Monday, April 6, 2020

वृत्तांचे स्वभाव

मला लहानपणापासून कवितांची आवड आहे. विशेषत: कविता मोठ्याने म्हणायला फार आवडतं. शिवाय खूप कविता
तोंडपाठ असल्यामुळे नेहमी कविता म्हणायची फरमाईश होते आणि अशा वेळी साधारणपणे गेय कविताच निवडली जाते. कविता
गेय असली की ती एखाद्या वृत्तात, छंदात किंवा जातीत बांधलेली असते. शाळेत वृत्ते शिकवली त्यावेळी एखादा खजिनाच हाती
गवसल्याचा आनंद झाला होता मला. कोणतीही कविता घ्यायची, तिचं वृत्त/ छंद शोधून अक्षर, गण, मात्रा मोजणे, त्यांची मांडणी
अभ्यासणे यात फार मन रमायचं. हळूहळू एका वृत्तातील अनेक कविता माहीत झाल्या आणि मनात आलं, माणसांसारखे वृत्तांचेही
स्वभाव असतील का? त्या दृष्टीने मुद्दाम पाहायला लागल्यावर एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे वृत्तांचेही स्वभाव असतात.
असं बघा, काही वृत्ते लांबलचक असतात तर काही छोटीशी. चटकन काही सांगायचं असलं तर ही छोटीशी वृत्तं उपयोगी
पडतात. उदाहरणार्थ भुजंगप्रयात. बारा अक्षरांचे हे छोटेसे अक्षरगणवृत्त. या वृत्ताचे उदाहरण म्हणजे मनाचे श्लोक.

मना सज्जना भक्तिपंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे.

आता हे चालीत म्हणून पाहा. या चालीत उपदेश किंवा बोधप्रद लिखाणच बरं वाटेल की नाही?
दुसरं उदाहरण घेऊ या दिंडी वृत्ताचं. हे मात्रावृत्त आहे. याचं उदाहरण म्हणजे
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात!

या वृत्ताची चालच इतकी करुण आहे की यात दु:ख हीच भावना मांडलेली शोभते. यात प्रेम व्यक्त केलं तर ते वियोगातलं आणि
युद्धाचं वर्णन आलं तर ते पराभवाचं किंवा सामान्य सैनिकाच्या वाट्याला आलेल्या नाहक बलिदानाचं बरं दिसेल.
यापेक्षा थोडं मोठं वृत्त आहे शिखरिणी. एखाद्या गोष्टीची माहिती द्यायची असेल तर ती यात द्यावी.

महाराष्ट्री सृष्टी स्वविभव चतुर्मास मिरवी,
अहा ती मैदाने चिररुचिर येथे न हिरवी,
वहाती येथे न स्थिर गहन विस्तीर्ण तटिनी,
पहा सह्याचीच प्रखर गिरिराजी शिखरिणी.

मराठी मुलुखाची व्यवस्थित माहिती दिली आहे.
रोमँटिसिझमच्या काळात इंग्रजी कवितेत ओड हा एक लोकप्रिय काव्यप्रकार होता. यात काव्यविषयाला थेट संबोधून
कविता सुरु होते. एखाद्या व्यक्तीबद्दल/ वास्तूबद्दल/ वस्तूबद्दल/ नैसर्गिक घटकाबद्दल किंवा घटनेबद्दल प्रेम/ आदर/आपुलकी व्यक्त करणे
हा त्या काव्याचा उद्देश असतो. असं काव्य जर मराठीत लिहायचं असेल, तर पृथ्वी वृत्त सर्वात चांगलं वाटेल.

अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे;
असो खलहि केवढा, तवकृपे सुमार्गी वळे.
उणे पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी,
शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी.

मोठ्या वृत्तांचंही बघा. मंदारमाला सारखं वृत्त उदाहरणादाखल घेऊ. यात चार ओळींत एक पूर्ण गोष्ट सांगता येते.

जाया हरीच्या जरी ठेवित प्रीति, त्यांची परी रीति अत्याग्रही.
कोल्हाळ हो घोर, वेल्हाळ तो थोर, त्याला न तो घोर बालाग्रही .
द्याया सुखाराम राहूनि निष्काम देई घनश्याम ती मागणी-
मंदारमाला रमालाच लाभे, उभा वृक्ष तो सत्यभामांगणी!

पहा, अवघ्या एका कडव्यात कृष्णाच्या बायकांचं वर्णन, त्यांचे स्वभाव, स्त्रीहट्ट, कृष्णाची भांडण हाताळण्याची रीत आणि शेवटी
स्वत:ला हवं ते साधून घ्यायची हातोटी हे सगळं एका गोष्टीच्या माध्यमातून येतं.
असंच निवेदनात्मक शैलीला सोयीचं वृत्त म्हणजे शार्दूलविक्रीडित. १९ अक्षरांचं हे वृत्त मंगलाष्टकं लिहिण्यासाठी वापरलं
जातं. एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायला हे सोयीचं आहे .

स्वप्नी गाढ निमग्न भोज असता ये जागृती त्याजला;
पाहे सुंदर मंदिरात भरली चंद्रप्रभा सोज्वळा.
जैसी कुंदलता फुलून खुलते, ते स्थान शोभे तसे,
योगी तेथ कुणी लिहीत बसला भोजास तेव्हा दिसे.

संपूर्ण प्रसंग डोळ्यांपुढे साकार होतो.
चामर, पंचचामर यांसारखी वृत्ते देवांच्या अष्टकांसाठी राखीव असल्यासारखी वाटतात, तर ओवीतून लोक परंपरा तर
अभंगातून भक्ती वजा करणं जवळजवळ अशक्य वाटतं. उर्दूमध्ये गझल आणि शृंगार याचं अतूट नातं आहे, मात्र मराठी गझल विद्रोह
आणि नैराश्यही व्यक्त करते.
तर अशी ही वृत्ते नि असे त्यांचे स्वभाव. अर्थात हे फक्त माझं मत होतं. तुम्हाला पटतंय का?

No comments:

Post a Comment