Monday, February 10, 2020

तशी ऑनलाईन मी बरी आहे

'अक्षरा ब्लॉग 'साठी लेखन सुरू करून तब्बल वर्ष झालं. गेल्या वर्षीची "नियमित ब्लॉगर'म्हणून मोहिनीने माझं नावही घोषित केलं. फार भारी वाटलं. खरच सांगते, वर्षभरात एकदाही असा प्रश्न पडला नाही की काय लिहावं? कशावर लिहावं? विषय सुचत गेले, मी लिहीत गेले.,भले मग ते कसेही असोत. उलट एकदोनदा अर्चना, मधुमती म्हटल्या की दरवेळी काय लिहावं , विषय सुचायला तर हवा. त्यावर मी म्हणत असे, विषयांचे काय ग? सुचतात आपोआप. आपल्या अवतीभवती च तर असतात विषय. पण ह्यावेळी मात्र मला स्वतःलाच प्रश्न पडला, कोणत्या विषयावर लिहावे?  एकतर 26 jan. ते 5 feb. हा संपूर्ण काळ, पुतण्या चे लग्न, प्रवास, लग्ना आधीचे आणि  नंतरचे सर्व कार्यक्रम, कुळाचार ह्यात गेला. ते सगळं उरकल्यावर फारसे कष्ट न करताही मी आजारी पडले. प्रवासाचा शीण, थंडी, दोन्ही घरां मधील अंतर कमी करण्याची धडपड आणि दगदग, त्यामुळे सर्दी, खोकला, ऍसिडिटी, ह्या सगळ्यांनी एकाच वेळी मेहेरबानी केली. प्रचंड  विकनेस जाणवत होता, तशात, वर्षा, अंजू, सीमा एकेकीचे "मोहिनी, मेल केलाय ग, लेख" असे  मेसेजेस यायला सुरुवात झाली, मग अजूनच गळाल्यासारखे व्हायला झाले.😔खरे तर ह्या सगळ्या गडबडीत माझा 'तानाजी' पण राहून गेला, पहायचा,त्याची खंतही होतीच, जिमलाही दांडी मारावी लागली. अर्चना आपली रोज विचारतेय, कधी येतेस ग? मी तिला काकुळतीने म्हणतेय, " अग, माझी तब्येत अजिबात बरी नाहीये. खूप विकनेस आलाय, तशात मी वर्क आऊट कशी करणार? अजून त्रास वाढला म्हणजे?" ह्यावर माय डियर अर्चना म्हटली, "पण तू तर गृपवर मस्त खिदळतेय, कंमेंट्स पास करतेय, वाकुल्याही दाखवते आहेस ----" मी जरासं चिडून उत्तर दिलं, "तू माझ्या ऑनलाईन अवस्थेची तुलना माझ्या शारीरिक अवस्थेशी कशी करू शकतेस? तुला कल्पनाही नाही, मला किती त्रास होतोय ते. तशी ऑनलाईन मी ओके आहे ग, प्रत्यक्षात मात्र नाही." ह्यावर तिनेही  'दात' विचकून 'ऑनलाईन दाद' दिली.😄आणि -------

अस्मादिकांना विषय गवसला, अर्थातच, " ऑनलाईन बरी आहे,तशी". 
     पण खरंच गम्मत आहे नाही? ह्या सोशल मिडिया मुळे, त्यातल्यात्यात ह्या व्हाट्सअप्प ग्रुप मुळे, मैत्रिणींबरोबरच्या संभाषणामुळे, आपसातील थट्टा मस्करी मुळे, आपण आजारी आहोत हे देखील विसरायला होते. हे एका दृष्टीने उपकारच मानायला हवेत. शरीराने आजारी असलो तरी मनाने मात्र सुदृढ असल्यासारखे वाटत राहते. ते चित्रपट किंवा मालिकांमध्ये नाही का," आम्ही भले पैशाने (परिस्थितीने) गरीब असू; पण मनाने श्रीमंत आहोत" . अशा  टाइप ची वाक्ये असतात, तसे मलाही म्हणावेसे वाटतेय, "मी भलेही प्रत्यक्षात ओके नसेन, पण ऑनलाईन मात्र अगदी ताजी-तवानी आहे." 😂 
  शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध असतो, असे म्हणतात. शरीर सुदृढ असले तर मनही निरोगी रहाते. अशा अर्थाने की शरीर साथ देत असेल तर मनही प्रसन्न राहून काम करते;पण ह्या बाबतीत मला हे विधान लागू होत नाही असे वाटते. आपल्या शरीराला होणारा त्रास आपण 'ऑनलाईन' दाखवायलाच हवा,हे काही जरुरी नाही ना. आपण जेव्हा एखाद्या आवडलेल्या पोस्ट्स ना मनापासून दाद देतो, इंटरेस्टिंग वाटणारी कोडी सोडवतो, मैत्रिणींसोबत हसी मजाक करतो, एकमेकींची खेचतो, रुसतो, खळखळून हसतो---  अशा वेळी  आपल्या चेहऱ्यावरचा निस्तेज किंवा थकलेला भाव, शरीराला होणारा त्रास, हे 'ऑनलाईन' दिसण्याची शक्यताच शून्य असते. ;हा: पण त्यामुळे एखाद्याचा, किंबहुना एखादी चा गैरसमज मात्र होऊ शकतो, हे पण नाकारू शकत नाही. आता 'अवर फॅमिली' ,' रिलेटीव्ह ग्रुप', 'हम साथ साथ है' सारखे भरपूर ग्रुप तयार होत आहेत, नातेवाईकांचे पण. आणि गैरसमज मैत्रिपेक्षा नात्यातच जास्त होतात. हल्ली, नणंद-भावजय, जावा-जावा, दूरच्या सासू-सुना ह्यांचे देखील ग्रुप व्हायला लागलेत. बरेच आहे एका अर्थाने, 'ऑनलाईन'संबंध तरी टिकून रहातात. सख्ख्या सासू-सुनेचा ग्रुप आणि त्यातील निखळ chatting ही कल्पना रूजू होतेय हळूहळू. असो. तर  गैरसमज असाच होऊ शकतो, की एखादीच्या  डोक्यात येऊच शकते की  ही बया तर चक्क मस्ती करतेय ग्रुप वर, नी  मदतीला ये म्हटलं तर तब्येतीचे कारण दाखवते. नौटंकी आहे नुसती. पण साहजिकच आहे अशी शंका मनात येणं, त्यावर शंका निरसन करणं हा देखील आपला धर्मच आहे असे समजून शंका निरसन करूया.😊 आता मैत्रिणींच्या ग्रुप वर आपल्या बऱ्याच द्वाड मैत्रिणी अगदी दुष्टपणे त्यांनी केलेल्या खमंग पदार्थांचे फोटो टाकत असतात. असे करून त्यांना कोणते पुण्य लाभते,देवच जाणे;पण चटोर जीभ लाभलेल्या आमच्या सारख्या लगेचच 'तोंडाला पाणी सुटल्याची इमोजी' 😋टाकून मोकळ्या होतोच ना? त्या पदार्थांचा प्रत्यक्ष आस्वाद घेणे आपल्या नशिबात नाही हे पुरते कळून चुकल्यामुळेच की काय, त्या पदार्थांकडे धाव 🏃‍♀घेण्याची इमोजी टाकतोच ना?  साधी दोन पावलं चालतानाही ज्यांना 'धाप' लागते, अशा व्यक्तीही  'ऑनलाईन जोरजोराने धावत ' असतातच ना? वरातीच्या घोड्यापुढे त्या 'शिकवलेल्या' घोड्यालाही शरम वाटावी इतके खराब नाचणारे, वेड्या वाकड्या उड्या मारून माकडचेष्टा करणारेही ऑनलाईन मात्र सहजच 💃💃 लवचिक  अंगकाठीच्या डान्सर ची इमोजी टाकायला मागेपुढे पहात नाही. (इमोजी वरून अंदाज बांधता येत नाही ना, म्हणूनच, कदाचित😂) तसेच एखाद्या अप्रिय घटनेशी, व्यक्तीशी आपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसतानाही आपण त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतोच ना?  खरं सांगायचं तर ज्या भावना आपण प्रत्यक्ष व्यक्त करू शकत नाही किंवा काही मर्यादांमुळे राहून जाते, त्यासाठी ह्या "इमोजी" मोलाचे काम करत असतात असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, ह्यात मतभेद असूच शकतात. राग दर्शवणारी, डोळ्यात पाणी दर्शवणारी, भिती , आश्चर्य,विस्मय सारख्या भावना दर्शवणारी, प्रेम व्यक्त करणारी, कपाळावर हात मारून घेणारी, इतकंच काय काहीच बोलायचे नसेल तर मौन दर्शवण्यासाठी तोंडावर पट्टी बांधलेली, फक्त स्माईल करणारी, खळखळून (बत्तीशी दाखवून) हसणारी, डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणारी------ ह्या आणि अशा सगळ्याच इमोजी म्हणजे माणसाच्या अंतरंगातील भावनांचं प्रतीकच जणू. आता त्या किती खऱ्या आणि किती खोट्या हा चर्चेचा मुद्दा आणि वेगळा भाग म्हणता येईल. पण आपल्या कुठल्याही भावना आपण ह्या इमोजी द्वारे व्यक्त करू शकतो, हे काय कमी महत्वाचे आहे?  हे 'ऑनलाईन देणं-घेणं" असंच सकारात्मक रितीने सुरू ठेवा आणि कधी शरीराने आजारी पडलात, कमकुवत झालात, तरी मनाने मात्र कायम आनंदी, सुदृढ असा, अर्थातच, "ऑनलाईन" 🙏😘
 माणिक नेरकर.

No comments:

Post a Comment