अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक शब्दात अंजली कीर्तने मॅडम नी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांची मेहनत अगदी प्रत्येक पानावर जाणवते. लायब्ररीतून आणून वाचले आणि सरळ विकतच घेतले. संग्रही ठेवावे असे पुस्तक.
पुस्तक दुर्गा भागवत यांच्या जीवनावर लघुपट तयार करण्यात आला तेव्हाच लेखिका अंजली कीर्तने यांनी त्या लघुपटाचा प्रवास कसा झाला हे सोबत सोबत लिहून ठेवले. ते हे पुस्तक! मला तर लेखिकेच्या अभ्यासाची कमाल वाटते. दुसरं म्हणजे दुर्गाबाईंवर लघुपट बनवला त्यासाठी लेखिकेचे आभार कारण त्यामुळे इतके छान पुस्तक वाचायला आणि संग्रही ठेवायला मिळाले. किर्तने मॅडमनी आनंदीबाई जोशी , पं. द. वि. पलुस्कर यांचेवर पण लघुपट तयार केले आहे. बरेच पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची ग्रंथसंपदा विविधांगी आणि भरपूर आहे. त्यात चरित्र, लघुकादंबरी, बालकादंबरी, कथासंग्रह, प्रवासवर्णन, लघुपटाची रोजनिशी, वेगवेगळ्या वृत्तपत्रात सदरलेखन, पाऊलखुणा लघुपटाच्या आणि संशोधनपर लेख इत्यादींचा समावेश आहे.
लेखिकेच्या बुध्दीमत्तेला आणि जिद्दीला सलाम!
पुस्तकाची मांडणी पण खूप छान केली आहे. त्यामुळे दुर्गाबाईंचे साहित्य, त्यांचे कार्य, त्यांनी घेतलेली मेहनत, बुध्दीमत्तेचं तेज, अभ्यास सर्व सर्व अगदी व्यवस्थित समजतं. दोन भागात विभागून केलेली मांडणी एकदम पर्फेक्ट आहे. शेवटी 7 परिशिष्ट आहे आणि एक संदर्भ सूची आहे. वरवर नजर टाकली तरी लगेच लक्षात येईल की ती पण किती व्यवस्थित, अचूकपणे दिली आहे. परिशिष्ट सुध्दा वाचनीय झाले आहे. अंजली कीर्तने यांच्या दुर्गाबाईंवरील प्रत्येक लेखाच्या शेवटी स्वतंत्र संदर्भ दिले आहेत. त्या विशिष्ट लेखासाठी कोणती पुस्तके रेफर केली आहे. इतकं परिपूर्ण पुस्तक मी तरी पाहिले नव्हते. त्या प्रत्येक लेखातला सच्चेपणा मनाला भिडतो. दुर्गाबाईंचे आख्खे साहित्य आपल्या संग्रही ठेवण्याचा मोह होतो.
पुस्तक हातात घेतल्यावर मी कितीतरी वेळ ते बघतच बसले. बहुरूपिणी दुर्गा भागवत चरित्र आणि चित्र. दुर्गबाईंचा तरुणपणीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. फक्त त्यांचं नाव इंद्रधनुष्याचे रंग असतात तसं लिहिलं आहे. पुस्तक इतकं ताज आहे की मागच्या वर्षी 1 जुलै 2018 ला पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. इतकं ताज पुस्तक हातात घेण्याचा माझा अनुभव पण पहिलाच असल्याने मला त्याच अप्रूप वाटलं. आनंदही झाला आहे.
मनोगत, ऋणनिर्देश हे देखील वाचनीय. काही वाक्ये इथे सांगायचा मोह आवरत नाहीये. "लघुपटनिर्मितीला चालना मिळाली तेव्हा दुर्गबाईंच्या आयुष्याची भैरवी सुरू झाली होती. आणखी थोडा जरी उशीर झाला असता तरी दुर्गाबाई माझ्या हातातून निसटून गेल्या असत्या. माझ्या आयुष्यात कॅमेरा आला म्हणून लेखणी नाउमेद नाही झाली. या तरल मनाच्या मित्रानं शिपडलं तिच्यावर जादूच पाणी. तिला गवसली चित्रवाणी. मी जगावं कॅमेर्याच्या डोळ्याशी भिडवून माझा मनःचक्षू आणि तिनं नोंदवावा प्रवास माझा, असा झाला होता अलिखित करार आमचा. डोळ्यांचा कॅमेरा केल्यावर आजवर अंधुक असलेल्या काही प्रतिमा रेखीव आणि स्पष्ट झाल्या. जीवनप्रीतीनं रसरसलेल्या या शब्दकळावंतीची शतरंगी रूपं पाहून मी मोहरून गेले. ही रूप मी लघुपटात टिपली. सव्वातासाचा लघुपट म्हणजे त्यांच्या जीवनकार्याची आणि मनोज्ञ रूपांची झलक होती. लघुपट पूर्ण झाला तरीही अजून दुर्गाबाईंबद्दल मला खूप काही सांगायचं शिल्लक होतं."
पुस्तकाची दोन भागात विभागणी केली आहे. ती अशी - पहिला विभाग चरित्र आणि दुसरा विभाग चित्र! चरित्र मध्ये दहा भाग. लेखिकेच्या स्मृतीतील दुर्गाबाई आपल्याला भेटतात. लेखिकेच्या कॉलेज जीवनातील भेट ते लघुपटासाठी पहिल्यांदा जेव्हा दुर्गाबाईंना भेटल्या तो प्रसंग आहे. त्या प्रसंगाचे वर्णन - ओठाजवळच्या चुण्या हलल्या. ओठापासून डोळ्यापर्यंत मंदस्मिताची झुळूक पसरली. सुरकुत्यांचं कमळ हसलं. विस्मृतींमधून लोप पावणाऱ्या त्यांच्या स्मृती प्रवाहात मला वाळूच्या कणाएवढंही स्थान असायचं कारण नव्हतं;पण कोणीतरी आपल्याला भेटायला आलं आहे, याचा त्यांना आनंद झाला. स्मृतीभ्रंशांनंतर माणसं दुरावली. नातेसंबंध विरून गेले. वेढून उरलं ते हरवलेपण, एकटेपण, आजारपण. त्यांनी अनुवादित केलेल्या "पो - चू" कवितेच्या ओळी लेखिकेला आठवल्या. "जर शिकलो नसतो मी ताठ बसण्याची नि विस्मरणाची कला
तर कसा सोसला असता मी हा निव्वळ एकटेपणा?"
त्यांच्या सतेज मनाची निशाणी म्हणजे वृध्दत्वाच्या ऐन बहरात त्यांनी लिहलेली नितांतसुंदर कविता - देहोपनिषद.
आयुष्याची झाली रात| मनी पेटे अंतर्ज्योत ||
भय गेले मरणाचे | कोंभ फुटले सुखाचे ||
अवयवांचे बळ गेले |काय कुणाचे अडले ||
फुटले जीवनाला डोळे |सुख वेडे त्यात लोळे ||
मरणा तुझ्या स्वागतास | आत्मा आहे सज्ज ||
पायघडी देहाची ती | घालुनी मी वाट पाही ||
सुखवेडी मी जाहले |देहोपनिषद सज्ज झाले ||
"फोटोसेशन च्या वेळी त्यांच्या समोर पॅड ठेवलं नि त्यांच्या हातात पेन दिलं. लेखणीच्या स्पर्शाने त्या मोहरल्या पण खंतावल्या न उमटणार्या शब्दांमुळे! तुमचा अनुभव घेताघेता मला कविता स्फुरल्या ; याचं मला खूप समाधान आहे." असं लेखिका म्हणतात. "जाण्यापूर्वी " या कवितेनेच लेखिका अंजली कीर्तने यांनी हा स्मृतींचा प्रवास थांबवला. "जाण्यापूर्वी काही तरी देऊन जाईन, माझं मी पण या इथे ठेवून जाईन.
माझ्यामागे येणार्यांनो इतुकंच करा, पुस्तकाची जुनी पानं उलटून वाचा.
निजलेला शब्दार्थ मनी पुन्हा जागा करा, उद्याच्या आकाशात मला मुक्त करा.
भूमीमध्ये पेरते मी जादूच्या या बिया, उगवत राहीन मी शब्द शब्द माझी काया.
जाण्यापूर्वी काही तरी देऊन जाईन, माझं मी पण या इथं ठेवून जाईन.
असा हा स्मृतींचा प्रवास त्यांचा जन्म, बालपण, त्यांची घरं, शिक्षण, कार्य, त्यांचे परिश्रम, चिकाटी, धैर्य सगळे सगळे प्रसंग वाचताना आपल्याला त्या त्या काळात घेऊन जातात. असे 10 प्रकरण आहे. प्रत्येकाबद्दल लिहणे शक्यच नाही.
चित्र विभागात त्यांच्या अनेक गुणांवर, बहुपेडी व्यक्तीमत्वाबद्दल अनेक प्रसंग सांगितले आहे. उदाहरणार्थ सौंदर्यासक्त या हेडिंग खाली रंगधुंद, नादलुब्ध, सौरभप्रेमी असे उपप्रकरण जोडले आहेत. तसेच भाषाभगिनी, रांधणप्रेमी, पूर्णा, शब्दकळावंती इत्यादि. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविले आहे.
डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नेमक्या शब्दात या पुस्तकाचा सारांश मागच्या पानावर लिहिला आहे. तो इथे सांगितल्या शिवाय पुस्तक किती वाचनीय आहे आणि संग्रही ठेवावे असे आहे ते समजणार नाही.
अंजली
No comments:
Post a Comment