स्वतःच रेस्टॉरंट सुरू करायचं अशी खूप दिवसांपासून सुभाष ची इच्छा होती.
शेवटी मे 2018 मध्ये 'ट्रीट रेस्टॉरंट' आम्ही सुरू केलं.सगळाच अनुभव नवीन असल्याने मी संध्याकाळी तिथे काउन्टर सांभाळायला जायचे.
बरेच ओळखीचे लोक तिथे भेटायचे. एका परिचितांनी विचारले ,'दिवसा मेडिकल शॉप अन संध्याकाळी इथे, कुठे जास्त आवडत?' क्षणाचही विलंब न लावता मी म्हंटल "अर्थात ट्रीट मधे !"
पटकन बोलून तर गेले पण मग माझं उत्तर मलाच खटकलं,काही तरी चुकल्यासारखं वाटलं.
25 वर्षाचा औषधी दुकानाचा प्रवास डोळ्यासमोर आला.
लग्नानंतर d.pharm.केलं ,त्यामुळे कॉलेज ला थेअरी आणि दुकानात प्रॅक्टिकल असं एकाच वेळेला सुरू झालं.
लग्नाआधी क्रोसिन व्यतिरिक्त कुठल्याही गोळीच नाव माहीत नव्हतं, त्यामुळे त्या औषधांच्या जंगलात गोंधळून जायला व्हायचं.शिवाय कोणाला चुकून भलतंच औषध दिल तर! ही भीती पण सतत मनात असायची.
दीर मानसोपचार तज्ञ आहेत ,त्यांच्या हॉस्पिटल समोर दुकान होत.
मानसोपचारासाठी येणारा रुग्ण म्हणजे पागल,त्याला धरून बांधून आणणार,हे मनात पक्क होत.कधी असे रुग्ण पाहिले नव्हते,फक्त ऐकलं होत.दुकानात येणारे रुग्ण नॉर्मल वाटायचे ,त्यामुळे हे पागल कसे असा मला प्रश्न पडायचा!
दोन तीन दिवसातच ,एका बाईला तिच्या नवऱ्याने धरून दवाखान्यात आणलं. तिनी बाहेरच गोंधळ घालणं सुरू केलं ,रस्त्यावर लोळण घेतली ,हातपाय झाडायला लागली,तिला कपड्याचीही शुद्ध नव्हती. ती ऐकत नाही पाहून नवरा तिला केसांना धरून फरफटत नेऊ लागला. त्यांची दोन लहान मूल केविलवाणी बाजूला उभी राहून हे सगळं बघत होती. हे सगळं मला खूपच नवीन होत. जाम भीती वाटली बघून.दिवसभर ते आठवून उदास वाटत राहील.
हे दृश्य मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही!
त्यानंतर, गेल्या वीस पंचवीस वर्षात, बेड्या घालून आणलेला,आई दवाखान्यात घेऊन येते म्हणून तिच्यावर चाकू उगारणारा,'माझे दागिने विकून पैसे दारूत उडवले,अन मला पागल म्हणून दवाखान्यात आणलं,'अस हंबरडा फोडून सांगणारा ,असे अन यापेक्षा भयानक अनेक रुग्ण बघितले. पण तरी, 'आता सवय झाली,काहीच वाटत नाही बघून' अस कधीच झालं नाही.आज ही अस काही बघितलं की मन उदास होत, तीव्रता कमी झाली हे मात्र खरं!
अजून एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे येणाऱ्या रुग्णांची गरिबी अन अज्ञान ! आजूबाजूच्या खेड्यांमधून इथे येणारे बरेचसे रुग्ण गरीब असतात. बराच पैसा तांत्रिक मांत्रिक वर खर्च करूनही काही फायदा झाला नाही की मग दवाखान्यात आणणार.मग महिन्याभराच औषध घ्यायला ही पैसे नाही, 8 दिवसाच औषध घेतलं तर ,परत गावाहून यायचा खर्च परवडत नाही, रुग्णा च एक दिवसाचही औषध बंद ठेऊन चालत नाही.अशा कात्रीत सापडलेले लोक बघून खूप त्रास होतो. बर,गोळ्या महत्वाच्या आहेत बाटली(टॉनिक) नेऊ नका ,असं याना कितीही जीव तोडून सांगितलं तरी, त्यांच्या दृष्टीने बाटली म्हणजे जणू अमृत! ती घेणारच त्यासाठी गोळ्या कमी कराव्या लागल्या तरी बेहत्तर!
यातले बरेचसे रुग्ण कधीही बरे होणार नसतात ,गोळ्या घेऊन स्टेबल राहतात. त्यामुळे वर्षानुवर्षे येणारे रुग्ण अन बरोबर येणारे नातेवाईक ओळखीचे होऊन जातात.दुकानात आल्यावर कधी हलकस स्मित तर कधी, 'मागच्या वेळेस आलो तेंव्हा तुम्ही दिसल्या नाही' ,अशी विचारपूस होते. काही तर
प्रेमाने शेतातली भाजी किंवा अजून काही आवर्जून घेऊन येतात.बरेच जण आपलं दुःखही शेअर करतात.दिलासा देण्याशिवाय आम्ही मात्र काहीच करू शकत नाही.
चार,पाच वर्षापूर्वी , क्रिटिकल केअर, रेटींना तज्ञ ,डेंटिस्ट, गायनॅकोलॉजिस्ट, फिजीशीयन असलेल्या हॉस्पिटल च्या बाजूला नवीन मेडिकल आम्ही सुरू केलं. तिथे जास्त गरज असल्याने मी पूर्ण वेळ तिकडे जायला लागले.दुकान बदललं ,रुग्णांचा प्रकार बदलला तरी बाकी गोष्टी तश्याच असतात.
क्रिटिकल केअर असल्याने दिवसातून 2,3 दा तरी,जोरजोरात सायरन वाजवत येणारी अँबुलन्स आणि रुग्ण दगावला म्हणून येणारे रडण्याचे आवाज हे तिथलं नॉर्मल दृश्य! रुग्ण सिरिअस झाल्यामुळे घाईघाईत आलो.पैसे नाहीत,उधार द्या, वाटलं तर माझी पोत ठेवा,अस गयावया करत म्हणणारे पण कॉमन! खरच खूप अस्वस्थ वाटत हे सगळं बघून ,पण आम्हाला पण उधार देण्याला काही मर्यादा असतात.
दिवसभरात येणारे शंभर दीडशे (रुग्ण अन नातेवाईक) लोक आणि प्रत्येकाचे येणारे वेगवेगळे अनुभव ह्यावर तर एक प्रबंध लिहिता येईल. खूप नमुने बघायला मिळतात.
डॉक्टरांकडे दोन तास थांबलेल्या रुग्णाला औषधासाठी मात्र दोन मिनिट थांबायचीही तयारी नसते.एखाद औषध नसेल तर आमचा उद्धार ठरलेलाच! अर्थात आजारपणामुळे रुग्ण अन नातेवाईक आधीच त्रस्त असल्याने आम्ही ही वाद न घालता ऐकून घेतो. काही रुग्ण डीसचार्ज मिळाला की पैसे देतो सांगून पैसे बुडवून निघून जातात ,तर काही उधार राहिलेले 10 ₹ सुद्धा गावातला माणूस इकडे येणार असेल तर त्याबरोबर पाठवतात. बरेच जण औषध घेण्याबाबत तर कायमच गोंधळलेले असतात,पूर्ण बिल बनल्यावर,'ह्या गोळ्या कमी करा घरी आहे बहुतेक,पैसे नाहीत हे पण कमी करा' अस करत करत पाच,सहा बिल बनवायला लावतात.गर्दीच्या वेळेला खूप चिडचीड होते पण......काय करणार!
एवढ्या वर्षात अजून एक जाणवलेला बदल म्हणजे डॉक्टरांबद्दल वाढत चाललेला अविश्वास आणि असंतोष ! रुग्ण मरण पावल्यावर तर , 'आपला पेशंट सकाळीच गेला असेल,उगीचच बिल वाढवायला आत्तापर्यंत ICU मधे ठेवलं अन एवढी मोठी औषध लिहून दिली, मेडिकल अन डॉक्टर ची मिलीभगत असेल, तेच औषध परत दुकानात आणून विकत असतील' अशा प्रकारचं संभाषण बिनदिक्कत आमच्यासमोर सुरू असत.संतापलेल्या त्या नातेवाईकांना आम्ही आमच्या परीने समजावतो.खर तर कोणीच डॉक्टर अस करत नाही (एखादा अपवाद असेलही).
थोडक्यात काय, मेडिकल स्टोअर मध्ये येणारे रुग्ण असो किंवा नातेवाईक, नेहमीच वैतागलेले ,दुःखी ,अन बरेचसे आयुष्याला कंटाळलेले असतात. नाही म्हणायला ,"बेटी हुई है" अस म्हणून बर्फी आणून देणारा आनंदी बाप, रुग्ण बरा झाला म्हणून मिठाई आणून देणारा नातेवाईक असे काही आनंदाचे क्षण ही कधी कधी वाट्याला येतात.
याउलट हॉटेल मधलं वातावरण! तिथे सगळे रिलॅक्स व्हायला येणार।वाढदिवस किंवा एखाद यश साजरं करणार.छान छान कपडे घालून ,(हे नयनसुख ही फार आनंद देत बर!) हसत खेळत जेवणार कुटुंब किंवा मित्र मंडळी यामुळे सगळं कसं 'आनंदी आनंद गडे 'असत! अशा वातावरणात राहायला कोणाला नाही आवडणार!
त्यामुळे ट्रीट मध्ये जास्त आवडत अस मी बोलून गेले खरी, पण डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधला दुआ असणारा,व थोडं का होईना रुग्णांच दुःख दूर करणारा, औषधी दुकानाचा व्यवसायच मला जास्त प्रिय आहे !
No comments:
Post a Comment