Sunday, February 9, 2020

आपला आवाज

कुछ छुट गया याद नही
न जाने किसकी चटखने थी
ये आवाज आयी
और अहसास दरारों मे
कैसे जा पहूचे।
  वाचता वाचता सहजच  मीनाकुमारीनं लिहिलेल्या या ओळींकडे लक्ष गेलं. नि त्यातल्या 'आवाज' शब्दानं मनात पिंगा घालायला सुरूवात केली. आवाज...! काय असतो हो? जन्माला आल्यावर येतो पहिला टॅह्यॅ तो असतो, आपला आवाज ! तो घशातून उमटतो. वाट्टेल तसा आयुष्यभर आम्ही त्याचा वापर करत असतो. तसा तो आमच्या शरिराचा महत्त्वाचा आणि आवश्यक असणारा भाग आहे.  प्रत्येक प्राणीपक्ष्यांकडे असतो. निसर्ग सृष्टीतही असतो. पण आवाजात शब्दांचा वापर करतो, तो मात्र केवळ मनुष्य ! प्रत्येकाचा आवाज सारखा असतो का? छे! तुम्ही सहज एक निरिक्षण म्हणून  आजूबाजूचे आवाज ऐका. शेकडो त-हा आढळतात. कोणाचा जाड, कोणाचा पातळ, कोणी हळूवार तर कोणी आक्रमक. प्रत्येकाचा पोत वेगळा असतो.

कानावर पडणारा ध्वनी म्हणजे आवाज. दैनंदिन जीवनात हे विविध ध्वनी म्हणजेच अनेक आवाज... विविध माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोहचत असतात. असंच एक माध्यम आहे, आकाशवाणी ! आवाज आणि आकाशवाणी यांचं नातं, तसं घट्ट नातं आहे. कारण चित्र दिसत नसल्यानं सगळा ऐकीव मामला. अशावेळी आवाजावरून लक्ष्यभेद करणारा अर्जुन हमखास आठवतो. आकाशवाणी ऐकणारे श्रोते सुद्धा आवाजाद्वारे अंदाज बांधत असतात. ही अंदाजबांधणी करण्याच्या काहीशा स्थितीत असतो फोन -इन कार्यक्रम सादर करणारा संवादक! फोन हे संवादाचं माध्यम असतं. उद्देश असतो, आवडीचं गाणं ऐकवणं. पण फक्त गाणंच ऐकवायचं नाही तर सोबत थोड्या आपुलकीच्या गप्पा सुद्धा असतात. आता खरी गंमत इथेच आहे. फोनची रिंग वाजते. 'हॅलो अमूक कार्यक्रम' म्हणत स्वतःची ओळख सांगितल्या जाते. पुढल्या संपूर्ण संवादात पलीकडचा माणूस काळा की गोरा? गरिब का श्रीमंत? तरूण का म्हातारा? काही काही माहित नसतं. फक्त आवाजाद्वारे अंदाज बांधत, काठाकाठाने बोलत संवाद पुढे न्यावा लागतो. समोरचा बोलण्यात मोकळा असला तर ठिक. नाही तर मग हो- नाही पलीकडे काही उत्तरं येत नाहीत. अशावेळी मोठी कठीण परिस्थिती असते. आवाजाची ही दुनिया मात्र मोठी मजेशीर असते. न डगमगता, न अडखळता, न बिचकता, न घाबरता, आपली भिती, गोंधळ आपल्या आवाजात न उमटू देता, ती कसोटी पार करावी लागते. हल्ली मोबाईल मुळे फोनवर बोलण्याचा सराव  ब-यापैकी आहे. पण वीस एक वर्षापूर्वी लॅन्डलाईनच्या काळात फोनच्या रिसिव्हर मधून ऐकायला येते नि आपण बोललेले समोरच्याला ऐकायला जाते, ही संकल्पना पचायला जरा जडच जात असे. विशेषतः ग्रामीण श्रोत्यांना हे खूप नवलाईचे होते. त्यामुळे तारसप्तकात संवादाची सुरूवात व्हायची. ती हळूहळू सामान्य आवाजावर आणणे म्हणजे एक कसरतच असे. पण त्यातही वेगळी गंमत असायची. साध्याभोळ्या स्वभावाची ही माणसं मनातलं सगळं बोलायची. मुलाचं लग्न, मुलीचं गाणं, बुढीचं जातं, बुढ्याचं खाटलं, दोस्ताईचा दोस्ताना, बायकोचा सुगरणपणा....सांगायला बसले की हातचं न राखता बोलत राहणार. पण त्यासाठी समोरचा आवाज तेवढा त्यांना आश्वासक हवा असतो. काही नमुने मात्र इरसाल असतात. दिसत नसलेत तरी आवाजातून कळतात. गावाबद्दल सांगता सांगता आमराईत येण्याचं छुपं आमंत्रण देणारे असतात. अशावेळला, डोकं थंड ठेवत, मनातला राग आवाजात न उमटू देता, मधाळपणे, "का नाही? नक्की येवू की. भावाकडे बहिणींनं आंब्याच्या रसाला जाण्याची पद्धत असतेच" हा हजरजबाबीपणा संवादकाला ठेवावा लागतो. बोलण्यातला खट्याळपणा कोणता नि टवाळखोरपणा कोणता? हे आवाजच सांगत असतो. आवाज, हा असा महत्वाचा असतो. व्यक्तिमत्व दर्शविणारा आरसाच असतो.

आवाजाचे हे न्यारे जग आहे. बोलणारा कसा दिसतो, हे दोघांनाही  माहित नाही, तरी ' बोलण्याची प्रचंड उत्सुकता दोन्ही बाजूला असते. हे नातं वेगळंच आहे. फोन सुरू असेतोवर आपलेपणा आहे. रिसिव्हर ठेवला की तिथेच स्वीच ऑफ व्हावं लागतं. पुढची रिंग, पुढचा संवाद. नवा आवाज, नवा स्नेहभाव. समोरचे आवाज बदलत राहतात पण संवादकाचा आपुलकीचा आवाज मात्र तोच असतो. त्याचा पोत कधी बिघडून चालत नाही. कारण शेवटी, हे असते 'आवाजाचे विश्व'. जोवर घसा चालतो तोवरच तुम्ही असता. घसा बसला तुम्ही संपला. घसा नुसता चालवायचा नसतो तर तो जपायचाही असतो. त्याचं संगोपन करायचं असतं. बोलत जायचं, ऐकत जायचं. तेवढं धैर्य आणि संयम बाळगत, जनांशी संवाद साधायचा.  कारण... जो त्यांच्या ह्रदयाची तार छेडत, मस्तकामध्ये विचारांची बीजं पेरत जातो,तोच असतो खरा आपला आवाज!

 - सीमा शेटे (रोठे), अकोला.

No comments:

Post a Comment