मी -- कोण आशिष?
आशिष नानोटी ,D.Pharm.वाला
मी - अरे! आता ओळखलं, बोल काय म्हणतोयस?
कॉलेज मधे 'alumni meet' आहे 9 Feb.ला,सगळे येताहेत ,तुला पण यायचंय , तुझा नं.आत्ता मिळाला ,ग्रुप मधे पण ऍड करतो आता.
कोण कुठे आहे ,कोण कोण येणार आहे,हे त्यानी सांगितलं मग बाकी गप्पा मारून फोन ठेवला.
खरच, D.Pharm केलं हे लक्षात आहे (दुकानात समोरच सर्टिफिकेट लागलं आहे)पण त्यासाठी केलेलं कॉलेज,त्याच्या आठवणी तर विसरूनच गेले होते मी!
लग्न ठरलं तेंव्हाच, मेडिकल शॉप असल्यामुळे, घरच लायसन्स असावं म्हणून मी D.pharm.करायचं हे ठरलं.फक्त, लग्नानंतर साडीच नेसावी लागणार होती(सासऱ्यांना ड्रेस चालायचा नाही) मला तर साडीची अजिबातच सवय नव्हती.साडी नेसून कॉलेज कस करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता!
ऍडमिशन जुन मधे झाल्या लग्न 6 जुलै ला होत ,त्यामुळे माहेरच्या नावानेच गीतादेवी खंडेलवाल कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली.
लग्नानंतर लगेच कॉलेज ला जायला लागले.ऍडमिशन च्या वेळेसच प्रिन्सिपॉल चांडक सरांनी नी आम्हा दोघांनाऑफिस मधे बोलावलं. मिलिटरी मध्ये सहज खपून जातील असे उंचे पुरे ,गोरेपान ,मोठ्या मोठ्या मिश्या असलेले, चांडक सर हिटलर म्हणून प्रसिद्ध होते. "कॉलेेेज ला 75 % उपस्थिती अनिवार्य आहे ,तुमचं आता लग्न होणारय ,लग्नानंतर येणाऱ्या काही अपरिहार्य गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील, कोणतही कारण न सांगता कॉलेज पूर्ण करावं लागेल".अस म्हणून त्यांनी इंडायरेक्टली, (डायरेक्ट )प्रेग्नंसी वर्षभर टाळा अस सांगितलं.
ग्रॅज्युएट असल्याने मला एकदम सेकंड इयर ला ऍडमिशन मिळाली(फर्स्ट इयर चे दोन विषय काढायचे होते), तर बाकी मुलं मुली ,12 वी नंतर फर्स्ट इयर करून आता सेकंड इयर ला आले होते.
वयात 3-४ ,वर्षाचच अंतर असलं तरी लग्न आणि साडी यामुळे त्यांच्यापुढे मला पार काकू बाई असल्यासारखं वाटायच .त्यामुळे मी सुरवातीला कोणामध्ये मिक्स झाले नाही.पण अगदी आठवड्याभरातच आमचा मुला मुलींचा छान ग्रुप बनला अन मी परत स्टुडंट मोड वर आले.
लग्ना नंतर लगेच गांधीरोड ला एक अजून मेडिकल स्टोअर आम्ही सुरू केलं.सकाळी 8 ते 1.30 कॉलेज तिथून आले की मी घराजवळच मेडिकल स्टोअर बघायची सुभाष, गांधीरोड च्या दुकानात जायचा. त्यामुळे एकदम बिझी शेड्युल होतं.घरची जबाबदारी मात्र शून्य!सासूबाई सगळं बघायच्या,कॉलेज ला जाताना सकाळचा डबा सुद्धा त्या करून द्यायच्या.
एक दिवस शेवटचे 2 पिरियड ऑफ मिळाल्यामुळे सगळ्या जणी एका मैत्रिणीकडे गेलो.तिची आई बाहेरगावी गेली होती,आम्हीच मस्त पकोडे केले ,खाल्ले ,गप्पा मारल्या,कॉलेज च्या वेळे पेक्षा जवळ जवळ एक तास उशिरा घरी गेले.आई तर काही म्हणाल्या नाहीत पण" तूला उशिर होणार आहे हे कळवायला पाहिजे होत,आम्ही काळजी करत बसलो,आज बाई पण आल्या नाहीत,आई ला थोडी मदत करत आली असती" अस सुभाष म्हणाला.लग्न म्हणजे काही तरी वेगळंच प्रकरण आहे हे तेंव्हा कुठे थोडस जाणवलं. बाकी तर मस्त मौला सारख आयुष्य चाललं होतं. या सगळ्या गडबडीत, लग्न झाल्यापासून एक दीड महिन्यात आपली MC आली नाही हे कधीतरी आठवल. काही गडबड तर झाली नसेल न ,अशी काळजी वाटली. त्याच दिवशी, कॉलेज ला जाता येता दिसणाऱ्या भुसारी हॉस्पिटल ला गेले.मला वाटलं डॉक्टर तपासून लगेच काय ते सांगतील.पण मॅडम नव्हत्या ,तिथल्या नर्स नी मला बाथरूम ला जाऊन यायला सांगितलं.ते हॉस्पिटलच बाथरूम एकदम अंधार अन घाण वास येणार होता.तशीच बाहेर आले नर्स ला नंतर येते सांगून पळून आले.मग मात्र सुभाष ला सांगितलं.संध्याकाळी आगाशे मॅडम कडे गेलो. तिथे टेस्ट वगैरे झाल्यावर त्यांनी मी प्रेग्नन्ट असल्याचं सांगितलं.
अरे देवा! दुष्काळात तेरावा (पहिला) महिना!
सिनेमा मध्ये आंबट खाणारी ,स्वेटर विणणारी हिरोईन लाजत नवऱ्याला प्रेग्नन्ट असल्याचं सांगते ,अस दृश्य डोळ्यासमोर येण्याच्या आधीच चांडक सरांचा उग्र ,मिशा फेंदारलेला रागीट चेहरा डोळ्यासमोर आला.बापरे,आता कस करायचं!
आम्ही दोघंही खूप काळजीत पडलो.लग्न होऊन पुरे दोन महिने पण झाले नव्हते.एकमेकांना समजून घेण्याच्या आधीच ही नवी जबाबदारी आमच्यावर आली.खूप विचार केला ,प्रेग्नन्सी टर्मिनेट करण मनाला काही केल्या पटेना,शेवटी बाळाचं प्रेमाने स्वागत करण्याचा निर्णय घेतला.
मी,साडी,कॉलेज ,हे समीकरण आत्ता कुठे थोडं जमायला लागलं होतं तर आता मी,साडी,कॉलेज अन वाढत पोट हे नवीनच समीकरण सामोर आलं.
पण त्याहीपेक्षा कठीण परीक्षा तर पुढे होती, मला मळमळ ,उलट्या अन कमी रक्तदाबाचा खूप त्रास सुरू झाला.उलटयाचा त्रास तर इतका होता ,की गोळ्या घेऊनही पोटात पाणी पण राहायचं नाही. त्यामुळे खूप अशक्तपणा होता. शेवटी रोज सलाईन लावावं लागायचं.घरचाच दवाखाना असल्याने कम्पाउंडर आमच्या रूम मधेच सलाईन लावून द्यायचा. पण ते संपलं की नाही हे पाहायला बिचारा सुभाष तीन चार वेळा तरी दुकानातून धावत पळत वर यायचा( आमची बेडरूम वर होती,दुकानातूनच घरात यायला दार होत).महिनाभर कॉलेज,दुकान कुठेच मी जाऊ शकले नव्हते.दोन्ही दुकान बघताना सुभाषची प्रचंड धावपळ होत होती.शेवटी गांधी रोड च दुकान बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला( माझे दागिने गहाण ठेऊन या दुकानासाठी पैसा उभा केला होता).खूप वाईट वाटलं पण काही निर्णय कटू असले तरी घ्यावेच लागतात.
कॉलेज मधून अजून सुट्टी घेऊन चालणार नव्हतं, मेडिकल सर्टिफिकेट देऊनही 60% हजेरी आवश्यक होती. कु.भाग्यश्री जोशी,ह्या प्रेग्नंसी,मूळे होणाऱ्या मळमळ ,उलट्या,कमी रक्तदाब यामुळे महिनाभर गैरहजर होत्या असं मजेेशीर सर्टिफिकेट देेेऊन ,कॉलेज ला जायला लागले.
त्रास अजूनही सुरू होताच,कमी रक्तदाबामुळे गळावटपणा असायचा. लेक्चर सुरू असतानाच मधेच उठून जावं लागायचं. कॉलेज मधे जाण्याचा उद्देश आता फक्त हजेरी लावणे एवढाच राहिला!
डबा पण सगळ्यांबरोबर न खाता ,कॉलेज समोर माझी चुलत बहीण राहायची ,तिच्याकडे जेवायला जायचे. ती पण अगदी प्रेमाने गरम पोळी करून खाऊ घालायची. महिनाभर अबसेन्ट होते ,तो अभ्यासक्रम भरून काढायला सगळ्यांनी मदत केली, जर्नल्स लिहून दिले.
प्रॅक्टिकल्स च्या वेळेला मला उभं राहायला लागू नये याची सगळे काळजी घ्यायचे. ऑफिस मधलं किंवा लायब्ररीतल
कुठलाही काम असो ,मला कधीच जावं लागलं नाही किंवा वाट पाहावी लागली नाही.फक्त आमचा ग्रुप च नाही ,तर चांडक सरांपासून लॅब असीस्टंट पर्यंत सगळ्यांनी सहकार्य केल.
3 महिन्यापर्यंत उलटयाचा त्रास होतो अस ऐकलं होतं ,पण माझे डोहाळे जास्तच कडक असावेत,त्रास कमी जास्त सुरूच होता. अधून मधून कॉलेज ला दांडी मारावीच लागायची.दाबकी रोड चे रस्ते पण तेंव्हा खूपच खराब होते,नुसते खड्डे होते म्हंटल तरी चालेल.मी लुना वर कॉलेज ला जायचे ,त्यामुळे घरी सगळ्यांना काळजी वाटायची, पण सुदैवाने काही त्रास झाला नाही।
अशाप्रकारे गेलेले दिवस त्रास देत, चालले होते. बघता बघता वर्ष संपत आलं. प्रॅक्टिकल एक्झाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मग प्रिपरेशन लिव्ह,तर थेअरी एप्रिल एंड ला होती.
डिलिव्हरी ची तारीख 22, 23 एप्रिल! त्यामुळे प्रॅक्टिकल्स आता तर, थेअरी सप्लिमेंटरी ला द्यायची अस ठरवलं होतं.
डिलिव्हरी च्या 10 दिवस आधी पर्यंत कॉलेज ला जावं लागलं,कारण
प्रॅक्टिकल्स 12 एप्रिल ला संपले .त्याच दिवशी मी माहेरी नागपूरला निघाले.
23 एप्रिल ला तन्वी चा जन्म झाला.
पुढे सप्लिमेंटरी ला परीक्षा देऊन मी एकदाची D.Pharm (फर्स्ट क्लास)झाले.त्यानंतर अकोल्यात असलेल्या एक दोघीं शिवाय(त्या पण क्वचित भेटायची)कोणाशी कॉन्टॅक्ट राहिला नाही. आज इतक्या वर्षांनी आशिष चा फोन आला,अन 26 वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. सगळ्यांना भेटायची उत्सुकता वाढली.
9 तारखेला कॉलेज ला गेले .84 पासूनच्या बॅच चे विद्यार्थी आले होते. आमच्या '93' बॅच चे सगळ्यात जास्त, 32 जण होते. मी 8,10 जण सोडले तर फार कोणाला ओळखत नव्हते,मला मात्र सगळे ओळखायचे (साडी अन प्रेग्नन्सी जिंदाबाद!).
सरांना भेटलो ,सगळ्या लॅबोरेटरी मधे, ,क्लासरूम मधे जाऊन आलो.तिथे जाऊन आल्यावर खूप आठवणींनी मनात गर्दी केली.
बाकी सगळ्यांच्या,पिकनिक ला कशी मजा आली, लॅब असिस्टंट ला आपण सारख ग्लिसरीन मागून कस सतवायचो ,फिशपॉड दिलेला कागद बोर्ड वर लावल्यावर कसा गोंधळ झाला होता ,अश्या गप्पा सुरू होत्या.मी तेंव्हा त्या कशातच नव्हते ,पण तरी ऐकायला मजा येत होती.
कॉलेज ने छान कार्यक्रम आखला होता.सत्कार समारंभ,( alumni representative म्हणून मला पण स्टेज वर बसवलं),आजी माजी विद्यार्थ्याच कौतुक,बक्षिस वितरण,भाषण हे दुपारच्या जेवणापर्यंत आटोपलं.मग गाणी ,डान्स ,एकपात्री प्रयोग असे रंगारंग कार्यक्रम होते. स्टेज वर डान्स सुरू असताना खाली पण उत्स्फूर्तपणे आपापल्या ग्रुप मधे मुलं मुली नाचत होते. एकदम अनौपचारिक वातावरण होत.
लवकर परत येईन अस ठरवून गेलेली मी तिथे चांगलीच रमली. पण कार्यक्रम जरा लांबला, घरी पाहुणे पण होते. त्यामुळे, फक्त आमच्या बॅच च्या जुन मधे होणाऱ्या गेट टूगेदर ला नक्की येण्याचं कबुल करून सगळ्यांचा निरोप घेतला.खूप खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून.
येताना मनात विचार आला,परिस्थितीमुळे काहीसा खडतर झालेला D.pharm चा मार्ग, केवळ मला चांगले लोक भेटत गेले त्यामुळे सुकर झाला.
त्या सगळ्यांचे शतशः आभार!