Wednesday, March 4, 2020

एक थप्पड

" ऑखो मे जल रहा है पर
        बुझता नहीं धुआ
        उठता तो है घटा सा
        बरसता नहीं धुआ"  
गुलजार साहेबांच्या या ओळी म्हणजे माणसाच्या मनातील विचारांचा कल्लोळ,मनाची घालमेल, उलाघाल ह्या सर्व भावनांचं प्रतिबिंबच आहे.जिथे मन आहे तिथे विचार आहेत आणि जिथे विचार आहेत तिथे वैचारिक गुंताही आलाच, ओघाने. ; पण हा गुंता सुटायला हवा अशी इच्छा असणारे त्यातून बाहेर पडण्यासाठी विवेकाचा आधार घेतात. सारासार विचार करून निर्णय घेणे किंवा व्यावहारिक पातळीवर सर्व बाजूनी विचार करून निर्णय घेणे ज्याला जमते तो ह्या गुंत्यातून बाहेर पडण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होऊ शकतो.
 'आत्मभान', 'आत्मसन्मान', 'सेल्फ रिस्पेक्ट' ----अत्यंत वजनदार शब्द. पेलायला जितके अवघड, पचवायला त्याहीपेक्षा कठीण. पचवायला गेलं तर आयुष्यच पणाला लागतं, विषमय होऊन जातं. त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर आयुष्य सावरूही शकतं.
      नुकताच "थप्पड" चित्रपट पहाण्याचा योग आला. विशेष म्हणजे सिनेमा  पहाण्याच्या एक दिवस अगोदर ह्या नावाचा सिनेमा आहे ही देखील कल्पना नव्हती. पण मैत्रिणींच्या ग्रुप वर चर्चा झाली काय, लगेच आम्ही 7/8 जणी ठरवून मोकळे झालो काय आणि "थप्पड" चा अनुभव घेतला काय ------
    खरं सांगायचं तर हे असले नाजूक, संवेदनशील विषय फक्त कथा- कादंबरी, नाटक ,सिनेमे ह्यात लिहिण्यासाठी, दाखवण्यासाठी असलेले, "पुरस्कार प्राप्त" विषय आहेत असे माझे प्रांजळ मत आहे. कारण आशा विषयांमध्ये भावनिक गुंता जास्त दाखवला जातो, मनाची कुतर ओढ, त्यातून निघण्याची धडपड आणि शेवटी मनाच्याच कोपऱ्यातून निघालेला आवाज ऐकण्याची तयारी----विषय असे भावनिक गुंत्याभवती फिरायला लागले की श्रोत्यांना चट्कन अपील होतात; पण वास्तवात पहाता, अशा केसेस मध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रत्यक्ष आयुष्य जगण्यासाठी ते जास्त सोयीस्कर ठरते. अर्थात, "आतल्या आवाजाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून." 
      एक अनाहूत क्षण--अचानक उद्भवलेला--मनाच्या अत्यंत दोलायमान स्थितीत, फ्रस्टेशनच्या  मनःस्थितीत असलेल्या नवऱ्याचा तोल ढळू नये,त्याचा संताप विकोपाला जाऊ नये म्हणून त्याची पत्नी त्याला आवरू पहाते. त्याला शांत करण्याच्या हेतूने त्याला अडवायला मध्ये येते आणि----संतापाच्या अग्रीम टोकावर विराजमान असलेला नवरा, खाडकन  तिच्या थोबाडीत मारतो, त्याच्या स्वताच्याही नकळत."थप्पड" ---एक जोरदार थप्पड, अनपेक्षितपणे बसलेली, तेही काहीही चूक नसताना--भर पार्टीत--सर्व जमलेल्या लोकांच्या देखत----निश्चितपणे एका पत्नीसाठी, एका स्त्रीसाठी अत्यंत लाजिरवाणी, ओशाळवाणी आणि अपमानास्पद गोष्ट. पत्नी ही एकच व्यक्ती अशी असते नवऱ्यासाठी, जी त्याला हक्काची वाटते, जिला नंतर चुचकारून, गोडीगुलाबीने  मनवता येऊ शकतं, अगदी सहज अशी तमाम नवरेशाहीला पूर्ण खात्री असते,आणि ते वास्तव आहे. स्त्रियांना  "समजून घेण्याची" सवय झालेली असते. म्हणूनच कदाचित अशा "थपडा" मारल्या जातात, तिला परस्पर गृहीत धरूनच. मग त्या शाब्दिक असोत वा "डायरेक्ट". आणि हे गृहीत धरणच बायकांना नको असतं, नको होतं,त्यांच्या अस्मितेला धक्का पोचतो,त्यांचं आत्मभान जागृत होतं आणि त्या स्वतःविषयी वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायला लागतात---अशी वेळ प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात कधी ना कधी येतेच.अशा  परिस्थितीत जे निर्णय घेतले जातात, त्याने कधी कधी संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून जाते. एकच नव्हे तर एकाच वेळी त्यांच्याशी जोडली गेलेली अनेक आयुष्य विस्कळीत होऊन जातात. पार कोलमडून पडतात. म्हणून हाच खरा कसोटीचा क्षण असतो. माणसाची सारासार विवेकबुद्धी त्याला कोणता निर्णय घयायला भाग पाडते ह्यावर पुढील भविष्याचे निर्णय ठरत असतात. त्या व्यक्तीच्या ही आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांचेही. मी ह्या ठिकाणी मुद्दामच "माणूस" हा शब्द वापरलाय कारण आशा प्रकारच्या अनाहूत चुका फक्त पुरुषांच्या हातूनच होतात असे नाही तर स्त्रियांच्याही हातून संतापाच्या, भावनेच्या भरात  घडतात चुका आणि त्यातूनच टोकाचे निर्णय घेतले जातात.अशा वेळी शांत राहून एकमेकांना समजून घेणं,त्यातून योग्य तो मार्ग काढणं ही दोघांचीही जबाबदारी  असते. 
     थप्पड सिनेमाविषयी बोलूया. मला काही समीक्षा वगैरे करायची नाहीये त्यामुळे कथा, पटकथा, दिग्दर्शन, संवाद ह्या बद्दल न बोलता जे मनात विचार आले सिनेमा पाहून त्याविषयी च बोलते. (लिहिते)  
    पतीने पत्नीच्या अंगावर हात टाकणे ह्या गोष्टीचे समर्थन मी स्वतः कधीच करत नाही, करणारही नाही.पण----
पण ह्या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर काही मुद्दे मांडावेसे वाटतात.1) --नायिकेचा नवरा हा काही सराईत "मारकुट्टया" नवरा नाहीये, किंवा त्याने हेतुपुरस्सर तिच्या अंगावर हात टाकला नाहीये. तो सतत तिला मारहाण करतो, तिचा छळ करतो, डॉमिनेट करतो, तिला घरात दुय्यम वागणूक दिली जाते, असे काहीही दाखवले नाहीये. मग तोल गेलेल्या मनःस्थितीत  झालेल्या चुकीला कालांतराने का होईना माफी का मिळू नये? बरं माफी तरी कुणाला? आपल्या जवळच्याच व्यक्तीला ना? रस्त्याने जाताना कुणी  जाणून बुजून धक्का दिला, वेडे वाकडे बोललं तर नाईलाजाने दुर्लक्ष करतोच की आपण. मग ही तर आपलीच माणसे,सतत आपल्या अवतीभवती असणारी,  आपल्यासाठी धडपडणारी, आपल्यासाठी जगणारी---- आपली मुलं, जी आपल्या काळजाचा तुकडा असतात, ज्यांना जिवापलीकडे जपतो आपण, ती देखील मोठी झाल्यावर आपल्याला कधी तोडून बोलतात, अपमानास्पद वागणूक देतात, मन दुखावले जाईल असे वागतात, त्याना दूर लोटू शकतो आपण? त्यांच्यावर प्रेम करणे सोडून देतो? मग नवरा- बायकोच्याच नात्यात हा इतका "इगो" का? त्याला कितीही गोंडस नावे दिलीत तरी "इगोच" असतो तो शेवटी. आणि मुख्य म्हणजे एकदा  चूक झाली तर आधीच्या वागण्याचे सगळे संदर्भच बदलून जातात लगेच? त्याने/तिने त्याआधी केलेले भरभरून प्रेम, घेतलेली काळजी ह्याला काहीच अर्थ उरत नाही?  एका "थप्पड" ने संपतं सगळं? मन, भावना थिजतात लगेच, आतल्याआत?  मग पुढील आयुष्य तरी कुठल्या भावनेवर जगणार?
  2)---नवऱ्याकडून अपमान झालेल्या स्त्रीचा आत्मसन्मान एका थपडेने नष्ट होत असेल तर बाहेरच्या जगाकडून, समाजाकडून तरी तिला "त्या" सन्मानाची अपेक्षा म्हणण्यापेक्षा   विश्वास असतो का?
एक "घटस्फोटित" किंवा समाजाच्या दृष्टीने "नवऱ्याचे घर सोडून आलेली बाई" असा शिक्का बसलेल्या बाईला समाज तरी कितपत स्वीकारतो? किती रिस्पेक्ट देतो? बाहेरच्या लोकांचे जाऊ देऊ एकवेळ; पण घरातलीच अगदी जवळची  समजली जाणारी नातलग मंडळीही वाट्टेल तसे ताशेरे ओढायला कमी करत नाही. आई वडील ह्यांना काळजाचा तुकडा म्हणून संभाळावेच लागते, समजून घयावेच लागते, पण भाऊ भावजय, दिर, जावा सगळेच समजून नाही घेऊ शकत. कटू असले तरी वास्तव आहे ते. समाजाची मानसिकता इतक्या वर्षात बदलू शकलेलो नाही आहोत आपण, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. त्यात चूकही आपलीच आहे, अर्थात. लहानपणापासून मनावर तेच बिंबवले जाते, पुरुष प्रधान संस्कृतीतील पुरुषी वरचढ पणाआणि स्त्रियांना कायम नमते घ्ययची लावलेली सवय.   ह्या सिनेमात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, की नवरा जर आपली चूक मनापासून कबूल करत असेल, तिचे त्याच्या जीवनातील स्थान, महत्व मान्य करून भविष्यात अशी चूक न होण्याची ग्वाही देत असेल तर ---अर्थात सरेंडर व्हायला तयार असेल तर बायकोनेही फार ताणून धरू नये.
3)- -अजून एक महत्वाचे, ते म्हणजे घरातल्या भानगडी घराबाहेर गेल्या विशेषतः नवरा बायकोमधले वाद बाहेर गेले तर त्यांच्या नात्याची कशी चिरफाड होते ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोर्ट, वकील, वकिली सल्ले आणि डावपेच.. व्यक्तीगत भांडणे, हेवेदावे, द्वेष,वैमनस्य ह्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले की आयुष्याचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. शेवटी कोर्टाचे काम दोन्ही बाजू ऐकून निकाल देणे, वकिलांचे काम, स्वतःची केस स्ट्रॉंग करण्यासाठी प्रतिपक्षावर वाट्टेल तसे आरोप ठोकून केस जिंकण्याचा प्रयत्न करणे. त्यांना कुणाच्याही मानसिक अवस्थेशी, अंतरंगातील आंदोलनाशी काहीही देणं घेणं नसतं. मग अशा वेळी आपल्या आयुष्यचा गुंता आपणच सोडवणे केव्हाही  योग्य नाही का? आपल्या आयुष्याचे निर्णय इतरांवर सोपवले की त्याचा विचका झालाच म्हणून समजायला हरकत नाही. सिनेमात गोस्ट जरी शेवटी कोटात जात नाही तरी ज्या मनस्तापाला तोंड द्यायचे ते द्यावेच लागते. 
4)-- स्वाभाविकपणे प्रेक्षक जो विचार करू शकतात तो वेगळेपण जपणाऱ्या दिग्दर्शकांना मान्य नसतो त्यामुळे अगदीच वेगळा, अपेक्षे पेक्ष्या वेगळाच शेवट दाखवणे हे काही दिग्दर्शकाचे उद्दिष्ट असते . चित्रपट समीक्षकांसाठी देखील असे विषय आणि असे "शेवट" भारी ठरतात. असो. नायिकेला आपण प्रेग्नन्ट असल्याचे कळते तेव्हा साहजिक प्रेक्षकांना एक आशा वाटून जाते की चला बुवा, आता "सेटलमेंट" व्हायला हरकत नाही.;पण ह्या वेगळेपण जपणाऱ्या दिग्दर्शकांना ते मान्य नसते. प्रत्यक्ष व्यवहारात खोलवर विचार केला तर हेच जाणवते की अशा केसेस मध्ये बिचाऱ्या त्या "होणाऱ्या बाळाचा" काय दोष असतो हो? आई बापाची ताटातूट त्या निष्पाप जिवाने का म्हणून सहन करावी? त्याचा पूर्ण अधिकार नाही का, आई बापाचे प्रेम एकाच वेळी एकाच छताखाली मिळवण्याचा?  त्याच्या भविष्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा विचार नवरा-बायको दोघांनीही करायलाच हवा, तेही समन्वयाने.
      एक गोष्ट मात्र 100% पटली, सिनेमात, नायिका जेव्हा तिच्या सासूला म्हणते, "त्याने जेव्हा मला थप्पड मारली, त्याच वेळी त्याला दिलगिरी व्यक्त करायला कुणीच कसे सांगितले नाही? त्याच्याकडून चूक झालीये माझ्याबाबतीत, हे कुणीच कसे त्याच्या लक्ष्यात आणून दिले नाही? माझ्या भावनांचा कुणालाच कसा विचार करावा वाटला नाही? उलट मलाच समज दिली गेली की संसारात तडजोड करावीच लागते, तीही बायकानाच. माझ्या मनावरचे ओरखडे कुणालाच जाणवले कसे नाहीत?"  खरे आहे अगदी. मुलांच्या मनात लहानपणापासून हेच बिंबवले जाते की स्त्री आणि पुरुषामध्ये हा फरक आहेच आणि तो तसाच रहाणार आहे. त्यामुळे तशीच मानसिकता घडतही जाते.  स्त्रियांनी देखील सुरुवातीपासूनच स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिकले पाहिजे. बायको आहे आणि तीही फक्त गृहिणी आहे म्हणून केवळ नवऱ्याच्या हातात ऑफिस चा डब्बा, पाण्याची बाटली,  त्याचे पाकीट  देणे इतकंच काय तो गाडीत बसेपर्यंत बाहेर येऊन त्याच्या मागे त्याला खाऊ घालण्यासाठी धावणे---- ह्या गोष्टी तरी कितपत योग्य आहेत?   स्त्री जरी बाहेर कुठे काम करत नसली तरी ती संपूर्ण  कुटुंबाची जबाबदारी घेते, ती निभावते हे देखील तिचे कर्तृत्व च नाही का?   असो.  
  शेवटी एकच सांगावं वाटतं,  अनेक मान्यवर लेखकांनी म्हटल्यानुसार जर नवरा बायकोचे नाते हे मुरलेल्या लोणच्या सारखे असते, एकाच रथाची दोन चाके वगैरे---- तर मग  हातून घडलेल्या "कधीतरी च्या" चुकीसाठी दोघांनी एकमेकांना समजून घेऊन माफ करणं पुढील आयुष्य सुकर होण्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही का? सगळ्यांसाठीच?  तुम्हाला काय वाटतं? 
   गुलजारच्या ओळींनीच शेवट करते, 
" अगला पल  जीने के लिये
पिछले पल को विदा तो कर लो
 कल जो गया, वो गया नहीं है
मनोका बोझ लेकर चल रहे हो
बहुत भारी है, बोझा लेकर चलना
उम्मीदे कम करो, सफर लंबा है"        





माणिक नेरकर.

No comments:

Post a Comment