Monday, April 13, 2020

अकोला मेरी जान

शीर्षक वाचल्यावर अकोल्यासारख्या शहरावर काय बरं लिहिण्यासारखं आहे ?  असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . माझ्या वडिलांची नोकरी बदलीची असल्याने दर 2,3 वर्षांनी आम्ही नवीन गावी जात असू. त्यामुळे प्रत्येक गावाच्या काही खास अशा आठवणी आहेत , कदाचित म्हणूनच ," आई तुला कोणतं गाव सगळ्यात जास्त आवडतं ? " ह्या माझ्या मुलानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही . तरीपण ' दिल के करीब ' म्हणावं असं गाव म्हणजे अकोला , कारण बालपणीचा सुखाचा काळ इथे गेला आहे . मी साधारण 6,7 वर्षाची असतांना आम्ही अकोल्यात आलो . ह्या आधी आपल्या काळातलं ' बालकमंदिर ' मोर्शी आणि इयत्ता पहिली अमरावती इथे पार पडलं होतं.  घराजवळची शाळा , मैत्रिणी ह्यामुळे मी पटकन अकोल्यात रमले . इयत्ता दुसरी ते सहावी अशी एकूण 5 वर्ष आम्ही इथे होतो भरपूर धमाल , खेळ ,मजा ,मस्ती सगळं मी इथे केलं . त्यामुळेच इथून जातांना खूप वाईट वाटलं . माझ्या शेजारी राहणारी माझी बालमैत्रीण आणि मी तर अगदी गळ्यात गळे घालून रडलो . नवीन गावात नंतर मी रुळले पण अकोल्याची आठवण मात्र वरचेवर यायची , माझे काका इथे राहत असल्याने वर्षातून एकदा तरी आमची चक्कर इथे व्हायची . पण ते 4,5 दिवसांचं येणं असायचं . आत्तासारखी तेव्हा काही मैत्रिणींची भेट व्हायची नाही .  बऱ्याचदा घरं माहित नसायची , फोन वगैरे असण्याचा प्रश्नच नाही . सुरवातीला पत्रं वगैरे पाठवणं व्हायचं मग हळूहळू ते ही बंद झालं . आमच्या ह्या बदली प्रकरणात एक अकोला सोडलं तर कुठल्याही गावात आमचे नातेवाईक नव्हते , म्हणजे नवा गाव नवी ओळख करायची आणि मग 2,3 वर्षांनी ती पाटी कोरी करून पुढे जायचं . माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे काका , मामा , मावशी असे कुणी ना कुणीतरी नातेवाईक गावात असायचे , मला त्यांचा फार हेवा वाटायचा . अकोल्यानंतर पुलगाव आणि पुलगावनंतर अमरावती अशी आमची बदली झाली आणि मग मात्र आम्ही अमरावतीला स्थायिक झालो . 

शाळा , कॉलेज हे झाल्यावर प्रत्येकीच्या आयुष्यात येणारा महत्वपूर्ण टप्पा म्हणजे ' स्थळ बघणे' माझ्याही बाबतीत सुरु झालं . अकोल्यातल्या माझ्या काकांचे कुटुंब माझ्यासाठी फार जवळचे होते लहानपणापासून मी त्यांच्याशी जोडले गेले होते , नवीन आलेल्या माझ्या दोन्ही वहिन्यांशी पण माझे सूर लगेच जुळले , वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं येऊ लागली तसं मी एकदा आईला म्हटलं , " माझं लग्न होऊन मी दुसऱ्या गावी गेले की माझ्याकडे आपले नातेवाईक फारसे येणारच नाहीत किंवा माझं सुद्धा त्यांच्याकडे जाणं कमीच होईल . " आपले आपल्याच लोकांशी असलेले संबंध आता कमी होत जाणार ह्या विचाराने खरं तर खूप वाईट वाटलं होतं . पण म्हणतात ना मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा धरली की ती इच्छा पूर्ण होते तसंच काहीसं झालं , लग्नासाठी इथलच स्थळ चालून आलं तेही भावाच्या ओळखीतलं त्यामुळे ' सोने पे सुहागा ' अशी माझी अवस्था झाली . एक चक्र जणू पूर्ण झालं , तब्बल 12 वर्षांनी मी पुन्हा एकदा माझ्या या लाडक्या शहरात आले . अर्थात आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं . बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या . लग्नानंतर कुठे बाहेर जात असतांना मला अचानक पॉप अप झाल्याप्रमाणे काहीतरी आठवे आणि मग मी नवऱ्याला , " अरे , इथे ते हे होतं नं ? , किंवा अरे हा रस्ता आता असा इकडून तिकडे जातो नं ? " असे प्रश्न विचारून बहुतेक भंडावून सोडत असे . शाळेत जातांना आपल्याला जो मोठ्ठा दवाखाना लागत होता तो म्हणजे ' लेडी हार्डिंग ' !!, किंवा ज्या  बँकेत एवढे पोलीस असतात हे बघून आपण घाबरलो होतो ती बँक म्हणजे ही स्टेट बँक मेन ब्रँच . आणि आईच्या नकळत ज्या बगिच्यात मैत्रिणींबरोबर खेळायला आलो होतो तो म्हणजे हा रामदासपेठ मधला टिळक पार्क !! ' असे माझे मला ' युरेका टाईप ' चे शोध लागत होते . पिकेव्ही मध्ये आता सुधीर कॉलनी कडून जो राजरस्ता झाला आहे तिथे मी लहान असताना एक रानटी झाडाझुडपांनी भरलेला भालामोठ्ठा खड्डा होता आणि आम्ही मुलं एक adventure activity म्हणून तो पार करून पिकेव्हीत घुसत असू किंवा रामदासपेठेत डॉ . श्रॉफ राहतात त्या भागात माझी एक मैत्रीण राहत असे जिच्याकडे मी शाळेतून परस्पर गेले होते आणि मग आईच्या हातचा मार खाल्ला होता हे अजूनही आठवते. 

           गावात नातेवाईक असण्याची माझी इच्छा ह्या शहराने पूर्ण केली . ' लोकल माहेर ' असं मी ज्याला म्हणते ते माझ्या काकांचं नांदत घर तर इथे होतंच पण थोड्याच काळात सख्खी झालेली अशी सासरची नातेवाईक मंडळी पण इथे होती .  ' हम दो हमारा एक किंवा हमारे दो ' असलेल्या आजच्या जमान्यात अशी नाती आजूबाजूला असावीत आणि आपण ती जपावीत असं मला प्रकर्षाने वाटतं . ते फार सोपं असतं .  माझ्या मुलाचं बालपण ह्या सगळ्यामुळे फार छान गेलं. 
नातेवाईकांच्या इतकेच जीवाभावाचे असतात ते मित्रमैत्रिणी . माझ्या नवऱ्याचं लहानपण  इथेच गेल्याने त्याला भरपूर मित्र आहेत पण मला देखील अतिशय मौल्यवान मैत्रिणी ह्या शहराने दिल्या ज्या  सुखदुःख वाटून घेणाऱ्या तर होत्याच पण आयुष्य समृद्ध करणाऱ्या होत्या , त्यांच्यामुळे मी बरंच काही शिकले . मोठ्या शहरात राहणाऱ्या माझ्या इतर मैत्रिणींना ह्याचा नेहमी हेवा वाटतो .  
         3,4 वर्षांपेक्षा जास्त कुठल्याच गावात न राहणाऱ्या मला आता इथे येऊन चक्क 20 वर्ष झालीत . ह्या 20 वर्षात एका लहान गावाचं रूपडं जाऊन एका महानगराचा आकार आलाय पण बाकी प्रगती फार नाही . इथे पाण्याची समस्या आहे , धुळीची समस्या आहे , काही मूलभूत सोयिंची कमतरता आहे , उज्वल भविष्याकडे नजर लावून बसलेल्या पुढील पिढीसाठी इथे काही नाही हे कटू असले तरी वास्तव आहे पण चायनीज , इटालियन डिशेस च्या बरोबरीने नाकातोंडातून पाणी काढणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर रमणारी आनंदी प्रजा जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत किंवा ' अबे , होते ना बे बराबर '  अशी मजबूत हिम्मत देणारे आवाज जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत ह्या शहराला मरण नाही  . 

           बालपणीच्या सुगंधित स्मृती सदैव ताज्या ठेवणाऱ्या ,  नातेवाईक आणि  मित्रमैत्रिणींच्या बाबतीत मला श्रीमंत करणाऱ्या , मॉल , मल्टिप्लेक्स अशी मनोरंजनाची कुठलीही आधुनिक साधनं नसणाऱ्या ह्या शहराने मला इथे रुजवलं हे मात्र खरं 

No comments:

Post a Comment