स्थळ-- वैकुंठ
देवी लक्ष्मी आणि श्री नारायण अगदी निवांत बसले आहेत.नारायण देवीला त्यांच्या अवतारांच्या कथा रंगवून सांगत आहेत आणि देवी त्या कौतुकाने ऐकत आहेत.एकीकडे देवांचे पाय चेपणेही सुरू आहे, तेही तन्मयतेने, न वैतागता.
विष्णुदेव: हा, तर कुठे होतो आम्ही?
लक्ष्मी देवी: "स्वामी, आपण दंडकारण्यात होतात आणि राक्षसांशी युद्धाच्या तयारीत---"
तितक्यात नारदमुनी प्रवेश करतात.
नारदमुनी:"नारायण$$ नारायण---
विष्णुदेव: "या मुनीवर. ह्या अवेळी येण्याचे प्रयोजन?"
नारदमुनी: "देवा, इकडे आपण राक्षसांच्या युद्धकथांमध्ये रमला आहात आणि पृथ्वीवर "तो महाभयंकर" राक्षस थैमान घालतोय. समस्त मानवजातीला त्राही त्राही करून सोडलंय त्याने. हाहाकार माजवलाय नुसता. तिकडे आपले लाखो भक्तगण संकटात आहेत आणि आपण इथे निवांतपणे। -----"
विष्णुदेव: "शांत व्हा, मुनीवर. इतके हायपर का होत आहात? कुंभ, निकुंभ, मारीच, खर, दूषण
यापैकी कुणी अवतार घेतलाय का पृथ्वीवर? आणि असल्यास आम्हाला कसे कळले नाही?"
नारदमुनी: "देवा, ते राक्षस तिन्ही लोकांवर राज्य करण्यासाठी युद्ध करत होते. त्या विलासी इंद्राला घाबरवण्यात त्यांना मजा येत असे. आणि त्यांच्याशी दोन हात करायला इथे स्वर्गात एकापेक्षा एक देवी देवता समर्थ आहेत. पण त्या पृथ्वीवर निर्माण झालेल्या राक्षसाने लोकांची झोपच उडवलीये हो. तो गरीब--श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, असा कोणताही भेद न पाळता, एकेकाच्या मानगुटीवर बसत चाललाय. काहीतरी करा प्रभो. "
विष्णुदेव: "मुनीवर, आता ब्रह्मदेव येतीलच इतक्यात. सृष्टी निर्माण केलीये त्यांनी, ती स्मूथली फिरत ठेवणे हे त्यांचं डिपार्टमेंट आहे. त्यांनाच विचारू या. देवाधिदेव महादेव पण पार्वती देवींसह कैलास पर्वतावरून निघाले आहेत. शिवाय इंद्रदेव शची देवींसह येत आहेत. सध्या सगळे जरा निवांत असल्याने आम्ही इथेच वैकुंठात "गेट टू गेदर" करायचं ठरलंय आमचं.आलाच आहात तर तुम्हीही जॉईन व्हा. कसे?"
नारदमुनी: "समस्त देवलोक गोळा होतोय? नवलच आहे. म्हणजे कुणालाच विषयाचं गांभीर्य दिसत नाही तर." (नारदमुनी चिंताग्रस्त)
विष्णुदेव: "मग काय, पृथ्वीवरली सगळी देवालये, मंदिरे ओस पडलीत नुसती. एक माणूस फिरकत नाही देवळात. आले तरी नाका तोंडाला फडके बांधून. गाभाऱ्यात इतकी भयाण शांतता,घंटेचा नाद नाही की तार स्वरातली आरती नाही, प्रार्थनेचे आवाज नाहीत की कुणाचा गोंधळ नाही--- आम्हालाच भीती वाटते कधी कधी तिथल्या वातावरणाची. भक्तांशिवाय मजा नाही हो मुनीवर मंदिरात. इतकी शांतता यापूर्वी आम्ही कधी अनुभवली नव्हती. कुणाचे काही मागणेही ऐकू येत नाही म्हणून मग आम्ही वैकुंठात येऊन बसलोय, निवांत. आम्हाला वाटलं सगळे भक्तगण सुखा समाधानात आहेत, कुणाची काही तक्रार नसावी."
नारद: "देवा, सगळी मंडळी घरात बसूनच आपला धावा करत आहेत. एरवी मानसपूजा भावते ना तुम्हाला? मग आता इतक्या भक्तगणांची बेंबीच्या देठापासून मारलेली (घरातल्या घरात) हाक कशी ऐकू येत नाहीये?"
विष्णुदेव: "मुनीवर, हृदयाची हाक ऐकून धावून जायला कुणी नाम्या, तुक्या, जनाबाई, चोखोबा अवतरलेत की काय पृथ्वीवर?" (नारद गप्प)आम्हाला सवय झालीये ती सतत कसली ना कसली तरी मागणी, गाऱ्हाणी ऐकण्याची. मंदिरातील उच्च स्वरातील प्रार्थना आणि आरतीची. मंदिरे सगळी ओस पडलीयेत मुनीवर."
नारदमुनी: "देवा, नुसती मंदिरेच नाही तर रस्तेही ओस पडलेले दिसताहेत.शुकशुकाट आहे नुसता. भयाण वाटताहेत रस्ते, मनुष्य प्राण्यांविना. पूर्वी प्राण्यांना रस्त्यावर यायला माणसाचे भय वाटत असे. आता प्राणी मजेत रस्त्यांवर फिरताना दिसतात आणि माणूस घरात कोंडलेला. जी माणसे जंगली प्राणी बघायला पैसे खर्च करून जायची तिथे आता हीच प्राणी मंडळी फुकटात मनुष्य प्राण्यांचे दर्शन घेताना दिसते, अगदी मजेत तेही. काहीतरी भयंकर घडते आहे देवा पृथ्वीवर. मी नुकताच फेरफटका मारून आलो ना पृथ्वीवर."
विष्णुदेव: "मुनीवर, मनुष्यप्राणी बुद्धिमान जीव आहे. आहे त्या परिस्थितीतुन मार्ग कसा काढायचा, हे त्याला बरोबर माहीत आहे. तुम्ही का इतके एक्साईट होता? बी कूल, मुनीवर. देवी, मुनींसाठी शीतल पेय घेऊन या." (देवी तत्परतेने जातात)
नारदमुनी: "देवा, मघापासून ऐकतोय, आपल्या तोंडी माणसाची भाषा?"
विष्णुदेव:" भक्तगणांच्या तोंडून ऐकून ऐकून पाठ झालंय आम्हालाही. आणि आपण आहातच की अधून मधून शिकवणी द्यायला. आपले राऊंड होतच असतात ना खालून वर, वरून खाली.(स्मित करतात.)
विष्णुदेव:"हं, आता जरा सविस्तर सांगा बघू, काय समस्या आहे नेमकी मानवाची."
नारदमुनी:" तिकडे पृथ्वीवर "विलगिकरण" सुरुये प्रभो."सोशल distancing" का काय ते मस्ट केलंय."
विष्णुदेव: "ते काय असतं आणि?"
नारदमुनी:" प्रभो, इकडे आपण गेट-टू-गेदर ची स्वप्नं पहात आहात; पण तिकडे मात्र लोकं एकमेकांपासून लांब पळताहेत. रस्त्यावर जा- ये करायलाही बंदी घातली गेली आहे. कसलाच गोंधळ नाही, पार्ट्या नाहीत, वाहनांची गजबज नाही. हॉटेल्स, मॉल्स, सगळं ओस पडलंय. रस्त्यांवर वाहने नाहीत त्यामुळे प्रदूषण कमी झालंय, अपघात कमी झालेत -- पर्यावरण शुद्ध होतंय, स्वच्छता,शांतता दिसतेय --पण ह्या गोष्टींचा आनंद मानावा की दुःख तेच मानवाला कळत नाहीये. कुणी कुणाला भेटत नाहीये त्यामुळे ना कसले वाद, ना कसली भांडणे. अहो, खून, मारामाऱ्या, दहशत यासारखे गुन्हेही घाबरून मागे पडले आहेत. ही चांगली बाब की वाईट हे तर मलाही कळेनासे झालेय."
विष्णुदेव:"आणि तुम्हाला वाटतं, हे सगळं त्या महाभयंकर राक्षसामुळे होतंय? मग तर तो "सज्जन राक्षस"असला पाहिजे.(मुनी कपाळावर हात मारून घेतात.)
नारदमुनी: "देवा, सगळं अघटित घडतंय, कळत कसं नाहीये तुम्हाला? लोकं अचानक खूप शहाण्यासारखी वागू लागलीत. स्वच्छतेचे नियम पाळू लागलीत, लोकांना शिस्तीची सवय लागतेय, बरीच मंडळी रातोरात स्टार व्हावं तशी "अध्ह्यात्मिक" वगैरे झालीये. एकमेकांना काळजी घ्या म्हणताहेत(अर्थात दुरूनच), अध्यात्मचे पाठ पढ वले जाताहेत, योग विद्याचं महत्व अचानक वाढू लागलंय---थोडक्यात माणसं अंतर राखून एकमेकांना सल्ला द्यायचे काम करत आहेत. त्यातही अति विद्वान, बुद्धिमान ज्याना सतत लोकांना उपदेश,ज्ञान द्यायची सवय असते, त्यांनी तर दुकानेच उघडली आहेत, तेही मोफत. त्यात उलट-सुलट, खरे-खोटे सगळेच पीक पिकतेय."
विष्णुदेव:"मुनीवर, हे उलट सुलट सांगणारे तुमचेच वंशज असणार.(मिस्कील पणे खेचतात) तुम्ही फेरफटका मारायला जातात तेव्हा काहिनाकाही पेरून येतच असाल ना? आणि तुम्ही म्हणता ते सगळे चांगलेच बदल आहेत की. माणूस बदलतोय हळूहळू का होईना. गुड."
नारदमुनी: "कसलं गुड देवा. एरवी बेंबीच्या देठापासून ओरडणारी विद्वान मंडळी, जी तक्रार करत असे की माणसा माणसातला दुरावा वाढत चाललाय, संवाद कमी होत चाललाय, जग धावतय नुसतं. कुणी पैशाच्या मागे तर कुणी कशाच्या -- अचानक हीच मंडळी दूर दूर रहायचा सल्ला देत आहेत. आयुष्य ब्रेक लावल्यासारखं गचकन थांबलय म्हणताहेत. लांबूनच रामराम होतोय, स्पर्श टाळला जातोय.--ही सगळी लक्षणे कशाची देवा? माझ्या तर कल्पने पलीकडले आहे हे सर्व."
विष्णुदेव:" हल्ली बरीच राक्षस मंडळी पृथ्वीवर मोकाट फिरून धुमाकूळ घालताहेत, हे आलंय आमच्याही कानावर. पण तुम्ही जे कथन करत आहात ते काहीसे विसंगत वाटते आहे खरे."
नारदमुनी:" देवा, हा राक्षस इतका भयंकर आहे की त्याने भल्या भल्यांची बोलतीच बंद केलीये. त्याला "बाटलीत बंद" करण्यासाठी पृथ्वीवरील मोदी नावाच्या महामानवाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्याने त्याच्या देशालाच "बंदिवान" करून टाकले आहे. तुरुंगवास जणू. जेणेकरून तो राक्षस ह्या तुरुंगाच्या अभेद्य भिंती पार करू शकणार नाही. तो कधी लोकांना दिवे लावायला सांगतो तर कधी टाळ्या वाजवायला सांगतो. लोकांनीही व्रत वैकल्ये, उपास तापास, पारायणे सुरू केलीयेत. "
विष्णुदेव:" काय म्हणालात मुनीवर? राक्षसाला घालवण्यासाठी टाळ्या वाजवल्या? मग? घाबरला का तो राक्षस? हा मनुष्य प्राणी म्हणजे कमाल आहे बाकी. आम्हाला कसं सुचलं नाही कधी हे? तुमच्या त्या "महामानव " चं दर्शन घ्यावे लागते. असो. तर कुठे होतात मुनीवर तुम्ही?"
नारदमुनी: "पृथ्वीवरच होतो देवा. पण मानवाकडे एक गोष्ट मात्र "जादुई" म्हणता येईल अशी आहे बरं का. ज्यामुळे तो कोणत्याही संकटात असला तरी एकटा पडत नाही.ती गोष्ट जवळ असली की त्याला कशाचीच उणीव भासत नाही. एकमेकांना स्पर्श न करताही संपर्कात रहाण्याची जादू.
देवी:" ती कोणती मुनीवर?"(आतापर्यंत शांतपणे ऐकत असलेल्या देवींनी आश्चर्याने विचारले)
नारदमुनी: "गोष्ट कसली, जादुई यंत्रच म्हणाना. प्रत्येकाकडे एक चौकोनी डब्बा आहे, जो सतत त्याच्या हातात आणि डोळयांसमोर असतो. त्याच्याकडे पाहून, लोकं हसतात, खिदळतात, गप्पा मारतात. चॅटींग म्हणतात त्याला. त्यात म्हणे त्यांना बसल्याजागी पूर्ण जगाची माहिती मिळते.प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यातून ते सतत एकमेकांना ज्ञानाचे, उपदेशाचे डोस पाजत असतात."
देवी:" (मध्येच) मुनीवर, ते जादुई यंत्र कसं दिसतं? स्वामी, मलाही हवंय तसलं जादुई यंत्र. हा माझा हट्ट समजा हवं तर. मी आजपर्यंत कधी काही मागीतलाय का आपल्याकडे स्वतःसाठी?"
विष्णुदेव:" देवी, भलता हट्ट करू नका.तुम्हाला इथे स्वर्गात काय कमी आहे? तुम्ही स्वतः ऐश्वर्य सम्पन्न आहात. सगळी सुखे पायाशी लोळण घेत असताना त्या"भिकार" यंत्राची अभिलाषा कशाला?(लक्ष्मी रुसते) तिची नाराजी पाहून नारदमुनी म्हणतात," देवी, आपण इतक्यात कधी देवावर रुसून माहेरी निघून गेला होतात का? त्या यंत्रात असं देखील म्हटलं होतं की लक्ष्मी रुसून माहेरी जाते तेव्हा नारायण विष्णू च्या रुपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात आणि विष्णूचे सूक्ष्म रूप म्हणजेच "विषाणू" .
देवी:" अगबाई! हे देखील माहीत आहे त्या यंत्राला? देवा, आता तर मला ते जादुई यंत्र हवं म्हणजे हवंच."
विष्णुदेव:"देवी, तुम्ही ते यंत्र घेऊन बसलात तर स्वतःला त्यात हरवून बसाल, मग भक्तगणांनी कुणाकडे पाहायचं?(आणि माझे पाय कुणी बरं चेपायचे?) एक लक्ष्यात असू द्या देवी, मानवी यंत्र पृथ्वीवरच शोभून दिसतात. ती स्वर्गात आली तर स्वर्गाची पृथ्वी व्हायला वेळ कितीसा लागणार? एकवेळ पृथ्वीचा स्वर्ग झालेला केव्हाही उत्तमच पण स्वर्गाची पृथ्वी नको व्हायला."
नारदमुनी:" पण तुम्हाला सांगतो प्रभो, पृथ्वीवर देखील आपल्यासारखी माणसे आहेत बरे का. जे संकट काळात गरजू लोकांसाठी धावून जातात, स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्याची धडपड करतात. "अगदी देवासारखी".
विष्णुदेव:"आम्हाला अभिमान आहे अशा गुणवान, नीतिमान आणि सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या लोकांचा. चित्रगुप नोंद घेतच असणार त्यांची. "
नारदमुनी:" खरंय देवा. सध्या चित्रगुप्ता पेक्ष्या यमराजाचेच काम वाढलेले दिसतेय.त्या पृथ्वीवरील राक्षसाने कितीतरी लोकांना यम सदनास पाठवले आहे. काहींनी त्याच्या भीतीने स्वतःच स्वतःला यमाच्या हवाली केलंय. "
विष्णुदेव:"मग? ह्यावर उपाय काय?"
नारदमुनी:" मलाच काय विचारताय देवा? उपाय आपणच शोधून काढायचा. काहीतरी चमत्कार करा आणि वाचवा पृथ्वीवरील निष्पाप जीवांना. आता "चमत्कारच" काय तो घालवू शकेल त्या महा भयंकर राक्षसाला."
विष्णुदेव:" मुनीवर, अहो, तुम्हाला मी आधीच म्हटलंय, मनुष्य हा बुद्धिवान प्राणी आहे आणि मुख्य म्हणजे तो हार मानणाऱ्या तला नाहीच.
आताचा मानव हा चमत्कारावर विसंबून रहाणारा नाही तर स्वतःच्या बुद्धीवर आणि कर्मावर विश्वास ठेवणारा आहे. तर्कशुद्ध, विज्ञान निष्ठ दिशेने जाणारा आहे. तो नक्कीच यातून बाहेर पडेल, अगदी यशस्वीपणे. " (तितक्यात ब्रह्मदेव, महादेव वगैरे सर्व देवमंडळी प्रवेश करतात आणि एका सुरात बोलू लागतात)
"अगदी योग्य विधान केलंत नारायणा. मुनीवर, आपण सर्व मिळून पृथ्वीवर "देव" रूपाने मदत करणाऱ्या सर्वांसाठी पुष्पवृष्टी करूया आणि अखिल मानव जातीला आशीर्वाद देऊया.
"कल्याणमस्तु, शुभम भवतु" 


माणिक नेरकर.
No comments:
Post a Comment