लहानपणी ही नेहमी सांगायची -मला मोठे होऊन डॉक्टर व्हायचे आहे !आमच्या ओळखीचे एक काका हे कायम कुठेही भेटले की अगदी कोणाही समोर ही आठवण सांगितल्याशिवाय पुढे बोलणे सुरू करत नाहीत हा माझा गेल्या 22 वर्षातला अनुभव आहे. सुरुवातीला हे ऐकून मला प्रश्न पडायचा -हो का? असं म्हणायचे का मी? काकां समोर हो हो सांगून माझ्यासकट घरचे सगळे विषय वाढणार नाही असा समंजसपणा दाखवायचे. खरंतर आजच्यासारखे आपल्या लहानपणी येता जाता मुलांना मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे, कशात करियर करणार, वगैरे प्रश्न विचारण्याची प्रथा नव्हती. फारच झाल्यास दहावीच्या परीक्षेला शुभेच्छा द्यायला गेल्यावर किंवा जसा असेल तसा निकालाचे पेढे स्वतःहून मुलांनी आणून दिले तर काहीतरी विचारायचे म्हणून काय व्हायचे तुला पुढे? असा औपचारिक प्रश्न कोणीतरी टाकायचे. एका अर्थी आपले शालेय शिक्षण निर्धोक वातावरणात पार पडले म्हणायचे!
पण नंतर खरंच आठवून बघितले की नेमके कधी आपण डॉक्टर व्हायचे ठरवले? शाळेत 99 टक्के मुलींना असायचा तसा मलाही गणिताचा फोबिया होता .बहुतेक सगळेच गणिताचे पेपर मी ताप असताना सोडवल्यामुळे माझ्या गणिताच्या मार्कांना कायम सहानुभूती मिळत गेली!! दहावीत पहिल्यांदा गणिताची ट्युशन लावून बोर्डात या विषयाला हद्दपार केले .नंतर "पी सी बी" चा पर्याय ओघाने स्वीकारला. त्यावेळी आम्ही नागपूरला होतो आणि तिथल्या हिस्लॉप कॉलेजमध्ये फिशरी सायन्स हा विषय घेऊन जुनियर कॉलेजला प्रवेश घेतला. गणित सुटलेले- पण फिजिक्स चा बागुलबुवा होताच .तो बारावीपर्यंत कसा निभवायचा एवढे एकच ध्येय अकरावी-बारावीत होते. दरम्यान फिशरी सायन्सच्या प्रोफेसर खूप छान होत्या. त्यांच्याकडून हा विषय शिकतांना त्याचे प्रॅक्टिकल्स करताना मजा यायची. आपल्याला यात रस निर्माण होतो आहे असे लक्षात आले. बारावीत असताना याच विषयात पुढे शिक्षण घेण्याचे पर्याय तपासले .पुढचे पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेऊन यात करियर करायला मुंबई -कोकण प्रांतशिवाय पर्याय नव्हता. पंचवीस वर्षांपूर्वी मुलीला बाहेर शिकायला पाठवणे काही पचनी पडणारी गोष्ट नव्हती. मग नाद सोडलेला बरा असा विचार करून बारावीच्या अभ्यासावर शांतपणे लक्ष केंद्रित करण्याचे ठरले .
नाही म्हणायला अधुन मधुन आयएएस व्हावे अशी तीव्र इच्छा व्हायची. वडील सरकारी नोकरीत उच्चपदावर असल्याने शासकीय कामांची परिस्थिती जवळून अनुभवली होती एन सी सी, विविध क्रीडा प्रकार ,सामान्य ज्ञानाची उत्तम तयारी इत्यादी गोष्टी जमेच्या होत्या. पण पुन्हा कुठेतरी हे क्षेत्र मुलींकरिता काही फारसे सोयीचे नाही. ग्रामीण भागातून, प्रशासकीय आणि काही प्रमाणात राजकीय गोष्टींशी येणारा संबंध झेपणारा नव्हता .त्यामुळे इंग्रज कालीन इमारतींमधले कार्यालय ,पांढरेशुभ्र पडदे असलेल्या खिडक्या-दरवाजे, सरकारी कार्यालयातल्या वैशिष्ट्यपूर्ण टेबल-खुर्च्या, सरकारी वाहन आणि सरकारी बंगले या गोष्टींचे अप्रूप तिथेच सोडावे लागले .मग आता पुढे काय करावे ?तर मुलींना वैद्यकीय क्षेत्र सर्वोत्तम मानणारा तो काळ आणि तसा मतप्रवाह असणारे वातावरण असल्याने या क्षेत्रात पुढे जायचे मनसुबे तयार होऊ लागले. बारावीच्या परीक्षेत मार्क चांगले मिळतील हे निश्चित होते पण त्यावेळी प्रवेश परीक्षा सुरू झालेल्या नसल्याने ओपन कॅटेगरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल का हा प्रश्न होता .एम बी बी एस ला शासकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायला सहा मार्क कमी पडले .मग पुढे काय- डेंटिस्ट, फिजिओथेरपी पर्याय विशिष्ट अवयव, आजारांपुरते कामी पडतील. संपूर्ण शरीराचा अभ्यास आणि सर्व व्याधींची चिकित्सा करता आली पाहिजे. मग पुढचा पर्याय म्हणून शासकीय महाविद्यालयात बी ए एम एस ला प्रवेश घेतला आणि अशाप्रकारे वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय चिकित्सक होण्याची प्रक्रिया सुरू झाली.
यापुढे हा प्रवास कसा झाला कसे अनुभव आले आणि नावापुढे डॉक्टर बिरुद मिळवायला काय काय खर्ची पडले याचे वर्णन पुढच्या भागात.....
No comments:
Post a Comment