Thursday, February 13, 2020

माझी मावशी

आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण आली नाही. काय कुणास ठाऊक पण तिचा-माझा काही वेगळाच ऋणानुबंध होता! आमच्या लहानपणी मावशी मुंबईला राहायची. आमची परिस्थिती खाऊनपिऊन सुखी अशी. आमचे सगळेच नातेवाईक जवळपास त्याच स्थितीतले. आमची राहणी वगैरे अगदी साधीसुधी. त्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर मावशी म्हणजे आम्हाला एकदमच हाय फाय वाटायची. मावशीचे यजमान मुंबईला सरकारी खात्यात चांगल्या मोठया हुद्यावर होते. वर्षा दोन वर्षातून एखादेवेळेला मावशी यायची आमच्या घरी अंजनगावला. लहानपणी आम्हाला तिच्याबद्दल एक वेगळेच कुतूहल असायचे. तेव्हाची तिची मूर्ती मला अजूनही चांगलीच आठवते. उंच, सडपातळ बांधा, निमगोरा रंग अन करारी चेहरा.  स्वच्छ परीटघडीची, फिक्कट रंगाची, हलक्या फुलाफुलांचे मोहक डिझाइन असलेली साडी अन त्यावर पांढरेशुभ्र चिकनचे ब्लॉउज. पायात सपाता. त्यावेळी घरात अशी चप्पल वगैरे वापरणे आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचेच असायचे. पण तिला कायम संधिवाताचा त्रास असल्याने थंड फरशी अजिबात सहन नाही व्हायची. म्हणून कायम पायात सपाता. सपाता हा शब्दही मला तेव्हाच पहिल्यांदा कळला. अजूनही तिचे ते ताठ चालणे अन खूप मोठ्या खणखणीत स्पष्ट आवाजात बोलणे चांगलेच स्मरणात आहे. बरेचदा तिचे साधे बोलणेही रागावल्यासारखेच वाटायचे. तिच्या त्या आवाजामुळे आम्ही कायम तिला वचकून असायचो. शिवाय स्वभाव असा की कुणाची कुठलीही चूक तिला सहन नाही व्हायची. ज्याचे चुकले त्याची धडगत नसायची. मला कधीही मी लहान असतांना तिने जवळ घेऊन लाड वगैरे केलेत अशी आठवण नाही. किंवा आम्ही भावंडंही कधी तिच्या फारसे जवळ नाही गेलो. तिचा कायमच एक आदरयुक्त दरारा असायचा. तरीही ती आलेली आम्हाला आवडायचं  कारण येतांना ती आमच्यासाठी खूप छान छान मिठाई घेऊन यायची, जी आम्ही आमच्या गावात कधी बघितली सुद्धा नसायची. आणि एकूणच तिचं राहणं, वागणं, बोलणं ह्याबद्दल एक सुप्त आकर्षण असायचं. दुसरं म्हणजे कुणाचा शाळेत नंबर आला, कुणाला कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं, कुणाचं हस्ताक्षर सुंदर इ. इ. तिला कळले की बाकी इतके भरभरून कौतुक करायची की आम्हाला अगदी आभाळ ठेंगणे व्हायचे. इतर कुणी कितीही कौतुक केले तरी कधी इतकी छाती फुगायची नाही. कारण ती कधीही कुणाची विनाकारण, तोंडदेखले स्तुती करायची नाही. खरं ते खरं असा तिचा बाणा! त्यामुळे तिच्या शब्दाला वेगळेच वजन होते. 

त्यानंतर काकांची अकोल्याला बदली झाली अन मग त्यांनी अकोल्यातच स्थायिक व्हायचे ठरवले. त्यानुसार मग अकोल्यालाच सुंदरसे घर देखील बांधले. आमच्या सर्व नातेवाइकांमध्ये इतके छान, प्रशस्त घर कुणाचेच नव्हते. नेमकी त्याच वर्षी मी बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. अगदी आमच्या शाळेतून फर्स्ट वगैरे आली. आईबाबांची इच्छा होती मी सायन्स घ्यावं म्हणून. पण आमच्या अंजनगावला सायन्स कॉलेज नव्हते. त्यामुळे मग मला मावशीकडे अकोल्याला ठेवायचे असे ठरले. तसाही माझ्या आईवर मावशीचा फार जीव. वडिलांच्या पश्चात ह्या दोघी बहिणींनी लग्नापूर्वी नोकरी करून पूर्ण कुटुंबाचा भार अतिशय कठीण परिस्थितीत सांभाळला होता. त्यामुळेच मावशीचे  माझ्या आईवर अतिशय प्रेम. नलूची मुलगी म्हणून ती मला तिच्याकडे ठेवायला लगेच तयार झाली आणि माझी रवानगी अकोल्याला मावशीकडे झाली. सुरवातीला मला तिच्याकडे प्रचंड बिचकल्यासारखे व्हायचे. तिची ती कडक शिस्त, मोठ्ठा आवाज, अमुक एक गोष्ट अशी म्हणजे अशीच करायची असा तिचा अट्टाहास, थोडे जरी इकडचे तिकडे झाले,एवढीशी चूक झाली तरी ती मोठ्यांदा रागावणार. आधीच आवाज मोठा त्यात रागावली की मग काही बघायलाच नको! मला अगदी पळून जावेसे वाटायचे! पण हळूहळू तिची सवय व्हायला लागली. तिचा आवाजच मोठा आहे हे ही लक्षात आले. पूर्वायुष्यात आलेल्या काही कटू अनुभवांनीच ती अशी फटकळ, स्पष्टवक्ती झालीय हेही कळत गेले. दुर्दैवाने तिला मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळेही असेल कदाचित पण तिची ती शिस्त, तिचा ठामपणा टिकून होता अजूनही. नाहीतर एखादं  मूल झाल्यावर स्त्रियांच्या स्वभावात जो सहज लवचिकपणा येतो तो तिच्यात नाही आला बहुदा. पण हळूहळू सहवासाने मला वरवर कठोर दिसणाऱ्या मावशीचे खरे अंतःकरण समजायला लागले. नलूची मुलगी म्हणून आपल्यावर ती किती प्रेम करते, माया करते हेही कळायला लागले. तिचे कितीतरी सदगुण जसे तिची कमालीची स्वच्छता, नीटनेटकेपणा, काटकसरी अन अतिशय कष्टाळू स्वभाव, गुणग्राहकता, नवीन गोष्टी शिकण्याची आवड अन ते लगेच आत्मसात करण्याची तल्लख बुद्धी, कमालीचा जिज्ञासू स्वभाव, तिचे अफाट वाचन, वाचन करतांना महत्वाची टिपणे काढण्याची तिची सवय, एखादी गोष्ट कळली नाही तर पटकन कुणालाही विचारण्यात कधी कमीपणा न मानण्याची  तिची वृत्ती, कुणालाही मदत करण्यात तत्पर स्वभाव, सद्गुणांची तोंडभरून तारीफ करण्याचा तिचा स्वभाव, वक्तशीरपणा, कामसूपणा, कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवण्याचा तिचा स्वभाव, विनाकारण गॉसिपिंग न करणे, स्वतःची चूक असेल तर पटकन मान्य करण्याचा स्वभाव अश्या कितीतरी गोष्टी ! तिच्या जवळ राहून जेव्हा हे सगळं मी अनुभवलं तेव्हा माझ्याही नकळत ती केव्हा माझे रोल मॉडेल बनली मलाही कळले नाही. तिची  प्रत्येक बाबतीत स्वतःची अशी ठाम मतं, तत्त्वं असायची अन ती 100 टक्के त्याला धरून चालायची. मात्र एखादा तिचा समज, तिचं मत चुकीचं आहे हे तिला कळल्यावर बाकी अत्यंत खिलाडू वृत्तीने ती ते मान्य करून स्वतःच्या वागण्यात आवश्यक तो बदल करायला तिला कधीही कमीपणा वाटला नाही. मात्र कुणी तिला फसवलं, तिच्याशी खोटं बोललं की बाकी ती भयानक संतापायची. खोटेपणाची तिला अतिशय चीड. कारण ती स्वतः कमालीची सत्यवचनी होती. जे खरं आहे ते अगदी निर्भीडपणे, स्पष्टपणे बोलून टाकणे हा तिचा स्वभाव. 

वास्तविक पाहता हा एक चांगलाच गुण, पण ह्या तिच्या अतिस्पष्टवक्तेपणाने बरेच लोक दुखावले जाऊन तिच्यापासून दूर झाले. खरं  तर हे तेच लोकं होते ज्यांच्यासाठी पूर्वी तिने खूप केले होते. पैसा, कष्ट अन वेळ तिन्ही खर्चून! पण एखाद्याच्या नशिबी यश नसतं म्हणतात.  तिचं तसंच झालं.  

मी तिच्याकडे बीएस्सीचे तीन वर्षे राहिली. तिने मला सांगून टाकले होते, "हे बघ मधुमती, तुझे हे अभ्यास करायचे दिवस आहेत. संधिवाताने माझं मेलं सदा हे दुखतं, ते दुखतं सुरु असतं. तू लक्ष देत जाऊ नकोस. तुझे तुझे कामं झाले कि आपला अभ्यास करायचा. ते जास्त महत्वाचे आहे." तिने मला दोन कामं  नेमून दिली होती. एक म्हणजे तिला सकाळी कणिक भिजवून देणे अन दुसरं म्हणजे झाडलोट करणे. कणिक मळतांना तिला संधिवातामुळे खूप वेदना व्हायच्या हातात. त्यामुळे ते काम मला दिलं. हे सविस्तर सांगायचं कारण म्हणजे माझ्या त्या एवढ्याश्या कामाचं ती केव्हढं तोंडभरून कौतुक करायची. "कित्ती छान कणिक भिजवते मधुमती. अगदी  चुरून चुरून मऊसूत लुसलुशीत गोळा करून ठेवते माझ्यासाठी. परात सुद्धा कशी स्वच्छ! कुठ्ठे लिडबिड नाही का काही नाही !" येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती हे आवर्जून सांगणार. मला संकोचल्यासारखं व्हायचं. साधी कणिक भिजवायचं काय एवढं कौतुक करायचं? पण खूप छान वाटायचं तिने कौतुक केले की. तिचा तो स्वभावच होता कुणाचं थोडंही चांगलं काही दिसलं कि पटकन पावती द्यायची. मग बरोब्बर 10 वाजता तिचा सगळा स्वयंपाक तय्यार असायचा. काकांना ऑफिस असायचं त्यामुळे ते 10 ला जेवायला बसायचे. मला गरम जेवायला आवडतं म्हणून तीनही वर्षे तिने काकांसोबत जेवायला बसवून गरम गरम टम्म फुगलेले, घराच्या लोण्याने माखलेले फुलके खाऊ घातले ! केव्हढी माया ही! आठवण आली की अजूनही भरून येते. एकदा कणिक भिजवल्यावर मग बाकी इतर स्वयंपाकात ती माझ्या मदतीची मुळीच अपेक्षा नाही करायची. उलट मला माझा अभ्यास करायला जा म्हणायची. “कामं काय मग आयुष्यभर करायचेच आहेत. आता अभ्यास महत्वाचा!” असं म्हणायची. मला वाटतं तेव्हा मी B.Sc. ला युनिव्हर्सिटीत गुणवत्ता यादीत दुसरी आले त्याचं श्रेय मावशीच्या ह्या अभ्यासाचं महत्व माझ्या मनावर बिंबवण्यालाच जातं. रिझल्ट लागला तेव्हा तिला केव्हढा आनंद झाला होता! ज्याला त्याला “माझ्या घरी राहिली तर मला यश दिलं मधुमतीनी!” असं सांगत सुटली ! 

मावशीचे घर होते केशवनगरला. तेथून RLT, माझे कॉलेज बरेच दूर पडायचे. मी बस ने बसस्टॅन्ड पर्यंत जायची अन येतांना टॉवर जवळून बस पकडावी लागायची. बस ची वाट बघण्यात बराच वेळ जायचा. माझ्या बऱ्याच मैत्रिणींजवळ सायकल होती. मलाही वाटायचं  सायकल घेऊन मागावी बाबांना. पण मग स्वतःच विचार करायची की कशाला उगाचच खर्चात पाडायचं बाबांना? आधीच कॉलेज ची फी, वह्या पुस्तके ह्यात बराच खर्च होतोय. शिवाय बाबा माझा खर्च म्हणून दरमहा 100 रुपये पाठवायचे मावशीला. त्यात आणखी सायकलचं  कशाला काढायचं ? म्हणून मी आपली चूप होती. पण माझ्या मनातलं मावशीने जणू काही ओळखलं अन बाबा पाठवायचे ते पहिल्या 5 महिन्यांचे 500 रुपये जमा झाल्यावर एकदिवस मला दुकानात घेऊन गेली अन माझ्यासाठी कोरी करकरीत हिरो ची सायकल
घेऊन दिली! त्यावेळेस झालेला आनंद केवळ शब्दातीत होता! असे लहानमोठे कैक प्रसंग. प्रत्येकवेळी तिच्या माझ्या नात्यामधली वीण आणखीनच घट्ट होत गेली.

नंतरही खूप प्रसंग आहेत. माझं लग्न ठरलं तेव्हा सर्वांना अकोला सोयीस्कर पडतं म्हणून माझा साखरपुडा तिच्याच घरी झाला. नंतर पहिल्या बाळंतपणाच्या वेळी अंजनगाव ला वैद्यकीय व्यवस्था तितकीशी नीट नव्हती तेव्हा म्हणून माझं पहिलं बाळंतपणही तिच्याच घरी झालं. माझ्या दुसऱ्या बाळंतपणात मला बेड रेस्ट होती तेव्हाही ती माझ्या जवळ येऊन राहिली होती. नंतर काही कारणास्तव आम्ही अकोल्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला तेव्हाही असा योग आला की पहिले 2, 3 वर्षे तिच्याकडेच राहिलो. मी नोकरीसाठी बाहेर असायची तेव्हा माझ्या मुलांचं ती अभ्यास घेण्यापासून सगळं करायची. त्या कालावधीत माझ्या दोन्ही मुलांवर तिने निरतिशय प्रेम केले. त्यांना चांगलं वळण लावलं, त्यांच्यावर उत्तम संस्कार केले! काय आणि किती सांगावं तिच्याबद्दल! मात्र एकच खंत वाटते की तिच्या शेवटच्या दिवसात काही परिस्थितीवश मी तिचं फारसं करू शकली नाही. त्याबद्दल अजूनही एक अपराधी भावना, एक सल माझ्या मनात आहे. काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं! माझं पूर्वजन्मीचं कुठलंतरी पुण्य म्हणून मला तिचा इतका जवळून सहवास घडला. तिने माझ्यावर, माझ्या मुलांवर जे अंतःकरणापासून प्रेम केलं त्याला तोड नाही. तिच्या आजच्या वाढदिवशी तिला शतशः नमन! मला पक्का विश्वास आहे की ह्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात जिथे कुठे ती असेल तेथून ती माझ्याकडे बघते आहे आणि तिचा  प्रेमळ वरदहस्त माझ्या डोक्यावर अजूनही आहे!

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे 
अकोला

No comments:

Post a Comment