चांदोबा चांदोबा भागलास कां
निंबोणिच्या झाडामागे लपलास कां
निंबोणिच्या झाडामागे लपलास कां
अशी बालपणी चांदोबाशी झालेली ओळख आपण कुणीही विसरु शकत नाही ..चांदोमामा म्हणताच जे आपुलकी,प्रेम ,जिव्हाळा आपल्या आतुन आपल्यालाच जाणवतो तो शब्दातीत आहे. चंद्र म्हणताच तो पूर्णचंद्र पौर्णिमेचा असो वा प्रतिपदेची सुंदर चंद्रकोर !.....अगदी जीव ओवाळून टाकावा असं लोभस रुपड! ............कविंचा तर अगदी हक्काचा मित्र ! बालपणापासुन ते तारुण्यातील प्रेम बहरण्यापर्यंत याची साथ लाभलेली.
"चंद्र आहे साक्षिला"......बस अशी!..
आज माझ्या मनातला चांदोबा मात्र वेगळाच आहे .माझ्या मनात घर करुन राहिलेला हा चांदोबा याची पहिली ओळख होताच मस्त गट्टी जमली. दर महिना आतुरतेने त्याच्या नवीन रुपाची वाट पाहू लागली.कसं वर्णन करु आता........ ,खरतर सर्वप्रथम त्याच्या अंतरंगाच्याच प्रेमात जास्त होते. पान भराभरा चाळावी नि एकेक रुप न्याहाळावे अगदी मन लावुन ! त्यातही विशेषत्वाने मोहवणार्या त्या लांब कमरेखाली घरंगळणार्या कुरळ्या केसांच्या बांधेसुद गोबर्या गालाच्या ललना तसेच सुबाहु पुरुष !... याव्यतिरिक्त रागीट खाष्ट स्त्रिया, पुरुष यांचे नुसते अवलोकन जरी केले तरी गोष्ट काय असेल याचा अंदाज येऊन त्याचा अनुक्रम पहिला ठरवायचा. हे बालवयातील मनाचे खेळ आतिशय लोभसवाणे, पण वेताळाच्या विक्रमादित्याला नेहमीच कोड्यात टाकणार्या प्रश्नांमुळे होणारी मनाची तगमग ,राजाच्या डोक्याची शंभर शकले तर होणार नाही ना! ही काळजी आणि राजा कसा हुशारीने उत्तर देतो म्हणून वाटणारा अभिमान आणि वेताळ पुन्हा दात विचकत झाडाला लटकलेला पाहुन राजाची येणारी कींव ! ......... तरीही राजाचा ध्यास वेताळाला पुन्हा पुन्हा खांद्यावर घेण्याचा व अचुक उत्तरे देण्याचा .हे जरी फक्त गोष्ट म्हणून त्या वयात वाचत असू तरीपण आज कुठेतरी त्याचा आग्रही ,निग्रही, समयावधान, आणि हुशारिची जाणीव होते आणि राजा म्हणाल तर विक्रमादित्य अशी समानार्थी ओळख बालपणी होते.
"बालपणीचा काळ सुखाचा "
असं म्हणतो ते याच कारणाने आपल्या निरागस मनावर होणारे भावभावनांचे संस्कार हा चांदोबा आपल्या मनावर करत असतो. म्हणूनच चंद्राला मनाचा कारक म्हणतात. मनातील भावभावनांचे होणारे चढउतार ह्याला कारणही हाच चांदोबा! आकाशातला आणि माझ्या जवळचा चांदोबा दोन्हिही सारखेच मनाचा ताबा घेणारे एकदा त्याची गोडी लागली की नात घट्ट करणारे तो काळ आठवला की खरच गंम्मतच वाटते. सुट्टीत तर चहुकडे चांदोबाने पसरलेल्या पलंगावर पालथे झोपावे, पायाने हवेत मस्त डोलावे, हाताने चेहर्याला आधार द्यावा नि निवांत खाऊचा फडशा पाडावा तसा पुस्तकांचा फडशा पाडावा!....आपलीच भलीमोठी संपत्ती असल्यासारखी परवानगीशिवाय कुणालाही त्याला हात लावू न देणे किंवा आपल्याचसमोर आपल्याच घरी वाचू देणे असे जाचक नियम ठरवण्याचा पूर्ण अधिकार ठेवून जणू मौल्यवान वस्तू उदार अंतःकरणाने आपण देतोय आसा भावही मनात असायचाच.आता मात्र आपल्याच वागण्याच हसु येतं. चांदोबा सोबतच आम्ही मोठे होत होतो तेव्हा हळूच सिनेमाविश्वाने मनावर प्रभाव टाकायला सुरुवात केली.तेव्हा नागीरेड्डी हे नांव ओळखीच झालं पण त्यांच्याशी खरी ओळख तर आधीच झाली होती चांदोबाच्या संपादकदापदामुळे पण तेव्हा फारस कळत नसल्याने त्याची या वयात नव्याने आठवण झाली. बालमासिक म्हणून १९४७पासुन तामिळ , तेलगु ,माराठी व आन्य भाषेतही ते सतत आपल्या सोबत होते. १९८०मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्युने ते नैराश्यग्रस्त झाले व मासिक सिमीत भाषेत प्रकाशित होऊ लागले पण आजही चांदोबा म्हणताच आठवतो हा बालपणीचा मित्र!......
@अर्चना मुळ्ये.
No comments:
Post a Comment