Tuesday, April 14, 2020

हॉस्टेल के दिन भी क्या दिन थे (भाग 2)

VGS( वर्षा गर्ल्स हॉस्टेल) च्या G+2 ऱ्या माळ्यावर डाव्या हाताची शेवटची खोली मला मिळाली होती . त्या खोलीत माझ्या आधीच एक बिहारी मुलगी रिचा राहायला आली होती. विशेष म्हणजे तिचा प्रवेश सुद्धा M Sc (F And N ) म्हणजे माझ्याच विषयात होता. कुरळ्या केसांची बॉय कट असलेली रिचा खरं तर प्रथमदर्शी बरी वाटली (दिसतं तसं नसतं म्हणून तर...).
         पण मी सामान घेऊन खोलीत पोचले तेव्हा रिचा कुठेतरी गायब होती. पण आपा ने खोली उघडून दिली . त्याक्षणी तिथे अत्यंत उग्र दर्प आला ,सडलेल्या अन्नाचा. आपा तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली ,पण मला कळले नाही. खोलीच्या एका  कोपऱ्यात एक ताटली आणि एका अल्युमिनियम च्या भांड्यात खरकट पाणी होतं आणि त्यात अळ्या झालेल्या होत्या . मला एकदम मळमळ झाली . मी ती भांडी उचलून खोली बाहेर ठेवली . आणि माझे सामान मला दिलेल्या कपाटात आणि टेबल वर लावण्यात गुंतून गेले. 

           होस्टेलच्या नियमानुसार संध्याकाळी  फाटक बंद होण्याची वेळ उन्हाळ्यात 7, पावसाळ्यात 6.30 आणि हिवाळ्यात 6 वाजता असे. हॉस्टेल आणि कॉलेज चे फाटक एकच होतं . त्यामुळे कॉलेज मध्ये असलेल्या स्थानिक मुलींना सुद्धा त्या आधी बाहेर निघणे क्रमप्राप्त असे. आता तुम्हाला असं वाटू शकतं की 6 नंतर मुळात कोणी कॉलेज मध्ये थांबेलच कशाला? तर त्याचं असं होतं की कॉलेज मध्ये सतत काही ना काही research work सुरू असायचं त्यामुळे काही विद्यार्थिनी विशेषतः M. Sc., P. hd. च्या विद्यार्थिनी आवश्यकतेनुसार थांबायच्या पण त्यांना रीतसर अर्ज करावा लागायचा आणि 6 नंतर बाहेर जायचे असल्यास वॉर्डन च्या घरातून बाहेर पडावे लागायचे, पण फाटक उघडत नव्हते.आणि हो एकवेळ मॅडमच्या घरातून बाहेर येता यायचं पण वेळे नंतर बाहेरून आत जाणं केवळ आणि केवळ specific ठराविक कारणांसाठीच चालत असे. 
                 तर हा प्रपंच एवढ्यासाठी की ही रिचा day 1 पासून फाटक बंद होईपर्यंत फाटकाच्या बाजूला मुलांशी बोलत उभी असायची .आणि फाटक बंद होताना दिसलं की आत यायची ! तर झालं असं की माझ्या  हॉस्टेल मधील पहिल्या दिवशी जेव्हा रिचा खोलीत आली तीच मुळी ओरडा आरडा करत ! की माझी भांडी बाहेर कोणी काढली? तिचा आवाज खूप मोठा आणि dominating होता . मी तर घाबरलेच ! आणि त त प प करत कसं बस सांगितलं की वास येत होता म्हणून बाहेर ठेवले. त्यावर तिने मला भांडी आधी आत ठेवण्याचा हुकूम सोडला . मला हे सगळं खूपच नवीन आणि अपमानास्पद वाटलं . तरी मी गुमान ऐकलं . आणि रडत बसले. विचार करून मेंदू शिणला की या मुलीसोबत हॉस्टेल आणि कॉलेज मध्ये आपला निभाव कसा लागणार? 

     हॉस्टेल मधील इतर मुली रिचाची roommate म्हणून माझ्याशी फार बोलत नव्हत्या हे मला दोनच दिवसात लक्षात आलं. गावात माझी मावशी राहात होती जिला माझं होस्टेल मध्ये राहणं अजिबात पसंत नव्हतं . ती मला तिच्या घरी राहण्याचा आधीच खूप आग्रह करत होती . आणि काका आमच्याच विद्यापीठात कृषि विभागात प्राध्यापक होते. त्यांना 2 दिवसांनी  मी हॉस्टेल मध्ये घडलेला प्रकार सांगितला . त्यांनी वॉर्डन (स्वाती मॅडम)च्या यजमानांना (नागार्जुन सर ,जे काकांचे मित्र होते आणि veterinary कॉलेज ला प्राध्यापक होते) थोडी चौकशी  केल्यावर कळलं की ही रिचा अत्यंत कजाग ,कॉपी बहाद्दर आणि चोर आहे . ती B. Sc.पासूनच हॉस्टेल मध्ये राहात होती. पण ती सगळ्यांशीच भांडायची त्यामुळे तिच्या खोलीत कुणीच राहायला तयार नव्हते. त्यामुळे वॉर्डन देखील केवळ नवीन मुलींना पहिले तिच्या खोलीत पाठवत. मग नवीन मुली घाबरून पहिले 2-3 महिने तरी काही बोलत नव्हत्या . तोवर दुसऱ्या खोलीत जागा रिकामी झाली की मग त्या मुलीची रिचाच्या तावडीतून सुटका होई. 
पण सुदैवाने काकांनी वॉर्डन ला request करून मला दुसऱ्या खोलीत सामावून घ्यायला सांगितले. पण हॉस्टेल पूर्ण pack असल्यामुळे लगेच काही होऊ शकणार नव्हतं .तरी 8 दिवसांनी कळलं की पहिल्या मजल्यावरच्या एक खोलीतील veterinary च्या दोघींपैकी एक मुलगी internship साठी पुण्याला जाणार आहे पण तिचं सामान ती degree पूर्ण होईतो हलवणार नाही आणि ती तिच्या गरजेनुसार अधूनमधून राहायला येईल . त्यासाठी थोडं adjust करावं लागेल, या अटीवर त्या खोलीत मला जागा मिळणार होती. पण रिचा नावाच्या वादळापेक्षा हे खूपच सुसह्य होतं. 
         पण वाटत होतं तेवढं सोप्पंही नव्हतं ....... कारण त्या मुलींनी  वॉर्डन ला सांगितलं की 'आम्ही 2 दिवसांनी घरून आलो की नव्या मुलीला खोलीची चावी देऊ ,तुम्ही कशाला त्रास घेता ?' आणि इथेच घात झाला.... प्रत्यक्षात त्या मुली 2 दिवसांनी आल्या तर होत्या पण मी त्यांना ओळखत नव्हते आणि दुसऱ्या मुली सांगतही नव्हत्या की त्या कोण आहेत. पण खोलीला कायम कुलुपच दिसायचं ! मी आयुष्यात एवढी डोळ्यात प्राण आणून कुणाचीच वाट नसेल बघितली (अगदी नवऱ्याची सुद्धा) तेवढी ते कुलूप उघडण्याची वाट बघितली. शेवटी 8 दिवसांनी कंटाळून वॉर्डन ला सांगितलं , तेव्हा त्यांनी त्यांच्या यजमानांना ( ते दोघींपैकी एकीचे guide होते ) कॉलेज मध्ये त्या मुलींना निरोप द्यायला सांगितला . तर तिने त्यांनाही शेंडी लावली ,म्हणे 'चावी दुसरीकडे आहे ,ती संध्याकाळी आली की मी स्वतः मीनल ला बोलावून आणेन'. मला कळल्याबरोबर मी माझं चंबू गबाळ आवरून निरोपाची वाट बघत बसले. दरम्यान आवरतांना माझ्या असं लक्षात आलं की आपले 2 पुस्तक, 2 कोरे रजिस्टर,1 ताटली, 1 भांडं,1 स्लिप गायब आहेत . पण लक्षात येऊनही रिचाला विचारण्याची माझ्यात हिम्मत नव्हती. 
             पण हाय रे माझ्या कर्मा! .....तो दिवस आणि पुढील 4 दिवस पुन्हा त्या खोलीचं कुलूप काही उघडेना ! मी सकाळ-संध्याकाळ 6 ते 8 जिन्यात दबा देऊन बसले की निदान प्रातःविधीसाठी जातांना तरी दोघींपैकी एखादी दिसेल. पण व्यर्थ ! अगदी रडकुंडीला येऊन खुल जा सिम सिम..... म्हणायची वेळ आली पण दार काही उघडेना . शेवटी वॉर्डन नी हॉस्टेल च्या चौकीदार मामाला कुलूप तोडण्याचे आदेश दिले .आणि अहो आश्चर्य ! एक मुलगी घाईघाईने बाजूच्या खोलीतून निघाली  आणि आश्चर्याने गोड हसत मला म्हणाली "अरेच्चा! तू आहेस का मीनल ? अग, तू आम्हाला दिसलीच नाही आम्ही तुला खूप शोधलं ! ये ये आम्ही तुझी वाटच बघत होतो !' आता मात्र हसावं की रडावं मला काही कळेना ! काही का असेना रिचाच्या तावडीतून  अंशतः सुटल्याचा आनंद झाला .(कारण कॉलेज मध्ये आम्ही वर्गात 4 मुली होतो त्या पैकी एक, ती होतीच माझ्या राशीला)

      आता दहशतीच्या वातावरणातून निघून हॉस्टेल मधील रोमांचक जीवनाच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली होती.आता नवीन roommates कल्पना आणि माधुरी या 2 नवीन मैत्रिणींची ओळख हळूहळू होऊ लागली . माधुरी ला इंटर्नशिपसाठी पुण्याला जायला काही दिवस होते. त्यामुळे आम्ही तिघी जणी खोलीत राहात होतो. आमची आपसात ओळख व्हायला फार दिवस नाही लागले .अगदी  सातव्याच दिवशी त्या दोघींनी बंद खोलीचं रहस्य सांगितलं ! त्यांच्याच शब्दात " अग आम्हाला वाटलं त्या रिचाची roommate रिचासारखीच असेल. शिवाय आम्हाला संपूर्ण नवीन मुलगी तीही home science ची आमच्यात नको होती ,त्याऐवजी आम्ही आमच्या जुन्या मैत्रिणींपैकी एखादीला आमच्यात द्या अशी विनंती वॉर्डन ला करत होतो पण त्यांनी आमचं ऐकलं नाही, कारण तुझा वशिला थेट आमच्या सरांनी लावला होता . मग आम्ही दुसरी शक्कल लढवली आम्ही रात्री उशिरा खोलीत यायचो आणि आत गेल्यावर आमच्या मैत्रिणी बाहेरून कुलूप लावायच्या . सकाळी 5.30 पुन्हा आम्ही त्यांच्या खोलीत मुक्काम ठोकत होतो . त्यामुळे तुला खोलीला कायम कुलूप दिसायचं. पण कुलूप तोडणार म्हंटल्यावर आमचा नाईलाज झाला. पण आता आमच्या मनात तुझ्याविषयी काहीच किल्मिश नाही . तू आम्हाला एवढ्या लवकर आपलंसं करशील असं वाटलंच नाही " मग काय त्यानंतर आमची घट्ट मैत्री झाली . आणि हॉस्टेल मधील अतिशय सुंदर आणि रंजक प्रवासाची सुरुवात झाली. ......
                              क्रमशः

या चिमण्यांनो.....

नाशिकला रोज सकाळी उठवणार चिमण्यांचं झाड बघून गंमत वाटते . हो चिमण्यांचं झाडच ! सकाळी सहा ते
साडे सहाच्या दरम्यान गॅलरीतून दिसणार्‍या बाजूच्या घरातल्या फणसाच्या झाडावर असंख्य चिमण्यांचा
चिवचिवाट जागं करतो. थोड्यावेळानी सात साडेसात वाजेपर्यंत शांतता होते तसेच संध्याकाळी देखील साडेसहा
पावणे सातच्या दरम्यान परत एकदा चिमण्यांचं झाड जागं होतं आणि जणूकाही दिवसभराचा इतिवृत्तांत
एकमेकांना सांगून झाल्यावरच शांतता होते. तसेच माझ्या कार्यालय परिसरात देखील रोज संध्याकाळी एक
वाळक्या झाडावर चिमण्या चिवचिव करत असतात. तसे बुलबुल,पारवा, कोतवाल,विविध प्रकारचे सुर्यपक्षी
,भारद्वाज,क्वचित पोपट, वेडाराघू, हे दोन्ही परिसरात पुष्कळ प्रमाणात आहेत.आणि त्यातल्या चिमण्या ,सुर्यपक्षी
माझ्या किचन च्या खिडकीत नेहमी कोवळी गुलाबाची पाने, तुळशी ची पाने खायला येतात म्हणून मी
त्यांच्यासाठी भांड्यात पाणी आणि थोडे बाजरीचे दाणे ठेवते. सकाळी जेव्हा मी किचन मध्ये काम करत असते
तेव्हा त्यांचा मधुर चिवचिवाट मन प्रसन्न करतो.

नाशिकला मला चिमणींची संख्या खूप लक्षणीय वाटली आणि तसे माझ्या मैत्रिणीला मी बोलून देखील दाखवले
पण जेव्हा सहज गुगल वर एक लेख वाचण्यात आला तेव्हा कळले की नाशिक येथील मोहम्मद दीलावर यांनी
चिमणी संवर्धनाकरता विशेष प्रयत्न केल्यामुळेच ही स्थिती आज दिसते आहे. आणि त्यांच्या अथक प्रयनांमुळेच
जागतिक चिमणी दिवस 2010 पासून साजरा होण्यास सुरुवात झाली. कुतूहल वाटले आणि त्यांची माहिती
गुगलून काढली. मोहम्मद दीलावर हे नाशिक येथून पर्यावरणाचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा संबंध बॉम्बे
नॅचरल हिस्ट्री सोसायटी आला आणि 2009 पासून त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या कॉमन बर्ड
मॉनिटरिंग प्रोग्राम या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरी पर्यावरणातील नेहमी
आढळणाऱ्या 18 पक्षांची नोंद केल्या गेली. त्यात कबूतर, पोपट, राखी वटवट्या तसेच हुदहुद पक्षाचा समावेश
होतो. आणि यातूनच त्यांना नुसत्या चिमण्याच नव्हे तर इतर ही नेहमीच्या आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी
काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी पक्ष्यांसाठी बर्ड फीडर आणि कृत्रिम घरटे माफक किमतीत घरोघरी वाटले. त्यांच्या या प्रयत्नामुळे चिमण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यांना लहानपणापासूनच चिमण्यांचे विशेष
आकर्षण होते लहानपणी कशा चिमण्या सगळीकडे दिसायच्या सगळ्यांच्या घरामध्ये देखील चिमण्यांचं एखादं घर तरी असायचं जणू काही ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग होत्या आणि तसं म्हटलं तर दहा हजार वर्षापासून
चिमण्या या माणसाच्या सोबती आहेत. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमधील चिमण्या कमी होत आहेत यावर एक
वैज्ञानिक लेख वाचला आणि त्या अनुषंगाने भारतात काय परिस्थिती आहे याच त्यांना कुतूहल वाटले तेव्हा
त्यांना असं लक्षात आलं की यापूर्वी कधीही चिमण्यांच्या संख्येची मोजदाद केली गेली नाही किंवा इतर
साधारणपणे आढळणाऱ्या कुठल्याही पक्षांची मोजदाद केली गेली नाही आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी पण
कुठल्याही प्रकारचं कार्य आपल्या देशात केल्या गेल नाही आहे, तेव्हा त्यांनी या दिशेने काम करायला सुरुवात
करायचा निर्णय घेतला. हे काम करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा देखील पुरेपूर सहभाग मिळाला. जेव्हा
पूर्ण जग त्यांच्यावर हसत होतं तेव्हा त्यांचे कुटुंबीय मात्र त्यांच्या सोबत उभे होते. चिमण्या या निसर्गातील
नैसर्गिक इनसेक्ट कंट्रोलर आहेत. त्यांच्या पिल्लांचे ,किडे हेच खाद्य असते तसेच चिमण्या या भरपूर प्रमाणात
आढळत असल्यामुळे त्या देखील कुणाचातरी खाद्य असतात .आणि त्यांची संख्या जर कमी झाली तर
त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या देखील कमी होईल. निसर्गातल्या प्रत्येक घटक प्रत्येक प्राणी
अगदी मुंगी पासून हत्ती पर्यंत विशेषच आहे .एखादी प्रजाती समूळ नाहीशी होणे हे नैसर्गिक साखळी विस्कळीत
होण्याचे लक्षण आहे.

आज चिमण्या नाहीश्या होत आहेत कदाचित उद्या आपण देखील...... त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपण या अन्नसाखळीचा एक घटक आहोत आणि बाकीच्या घटकांवर आपले जीवन
अवलंबून आहे. इतर प्राणी, पक्षी माणसांशिवाय आनंदाने जगू शकतील पण माणूस मात्र , प्राणी ,झाडं ,पक्षी
यांच्या शिवाय जगूच शकणार नाही. त्यासंदर्भात त्यांनी चीनमधील माओ झेडोंग यांची गोष्ट सांगितली 1957
मध्ये जेव्हा तेथील हरितक्रांती निष्फळ ठरली त्याचा दोष त्यांनी उंदीर , माश्या , डास आणि चिमण्या यांच्यावर
ठेवला आणि जवळपास 200000 चिमण्यांना मार्च ते नोव्हेंबर 1958 मध्ये मारण्यात आले. खरंतर किडे हे
चिमण्यांचे भक्ष असल्यामुळे त्यांचा उपयोगच होत होता . पण या कत्तलीचा परिणाम व्हायचा तोच झाला.
किड्यांनी 1959 चा धान्याचा हंगाम पूर्णपणे खराब झाला, तसेच समाजातल्या दुबळ्या आणि गरीब
माणसांविरुद्ध ची हिंसा ही राष्ट्रीय हितासाठी म्हणजेच लोकांच्या हितासाठी आहे असं तिथल्या नवीन पिढीला
वाटू लागलं .आणि पुढे जाऊन 1960 ते 62 मध्ये दुष्काळाने चाळीस लाख चायनीज लोक मृत्युमुखी पडले.
भारतात मात्र आता चिमण्या विषयी जागरूकता वाढीस लागली आहे सरकारने देखिल याच यात लक्ष घातले
आहे दिल्ली राज्याला स्वतःचा असा राज्यपक्षी नव्हता. मोहम्मद दीलावर यांच्या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे
2016 मध्ये चिमणीला दिल्ली राज्याचा राज्य पक्षी म्हणून घोषित केले गेले. लोकांमधली जागरुकता देखील
वाढीस लागली आहे, चिमण्यांच्या संवर्धनासाठी ते पुढे येत आहेत.यामागे मोहम्मद दीलावर यांच्या संस्थेचे आठ
-दहा वर्षाचे अथक प्रयत्न आहेत ते मात्र याचे श्रेय लोकांना देतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी सहभाग
घेतल्यामुळे या योजनेला यश मिळत आहे लोकांना देखील यात आनंद मिळतो आहे जेव्हा ते पक्षांचे घरटे
पाहतात त्यांच्यात छोटे छोटे पिल्लू पाहतात तेव्हा त्यांना हे दृश्य मानसिक आनंद देते . निसर्ग संवर्धन हे
आनंदी आणि सहज करता येऊ शकेल असे आहे. त्यासाठी वैज्ञानिक किंवा फक्त सरकारी यंत्रणा काम करू
शकतात असे नाही तर सुजाण नागरिक देखील स्वयंप्रेरणेने चांगले काम करू शकतात. तसेच फक्त पैशानेच हे
काम होते असे नाही अनेक संस्था फक्त पैशासाठी निसर्गप्रेमी असल्याचे दाखवतात पण प्रत्यक्षात काही काम
करत नाहीत मोहम्मद दीलावर यांची संस्था बर्ड फिडर हे अतिशय माफक किमतीत उपलब्ध करून देते अर्थात
त्यांची क्वालिटी ठेवूनच. मोहम्मद दीलावर यांची संस्था तीन तत्त्वावर काम करते पक्षांना चिमणी तसेच इतरही
नेहमी आढळणाऱ्या पक्षांना घर आणि अन्नाची सोय करून देणे हे सर्व करीत असतांना नागरिकांमध्ये पक्षांत
प्रति जागृती तसेच प्रेम निर्माण होण्यास मदत करणे आणि उच्च प्रतीचे बर्ड फिडर आणि घरटे बनवण्यासाठी
निधी संकलन करणे. खूप चांगला प्रतिसाद त्यांना या कार्यात मिळाला आहे.

“ I ❤️ sparrows “
ही या वर्षीच्या जागतिक चिमणी दिवसाची थीम आहे, चला तर मग आपण पण चिऊताई च्या स्वागताची ,
पाणी चारा आणि जमत असल्यास निवारा म्हणजे लाकडाचे घरटे ठेवून जय्यत तयारी करू या.☺️

@गौरी-शितल राजूरकर
माहिती स्रोत :- गुगल, रेडिफ.कॉम

दवा आणि ’दुवा’

स्वतःच रेस्टॉरंट सुरू करायचं अशी खूप दिवसांपासून सुभाष ची इच्छा होती.
शेवटी मे 2018 मध्ये 'ट्रीट रेस्टॉरंट' आम्ही सुरू केलं.सगळाच अनुभव नवीन असल्याने मी संध्याकाळी तिथे काउन्टर सांभाळायला जायचे.
बरेच ओळखीचे लोक तिथे भेटायचे. एका परिचितांनी विचारले ,'दिवसा मेडिकल शॉप अन संध्याकाळी इथे, कुठे जास्त आवडत?' क्षणाचही विलंब न लावता मी म्हंटल "अर्थात ट्रीट मधे !"
पटकन बोलून तर गेले पण मग माझं उत्तर मलाच खटकलं,काही तरी चुकल्यासारखं वाटलं. 
 25 वर्षाचा औषधी दुकानाचा प्रवास डोळ्यासमोर आला.
लग्नानंतर d.pharm.केलं ,त्यामुळे कॉलेज ला थेअरी आणि दुकानात प्रॅक्टिकल असं एकाच वेळेला सुरू झालं.
लग्नाआधी क्रोसिन व्यतिरिक्त कुठल्याही गोळीच नाव माहीत नव्हतं, त्यामुळे त्या औषधांच्या जंगलात गोंधळून जायला व्हायचं.शिवाय कोणाला चुकून भलतंच औषध दिल तर! ही भीती पण सतत मनात असायची.
दीर मानसोपचार तज्ञ आहेत ,त्यांच्या हॉस्पिटल समोर दुकान होत.
मानसोपचारासाठी येणारा रुग्ण म्हणजे पागल,त्याला धरून बांधून आणणार,हे मनात पक्क होत.कधी असे रुग्ण पाहिले नव्हते,फक्त ऐकलं होत.दुकानात येणारे रुग्ण नॉर्मल वाटायचे ,त्यामुळे हे पागल कसे असा मला प्रश्न पडायचा!
दोन तीन दिवसातच ,एका बाईला तिच्या नवऱ्याने धरून दवाखान्यात आणलं. तिनी बाहेरच गोंधळ घालणं सुरू केलं ,रस्त्यावर लोळण घेतली ,हातपाय झाडायला लागली,तिला कपड्याचीही शुद्ध नव्हती. ती ऐकत नाही पाहून नवरा तिला केसांना धरून फरफटत नेऊ लागला. त्यांची दोन लहान मूल केविलवाणी बाजूला उभी राहून हे सगळं बघत होती. हे सगळं मला खूपच नवीन होत. जाम भीती वाटली बघून.दिवसभर ते आठवून उदास वाटत राहील.
हे दृश्य मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही!
त्यानंतर, गेल्या वीस पंचवीस वर्षात, बेड्या घालून आणलेला,आई दवाखान्यात घेऊन येते म्हणून तिच्यावर चाकू उगारणारा,'माझे दागिने विकून पैसे दारूत उडवले,अन मला पागल म्हणून दवाखान्यात आणलं,'अस हंबरडा फोडून  सांगणारा ,असे अन यापेक्षा भयानक अनेक रुग्ण बघितले. पण तरी, 'आता सवय झाली,काहीच वाटत नाही बघून' अस कधीच झालं नाही.आज ही अस काही बघितलं की मन उदास होत, तीव्रता कमी झाली हे मात्र खरं!
अजून एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे येणाऱ्या रुग्णांची गरिबी अन अज्ञान ! आजूबाजूच्या खेड्यांमधून इथे येणारे बरेचसे रुग्ण  गरीब असतात. बराच पैसा   तांत्रिक मांत्रिक वर खर्च करूनही काही फायदा झाला नाही की मग दवाखान्यात आणणार.मग महिन्याभराच औषध घ्यायला ही पैसे नाही, 8 दिवसाच औषध घेतलं तर ,परत गावाहून यायचा खर्च परवडत नाही, रुग्णा च एक दिवसाचही औषध बंद ठेऊन चालत नाही.अशा कात्रीत सापडलेले लोक बघून खूप त्रास होतो. बर,गोळ्या महत्वाच्या आहेत बाटली(टॉनिक) नेऊ नका ,असं याना कितीही जीव तोडून सांगितलं तरी,  त्यांच्या दृष्टीने बाटली म्हणजे जणू अमृत! ती घेणारच त्यासाठी गोळ्या कमी कराव्या लागल्या तरी बेहत्तर! 

यातले बरेचसे रुग्ण कधीही बरे होणार नसतात ,गोळ्या घेऊन स्टेबल राहतात. त्यामुळे वर्षानुवर्षे येणारे रुग्ण अन बरोबर येणारे नातेवाईक ओळखीचे होऊन जातात.दुकानात आल्यावर कधी हलकस स्मित तर कधी, 'मागच्या वेळेस आलो तेंव्हा तुम्ही दिसल्या नाही' ,अशी विचारपूस होते. काही तर
प्रेमाने शेतातली भाजी किंवा अजून काही आवर्जून घेऊन येतात.बरेच जण आपलं दुःखही शेअर करतात.दिलासा देण्याशिवाय आम्ही मात्र काहीच करू शकत नाही.
चार,पाच वर्षापूर्वी , क्रिटिकल केअर, रेटींना तज्ञ ,डेंटिस्ट, गायनॅकोलॉजिस्ट, फिजीशीयन असलेल्या हॉस्पिटल च्या बाजूला नवीन मेडिकल आम्ही सुरू केलं. तिथे जास्त गरज असल्याने मी पूर्ण वेळ तिकडे जायला लागले.दुकान बदललं ,रुग्णांचा प्रकार बदलला तरी बाकी गोष्टी तश्याच असतात. 
क्रिटिकल केअर असल्याने दिवसातून 2,3 दा तरी,जोरजोरात सायरन वाजवत येणारी अँबुलन्स आणि रुग्ण दगावला म्हणून येणारे रडण्याचे आवाज हे तिथलं नॉर्मल दृश्य! रुग्ण सिरिअस झाल्यामुळे घाईघाईत आलो.पैसे नाहीत,उधार द्या, वाटलं तर माझी पोत ठेवा,अस गयावया करत म्हणणारे पण कॉमन! खरच खूप अस्वस्थ वाटत हे सगळं बघून ,पण आम्हाला पण उधार देण्याला काही मर्यादा असतात.
दिवसभरात येणारे शंभर दीडशे (रुग्ण अन नातेवाईक) लोक आणि प्रत्येकाचे येणारे वेगवेगळे अनुभव ह्यावर तर एक प्रबंध लिहिता येईल. खूप नमुने बघायला मिळतात.

डॉक्टरांकडे दोन तास थांबलेल्या रुग्णाला औषधासाठी मात्र दोन मिनिट थांबायचीही तयारी नसते.एखाद औषध नसेल तर आमचा उद्धार ठरलेलाच! अर्थात आजारपणामुळे रुग्ण अन नातेवाईक  आधीच त्रस्त असल्याने आम्ही ही वाद न घालता ऐकून घेतो. काही रुग्ण डीसचार्ज मिळाला की पैसे देतो सांगून पैसे बुडवून निघून जातात ,तर काही उधार राहिलेले 10 ₹ सुद्धा गावातला माणूस इकडे येणार असेल तर त्याबरोबर पाठवतात. बरेच जण औषध घेण्याबाबत तर कायमच गोंधळलेले असतात,पूर्ण बिल बनल्यावर,'ह्या गोळ्या कमी करा घरी आहे बहुतेक,पैसे नाहीत हे पण कमी करा' अस करत करत पाच,सहा बिल बनवायला लावतात.गर्दीच्या वेळेला खूप चिडचीड होते पण......काय करणार!

एवढ्या वर्षात अजून एक जाणवलेला बदल म्हणजे डॉक्टरांबद्दल वाढत चाललेला अविश्वास आणि असंतोष ! रुग्ण मरण पावल्यावर तर , 'आपला पेशंट सकाळीच गेला असेल,उगीचच बिल वाढवायला आत्तापर्यंत ICU मधे ठेवलं अन एवढी मोठी औषध लिहून दिली, मेडिकल अन डॉक्टर ची मिलीभगत असेल, तेच औषध परत दुकानात आणून विकत असतील' अशा प्रकारचं संभाषण बिनदिक्कत आमच्यासमोर सुरू असत.संतापलेल्या त्या नातेवाईकांना आम्ही आमच्या परीने समजावतो.खर तर कोणीच डॉक्टर अस करत नाही (एखादा अपवाद असेलही).  
थोडक्यात काय, मेडिकल स्टोअर मध्ये येणारे रुग्ण असो किंवा नातेवाईक,  नेहमीच वैतागलेले ,दुःखी ,अन बरेचसे आयुष्याला कंटाळलेले असतात. नाही म्हणायला ,"बेटी हुई है" अस म्हणून बर्फी आणून देणारा आनंदी बाप, रुग्ण बरा झाला म्हणून मिठाई आणून देणारा नातेवाईक असे काही आनंदाचे क्षण ही कधी कधी वाट्याला येतात.
याउलट हॉटेल मधलं वातावरण!  तिथे  सगळे रिलॅक्स व्हायला येणार।वाढदिवस किंवा एखाद यश साजरं करणार.छान छान कपडे घालून ,(हे नयनसुख ही फार आनंद देत बर!) हसत खेळत जेवणार कुटुंब किंवा मित्र मंडळी यामुळे सगळं कसं 'आनंदी आनंद गडे 'असत! अशा वातावरणात राहायला कोणाला नाही आवडणार!
 त्यामुळे ट्रीट मध्ये जास्त आवडत अस मी बोलून गेले खरी, पण डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधला दुआ असणारा,व थोडं का होईना रुग्णांच दुःख दूर करणारा, औषधी दुकानाचा व्यवसायच मला जास्त प्रिय आहे !


इजिप्तायन - 4

                म्युझिअम मधून बाहेर पडल्यावर मस्त कढी-पकोडे, गाजर-हलवा, पालकाची भाजी इ. असा चविष्ट इंडियन फूडचा आस्वाद घेतला. नंतर पपायरस तयार करणाऱ्या कारखान्यात गेलो. तिथे अतिशय चटपटीत, पंधरा - सोळा वर्षांची मुलगी होती.तिने  लव्हाळ्यापासून पपायरस कसे बनवतात  त्याचे  नेमके  आणि प्रभावी प्रेझेंटेशन देऊन आम्हाला  इंप्रेस केलं. आम्ही  सगळ्यांनी  तिचे  आवर्जून  कौतुक केले. पपायरसला खडखडीत  वाळवलं  की उत्तम, टिकाऊ कागद बनतो. असली  लव्हाळी  आता आणि आधीही भारतात व जगात सगळीकडेच उगवत होती, उगवतात! पण त्याचा कागद म्हणजे पपायरस बनवण्याची कला फक्त इजिप्तला साधली. त्यावर लिखाण करुन इजिप्तने स्वतः ची  व जगाची उन्नती केली. "  पेपर " शब्दाचा  उगम इथूनच झाला. तिथे  पपायरसवर काढलेली खूप सुंदर, आकर्षक चित्रे  (  फ्रेमस् ) होती. एका  मोठय़ा  पपायरस वर हिरव्यागार रंगावर, सुरेख सोनेरी अक्षरात कुराणातलं वचन लिहिलेलं होतं. अगदी घ्यावसं वाटेल असं! ( कुणी मुस्लीम फ्रेंड असल्यास गिफ्ट द्यायला! )मी दोन  पपायरस आणून  फ्रेमस् केल्यात. विशेष सांगायचे म्हणजे अंधारात  पाहिलं तर,पूर्णपणे वेगळच  चित्र  दिसतं. आश्चर्यच वाटतं!

            संध्याकाळ  बरीच झाली होती, आम्हाला खान - अल् - खलीली च्या बाजाराजवळ शाॅपिंगसाठी नेलं. " एखाद्या तासात परत या, "टूर  मॅनेजर म्हणाले. आत  गेलो तर "इंडिया? इंडिया? शाहरूख खान? अमिताभ बच्चन? असं म्हणत  सगळे  दुकानदार  हाका मारत होते. अगदी  छोटी -छोटी   दुकानं! म्हटलं  आधी  एक चक्कर मारुन किंमती,मार्केट मधे  काय  मिळतं  याचा अंदाज  घेऊ. पण  खूप  विशेष  असे काही  वाटले नाही. मग मी  फ्रीज  मॅग्नेटस् ,एक छोटसं  शिल्प( Hat shepsut, या स्त्री  फेरोचं (राणी ) त्याचं  विशेष म्हणजे  चेहरा  स्त्रीचा असून,  त्याला  कृत्रिम  छोटीशी दाढी  आहे. याचे कारण  विचारले  तर,म्हणे  स्त्रियाही पुरुषांइतक्याच  बलवान  आहेत हे  दाखविण्यासाठी ! पहाणारा कन्फ्यूज  होतो की  चेहरा  पुरुषाचा आहे  की  स्त्रीचा ?
या  मार्केट मध्ये  कपडे इ. घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. मुस्लीम  स्त्रिया  परिधान  करतात  तसेच कपडे  होते  तिथे  फक्त! शाॅपिंग लवकरच  आटोपले  आमचे! तो भाग  मात्र खास  मुस्लीम  वाटत होता. त्यांचे खास  पदार्थ  तिथल्या  हाॅटेलमध्ये दिसत  होते. काहीजणांनी  चहा -काॅफी  घेतली  तिथे. .मी मात्र  तिथून  लवकर  बाहेर पडून बसमध्ये  जाऊन  बसले.

रात्री  नाईल नदीवर, क्रुझ डिनर पार्टी  एंजॉय केली.... सकाळी लवकर उठून  अलेक्झांड्रियाला निघालो. कारण कैरो  ते  अलेक्झांड्रिया अंतर  3 तासांचे  होते .                   अलेक्झांड्रिया......अतिशय  रम्य, भूमध्य  समुद्राकाठी वसलेलं. .आजचा  पहिला  स्पॉट  होता,रोमन मंदिर ! पण  पूर्णतः भग्न  झालेलं.वास्तुकलेचा नमुना असलेले  पिलर्स आणि  sphinx  च्या  भव्य  प्रतिकृती  होत्या  तिथे. इतका  मोठा  परिसर फिरत  असताना,ज्याने हे  नष्ट  केलं त्याचा  राग आला,एक  भव्य  कलाकृती  संपवली  म्हणून! नंतर रोमन थिएटर  बघितले, पण  वेळेअभावी  बाहेरूनच! संपूर्ण  संगमरवरी  इमारत! नंतर  कॅटाकोमला गेलो, तिथे अगदी  पुरातन  वास्तू  
वरुन खाली  उतरत जाऊन  पहावी लागली. निराळीच  वास्तुरचना,ठिकठिकाणी  चौथरे होते, जसे  आपल्याकडे  साधूंना  झोपण्याची जागा  असते तसे! 
नंतर गेलो, हॅगिंग चर्च  पहायला. ..खाली  एकावर  एक  दोन  किल्ले,  आणि  त्यावर  चर्च म्हणून  हॅगिंग! तिथेहीवास्तुकलेचे नमुने  पहायला  मिळाले.
जुन्या  जगातल्या सर्वात मोठ्या  ग्रंथालयाला भेट   द्यायची  उत्सुकता होती  खूप! पण ते बंद  झाल्याने  बाहेरूनच  पहावे लागले.सगळीकडे ग्रॅनाईटचा  वापर,स्वच्छ  चकचकीत! ही इमारत  अगदी  वेगळ्याच  आकाराची  आहे. एखादी  प्रचंड  मोठय़ा  आकाराची  थाळी  जमिनीत  तीस -चाळीस  अंशाचा  कोन  करून रुतवावी असा  आकार! हे  सिलींग आहे  तिचे! गाइडने त्याबद्दल  रोचक  माहिती दिली. एकाचवेळी  अकरा  मजल्यांवर  मिळून  पाच हजार  लोक  वाचायला  बसू शकतात.वाचनाबरोबर  लेखनाची, कम्प्युटरस्  ची  सोय आहे. एवढा  प्रचंड  विस्तार  असलेले  जगातले एकमेव  ग्रंथालय! सध्या  300000  पुस्तकं  आहेत  तिथे!पण  700000 पुस्तकं  ठेवण्याची  तरतूद आहे. इथे  एक  गोलाकार  दगडी  भिंत  आहे, तिला  वेगळीच  कल्पकता  वापरून  सजवलयं!जगातल्या  सर्व  लिप्यांमधलं एक -एक अक्षर या  भिंतीवर  कोरलय अगदी  प्राचीन काळापासूनच्या सर्व  लिप्या  तिथे  हजर  आहेत. या  सगळ्यांमधून आपण  ज्ञान  संपादन  करतो, असा  त्याचा अर्थ! किती  छान  कल्पना  नं? देवनागरी लिपीतलं कुठलं  अक्षर  असेल  तिथे? हा प्रश्न  आला  नं मनात? माझ्याही. ...तर त्या  तिथे  अगदी  मध्यभागी, "है" असं  कोरलेलं आहे. ते अक्षर  का निवडलं आणि  त्याचा अर्थ  काय? हे प्रश्न मात्र  मनातल्या मनातच   राहिले.

नंतर  लंचला  भूमध्य समुद्राकाठी  (20 किमी लांबीचा     समुद्र किनारा  आहे. )असलेल्या  हाॅटेलमध्ये  गेलो. तिथे  जेवण  जरा जास्तच  इजिप्शियन  होतं, मग मी सरळ  सकाळी  बसमध्ये  दिलेले  मेथीच्या  पराठ्याचे  पॅकेट  फोडले. हाॅटेलमध्ये दही होतच. (इजिप्तमध्ये  दही  खूप  मस्त  असायचं, दह्यातल्या को शिंबीरी,सॅलडही) त्यामुळे  माझी  मजा  होती. आमच्या  पुणेरी  टूर  मॅनेजरने आम्हाला  तिथे चितळे  आंबा वडी खिलवून सरप्राईज  दिलं. जेवणानंतर  मस्त  भूमध्य समुद्रकिनारी फेरफटका मारला. समुद्राचे  निळेशार  पाणी  पहायची आपल्याला  सवय! (मुंबईत  काळेशार)इथे समुद्राचे  पाणी  चक्क  हिरवे आहे. आत बीचवर  कुणाला  जाऊ  देत नाहीत, त्यामुळे स्वच्छ, चमकदार  पाणी! समुद्राकाठचा  भाग अगदी  मरिन  ड्राईव्ह  सारखा आहे. (अर्थात  आपले मरिन  ड्राईव्ह  जास्त  भारी  आहे.)एक विशेष  सांगायचं  म्हणजे  तिथल्या  इमारतींना  एका  बाजूने  प्लॅस्टरच  करत नाहीत. आम्ही  गाइडला  कारण  विचारलं  तर त्याने  tax purpose साठी  असं सांगितलं. पण  खरं  कारण,  इथे  एकाला  एक लागून  8-10 मजली इमारती. ..म्हणजे  आपल्याकडे  काॅमन वाॅल घेऊन  बंगले बांधतात  तशा  ...अनेक इमारती! थक्कच  होतो  आपण! 
           तसं  इजिप्तमध्ये  फिरताना  वेगळं  असं काही  जाणवलंच नाही. लोकही शांत  वाटले आणि  मुख्य म्हणजे  एखाद्या  मुस्लिम  देशात  आपण आहोत, हे विसरायला  लावणारं  वातावरण आहे  तिथे! मुली, बायकाही  मस्त  जीन्स, टाॅप या वेशात  दिसल्या. कुणीही  बुरखा  घालीत  नाहीत. अगदी  क्वचितच  एखादी! मुलींचा  मुक्त  संचार  आहे  सगळीकडे! 
       राजवाड्याचं renovation सुरु  होतं. बाहेरुनच इतका भव्य,  दिमाखदार दिसत  होता.समोर  समुद्र असल्याने  तिथे भरपूर  फोटो काढले.मग गेलो अलेक्झांड्रिया च्या  प्राचीन  दीपगृहाकडे . आता  तिथे सातशे  वर्षे  जुना ,सुंदर, दुधी  रंगाचा चिरेबंदी  किल्ला  आहे. तो पाहून  होत असतानाच  संध्याकाळ  झाली. इजिप्त  दर्शन  संपत  आल्याची  हुरहूर  मनात  दाटून  आली. 
    दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रुप  फोटो, व्हिडिओ  असे  सगळे  चालू  होते. काहीजण  हाॅटेलमध्ये  पोहून  रिलॅक्स  झाले. हाॅटेल निवांत  फिरुन आलो. ब्रेकफास्ट  झाल्यावर  बस विमानतळाच्या दिशेने  धावू लागली. मी कुणाशी  जास्त  काही  न बोलता, इजिप्तचं  ते शेवटचं  दर्शन  मनात  साठवण्याचा प्रयत्न  करीत होते, जे  माझ्या निरंतर  स्मृतीत  रहाणार  होते. 
(समाप्त ).

Monday, April 13, 2020

थांब वाचका, पुस्तक काढतो

मी अगदी योग्य वेळेला हॉलमध्ये प्रवेश केला. जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. सुटले! इकडे वधूपित्याने म्हणजे पुस्तक लिहिणार्‍या नवलेखकाच्या मुलाने आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्‍यातली खुर्ची धरली. स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान मुद्दे मांडले. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक एकदम बंडल असून नवलेखक अद्याप साहित्याच्या बालवाडीत आहे. रिटायर झाल्यानंतर त्यांना कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या कथांचं पुस्तकबिस्तक काढून खूश करायची आयडिया पोराला सुचली असावी. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती कशी असावी असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं डोंबलाचं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने न बोलून करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखक-काकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही स्पष्ट सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, काकांच्या नात्यातल्या असाव्यात. तेव्हा संक्रांतीचे दिवस असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊ या, या हिशेबाने खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखककाकांचे रिटायर मित्र असावेत. रविवारची दुपार जरा बरी गेल्याने तेवढाच एक दिवस कटला न बा, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्‍यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती तशीच राखण्याकडे तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व ’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’ तत्सम काहीतरी यमक जुळवले. ह्यांचे नक्कीच ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असणार.

त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले. ’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ आहेत) सादर करतो’, असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगून, ’लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’ अशी मांडणी केली. मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असून (किती तो आत्मविश्वास!)) ही काकांनी (उत्सवमूर्ती लेखक- काका) नोकरीसाठी मदत केल्याबाबत त्यांचे आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं. म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या," मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत." जर या काकांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’काकांचे गुण किती सांगावे (त्यांना एकही आठवेना) तितके कमीच.’ काकांनी बालपणी खेळवलं असणार. त्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात. डॉ, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबंद्ध व्यक्तिला आमंत्रित करण्यात आलं. काका ज्या संस्थेतून रिटायर झाले तिथल्या मराठीच्या म्याडम. माझ्या व शेजारी बसलेल्या मैत्रिणीच्या पोटात गोळा आला. म्याडम चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करुन म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. काकांच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या. ’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (ऑ!) नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’ असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते असा इशारा कळून श्रोते इमानेइतबारे टाळ्या वाजवत.

लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार काकांना. काकांनी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. मला तर कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही. निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले. दरम्यान मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्‍या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.

काकांचा मुलगा आभारप्रदर्शनाला उभा राहिला. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्‍यावर लेऊन तो उभा राहताच मी ’आभाराचा भार कशाला अन शब्दांचे हार कशाला’ या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्याने त्या ओळी म्हटल्याच. या ओळी न म्हणणारा आभारवाला दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला काकांच्या दिशेने धावले. आम्ही लेखिका- मैत्रिणीच्या दिशेने धावलो.
काका आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत डायरेक्ट ’साहित्तिक’ झाले. :-)

- मोहिनी

अकोला मेरी जान

शीर्षक वाचल्यावर अकोल्यासारख्या शहरावर काय बरं लिहिण्यासारखं आहे ?  असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . माझ्या वडिलांची नोकरी बदलीची असल्याने दर 2,3 वर्षांनी आम्ही नवीन गावी जात असू. त्यामुळे प्रत्येक गावाच्या काही खास अशा आठवणी आहेत , कदाचित म्हणूनच ," आई तुला कोणतं गाव सगळ्यात जास्त आवडतं ? " ह्या माझ्या मुलानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही . तरीपण ' दिल के करीब ' म्हणावं असं गाव म्हणजे अकोला , कारण बालपणीचा सुखाचा काळ इथे गेला आहे . मी साधारण 6,7 वर्षाची असतांना आम्ही अकोल्यात आलो . ह्या आधी आपल्या काळातलं ' बालकमंदिर ' मोर्शी आणि इयत्ता पहिली अमरावती इथे पार पडलं होतं.  घराजवळची शाळा , मैत्रिणी ह्यामुळे मी पटकन अकोल्यात रमले . इयत्ता दुसरी ते सहावी अशी एकूण 5 वर्ष आम्ही इथे होतो भरपूर धमाल , खेळ ,मजा ,मस्ती सगळं मी इथे केलं . त्यामुळेच इथून जातांना खूप वाईट वाटलं . माझ्या शेजारी राहणारी माझी बालमैत्रीण आणि मी तर अगदी गळ्यात गळे घालून रडलो . नवीन गावात नंतर मी रुळले पण अकोल्याची आठवण मात्र वरचेवर यायची , माझे काका इथे राहत असल्याने वर्षातून एकदा तरी आमची चक्कर इथे व्हायची . पण ते 4,5 दिवसांचं येणं असायचं . आत्तासारखी तेव्हा काही मैत्रिणींची भेट व्हायची नाही .  बऱ्याचदा घरं माहित नसायची , फोन वगैरे असण्याचा प्रश्नच नाही . सुरवातीला पत्रं वगैरे पाठवणं व्हायचं मग हळूहळू ते ही बंद झालं . आमच्या ह्या बदली प्रकरणात एक अकोला सोडलं तर कुठल्याही गावात आमचे नातेवाईक नव्हते , म्हणजे नवा गाव नवी ओळख करायची आणि मग 2,3 वर्षांनी ती पाटी कोरी करून पुढे जायचं . माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे काका , मामा , मावशी असे कुणी ना कुणीतरी नातेवाईक गावात असायचे , मला त्यांचा फार हेवा वाटायचा . अकोल्यानंतर पुलगाव आणि पुलगावनंतर अमरावती अशी आमची बदली झाली आणि मग मात्र आम्ही अमरावतीला स्थायिक झालो . 

शाळा , कॉलेज हे झाल्यावर प्रत्येकीच्या आयुष्यात येणारा महत्वपूर्ण टप्पा म्हणजे ' स्थळ बघणे' माझ्याही बाबतीत सुरु झालं . अकोल्यातल्या माझ्या काकांचे कुटुंब माझ्यासाठी फार जवळचे होते लहानपणापासून मी त्यांच्याशी जोडले गेले होते , नवीन आलेल्या माझ्या दोन्ही वहिन्यांशी पण माझे सूर लगेच जुळले , वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं येऊ लागली तसं मी एकदा आईला म्हटलं , " माझं लग्न होऊन मी दुसऱ्या गावी गेले की माझ्याकडे आपले नातेवाईक फारसे येणारच नाहीत किंवा माझं सुद्धा त्यांच्याकडे जाणं कमीच होईल . " आपले आपल्याच लोकांशी असलेले संबंध आता कमी होत जाणार ह्या विचाराने खरं तर खूप वाईट वाटलं होतं . पण म्हणतात ना मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा धरली की ती इच्छा पूर्ण होते तसंच काहीसं झालं , लग्नासाठी इथलच स्थळ चालून आलं तेही भावाच्या ओळखीतलं त्यामुळे ' सोने पे सुहागा ' अशी माझी अवस्था झाली . एक चक्र जणू पूर्ण झालं , तब्बल 12 वर्षांनी मी पुन्हा एकदा माझ्या या लाडक्या शहरात आले . अर्थात आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं . बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या . लग्नानंतर कुठे बाहेर जात असतांना मला अचानक पॉप अप झाल्याप्रमाणे काहीतरी आठवे आणि मग मी नवऱ्याला , " अरे , इथे ते हे होतं नं ? , किंवा अरे हा रस्ता आता असा इकडून तिकडे जातो नं ? " असे प्रश्न विचारून बहुतेक भंडावून सोडत असे . शाळेत जातांना आपल्याला जो मोठ्ठा दवाखाना लागत होता तो म्हणजे ' लेडी हार्डिंग ' !!, किंवा ज्या  बँकेत एवढे पोलीस असतात हे बघून आपण घाबरलो होतो ती बँक म्हणजे ही स्टेट बँक मेन ब्रँच . आणि आईच्या नकळत ज्या बगिच्यात मैत्रिणींबरोबर खेळायला आलो होतो तो म्हणजे हा रामदासपेठ मधला टिळक पार्क !! ' असे माझे मला ' युरेका टाईप ' चे शोध लागत होते . पिकेव्ही मध्ये आता सुधीर कॉलनी कडून जो राजरस्ता झाला आहे तिथे मी लहान असताना एक रानटी झाडाझुडपांनी भरलेला भालामोठ्ठा खड्डा होता आणि आम्ही मुलं एक adventure activity म्हणून तो पार करून पिकेव्हीत घुसत असू किंवा रामदासपेठेत डॉ . श्रॉफ राहतात त्या भागात माझी एक मैत्रीण राहत असे जिच्याकडे मी शाळेतून परस्पर गेले होते आणि मग आईच्या हातचा मार खाल्ला होता हे अजूनही आठवते. 

           गावात नातेवाईक असण्याची माझी इच्छा ह्या शहराने पूर्ण केली . ' लोकल माहेर ' असं मी ज्याला म्हणते ते माझ्या काकांचं नांदत घर तर इथे होतंच पण थोड्याच काळात सख्खी झालेली अशी सासरची नातेवाईक मंडळी पण इथे होती .  ' हम दो हमारा एक किंवा हमारे दो ' असलेल्या आजच्या जमान्यात अशी नाती आजूबाजूला असावीत आणि आपण ती जपावीत असं मला प्रकर्षाने वाटतं . ते फार सोपं असतं .  माझ्या मुलाचं बालपण ह्या सगळ्यामुळे फार छान गेलं. 
नातेवाईकांच्या इतकेच जीवाभावाचे असतात ते मित्रमैत्रिणी . माझ्या नवऱ्याचं लहानपण  इथेच गेल्याने त्याला भरपूर मित्र आहेत पण मला देखील अतिशय मौल्यवान मैत्रिणी ह्या शहराने दिल्या ज्या  सुखदुःख वाटून घेणाऱ्या तर होत्याच पण आयुष्य समृद्ध करणाऱ्या होत्या , त्यांच्यामुळे मी बरंच काही शिकले . मोठ्या शहरात राहणाऱ्या माझ्या इतर मैत्रिणींना ह्याचा नेहमी हेवा वाटतो .  
         3,4 वर्षांपेक्षा जास्त कुठल्याच गावात न राहणाऱ्या मला आता इथे येऊन चक्क 20 वर्ष झालीत . ह्या 20 वर्षात एका लहान गावाचं रूपडं जाऊन एका महानगराचा आकार आलाय पण बाकी प्रगती फार नाही . इथे पाण्याची समस्या आहे , धुळीची समस्या आहे , काही मूलभूत सोयिंची कमतरता आहे , उज्वल भविष्याकडे नजर लावून बसलेल्या पुढील पिढीसाठी इथे काही नाही हे कटू असले तरी वास्तव आहे पण चायनीज , इटालियन डिशेस च्या बरोबरीने नाकातोंडातून पाणी काढणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर रमणारी आनंदी प्रजा जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत किंवा ' अबे , होते ना बे बराबर '  अशी मजबूत हिम्मत देणारे आवाज जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत ह्या शहराला मरण नाही  . 

           बालपणीच्या सुगंधित स्मृती सदैव ताज्या ठेवणाऱ्या ,  नातेवाईक आणि  मित्रमैत्रिणींच्या बाबतीत मला श्रीमंत करणाऱ्या , मॉल , मल्टिप्लेक्स अशी मनोरंजनाची कुठलीही आधुनिक साधनं नसणाऱ्या ह्या शहराने मला इथे रुजवलं हे मात्र खरं 

लॉक डाउन, मी आणि माझी पापड रेसिपी

 'तुम्हा बायकांचं काही कळतच नाही. तुमच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही' असं जे नेहमी पुरुष मंडळी किंवा समस्त नवरे मंडळी म्हणत असते त्यात खरं तर बरच तथ्य आहे. आता हेच पहा ना---- सध्या "कोरोना" मुळे "लॉक डाउन पिरेड" सुरू आहे. ह्या काळात बहुतांश ठिकाणी नवरा, मुले घरातच असल्याने कामे खूपच वाढली आहेत,
असा बायकांचा अनुभव आहे. त्यातही बऱ्याच ठिकाणी बायकांना मुलांची, नवऱ्याची मदत होते; पण तरीही मुख्य कामे स्त्री लाच करावी लागतात. त्यात "मोलकरीण" ह्या  महत्वपूर्ण पदावरील (नव्यानेच   साक्षातकार  झालेल्या) व्यक्ती ची उणीव, दर  दोन तासांनी निघणाऱ्या भांड्यांची रास, चहा, नाश्ता, जेवण, परत  चहा, नाश्ता, जेवण ,कपडे धुणे, घर आवरणे--- ह्या सततच्या आणि कराव्याच लागणाऱ्या जास्तीच्या कामांमुळे एकीकडे वैतागलेल्या, थकलेल्या बायका दुसरीकडे मात्र अति उत्साहाने वड्या, पापड, कुरडया, खारोड्या---असले किचकट पदार्थ बनवतात आणि फुशारकीने त्याचे फोटोही पाठवतात. ह्या सुगरण बायकांचा कुटील डाव असतो, तो आमच्या सारख्या "जेमतेम काठावर पास झालेल्या" बायकांना डॉमिनेट करण्याचा.😉😉आणि आम्हीही फसतो की हो. आम्हीही शिरा ताणून आणि पदर खोचून लागतो कामाला. जशी की मी---

 झाले असे की अर्चना, रश्मी, दिप्ती, सुषमा ह्या सारख्या बऱ्याच सुगरण मैत्रिणींनी  टाकलेले वेगवेगळ्या रेसिपी चे फोटो पाहून अस्मादिकांनाही इच्छा झाली . ते काय दांडगे की सांडगे म्हणतात ते करून पाहिलं. ते अगदीच सोप्प होतं तरी बऱ्यापैकी जमलं. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करून पाहिले ते फसले इतकं करूनही मन भरलं नाही म्हणा  की  स्वतः वरील अति आत्मविश्वासा मुळे म्हणा ज्वारीचे पापड करायचा बेत केला. मार्गदर्शन अर्थात च दिप्ती आणि  अर्चनाचं. वाटलं सोप्प तर आहे अगदी.  पीठ पाण्यात भिजवायचे, थोडं फार मीठ, तिखट काय ते टाकायचे आणि "सांगितलेल्या अंदाजे पाण्यात" (उकळलेल्या) घोटत रहायचे, पेशन्स ठेवून अर्थात. मग ते "काहीतरी" दिसलं की समजायचे झाले म्हणून, अन पळीने ओतायचे प्लास्टिक कागदावर किंवा  कॉटन कपड्यावर. हाय काय अन नाय काय.😛 केली मग तयारी, तेही नवरा हॉटेल ला निघून गेल्यावर, सकाळी 9 नंतर.  आमच्या हॉटेल ला शटर सिस्टिम नसल्याने त्याला बिचाऱ्याला जावेच लागते, सकाळी 3 तास,  संध्याकाळी 4/5 तास. (तेवढीच  मलाही शांतता. आणि गरज लागली तर लगेचच आवाजही देता येतो. म्हणजे दुहेरी फायदा.)तसेही नवऱ्यासमोर मी जास्त सुगरण पणा करतच  नाही. तो म्हणतो, 'कशाला दमतेस इतकी?(खरे तर त्याला म्हणायचे असते, जमत नाही तिथे डोकं का खराब करतेस?) कारण केल्यावर ते खाल्लं जाईलच ह्याची खात्री "शून्य" असते. असो. 
तर मी मिळालेल्या ज्ञाना नुसार सगळी प्रोसेस पार पाडली, तेही संयम बाळगत, जो मुळातच माझ्यात खूप कमी आहे. मुलं ही नेहमी म्हणतात, 'मॉम, तुला धीर जरासाही नाही." सांगितलेलं काम किंवा मनात असलेली गोष्ट लगेच झाली पाहिजे, कीवा  होऊन जावी असे मला वाटते . खरे तर असले किचकट पदार्थ ही मनात आले की पट्कन तयार व्हावेत अशी माझी भाबडी इच्छा असते(थोडक्यात,  कष्ट न करताच) . मी 2 प्लास्टिक पेपर, एक मोठा कॉटन कपडा अगोदरच तयार ठेवले होते. पीठ  "ओतणेबल "  झाले असे वाटल्यावर मी पळीने ओतायला सुरुवात केली. पण  बहुदा ओतत असतानाच त्यांची  घट्ट मैत्री झाली आणि कुठलाही सारासार विचार न करता सगळे एकमेकांना बिलगले, कबके बिछडे हुवे  --सारखे . अगदीच आकारहीन दिशाहीन पसरू लागले, आणि  मग माझा चेहराही रंगहीन होऊ लागला. कशीतरी कसरत करून चार चकरा गच्चीवर मारत "ते अजब समीकरण" वाळत घालून आली. खूप थकायला झाले होते. त्यानंतर लेकाचा चहा, पूर्ण स्वयंपाक--- माझा चेहरा आणि  वेदनेने परिपूर्ण भाव पाहून "दोघेही" मदतीला धावून आले अर्थात. जेवणानंतर मैत्रिणींच्या गृप (सगळ्याच) मध्ये डोकावणे आणि मधून मधून रिप्लाय करणे हे तर "मस्ट" असतेच. कुणी कोडी टाकली तर तीही सोडवावी लागतातच. आपले ज्ञान (की अज्ञान?)  दाखवायची संधी कोण कशाला सोडेल? तर गृप वर उडत उडत हिंडून झाले, थोडा आराम करून झाला आणि 4 वाजता मोठ्या उत्साहाने गच्चीवर गेले "ते समीकरण " खाली आणायला. बघताच क्षणी इतकी प्रेमात पडले त्याच्या की लपत छपत   खाली आणून झटकन झाकून ठेवले,जेणे करून माझ्या "प्रियकराचे " दर्शन नवऱ्याला व्हायला नको. मग परत जेव्हा तो हॉटेल ला गेला तेव्हा ताबडतोब मी केलेली कारागिरी ताटात उतरवायला निघाले. पण छया: कसलं काय? ते सगळे जीव इतके एकमेकांच्या प्रेमात होते की अलग व्हायलाच तयार होईनात.😔😔मी आपल्या स्वभावाला अनुसरून जोराने आणि काहीशा रागाने त्यांना जवळ घेण्याचा, सॉरी, ओढायचा प्रयत्न करताच  ते कॉटन चे कापड  टराटरा फाटलेच. प्लास्टिक मधून तरी थोडं फार हाती लागलं, म्हणजे चुराच. मग काय , 
  
कानाला खडा लावला, जिवाला यापुढे जास्त त्रास करून  घयायचा नाय, झेपेल तेच आणि जमेल तेवढंच करायचं. निदान दुष्ट मैत्रिणींनी दुसरी रेसिपी पाठवेपर्यंत तरी.😀
 माणिक नेरकर.

Friday, April 10, 2020

बाटलीतला राक्षस

स्थळ-- वैकुंठ
देवी लक्ष्मी आणि  श्री नारायण अगदी निवांत बसले आहेत.नारायण देवीला त्यांच्या अवतारांच्या कथा रंगवून सांगत आहेत आणि देवी त्या कौतुकाने ऐकत आहेत.एकीकडे देवांचे पाय चेपणेही सुरू आहे, तेही तन्मयतेने, न वैतागता.
विष्णुदेव: हा, तर कुठे होतो आम्ही?
लक्ष्मी देवी: "स्वामी, आपण दंडकारण्यात होतात आणि  राक्षसांशी युद्धाच्या तयारीत---"
तितक्यात नारदमुनी प्रवेश करतात. 
नारदमुनी:"नारायण$$ नारायण---
विष्णुदेव: "या मुनीवर. ह्या अवेळी येण्याचे प्रयोजन?" 
नारदमुनी: "देवा, इकडे आपण राक्षसांच्या युद्धकथांमध्ये  रमला आहात आणि पृथ्वीवर "तो महाभयंकर" राक्षस थैमान घालतोय.  समस्त मानवजातीला त्राही त्राही करून सोडलंय त्याने. हाहाकार माजवलाय नुसता. तिकडे  आपले लाखो भक्तगण संकटात आहेत आणि आपण इथे निवांतपणे। -----"
विष्णुदेव: "शांत व्हा, मुनीवर. इतके हायपर का होत आहात?  कुंभ, निकुंभ, मारीच, खर, दूषण      
यापैकी कुणी  अवतार घेतलाय का पृथ्वीवर? आणि असल्यास आम्हाला कसे कळले नाही?"
नारदमुनी: "देवा, ते राक्षस तिन्ही लोकांवर राज्य करण्यासाठी युद्ध करत होते. त्या विलासी इंद्राला घाबरवण्यात त्यांना मजा येत असे. आणि त्यांच्याशी दोन हात करायला इथे स्वर्गात एकापेक्षा एक देवी देवता समर्थ आहेत. पण त्या  पृथ्वीवर निर्माण झालेल्या राक्षसाने लोकांची झोपच उडवलीये हो. तो गरीब--श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, असा कोणताही भेद न पाळता, एकेकाच्या मानगुटीवर बसत चाललाय. काहीतरी करा प्रभो. "
विष्णुदेव: "मुनीवर, आता ब्रह्मदेव येतीलच इतक्यात. सृष्टी निर्माण केलीये त्यांनी, ती स्मूथली फिरत ठेवणे हे त्यांचं डिपार्टमेंट आहे. त्यांनाच विचारू या. देवाधिदेव महादेव पण पार्वती देवींसह कैलास पर्वतावरून निघाले आहेत. शिवाय इंद्रदेव शची देवींसह येत आहेत. सध्या सगळे जरा निवांत असल्याने आम्ही इथेच वैकुंठात "गेट टू गेदर" करायचं  ठरलंय आमचं.आलाच आहात तर  तुम्हीही जॉईन व्हा. कसे?" 
नारदमुनी: "समस्त देवलोक गोळा होतोय? नवलच आहे. म्हणजे कुणालाच विषयाचं गांभीर्य दिसत नाही तर." (नारदमुनी चिंताग्रस्त)
विष्णुदेव: "मग काय, पृथ्वीवरली सगळी देवालये, मंदिरे ओस पडलीत नुसती. एक माणूस फिरकत नाही देवळात. आले तरी नाका तोंडाला फडके बांधून. गाभाऱ्यात इतकी भयाण शांतता,घंटेचा नाद नाही की तार स्वरातली आरती नाही, प्रार्थनेचे आवाज नाहीत की कुणाचा गोंधळ नाही--- आम्हालाच भीती वाटते कधी कधी तिथल्या वातावरणाची. भक्तांशिवाय मजा नाही हो मुनीवर मंदिरात.  इतकी शांतता यापूर्वी आम्ही कधी अनुभवली नव्हती. कुणाचे काही मागणेही ऐकू येत नाही म्हणून मग आम्ही वैकुंठात येऊन  बसलोय, निवांत. आम्हाला वाटलं सगळे भक्तगण सुखा समाधानात आहेत, कुणाची काही तक्रार नसावी." 
नारद: "देवा, सगळी मंडळी घरात बसूनच आपला धावा करत आहेत. एरवी मानसपूजा भावते ना तुम्हाला? मग आता इतक्या भक्तगणांची बेंबीच्या देठापासून मारलेली (घरातल्या घरात) हाक कशी ऐकू येत नाहीये?" 
विष्णुदेव: "मुनीवर, हृदयाची हाक ऐकून धावून जायला कुणी नाम्या, तुक्या, जनाबाई, चोखोबा अवतरलेत की काय पृथ्वीवर?" (नारद गप्प)आम्हाला सवय झालीये ती सतत कसली ना कसली तरी मागणी, गाऱ्हाणी ऐकण्याची. मंदिरातील उच्च स्वरातील प्रार्थना आणि आरतीची. मंदिरे सगळी ओस पडलीयेत मुनीवर."
नारदमुनी: "देवा, नुसती मंदिरेच नाही तर रस्तेही ओस पडलेले दिसताहेत.शुकशुकाट आहे नुसता. भयाण वाटताहेत रस्ते, मनुष्य प्राण्यांविना. पूर्वी प्राण्यांना रस्त्यावर यायला माणसाचे भय वाटत असे. आता प्राणी मजेत रस्त्यांवर फिरताना दिसतात आणि माणूस घरात कोंडलेला. जी माणसे जंगली प्राणी बघायला पैसे खर्च करून जायची तिथे आता हीच प्राणी मंडळी फुकटात मनुष्य प्राण्यांचे दर्शन घेताना दिसते, अगदी मजेत तेही. काहीतरी भयंकर घडते आहे देवा पृथ्वीवर. मी नुकताच फेरफटका मारून आलो ना पृथ्वीवर."
विष्णुदेव: "मुनीवर, मनुष्यप्राणी बुद्धिमान जीव आहे. आहे त्या परिस्थितीतुन मार्ग कसा काढायचा, हे त्याला बरोबर माहीत आहे. तुम्ही का इतके  एक्साईट होता? बी कूल, मुनीवर. देवी, मुनींसाठी शीतल पेय घेऊन या." (देवी तत्परतेने जातात)
नारदमुनी: "देवा, मघापासून ऐकतोय, आपल्या तोंडी माणसाची भाषा?"
 विष्णुदेव:" भक्तगणांच्या तोंडून ऐकून ऐकून पाठ झालंय आम्हालाही. आणि आपण आहातच की अधून मधून शिकवणी द्यायला. आपले राऊंड होतच असतात ना खालून वर, वरून खाली.(स्मित करतात.)
विष्णुदेव:"हं, आता जरा सविस्तर सांगा बघू, काय समस्या आहे नेमकी मानवाची."
 नारदमुनी:" तिकडे पृथ्वीवर "विलगिकरण" सुरुये प्रभो."सोशल  distancing" का काय ते  मस्ट केलंय."
विष्णुदेव: "ते काय असतं आणि?"
नारदमुनी:" प्रभो, इकडे आपण गेट-टू-गेदर ची स्वप्नं पहात आहात; पण तिकडे मात्र लोकं एकमेकांपासून लांब पळताहेत. रस्त्यावर जा- ये करायलाही बंदी घातली गेली आहे. कसलाच गोंधळ नाही, पार्ट्या नाहीत, वाहनांची गजबज नाही. हॉटेल्स, मॉल्स, सगळं ओस पडलंय. रस्त्यांवर वाहने नाहीत त्यामुळे प्रदूषण कमी झालंय, अपघात कमी झालेत -- पर्यावरण शुद्ध होतंय, स्वच्छता,शांतता दिसतेय --पण ह्या गोष्टींचा आनंद मानावा की दुःख तेच मानवाला कळत नाहीये. कुणी कुणाला भेटत नाहीये त्यामुळे ना कसले वाद, ना कसली भांडणे. अहो, खून, मारामाऱ्या, दहशत यासारखे गुन्हेही घाबरून मागे पडले आहेत. ही चांगली बाब की वाईट हे तर मलाही कळेनासे झालेय."
विष्णुदेव:"आणि  तुम्हाला वाटतं, हे सगळं त्या महाभयंकर राक्षसामुळे होतंय? मग तर तो "सज्जन राक्षस"असला पाहिजे.(मुनी कपाळावर हात मारून घेतात.) 
नारदमुनी: "देवा, सगळं अघटित घडतंय, कळत कसं नाहीये तुम्हाला? लोकं अचानक खूप शहाण्यासारखी वागू लागलीत. स्वच्छतेचे नियम पाळू लागलीत, लोकांना शिस्तीची सवय लागतेय, बरीच मंडळी रातोरात स्टार व्हावं तशी "अध्ह्यात्मिक" वगैरे झालीये. एकमेकांना काळजी घ्या म्हणताहेत(अर्थात दुरूनच), अध्यात्मचे पाठ पढ वले जाताहेत, योग विद्याचं महत्व अचानक वाढू लागलंय---थोडक्यात माणसं अंतर राखून एकमेकांना सल्ला द्यायचे काम करत आहेत.  त्यातही अति विद्वान, बुद्धिमान ज्याना सतत लोकांना उपदेश,ज्ञान द्यायची सवय असते, त्यांनी तर दुकानेच उघडली आहेत, तेही मोफत. त्यात उलट-सुलट, खरे-खोटे सगळेच पीक पिकतेय."
विष्णुदेव:"मुनीवर, हे  उलट सुलट सांगणारे तुमचेच वंशज असणार.(मिस्कील पणे  खेचतात) तुम्ही फेरफटका मारायला जातात तेव्हा काहिनाकाही पेरून येतच असाल ना? आणि तुम्ही म्हणता ते सगळे चांगलेच बदल आहेत की. माणूस बदलतोय हळूहळू का होईना. गुड."
 नारदमुनी: "कसलं गुड देवा. एरवी बेंबीच्या देठापासून ओरडणारी विद्वान मंडळी, जी तक्रार करत असे की माणसा माणसातला दुरावा वाढत चाललाय, संवाद कमी होत चाललाय, जग धावतय नुसतं. कुणी पैशाच्या मागे तर कुणी कशाच्या -- अचानक हीच मंडळी दूर दूर रहायचा सल्ला देत आहेत. आयुष्य ब्रेक लावल्यासारखं गचकन थांबलय म्हणताहेत. लांबूनच रामराम होतोय, स्पर्श टाळला जातोय.--ही सगळी लक्षणे कशाची देवा? माझ्या तर कल्पने पलीकडले आहे हे सर्व." 
विष्णुदेव:" हल्ली बरीच राक्षस मंडळी पृथ्वीवर मोकाट फिरून धुमाकूळ घालताहेत, हे आलंय आमच्याही कानावर. पण तुम्ही जे कथन करत आहात ते काहीसे विसंगत वाटते आहे खरे."
नारदमुनी:" देवा, हा राक्षस इतका भयंकर आहे की त्याने भल्या भल्यांची बोलतीच बंद केलीये. त्याला "बाटलीत बंद" करण्यासाठी पृथ्वीवरील मोदी नावाच्या महामानवाचे  अथक प्रयत्न सुरू आहेत. त्याने त्याच्या देशालाच "बंदिवान" करून टाकले आहे. तुरुंगवास जणू. जेणेकरून तो राक्षस ह्या तुरुंगाच्या अभेद्य भिंती पार करू शकणार नाही. तो  कधी लोकांना दिवे लावायला सांगतो तर कधी टाळ्या वाजवायला सांगतो. लोकांनीही व्रत वैकल्ये, उपास तापास, पारायणे सुरू केलीयेत. "
 विष्णुदेव:" काय म्हणालात मुनीवर? राक्षसाला घालवण्यासाठी टाळ्या वाजवल्या? मग? घाबरला का तो राक्षस? हा मनुष्य प्राणी म्हणजे कमाल आहे बाकी.  आम्हाला कसं सुचलं नाही कधी हे? तुमच्या त्या "महामानव " चं दर्शन घ्यावे लागते. असो. तर कुठे होतात मुनीवर तुम्ही?" 
नारदमुनी: "पृथ्वीवरच होतो देवा.  पण मानवाकडे एक गोष्ट मात्र "जादुई" म्हणता येईल अशी आहे बरं का. ज्यामुळे तो कोणत्याही संकटात असला तरी एकटा पडत नाही.ती गोष्ट जवळ असली की त्याला कशाचीच उणीव भासत नाही. एकमेकांना स्पर्श न करताही संपर्कात रहाण्याची जादू.  
देवी:" ती कोणती मुनीवर?"(आतापर्यंत शांतपणे ऐकत असलेल्या देवींनी आश्चर्याने विचारले) 
नारदमुनी: "गोष्ट कसली, जादुई यंत्रच म्हणाना. प्रत्येकाकडे  एक चौकोनी डब्बा आहे, जो सतत त्याच्या हातात आणि डोळयांसमोर असतो. त्याच्याकडे पाहून,  लोकं हसतात, खिदळतात, गप्पा मारतात. चॅटींग म्हणतात त्याला. त्यात म्हणे त्यांना बसल्याजागी पूर्ण जगाची माहिती मिळते.प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यातून ते सतत एकमेकांना ज्ञानाचे, उपदेशाचे डोस पाजत असतात."
देवी:" (मध्येच) मुनीवर, ते जादुई यंत्र कसं दिसतं? स्वामी, मलाही हवंय तसलं जादुई यंत्र. हा माझा हट्ट समजा हवं तर. मी आजपर्यंत कधी काही  मागीतलाय का आपल्याकडे स्वतःसाठी?"
 विष्णुदेव:" देवी, भलता हट्ट करू नका.तुम्हाला इथे स्वर्गात काय कमी आहे? तुम्ही स्वतः ऐश्वर्य सम्पन्न आहात. सगळी सुखे पायाशी लोळण घेत असताना त्या"भिकार" यंत्राची अभिलाषा कशाला?(लक्ष्मी रुसते) तिची नाराजी पाहून नारदमुनी म्हणतात," देवी, आपण इतक्यात कधी देवावर रुसून माहेरी निघून गेला होतात का? त्या यंत्रात असं देखील म्हटलं होतं की लक्ष्मी रुसून माहेरी जाते तेव्हा नारायण विष्णू च्या रुपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात आणि विष्णूचे सूक्ष्म रूप म्हणजेच "विषाणू" .
देवी:" अगबाई! हे देखील माहीत आहे त्या यंत्राला? देवा, आता तर मला ते जादुई यंत्र हवं म्हणजे हवंच."
 विष्णुदेव:"देवी, तुम्ही ते यंत्र घेऊन बसलात तर स्वतःला त्यात हरवून बसाल, मग भक्तगणांनी कुणाकडे पाहायचं?(आणि माझे पाय कुणी बरं चेपायचे?) एक लक्ष्यात असू द्या देवी, मानवी यंत्र  पृथ्वीवरच शोभून दिसतात. ती स्वर्गात आली तर स्वर्गाची पृथ्वी व्हायला वेळ कितीसा लागणार? एकवेळ पृथ्वीचा स्वर्ग झालेला केव्हाही उत्तमच पण स्वर्गाची पृथ्वी नको व्हायला." 
नारदमुनी:" पण तुम्हाला सांगतो प्रभो, पृथ्वीवर देखील आपल्यासारखी माणसे आहेत बरे का. जे संकट काळात  गरजू  लोकांसाठी धावून जातात, स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्याची धडपड करतात. "अगदी देवासारखी".
 विष्णुदेव:"आम्हाला अभिमान आहे अशा  गुणवान, नीतिमान आणि सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या लोकांचा. चित्रगुप नोंद घेतच असणार त्यांची. "
 नारदमुनी:" खरंय देवा. सध्या चित्रगुप्ता पेक्ष्या यमराजाचेच काम वाढलेले दिसतेय.त्या पृथ्वीवरील राक्षसाने कितीतरी लोकांना यम सदनास पाठवले आहे. काहींनी त्याच्या भीतीने स्वतःच स्वतःला यमाच्या हवाली केलंय. "
विष्णुदेव:"मग? ह्यावर उपाय काय?"
 नारदमुनी:" मलाच काय विचारताय देवा? उपाय आपणच शोधून काढायचा. काहीतरी चमत्कार करा आणि वाचवा पृथ्वीवरील निष्पाप जीवांना.   आता "चमत्कारच" काय तो घालवू शकेल त्या महा भयंकर राक्षसाला."
 विष्णुदेव:" मुनीवर, अहो, तुम्हाला मी आधीच म्हटलंय, मनुष्य हा बुद्धिवान प्राणी आहे आणि मुख्य म्हणजे तो हार मानणाऱ्या तला नाहीच.  
आताचा मानव हा चमत्कारावर विसंबून रहाणारा नाही तर स्वतःच्या बुद्धीवर आणि कर्मावर विश्वास ठेवणारा आहे. तर्कशुद्ध, विज्ञान निष्ठ दिशेने जाणारा आहे. तो नक्कीच यातून बाहेर पडेल, अगदी यशस्वीपणे. " (तितक्यात ब्रह्मदेव, महादेव वगैरे सर्व देवमंडळी प्रवेश करतात आणि एका सुरात बोलू लागतात)   
   "अगदी योग्य विधान केलंत  नारायणा. मुनीवर, आपण सर्व मिळून पृथ्वीवर  "देव" रूपाने मदत करणाऱ्या सर्वांसाठी पुष्पवृष्टी करूया आणि अखिल मानव जातीला आशीर्वाद देऊया.
 "कल्याणमस्तु, शुभम भवतु" 🙏🙏🙏


माणिक नेरकर.

Wednesday, April 8, 2020

छंद


2010 ला theme बुक बीसी घेतली होती. एक विशिष्ट विषय किंवा शब्द देऊन त्यावर काहीतरी स्वतः चे लिहून ते वाचायचे. त्यावेळी लिहलेला हा लेख.     

              * छंद *                  
मोहिनीचा बुक बीसीचा मेसेज मिळाला. विषय समजला hobby! पण त्याच्या पुढे c h a n d a काही केल्या समजलं नाही. खूप वेळ स्पेलिंग जुळवलं, विचार केला केला आणि विसरले. पण hobby मनात रेंगाळलं. म्हटलं चला जुन्या पेपरच्या गठ्ठ्यात हॉबी वर काही मिळतं का पाहावं म्हणून जुन्या लोकसत्ताच्या पुरवण्या चाळत होते. आणि स्वतःच्या hobby वर विचार चालूच होता. तेवढ्यात एक हेडिंग वाचलं 'छंदातून व्यवसायाकडे ' आणि मग माझी ट्युब पेटली की मोहिनीचे chanda हे छंद आहे. स्पेलिंग चा अर्थ असा अचानक सापडल्याने मला जरा बरं वाटलं.

बापरे लोकं काय ग्रेट असतात, छंदातून व्यवसाय पण करतात आणि कुटुंबाला आर्थिक हातभार पण लावतात. धन्य धन्य ते लोकं आणि त्यांचे छंद - व्यवसाय! मग मी माझे छंद आठवू लागले. आम्हाला मेलं छंद आठवावे लागतात न! अशी कोणतीही उपजत कला, गुण त्या ईश्वरने दिली नव्हती. हे एक कारण आणि दुसरे कारण म्हणजे वेळेनुसार त्यात बदल होतं होते. तसे लहानपणापासून वाचन, चित्रकला, नाटकात काम करणे, गाणं म्हणणे वगैरे कॉमन छंद सगळ्यांना असतात तसे मलाही होते. पण त्या छंदांची जोपासना, उपासना वगैरे काही करणं झालीच नाही. अहो वेळच नव्हता न! काही कला आपल्यात आहे हे लक्षात यायलाच आधी बरेच दिवस लागले. (हे समजायला  आधी आत तर काही हवे न!) त्यात वर्ष, दिड वर्षात सतत बदली, क्वार्टर गावाच्या बाहेर एका टोकाला, कोणात मिसळण्यात बंधन मग काय छंद जोपासणारा कप्पाळ! शिक्षणच कसंबसं पूर्ण केलं ते पूर्ण व्हायच्या आत लग्न झालं. मग छंदांचा आणि माझा संपर्कच तुटला. मला वाटतं काळावेळा प्रमाणे माझे छंदही बदलत गेले. नाही म्हणायला थांबत, अडखळत मी बरेच छंद जोपासले. लग्नानंतर काही दिवसांनी मी सतारीचा क्लास लावला. इथेच शकूताईंकडे. किती आनंद झाला होता मला इतक्या जवळ क्लास मिळाल्याचा. पण महिन्या दिड महिन्यातच माझं आणि सतारीचं काही जमत नाही असं माझ्या लक्षात आलं. नाही म्हणायला बोटं दुखू लागली आणि घरही. सतारीचा आणि संसाराचा षड्ज काही केल्या जमेना. दिड दा दिड दा वाजवतांना खूप दमछाक होऊ लागली. मग छंदाचा छांदिष्टपणा थंड बस्त्यात पडला.

मग अनेक दिवसांनी मी गाण्याचा क्लास लावला. मी गाणार किंवा रियाज करणार म्हटलं की नवर्‍याला रेडिओ, टेपरेकॉर्डर लावायची उर्मी येई. मुलं बिचारी रडवेल्या चेहर्‍याने, शिक्षा झाल्यासारखे माझ्याकडे बघायचे. घरातील ही 'खास ' वातावरणनिर्मिती पाहून माझाही गळा दाटून यायचा. दाटलेल्या गळ्यातून रडगाणं म्हणण्यापेक्षा गाणं सोडलेले बरे, बिचारे माझे कुटुंबीय तरी सुटकेचा श्वास सोडतील अशी मला खात्री झाली. बरं हे सर्व पोरांना क्लास लावून मी पण शिकण्याच्या प्रयत्नात होते. सोडायला जा घ्यायला जा अशा चकरा करण्यापेक्षा मी पण गाणं शिकायला जावे असा साधा सरळ विचार केला पण पठ्ठे दोघे बहिण भाऊ बाबांचे पक्के शिष्य. ते जाम काही शिकले नाही आणि माझाही 'सा' लागू दिला नाही.

मग आणखी काही दिवसांनी मी पाककलेत निपुण व्हायच ठरवलं. स्वयंपाक करणे ही एक कला आहे असं मला नुकतच कळल होत ना! नविन छंद सापडला. मग वाच रेसिपी कर रेसिपी, मग खाऊ घाल- रेसिपी अस अगदी उत्साहात, आनंदात सुरू झालं. रेडिओ, टीव्ही, पुस्तकं, मासिक, पेपर सगळे माध्यम पालथे घातले, त्यात काही माझे घातले, मग सर्वांना खाऊ घातले. पोरांचे चेहरे पुन्हा केविलवाणे. नवरा बिचारा आधीच कमी बोलतो- बोलतीच बंद झाली. सगळ्यांनी एक आवाजात 'भुक सहन करतो पण रेसिपी आवर' भीक नको पण कुत्रे आवरच्या तालावर म्हटले. आई तू कशाला इतकी मेहनत करते. इति मूलं, अंग कशाला ते करण्यात वेळ घालवतेस? तू दमतेस - इति नवरा. आपण होटेलमध्ये जाऊ या कि- इति सर्व मंडळी एका सुरात. मग मी याही छंदातुन सपशेल माघार घेतली. सगळ्यांनी सुटल्याच आनंद साजरा केला होस्टेलला जाऊन. आणखी काही दिवस सगळ्यांचे चांगले गेले.माझा पुन्हा नवीन छंद शोधण्याचा ध्यास सुरू झाला. मग लिखाण करावसं वाटू लागलं. वाचन धीम्या गतीने सुरू होते मग त्याची गती वाढवली. चिंतन, मनन (?) करण्यात वेळ जाऊ लागला छान. तर परत सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. पोरांचं झालं सुरू... आई माझी ती अमुक वस्तू दिसत नाही शोधून दे न, आई माझी drawing book पूर्ण करून दे नं! आई हे दे आई ते दे. मग मी, 'अरे असेल तिथेच कुठे बघ जरा नीट मला वाचू दे.' 'Drawing book तुझी तू पूर्ण कर मला लिहू दे.' अगं आॅफिस मध्ये चहा पाठवशील. किंवा आज आपण बाहेर जाऊ, इकडे जाऊ, असं करू तसं करू... माझा आपला नन्नाचा पाढा. अहो मला वाचायचय, लिहायचय, लायब्ररीत जायचयं, तुम्ही जा. पुन्हा सर्वजण माझ्या छंदापुढे हतबल झाले. मग मात्र म्हणाले माऊली हे वाचन, लिखाण बंद केलेस तर फार छान होईल. कारण ते लिहलेले त्यांना ऐकावे लागायचे ना! मुलं अभ्यास, ट्युशन, खेळ याचे कारणं देऊन सुटका करून घ्यायचे. पण बिचारे मुलांचे बाबा... कधी ऐकायचे पण त्यांना नेमके त्याच वेळी खूप सारे काम आठवायचे किंवा फोन यायचे. त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगूनच ठेवले होतं माझा मिसकॉल आला की मला सतत फोन करत जा. हे मला त्यांनीच माझा छंद थांबल्यानंतर एकदा चुकून खरं सांगितलं. मग मला फोन येण्याचं कोडं सुटलं.

मग मी बॅडमिंटन खेळण्याचा छंद जोपासला तो तसा बराच जोपासला गेला. त्यातून मंडळींना कुठलाही त्रास होत नव्हता,कारण कुटुंबिय आपापल्या ग्रुप बरोबर बॅडमिंटन खेळत होते. बॅडमिंटनचा हा छंद इतका जोपासला की तो छंद न राहता त्यात छांदिष्टपणाच जास्त घुसला. थंडी, ऊन, वारा, पाऊस या निसर्ग निर्मित गोष्टी आणि पाहुणे, आजारपण (कुटुंबातील इतर कोणी), अडचणी हे मानवनिर्मित काहीही समोर उभे राहो खेळ हा झालाच पाहिजे, 'देशाला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे' च्या तत्वावर. शेवटी तो छंद इतका अंगलट आला कि गुडघे कुरकुरु लागले. उगाच आणखी त्रास झाला तर घरातच बसाव लागलं असतं मग थाबण्याशिवाय पर्याय राहीला नाही. कुठे थांबायचे हे पण लक्षात येणं हे त्या छंदातूनच शिकायला मिळालं. अति तेथे माती न करणं हे लक्षात आलं. मग काय पुन्हा छंदाला राम राम.... पण त्यामुळे पण मंडळी खूषच झाली. कारण गरम नाश्ता त्यांच्या खेळानंतर मिळू लागला. आता मी नवीन छंदाच्या शोधात आहे आणि कुटुंबीय भयभीत! तर असे हे छंद पुराण!

ज्या लोकांजवळ छंद आहेत, कला आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी, जपण्यासाठी पुरेसा वेळ आहे उर्मी आहे त्यांना शतशः प्रणाम! छंदाच्या फंदातून मी मात्र पूर्णपणे बाहेर यायचं पक्कं ठरवलयं कारण मला समजलंय छंदासाठी अंगभूत गुणांची आवश्यकता नक्कीच हवी असते. म्हणजे God gift हो... त्याला प्रयत्नांची जोड दिल्यावर छंद व्यवसाय बनू शकतो आणि विरंगुळा होतो सर्वांचाच.

अंजली

Monday, April 6, 2020

वृत्तांचे स्वभाव

मला लहानपणापासून कवितांची आवड आहे. विशेषत: कविता मोठ्याने म्हणायला फार आवडतं. शिवाय खूप कविता
तोंडपाठ असल्यामुळे नेहमी कविता म्हणायची फरमाईश होते आणि अशा वेळी साधारणपणे गेय कविताच निवडली जाते. कविता
गेय असली की ती एखाद्या वृत्तात, छंदात किंवा जातीत बांधलेली असते. शाळेत वृत्ते शिकवली त्यावेळी एखादा खजिनाच हाती
गवसल्याचा आनंद झाला होता मला. कोणतीही कविता घ्यायची, तिचं वृत्त/ छंद शोधून अक्षर, गण, मात्रा मोजणे, त्यांची मांडणी
अभ्यासणे यात फार मन रमायचं. हळूहळू एका वृत्तातील अनेक कविता माहीत झाल्या आणि मनात आलं, माणसांसारखे वृत्तांचेही
स्वभाव असतील का? त्या दृष्टीने मुद्दाम पाहायला लागल्यावर एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे वृत्तांचेही स्वभाव असतात.
असं बघा, काही वृत्ते लांबलचक असतात तर काही छोटीशी. चटकन काही सांगायचं असलं तर ही छोटीशी वृत्तं उपयोगी
पडतात. उदाहरणार्थ भुजंगप्रयात. बारा अक्षरांचे हे छोटेसे अक्षरगणवृत्त. या वृत्ताचे उदाहरण म्हणजे मनाचे श्लोक.

मना सज्जना भक्तिपंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे.

आता हे चालीत म्हणून पाहा. या चालीत उपदेश किंवा बोधप्रद लिखाणच बरं वाटेल की नाही?
दुसरं उदाहरण घेऊ या दिंडी वृत्ताचं. हे मात्रावृत्त आहे. याचं उदाहरण म्हणजे
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात!

या वृत्ताची चालच इतकी करुण आहे की यात दु:ख हीच भावना मांडलेली शोभते. यात प्रेम व्यक्त केलं तर ते वियोगातलं आणि
युद्धाचं वर्णन आलं तर ते पराभवाचं किंवा सामान्य सैनिकाच्या वाट्याला आलेल्या नाहक बलिदानाचं बरं दिसेल.
यापेक्षा थोडं मोठं वृत्त आहे शिखरिणी. एखाद्या गोष्टीची माहिती द्यायची असेल तर ती यात द्यावी.

महाराष्ट्री सृष्टी स्वविभव चतुर्मास मिरवी,
अहा ती मैदाने चिररुचिर येथे न हिरवी,
वहाती येथे न स्थिर गहन विस्तीर्ण तटिनी,
पहा सह्याचीच प्रखर गिरिराजी शिखरिणी.

मराठी मुलुखाची व्यवस्थित माहिती दिली आहे.
रोमँटिसिझमच्या काळात इंग्रजी कवितेत ओड हा एक लोकप्रिय काव्यप्रकार होता. यात काव्यविषयाला थेट संबोधून
कविता सुरु होते. एखाद्या व्यक्तीबद्दल/ वास्तूबद्दल/ वस्तूबद्दल/ नैसर्गिक घटकाबद्दल किंवा घटनेबद्दल प्रेम/ आदर/आपुलकी व्यक्त करणे
हा त्या काव्याचा उद्देश असतो. असं काव्य जर मराठीत लिहायचं असेल, तर पृथ्वी वृत्त सर्वात चांगलं वाटेल.

अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे;
असो खलहि केवढा, तवकृपे सुमार्गी वळे.
उणे पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी,
शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी.

मोठ्या वृत्तांचंही बघा. मंदारमाला सारखं वृत्त उदाहरणादाखल घेऊ. यात चार ओळींत एक पूर्ण गोष्ट सांगता येते.

जाया हरीच्या जरी ठेवित प्रीति, त्यांची परी रीति अत्याग्रही.
कोल्हाळ हो घोर, वेल्हाळ तो थोर, त्याला न तो घोर बालाग्रही .
द्याया सुखाराम राहूनि निष्काम देई घनश्याम ती मागणी-
मंदारमाला रमालाच लाभे, उभा वृक्ष तो सत्यभामांगणी!

पहा, अवघ्या एका कडव्यात कृष्णाच्या बायकांचं वर्णन, त्यांचे स्वभाव, स्त्रीहट्ट, कृष्णाची भांडण हाताळण्याची रीत आणि शेवटी
स्वत:ला हवं ते साधून घ्यायची हातोटी हे सगळं एका गोष्टीच्या माध्यमातून येतं.
असंच निवेदनात्मक शैलीला सोयीचं वृत्त म्हणजे शार्दूलविक्रीडित. १९ अक्षरांचं हे वृत्त मंगलाष्टकं लिहिण्यासाठी वापरलं
जातं. एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायला हे सोयीचं आहे .

स्वप्नी गाढ निमग्न भोज असता ये जागृती त्याजला;
पाहे सुंदर मंदिरात भरली चंद्रप्रभा सोज्वळा.
जैसी कुंदलता फुलून खुलते, ते स्थान शोभे तसे,
योगी तेथ कुणी लिहीत बसला भोजास तेव्हा दिसे.

संपूर्ण प्रसंग डोळ्यांपुढे साकार होतो.
चामर, पंचचामर यांसारखी वृत्ते देवांच्या अष्टकांसाठी राखीव असल्यासारखी वाटतात, तर ओवीतून लोक परंपरा तर
अभंगातून भक्ती वजा करणं जवळजवळ अशक्य वाटतं. उर्दूमध्ये गझल आणि शृंगार याचं अतूट नातं आहे, मात्र मराठी गझल विद्रोह
आणि नैराश्यही व्यक्त करते.
तर अशी ही वृत्ते नि असे त्यांचे स्वभाव. अर्थात हे फक्त माझं मत होतं. तुम्हाला पटतंय का?

Sunday, April 5, 2020

धक्का

माझ्या मनात दिवस भर तिचाच विचार घोळत होता. दिवस भर मुंजीचे कार्यक्रम पार पडले. संध्याकाळी आम्ही सर्व मामांच्या घरी गेलो. रात्री सगळे जण बसुन गप्पा मारत असतांना पुन्हा मी अनू बद्दल मामींना विचारले,त्या मला म्हणाला अजुन तुझ्या दिमाख मैं वही हैंक्या?अस म्हणून त्या खुप जोरात हसल्या.त्यांच्या सोबत घरातील सर्व जण हसत होती. शेवटी एकदाचं मामीनी तिच्या बद्दल सांगितल.ऐकुण मात्र अगदीअस वाटल "छोटा पँकेट बडा धमाका" मला तर खुपच जोराचा धक्का बसला.मला रात्री काही लवकर झोप आली नाही मी तिचाच विचार करत होते!
           कारण तस खुपच मोठे होते माझ्या साठी ,ते असे कि तिला पहिली मुलगी नंतर मुलगा असे दोघ जण . पण तिच्या मोठ्या जावेला काहि मुल बाळ झाले नाहि त्यांनी खुप प्रयत्न केले . हिचा लहान मुलगा १२ वर्षाचा झाल्या नंतर तीने तिसरा  चान्स घेतला आपल्या जावेसाठी जेव्हा की पहिले दोन्हि मुलांच्या वेळी हिचे सिझीरियन झाले होते तिसरा चान्स म्हणजे जीवधोक्यात  घालण्यासारखे होते.पण त्याची पर्वा केली नाहि.जे काहि होईल ते जावेला द्यायचे असा निश्चयच केला होता दोघांनी पण*हे ठरल्यावर
   त्यानी घरात सगळ्यांना सांगितल  ,आधी सगळ्यानी विरोध केला होता पण हिने सगयळ्यांची समजूत काढुन होकार मिळवलामग जशी गोड बातमी समजली तसा सगळ्याना खुप आनंद झाला .तिच्या मोठ्या जावेने तीचे सगळे डोहाळे पुरवले जणु काहिती पहिल्यांदाच आहे . अनुला मुलगी झाली ती दिड महिन्याची झाल्या नंतर  दत्तकविधान करुन रीतसर मुलीला त्यांच्या पदरात घातले. त्यानंतर हिने त्या मुलीचे काहिच केले नाहि फक्त दुध वाटित काढुन देणे बस इतकेच,सहा महिन्यापर्यंत नंतर  ते पण नाहि. जणु काहि हि तीचा पोटचा गोळाच नाहि असे ,हौस वैगेरे केल्या पण पुतणी म्हणुन  हे सगळे ऐकुन मला काय पण आम्हा सर्वानां खुप मोठा धक्काच बसला.
         माझ्या मनात  विचार आला आपल्यावर, यदाकदाचीत अशी वेळ आली असती तर ? आपण हे करु शकलो असतो का?  हि ने एवढा मोठा त्याग करुनहि कुठे या गोष्टीची वाच्यतापण केली नाहि.कस सहन केल असेल अनुने .मी तर अनुला काय समजत होते अन ती ने तर मला चांगलाच धक्का दिला....

अपर्णा

Friday, April 3, 2020

करोना बाई कोरोना!....

K....for ....  अंह ........कपूर !तिही एकताबाई!....ह्या बाईंनी खरी ओळख करुन दिली ह्या K अक्षराशी ......तिला म्हणे हे अक्षर पावतं ...हं...हं...हं.. कसोटी जिंदगी की, क्युँ की साँस भी कभी बहु थी .....अशा सिरीअल्सनी त्या काळात t.v. वर नुसता हैदोस घातला होता. एका हुश्शार मुलीने सर्व सामान्यांच्या घरात जाऊन फॕशन कशाशी खातात ह्याचे धडे दिले आणि त्याचबरोबर फॕशन म्हणजे अंगावर भसाभसा सगळं चढवून घेणे अशी आमच्यासारख्या बावळट लोकांची समजूत करुन दिली. घरातही काम करताना अंगभर दागिने घालून भरजरी साड्यांच्या जड ओझ्यात कसं वावराव याच   प्रशिक्षण दिलं ,तर असो हा झाला तिचा अल्प परिचय तोंडओळखही म्हणू शकता. बाई अतिशय धडाडीची ,जिद्दीची  तिने जिद्द सोडली नाही आणि K ची पाठपण! .........कारण तोच तिचापाठीराखा. पापी पेट भरवणारा खंदा आधार!.....बाईने जाम उतमात माजवली Kच्या भरवशावर. ...आजही t.v.जगतात बाईच नांव आदराने घेतलं जातं... मिळमिळीत कथा कहाण्या ,उपदेशामृत पाजणार्या गोष्टी बाजूला जाऊन हीने t.v.जगतातील आद्य क्रांतीकारक हा किताब पटकवला. टाळ्यांच्या कडकडाटात तीचं प्रचंड कौतुक!

    गया वो जमाना गयी वो बाते
     नया यह जमाना देखो नयी बाते

असे  म्हणत ,ठसवत आपल्या मेंदूला गद्गदून   प्रेमाने चक्क तिने जी मिठी मारली ती आजतागायत . ....!तिच्यासोबतच तिचा पाठचा भाऊ kjo हा पण Kवेडा !!!  येडे कुठले. याच चराऊ क्षेत्र मात्र वेगळं हा मोठ्या पडद्यावरला "बाबा" तिथे याची हुकमी पाने घेऊन चालवलेली सत्ता..... !वीट नुसता! .....जमिनीवरच  काहीच नाही रावं सगळे हवेत उडणारे रग्गड प्राणी !घरात सदासर्वकाळ अगदी झोपताना पण सुटाबुटात दिसणारे . डोकचआऊट करतात निव्वळ.

     आता तरआणखी एक Kराशीला येऊन बसला.त्यान तं थेट पायच  आवळले.  होs होs sss मुसक्याही आवळल्या ...... अरे हो  हो !   ......बोलू तर द्या !    बोलता येतं तरीपण.......त्यावर बंदी नाहीच मुळी!!!   तो  करोना कां फरोना जगभर हैदोस घालत सुटला आहे अगदी महाराज्यांच्या राज्यात येताना खानाने घातला तसा !!! पण म्हणून महाराज घाबरले थोडीच! !!   .....गनिमी कावा!!    .......वापरुन केलं ना त्याला पायचित् !....यालापण हुसकवुन लावायचं तर गनिमी कावाच वापरला पाहीजे हे कावेबाज सरकारच्या ध्यानी येताच जनतेची पायबंदी केली .....त्यासाठी नाना तंत्र उपाय शोधून काढले ......दूरदर्शनला पुन्हा सुगीचे दिवस आले .घरात बसणारे सगळेच  जुन्या खेळांना उजाळा देऊ लागले. पत्ते ,अष्टचंग , खडे(नऊ-खऊ) ,चिमणी ऊड, कावळा ऊड सारखे खेळ नव्या पिढीला कळले. त्यानिमित्ताने आपला हा लोप पावलेला संस्कृतीक वारसा  पुन्हा जीवंत झाला ,प्रवाही झाला. दूरदर्शनचे !तर अच्छे दिन आ गये !.....असं झालं ....!काय  नशीब असतं बघा कधी कोणाच उजळेल काहीच सांगता यायचं नाही. त्यांच्या राशीतले राहु-केतु पार पसार  झाले .बहुदा कोरोनाला घाबरले असावे. .....चिल्....जस्ट किडींग.....तर कुठे होतो आपण......: हा आठवलं .दूरदर्शन, अच्छे दिन ! .....असं सगळं सुरु होतं.....बघा मंडळी चोर पावलांनी कां होईना अच्छे दिन येत आहेत........हा....हा...हा..

.@अर्चना मुळ्ये.

Wednesday, April 1, 2020

भाग ३

आपण ठरवतो एक आणि घडतं भलतंच!
 बरोबर ना?
असा अनुभव मला पहिल्यांदा आला माझं वैद्यकीय शिक्षण घेताना. एक वर्ष अभ्यासक्रम सुरू होऊन झालं होतं. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी रुळायला लागल्या होत्या त्यातच कुटुंबामध्ये पुण्याला स्थायिक होण्याचे वारे वाहू लागले होते .अर्थात माझ्या शैक्षणिक प्रवासाला चांगलाच फायदा होणार होता .त्यामुळे "विद्येच्या माहेरघरी" पुढचं शिक्षण घेण्याला मी तयार झाले. मात्र प्रकरण एवढं साध नव्हतं. पुणे विद्यापीठातल्या नंबर एक वर असलेल्या टिळक आयुर्वेद कॉलेज मध्ये ट्रान्सफर घ्यायला बारा अर्ज आले  होते आणि जागा तीन होत्या .माझ्या बाबांची चिकाटी आणि या सरकारी कामातली समज यावेळी खूप महत्त्वाची ठरली. बड्या राजकीय असामीं चा वशिला असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचा कट त्यांनी  मुंबईत वैद्यकीय संचालनालयाच्या ऑफिसमध्ये सतत पाठपुरावा करून हाणून पडला आणि माझी ऍडमिशन ऑन ट्रान्सफर नक्की झाली.

या आनंदात आपण नागपूरच्या बऱ्याच गोष्टी सोडून जातोय याचं भानच राहिले नाही .आमच्या तिघींची गट्टी असलेल्या आपण आता दोघीच मैत्रिणी उरणार म्हणून त्या दोघी नाराज झाल्या. कॉलेजमधल्या पंडितजींनी (सर )बाबांना अर्ज देतांना स्वतः येऊन म्हटले- रहने दो वर्षा को यही| हॉस्टेल में  रहकर पूरी करने दो  डिग्री |  अनँटाँमी शिकवणाऱ्या  मॅडम भयंकर कडक शिस्तीच्या! वर्षभर कोणाशीही चेहर्‍यावर विशिष्ट त्रासिक उग्र भाव ठेवल्याशिवाय न बोललेल्या !मात्र त्या  सुद्धा जेव्हा- एकाच ठिकाणी पूर्ण होऊ द्या तिचं शिक्षण. चांगली स्टुडन्ट आहे ती. नका करू तिला डिस्टर्ब.- असे स्वतःहून येऊन बाबांना म्हणाल्या तेव्हा मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. वर्षभर जाम त्रस्त केलेल्या मॅडमनी( त्यामुळे आम्ही त्यांचं टोपणनाव रक्तपिपासू ठेवलं होतं) चक्क अस्पष्ट का होईना हसरे भाव ठेवून असे म्हटले यावर विश्वास बसत नव्हता .मात्र अखेरीस पूर्ण कुटुंब पुण्याला निघाल. त्यावेळी पहिल्यांदा ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये मी, आई, बाबा बसलो होतो. गाडी सुटली तशी बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर माझ्या  दोघी मैत्रिणी पाणावलेल्या डोळ्यांनी  बाय करत होत्या.

पुण्यातल्या कॉलेजमध्ये जाताना सगळीकडे उत्साह भरून गेला होता .छानच वाटलं कॉलेज. लहान बिल्डिंग असली तरी इथे आयुर्वेद शिकणं भाग्याचं आहे याची कॉलेजचा राऊंड मारताना खात्री मिळाली. कॉलेजला संलग्न ताराचंद हॉस्पिटल पुण्यातल्या जुन्या नावाजलेल्या हॉस्पिटल्स पैकी एक .तिथल्या डिपार्टमेंटच्या पाट्या वाचताना एकापेक्षा एक बडी नावं येत होती. वैद्य नानल वैद्य गोगटे वैद्य तनुजा नेसरी , डॉक्टर पां ह कुळकर्ण ,डॉक्टर डोळे ...या मिळालेल्या संधीचं  चीज करण्याचा निश्चय मी त्यादिवशी केला.

कॉलेजमध्ये माझ्याबरोबरच एक मुंबईच्या सायन कॉलेजहून आणि दुसरी नाशिकच्या कॉलेजहून ट्रान्सफर घेतलेली पण मूळची सदाशिव पेठ पुण्याची असलेली अशा दोघी जणी होत्या. म्हणजे थोडक्यात आम्ही  "मुंबईकर ,पुणेकर, नागपूरकर" तिथे एकत्र आलो आणि आमची मैत्री पण चांगली झाली. कॉलेज च्या घरापासून च्या अंतराचा मात्र प्रश्न होता .18 किलोमीटर बसने रोज जायचे आणि पुढे दहा मिनिटे चालत जायचे एवढं रोज करावे लागणार होतं आजच्यासारखे तेव्हा मी धष्टपुष्ट नव्हते चेपायला त्रास होऊ लागला. झेपायला त्रास होऊ लागला.  घरी येऊन अभ्यासाची शक्ती उरायची नाही. मग कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहावे म्हणून तयारी केली.  गादी सकट सगळे सामान होस्टेलला घेऊन निघाले. सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार-रविवार घरी येणार वगैरे सांगून होस्टेलला पोचले. पहिल्या रात्री झोप लागली नाही, दुसऱ्या दिवशी जेवण गेलं नाही तिसऱ्या दिवशी सकाळी उठून चंबूगबाळं बांधून परत घरी आले. "अपडाऊन करेन पण होस्टेलला राहणार नाही" यावर शिक्कामोर्तब झालं. 

मग नऊ वाजता च्या क्लिनिक्स, 12 ते 4 कॉलेज असं करायला 7:30 च्या बसणे निघायचं आणि 5:30 पर्यंत परत यायचं असं रुटीन सुरू झालं. पुढची दोन्ही वर्ष शिकणे ,वाचणे, प्रॅक्टिस भरपूर सुरू होती. कॉलेजच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने बरेच शिकायला मिळत होते. एका एका प्रोफेसर ची शिकवण्याची पद्धत ,पेशंट तपासण्याची पद्धत, पुण्यात आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये अटेंड केलेली आरोग्य शिबिरे, प्रायव्हेट क्लिनिक्स मधून शिक्षण सुरू होतं. एक सुखद आठवण म्हणजे दुसऱ्या वर्षी "मिस आयुर्वेद" झाल्याची !लेखी परीक्षा, परीक्षकांची तोंडी परीक्षा स्टेजवर देणे यावर हे टायटल मिळालं होतं. याशिवाय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची ट्रॉफी आमच्या कॉलेजला मिळाली आणि प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस मला मिळाले होते.
याशिवाय बारामतीचा कॅम्प जिथे अँप्रन नं  नेल्यामुळे सर्जिकल गाऊन घालून रुग्ण तपासले होते ,भिमाशंकरला औषधी वनस्पतींच्या अभ्यास शिबिराला मधमाशांनी केलेली आमची भीतीदायक फजिती ,हर्बेरियम करताना सलग तीन रात्री आणि दिवस आम्ही  दहा मैत्रिणींनी एकत्र केलेली मेहनत इत्यादी इत्यादी खूप कडूगोड अनुभव आणि आठवणी आहेत. त्या सगळ्यातून शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली.नानल हॉस्पिटल आणि देहूगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही इंटर्नशिप होती. त्यावेळी बरेचदा प्रत्यक्ष औषधी कल्प तयार करणे( शतावरी कल्प,  च्यवनप्राश यासारखे) तसेच सलाईन लावणे ,सर्पदंशाच्या केसेस, डिलिव्हरी करणे असे खूप काम सीनियर च्या मार्गदर्शनात केले आणि अनुभवाची शिदोरी वाढवत नेली.

 डॉक्टर म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यावर मला बाबांकडून स्कूटीचे बक्षीस मिळाले. पुण्यातल्या शोरूम पासून घरी बावीस किलोमीटर ती नवीन स्कुटी बाबांना मागे बसवून चालवत आणली तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. सोबत माझा भाऊ त्याच्या बाईकवर वहिनी बरोबर होताच. याच भावाने फायनल परीक्षेच्या संपूर्ण दहा-बारा दिवसात मला दोन वाजता सेंटरवर पोचवून पाच वाजता घ्यायला येण्याचं काम आपल्या कंपनीचं काम सांभाळून  केलं होतं. अशा प्रकारे एक क्वालिफाईड डॉक्टर ,आयुर्वेद तज्ञ होण्यापर्यंत मजल मारली होती. आता खरे आव्हान स्वतःच्या प्रॅक्टिस चे होते. प्रॅक्टिस करावी का पुढे शिकावं? आधी लग्न करावं (आई-बाबांच्या म्हणण्याप्रमाणे) आणि मग प्रॅक्टिस करावी? काही दिवस या विचारातून पुढचा मार्ग ठरवून पुढच्या प्रवासाला लागले ...त्याबद्दल पुढच्या भागात......