नाही, अजिबात नाही. चित्रपटाविषयी नाही लिहिणार आहे. मला माहीत आहे, चांगला चित्रपट होता हा आणि रितेश देशमुख च्या कामाचं कौतुकही झालं होतं. :पण मी नाही पाहिलाय सिनेमा.
व्हिलन, हा विषय तसा मनात चार सहा दिवसापासून घोळतच होता. तशातच नेमके ह्या वेळी 'चला, हवा येऊ द्या च्या सेलिब्रिटी पॅटर्न' मध्ये नेमका हाच विषय घेतला गेला. मग पक्के ठरवले की ह्या वेळी ब्लॉग लेखनासाठी "व्हीलनचीच " निवड करावी. असो. आपण ह्या ठिकाणी ह्या विषयाची 'डार्क बाजू' विचारात न घेता ( वास्तवातील खरे खुरे व्हिलन) फक्त मालिका, चित्रपट, वेब सिरीज ह्यातील व्हिलन विषयीच विचार करूया. तसे 'कल्पनेतील व्हिलन देखील असतातच, जसे कल्पनेतील हिरो असतात,तसे;आपणच निर्माण केलेले,किंवा आपल्या मानसिकतेतून निर्माण झालेले. आपण आपल्या सामान्य पातळीवरच विचार करूया.
' डेली सोप' मालिका पाहणाऱ्या वर्गाचा ह्या 'व्हिलन' शी सतत संबंध येत असतो. कारण बहुतेक मालिकातून मग त्या मराठी असोत वा हिंदी 'एक व्हिलन' असल्याशिवाय मालिका बनतच नाही ;किंबहुना ती पुढे सरकतच नाही. प्रेक्षकांनाही त्याशिवाय मजा येत नाही बघायला. परवा च्या 'सेलिब्रिटी पॅटर्न' च्या भागात व्हिलन ची भूमिका करणारा म्हणतो, ' व्हिलन नसेल तर हिरो लाही काही किंमत रहाणार नाही. ' 'पोह्यांमध्ये मिरची नसेल तर पोहे कसे लागतील?' पण मिरचीला पर्याय तरी आहे, लाल तिखटाचा. मिठाला पर्यायच नाही हो. मीठ नसले तर अन्न कसे अळणी, बेचव लागते, तसेच व्हिलन नसलेल्या मालिका प्रेक्षकांना मिचमीचीत, गुळमुळीत वाटतात. आजारी माणसाला दिलेल्या खाद्य पदार्थ सारख्या. आणि चोखंदळ आणि करमणूक हवी असणाऱ्या प्रेक्षकाला चमचमीत च पहायला आवडणार,हे साहजिक आहे. काहीतरी उत्कंठावर्धक, थरारक किंवा उत्सुकता वाढवणारे कथानक ही प्रेक्षकांचीच मागणी असते. व्हिलन च नसेल तर नायक/नायिकेला छळणार तरी कोण? त्यांना सहानुभूती मिळणार तरी कशी? सुरळीतपणे सुरू असलेल्या आयुष्यात किंवा आनंदी जीवनात खोडा घालणार कोण? आणि मग एक दिवस सगळं काही छान होणार ही 'वेडी आशा' लावून बसलेले प्रेक्षक शेवटपर्यंत त्या मालिकेला चिकटून बसणार तरी कसे? पण गमंत अशी की ह्या काल्पनिक मालिकांमध्ये प्रेक्षक इतके गुंतत जातात की कधी चुकूनही ही मंडळी समोर दिसली तरी त्यांचा राग राग करतात. (वास्तव जीवनात ही मंडळी खरोखर सज्जन असते, असा खात्रीशीर समज असतो.) एकीकडे ह्या व्हिलन चा रागही येतो. कधी ह्याला धडा शिकवला जातो आणि कधी सगळं ' ऑल वेल' होतं ह्याची प्रेक्षक वाट पहात असतात आणि दुसरीकडे ह्याच्या अगदी विरुद्ध भावनाही असतात. एखाद्या मालिकेतून व्हिलन काही काळापुरता 'बाद' झाला, तर तेही चालत नाही. "त्या राणा च्या सिरीयल मध्ये काही मजा राहिली नाही आता. ती नंदिता होती तोपर्यंत काहीतरी बघायची उत्सुकता तरी होती" किंवा "घाडगे & सून" मध्ये 'कियारा ' खरोखर सुधरली तर संपलीच मग मालिका. पुढे काय अर्थ आहे बघण्यात'? आशा प्रकारची विधाने सार्वजनिक ठिकाणी सर्रास ऐकायला मिळतात (अर्थात महिला मंडळ) , पण ही व्हिलन मंडळी खरेच सुधरली की तात्पुरती सुधारल्याचे नाटक करताहेत हे बघणे देखील गमतीशीर आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या कुठल्या त्या पाचकळ मालिका त्यात कसली आलीये गंमत बिंमत? आता विनोदबुद्धीने पाहिले की झाले. तर ज्यावेळी व्हिलन मंडळी माफी वगैरे मागते, उपरती झाल्याचे दाखवते, पण फक्त प्रेक्षकांना कळेल अशा रितीने मान वेडी वाकडी फिरवणे, डोळे उगाचच बारीक किंवा अति मोठे करून कधी ह्या बाजूला तर कधी त्याबाजूला गरगर फिरवणे चेहऱ्यावर छद्मी हास्य आणणे असले येडे चाळे करते तेव्हा ती तात्पुरती सुधरली किंवा मालिका अजून लंबी खेचणार हे ओळखावे. आणि व्हिलन मंडळींच्या चेहऱ्यावर फक्त शांत, सौम्य भाव दिसले माफी मागताना की मग ती खरोखर (finally) सुधरली असे खुशाल समजावे . अर्थात, आता मालिकेचा 'द एन्ड' जवळ आलाय हे ओघाने आलेच. पण ह्या अत्यंत कठीण गोष्टी समजायला देखील अभ्यास लागतो बरे. आमच्या सारखी जाणकार ( रिकामी) मंडळी ताबडतोब ओळखू शकते असे प्रकार. मग काय तर, मी देखील बघते हो, काही ठराविक मालिका नियमित बघते. आज नाही जमले तर उद्या रिपीट टेली कास्ट बघते पण बघते जरूर. त्यामुळे अंदाजही बऱ्यापैकी बरोबर असतात. 
माझी मुलं नेहमी म्हणतात, काय मॉम, असल्या रटाळ मालिका पहात असतेस, रडक्या आणि बोअरिंग. त्यापेक्षा नेटफ्लिक्स वर कसल्या एकापेक्षा एक सिरीज असतात, त्या बघत जा. पण माझ्यासारखी जेष्ठ मंडळी एका जागी बसून चॅनल बदलायचेही फारसे कष्ट घेत नाही तर चार ठिकाणी फिरून कशाला जिवाला त्रास करून घ्या. पेक्षा जे आतापर्यंत पहात आलोय तेच पहात रहावं ,झालं. नाही म्हणायला मध्यंतरी लेकीच्या सूचनेनुसार बघितल्या काही वेब सिरीज. 'मॉम & कंपनी' म्हणून फक्त 10 एपिसोड ची मालिका
पण मस्त होती. नो व्हिलन, नो फॅमिली drama ,नो मिरची मसाला --- मुलगा आणि आई ह्यांच्यातील भावनिक गुंतवणूक आणि समजून उमजून एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती. दर्जेदार मालिका, चित्रपट पहायला कुणाला नाही आवडत; पण आता गुणवत्ता कमी झालीये आणि संख्या वाढलीये कार्यक्रमांची. फार पूर्वी म्हणजे 10 ते 12 वर्षांपूर्वी काही हिंदी मालिका खूप चाललेल्या. एकता कपूरच्या-- क पासून सुरू होणाऱ्या--- क्यूँकी--- , कहानी घर घर की ---, कसोटी जिंदगी की--- सारख्या. त्यात व्हिलन गिरी भरपूर असली तरी बघितल्या जात. अर्थात एका ठराविक मर्यादेपलीकडे गेली की कोणतीही मालिका बोअर व्हायला लागते हेही तितकेच खरे. त्याही अगोदर बुनियाद, हमलोग, तमस सारख्या दर्जेदार मालिका होत्या. पण तेव्हा इतके पर्याय पण नव्हते. आता विविध वाहिन्यांवर विविध प्रकारचे कार्यक्रम सतत सुरू असतात. त्यात तिथेही जीवघेणी स्पर्धा आहेच. त्यामुळे दर्जाचा विचार कमी आणि टीआरपी चा विचार जास्त करून केला जातो. देख भाई देख, हम पाच, साराभाई v/s साराभाई सारख्या व्हिलन नसलेल्या आणि निखळ करमणूक देणाऱ्या मालिका सध्या तरी पाहायला मिळत नाहीत. अशा वेळी कथा बाह्य कार्यक्रम जसे, सूर नवा सारख्या गाण्यांचा कार्यक्रम, हवा येऊ द्या सारखे विनोदी कार्यक्रम किंवा kbc सारखे मनोरंजनसोबत ज्ञान समृद्ध करणारे, माहितीची कक्षा विस्तृत करणारे कार्यक्रम बघणे जास्त चांगले. मला स्वतःला गाण्यांचा कार्यक्रम पहायला फार आवडतो. सध्या सोनी वर एक नवीन मालिका सुरू झालीये, 'मेरे डॅड की दुलहन' सध्या तरी बरी वाटतेय.
पण शेवटी हेच म्हणावे लागते की मालिका म्हटली की व्हिलन हवाच . आणि हाच 'व्हिलन गिरीचा' खेळ बघत असताना हेही जाणवतं कैकदा की मुख्य नायक नायिकेपेकशा हे व्हीलनच भाव खाऊन जातात. बऱ्याच मालिकांमध्ये खलनायक, विशेषतः खलनायिका ह्या नायिकेच्या तुलनेत , दिसण्यात, अभिनयात सर्वच बाबतीत सरस वाटतात. इतकंच काय पण काही काही व्हिलन तर असे असतात की त्यांचा रागही येत नाही. काही विनोदी खलनायक देखील पहावयास मिळतात. ते दुष्टपणा करायला जातात आणि स्वतःचेच हसे करून घेतात. . असो.
मला तरी हा 'व्हिलन' प्रतिकात्मक स्वरूपाचा' वाटतो. म्हणजे बघा ना, आपण नेहमी म्हणतो, दुःखाचे दिवस फार काळ टिकून रहात नाही. रात्रीमागून दिवस, दुख्खा मागून सुख, हा नियतीचा नियमच नाही का? तसाच हा व्हिलन पण. तो येतो अडचणी घेऊनच; पण जातो तेही अडचणी घेऊनच. कहाणीतला व्हिलन 'संपला' म्हणजे सुखाचा मार्ग मोकळा झाला तसे आयुष्यातही असे एक नाही तर अनेक व्हिलन वेळोवेळी येतच असतात, आपली कसोटी पहायला? एकच व्हिलन नसतो मुळी आपल्या आयुष्यात. ह्या सगळ्या व्हीलन्स चा खात्मा करण्याचा प्रयत्न करतच आयुष्य पुढे जात रहाते, एखाद्या मालिकेसारखे------
त्यामुळे आपल्या जीवनात तरी आपणच असतो "रियल हिरोज' . संघर्षावर मात करणारे.
आणि हो, आपण जर स्वतःचं आत्मपरीक्षण करीत असू तर हे देखील ध्यानात येईल की आपणही कुणा ना कुणाच्या नजरेत व्हिलन असूच शकतो.
," we are all bad in
Someone's story.
पण वाईट वागणारे सर्वच व्हिलन नसतात. जेव्हा आपण केलेल्या वाईट कृतीची, कर्माची जाणीव होऊन खऱ्या अर्थाने उपरती होते, तो क्षण महत्वाचा.
" उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरले पाप
देह्यांत्ततपे पुण्यरूप, दुसरा जन्म जाला"
आयुष्यात सगळं चांगलंच घडावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य नसतं. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, मिळत नाहीत. धूप छाव चा खेळ चालूच रहाणार. तसे सगळी चांगलीच माणसे भेटतील अशी अपेक्ष्या ही करणे चुकीचेच नाही का? जगात वाईट प्रवृत्तीची माणसे आहेत म्हणून चांगल्या माणसांची किंमत आहे. मिर्झा गालिब च्या दोन ओळी आठवल्या त्या लिहिते आणि थांबते.
" खुदा की मोहब्बत को, फना कौन करेगा?
सभी बन्दे नेक हो, तो
गुनाह कौन करेगा?"
माणिक नेरकर
अकोला.
No comments:
Post a Comment