणं शक्य नव्हत. झालं !आता आपल्याला इथूनच परत जावं लागत की काय अस वाटलं. सुभाष नी पुढे जाऊन चौकशी केली तर कळलं की एअरपोर्ट वरच फोटो काढण्याची सोय आहे. तिकडे गेलो तर आमच्यासारखे बरेच विसरभोळे लोक तिथे रांगेत उभे होते. 300 बाथ (आपले 700 ₹) मध्ये 8 फोटो घ्यावे लागणार होते,जेंव्हा की  गरज एकाच फोटो ची होती. दोघंचे 1400 ₹ अक्कल खाती जमा करून ,एकदाचा व्हिसा मिळाला.
फुकेट हुन आम्ही लगेच  क्राबी ला जाणार होतो.
फुकेट क्राबी 2.30 तास लागणार होते। रस्ते अतिशय सुंदर ,रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवे पडदे ओढल्यासारखी दाट झाडी होती,त्याच्या फटीतून मधूनच हिरव्या निळ्या समुद्राचा तुकडा दिसत होता. मधेच लाईम स्टोन चे उंच सुळके मान वर काढून उभे होते ,त्यावरही दाट झाडी होतीच! हे लाईम स्टोन चे सुळके तिथे सगळीकडे, अगदी समुद्रात सुद्धा मोठया प्रमाणात आहेत. 
रस्त्यात एका ठिकाणी छोट्या जॉईंट वर थांबलो ,बरोबर आणलेले ठेपले ,पराठे ,भाजी खाल्ली( आमच्या पॅकेज मधे 3 लंच नव्हते ,ते आमचे आम्हाला करायचे होते) चहा घेतला.तिथे विविध प्रकारची फळ मांडून ठेवली होती,आपण सांगू ती फळ लगेच कापून देत होते.त्यात आंबे पाहून खूप आनंद झाला,पण आंब्याला काहीच चव नव्हती .अननस मात्र अतिशय गोड आणी रसदार होते.
12.30 ला ,'रामदा इन हॉटेल' क्राबी ला पोचलो.चेक इन 3 pm.ला होत, वेलकम ड्रिंक घेत ,रिसेप्शन ला आरामात बसून हॉटेल च निरीक्षण केल.
हॉटेल खूप सुंदर होत.नारळाची अन पाम ची झाड तर खूप होती,पण स्विमिंग पूल जवळ बुच्याच झाड पाहून खूप छान वाटलं. 
हॉटेल च्या समोरच मसाज पार्लर दिसलं ( तिथे दर 5 दुकानापैकी 1 मसाज पार्लर आहे),वेळ आहे तर रूम मिळेपर्यंत मसाज करून घेऊ अस ठरलं ,कोणी फक्त फूट मसाज ,तर कोणी फुल बॉडी मसाज करून घेतला.तोपर्यंत रूम्स पण मिळाल्या.
फ्रेश होऊन 5 वाजता बीच वर जायचा प्लॅन केला.
बीच तिथून अगदी जवळ होता. फिरत फिरत निघालो, बीच वर मनसोक्त हिंडलो. समोरच ओळींनी अनेक दुकान होती, 
तिथे पण डोकावलो. 
तिथले दुकानदार खूपच उद्धट वाटले कोणी,बार्गेनिंग करायला गेल तर सरळ बाहेर निघून जायला सांगायचे. सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले,होते, गिऱ्हाईक आलं गेलं त्यांना काही फरक पडत नव्हता. कदाचित भारतीय लोक घेतात कमी अन बार्गेनिंग जास्त करतात असा त्यांचा अनुभव असावा.एकानी तर आम्हाला बोलून ही दाखवलं ,'आप इंडियन बिझनेस बहोत अछा करते है ,लेकींन जब खरीदने की बात आती है तो खरीदने से ज्यादा बार्गेनिंग के बारे मे सोचते हो!' तेच अमेरिकन ,युरोपिअन लोक कितीही किंमत सांगीतली तरी घासाघीस न करता घेतात.म्हणूनच भारतीय लोकांकडे ते दुर्लक्ष करत असावेत. दुकानात हिंडत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू  झाला ,सगळ्या दुकानदारांची माल पाण्यापासून वाचवण्याची धावपळ सुरू झाली.आम्ही पण  पाऊस थांबेपर्यंत एका ठिकाणी थांबलो,मग डिनर ला निघालो. रस्त्यात एक बार दिसला,तिथे छताला अनेक ब्रा टांगलेल्या होत्या ,अन बाहेर बोर्ड लावला होता ,आपली अंगातली ब्रा काढून द्या अन बिअर फ्री घेऊन जा. काय काय चालत बाहेरच्या जगात ,आपण कल्पना पण नाही करू शकत! तसाही थायलंड सेक्स इंडस्ट्री म्हणून जास्त प्रसिद्ध आहे .रस्त्यांनी जाताना पण मसाज पार्लर चे बोर्ड घेऊन उत्तेजक कपड्यातल्या मुली जागोजागी दिसत होत्या.मसाज च्या नावाखाली या पार्लर मधे  काय चालत असेल याची त्यांच्या कपड्यांवरूनच कल्पना येत होती. डिनर करून हॉटेल ला आलो.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून 10 वाजता 4 आयलँड्स ला निघायचं होता.
टॅक्सी बरोब्बर 10 ला आली. टॅक्सी नी समुद्रापर्यंत अन तिथून स्पीड बोट नि आयलँड्स ला जायचं होतं. लाईफ जॅकेट घालून बोटीत बसलो,अंतर फार नव्हतं .10 min.कोह टप आयलंड ला पोचलो तिथून 100 फुटावर कोह मोर आयलंड आहे.ओहोटी असली तर आरामात कोह टप ते कोह मोर पायी जाता येत.आम्ही गेलो तेंव्हा ओहोटी होती, त्यामुळे दोन्ही आयलंड चा आनंद घेतला. समुद्रात  डुंबलो,भरती ची वेळ झाली सांगितल्यामुळे पटापट बोट होती तिथे पोचलो. दुसरं, चिकन नेक आयलंड ,लाईम स्टोन च्या या सुळक्याच्या आकार विशिष्ट अँगल नि कोंबडी सारखा दिसतो.
तिथून पुढे ज्यांना स्नोरकलिंग करायचं होतं त्यांच्यासाठी समुद्राच्या मधे बोट थांबली. पोहता येणाऱ्यांनी मास्क घालून आरामात पाण्यात उडी मारली. मी पण लाईफ जॅकेट अन मास्क घालून पाण्यात उतरले पण,पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही (पोहता येत नाही न!). लाईफ जॅकेट असल्यावर तू काही बुडणार नाही ,अस म्हणून सगळे प्रोत्साहन देत होते,पण समुद्राखालचे जीव बघण्यापेक्षा मी माझ्या जीवाला जास्त महत्व दिल अन बोटीत परतले.
पुढचा स्टॉप, कोह पोडा! पांढरी शुभ्र वाळू , पाम ट्री ची बॉर्डर अन सभोवती हिरव्या निळ्या, पांढऱ्या छटा असलेला समुद्र ,असा हा आयलंड अतिशय देखणा आहे .या पासून काही अंतरावर, क्राबी च्या ब्राउशर वर नेहमी असतो तो प्रसिद्ध सुळका आहे. तिथे भरपूर फोटो काढले ( कुठे नाही काढले ते विचारा !)
तिथेच आमचा थाई लंच होता.एका टेबल वर ,भात ,बेचव थाई करी ,त्यात काही पाला  होता,पाणीदार चिकन करी अन खूप सारं अननस अस मांडून ठेवलं होतं. आम्ही फक्त अननस खाऊ शकलो.
कोह पोडा हुन मग रिलाय बे ला गेलो.तिथली फारा नांग गुफा ,सुंदर स्टलॅकटाइटस अन स्टलागमईट्स साठी प्रसिद्ध आहे. इथले सरळसोट लाईम स्टोन चे सुळके रॉक क्लाइम्बर्स साठी पर्वणी! दुरून दुरून हे आव्हान पेलायला लोक येतात.
या गुफेमधे शिवलिंग आहे.मासेमारी ला जाण्याआधी कोळी  इथे येऊन प्रार्थना  करतात. त्यांची श्रद्धा आहे ,असे केल्याने,त्यांना जास्त मासे सापडतील ,अन ही देवता समुद्रात त्यांचे रक्षण करेल. तिथे अजून एक वेगळी गोष्ट दिसली ,गुफेमध्ये ,अनेक छोटे मोठे  लाकडी लिंगम होते ,ते रंगीबेरंगी कापडाने सजवले होते. आपल्या पृथ्वीच्या भरभराटीसाठी हे लिंगम अर्पण करायची प्रथा तिथे आहे. हे लिंगम फक्त लाकडी असतात,दगडी किंवा दुसरे  लिंग तिथे बाजूला काढून ठेवलेले दिसले.
चारही आयलंड ची सुंदर सफर आटोपून 3 वाजता हॉटेल ला पोचलो.
ओले झालेलोच होतो तर हॉटेल मधल्या स्विमिंग पूल मध्ये उतरलो. दुपारची वेळ असल्याने तिथे बाकी कोणी नव्हतं! पूल जवळच्या रेस्टॉरंट मध्ये एक वेटर जयपूर चा होता. मग काय त्याला सांगू ती गाणी, त्यांनी लावून दिली,गाण्याच्या ठेक्यावर धूम नाचलो. 
संध्याकाळी परत बीच वर चक्कर मारली.डिनर करून परत आलो.
सकाळी 10 ला फुकेट ला निघायचं होता. 
 


बोधकथा

अति भाषणे वीटती बुद्धिवंत
 अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत
 खरे तत्त्व ते अल्प शब्दे ठसावे
 प्रमाणामध्ये सर्व काही असावे

 मोजक्या शब्दात अर्थपूर्ण संदेश देण्याचे महत्त्व सांगणारा हा रामदास स्वामींनी लिहून ठेवलेला श्लोक आहे. आपल्या संस्कृतीतील बोधकथा या पण अशाच  थोडक्यात महत्वपूर्ण  संदेश देणाऱ्या  असतात.

 मध्यंतरी अशीच एक बोधकथा वाचण्यात आली. व्यक्तिमत्व कसे असावे याचे सार त्या बोधकथे मध्ये सांगितलेले आहे. एका मुलीला कायम परिस्थितीबद्दल कुरकुर करण्याची सवय असते. मला मिळालेले अपुरे आहे, मला अनेक समस्या आहेत, माझे पुढे कसे होणार अशी सारखी तक्रारीचा सूर असलेली विचारांची व बोलण्याची तिची पद्धत होती .कशाचेही समाधान तिच्या वागण्या-बोलण्यातून दिसत नव्हते .मुलीच्या वडिलांनी ही गोष्ट लक्षात आल्यावर एक युक्ती काढली. त्यांनी तीन मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले. पहिल्या पातेल्यामध्ये बटाटे टाकले .दुसऱ्या पातेल्यामध्ये अंडी टाकली आणि तिसऱ्या पातेल्यामध्ये कॉफीच्या काही बिया  ठेवून उकळू दिले. झाकण ठेवून पाणी भरपूर उकळल्यावर त्यांनी ते  तिन्ही पातेले विस्तवावरून उतरवले .मुलीला बोलावले आणि तिला प्रत्येक पातेले उघडून आतील पदार्थाला तपासायला सांगितले .पहिल्या पातेल्यातील  कडक असलेले बटाटे उकळल्यानंतर मात्र मऊ असे हाताला लागले. दुसऱ्या पातेल्यातील वरच्या कडक  कवचा मधील  द्रवरूप  पदार्थ असलेली अंडी उकळल्यावर आतून घट्ट झालेली दिसली तर तिसऱ्या पातेल्यातील पाणी उकळल्यावर कॉफीच्या बियांमधील अर्क पाण्यामध्ये उतरला आणि संपूर्ण पाणी कॉफीच्या सुगंधाने दरवळून गेले .वडिलांनी मुलीला प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासायला सांगून हे असे का झाले यातून आपण काय शिकायचे असा प्रश्न विचारला. मुलीला नेमका अर्थ सांगता आला नाही. मग वडिलांनी तिला सांगितले. पाणी  उकळण्याची क्रिया प्रत्येक पदार्थाला सारखी होती. त्यातून बटाटे मुळात  कडक असलेले मऊ झाले. अंड्याच्या  आतील द्रवपदार्थ घट्ट झाला तर कॉफीच्या बिया उकळल्याने पाण्यामध्ये आपला सुगंध सोडून गेल्या. असेच प्रत्येक व्यक्तीची  कठीण परिस्थिती आल्यावर  त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. खरे पाहता तीच व्यक्ती सर्वांग परिपूर्ण म्हणता येईल जी वाईट परिस्थितीतही इतरांशी व्यवहार करताना वरून  नरमाईने वागणारी पण आतून घट्ट खंबीर एकसंध असलेली आणि कुठल्याही परिस्थितीत आपला सकारात्मकतेचा दरवळ पसरवणारी अशी व्यक्ती सर्वांना हवीशी वाटते. खरंच किती गहन अर्थ आहे या  कथेमध्ये .फार कमी जणांना असे जमते. ज्या काही व्यक्ती अशा पद्धतीने स्वतःला परिस्थितीतून निभावून नेतात त्या खऱ्या अर्थाने अजातशत्रु असतात आणि सुखी होतात.

एक व्हिलन

नाही, अजिबात नाही. चित्रपटाविषयी नाही लिहिणार आहे. मला माहीत आहे, चांगला चित्रपट होता हा आणि रितेश देशमुख च्या कामाचं कौतुकही झालं होतं. :पण मी नाही पाहिलाय सिनेमा.      
 व्हिलन, हा विषय तसा मनात चार सहा दिवसापासून घोळतच होता. तशातच नेमके ह्या वेळी 'चला, हवा येऊ द्या च्या सेलिब्रिटी पॅटर्न' मध्ये नेमका हाच विषय घेतला गेला. मग पक्के   ठरवले की ह्या वेळी ब्लॉग लेखनासाठी "व्हीलनचीच " निवड करावी. असो.  आपण ह्या ठिकाणी ह्या विषयाची 'डार्क बाजू' विचारात न घेता ( वास्तवातील खरे खुरे व्हिलन) फक्त मालिका, चित्रपट, वेब सिरीज ह्यातील व्हिलन विषयीच विचार करूया.  तसे 'कल्पनेतील व्हिलन देखील असतातच, जसे कल्पनेतील हिरो असतात,तसे;आपणच निर्माण केलेले,किंवा आपल्या मानसिकतेतून निर्माण झालेले. आपण आपल्या सामान्य पातळीवरच विचार करूया.  
   ' डेली  सोप' मालिका पाहणाऱ्या वर्गाचा ह्या 'व्हिलन' शी सतत संबंध येत असतो.  कारण बहुतेक मालिकातून मग त्या मराठी असोत वा हिंदी 'एक व्हिलन' असल्याशिवाय मालिका बनतच नाही ;किंबहुना ती पुढे सरकतच नाही.  प्रेक्षकांनाही त्याशिवाय मजा येत नाही बघायला. परवा च्या 'सेलिब्रिटी पॅटर्न' च्या भागात व्हिलन ची भूमिका करणारा म्हणतो, ' व्हिलन नसेल तर हिरो लाही काही किंमत रहाणार नाही. ' 'पोह्यांमध्ये मिरची नसेल तर पोहे कसे लागतील?' पण मिरचीला पर्याय तरी आहे, लाल तिखटाचा. मिठाला पर्यायच नाही हो. मीठ नसले तर अन्न कसे अळणी, बेचव लागते, तसेच व्हिलन नसलेल्या मालिका प्रेक्षकांना मिचमीचीत, गुळमुळीत वाटतात.  आजारी माणसाला दिलेल्या खाद्य पदार्थ सारख्या. आणि चोखंदळ आणि करमणूक हवी असणाऱ्या प्रेक्षकाला चमचमीत च पहायला आवडणार,हे साहजिक आहे. काहीतरी उत्कंठावर्धक,  थरारक किंवा उत्सुकता वाढवणारे कथानक ही प्रेक्षकांचीच मागणी असते.  व्हिलन च नसेल तर नायक/नायिकेला  छळणार तरी कोण? त्यांना सहानुभूती मिळणार तरी कशी? सुरळीतपणे सुरू असलेल्या आयुष्यात किंवा आनंदी जीवनात खोडा घालणार कोण? आणि मग  एक दिवस सगळं काही छान होणार ही 'वेडी आशा' लावून बसलेले प्रेक्षक शेवटपर्यंत त्या मालिकेला चिकटून बसणार तरी कसे?  पण गमंत अशी की ह्या काल्पनिक मालिकांमध्ये प्रेक्षक इतके गुंतत जातात की कधी चुकूनही ही मंडळी समोर दिसली तरी त्यांचा राग राग करतात.  (वास्तव जीवनात ही मंडळी खरोखर सज्जन असते, असा खात्रीशीर समज असतो.)  एकीकडे ह्या व्हिलन चा रागही येतो. कधी  ह्याला धडा शिकवला  जातो आणि कधी सगळं  ' ऑल वेल' होतं ह्याची प्रेक्षक वाट पहात असतात आणि दुसरीकडे ह्याच्या अगदी विरुद्ध भावनाही असतात. एखाद्या मालिकेतून व्हिलन काही काळापुरता 'बाद' झाला, तर तेही चालत नाही.  "त्या राणा च्या सिरीयल मध्ये काही मजा राहिली नाही आता. ती नंदिता होती तोपर्यंत काहीतरी बघायची उत्सुकता तरी होती" किंवा  "घाडगे & सून" मध्ये  'कियारा ' खरोखर सुधरली तर संपलीच मग मालिका. पुढे काय अर्थ आहे बघण्यात'? आशा प्रकारची विधाने सार्वजनिक ठिकाणी सर्रास ऐकायला मिळतात (अर्थात महिला मंडळ) , पण ही व्हिलन मंडळी खरेच सुधरली की तात्पुरती सुधारल्याचे नाटक करताहेत हे बघणे देखील गमतीशीर आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या कुठल्या त्या पाचकळ मालिका त्यात कसली आलीये गंमत बिंमत? आता विनोदबुद्धीने पाहिले की झाले. तर ज्यावेळी व्हिलन मंडळी माफी वगैरे मागते, उपरती झाल्याचे दाखवते, पण फक्त प्रेक्षकांना कळेल अशा रितीने मान वेडी वाकडी फिरवणे, डोळे उगाचच बारीक किंवा अति मोठे करून कधी ह्या बाजूला तर कधी त्याबाजूला गरगर फिरवणे चेहऱ्यावर छद्मी हास्य आणणे असले येडे चाळे करते तेव्हा ती तात्पुरती सुधरली किंवा मालिका अजून लंबी खेचणार हे ओळखावे. आणि व्हिलन मंडळींच्या चेहऱ्यावर फक्त शांत, सौम्य भाव दिसले माफी मागताना की मग ती खरोखर (finally) सुधरली  असे खुशाल समजावे . अर्थात, आता मालिकेचा 'द एन्ड' जवळ आलाय हे ओघाने आलेच. पण ह्या अत्यंत कठीण गोष्टी समजायला देखील अभ्यास लागतो बरे. आमच्या सारखी  जाणकार ( रिकामी) मंडळी ताबडतोब ओळखू शकते असे प्रकार. मग काय तर, मी देखील बघते हो, काही ठराविक मालिका नियमित बघते. आज नाही जमले तर उद्या रिपीट टेली कास्ट बघते पण बघते जरूर. त्यामुळे अंदाजही बऱ्यापैकी बरोबर असतात. 😛😄 माझी मुलं नेहमी म्हणतात, काय मॉम, असल्या रटाळ मालिका पहात असतेस, रडक्या आणि बोअरिंग. त्यापेक्षा नेटफ्लिक्स वर कसल्या एकापेक्षा एक सिरीज असतात, त्या बघत जा. पण माझ्यासारखी जेष्ठ मंडळी एका जागी बसून चॅनल बदलायचेही  फारसे कष्ट घेत नाही तर चार ठिकाणी फिरून कशाला जिवाला त्रास करून घ्या. पेक्षा जे आतापर्यंत पहात आलोय तेच पहात रहावं ,झालं. नाही म्हणायला  मध्यंतरी लेकीच्या सूचनेनुसार बघितल्या काही वेब सिरीज. 'मॉम & कंपनी' म्हणून फक्त 10 एपिसोड ची मालिका
पण मस्त होती. नो व्हिलन, नो फॅमिली  drama ,नो  मिरची मसाला ---  मुलगा आणि आई ह्यांच्यातील भावनिक गुंतवणूक आणि समजून उमजून एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती. दर्जेदार मालिका, चित्रपट पहायला कुणाला नाही आवडत; पण आता  गुणवत्ता कमी झालीये आणि संख्या वाढलीये कार्यक्रमांची. फार पूर्वी म्हणजे 10 ते 12 वर्षांपूर्वी  काही हिंदी मालिका खूप चाललेल्या. एकता कपूरच्या-- क पासून सुरू होणाऱ्या--- क्यूँकी--- , कहानी घर घर की ---, कसोटी जिंदगी की--- सारख्या. त्यात  व्हिलन गिरी भरपूर असली तरी बघितल्या जात. अर्थात एका ठराविक मर्यादेपलीकडे गेली की कोणतीही मालिका बोअर व्हायला लागते हेही तितकेच खरे.  त्याही अगोदर बुनियाद, हमलोग, तमस सारख्या दर्जेदार मालिका होत्या. पण तेव्हा इतके पर्याय पण नव्हते. आता विविध वाहिन्यांवर विविध प्रकारचे कार्यक्रम सतत सुरू असतात. त्यात तिथेही जीवघेणी स्पर्धा आहेच. त्यामुळे दर्जाचा विचार कमी आणि टीआरपी चा विचार जास्त करून केला जातो.   देख भाई देख, हम पाच, साराभाई v/s साराभाई सारख्या व्हिलन नसलेल्या आणि निखळ करमणूक देणाऱ्या मालिका सध्या तरी पाहायला मिळत नाहीत. अशा वेळी कथा बाह्य कार्यक्रम जसे, सूर नवा सारख्या गाण्यांचा कार्यक्रम, हवा येऊ द्या सारखे विनोदी कार्यक्रम किंवा kbc सारखे मनोरंजनसोबत ज्ञान समृद्ध करणारे, माहितीची कक्षा विस्तृत करणारे कार्यक्रम बघणे जास्त चांगले.  मला स्वतःला गाण्यांचा कार्यक्रम पहायला फार आवडतो. सध्या सोनी वर एक नवीन मालिका सुरू झालीये, 'मेरे डॅड की दुलहन' सध्या तरी  बरी वाटतेय.
पण  शेवटी हेच म्हणावे लागते की मालिका म्हटली की व्हिलन हवाच .  आणि हाच 'व्हिलन गिरीचा' खेळ बघत असताना हेही जाणवतं कैकदा की मुख्य नायक नायिकेपेकशा हे व्हीलनच भाव खाऊन जातात. बऱ्याच मालिकांमध्ये खलनायक, विशेषतः खलनायिका ह्या नायिकेच्या तुलनेत , दिसण्यात, अभिनयात सर्वच बाबतीत सरस वाटतात. इतकंच काय पण काही काही व्हिलन तर असे असतात की त्यांचा  रागही येत नाही. काही विनोदी खलनायक देखील पहावयास मिळतात. ते दुष्टपणा करायला जातात आणि स्वतःचेच हसे करून घेतात.  . असो. 
   मला तरी हा 'व्हिलन' प्रतिकात्मक स्वरूपाचा' वाटतो.  म्हणजे बघा ना, आपण नेहमी म्हणतो, दुःखाचे दिवस फार काळ टिकून रहात नाही. रात्रीमागून दिवस,  दुख्खा मागून सुख, हा नियतीचा नियमच नाही का?   तसाच हा व्हिलन पण. तो येतो अडचणी घेऊनच; पण जातो तेही अडचणी घेऊनच.  कहाणीतला व्हिलन 'संपला' म्हणजे सुखाचा मार्ग मोकळा झाला तसे आयुष्यातही असे एक नाही तर अनेक व्हिलन वेळोवेळी येतच असतात,  आपली  कसोटी पहायला?  एकच व्हिलन नसतो मुळी आपल्या आयुष्यात. ह्या सगळ्या व्हीलन्स चा खात्मा करण्याचा प्रयत्न करतच आयुष्य पुढे जात रहाते, एखाद्या मालिकेसारखे------😊 त्यामुळे आपल्या जीवनात तरी  आपणच असतो  "रियल हिरोज' . संघर्षावर मात करणारे.
आणि हो, आपण जर स्वतःचं आत्मपरीक्षण करीत असू तर  हे देखील ध्यानात येईल की आपणही कुणा ना कुणाच्या नजरेत व्हिलन असूच शकतो.  
," we are all bad in
Someone's story.
 पण वाईट वागणारे सर्वच व्हिलन नसतात. जेव्हा  आपण केलेल्या वाईट कृतीची, कर्माची जाणीव होऊन खऱ्या अर्थाने उपरती होते, तो क्षण महत्वाचा.
 "  उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरले पाप
देह्यांत्ततपे पुण्यरूप, दुसरा जन्म जाला" 
       आयुष्यात सगळं  चांगलंच घडावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य नसतं. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, मिळत नाहीत. धूप छाव चा खेळ चालूच रहाणार. तसे सगळी चांगलीच माणसे भेटतील अशी अपेक्ष्या ही करणे चुकीचेच नाही का?  जगात वाईट प्रवृत्तीची माणसे आहेत म्हणून चांगल्या माणसांची किंमत आहे.  मिर्झा गालिब च्या दोन ओळी आठवल्या त्या लिहिते आणि थांबते.🙏  
" खुदा की मोहब्बत को, फना कौन करेगा?
 सभी    बन्दे नेक हो, तो
गुनाह कौन करेगा?"
    
माणिक नेरकर 
अकोला.

Friday, November 15, 2019

मे(रा)नोपॉज

कावळा शिवला ,पाळी आली ,MC ,टमाटर फुटला....,अशा नानाविध नावानी ओळखली जाणारी ,मेंस्ट्रुअल सायकल ,प्रत्येक स्त्रिच्या जीवनाच अविभाज्य अंग आहे.
वयाच्या अंदाजे 15 -16 व्या वर्षी सुरु होणारी आणि दर महिन्यात अवचित भेट देणारी ही सखी ,वयाच्या साधारण  45- 50 व्या वर्षी आपला निरोप घेते.
माझी अन पाळी ची पहिली भेट झाली (ओझरती म्हणू हव तर) मी चौथीत असताना,पुसद ला.
माझी मैत्रीण होती कल्पना,ती आठवी ला होती (मैत्री ला वयाच अंतर नसतं म्हणतात ते खरय ) मी तिच्याकडे रोज खेळायला जायचे ,एक दिवस गेले तर तिनी सांगितले मी आता  खेळणार नाही 3-4 दिवस , मला कावळा शिवला आहे .तरी मी तिच्याशी बोलत बसले ,निघाले तर ति मला सोडायला बाहेरपर्यन्त येत होती ,तेवढ्यात तिची आई ओरडली ,तो पायावर ओघळ आलाय तो धुऊन घे आधी ,तिच्या पायावर लाल रंगाचा रक्ताचा ओघळ होता ,तिचा चेहरा कावरा बावरा झाला ,ती आत गेली.
,मुळात चौकस स्वभाव नसल्याने ,आई ला किंवा तिलाही ह्याबद्दल कधी विचारले नाही,हा प्रसंग मी विसरुनही गेले .
पुढे साधारण सातवी ला असताना आई ने मला याबद्दल जुजबी माहिती दिली आणि अस काही
झाल तर सांग म्हणाली . मधे 1- 2 वर्ष गेले ,दहावी ला असताना आम्ही गाइड च्या कॅम्प ला गेलो ,तिथे मैत्रीणींची कुजबुज सुरु होती ,एका मैत्रीणीची विशेष काळजी घेतली जात होती ,तिची सगळी काम बाकी मैत्रीणी करत होत्या ,मला काय ते कळत नव्हत पण इतक्या जवळच्या मैत्रीणी
मला डावलुन कुजबुज करतायत ह्याच तेंव्हा खुप वाइट वाटल होत.
मग तो दिवस उजाडला, दहावी संपता संपता माझी पाळी आली ,खुप  वेगळ फीलिंग होत ते ,शब्दात मांडता न येणार !
कल्पना ला  शिवलेला कावळा ,गाइड कैम्प मधे मैत्रीणीला मिळलेली स्पेशल वागणूक ,अजुन कुठे कुठे झालेला याचा उल्लेख सगळ झर्रकंन डोळ्यासमोरून गेल .
वर्षभर, पाळी ची तारीख जवळ आली ,की नको वाटायच ,पण हळू हळू कहि वाटेनास झाल ,सवय झाली त्याची .
प्रामाणिकपणे सांगायचं तर मला कधी  पाळी चा फारसा त्रास झाला नाही ,मामुली पोट ,पाठ दुखण,थोड़ी बहुत चिड़चिड़ ,बास एवढंच!त्यामुळे पण या सखीशी लवकर सख्य जमल.
बघता बघता 30 ,वर्ष आम्ही गुणयागोविंदाने नांदलो .
48 वर्षाची झाले अन आता कधी पण पाळी जाईल अशी लक्षण दिसायला लागले .
मेंनोपॉज ! हा स्त्री च्या जीवनताल एक थांबा आहे ,ठहराव आहे ,अस बरच काही वाचल होत.मेंनोपॉज मधे खुप त्रास होते असही ऐकले होत,त्यामुळे भीति वाटत होती.शिवाय ज्या मैत्रिणी या फेज़ मधून जात होत्या ,त्यांचे ही अनुभव फेर धरून, खुर्ची का मिर्ची जाशील कैसी म्हणत सभोवति नाचत होते.
अचानक छाती धडधडायला लागते ,एकटेपणा वाटतो ,थोड़ ही काही झाल की डोळ्यात पाणी येत ,हाड़ ठिसुळ होतात.....एक ना अनेक प्रत्येकीचे अनुभव वेगळे ! 
1 पूर्ण वर्षभर पाळी आली नाही ,अन माझ्या मेंनोपॉज वर शिक्कामोर्तब झाल.
दोघही मुलं पण त्या वर्षी, एकाच वेळी बाहेरगावी शिकायला गेले,त्यामुळे आता आपल काही खर नाही अस वाटल. पण एखाद्या संकटाचा सामना करायला आपण सुसज्ज असाव ,अन ते संकट अगदी मामूली निघाव ,अस काहीस या बाबतीत झाल.
या सखी नी जस असताना मला काही त्रास दिला नाही ,तस जाताना पण निमुटपणे निघुन गेली .
सकाळी बॅडमिंटन ,मग दुकान ,तिथुन आल की लगेच खाली गोडाउन ला बसायच ,मग गाण्याचा क्लास ,तिथुन आल्यावर ट्रीट ला चक्कर , 3 - 4 bc ग्रुप ,प्रेरणा क्लब हा सोशल वर्क करणारा ग्रुप,अस सगळ व्यस्ततेच कवच भोवती आखुन घेतल्यामुळे फार काही जाणवल नसाव .तरी पण हे कवच भेदुन येणारा एखादा चुकार रिकामा क्षण त्रास देतोच.त्याशिवाय,
कधी न होणारी अॅसिडिटी आता व्हायला लागली आहे,खाणयापिंण्याच्या वेळेत बदल झाला तर त्रास होतो ,अचानक गर्मी होते तर दुसऱ्या क्षणाला थंडी वाजते,आजुबाजूला अनेक जण बोलत असतील तर त्रास होतो ,बॅडमिंटन खेळताना रिफ्लेक्सेस कमी झालेत हे जाणवत  मूड स्विंग आहेत..,अरेच्चा! काहि त्रास नाही म्हणता म्हणता ,यादी बरीच मोठी झाली की !
पण आपल्या सहवासात बरेच वर्ष असणारी गोष्ट ,मग ती आवडती असो की नावडती ,आपल्या आयुष्यातुन जाताना थोड़ा बहुत त्रास तर होणारच न !
या वर्षभरात ,वाचन जे बंदच झाल होत ,ते सुरु केल,थोड़ थोड़  लिखाण सुरु केल ,रिफ्लेक्सेस कमी झालें तरी खेळण्यात कुठे कमी पडत नाहीये ( ग्रुप मधे सगळे जेंट्स असल्याने,ही शक्यता जास्त होती ) हे लक्षात आल्यामुळे खेळण ही सुरु ठेवल. डान्स आणि स्विमिंग शिकायचा विचार आहे .
एकूण जमा खर्च मांडला तर पाळी येण अन मेनोपॉज़ दोन्ही फारस त्रासदायक ठरल नाही.त्यामुळे मेनोपॉज़ हा पॉज न ठरता ,अनेक नवीन गोष्टीची सुरुवात ठरावा अस वाटतय.

आनंदाच्या शोधात...

आनंद म्हणजे नेमकं काय? सतत छान वाटत राहणं म्हणजे आनंद? मग एखाद्या दारुड्याला
भरपूर दारू प्यायला मिळाली तरी छान वाटतं, त्या भावनेला आनंद म्हणता येईल का? नाही. मग हवं ते
करता/ घेता येण्याची कुवत मिळवणं म्हणजे आनंद? पण मग ज्यांच्याकडे ही कुवत आहे, ते सदैव
आनंदीच असायला हवेत. ते तसे नसतात. मग आनंद म्हणजे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट? पण आनंद हे
जर अंतिम उद्दिष्ट मानायचं तर संपूर्ण आयुष्य त्याशिवाय जगायचं? नाही नाही; फारच घोळ होतोय.
मला वाटतं आनंद हा आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून आयुष्याच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असायला
हवा.
Aristotle च्या मते केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं नव्हे, तर अलम मानवजातीच्या
अस्तित्वाचं प्रयोजन म्हणजे आनंद!
आता खरं सांगायचं तर आयुष्य हा सुख- दु:खाच्या टप्प्यांनी बनलेला प्रवास आहे. कालिदास
म्हणतो त्यानुसार आत्यंतिक सुख किंवा दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नसतं. जीवनाचं चक्र कधी खाली
तर कधी वर जात असतं. सुख आणि दु:ख दोन्ही क्षणकाल टिकणारे असतात, सुखाचे क्षण तुलनेने
लवकर गेल्यासारखे आणि म्हणून जास्त क्षणभंगुर वाटतात इतकंच. मनुष्य सुखाच्या क्षणांना घट्ट धरून
ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते नकळत कधी निसटून जातात ते कळतच नाही. एक उर्दू शायर म्हणतो,
‘बार बार रफू करते रहते हैं जिन्दगी की जेब को हम, कमबख्त फिर भी गिर ही जाते हैं खुशीके कुछ
लम्हे...’ म्हणजे देणारा लाख देईल हो, पण घेणाऱ्याची झोळी तर धड हवी, ती आपली असते कायम
फाटकी!
आनंदाची आणखी एक गंमत असते. एका व्यक्तीला ज्यात आनंद वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच
असं नसतं. त्यामुळे आनंद कशात असतो याची व्याख्या करणंही शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला
वाचनाची आवड असते. तिची मैत्रीण नेमकी “एवढं काय वाचत असतेस? जरा लाईफ एन्जॉय कर ना
आमच्यासारखं!” असं म्हणते तेव्हा तिला हसावं की रडावं हेच कळत नाही. एवढंच नाही, तर आज ज्या
गोष्टीतून आनंद मिळतो, त्या गोष्टीचा त्याच व्यक्तीला कालांतराने कंटाळा येऊ शकतो. दहा वर्षांपूर्वी
एकमेकांची सोबत सतत हवीशी वाटणारे नवराबायको एकमेकांना कंटाळतात आणि मग “ह्यांची सुटी
नकोच असं वाटतं आताशा, रोजचाच दिवस जास्त बरा जातो.” असं वाक्य एखादी गृहिणी बोलून जाते.
किंवा ‘आई तू ऑफिसला जाऊ नकोस’ म्हणून मागे लागणारी मुले ‘ती ऑफिसला गेलेलीच बरी’ असे म्हणू
लागतात. (त्यामागची कारणे शोधायला स्वतंत्र लेख लिहायची गरज आहे, इथे ती चर्चा नको.)
आनंद विकत मिळत नाही. तो तसा मिळाला असता, तर फक्त श्रीमंत लोक आनंद दिसले असते.
मात्र लक्ष्मी ज्यांच्या घरी पाणी भरते, अशा व्यक्तींच्या जीवनातही आनंद असतोच असं नाही. वैभवाच्या

झगमगाटात त्यांच्या डोळ्यांतली दु:खाची छटा लपत नाही. याउलट एकाच खोलीत संसार मांडलेल्या, घाम
गाळल्यावाचून भाकर न दिसणाऱ्या व्यक्तींचा चेहराही आनंदाने फुललेला दिसून येतो.
आनंद कशातही असेल, तरी तो व्यक्तीसापेक्ष आहे, हे मान्य करायलाच हवं. कधीकधी आनंद
कशात मानावा हे परंपरा ठरवतात. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत. या संदर्भात मला एक भुलाबाईचं गाणं
नेहमी आठवतं. मुलींना खेळात अधेली सापडते. त्या अधेलीचा उपयोग कसा व्हावा हे पुढच्या गाण्यात येत
जातं – सर्वप्रथम ‘अधेली देऊ वाण्याला’. स्त्रीजवळ पैसा असला तर पहिला उपयोग ‘वाण्याकडे जाणे’ ! बरं
वाण्याकडे जाऊन काय करायचं तर ‘वाण्या वाण्या शोपा दे’ , शोपा स्वतःला खाण्यासाठी नाहीतच, तर
‘शोपा देऊ गाईला’ ! त्या शोपांच्या मोबदल्यात गाय दूध देईल. ते तरी मुली पिणार का? तर नाही; ‘दूध
देऊ बगळ्याला!’ बरं दुधाच्या मोबदल्यात बगळा चक्क पंख देतोय, तर ते घेऊन आकाशात भरारी घ्यावी
असा विचार करायचा नाही. तर ‘पंख देऊ राजाला’. आणि राजाकडून काय घ्यायचं तर ‘गोंडे’. बरं, हे गोंडे
लेऊन मुली समारंभात, गावात मिरवणार का? तर नाही, ‘तेच गोंडे लेऊ , सासरी जाऊ’ म्हणजे सगळा
उठारेटा करायचा तो सासरी जायला. मुलींचा आनंद अधेली स्वत:ला वाटेल तशी खर्च करण्यात नाही, दूध
पिऊन सशक्त होण्यात नाही, पंख पसरून भरारी घेण्यात नाही, गोंडे लेऊन मिरवण्यात नाही, तर तो आहे
(खरं तर असावा असा आग्रह आहे) सासरी जाण्यात. शिवाय हे सासर देखील कसं असतं, तर कुचूकुचू
काट्यांच्या वाटेवरलं ! असा प्रिस्क्राईब केलेला आनंद हे स्त्रीचं प्राक्तन होतं.
एखाद्याचा आनंद हा कशात असावा हे सांगणं चुकीचं असलं, तरी कशात नसावा हे सांगायची
बरेचदा गरज पडते. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याची फजिती करण्यात, विध्वंसक कृत्ये करण्यात आनंद
नसावा. हॉटेलमधील वस्तू चोरण्यात, बसेसच्या सीट्स फाडण्यात, सार्वजनिक बागेतील उपकरणे
निष्काळजीपणे वापरून खिळखिळी करण्यात आनंद नसावा. एखाद्याच्या आयुष्यातील दुखरा कोपरा
मुद्दाम पकडण्यात, नको इतके खाजगी प्रश्न विचारून बित्तंबातमी काढण्यात, इतरांना तुच्छ लेखण्यात
आनंद नसावा. गरिबापुढे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यात, एकाकी व्यक्तींसमोर भरल्या घराचे गोडवे
गाण्यात, हरलेल्याला हिणवण्यात आनंद नसावा. यातून फक्त अहंकार सुखावतो. आणि अहंकार
सुखावण्यातून मिळणारा आनंद हा आसुरी आनंद असतो.
एकूण काय, आनंद हा कस्तुरीसारखा असतो. मनुष्य आनंदाच्या शोधात वणवण भटकतो एखाद्या
कस्तुरीमृगासारखा. ती त्याच्या नाभीतच दडलेली आहे हे त्याला माहीतच नसतं. तो तिला इतरत्र शोधत
बसतो . मनुष्यही आनंद असाच बाहेर शोधत बसतो आणि त्याला तो सापडत नाही. तो त्याच्या मनातच
दडलेला असतो आणि म्हणत असतो, “तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी.”

Thursday, November 14, 2019

ED ची नोटीस

कार्यालयातील रोजचीच काम आपल्या गतीने सुरू होती,त्यात नवीन काही काम आलेली होती, आणि ती प्राध्यान
तत्वावर पूर्ण करायची होती,त्यामुळे जुन्या नव्या कामांची सांगड कशी घालायची याच विवंचनेत असतांना
आस्थापनेतील शिपाई आला आणि माझ्या हातात 1 कागद देत म्हणाला , “मॅडम ईडी ची नोटीस आहे” .मी एकदम
उडालेच कस शक्य आहे ? . आतापर्यंत पेपर मध्ये वाचले होते त्याप्रमाणे ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे करणाऱ्यानांच ईडी
चे बोलावणे येते असे वाटले होतेआणि माझ्यासारख्या त्यापैकी 1 चा आकडाही न पार करणारीला नोटीस ह्या
विचारांचा कल्लोळ मनात उभा राहिला, तेवढ्यात तो परत म्हणाला मॅडम घेताय न नोटीस ? मी भीतीयुक्त
आश्चर्य ने ती ,सही करून वाचायला घेतली आणि हसूच आले ,ती ईडी म्हणजे इलेकशन ड्युटी ची नोटीस होती
आणि त्यात मला पोलिंग ऑफिसर च्या पहिल्या प्रशिक्षणासाठी बोलावणे आले होते .
यापूर्वी कधीही हा योग आला नव्हता ,माझी ही पहिलीच ड्युटी होती.लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवाची मी
भागीदार होणार होती. मनात उत्सुकता,काळजी याचे मिश्रण झाले होते.कार्यालयात बहुतेक सर्व मैत्रिणींना ड्युटी
आलेली होती, त्यामुळे अनुभवी मैत्रिणींनी धीर दिला.
आणि आम्ही सगळ्या पहिल्या प्रशिक्षणासाठी दिलेल्या स्थळी पोहोचलो, तिथे व्यवस्थित सूचना फलक लावले होते
परीक्षा केंद्रावर जशी विद्यार्थ्यांची गर्दी असते तसा जनसागर गायकवाड सभागृहात लोटला होता.साधारणतः ५० -६०
अधिकाऱ्यांसाठी १ टेबल या प्रमाणे काही काही अधिकारी तिथे बसले होते, त्याच्याकडे याद्या होर्या त्यात आपले नाव
पाहून उपस्थिती नोंदवायची होती. नंतर वरच्या सभागृहात प्रशिक्षण होते. आम्ही दोघी तिघी मैत्रिणी सही करून
सभागृहात पोहोचलो आणिलगेच प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रशिक्षण चालू केले,ते निवडणूक कामाची पार्श्वभूमी,त्याचा
संपूर्ण तपशील,तसेच ती बजावताना घेण्याची काळजी, त्यातील गांभीर्य व त्या अनुषंगाने घ्यावयाची जबाबदारी
याबद्दल कळकळीने सांगत होते, त्याबद्दल ऐकतांना जाणवले की किती व्यवस्थित सांगड घातली गेली आहे
जबाबदाऱ्यांची ,वेगवेगळ्या विभागात कार्य करणारे , यापूर्वी कधी या कामाचा अनुभव असलेलें ,नसलेले विविध लोक
हे जबाबदारीचे काम अतिशय उत्कृष्ठ करतात .साधारणतः ५ लोकांची टीम एक मतदान केंद्रावर कार्यरत असते
त्यांच्या जोडीला पोलीस दलातील शिपाई, होमगार्ड पण असतात त्याचे काम बूथ च्या बाहेरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे
असते.अशा 5 ते 10 बूथ ची जबाबदारी 1का क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे असते तो विभाग स्तरावरील मुख्य अधिकारी
आणि केंद्राध्यक्ष यामधील दुवा असतो. बुथमधील ५जणांची टीमचा PRO हा कॅप्टन असतो त्याचे काम बाकी टीम
कडून काम करून घेणे आणि लेखी रिपोर्ट सादर करणे असते पण त्याची जबाबदारी त्या बुथ पुरती पूर्ण च असते.
दोन क्रमन्कचा चा पोलिंग ऑफिसर मतदाराचे नाव यादीत चेक करतो व त्याने दाखवलेल्या valid ओळखपत्राद्वारे
त्यांची ओळख पटवतो.३ रा पोलिंग ऑफिसर त्या ओळखपत्राचे नाव व नंबराची एक वहीत नोंद घेतो आणि त्याची
चिट्ठी बनवून ४ थ्या पोलिंग ऑफिसर कडे देतो . त्याचे काम 100 चिठयांचा 1 गठ्ठा अशाप्रकारे गठ्ठे तयार करणे
हे असते आणि प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी cpu चे बटण दाबणे हे असते . आणि ५ व अधिकारी बोटाला
शाई लावण्याचे काम करतो . हे सर्व ऐकून वाटले की खरच किती बारीक बारीक कामाचा तपशील नोंद करून ही
यंत्रणा अस्तित्वात आली असेल , भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणूक
प्रक्रिया अपवादात्मक परिस्थिती सोडता, यशस्वीपणे पार पडणाऱ्या या यंत्रणेची कमाल च आहे. आतापर्यंत मतदान
प्रक्रियेचा फ्रंट साईडने अनुभव घेतला होता आणि आता बॅक एन्ड ने चालणारी कामे अनुभवायला मिळणार होती.

प्रमुख निवडणूक अधिकाऱ्याचे training संपल्यावर प्रत्यक्ष hands on training साठी जवळच असलेल्या एका शाळेत
गेलो आणि तिथे cpu (central processing युनिट) , vvpat आणि evm यांची जुळणी करण्याचे प्रात्यक्षिक करून
पाहिले आणि मगच घरी गेलो.
अंदाजे 15 दिवसांनी 2रे ट्रेनिंग लागले . सकाळी मला एका unknown नंबर वरून कॉल आला आणि पलीकडल्या
व्यक्तीने विचारले की शितलजी बात कर रही है? मी हो म्हणाली. त्याने सांगितले की तो आमच्या टीम चा PRO आहे
आणि ट्रेनिंग ला भेटू या असे म्हणाला. पहिल्या ट्रेनिंग चीच पुनरावृत्ती झाली पण फक्त आम्हाला आम्ही कोणत्या
विभागात काम करणार आहोत हे कळले. नंतर hands on traning च्या वेळी इतर सहकाऱ्यांची ओळख झाली आणि
आम्ही प्रत्यक्ष कुठे काम करायचं आहे या विचारांमध्ये आपापल्या घरी गेलो.
21 तारखेला प्रत्यक्ष मतदान होते, आणि आम्हाला 20 तारखेला सकाळी 9 वाजता संभाजी स्टेडियम मध्ये reporting
करायला सांगितले होते,आदल्या दिवशी पर्यंत पाऊस सुरू होता त्यामुळे चिखल सर्वत्र होता आणि त्यादिवशी पण
पावसाची रिपरिप चालूच होती,अशा परिस्थितीत संभाजी स्टेडियम वर पोहोचले , आणि ऑर्डर वरचा टीम क्रमांक
शोधायला लागले तेव्हा आमच्या टीम चे PRO भेटले आणि त्यांच्या बरोबर टीम ची बूथ ऑर्डर घ्यायला एका टेबल
वर गेलो ,तिथे कळले की आमचा टीम क्रमांक च बदलला आहे परत समोर आलो आणि दर्शनी फलकावर लावलेली
यादी पाहू लागलो तेव्हा PRO यांच्या नावासमोर दुसरा टीम क्रमांक दिसला ,परत त्या क्रमांक नुसार दिलेल्या टेबल
वर ऑर्डर घ्यायला गेलो तर त्यात फक्त त्यांचेच नाव होते आणि बाकी सर्व टीम बदलली होती, माझे नाव दुसऱ्या
टीम मध्ये add झाल्याची शक्यता होती, परत दर्शनीय भागात येऊन नोटीस फलक पाहिला. माझ्या टीम चे नाव
कुठेच नव्हते तसेच माझा नंबर पण नव्हता, मग आता काय करायचे याचा विचार करत असतानाच माझ्या
कार्यालयातील काही सहकारी भेटल्या, त्यांचे पण असेच झाले होते , मग आम्हाला अधिक चौकशी केली असताना
कळले की आम्ही राखीव अधिकारी आहोत , आम्हाला कोणताही बूथ allot झाला नाही , आम्ही थोडे बाजूला ऊभे
राहून ज्यांना बूथ allot झाले आहेत त्यांची सामान म्हणजे evm machine, vvpat, cpu व इतर लावणारे साहित्य
नेण्याची गडबड पाहत राहिलो. साधारण 1 .30 वाजेपर्यंत त्याची गर्दी आटोपली, त्यानंतर आम्ही जेवढे लोक उरलो
होतो त्यांना हॉल मध्ये एका ठिकाणी जमा व्हायला सांगितले आणि बाजूला क्षेत्रीय अधिकारी उभे होते , ज्याच्या कडे
अंदाजे 5 ते 10 बूथ होते आणि त्यापैकी काही बूथ मधील टीम मधला एखादा सदस्य नव्हता त्याच्या बदल्यात
दुसऱ्या सदस्याची मागणी करत होता आणि त्याच्या requirement प्रमाणे त्या विभागाचे मुख्य निवडणूक अधिकारी
राखीव सदस्यातून निवड करून त्याची मागणी पूर्ण करत होते . मला आणि अजून एक सदस्याला ला अशा एक
क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे परत राखीव सदस्य म्हणून दिले. त्यांना फक्त 1 PRO हवा होता पण त्याच्या सोबत आम्ही 2
जण फ्री मिळालो त्यांना. मग त्याच्या सोबत आम्ही जीप मध्ये आणि इतर 5 बूथ च्या टीम बस मध्ये असे
निघालो आणि 1का शाळेवर पोहोचलो तेव्हा कळले की त्याच शाळेत 5 बूथ आहेत आणि तेवढंच बूथ क्षेत्रीय
अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्राखाली आहेत. शाळा kinder garden private होती . सगळ्या बूथ मध्ये सामान लावणे
,चीठ्या बनवणे, फलक लावणे इ काम सुरू झाले ,काही सामान आणण्यासाठी परत आमची स्टेडियम ला 1 चक्कर
झाली आणि संध्याकाळी महिला कर्मचार्यांना घरी जाण्याची सूट मिळाली, घरी पोहोचले तर मुलाने surprise cake
आणला होता (त्यादिवशी माझा वाढदिवस होता��) त्याच्याशी बाबांशी गप्पा झाल्या आणि इतर मैत्रिणी , नातेवाईक
यांचे फोन आले ,त्यामुळे दिवसभराचा शारिरिक व मानसिकथकवा दूर झाला .

दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता परत शाळेत पोहोचली तेव्हा मौक पोल सुरू झाले होते . ते संपले आणि ठीक 7
वाजता मतदानाला सुरुवात झाली. मी शाळेच्या रेसिपशन लाच बसले होते , तिथे तैनात असलेली 1 पोलीस महिला
शिपाई आणि 1 पुरुष शिपाई याची ड्युटी लोकसभा इलेकशन वेळी त्याच बूथ ला झाली होती ,त्यांनी मागचा
अनुभव सन्गितला की कसे काही लोकांनी गडबड केली कारण त्याचे मतदान ह्या मतदान केंद्राच्या दुसऱ्या उपकेंद्रावर
होते. हळूहळू लोक येत होती आणि BLO पण येऊन बसलेले होते पाऊस रिमझिम चालूच होता , 1 blo आपल्या 9
वि तल्या मुलाला घेऊन आला होता मदतीसाठी, येणारे लोक , जॉगिंग , सायकलिंग करून मतदानाला येत होते आणि
बाहेर आल्यावर कर्तव्याचे पालन केले आहे तो ‘ सेल्फी तो बनता है यार’ असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. अनि
सेल्फ़ि चे पण कर्तव्य पार पाडत होते. पाऊस थांबला आणि हळू हळू गर्दी वाढू लागली .काही छोटे मुलं मुली पण
उत्साहाने आपल्या पालकांबरोबर आली होती ,एकजण माझ्यासोबत बसली ,तिचे पालक रांगेत उभे होते. वय वर्ष 5
तिला गमतीने सहज विचारलं ,”तुला करायचे नाही का मतदान ? तर तिने जे उत्तर दिले ते ऐकून मी थक्कच झाले
ति म्हणाली.” बटण दाबून उमेदवाराला मतदान करतात आणि ज्याला जास्त मतदान होते ते जिंकतात .” तिच्या
बाजूला साधारण तिच्याच वयाचा 1 मुलगा मोबाइल वर गेम खेळत होता , ते पाहून पोलीस शिपाई म्हणाला अरे
मोबाइलला ने डोळे खराब होतात , मेंदू खराब होतो ,तर लगेच ही म्हणांली मी नाही खेळत मोबाइलल वर ,आम्ही
तिचे कौतुक केले तर लगेच “पण माझी आई खेळते मोबाइल वर गेम ‘” अस सांगून आमची दांडीच उडवली.
दुपारनंतर मी 1 बूथ वर reliever म्हणून गेली आणि बोटाला शाई लावण्याचे काम केले, त्यात पण अनेक नमुने
पाहायला मिळाले , एक मुलींनी तर please जरा बारीक आणि सरळ शाई लावण्याची विनंती केली तिला सेल्फी
काढायची होती. एकजण त्याचे आधार कार्ड तिथेच विसरला. एक तर पासपोर्ट विसरला
काहींच्या इलेकशन कार्ड मध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत्या त्यामुळे ओळख पटवणे कठीण जात होते,काही लहान मूल
पालकांबरोबर आत येत होती आणि आमच्यापण बोटाला शाई लावा म्हणून हट्ट करीत होती,
या सगळ्या सोहळ्यात मात्र मतदारांचा उत्साह , मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याचे त्याला पूरक साहाय्य आणि त्यात
काही उमेदवारांची शेलेब्रिटी स्टाईल एन्ट्री यांची सरमिसळिने निवडणूकीचे वातावरण रंगात आले होते आणि जसे जसे
घडाळ्या चा काटा 6 कडे सरकू लागला तसा मतदारांच्या रांगा वाढू लागल्या आणि कर्मचाऱ्यांच्या अंगात अजूनच
स्फुरण चढले. घडाळ्यात 6 वाजले आणि निवडणुकीचा बिगुल वाजला . आता बाकिचे बूथ मधिल लोक evm सिल करणे,
बाकिचे सोपस्कार करणे अशि कामे करु लागलि, मला परत संभाजी स्टेडियम ला reporting करूनच घरी जायचे होते.
या निवडणुकीच्या चांगल्या अनुभवामुळे माझा मतदान प्रक्रिया योग्य प्रकाराने राबविण्यासाठी किती अधिकारी
,कर्मचारी अविरत काम करीत असतात याचा चांगला अनुभव आला. त्यामागे निवडणूक आयोगाची आखलेली कठोर
कर्तव्य नियमावली हेदेखील कारण असू शकते पण प्रत्येकाने त्याला नेमून दिलेले काम योग्य केले तर अनुशासनाची
भीती राहत नाही हे देखील कळले .
मात्र अजुनहि सरकार स्थापन झालेले नाहि, आणी ते करण्यासाठी होत असलेली सुंदोपसुंदी पाहता, हेच अनुशासनाचे
कठोर नियम आणि कर्तव्य हे ते नियम पारित करणाऱ्यांसाठी का नाहीत ह्या गोष्टीचा विषाद नक्कीच वाटतो

- गौरी

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

एका शाळेच्या बालक दिनाच्या कार्यक्रमातील ही घटना मला बरंच काही शिकवून गेली. सतत गप्पा मारणाऱ्या आणि आपल्या बांगडीशी ती हातातून बाहेर काढून खेळणाऱ्या एका मुलीला शिक्षिकेने शांत बसायला सांगितल्यावरही तिने आपला चाळा सुरूच ठेवला. मग  शिक्षिकेने तिच्या हातातील बांगडी काढून स्वतःजवळ ठेवली. कार्यक्रम संपल्यावर त्या मुलीने माफी मागून बांगडी परत मागितली आणि आज बालक दिन आहे तर आज तुम्ही मला शिक्षा न करता क्षमा करायला हवे असे सांगितले. त्यावर शिक्षिकेने दिलेले उत्तर मार्मिक होते .त्या मुलीला उद्देशून म्हणाल्या- बालक दिनाच्या निमित्ताने क्षमा करावी. मात्र याच निमित्ताने का होईना तुम्ही बालकां सारखे राहायला हवे ना? केवळ आजच नाही तर सर्वच दिवस बालकाची निरागसता असते का तुमच्यात? तुम्ही असे निरागस रहाल तर शंभर वेळा तुमच्या चुकांबद्दल तुम्हाला माफ करण्यात येईल.
   खरंच निरागसता लहान मुलांमध्ये किती बघायला  मिळते हा प्रश्नच आहे. कार्बाईडच्या वापराने वेळेआधी पिकवलेल्या फळां प्रमाणे आजची बालके घाईने मोठी केली जात आहेत .शारीरिक वाढीचे टप्पे वेगाने गाठण्याचे प्रमाण असे आहे की बसती झालेली बालके रांगण्याची पायरी चुकवून सरळ उभी राहायला लागलेली आहेत. मग मानसिक वाढीचे टप्पे ही वेग -अतिवेग धरू लागले आहेत. वयानुसार भाव- विभाव दाखवणारी बालके, लहान मुले शोधावी लागतात. बहुतेक मुलांना माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशी शिकवण कळत-नकळत मिळते आहे. आपली मूठ झाकून दुसऱ्याच्या ओंजळीतले हिसकावून घेणे हे करता येणारी मुलं आजच्या जगात "फिट" आहे म्हणून त्याची पाठ थोपटली जाते.
   सदगुणांना धाब्यावर बसवून षड्रिपुना  आपले दोस्त बनवले जात आहे. दया-क्षमा-शांती ही केवळ स्त्रियांची नावे म्हणूनच माहिती आहेत का असा प्रश्न पडतो .मत्सर मात्र ठासून भरलेला दिसतोय .त्याच्याकडे तेवढे माझ्याकडे एवढेच ?असा असमाधानी सूर कायमच मुलांमध्ये दिसतो. कितीही मिळाले तरी इतरांकडे पाहून त्यावर विरजण पडते आहे .त्यातून मद, उन्मत्त पिढी तयार होते आहे .मला मिळायला हवे, इतरांशी काय करायचे ?सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ बघितला .इमारतीमधील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माणसे भरल्याने ती थांबते. अस्वस्थपणे ती सुरू होण्याची , वर चढण्याची वाट बघत प्रत्येकच व्यक्ती इतरांकडे अपेक्षेने बघते .मात्र स्वतः भार कमी करण्याचा विचार त्यातील कुणालाच येत नाही .अखेर एक कुबडयांच्या आधारे उभी असलेली मुलगी तिथून बाहेर पडते आणि लिफ्ट सुरू होताना बघते. निरागसता न जोपासलेली लहान पिढी  मोठी झाल्यावर अशी उन्मत्त, भावशून्य झाली तर त्यात काय नवल?
  लोभ हव्यास वाढवायला समजुतीचे बीज न पेरले जाणेच कारणीभूत असते ना? " ब्लॅक होल" नावाचा एक लघुपट मध्यंतरी बघितला. एका कागदाच्या मध्यभागी जादुई काळा गोल असतो त्यातून पलीकडच्या वस्तू पर्यंत आरपार पोहोचता येते हे जेव्हा एका व्यक्तीला कळते तेव्हा तो आधी बंद फ्रीजमधले खाद्यपदार्थ हात आरपार घालून काढतो आणि खातो मग त्याच्या वापराने तिजोरीतील धन काढण्याचा मोह त्याला आवरता येत नाही आणखीन आत हात घालून सर्व धन बाहेर काढता काढता तो कधी आत डोकावतो आणि आतच गडप होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही. 
  आपल्या प्रत्येकातील खरा बालक जेव्हा सक्रिय राहील तेव्हाच संपूर्ण मानवजातीचे हित साधले जाईल. यानिमित्ताने ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांच्या एकमेकांशी घडलेल्या संवादा वरील ओळी आठवल्या

    अरे अरे ज्ञाना झालासी पावन 
     तुझे तुज ध्यान कळो आले 

 अध्यात्मिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी स्वतःला स्वतःची ओळख झाल्यावर पावित्र्य येते हे सांगणाऱ्या आहेत .आत्मा आणि परमात्मा यांच्यातील एकरूपता दर्शवणाऱ्या आहेत. अशीच एकरूपता बालक दिनाच्या निमित्ताने आपल्यातील प्रत्येकाने स्वतःतील बालकाशी साधली तर जगणे खऱ्या अर्थाने सुंदर होईल .

     दीपकी दीपक मावळल्या ज्योती
      घरभरी वाती शून्य झाल्या 

  ज्ञानाच्या प्रकाशाने जसे जगातील सर्व गोष्टी उजळून निघतात आणि आपल्या न संपणार्‍या इच्छा नाहीशा होतात तशाच बालसुलभ भावाविशेषांनी आपल्यातील कोमलता जागृत ठेवून षड्रिपूंचे दमन करणे गरजेचे आहे.

    वृत्तीची निवृत्ती अपणांसकट
    अवघेचि वैकुंठ चतुर्भूज

 बालकांच्या शोधक नजरेने चांगल्या गुणांचा मार्ग जोपासत संपूर्ण विश्वामध्ये दैवी गुणांची ज्योत अखंड जागवत ठेवूया.
 बालक दिनाच्या शुभेच्छा!!!

 

Tuesday, November 12, 2019

भेट

मध्यंतरी मला उगाचच सारख उदास वाटत रहायचं ,पावसामुळे असेल  कदाचित् !...सततच्या   आभाळी वातावरणाने मनावर मळभ चढले होते दिव्यावर काजळी धरल्याने अंधुक प्रकाश पसरावा अगदी तसेच.......माणिक म्हणाली होती की अर्चना, आपण जायचे कां गं केकतउमर्याला दिवाळीचा फराळ घेऊन ?.....मी नाही म्हणाले कारण खरोखरच जमत नव्हते माझं तेव्हा कारण दोन दिवसांनी मुलगा,मुलगी,जावई यायचे होते आणि माझी काहीच तयारी झाली नव्हती. ती पण बिचारी शांत बसली कारण माझ्यासारखच आणि दोघी तिघी मैत्रिणींच देखील याच कारणाने जमत नव्हतं. 
       दिवाळी आटोपली होती, पाहुणे  आपआपल्या गावी परतले होते.पुन्हा माणिकने हळूच सूर काढला कां गं मुलींनो चलायच कां? कोण कोण येतय सांगा गं जरा म्हणजे सगळी नीट व्यवस्था करता येईल!....आणि तीथेपण नीट कळवता येईल...............आता तशा सगळ्या मोकळ्या झाल्या होत्या दिवाळीची सुट्टी संपायच्या आत जाऊ गं असं एकीने सुचवलं आणि रविवार पक्का झाला.
        रेल्वेचा प्रवास !.....अकोला वाशिम असा !. या वर्षीच्या सतत सहा महिन्याच्या पावसाने रखरखत्या ऊन्हाच्या झळांना काबुत केले होते. .सर्वत्र हिरवाईचे दर्शन होत होते. त्यामुळे आपोआपच मरगळ दूर झालेली. रिझर्व्हेशन असल्याने प्रवासही सुखकर! गप्पांच्या ओघात वाशिम कधी आले ते कळले देखील नाही.मी ,माणिक,सुषमा,कल्पना आमचं चौकोनी मैत्र निघालो केकतउमराच्या वाटेने.आणखी एका सखीने दिप्तीने तिच्या भाच्याला सांगून आमची चांगलीच सोय करुन दिली होती. त्यांच्याच कारमधून आम्ही निघालो ते थेट त्यांच्या घरी!....
         "चेतन उमरीतकर" अशा खड्या अक्षरातल्या पाटीने  लक्ष वेधून घेतले.आणखी लक्षवेधून घेतले ते त्यांच्या परिसरातल्या दाट वनराईने जणू एखाद्या सहलीच्या  ठिकाणी आपण आलो की काय इतके मनोवेधक होते ते.दाट वनराईत लपलेल घर जसजस जवळ जवळ जात होतो तसतस ठळक होत होतं. सगळ्या झाडांना पाटानं जाणार झुळझुळ पाणी आपल्या लयबद्ध नादाची हळूच जाणिव करुन देत होतं. वड ,पिंपळ,आंबा ,लिंबू,केळी ,जास्वंद असा वनराईंनी सजलेला परिसर आणि तो हिरवाईचा तजेलदारपणा मनाला तिथेच निक्षूण  सांगत होता जणू आम्ही दृष्टीहीन असुनही टवटवीत ताज्या मनाचे आहोत. .. ................................संपूर्ण टिनांच तीन खोल्यांच सुटसुटीत घर आणि घरातील माणसे आपआपल्या कामात गुंतलेले. चेतन "हा पांडूरंग उचितकरांचा १३/१४वर्षाचा जन्मांध मुलगा मोठी बहीण bscकरुन mpscचे लक्षठेवून असणारी. १००वर्षाच्या आसपास असणार्या चुणचुणीत आजी, आई-बाबा आणि देवाने पदरात टाकलेले आणखी १४मुले असा भरगच्च परिवार! विशेष म्हणजे त्यात दोन अंध जोडपी! वय वर्ष११ते २६  असा सगळा भरलाभुरला परिवार   !. .......... आम्ही आलोय याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन आणि डोळ्यातुन ओसंडून वहात होता. आपआपल्यापरिने सगळ्यांनीच आमचे स्वागत अतिशय प्रेमभराने केले. कितीतरी जुनी ओळख असल्यासारखे कुठलाही आडपडदा न ठेवता म्हणजे संकोच न करता गप्पा करु लागले.मला त्यांच्या आनंदाचे सगळे भाव त्यांच्या डोळ्यात दिसत होते. नवीन बांधकाम केलेली इमारत दाखवताना  आणि आम्ही उत्सुकतेने पाहताना जाणवले की,उचितकरांनी सगळ्या मुलांना दैनंदिन व्यवहार, वागणूक,आगतस्वागत,बोलण्यातील आब यात एकदम तरबेज केले होते. प्रत्येकांच्या खोलीत गेल्यावर एक लोखंडी कपाट,एक पलंग त्यावर नीटनेटकी चादर अंथरलेली ,सोपसुपारीचे पानदान असा सगळा सांसारिक रितीभातीचा मेळ बघून माझे डोळे आश्चर्याने अवाक् झाले.
      मनात सहजच विचार डोकावून गेला की आपण सगळ्या गोष्टींची अनुकुलता असुनही छोट्याशा कुंटुबातही कुरबुरी करत राहतो पण हा सगळा पसारा सांभाळताना चेतनच्या आईबाबांना अनेक कसोटीच्या क्षणांना सामोरे जावे लागले असेल अनेक संकंट अचानकच समोर आली असतील पण उचितकर दाम्पत्यांच्या हसर्या सेवाभावी चेहर्याकडे बघून हेच वाटत होते की यांना दैवीशक्तीच मिळाली आहे त्याच शक्तिच्याआधारे ते इतक्या जणांचा आज चिकाटीने सांभाळ करित आहेत.श्री.उचितकरांनी अतिशय हलाखित आणि कष्टातून शिक्षण घेतले .सात भावंडात एकमेव शिकलेले पण कमालिची जिद्द चिकाटी आणि परिस्थितीशी सामना करुन पुढे कसे गेले  हे त्यांनी आम्हाला सविस्तर कथन केले.आता मुलांना उत्साह आला होता. आम्हाला प्रशस्त हॉल मध्ये बसवून वाद्यसामग्रींनी सुसज्ज असलेल्या स्टेजवर सगळीजण बसून प्रत्येकाने सुंदर सुंदर गाणी आमच्यासमोर सादर केली. चेतन तर सिंथेयाझर उत्तम वाजवतो.कुणी ढोलकी,कुणी तबला असे तरबेज .आणि स्वरज्ञान उत्तमच कुठे अडखळण नाही की कुठे निराशा नाही.आम्हाला गाणी ऐकवण्याची अहमहमिकाच लागलेली होती. छोट्या१०वर्षाच्या विजयने तर कमालच केली टाळ्यांच्या रिदमवर जणगणमन इतक सुंदर वाजवल की ,स्वरही फिके पडावेत!... अस माझ्या ऐकण्यात आहे दृष्टीहिनांचा  low scale -m5 इतका स्ट्राँग असतो म्हणून दृष्टीहिनांचा कल गाणं,वादन संगितादी कलेकडे असतो. जसे रविंद्र जैन ,प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यासारखी थोर मंडळी माहितीचआहेत.
   ............नंतर त्या सगळ्यासोंबतच आम्ही जेवणाचाही आस्वाद घेतला आणि आम्ही आणलेली फुल नाहीपण फुलाची पाकळी भेट त्यांच्या सुपूर्द केली. ह्यात आमचा अजिबातच मोठेपणा नाही खरतर त्याबदल्यात आम्हीच त्यांकडून बरच घेऊन चाललो होतो. परतिच्या वाटेला पुन्हा भेटण्यासाठी!


        कळ्यांचे फुलणे माहीत होते
        नव्हते माहीत अंधार असा
         चालत चालत काटे उचलत
            वाटा झाल्या प्रकाशमान !
            वाटा झाल्या प्रकाशमान!!!

@अर्चना मुळ्ये.

Saturday, November 9, 2019

बहुरूपिणी दुर्गा भागवत, चरित्र आणि चित्र.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक शब्दात अंजली कीर्तने मॅडम नी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांची मेहनत अगदी प्रत्येक पानावर जाणवते. लायब्ररीतून आणून वाचले आणि सरळ विकतच घेतले. संग्रही ठेवावे असे पुस्तक.
पुस्तक दुर्गा भागवत यांच्या जीवनावर लघुपट तयार करण्यात आला तेव्हाच लेखिका अंजली कीर्तने यांनी त्या लघुपटाचा प्रवास कसा झाला हे सोबत सोबत लिहून ठेवले. ते हे पुस्तक! मला तर लेखिकेच्या अभ्यासाची कमाल वाटते. दुसरं म्हणजे दुर्गाबाईंवर लघुपट बनवला त्यासाठी लेखिकेचे आभार कारण त्यामुळे इतके छान पुस्तक वाचायला आणि संग्रही ठेवायला मिळाले. किर्तने मॅडमनी आनंदीबाई जोशी , पं. द. वि. पलुस्कर यांचेवर पण लघुपट तयार केले आहे. बरेच पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची ग्रंथसंपदा विविधांगी आणि भरपूर आहे. त्यात चरित्र, लघुकादंबरी, बालकादंबरी, कथासंग्रह, प्रवासवर्णन, लघुपटाची रोजनिशी, वेगवेगळ्या वृत्तपत्रात सदरलेखन, पाऊलखुणा लघुपटाच्या आणि संशोधनपर लेख इत्यादींचा समावेश आहे.
लेखिकेच्या बुध्दीमत्तेला आणि जिद्दीला सलाम!
पुस्तकाची मांडणी पण खूप छान केली आहे. त्यामुळे दुर्गाबाईंचे साहित्य, त्यांचे कार्य, त्यांनी घेतलेली मेहनत, बुध्दीमत्तेचं तेज, अभ्यास सर्व सर्व अगदी व्यवस्थित समजतं. दोन भागात विभागून केलेली मांडणी एकदम पर्फेक्ट आहे. शेवटी 7 परिशिष्ट आहे आणि एक संदर्भ सूची आहे. वरवर नजर टाकली तरी लगेच लक्षात येईल की ती पण किती व्यवस्थित, अचूकपणे दिली आहे. परिशिष्ट सुध्दा वाचनीय झाले आहे. अंजली कीर्तने यांच्या दुर्गाबाईंवरील प्रत्येक लेखाच्या शेवटी स्वतंत्र संदर्भ दिले आहेत. त्या विशिष्ट लेखासाठी कोणती पुस्तके रेफर केली आहे. इतकं परिपूर्ण पुस्तक मी तरी पाहिले नव्हते. त्या प्रत्येक लेखातला सच्चेपणा मनाला भिडतो. दुर्गाबाईंचे आख्खे साहित्य आपल्या संग्रही ठेवण्याचा मोह होतो.
पुस्तक हातात घेतल्यावर मी कितीतरी वेळ ते बघतच बसले. बहुरूपिणी दुर्गा भागवत चरित्र आणि चित्र. दुर्गबाईंचा तरुणपणीचा  ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. फक्त त्यांचं नाव इंद्रधनुष्याचे रंग असतात तसं लिहिलं आहे.  पुस्तक इतकं ताज आहे की मागच्या वर्षी 1 जुलै 2018 ला पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. इतकं ताज पुस्तक हातात घेण्याचा माझा अनुभव पण पहिलाच असल्याने मला त्याच अप्रूप वाटलं. आनंदही झाला आहे.
मनोगत, ऋणनिर्देश हे देखील वाचनीय. काही वाक्ये इथे सांगायचा मोह आवरत नाहीये. "लघुपटनिर्मितीला चालना मिळाली तेव्हा दुर्गबाईंच्या आयुष्याची भैरवी सुरू झाली होती. आणखी थोडा जरी उशीर झाला असता तरी दुर्गाबाई माझ्या हातातून निसटून गेल्या असत्या. माझ्या आयुष्यात कॅमेरा आला म्हणून लेखणी नाउमेद  नाही झाली. या तरल मनाच्या मित्रानं शिपडलं तिच्यावर जादूच पाणी. तिला गवसली चित्रवाणी. मी जगावं कॅमेर्‍याच्या डोळ्याशी भिडवून माझा मनःचक्षू आणि तिनं नोंदवावा प्रवास माझा, असा झाला होता अलिखित करार आमचा. डोळ्यांचा कॅमेरा केल्यावर आजवर अंधुक असलेल्या काही प्रतिमा रेखीव आणि स्पष्ट झाल्या. जीवनप्रीतीनं रसरसलेल्या या शब्दकळावंतीची शतरंगी रूपं पाहून मी मोहरून गेले. ही रूप मी लघुपटात टिपली. सव्वातासाचा लघुपट म्हणजे त्यांच्या जीवनकार्याची आणि मनोज्ञ रूपांची झलक होती. लघुपट पूर्ण झाला तरीही अजून दुर्गाबाईंबद्दल मला खूप काही सांगायचं शिल्लक होतं."
पुस्तकाची दोन भागात विभागणी केली आहे. ती अशी - पहिला विभाग चरित्र आणि दुसरा विभाग चित्र! चरित्र मध्ये दहा भाग. लेखिकेच्या स्मृतीतील दुर्गाबाई आपल्याला भेटतात. लेखिकेच्या कॉलेज जीवनातील भेट ते लघुपटासाठी पहिल्यांदा जेव्हा दुर्गाबाईंना भेटल्या तो प्रसंग आहे. त्या प्रसंगाचे वर्णन - ओठाजवळच्या चुण्या हलल्या. ओठापासून डोळ्यापर्यंत मंदस्मिताची झुळूक पसरली. सुरकुत्यांचं कमळ हसलं. विस्मृतींमधून लोप पावणाऱ्या त्यांच्या स्मृती प्रवाहात मला वाळूच्या कणाएवढंही स्थान असायचं कारण नव्हतं;पण कोणीतरी आपल्याला भेटायला आलं आहे, याचा त्यांना आनंद झाला. स्मृतीभ्रंशांनंतर माणसं दुरावली. नातेसंबंध विरून गेले. वेढून उरलं ते हरवलेपण, एकटेपण, आजारपण. त्यांनी अनुवादित केलेल्या "पो - चू" कवितेच्या ओळी लेखिकेला आठवल्या. "जर शिकलो नसतो मी ताठ बसण्याची नि विस्मरणाची कला
तर कसा सोसला असता मी हा निव्वळ एकटेपणा?"
त्यांच्या सतेज मनाची निशाणी म्हणजे वृध्दत्वाच्या ऐन बहरात त्यांनी लिहलेली नितांतसुंदर कविता - देहोपनिषद.
आयुष्याची झाली रात| मनी पेटे अंतर्ज्योत ||
भय गेले मरणाचे | कोंभ फुटले सुखाचे ||
अवयवांचे बळ गेले |काय कुणाचे अडले ||
फुटले जीवनाला डोळे |सुख वेडे त्यात लोळे ||
मरणा तुझ्या स्वागतास | आत्मा आहे सज्ज ||
पायघडी देहाची ती | घालुनी मी वाट पाही ||
सुखवेडी मी जाहले |देहोपनिषद सज्ज झाले ||
"फोटोसेशन च्या वेळी त्यांच्या समोर पॅड ठेवलं नि त्यांच्या हातात पेन दिलं. लेखणीच्या स्पर्शाने त्या मोहरल्या पण खंतावल्या न उमटणार्‍या शब्दांमुळे! तुमचा अनुभव घेताघेता मला कविता स्फुरल्या ; याचं मला खूप समाधान आहे." असं लेखिका म्हणतात. "जाण्यापूर्वी " या कवितेनेच लेखिका अंजली कीर्तने यांनी हा स्मृतींचा प्रवास थांबवला. "जाण्यापूर्वी काही तरी देऊन जाईन, माझं मी पण या इथे ठेवून जाईन.
माझ्यामागे येणार्‍यांनो इतुकंच करा, पुस्तकाची जुनी पानं उलटून वाचा.
निजलेला शब्दार्थ मनी पुन्हा जागा करा, उद्याच्या आकाशात मला मुक्त करा.
भूमीमध्ये पेरते मी जादूच्या या बिया, उगवत राहीन मी शब्द शब्द माझी काया.
जाण्यापूर्वी काही तरी देऊन जाईन, माझं मी पण या इथं ठेवून जाईन.
असा हा स्मृतींचा प्रवास त्यांचा जन्म, बालपण, त्यांची घरं, शिक्षण, कार्य, त्यांचे परिश्रम, चिकाटी, धैर्य सगळे सगळे प्रसंग वाचताना आपल्याला त्या त्या काळात घेऊन जातात. असे 10 प्रकरण आहे. प्रत्येकाबद्दल लिहणे शक्यच नाही.
चित्र विभागात त्यांच्या अनेक गुणांवर, बहुपेडी व्यक्तीमत्वाबद्दल अनेक प्रसंग सांगितले आहे. उदाहरणार्थ सौंदर्यासक्त या हेडिंग खाली रंगधुंद, नादलुब्ध, सौरभप्रेमी असे उपप्रकरण जोडले आहेत. तसेच भाषाभगिनी, रांधणप्रेमी, पूर्णा, शब्दकळावंती इत्यादि. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविले आहे.
डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नेमक्या शब्दात या पुस्तकाचा सारांश मागच्या पानावर लिहिला आहे. तो इथे सांगितल्या शिवाय पुस्तक किती वाचनीय आहे आणि संग्रही ठेवावे असे आहे ते समजणार नाही.

अंजली