Friday, February 14, 2020

गेले ते दिवस

हॅलो मी आशिष बोलतोय.
मी -- कोण आशिष?
  आशिष नानोटी ,D.Pharm.वाला
मी - अरे! आता ओळखलं, बोल काय म्हणतोयस?
 कॉलेज मधे 'alumni meet' आहे 9 Feb.ला,सगळे येताहेत ,तुला पण यायचंय , तुझा नं.आत्ता मिळाला ,ग्रुप मधे पण ऍड करतो आता. 
कोण कुठे आहे ,कोण कोण येणार आहे,हे त्यानी सांगितलं मग बाकी गप्पा मारून फोन ठेवला.
खरच, D.Pharm केलं हे लक्षात आहे (दुकानात समोरच सर्टिफिकेट लागलं आहे)पण त्यासाठी केलेलं कॉलेज,त्याच्या आठवणी तर विसरूनच गेले होते मी!
लग्न ठरलं तेंव्हाच, मेडिकल शॉप असल्यामुळे, घरच लायसन्स असावं म्हणून मी D.pharm.करायचं हे ठरलं.फक्त, लग्नानंतर साडीच नेसावी लागणार होती(सासऱ्यांना ड्रेस चालायचा नाही) मला तर साडीची अजिबातच सवय नव्हती.साडी नेसून कॉलेज कस करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता!
ऍडमिशन जुन मधे झाल्या लग्न 6 जुलै ला होत ,त्यामुळे माहेरच्या नावानेच गीतादेवी खंडेलवाल कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली.
 लग्नानंतर लगेच कॉलेज ला जायला लागले.ऍडमिशन च्या वेळेसच  प्रिन्सिपॉल चांडक सरांनी नी आम्हा दोघांनाऑफिस मधे बोलावलं. मिलिटरी मध्ये सहज खपून जातील असे उंचे पुरे ,गोरेपान ,मोठ्या मोठ्या मिश्या असलेले, चांडक सर हिटलर म्हणून प्रसिद्ध होते. "कॉलेेेज ला 75 % उपस्थिती अनिवार्य आहे ,तुमचं आता लग्न होणारय ,लग्नानंतर येणाऱ्या काही अपरिहार्य गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील, कोणतही कारण न सांगता कॉलेज पूर्ण करावं लागेल".अस म्हणून त्यांनी इंडायरेक्टली, (डायरेक्ट )प्रेग्नंसी वर्षभर टाळा अस सांगितलं.
 ग्रॅज्युएट असल्याने मला एकदम सेकंड इयर ला ऍडमिशन मिळाली(फर्स्ट इयर चे दोन विषय काढायचे होते), तर बाकी मुलं मुली ,12 वी नंतर फर्स्ट इयर करून आता सेकंड इयर ला आले होते.
वयात 3-४ ,वर्षाचच अंतर असलं तरी लग्न आणि साडी यामुळे त्यांच्यापुढे मला पार काकू बाई असल्यासारखं वाटायच .त्यामुळे मी सुरवातीला कोणामध्ये मिक्स झाले नाही.पण अगदी आठवड्याभरातच  आमचा मुला मुलींचा छान ग्रुप बनला अन मी परत स्टुडंट मोड वर आले.

 लग्ना नंतर लगेच गांधीरोड ला एक अजून मेडिकल स्टोअर आम्ही सुरू केलं.सकाळी 8 ते 1.30 कॉलेज तिथून आले की मी घराजवळच मेडिकल स्टोअर बघायची सुभाष, गांधीरोड च्या दुकानात जायचा. त्यामुळे एकदम बिझी शेड्युल होतं.घरची जबाबदारी मात्र शून्य!सासूबाई सगळं बघायच्या,कॉलेज ला जाताना सकाळचा डबा सुद्धा त्या करून द्यायच्या.
एक दिवस शेवटचे 2 पिरियड ऑफ मिळाल्यामुळे सगळ्या जणी एका मैत्रिणीकडे गेलो.तिची आई बाहेरगावी गेली होती,आम्हीच मस्त पकोडे केले ,खाल्ले ,गप्पा मारल्या,कॉलेज च्या वेळे पेक्षा जवळ जवळ एक तास उशिरा घरी गेले.आई तर काही म्हणाल्या नाहीत पण" तूला उशिर होणार आहे हे कळवायला पाहिजे होत,आम्ही काळजी करत बसलो,आज बाई पण आल्या नाहीत,आई ला थोडी मदत करत आली असती" अस सुभाष म्हणाला.लग्न म्हणजे काही तरी वेगळंच प्रकरण आहे हे तेंव्हा कुठे थोडस जाणवलं. बाकी तर मस्त मौला सारख आयुष्य चाललं होतं. या सगळ्या गडबडीत, लग्न झाल्यापासून एक दीड महिन्यात आपली MC आली नाही हे कधीतरी आठवल. काही गडबड तर झाली नसेल न ,अशी काळजी वाटली. त्याच दिवशी, कॉलेज ला जाता येता दिसणाऱ्या भुसारी हॉस्पिटल ला गेले.मला वाटलं डॉक्टर तपासून लगेच काय ते सांगतील.पण मॅडम नव्हत्या ,तिथल्या नर्स नी मला बाथरूम ला जाऊन यायला सांगितलं.ते हॉस्पिटलच बाथरूम एकदम अंधार अन घाण वास येणार होता.तशीच बाहेर आले नर्स ला नंतर येते सांगून पळून आले.मग मात्र सुभाष ला सांगितलं.संध्याकाळी आगाशे मॅडम कडे गेलो. तिथे टेस्ट वगैरे झाल्यावर त्यांनी मी प्रेग्नन्ट असल्याचं सांगितलं.
अरे देवा! दुष्काळात तेरावा (पहिला) महिना!
सिनेमा मध्ये आंबट खाणारी ,स्वेटर विणणारी हिरोईन लाजत नवऱ्याला प्रेग्नन्ट असल्याचं सांगते ,अस दृश्य डोळ्यासमोर येण्याच्या आधीच चांडक सरांचा उग्र ,मिशा फेंदारलेला रागीट चेहरा डोळ्यासमोर आला.बापरे,आता कस करायचं! 
आम्ही दोघंही खूप काळजीत पडलो.लग्न होऊन पुरे दोन महिने पण झाले नव्हते.एकमेकांना समजून घेण्याच्या आधीच ही नवी जबाबदारी आमच्यावर आली.खूप विचार केला ,प्रेग्नन्सी टर्मिनेट करण मनाला काही केल्या पटेना,शेवटी बाळाचं प्रेमाने स्वागत करण्याचा निर्णय घेतला.

मी,साडी,कॉलेज ,हे समीकरण आत्ता कुठे थोडं जमायला लागलं होतं तर आता मी,साडी,कॉलेज अन वाढत पोट हे नवीनच समीकरण सामोर आलं.
पण त्याहीपेक्षा कठीण परीक्षा तर पुढे होती, मला मळमळ ,उलट्या अन कमी रक्तदाबाचा खूप त्रास सुरू झाला.उलटयाचा त्रास तर इतका होता ,की गोळ्या घेऊनही पोटात पाणी पण राहायचं नाही. त्यामुळे खूप अशक्तपणा होता. शेवटी रोज सलाईन लावावं लागायचं.घरचाच दवाखाना असल्याने कम्पाउंडर आमच्या रूम मधेच सलाईन लावून द्यायचा. पण ते संपलं की नाही हे पाहायला बिचारा सुभाष तीन चार वेळा तरी दुकानातून धावत पळत वर यायचा( आमची बेडरूम वर होती,दुकानातूनच घरात यायला दार होत).महिनाभर कॉलेज,दुकान कुठेच मी जाऊ शकले नव्हते.दोन्ही दुकान बघताना सुभाषची प्रचंड धावपळ होत होती.शेवटी गांधी रोड च दुकान बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला( माझे दागिने गहाण ठेऊन या दुकानासाठी पैसा उभा केला होता).खूप वाईट वाटलं पण काही निर्णय कटू असले तरी घ्यावेच लागतात.
कॉलेज मधून अजून सुट्टी घेऊन चालणार नव्हतं, मेडिकल सर्टिफिकेट देऊनही 60% हजेरी आवश्यक होती. कु.भाग्यश्री जोशी,ह्या प्रेग्नंसी,मूळे होणाऱ्या मळमळ ,उलट्या,कमी रक्तदाब यामुळे महिनाभर गैरहजर होत्या असं मजेेशीर सर्टिफिकेट देेेऊन ,कॉलेज ला जायला लागले.
त्रास अजूनही सुरू होताच,कमी रक्तदाबामुळे गळावटपणा असायचा. लेक्चर सुरू असतानाच मधेच उठून जावं लागायचं. कॉलेज मधे जाण्याचा उद्देश आता फक्त हजेरी लावणे एवढाच राहिला!
 डबा पण सगळ्यांबरोबर न खाता ,कॉलेज समोर माझी चुलत बहीण राहायची ,तिच्याकडे जेवायला जायचे. ती पण अगदी प्रेमाने गरम पोळी करून खाऊ घालायची. महिनाभर अबसेन्ट होते ,तो अभ्यासक्रम भरून काढायला सगळ्यांनी मदत केली, जर्नल्स लिहून दिले.
प्रॅक्टिकल्स च्या वेळेला मला उभं राहायला लागू नये याची सगळे काळजी घ्यायचे. ऑफिस मधलं किंवा लायब्ररीतल
कुठलाही काम असो ,मला कधीच जावं लागलं नाही किंवा वाट पाहावी लागली नाही.फक्त आमचा ग्रुप च नाही ,तर चांडक सरांपासून लॅब असीस्टंट पर्यंत सगळ्यांनी सहकार्य केल.
 3 महिन्यापर्यंत उलटयाचा त्रास होतो अस ऐकलं होतं ,पण माझे डोहाळे जास्तच कडक असावेत,त्रास कमी जास्त सुरूच होता. अधून मधून कॉलेज ला दांडी मारावीच लागायची.दाबकी रोड चे रस्ते पण तेंव्हा खूपच खराब होते,नुसते खड्डे होते म्हंटल तरी चालेल.मी लुना वर कॉलेज ला जायचे ,त्यामुळे घरी सगळ्यांना काळजी वाटायची, पण सुदैवाने काही त्रास झाला नाही।
अशाप्रकारे गेलेले दिवस त्रास देत, चालले होते. बघता बघता वर्ष संपत आलं. प्रॅक्टिकल एक्झाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मग प्रिपरेशन लिव्ह,तर थेअरी एप्रिल एंड ला होती.
डिलिव्हरी ची तारीख 22, 23 एप्रिल! त्यामुळे प्रॅक्टिकल्स आता तर, थेअरी सप्लिमेंटरी ला द्यायची अस ठरवलं होतं.  
डिलिव्हरी च्या 10 दिवस आधी पर्यंत कॉलेज ला जावं लागलं,कारण
प्रॅक्टिकल्स 12 एप्रिल ला संपले .त्याच दिवशी मी माहेरी नागपूरला निघाले.
23 एप्रिल ला तन्वी चा जन्म झाला.
पुढे सप्लिमेंटरी ला परीक्षा देऊन मी एकदाची D.Pharm (फर्स्ट क्लास)झाले.त्यानंतर अकोल्यात असलेल्या एक दोघीं शिवाय(त्या पण क्वचित भेटायची)कोणाशी कॉन्टॅक्ट राहिला नाही. आज इतक्या वर्षांनी आशिष चा फोन आला,अन 26 वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. सगळ्यांना भेटायची उत्सुकता वाढली. 
9 तारखेला कॉलेज ला गेले .84 पासूनच्या बॅच चे विद्यार्थी आले होते. आमच्या '93' बॅच चे सगळ्यात जास्त, 32 जण होते. मी 8,10 जण सोडले तर फार कोणाला ओळखत नव्हते,मला मात्र सगळे ओळखायचे (साडी अन प्रेग्नन्सी  जिंदाबाद!).

सरांना भेटलो ,सगळ्या लॅबोरेटरी मधे, ,क्लासरूम मधे जाऊन आलो.तिथे जाऊन आल्यावर खूप आठवणींनी मनात गर्दी केली.
   बाकी सगळ्यांच्या,पिकनिक ला कशी मजा आली, लॅब असिस्टंट ला आपण सारख ग्लिसरीन मागून कस सतवायचो ,फिशपॉड दिलेला कागद बोर्ड वर लावल्यावर कसा गोंधळ झाला होता ,अश्या गप्पा सुरू होत्या.मी तेंव्हा त्या कशातच नव्हते ,पण तरी ऐकायला मजा येत होती. 
कॉलेज ने छान कार्यक्रम आखला होता.सत्कार समारंभ,( alumni representative म्हणून मला पण स्टेज वर बसवलं),आजी माजी विद्यार्थ्याच कौतुक,बक्षिस वितरण,भाषण हे दुपारच्या जेवणापर्यंत आटोपलं.मग गाणी ,डान्स ,एकपात्री प्रयोग असे रंगारंग कार्यक्रम होते. स्टेज वर डान्स सुरू असताना खाली पण उत्स्फूर्तपणे आपापल्या ग्रुप मधे मुलं मुली नाचत होते. एकदम अनौपचारिक वातावरण होत.
लवकर परत येईन अस ठरवून गेलेली मी तिथे चांगलीच रमली. पण कार्यक्रम जरा लांबला, घरी पाहुणे पण होते. त्यामुळे, फक्त आमच्या बॅच च्या जुन मधे होणाऱ्या गेट टूगेदर ला नक्की येण्याचं कबुल करून सगळ्यांचा निरोप घेतला.खूप खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून.
येताना मनात विचार आला,परिस्थितीमुळे काहीसा खडतर झालेला D.pharm चा मार्ग, केवळ मला चांगले लोक भेटत गेले त्यामुळे सुकर झाला.
त्या सगळ्यांचे शतशः आभार!

हाँ तो मै कहाँ थी...

धावतपळत मी जस्ट सुटलेली झेलम एक्सप्रेस पकडली. जळगावला नोकरी करत असतानाचे अपडाऊनचे दिवस. नेहमी स्टेशनवर किंवा माझ्याच गाडीत किंवा जळगावला परतीची गाडी पकडण्य़ासाठी बस स्टँडपासून स्टेशनकडे धावणार्‍या आम्हा सर्वांबरोबर दिसणार्‍या त्या टपोर्‍या डोळ्यांच्या ख्रिश्चन मुलीने मला शाहरुख स्टाईल हात देऊन आत ओढले. आम्ही एकमेकींना छान स्माईल दिलं. मग चेहर्‍यावर करुण भाव आणून नेहमीची आयडिया करुन एक बरी फॅमिली पाहून मी बसायला जागा पटकावली. तिलाही बोलावलं. शेजारी बसल्याने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती माझ्याच शाळेत मला दोन वर्ष सिनीयर होती हे कळलं. मग जुन्या शिक्षक-शिक्षिकांचे, इतरही बरेच विषय निघाले. तिलाही माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती. आपण तिला जेनी म्हणूया. बॉयकट, जरा सावळा वर्ण आणि गुटगुटीत बांधा असलेल्या, स्कर्ट किंवा जरा मॉडर्न पद्धतीचा पंजाबी ड्रॆस घालणार्‍या आणि लालचुटुक्क लिपस्टीक लावणार्‍या या जेनीची आणि माझी त्या प्रवासात जी भयंकर गट्टी जमली ती आजतागायत तश्शीच टिकून आहे. मुलं तिला ’तोता’ म्हणत.. म्हणजे ती अब्सेंट असली तर मला ऐकू जाईल अशा आवाजात, ’आज तोता नही दिख रहेला रे..’ वगैरे म्हणत.
तिची इंग्लीशमिश्रित बंबईया हिंदी खासच असायची. उदा: ’रास्ते मे साला ये गायलोग कही भी बैठते, घूमते है तो आय गेट फ्रायटन्ड इसलिए मै गाडीच नई चलाती’

आता सकाळी स्टॆशनवर निघताना ती मला हाक मारायची. माझी कायम धांदल असायची. त्यात माझी शिस्तप्रिय आई, ’मोहिनी मागे फिर, तुझा चमचा विसळायचा राहिला आहे’ असं काहीतरी प्रचंड घाईत असताना सांगायची. ’अग माझे आई, माझी गाडी चुकेल नं’ म्हटलं तरी, ’चुकू दे, त्याशिवाय तुला सवय लागणार नाही’ असं शांतपणे म्हणायची. जेनी फाटकात उभी राहून आमचे हे प्रेमळ संवाद हसत ऐकत असायची. ’तेरेको ये लिपस्टिक वगैरे लगानेको टाईम कैसे मिलता रे’, असं मग मी रस्त्याने धावता धावता तिला विचारायचे. तिला झोपेची देणगी आहे. ’मेरेको जहाँ कही भी होरिझॉंटल किया, वही मै सो जाती’ असा तिचा प्रकार होता. गाडीत, वेटिंग रुममध्ये ती अशीच पटकन जरा तिरकी झाली की झोपून जायची त्यामुळे ती कायम फ्रेश असे. आमची कंपनी वेगवेगळी असल्याने आणि कामाच्या लोडप्रमाणे आमच्या परतण्याच्या वेळा कधी कधी जुळत नसत. मग दुसर्‍या दिवशी सांगायला आमच्याकडे, काल काय झाले, पवन भोत लेट आई, कर्नाटक कैसे अचानक रुक गयी, बोगी मे क्या गडबड हुई, वो मनमाडका मुछ्छड टीसी फिरसे मेरेको बोला की ये पास नही चलेगा वगैरे ढीगभर किस्से असत. तिला सविस्तर आणि संगतवार सांगायला आवडे. उदा: - ५.१२ को मैने कॉम्प्युटर शटडाऊन किया और बस पर्स हाथ मे ली तो ये साला डेरिक आके बोलता है, इतना पेज अर्जंट बनानेका है. इधर नवजीवन का टाईम होयेला. मैने फटाफट बनाया. ५.१७ को उसको दिया तो उसको उसमे एक गलती मिला. उसको क्या रे, स्कूटर से घर जाके पैर दीवाल को लगाके टीव्ही देखनेका रहता खाली, बीबी बनाती बेचारी खाना. बच्चो की पढाई भी वो ही लेती. हाँ, तो मै कहाँ थी!’ मी- ’डेरिक के पास’. मग ५.४५ पर्यंतचे नवजीवन चुकली, मुश्कील से कुर्ला मिली, वो मोटे अंकल कैसे गिर गये जीनेपे, वगैरे वगैरे धावते समालोचन ऐकवायची.

 मी कंटाळून मध्येच काही पुढचे विचारले की ते तिला आवडत नसे. ’रुक तू, हाँ, तो मै कहाँ थी!’, ’वो आर्थर हॅले के बाजू मे’. एक अपडाऊनवाला मुलगा आम्हाला कव्हर दिसेल अशी मुद्दाम धरुन जाड जाड इंग्लीश पुस्तके वाचायचा. त्याला आम्ही आर्थर हॅले म्हणत असू. ’समझता भी है के खाली स्टाईल मारता है’ अशी तिला शंका होती. या अखंड गप्पांमध्ये दरम्यान आम्हा दोघींना माझी आणखी एक जवळची मैत्रिण जॉइन झाली होती. एव्हाना आम्हाला एकमेकींच्या घरची, कंपन्यांची, त्यातल्या आमच्या डिपार्ट्मेंटच्या लोकांची इतकेच नव्हे तर त्यांच्या खानदानाची सुद्धा इत्यंभूत माहिती झाली होती’. रोज नवी गाडी, नवे प्रवासी, नवे अनुभव, धमाल यायची. एक मुलगा आम्ही तिघी सकाळी ज्या गाडीच्या ज्या बोगीत चढत असू तिथेच यायचा आणि मख्ख चेहर्‍याने ’अजंता टूथपेस्ट पापा का, भैया का, बहना का, और अजंता मेरा.. टिंग्ग’ एवढेच म्हणायचा आणि आम्हाला हसू आवरायचे नाही. बाकी तो काही त्रास द्यायचा नाही पण हे मात्र म्हणायचाच. आम्ही कितीही ठरवले तरी हे ऐकताच आम्ही ही ही करायला लागत असू. आम्ही हसलो की तो निघून जात असे मग थेट दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा तो अजंता टूथब्रश हजर होत असे. तिच्या बॉयकट आणि शर्ट ट्राऊजर मुळे मागून तिला पुरुष समजून एकदा ट्रॆनच्या दुसर्‍या बाजूने चढणार्‍या एका बाईने तिला ’भैया जरा हाथ देना तो’ असे म्हणून एक गाठोडे हिच्या डोक्यावरच ठेवून दिले होते. पास संपलेला आहे याची ट्यूब पेटली आणि तेव्हाच नेमका टीसी आला तर आम्ही अनेक क्लुप्त्या लढवत असू पण तेव्हा खिदकन हसून जेनी आम्हाला बरेचदा तोंडघशी पाडत असे.

रविवारी जेनी लवकर उठून लालचुटुक्क लिपस्टिक लावून संडॆ मासला न चुकता जात असे. येताना भाजी घेऊन, मला भेटून घरी जात असे. मग चिकन खानेका आणि सोनेका असा तिचा सोपा कार्यक्रम असायचा. प्रवासात सोबत नसेल तेव्हा वाचन बरं म्हणून मी जवळ कायम पुस्तक ठेवायचे, क्या करती तू इतना पढके, आजूबाजू देखकेही तो कितना पढनेको मिलता है, असं तिचं सोपं प्रिन्सिपल. पुरणपोळी तिला खूप आवडायची म्हणून घरी केली की तिच्यासाठी मी डबा न्यायचे. माझं ख्रिस्मस लंच इतर ख्रिश्चन मैत्रिणींसह तिच्याकडे असायचं. तिची आई अप्रतिम डोनट्स बनवायची. जेवण मग थोडं म्युझिक, डान्स वगैरे. मजा यायची. ख्रिश्चन लग्नाच्या रिसेप्शनला ती सोबत असली तरच मी जायचे. भेटवस्तू देताना नवरा-नवरीला हलका किस करण्य़ाची त्यांची पद्धत मला झेपायची नाही मग मी तिच्या मागे लपून लांब हात करून भेट देऊन सटकायचे. गावात धर्मांतरित ख्रिशचन भरपूर. एक कॉलोनी अँग्लोइंडियन्सची. यांची चर्चेस वेगळी. त्यातून मराठी ख्रिशचन्सची चर्चेस अजून वेगळी. त्यांचं सर्कल वेगळं. जो भेद नको म्हणून धर्मांतर झालेलं तो भेद शेवटी तसाच. जेनीचं कुटुंब कॅथोलिक. प्रेयरशिवाय जेवण नाही. अगदी कट्टर धार्मिक, वडील नव्हते. मोठी बहिण त्यांच्या जागेवर नोकरीला लागली होती. धाकटी बहिण एक जुजबी नोकरी करत होती. धाकटा भाऊ शिकत होता. तशातच तिच्या धाकट्या बहिणीने एका मूळ यूपीतल्या हिंदू मुलाशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना तो मोठा धक्का होता. पांढर्‍या सॅटीनच्या झालरवाल्या गाऊन मधल्या, हातात गुलाबांचा बुके घेतलेल्या ब्राईड ऐवजी त्यांना लालजर्द शालू, सोनेरी ओढणी, हातात चुडा, भांगात सिंदूर, हातभर मेहंदी, मोठठं कुंकू अशा वेशातल्या वधूच्या रुपात बहिणीला बघवेना. जेनी रडली, संतापली, वो सुखी नही रहेगी म्हणाली. हळूहळू ते निवळलं. (आता त्या बहिणीचं कुटुंब हिंदूच असलं तरी ख्रिश्चनांच्या वरताण त्यांच्यामध्ये मिसळून गेलंय)

आपल्याकडे ख्रिश्चन लोक सैल चारित्र्याचे असतात असा फार गैरसमज आहे. एकदा स्टुडिओत लग्नासाठी फोटो काढायला गेली असताना फोटोग्राफरने तिला काही ऑड पोझेस द्यायला सुचवल्या. तिने मला हे सांगितल्रे तेव्हा मी जाऊन त्याला झापले. त्यावर तो निगरगट्टपणॆ ’उन लोगोमे इतना चलता है’ असं म्हटल्यावर मात्र मला अतिशय वाईट वाटले. जेनी एखाद्या सभ्य हिंदू घरातल्या मुलीइतकीच सुसंस्कृत होती. जेनीला जी स्थळं यायची त्यात शिकलेली फार कमी. ख्रिश्चनांमध्ये उच्चशिक्षित (तेव्हा) फार कमी, दारु पिणे नॉर्मल. इंग्लीशच्या जोरावर नोकर्‍या मिळून जात. चंकीफंकी हेअर स्टाईल, हातात गिटार असे ’मुलांचे फोटो’ पाहून ती वैतागायची. ’इन मिथुन चक्रवर्तीयोंमेसेही कोई सिलेक्ट करना पडेगा क्योंकी किसिको पटाना अपने बस की बात नही’ असं म्हणायची. मग तिला एक चांगले मुंबईचे स्थळ आले. मुलाला जरा टक्कल होते पण शिक्षण नोकरी उत्तम. बाकी माहिती काढली, ते ही उत्तम. ’ये कितना टकला है मॅन ..कैसा लगेगा जोडा रिसेप्शन के फोटोमे’ अशी तिला काळजी पडली. मी तिची बरीच समजूत घातली की ’शादी के बाद घने बालोवाला भी टकला हुआ तो तू क्या उसे छोड देगी! शादी क्या सिर्फ रिसेप्शनके फोटो अचछे आने के लिए करतेहै क्या’ वगैरे. अखेर तिने त्याला होकार दिला. तिची निवड सार्थ ठरली. माझे लग्न ठरले तेव्हा महेश टकला नसल्याचे तिला हायसे वाटले.अर्थात हे सगळे तेव्हापासून फोनवर. व्हॉट्सअ‍ॅप वर संपर्कात असतोच. एकदोनदा ठरवून आणि एकदा योगायोगाने आम्ही भेटलो. एकमेकींच्या घरी मात्र अजून जाणं झालं नाही पण तिचा फोन आला नाही असा माझाच काय , मुलांचा वाढदिवसही जात नाही. फोन उचलला की जेनी सुरु होते, "कैसी है रे! मै तो बस दिनभर कॉर्पोरेट जॉब, बॉस, टार्गेट, सब्जी, बच्चे.. खाली सोने के लिए घर आती रे, इस्से अच्छा ऑफीसमे ही सो जानेका! कल की बात, ५.१५ को मै उठी, हजबंड के लिए चाय बनाई, वो भी बनाता रे मेरे लिए लेकिन इतनी टेरिबल बनाता की काडेके माफिक. पीही नही सकते. फिर बोलता आज मेरा ऑफ है, पहले बोलता तो मै आधा घंटा जादा नही सोती थी क्या, सोना तो मेरी जान है. बॉंबेमे इन्सान को कहाँ सोनेको मिलता रे, अपना अपडाऊन बहोत आसान था, ऐ अब तेरी साँस मम्मी के जैसा टॊकती क्या रे, मोहिनी मागे फिर, ही ही ही, हाँ तो मै कहाँ थी...’
मी- ’हजबंड के पास’...

- मोहिनी

Thursday, February 13, 2020

माझी मावशी

आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण आली नाही. काय कुणास ठाऊक पण तिचा-माझा काही वेगळाच ऋणानुबंध होता! आमच्या लहानपणी मावशी मुंबईला राहायची. आमची परिस्थिती खाऊनपिऊन सुखी अशी. आमचे सगळेच नातेवाईक जवळपास त्याच स्थितीतले. आमची राहणी वगैरे अगदी साधीसुधी. त्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर मावशी म्हणजे आम्हाला एकदमच हाय फाय वाटायची. मावशीचे यजमान मुंबईला सरकारी खात्यात चांगल्या मोठया हुद्यावर होते. वर्षा दोन वर्षातून एखादेवेळेला मावशी यायची आमच्या घरी अंजनगावला. लहानपणी आम्हाला तिच्याबद्दल एक वेगळेच कुतूहल असायचे. तेव्हाची तिची मूर्ती मला अजूनही चांगलीच आठवते. उंच, सडपातळ बांधा, निमगोरा रंग अन करारी चेहरा.  स्वच्छ परीटघडीची, फिक्कट रंगाची, हलक्या फुलाफुलांचे मोहक डिझाइन असलेली साडी अन त्यावर पांढरेशुभ्र चिकनचे ब्लॉउज. पायात सपाता. त्यावेळी घरात अशी चप्पल वगैरे वापरणे आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचेच असायचे. पण तिला कायम संधिवाताचा त्रास असल्याने थंड फरशी अजिबात सहन नाही व्हायची. म्हणून कायम पायात सपाता. सपाता हा शब्दही मला तेव्हाच पहिल्यांदा कळला. अजूनही तिचे ते ताठ चालणे अन खूप मोठ्या खणखणीत स्पष्ट आवाजात बोलणे चांगलेच स्मरणात आहे. बरेचदा तिचे साधे बोलणेही रागावल्यासारखेच वाटायचे. तिच्या त्या आवाजामुळे आम्ही कायम तिला वचकून असायचो. शिवाय स्वभाव असा की कुणाची कुठलीही चूक तिला सहन नाही व्हायची. ज्याचे चुकले त्याची धडगत नसायची. मला कधीही मी लहान असतांना तिने जवळ घेऊन लाड वगैरे केलेत अशी आठवण नाही. किंवा आम्ही भावंडंही कधी तिच्या फारसे जवळ नाही गेलो. तिचा कायमच एक आदरयुक्त दरारा असायचा. तरीही ती आलेली आम्हाला आवडायचं  कारण येतांना ती आमच्यासाठी खूप छान छान मिठाई घेऊन यायची, जी आम्ही आमच्या गावात कधी बघितली सुद्धा नसायची. आणि एकूणच तिचं राहणं, वागणं, बोलणं ह्याबद्दल एक सुप्त आकर्षण असायचं. दुसरं म्हणजे कुणाचा शाळेत नंबर आला, कुणाला कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं, कुणाचं हस्ताक्षर सुंदर इ. इ. तिला कळले की बाकी इतके भरभरून कौतुक करायची की आम्हाला अगदी आभाळ ठेंगणे व्हायचे. इतर कुणी कितीही कौतुक केले तरी कधी इतकी छाती फुगायची नाही. कारण ती कधीही कुणाची विनाकारण, तोंडदेखले स्तुती करायची नाही. खरं ते खरं असा तिचा बाणा! त्यामुळे तिच्या शब्दाला वेगळेच वजन होते. 

त्यानंतर काकांची अकोल्याला बदली झाली अन मग त्यांनी अकोल्यातच स्थायिक व्हायचे ठरवले. त्यानुसार मग अकोल्यालाच सुंदरसे घर देखील बांधले. आमच्या सर्व नातेवाइकांमध्ये इतके छान, प्रशस्त घर कुणाचेच नव्हते. नेमकी त्याच वर्षी मी बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. अगदी आमच्या शाळेतून फर्स्ट वगैरे आली. आईबाबांची इच्छा होती मी सायन्स घ्यावं म्हणून. पण आमच्या अंजनगावला सायन्स कॉलेज नव्हते. त्यामुळे मग मला मावशीकडे अकोल्याला ठेवायचे असे ठरले. तसाही माझ्या आईवर मावशीचा फार जीव. वडिलांच्या पश्चात ह्या दोघी बहिणींनी लग्नापूर्वी नोकरी करून पूर्ण कुटुंबाचा भार अतिशय कठीण परिस्थितीत सांभाळला होता. त्यामुळेच मावशीचे  माझ्या आईवर अतिशय प्रेम. नलूची मुलगी म्हणून ती मला तिच्याकडे ठेवायला लगेच तयार झाली आणि माझी रवानगी अकोल्याला मावशीकडे झाली. सुरवातीला मला तिच्याकडे प्रचंड बिचकल्यासारखे व्हायचे. तिची ती कडक शिस्त, मोठ्ठा आवाज, अमुक एक गोष्ट अशी म्हणजे अशीच करायची असा तिचा अट्टाहास, थोडे जरी इकडचे तिकडे झाले,एवढीशी चूक झाली तरी ती मोठ्यांदा रागावणार. आधीच आवाज मोठा त्यात रागावली की मग काही बघायलाच नको! मला अगदी पळून जावेसे वाटायचे! पण हळूहळू तिची सवय व्हायला लागली. तिचा आवाजच मोठा आहे हे ही लक्षात आले. पूर्वायुष्यात आलेल्या काही कटू अनुभवांनीच ती अशी फटकळ, स्पष्टवक्ती झालीय हेही कळत गेले. दुर्दैवाने तिला मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळेही असेल कदाचित पण तिची ती शिस्त, तिचा ठामपणा टिकून होता अजूनही. नाहीतर एखादं  मूल झाल्यावर स्त्रियांच्या स्वभावात जो सहज लवचिकपणा येतो तो तिच्यात नाही आला बहुदा. पण हळूहळू सहवासाने मला वरवर कठोर दिसणाऱ्या मावशीचे खरे अंतःकरण समजायला लागले. नलूची मुलगी म्हणून आपल्यावर ती किती प्रेम करते, माया करते हेही कळायला लागले. तिचे कितीतरी सदगुण जसे तिची कमालीची स्वच्छता, नीटनेटकेपणा, काटकसरी अन अतिशय कष्टाळू स्वभाव, गुणग्राहकता, नवीन गोष्टी शिकण्याची आवड अन ते लगेच आत्मसात करण्याची तल्लख बुद्धी, कमालीचा जिज्ञासू स्वभाव, तिचे अफाट वाचन, वाचन करतांना महत्वाची टिपणे काढण्याची तिची सवय, एखादी गोष्ट कळली नाही तर पटकन कुणालाही विचारण्यात कधी कमीपणा न मानण्याची  तिची वृत्ती, कुणालाही मदत करण्यात तत्पर स्वभाव, सद्गुणांची तोंडभरून तारीफ करण्याचा तिचा स्वभाव, वक्तशीरपणा, कामसूपणा, कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवण्याचा तिचा स्वभाव, विनाकारण गॉसिपिंग न करणे, स्वतःची चूक असेल तर पटकन मान्य करण्याचा स्वभाव अश्या कितीतरी गोष्टी ! तिच्या जवळ राहून जेव्हा हे सगळं मी अनुभवलं तेव्हा माझ्याही नकळत ती केव्हा माझे रोल मॉडेल बनली मलाही कळले नाही. तिची  प्रत्येक बाबतीत स्वतःची अशी ठाम मतं, तत्त्वं असायची अन ती 100 टक्के त्याला धरून चालायची. मात्र एखादा तिचा समज, तिचं मत चुकीचं आहे हे तिला कळल्यावर बाकी अत्यंत खिलाडू वृत्तीने ती ते मान्य करून स्वतःच्या वागण्यात आवश्यक तो बदल करायला तिला कधीही कमीपणा वाटला नाही. मात्र कुणी तिला फसवलं, तिच्याशी खोटं बोललं की बाकी ती भयानक संतापायची. खोटेपणाची तिला अतिशय चीड. कारण ती स्वतः कमालीची सत्यवचनी होती. जे खरं आहे ते अगदी निर्भीडपणे, स्पष्टपणे बोलून टाकणे हा तिचा स्वभाव. 

वास्तविक पाहता हा एक चांगलाच गुण, पण ह्या तिच्या अतिस्पष्टवक्तेपणाने बरेच लोक दुखावले जाऊन तिच्यापासून दूर झाले. खरं  तर हे तेच लोकं होते ज्यांच्यासाठी पूर्वी तिने खूप केले होते. पैसा, कष्ट अन वेळ तिन्ही खर्चून! पण एखाद्याच्या नशिबी यश नसतं म्हणतात.  तिचं तसंच झालं.  

मी तिच्याकडे बीएस्सीचे तीन वर्षे राहिली. तिने मला सांगून टाकले होते, "हे बघ मधुमती, तुझे हे अभ्यास करायचे दिवस आहेत. संधिवाताने माझं मेलं सदा हे दुखतं, ते दुखतं सुरु असतं. तू लक्ष देत जाऊ नकोस. तुझे तुझे कामं झाले कि आपला अभ्यास करायचा. ते जास्त महत्वाचे आहे." तिने मला दोन कामं  नेमून दिली होती. एक म्हणजे तिला सकाळी कणिक भिजवून देणे अन दुसरं म्हणजे झाडलोट करणे. कणिक मळतांना तिला संधिवातामुळे खूप वेदना व्हायच्या हातात. त्यामुळे ते काम मला दिलं. हे सविस्तर सांगायचं कारण म्हणजे माझ्या त्या एवढ्याश्या कामाचं ती केव्हढं तोंडभरून कौतुक करायची. "कित्ती छान कणिक भिजवते मधुमती. अगदी  चुरून चुरून मऊसूत लुसलुशीत गोळा करून ठेवते माझ्यासाठी. परात सुद्धा कशी स्वच्छ! कुठ्ठे लिडबिड नाही का काही नाही !" येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती हे आवर्जून सांगणार. मला संकोचल्यासारखं व्हायचं. साधी कणिक भिजवायचं काय एवढं कौतुक करायचं? पण खूप छान वाटायचं तिने कौतुक केले की. तिचा तो स्वभावच होता कुणाचं थोडंही चांगलं काही दिसलं कि पटकन पावती द्यायची. मग बरोब्बर 10 वाजता तिचा सगळा स्वयंपाक तय्यार असायचा. काकांना ऑफिस असायचं त्यामुळे ते 10 ला जेवायला बसायचे. मला गरम जेवायला आवडतं म्हणून तीनही वर्षे तिने काकांसोबत जेवायला बसवून गरम गरम टम्म फुगलेले, घराच्या लोण्याने माखलेले फुलके खाऊ घातले ! केव्हढी माया ही! आठवण आली की अजूनही भरून येते. एकदा कणिक भिजवल्यावर मग बाकी इतर स्वयंपाकात ती माझ्या मदतीची मुळीच अपेक्षा नाही करायची. उलट मला माझा अभ्यास करायला जा म्हणायची. “कामं काय मग आयुष्यभर करायचेच आहेत. आता अभ्यास महत्वाचा!” असं म्हणायची. मला वाटतं तेव्हा मी B.Sc. ला युनिव्हर्सिटीत गुणवत्ता यादीत दुसरी आले त्याचं श्रेय मावशीच्या ह्या अभ्यासाचं महत्व माझ्या मनावर बिंबवण्यालाच जातं. रिझल्ट लागला तेव्हा तिला केव्हढा आनंद झाला होता! ज्याला त्याला “माझ्या घरी राहिली तर मला यश दिलं मधुमतीनी!” असं सांगत सुटली ! 

मावशीचे घर होते केशवनगरला. तेथून RLT, माझे कॉलेज बरेच दूर पडायचे. मी बस ने बसस्टॅन्ड पर्यंत जायची अन येतांना टॉवर जवळून बस पकडावी लागायची. बस ची वाट बघण्यात बराच वेळ जायचा. माझ्या बऱ्याच मैत्रिणींजवळ सायकल होती. मलाही वाटायचं  सायकल घेऊन मागावी बाबांना. पण मग स्वतःच विचार करायची की कशाला उगाचच खर्चात पाडायचं बाबांना? आधीच कॉलेज ची फी, वह्या पुस्तके ह्यात बराच खर्च होतोय. शिवाय बाबा माझा खर्च म्हणून दरमहा 100 रुपये पाठवायचे मावशीला. त्यात आणखी सायकलचं  कशाला काढायचं ? म्हणून मी आपली चूप होती. पण माझ्या मनातलं मावशीने जणू काही ओळखलं अन बाबा पाठवायचे ते पहिल्या 5 महिन्यांचे 500 रुपये जमा झाल्यावर एकदिवस मला दुकानात घेऊन गेली अन माझ्यासाठी कोरी करकरीत हिरो ची सायकल
घेऊन दिली! त्यावेळेस झालेला आनंद केवळ शब्दातीत होता! असे लहानमोठे कैक प्रसंग. प्रत्येकवेळी तिच्या माझ्या नात्यामधली वीण आणखीनच घट्ट होत गेली.

नंतरही खूप प्रसंग आहेत. माझं लग्न ठरलं तेव्हा सर्वांना अकोला सोयीस्कर पडतं म्हणून माझा साखरपुडा तिच्याच घरी झाला. नंतर पहिल्या बाळंतपणाच्या वेळी अंजनगाव ला वैद्यकीय व्यवस्था तितकीशी नीट नव्हती तेव्हा म्हणून माझं पहिलं बाळंतपणही तिच्याच घरी झालं. माझ्या दुसऱ्या बाळंतपणात मला बेड रेस्ट होती तेव्हाही ती माझ्या जवळ येऊन राहिली होती. नंतर काही कारणास्तव आम्ही अकोल्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला तेव्हाही असा योग आला की पहिले 2, 3 वर्षे तिच्याकडेच राहिलो. मी नोकरीसाठी बाहेर असायची तेव्हा माझ्या मुलांचं ती अभ्यास घेण्यापासून सगळं करायची. त्या कालावधीत माझ्या दोन्ही मुलांवर तिने निरतिशय प्रेम केले. त्यांना चांगलं वळण लावलं, त्यांच्यावर उत्तम संस्कार केले! काय आणि किती सांगावं तिच्याबद्दल! मात्र एकच खंत वाटते की तिच्या शेवटच्या दिवसात काही परिस्थितीवश मी तिचं फारसं करू शकली नाही. त्याबद्दल अजूनही एक अपराधी भावना, एक सल माझ्या मनात आहे. काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं! माझं पूर्वजन्मीचं कुठलंतरी पुण्य म्हणून मला तिचा इतका जवळून सहवास घडला. तिने माझ्यावर, माझ्या मुलांवर जे अंतःकरणापासून प्रेम केलं त्याला तोड नाही. तिच्या आजच्या वाढदिवशी तिला शतशः नमन! मला पक्का विश्वास आहे की ह्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात जिथे कुठे ती असेल तेथून ती माझ्याकडे बघते आहे आणि तिचा  प्रेमळ वरदहस्त माझ्या डोक्यावर अजूनही आहे!

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे 
अकोला

इजिप्तायन 2


इजिप्त टूरचा पहिला साईट सिंइगचा स्पॉट होता, गिझा पिरॅमिड्स! हॉटेलमधून धूसर दिसणारे पिरॅमिड्स प्रत्यक्ष पाहायची खूप घाई झाली होती. पूर्ण वालुकामय भागांतून आमची बस वर पोचली आणि आणि खाली उतरलो, तर जगातले प्राचीन आश्चर्य डोळ्यांसमोर होते. आपण ते प्रत्यक्ष बघतोय यावर विश्‍वासच बसत नव्हता.
              आम्ही इतर फोटो प्रेमींच्या मध्ये न अडकता, पटकन् पिरॅमिड्सवर चढलो. आम्हाला वाटलं ‌ की आत जाण्यासाठी रांग आहे, पण तिथे गेल्यावर समजलं की त्यासाठी वेगळे तिकीट आहे. ते काढून आत पाहायला जाण्याइतका वेळ आमच्या टूर मॅनेजरने दिला नव्हता. पण मग जे आत जाऊन बाहेर येत होते त्यांना विचारलं, तर ते म्हणाले की, आत आता बघण्यासारखे काही नाही. बोगद्या सारखा, चढणीचा, ओबड-धोबड रस्ता आहे.  किल्ल्याच्या गुप्त भुयारा सारखा! भिंतीत फक्त चौकोनी विवरे आहेत.त्याच्यावर ना नक्षी आहे, ना चित्र!मग खट्टू झालेल्या मनाला थोडे बरे वाटले.
                 मग खाली खडकाळ रेतीत येऊन वर पिरॅमिडकडे पाहिलं, खूफू पिरॅमिड! एकावर एक रचलेले प्रचंड आकाराचे दगड, नुसतेच एकावर एक असे रचून ठेवलेले ,त्यांच्यामध्ये सिमेंट किंवा चुना असे काहीही भरलेले नाही. आश्चर्य वाटले ना? पूर्वी म्हणे, त्यांच्या वरच्या भागावर इलेक्ट्रमची म्हणजे सोन्या-चांदीच्या मिश्र धातू ची त्रिकोणी टोपी बसवलेली होती. ग्रीस मध्ये पिरॅमिड म्हणजे  कणकेचा बसका केक!ग्रीकांना पिरॅमिड लांबून पाहून केक ची आठवण झाली म्हणतात.
      त्या भागात तीन पिरॅमिडस आहेत.आजोबा ,वडील आणि नातू या तिघांनी बांधलेली ही अद्भूत  स्मारकं!  त्या पिरॅमिड्सच्या दगडांना मी खूप वेळा कुरवाळले.
.  हजारो वर्षांत, त्यांनी कुठल्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले नसेल? पण तरी तितकेच स्वच्छ, चकचकीत दगड! अडीच टन वजनाचा एकेक असे पंचवीस  लाख दगड यात वापरले आहेत. ते इतक्या  उंचीवर  कसे  नेले  असतील?  सगळेच अद्भुत!
4500 वर्षांपूर्वी खूफूची ममी इथे ठेवली गेली होती. काही शतकं तिला काहीही ही झालं नव्हतं, पण पिरॅमिड फुटल्यानंतर, लाखो करोडो लोक इथे येऊन गेले.  त्याचा परिणाम पिरॅमिड्स वर झाला. नाहीतर ममी कायमची टिकावी म्हणून हवाबंद असा पिरॅमिड बांधला होता. आजही इथे सफरचंद ठेवलं आणि दार बंद करून घेतलं तर ते वर्षभर तसंच टिकतं असं म्हणतात. ग्रेट ना!

खुफू ,खाफ्र आणि आणि मेंनकावरे असे 3 पिरॅमिड्स पाहून आम्ही  निघालो ते Sphinx च्या दिशेने
 पिरॅमिडसच्या जरा  खालच्या  बाजूला sphinx  आहे. हे  इजिप्तमधील सर्वात  प्रसिद्ध, महा प्रचंड  असं शिल्प! इजिप्तचे  प्रतीक!  सव्वादोनशे  फूट  लांब, सत्तर फूट  रुंद  आणि  साठ  फूट  उंच!  चुनखडीच्या  एका  अखंड  खडकात  कोरलेले! या  शिल्पाभोवती अनेक दंतकथा,अंधश्रद्धा आहेत. Sphinx  म्हणजे  बसलेल्या  सिंहाचं शरीर आणि  त्याला मानवी  शिर, ते  शिर  स्त्रीचं की पुरुषाचं, हे  पण  नक्की  सांगू  शकत नाही.   त्यावरही  वाद आहेत. कारण केशरचना  पाहिली,  तर  बाईची वाटते. त्यामुळे  हे  पाहून  आपल्याला  अनेक  प्रश्न  पडतात? हे शिल्प  कुणी,कधी उभारलं असेल?कारणं काय असतील? हे कसं  साकारलं गेलं असेल? पण  यापैकी कुठल्याच प्रश्नाला  अजून  तरी  उत्तर  सापडलं नाहीये. ( इजिप्तमध्ये  हा अनुभव  बरेचदा  येतो.)केशवसुत म्हणतात  तसं, 'कोडे  घालूनिया बसली  कैदाशीण, उकलिल्यावीण  खाईल ती!'(सध्या  त्याच्या  नाकाचा  शेंडा आणि  डावा भाग नष्ट  झालाय, नेपोलियनने केली  म्हणतात  ही दशा! वाईट  वाटले  पहाताना! )
               तिथून आम्हाला  संपूर्ण  वालूकामय भागात  नेलं,चारी  बाजूंना  सगळीकडे  वाळूच  वाळू! तिथे  खूप  मोठ्या  परिसरात  नऊ  पिरॅमिड्स आहेत. लांबून  ते जवळजवळ  भासतात,पण प्रत्यक्षात ते  एकमेकांपासून काही  अंतरावर  आहेत. 
       इथे  उंटवाले,घोडेवाले, घोडागाडीवाले यांची गर्दी होती. प्रत्येकजण हाका मारून  राइडसाठी मागे  लागले होते. पण  आम्ही  उंटावर  बसायचे  टाळून, घोडागाडी प्रेफर केली. वाळूवर मध्येच उंचवटे, मध्येच  गाडी घसरत  खाली  यायची. ....मजाही  येत  होती आणि  थोडीशी भीतीही वाटत होती. घोडागाडी पिरॅमिडसच्या अगदी जवळून नेतात, तिथे  लहान नऊ आणि  मागे. ..ते 3 मोठे  पिरॅमिड्स असे आहे.लख्ख  उन्हातले ते द्रुष्य  म्हणजे  पर्वणीच! त्या  घोडागाडीवाल्याने  आमचे वेगवेगळ्या  पोझमध्ये इतके फोटो  घेतले. तोच पोझेस् सांगायचा ,आम्ही  आज्ञाधारकपणे तशा द्यायचो. ...तेही  भराभर. ..हे सगळे फोटो   तो  घसरत्या वाळूत  घोडा, गाडी, स्वतःला  बॅलन्स  करुन  काढत होता.मला तर राइड संपूच  नये, असं वाटत होतं. 
           इतका  grand experience! असं काही  पाहिलं  की  वाटतं. ...आपण  हे  फोटोत  नाही  कैद  करु शकत!  तेव्हा  उगाच  भारंभार  स्वतःचे  फोटो  काढत बसण्यापेक्षा, त्यांना  जितकं शक्य तेवढं डोळ्यांत  साठवावं,मनात  ते  खूप  खोल  कसं  जाईल  ते  पहावं. ..म्हणजे  कधीही  स्मरण केल्यावर ,ताज्या अनुभवाची  अनुभूती येईल. ..असं मला  वाटतं.
 नंतर  जेवायला  ज्या  हॉटेलमध्ये  गेलो, तिथे  Indian food होते. तिथला  कुक  लखनौचा होता. तो  अगदी  घरी  आपण  ज्या  अगत्याने  वाढतो,   तसं, मॅडम, आचार  खाके देखो! निंबूका है. ...खीर  जरुर  लेना..असा आग्रह  करत होता. 
आम्हाला ब्रेकफास्ट  इजिप्शियन  असायचा, त्यातमसूरउसळ,त्यावर चाटमसाला  इ. टाकून चटपटीत, . छोटे छोटे  समोसे, (आतलं  सारण वेगळंच  होतं )मूगवडे म्हणू  शकू असे  वडे ,विविध प्रकारचे  ब्रेड, केक्स, ताजी फळं, खजूर  खारकेची फळं. छान लागतात  ती!तिथे मधाच्या  पोळ्याचा तुकडा  ठेवलेला  असायचा,त्यातून  मध ठिबकत असायचं. मी fruit dish बनवून  त्यात  मध घालून  खायचे! एकदम  यम्मी!इजिप्तमध्ये  मिठाईचे खूपच प्रकार आहेत. शेवयांचा वापर करून  केलेल्या  वड्या हा वेगळा  प्रकार  वाटला.                                               लंचनंतर  आम्ही  परफ्यूम  फॅक्टरी  कम् सेल इथे  गेलो. खूप  सुंदर आकाराच्या,अतिशय  नाजूक  डिझाइनच्या परफ्यूमच्या  बाटल्या  पाहून  मन आधीच  सुगंधित  झाले. नंतर एका  माणसाने  सर्व  प्रकारच्या परफ्यूमस् ची  माहिती  द्यायला  सुरुवात केली. त्यात दम्यावरचा उपाय, वेगवेगळ्या सुगंधी  अत्तरांचे विविध  उपयोग, अशी माहिती  देत असतानाच, त्याने  specially  for MEN &WOMEN  म्हणून जी माहिती दिली आणि  ज्या पद्धतीने. ....?मला तर  खाली -खाली मान  घालून,तुटते  की काय? अशी  वेळ आली. इतकी लाज वाटत होती  सगळ्या  gents समोर! तरी त्याच्या  मदतनीस  सर्व  मुलीच  होत्या. त्या  मस्त  हसत  होत्या..?त्याचा सेल मात्र चांगला  झाला.मला रागच आला,मी काहीच घेतलं नाही. 

डिनरला  आम्ही fish boat hotel ला  गेलो. तिथे  उंचेपुरे,गोरेपान इजिप्शियन गायक,वादक  होते. त्यांचे  संगीत, त्यांच्या भाषेतील गाणी  मन  शांत करणारी होती. चारही बाजूंनी पाणी आणि इजिप्शियन  संगीत. .मस्त वाटत होतं. त्यानंतर Gala dinner होते. मजा-मस्ती,डान्स झाल्यावर  पुन्हा  हाॅटेलला आलो.झोपताना  मात्र  डोळ्यांसमोर फक्त  पिरॅमिडसच् होते

क्रमश:...

Tuesday, February 11, 2020

चांदोबा चांदोबा भागलास कां

चांदोबा चांदोबा भागलास कां                    
निंबोणिच्या झाडामागे लपलास कां 
                                                              अशी बालपणी चांदोबाशी झालेली ओळख आपण कुणीही विसरु शकत नाही ..चांदोमामा म्हणताच जे आपुलकी,प्रेम ,जिव्हाळा आपल्या आतुन आपल्यालाच जाणवतो तो शब्दातीत आहे. चंद्र म्हणताच तो पूर्णचंद्र पौर्णिमेचा असो वा प्रतिपदेची सुंदर चंद्रकोर !.....अगदी जीव ओवाळून टाकावा असं लोभस रुपड! ............कविंचा तर अगदी हक्काचा मित्र !     बालपणापासुन ते तारुण्यातील प्रेम बहरण्यापर्यंत याची साथ लाभलेली.                                            
  "चंद्र आहे साक्षिला"......बस अशी!..

आज माझ्या मनातला चांदोबा मात्र वेगळाच आहे .माझ्या मनात घर करुन राहिलेला हा चांदोबा याची  पहिली ओळख होताच मस्त गट्टी जमली. दर महिना आतुरतेने त्याच्या नवीन रुपाची वाट पाहू लागली.कसं वर्णन करु आता........ ,खरतर सर्वप्रथम त्याच्या अंतरंगाच्याच प्रेमात जास्त होते. पान भराभरा चाळावी नि एकेक रुप न्याहाळावे अगदी मन लावुन ! त्यातही विशेषत्वाने मोहवणार्या त्या लांब कमरेखाली घरंगळणार्या  कुरळ्या केसांच्या बांधेसुद गोबर्या गालाच्या  ललना  तसेच सुबाहु पुरुष !... याव्यतिरिक्त रागीट खाष्ट स्त्रिया, पुरुष यांचे नुसते अवलोकन जरी केले तरी गोष्ट काय असेल याचा अंदाज येऊन त्याचा अनुक्रम पहिला ठरवायचा. हे बालवयातील मनाचे खेळ आतिशय लोभसवाणे, पण वेताळाच्या विक्रमादित्याला नेहमीच कोड्यात टाकणार्या प्रश्नांमुळे होणारी मनाची तगमग ,राजाच्या डोक्याची शंभर शकले तर होणार नाही ना! ही काळजी आणि राजा कसा हुशारीने उत्तर देतो म्हणून वाटणारा  अभिमान आणि वेताळ पुन्हा दात विचकत झाडाला लटकलेला पाहुन राजाची येणारी कींव !  .........      तरीही राजाचा ध्यास वेताळाला पुन्हा पुन्हा खांद्यावर घेण्याचा व अचुक उत्तरे देण्याचा .हे जरी फक्त गोष्ट म्हणून त्या वयात वाचत असू तरीपण आज कुठेतरी त्याचा आग्रही ,निग्रही, समयावधान, आणि हुशारिची जाणीव होते आणि राजा म्हणाल तर विक्रमादित्य अशी समानार्थी ओळख बालपणी होते. 

       "बालपणीचा काळ सुखाचा "

असं म्हणतो ते याच कारणाने आपल्या निरागस मनावर होणारे भावभावनांचे संस्कार हा चांदोबा आपल्या मनावर करत असतो. म्हणूनच चंद्राला मनाचा कारक म्हणतात. मनातील भावभावनांचे होणारे चढउतार  ह्याला कारणही हाच चांदोबा!  आकाशातला आणि माझ्या जवळचा चांदोबा दोन्हिही सारखेच मनाचा ताबा घेणारे एकदा त्याची गोडी लागली की नात घट्ट करणारे तो काळ आठवला की खरच गंम्मतच वाटते. सुट्टीत तर चहुकडे चांदोबाने पसरलेल्या पलंगावर पालथे झोपावे, पायाने हवेत मस्त डोलावे, हाताने चेहर्याला आधार द्यावा नि निवांत खाऊचा फडशा पाडावा तसा पुस्तकांचा फडशा पाडावा!....आपलीच भलीमोठी संपत्ती असल्यासारखी परवानगीशिवाय कुणालाही त्याला हात लावू न देणे किंवा आपल्याचसमोर आपल्याच घरी वाचू देणे असे जाचक नियम ठरवण्याचा पूर्ण अधिकार ठेवून जणू मौल्यवान वस्तू उदार अंतःकरणाने आपण देतोय आसा भावही मनात असायचाच.आता मात्र आपल्याच वागण्याच हसु येतं. चांदोबा सोबतच आम्ही मोठे होत होतो तेव्हा हळूच सिनेमाविश्वाने मनावर प्रभाव टाकायला सुरुवात केली.तेव्हा नागीरेड्डी हे नांव ओळखीच झालं पण त्यांच्याशी खरी ओळख तर आधीच झाली होती चांदोबाच्या संपादकदापदामुळे पण तेव्हा फारस कळत नसल्याने त्याची या वयात नव्याने आठवण झाली. बालमासिक म्हणून १९४७पासुन  तामिळ , तेलगु ,माराठी व आन्य भाषेतही ते सतत आपल्या सोबत होते. १९८०मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्युने ते नैराश्यग्रस्त झाले व मासिक सिमीत भाषेत प्रकाशित होऊ लागले पण आजही चांदोबा म्हणताच आठवतो हा बालपणीचा मित्र!......

@अर्चना मुळ्ये.

Monday, February 10, 2020

तशी ऑनलाईन मी बरी आहे

'अक्षरा ब्लॉग 'साठी लेखन सुरू करून तब्बल वर्ष झालं. गेल्या वर्षीची "नियमित ब्लॉगर'म्हणून मोहिनीने माझं नावही घोषित केलं. फार भारी वाटलं. खरच सांगते, वर्षभरात एकदाही असा प्रश्न पडला नाही की काय लिहावं? कशावर लिहावं? विषय सुचत गेले, मी लिहीत गेले.,भले मग ते कसेही असोत. उलट एकदोनदा अर्चना, मधुमती म्हटल्या की दरवेळी काय लिहावं , विषय सुचायला तर हवा. त्यावर मी म्हणत असे, विषयांचे काय ग? सुचतात आपोआप. आपल्या अवतीभवती च तर असतात विषय. पण ह्यावेळी मात्र मला स्वतःलाच प्रश्न पडला, कोणत्या विषयावर लिहावे?  एकतर 26 jan. ते 5 feb. हा संपूर्ण काळ, पुतण्या चे लग्न, प्रवास, लग्ना आधीचे आणि  नंतरचे सर्व कार्यक्रम, कुळाचार ह्यात गेला. ते सगळं उरकल्यावर फारसे कष्ट न करताही मी आजारी पडले. प्रवासाचा शीण, थंडी, दोन्ही घरां मधील अंतर कमी करण्याची धडपड आणि दगदग, त्यामुळे सर्दी, खोकला, ऍसिडिटी, ह्या सगळ्यांनी एकाच वेळी मेहेरबानी केली. प्रचंड  विकनेस जाणवत होता, तशात, वर्षा, अंजू, सीमा एकेकीचे "मोहिनी, मेल केलाय ग, लेख" असे  मेसेजेस यायला सुरुवात झाली, मग अजूनच गळाल्यासारखे व्हायला झाले.😔खरे तर ह्या सगळ्या गडबडीत माझा 'तानाजी' पण राहून गेला, पहायचा,त्याची खंतही होतीच, जिमलाही दांडी मारावी लागली. अर्चना आपली रोज विचारतेय, कधी येतेस ग? मी तिला काकुळतीने म्हणतेय, " अग, माझी तब्येत अजिबात बरी नाहीये. खूप विकनेस आलाय, तशात मी वर्क आऊट कशी करणार? अजून त्रास वाढला म्हणजे?" ह्यावर माय डियर अर्चना म्हटली, "पण तू तर गृपवर मस्त खिदळतेय, कंमेंट्स पास करतेय, वाकुल्याही दाखवते आहेस ----" मी जरासं चिडून उत्तर दिलं, "तू माझ्या ऑनलाईन अवस्थेची तुलना माझ्या शारीरिक अवस्थेशी कशी करू शकतेस? तुला कल्पनाही नाही, मला किती त्रास होतोय ते. तशी ऑनलाईन मी ओके आहे ग, प्रत्यक्षात मात्र नाही." ह्यावर तिनेही  'दात' विचकून 'ऑनलाईन दाद' दिली.😄आणि -------

अस्मादिकांना विषय गवसला, अर्थातच, " ऑनलाईन बरी आहे,तशी". 
     पण खरंच गम्मत आहे नाही? ह्या सोशल मिडिया मुळे, त्यातल्यात्यात ह्या व्हाट्सअप्प ग्रुप मुळे, मैत्रिणींबरोबरच्या संभाषणामुळे, आपसातील थट्टा मस्करी मुळे, आपण आजारी आहोत हे देखील विसरायला होते. हे एका दृष्टीने उपकारच मानायला हवेत. शरीराने आजारी असलो तरी मनाने मात्र सुदृढ असल्यासारखे वाटत राहते. ते चित्रपट किंवा मालिकांमध्ये नाही का," आम्ही भले पैशाने (परिस्थितीने) गरीब असू; पण मनाने श्रीमंत आहोत" . अशा  टाइप ची वाक्ये असतात, तसे मलाही म्हणावेसे वाटतेय, "मी भलेही प्रत्यक्षात ओके नसेन, पण ऑनलाईन मात्र अगदी ताजी-तवानी आहे." 😂 
  शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध असतो, असे म्हणतात. शरीर सुदृढ असले तर मनही निरोगी रहाते. अशा अर्थाने की शरीर साथ देत असेल तर मनही प्रसन्न राहून काम करते;पण ह्या बाबतीत मला हे विधान लागू होत नाही असे वाटते. आपल्या शरीराला होणारा त्रास आपण 'ऑनलाईन' दाखवायलाच हवा,हे काही जरुरी नाही ना. आपण जेव्हा एखाद्या आवडलेल्या पोस्ट्स ना मनापासून दाद देतो, इंटरेस्टिंग वाटणारी कोडी सोडवतो, मैत्रिणींसोबत हसी मजाक करतो, एकमेकींची खेचतो, रुसतो, खळखळून हसतो---  अशा वेळी  आपल्या चेहऱ्यावरचा निस्तेज किंवा थकलेला भाव, शरीराला होणारा त्रास, हे 'ऑनलाईन' दिसण्याची शक्यताच शून्य असते. ;हा: पण त्यामुळे एखाद्याचा, किंबहुना एखादी चा गैरसमज मात्र होऊ शकतो, हे पण नाकारू शकत नाही. आता 'अवर फॅमिली' ,' रिलेटीव्ह ग्रुप', 'हम साथ साथ है' सारखे भरपूर ग्रुप तयार होत आहेत, नातेवाईकांचे पण. आणि गैरसमज मैत्रिपेक्षा नात्यातच जास्त होतात. हल्ली, नणंद-भावजय, जावा-जावा, दूरच्या सासू-सुना ह्यांचे देखील ग्रुप व्हायला लागलेत. बरेच आहे एका अर्थाने, 'ऑनलाईन'संबंध तरी टिकून रहातात. सख्ख्या सासू-सुनेचा ग्रुप आणि त्यातील निखळ chatting ही कल्पना रूजू होतेय हळूहळू. असो. तर  गैरसमज असाच होऊ शकतो, की एखादीच्या  डोक्यात येऊच शकते की  ही बया तर चक्क मस्ती करतेय ग्रुप वर, नी  मदतीला ये म्हटलं तर तब्येतीचे कारण दाखवते. नौटंकी आहे नुसती. पण साहजिकच आहे अशी शंका मनात येणं, त्यावर शंका निरसन करणं हा देखील आपला धर्मच आहे असे समजून शंका निरसन करूया.😊 आता मैत्रिणींच्या ग्रुप वर आपल्या बऱ्याच द्वाड मैत्रिणी अगदी दुष्टपणे त्यांनी केलेल्या खमंग पदार्थांचे फोटो टाकत असतात. असे करून त्यांना कोणते पुण्य लाभते,देवच जाणे;पण चटोर जीभ लाभलेल्या आमच्या सारख्या लगेचच 'तोंडाला पाणी सुटल्याची इमोजी' 😋टाकून मोकळ्या होतोच ना? त्या पदार्थांचा प्रत्यक्ष आस्वाद घेणे आपल्या नशिबात नाही हे पुरते कळून चुकल्यामुळेच की काय, त्या पदार्थांकडे धाव 🏃‍♀घेण्याची इमोजी टाकतोच ना?  साधी दोन पावलं चालतानाही ज्यांना 'धाप' लागते, अशा व्यक्तीही  'ऑनलाईन जोरजोराने धावत ' असतातच ना? वरातीच्या घोड्यापुढे त्या 'शिकवलेल्या' घोड्यालाही शरम वाटावी इतके खराब नाचणारे, वेड्या वाकड्या उड्या मारून माकडचेष्टा करणारेही ऑनलाईन मात्र सहजच 💃💃 लवचिक  अंगकाठीच्या डान्सर ची इमोजी टाकायला मागेपुढे पहात नाही. (इमोजी वरून अंदाज बांधता येत नाही ना, म्हणूनच, कदाचित😂) तसेच एखाद्या अप्रिय घटनेशी, व्यक्तीशी आपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसतानाही आपण त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतोच ना?  खरं सांगायचं तर ज्या भावना आपण प्रत्यक्ष व्यक्त करू शकत नाही किंवा काही मर्यादांमुळे राहून जाते, त्यासाठी ह्या "इमोजी" मोलाचे काम करत असतात असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, ह्यात मतभेद असूच शकतात. राग दर्शवणारी, डोळ्यात पाणी दर्शवणारी, भिती , आश्चर्य,विस्मय सारख्या भावना दर्शवणारी, प्रेम व्यक्त करणारी, कपाळावर हात मारून घेणारी, इतकंच काय काहीच बोलायचे नसेल तर मौन दर्शवण्यासाठी तोंडावर पट्टी बांधलेली, फक्त स्माईल करणारी, खळखळून (बत्तीशी दाखवून) हसणारी, डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणारी------ ह्या आणि अशा सगळ्याच इमोजी म्हणजे माणसाच्या अंतरंगातील भावनांचं प्रतीकच जणू. आता त्या किती खऱ्या आणि किती खोट्या हा चर्चेचा मुद्दा आणि वेगळा भाग म्हणता येईल. पण आपल्या कुठल्याही भावना आपण ह्या इमोजी द्वारे व्यक्त करू शकतो, हे काय कमी महत्वाचे आहे?  हे 'ऑनलाईन देणं-घेणं" असंच सकारात्मक रितीने सुरू ठेवा आणि कधी शरीराने आजारी पडलात, कमकुवत झालात, तरी मनाने मात्र कायम आनंदी, सुदृढ असा, अर्थातच, "ऑनलाईन" 🙏😘
 माणिक नेरकर.

Sunday, February 9, 2020

आपला आवाज

कुछ छुट गया याद नही
न जाने किसकी चटखने थी
ये आवाज आयी
और अहसास दरारों मे
कैसे जा पहूचे।
  वाचता वाचता सहजच  मीनाकुमारीनं लिहिलेल्या या ओळींकडे लक्ष गेलं. नि त्यातल्या 'आवाज' शब्दानं मनात पिंगा घालायला सुरूवात केली. आवाज...! काय असतो हो? जन्माला आल्यावर येतो पहिला टॅह्यॅ तो असतो, आपला आवाज ! तो घशातून उमटतो. वाट्टेल तसा आयुष्यभर आम्ही त्याचा वापर करत असतो. तसा तो आमच्या शरिराचा महत्त्वाचा आणि आवश्यक असणारा भाग आहे.  प्रत्येक प्राणीपक्ष्यांकडे असतो. निसर्ग सृष्टीतही असतो. पण आवाजात शब्दांचा वापर करतो, तो मात्र केवळ मनुष्य ! प्रत्येकाचा आवाज सारखा असतो का? छे! तुम्ही सहज एक निरिक्षण म्हणून  आजूबाजूचे आवाज ऐका. शेकडो त-हा आढळतात. कोणाचा जाड, कोणाचा पातळ, कोणी हळूवार तर कोणी आक्रमक. प्रत्येकाचा पोत वेगळा असतो.

कानावर पडणारा ध्वनी म्हणजे आवाज. दैनंदिन जीवनात हे विविध ध्वनी म्हणजेच अनेक आवाज... विविध माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोहचत असतात. असंच एक माध्यम आहे, आकाशवाणी ! आवाज आणि आकाशवाणी यांचं नातं, तसं घट्ट नातं आहे. कारण चित्र दिसत नसल्यानं सगळा ऐकीव मामला. अशावेळी आवाजावरून लक्ष्यभेद करणारा अर्जुन हमखास आठवतो. आकाशवाणी ऐकणारे श्रोते सुद्धा आवाजाद्वारे अंदाज बांधत असतात. ही अंदाजबांधणी करण्याच्या काहीशा स्थितीत असतो फोन -इन कार्यक्रम सादर करणारा संवादक! फोन हे संवादाचं माध्यम असतं. उद्देश असतो, आवडीचं गाणं ऐकवणं. पण फक्त गाणंच ऐकवायचं नाही तर सोबत थोड्या आपुलकीच्या गप्पा सुद्धा असतात. आता खरी गंमत इथेच आहे. फोनची रिंग वाजते. 'हॅलो अमूक कार्यक्रम' म्हणत स्वतःची ओळख सांगितल्या जाते. पुढल्या संपूर्ण संवादात पलीकडचा माणूस काळा की गोरा? गरिब का श्रीमंत? तरूण का म्हातारा? काही काही माहित नसतं. फक्त आवाजाद्वारे अंदाज बांधत, काठाकाठाने बोलत संवाद पुढे न्यावा लागतो. समोरचा बोलण्यात मोकळा असला तर ठिक. नाही तर मग हो- नाही पलीकडे काही उत्तरं येत नाहीत. अशावेळी मोठी कठीण परिस्थिती असते. आवाजाची ही दुनिया मात्र मोठी मजेशीर असते. न डगमगता, न अडखळता, न बिचकता, न घाबरता, आपली भिती, गोंधळ आपल्या आवाजात न उमटू देता, ती कसोटी पार करावी लागते. हल्ली मोबाईल मुळे फोनवर बोलण्याचा सराव  ब-यापैकी आहे. पण वीस एक वर्षापूर्वी लॅन्डलाईनच्या काळात फोनच्या रिसिव्हर मधून ऐकायला येते नि आपण बोललेले समोरच्याला ऐकायला जाते, ही संकल्पना पचायला जरा जडच जात असे. विशेषतः ग्रामीण श्रोत्यांना हे खूप नवलाईचे होते. त्यामुळे तारसप्तकात संवादाची सुरूवात व्हायची. ती हळूहळू सामान्य आवाजावर आणणे म्हणजे एक कसरतच असे. पण त्यातही वेगळी गंमत असायची. साध्याभोळ्या स्वभावाची ही माणसं मनातलं सगळं बोलायची. मुलाचं लग्न, मुलीचं गाणं, बुढीचं जातं, बुढ्याचं खाटलं, दोस्ताईचा दोस्ताना, बायकोचा सुगरणपणा....सांगायला बसले की हातचं न राखता बोलत राहणार. पण त्यासाठी समोरचा आवाज तेवढा त्यांना आश्वासक हवा असतो. काही नमुने मात्र इरसाल असतात. दिसत नसलेत तरी आवाजातून कळतात. गावाबद्दल सांगता सांगता आमराईत येण्याचं छुपं आमंत्रण देणारे असतात. अशावेळला, डोकं थंड ठेवत, मनातला राग आवाजात न उमटू देता, मधाळपणे, "का नाही? नक्की येवू की. भावाकडे बहिणींनं आंब्याच्या रसाला जाण्याची पद्धत असतेच" हा हजरजबाबीपणा संवादकाला ठेवावा लागतो. बोलण्यातला खट्याळपणा कोणता नि टवाळखोरपणा कोणता? हे आवाजच सांगत असतो. आवाज, हा असा महत्वाचा असतो. व्यक्तिमत्व दर्शविणारा आरसाच असतो.

आवाजाचे हे न्यारे जग आहे. बोलणारा कसा दिसतो, हे दोघांनाही  माहित नाही, तरी ' बोलण्याची प्रचंड उत्सुकता दोन्ही बाजूला असते. हे नातं वेगळंच आहे. फोन सुरू असेतोवर आपलेपणा आहे. रिसिव्हर ठेवला की तिथेच स्वीच ऑफ व्हावं लागतं. पुढची रिंग, पुढचा संवाद. नवा आवाज, नवा स्नेहभाव. समोरचे आवाज बदलत राहतात पण संवादकाचा आपुलकीचा आवाज मात्र तोच असतो. त्याचा पोत कधी बिघडून चालत नाही. कारण शेवटी, हे असते 'आवाजाचे विश्व'. जोवर घसा चालतो तोवरच तुम्ही असता. घसा बसला तुम्ही संपला. घसा नुसता चालवायचा नसतो तर तो जपायचाही असतो. त्याचं संगोपन करायचं असतं. बोलत जायचं, ऐकत जायचं. तेवढं धैर्य आणि संयम बाळगत, जनांशी संवाद साधायचा.  कारण... जो त्यांच्या ह्रदयाची तार छेडत, मस्तकामध्ये विचारांची बीजं पेरत जातो,तोच असतो खरा आपला आवाज!

 - सीमा शेटे (रोठे), अकोला.

हनी चिली पोटॅटो !!

शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ?...हे काय बॉ नवीन काहीतरी चायनीज ?  तर हा माझा आणि माझ्या मुलाचा कोडवर्ड आहे. मी केलेला एखादा खाद्यप्रकार बिघडला कि आम्ही एकमेकांना सांगतो की आज 'हनी चिली'  झालेलं आहे.

‌          मुळात मी काही सुगरण नाही उलट एक  घाबरट गृहिणी आहे , म्हणजे आधी पदार्थ करायची मारामार आणि त्यात तो बिघडायला पण नको , त्यामुळे नेमकं प्रमाण असल्याशिवाय मी फार काही करायला धजावत नाही . बिघडलेल्या पदार्थात सुधारणा करायची म्हणजे तर आधी माझ्या कपाळावर आठ्या निर्माण होतात , त्यात राशीला अनेक सुगरण मैत्रिणी आलेल्या मग काय विचारता , पण खरंतर त्यांच्यामुळेच आणि घरच्या सदस्यांमुळे माझी पाकशास्त्रात बरी प्रगती झालीय ( असं इतर कोणी म्हणो न म्हणो  मीच म्हणते ). तर ' हनी चिली '  ची सुरवात माझ्या कॉलेज जीवनातच झालेली आहे म्हणजे अगदी डाळींमधला फरक ओळखू न येणे , त्यामुळे त्या धांदरटपणे एकत्र करणे , मग आई घरी परत येण्याच्या आता त्या पुन्हा वेगळ्या करणे ह्या अगदी प्राथमिक चुकांपासून मी सुरवात केलीय . एकदा मी आणि माझा भाऊ दोघेच घरी असताना सगळ्या उरल्यासुरल्या भाज्या संपवायच्या म्हणून मी पावभाजीचा बेत केला , आणि एवढ्या भाज्यांमध्ये काय कळणार म्हणून गवारीची भाजी  सुद्धा त्यात घातली पण तिनी तिचं वेगळेपण आम्हा दोघांनाही दाखवून दिलंच .  'रुचिरा'  ह्या मौल्यवान पुस्तकातले पदार्थ मी अगदी मन लावून वाचत असे आणि घरच्यांना वाचून दाखवत असे. लग्नाळू होईपर्यंत मला चहा,पोहे , अडीनडीला उपयोगी पडणारी खिचडी ( कदाचित आईला माझे भविष्य दिसले असावे) आणि बेसिक स्वयंपाक येऊ लागला पण बाकी प्रगती शून्य!!...पण मी म्हटलं 'देख लेंगे , उसमे क्या है!!' पण इकडे आल्यावर तर काय ! सासुबाई तर सुगरणच मग आपलं अज्ञान झाकलं जाईल अशा बेताने माझे स्वयंपाकघरातले काम सुरु झाले, हळूहळू आशेचे किरण दिसु लागले . तरी एकदा तेलात फटाफट फुटलेले उडदाचे वडे , साबुदाण्याचे वडे , तट्ट फुगून खाली बसलेला केक , कडक झालेले लाडू , वड्या हे अधूनमधून होतंच होते . अशात एकदा कुठेतरी खाल्लेले हनी चिली पोटॅटो मुलाला खाऊ घालू म्हणून घरी केले आणि ते फसले . चिरंजीवांना आता शिंग फुटू लागल्याने आतापर्यंत मुकाटपणे आईनी केलेला पदार्थ खाणारा माझा गुणी बाळ फिदीफिदी हसायला लागला आणि त्यामुळेच की काय धीर येऊन त्याचे बाबा इतक्या वर्षांचं साचलेलं हसू व्यक्त करू लागले ( अर्थात आता मी पण निगरगट्ट झाले होते त्यामुळे मी ते फारसे मनावर घेतले नाही ) पण तेव्हापासून मी ओट्याशी काहीतरी खुडबुड करतेय हे पहिले कि तो धास्तावून मला , ' आई , हनी चिली नाही ना ?' असं विचारतो

‌         आज हे सगळं आठवण्याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेलच , करेक्ट , आज परत ' हनी चिली '  झालंय , पण आता चिरंजीव इथे नसल्याने जे झालंय ते आरामात मुकाटपणे सगळ्यांच्या पोटात गेलंय.

Thursday, February 6, 2020

माझे वैद्यकीय आख्यान

लहानपणी ही नेहमी सांगायची -मला मोठे होऊन डॉक्टर व्हायचे आहे !आमच्या ओळखीचे एक काका हे कायम कुठेही भेटले की अगदी कोणाही समोर ही आठवण सांगितल्याशिवाय पुढे बोलणे सुरू करत नाहीत हा माझा गेल्या 22 वर्षातला अनुभव आहे. सुरुवातीला हे ऐकून मला प्रश्न पडायचा -हो का? असं म्हणायचे का मी? काकां समोर हो हो सांगून माझ्यासकट घरचे सगळे विषय वाढणार नाही असा समंजसपणा दाखवायचे. खरंतर आजच्यासारखे आपल्या लहानपणी येता जाता मुलांना मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे, कशात करियर करणार, वगैरे प्रश्न विचारण्याची प्रथा नव्हती. फारच झाल्यास दहावीच्या परीक्षेला शुभेच्छा द्यायला गेल्यावर किंवा जसा असेल तसा निकालाचे पेढे स्वतःहून मुलांनी आणून दिले तर काहीतरी विचारायचे म्हणून काय व्हायचे तुला पुढे? असा औपचारिक प्रश्न कोणीतरी टाकायचे. एका अर्थी आपले शालेय शिक्षण निर्धोक वातावरणात पार पडले म्हणायचे!

    पण नंतर खरंच आठवून बघितले की नेमके कधी आपण डॉक्टर व्हायचे ठरवले? शाळेत 99 टक्के मुलींना असायचा तसा मलाही गणिताचा  फोबिया होता .बहुतेक सगळेच गणिताचे पेपर मी ताप असताना सोडवल्यामुळे माझ्या गणिताच्या मार्कांना कायम सहानुभूती मिळत गेली!! दहावीत पहिल्यांदा गणिताची ट्युशन लावून बोर्डात या विषयाला हद्दपार केले .नंतर "पी सी बी" चा पर्याय ओघाने स्वीकारला. त्यावेळी आम्ही नागपूरला होतो आणि तिथल्या हिस्लॉप कॉलेजमध्ये फिशरी सायन्स हा विषय घेऊन जुनियर कॉलेजला प्रवेश घेतला. गणित सुटलेले- पण फिजिक्स चा बागुलबुवा होताच .तो बारावीपर्यंत कसा निभवायचा एवढे एकच ध्येय अकरावी-बारावीत होते. दरम्यान फिशरी सायन्सच्या प्रोफेसर खूप छान होत्या. त्यांच्याकडून हा विषय शिकतांना त्याचे प्रॅक्टिकल्स करताना मजा यायची. आपल्याला यात रस निर्माण होतो आहे असे लक्षात आले. बारावीत असताना याच विषयात पुढे शिक्षण घेण्याचे पर्याय तपासले .पुढचे पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेऊन यात करियर करायला मुंबई -कोकण प्रांतशिवाय पर्याय नव्हता. पंचवीस वर्षांपूर्वी मुलीला बाहेर शिकायला पाठवणे काही पचनी पडणारी गोष्ट नव्हती. मग नाद सोडलेला बरा असा विचार करून बारावीच्या अभ्यासावर शांतपणे लक्ष केंद्रित करण्याचे ठरले .

   नाही म्हणायला अधुन मधुन आयएएस व्हावे अशी तीव्र इच्छा व्हायची. वडील सरकारी नोकरीत उच्चपदावर असल्याने शासकीय कामांची परिस्थिती जवळून अनुभवली होती एन सी सी, विविध क्रीडा प्रकार ,सामान्य ज्ञानाची उत्तम तयारी इत्यादी गोष्टी जमेच्या होत्या. पण पुन्हा कुठेतरी हे क्षेत्र मुलींकरिता काही फारसे सोयीचे नाही. ग्रामीण भागातून, प्रशासकीय आणि काही प्रमाणात राजकीय गोष्टींशी येणारा संबंध झेपणारा नव्हता .त्यामुळे इंग्रज कालीन  इमारतींमधले कार्यालय ,पांढरेशुभ्र पडदे असलेल्या खिडक्या-दरवाजे, सरकारी कार्यालयातल्या वैशिष्ट्यपूर्ण टेबल-खुर्च्या, सरकारी वाहन आणि  सरकारी बंगले या गोष्टींचे अप्रूप तिथेच सोडावे लागले .मग आता पुढे काय करावे ?तर मुलींना वैद्यकीय क्षेत्र सर्वोत्तम मानणारा तो काळ आणि तसा मतप्रवाह असणारे वातावरण असल्याने या क्षेत्रात पुढे जायचे मनसुबे तयार होऊ लागले. बारावीच्या परीक्षेत मार्क चांगले मिळतील हे निश्चित होते पण त्यावेळी प्रवेश परीक्षा सुरू झालेल्या नसल्याने ओपन कॅटेगरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल का हा प्रश्न होता .एम बी  बी एस ला शासकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायला सहा मार्क कमी पडले .मग पुढे काय- डेंटिस्ट, फिजिओथेरपी पर्याय विशिष्ट अवयव, आजारांपुरते  कामी पडतील. संपूर्ण शरीराचा अभ्यास आणि सर्व व्याधींची चिकित्सा करता आली पाहिजे. मग पुढचा पर्याय म्हणून शासकीय महाविद्यालयात बी ए एम एस ला प्रवेश घेतला आणि अशाप्रकारे वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय चिकित्सक होण्याची प्रक्रिया सुरू झाली.
   यापुढे हा प्रवास कसा झाला कसे अनुभव आले आणि नावापुढे डॉक्टर बिरुद मिळवायला काय काय खर्ची पडले याचे वर्णन पुढच्या भागात.....

Tuesday, February 4, 2020

आशियाना (भाग 3)

बुलबुल पक्षी उड्डाण सोहळ्यानंतर घरट्याकडे फिरकलेच नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी  पण नाही. माझाच धीर सुटत चालला. असं वाटलं घरट्यातलं पिल्लू काल पासून उपाशी आहे भूकेने कासावीस झाले असेल का? आम्ही केळ, चिक्कू देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पिल्लू अजूनही हळू आवाजात ओरडत होतं. दुपार झाली तरी बुलबुल आले नाहीत. मग संध्याकाळी 5ते 6 च्या दरम्यान आली त्याची आई आणि मी सुटकेचा श्वास सोडला. 

बरोब्बर 24 तासाने आली ती. त्याला भरवलं, काहीतरी चिवचिव केली जणु त्याला बाहेरच्या जगाचा परीचय देत असावी. उद्या तुला पण यायचयं बाहेर तयार हो बरं का! उद्या सकाळी येते मी. असा काहीसा संवाद सुरू असेल का त्यांचा? कारण अंधार पडायला सुरुवात व्हायच्या आत ती त्याला सोडून बाहेर उडून गेली. बहुदा त्या मोठ्या पिल्लाजवळ असतील ते दोघे. रात्री ते पिल्लू एकटचं घरट्यात. सकाळी पुन्हा त्यांची तिच धावपळ, चिवचिवाट सुरू झालं. माझ्या लक्षात आलं आता या पिल्लाचा first take off.... OMG पुन्हा तोच उत्साह... त्याला समजावून सांगणं, हॉलमध्ये उडून दाखवणं. उडणं कसं सोप आहे हेच जणू ते बुलबुल पक्षी पिल्लाला सांगत होते. खूप वेळ निरीक्षण करून झाल्यावर ते पिल्लू घरट्यातून 11, 11.30 ला खिडकी च्या गजावर जाऊन बसला. त्याचे आईवडील रेलिंगवरून खिडकीत खिडकी तून रेलिंगवर उडणं सुरू चिवचिवाट तर होताच. त्याला जणू प्रोत्साहन आणि शाबासकी देत असतील. बराच वेळ बसल्यावर त्या पिल्लाने पंखांची उघडझाप केली आणि पायात घट्ट धरुन ठेवलेले गज हलकेच सोडून भुर्रर्र... पेरूच्या झाडावर... बुलबुल पक्षी पण खूश... ते पण उडून पेरूच्या झाडावर पिल्लाजवळ. मी खूप वेळ नजर लावून बसले होते. तिथे त्या छोट्याला मोठा पिल्लू पण भेटला. मग काय विचारता त्या कुटुंबाचा आनंद! ही पहीली भरारी घेतल्यावर मात्र ते दोन्ही पिल्लं तिथल्या तिथे उडत होती.  या फांदीवरून त्या फांदीवर. मोठ्या झाडांवर जात नव्हते. मोठे बुलबुल पक्षी होतेच त्यांच्या अवती भवती. एक उडून खाद्य शोधायचा एक पिल्लाजवळ बसून असायचा. असे 3,4 दिवस गेले. मला सरावाने समोरच्या झाडावर बरोबर दिसायचे. हळूहळू खाद्य शोधायला पण ते शिकले असावे कारण मग मात्र ते तिथे दिसेना. खूप प्रयत्न करून पण दिसले नाही. नक्कीच आपापल्या मार्गाने ते उडून गेले... आमचा महिना सव्वा महिना कसा निघून गेला कळलचं नाही. खूप जवळून त्यांचं मोठं होणं आम्ही अनुभवलं... त्यांचे फोटो, व्हिडिओ बघत बसायचो. आता कुठे असतील असं एकमेकांना विचारायचो. यामध्ये 10, 15 दिवस गेले असतील आणि पुन्हा एका सकाळी तेच लाडं लाडं बोलणं, चिवचिवणं कानावर आलं. आम्ही दोघी धावत हॉलकडे गेलो. हळूच बघितलं तर दोन बुलबुल पक्षी! अरे व्वा! आम्हाला पुन्हा आनंद झाला. फक्त यावेळेस बुलबुलला घरटं रेडिमेड मिळालं. आधीच्या जोडीने सांगितले असेल का या नव्या जोडीला घरट्याबद्दल? हॉल बुलबुल पक्षाचे मॅटर्निटी होम झालय असंच वाटलं. यावेळी दोन अंडी होती घरट्यात. पण या बुलबुलची गंमतच झाली. ती बिचारी तिच्या घरट्याकडे जाणारी खिडकी चुकली. ती हॉलच्या खिडकी ऐवजी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत आली आणि हॉलकडे जायचं तर आतल्या खोलीत शिरली. थेट आतल्या खोलीत उडणं आणि भेदरलेला आवाज काढणं सुरू. अरे मी इकडे कुठे आली माझं घरटं पिल्लू कुठे गेल? असंच म्हणत असेल का ती. बरं बाहेर काळोख झाला होता. तिला दार उघडून दिले पण बाहेरच्या रस्ता तिला दिसत नव्हता. घाबरल्यामुळे, गोंधळल्यामुळे तिला काही सूचत नव्हते. तिचं ते असहाय्य उडणं,  केविलवाणं चिवचिवणं बघून मला वाईट वाटत होतं. कसा मार्ग काढावा हे सूचत नव्हतं. असा जवळपास पाऊणतास गेला आणि मला एक कल्पना सुचली एकदाची. मी सगळ्या खोल्यांचे लाईट बंद केले. एका खोलीचं, गॅलरीचं दार बंद करून घेतलं आणि पुढच्या खोलीत येण्यासाठी एकच दार उघडं ठेवलं आणि पुढच्या खोलीत लाईट लावून ठेवला. मग क्षणार्धात ती पुढच्या खोलीत आली. मग बेडरूम चा लाईट बंद केला आणि डायनिंग रूमचा लाईट लावला. पुढच्या सेकंदाला ती आणखी एक खोली पुढे आली. मग हॉलचा लाईट लावून डायनिंग टेबलच्या खोलीचा लाईट बंद केला. दुसर्‍या क्षणी ती हॉलमध्ये आली. आणि मग तिच्या ओळखीच्या खुणा तिला दिसल्या. झुंबर, तिचं घरटं, हॉलची खिडकी आणि सर्वात महत्त्वाचे तिचं पिल्लू! सगळं सापडलं एकदाच आणि आम्हीच सुटलो. तिच्या आवाजात एकदम फरक जाणवला. आनंद, सुटका झाल्याचं समाधान! बसली एकदाची घरट्यात जाऊन!

 पण ही बुलबुल त्या आधीच्या बुलबुलपेक्षा घाबरट होती. मैत्री करायला आली नाही तिच्यासारखी. घरट्यात एक पिल्लू होतं. त्याला भरवणं, चिवचिवणं, उडणं अगदी पहिल्या बुलबुल सारखच. पिल्लू वाढत होतं. पण... पण एक दिवस सकाळी तिचा आवाज खूप येत होता. इकडून तिकडून उडणं वाढलं. घाईने हॉलमध्ये गेले... तर तिचं पिल्लू खाली पडलेलं. फरफटत एका कोपर्‍यात गेलं थरथर कापत होतं. मला तर खूपच वाईट वाटलं. काय करावे काही सुचत नव्हतं. उचलताना बोट त्या पिल्लाला टोचतील का? आता तिच्या आवाजातला आक्रोश मला जास्त जाणवू लागला. मग एक मऊ कॉटनचा रुमाल घेतला आणि पिल्लाच्या अंगावर अलगद घालून त्याला पटकन उचललं स्टूलवर चढले आणि हलकेच त्याला घरट्यात ठेवले. तिचा आक्रोश कमी झाला. मग बाहेर गेली त्याच्यासाठी चोचीत काहीतरी आणून त्याला खाऊ घातलं. आता बरीच शांत होती. बराच वेळ घरट्यावर बसून होती. मग पुन्हा बाहेर गेली चोचीत काही घेऊन आली. पिल्लाला जाग करण्याचा विशिष्ट आवाज काढू लागली. पण पिल्लू काही जाग झाले नाही. खूप खूप प्रयत्न करूनही पिल्लू उठलं नाही तेव्हा तिचा आक्रोश सुरू झाला. मला लक्षात आलं पिल्लू गतप्राण झालय. घाबरलं असेल पडल्याने, लागलं असेल काय झालं काही कळलं नाही पण ते पिल्लू गेलच बिचारं! तिचा आवाज, उडणं पुन्हा एकदा सुरू झालं. मग ती बाहेर जायची पुन्हा घरट्यावर येऊन बसायची. विशिष्ट आवाज करायची. असं तिचं दोन दिवस चाललं. मग मात्र येईनाशी झाली. बाहेरच्या झाडावर पण दिसली नाही. मग स्टूलावर चढून कॅमेरात फोटो काढला.

 तर त्या पिल्लाला तिथे मुंग्या लागल्या होत्या इतक्या वर! मग मात्र आम्ही ते घरटं काढून टाकलं. सगळं झुंबर साफसूफ करून ठेवलं. अशी शोकांतिका झाल्यामुळे आम्ही हिरमुसलो. अवंती मला म्हणाली आई पुन्हा येतील का गं ते पक्षी घरटं करायला? मी म्हटले काय माहीत येतील की नाही. पण नंतर बुलबुलची जोडी आलीच नाही. असचं वर्ष निघून गेलं. आम्ही हे सर्व विसरलो होतो. आणि पुन्हा अॉगस्ट /सप्टेंबर मध्ये बुलबुलचे आगमन झाले. पुन्हा तेच प्रेमळ संवाद, गाणं, उडणंं सुरू झालं. खात्री पटली पुन्हा एकदा घरटं तयार होणार. पुन्हा तोच अनुभव...मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं इतक्या आत छताला लावलेलं झुंबर या छोट्याशा पक्षांना कसं काय दिसलं असेल? इतक्या वर्षात हे कधी घडलं नव्हतं ते कसं काय सुरू झालं. निसर्गाच्या चक्राचं नवल वाटलं. ते अविरतपणे सुरूच राहतं. काळ पुढे जात असतो आपल्याला चांगल्या, वाईट गोष्टीचा अनुभव मिळत जातो. आपल्याही नकळत! मारुती चितमपल्ली म्हणतात ते खरचं आहे. निसर्ग, पक्षी, प्राणी यांच्याकडून बरचं शिकण्यासारखं असतं. पिल्लांना उडण्याचं बळ द्यायचं, उडायला शिकवायचे, त्यांचे अन्न ते मिळवून खाऊ लागले की झाले मग पिल्लांमधे गुंतणं नाही की घरट्याकडे परतणं नाही. असं निर्मोही जगण्याचं वरदान मनुष्यप्राण्याला पण मिळायले हवे नाही का?

(समाप्त) 
अंजली 

Sunday, February 2, 2020

आमची मालुताई

मालूताई ,ही खर तर माझी मावशी ! पण आम्ही कधीच तिला मावशी म्हंटल नाही .आई ,मामा तिला मालूताई म्हणायचे ,त्यामुळे सगळेच ,तिचे भाचे ,पुतणे मालूताई म्हणायला लागले. तिची नातवंड सोडली तर सगळ्यांची ती मालूताई होती.आणि खरच एखाद्या मोठ्या ताई सारख तीनी आमचा BJP(बापट ,जोशी,परांजपे) परिवार सांभाळला.
गोरा रंग ,नऊवारी पातळ, शांत,सोज्वळ, प्रसन्न चेहरा अस तिच व्यक्तिमत्व होत.
सतत कामात राहण्याचा तिचा स्वभाव!सुना येईपर्यंत, चौघ मुल ,घर, दुकान सगळा व्याप सांभाळायची .घराखालीच किराणा दुकान असल्याने व्यापही खुप होता .दुकानात विकायला श्रीखंड ,बेसनाचे लाडू,चिवड़ा ,शेव करण कड़धान्य भिजत टाकण असे अनेक काम असायचे .आचारी असला तरी लक्ष दयावच लागायच.अन त्यात भर म्हणुन प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा बहिणीचा मुक्काम तिच्याकडे असायचा.पण तिला मी कधीही रागावलेल पाहिलं नाही।  उलट घरी  सगळी मुलं असल्याने आमचे  तिथे लाडच  व्हायचे। लहानपणी मी रडकी होते आईला सोडून राहायचे नाही ।पण आम्ही नागपूरला आलो की ती  आईला जबरदस्ती सिनेमाला पाठवायची आणि मी  कितीही  त्रास दिला तरी ," अग काही त्रास दिला नाही तीनि तू उगीचच म्हणतेस "अस ही वर म्हणायची .आमचे  सगळ्याचे लग्न ठरवण्यातच नाही तर ते सुरळीत पार पाडण्यात तिची महत्वाची भूमिका होती.बर हे प्रेम फ़क्त आमच्यापुरत मर्यादित नव्हतं तर पुढे आमच्या मुलांवरही तिनी तेवढच प्रेम केल.तनु MD च्या क्लासेस साठी  नागपुरला जायची ,तेंव्हा जर तनु च्या आवडीची भाजी नसेल तर लगेच तिच्यापुरती आवडीची भाजी करुन द्यायची ,अन  ते पण तिच्या  वयाच्या 82 वर्षी! कुठून येत असेल हा उत्साह ! प्रेम आणि आपलेपणा मनातुन असेल तिथेच हे होऊ शकत.उगीच नाही 
चार मुल, सुना ,नातवंड यांची इतकी वर्ष  एकत्र मोट बांधून ठेवणयात ती यशस्वी झाली!

नवीन गोष्टी सहजतेने आत्मसात करण्याचा तीचा स्वभाव होता. होमिओपॅथी च थोडं बहुत ज्ञान तिला होत,छोट्या मोठ्या आजारावर तीच आम्हाला औषध देत असे।  आम्हा सगळ्यांचे कानही जन्मानंतर (अन गरज पडेल तेंव्हा तेंव्हा) तिनेच घरी टोचले!तिचे शिक्षण 10 पर्यन्त पण व्यावहारीक ज्ञान मात्र एखाद्या व्यापारयाला लाजवेल अस होत.दुकाना चे सगळे हिशोब तीच ठेवायची।कंप्यूटर आल्यावर  तीनि लगेच शिकुन घेतल व त्यावर हिशोब ठेवण सुरू केलं।

आत्ता वीणा वर्ल्ड बरोबर भूतान ला गेली होती ,तिथल्या रैंप वॉक साठी जीन्स टॉप ,सलवार सूट खरेदी केले होते,वेस्टर्न मधे ति इतकी सहज वाटत होती कि हीच का नेहमी नऊवारी नेसनारी मालू ताई ,असा प्रश्न पडावा.
आजी गेल्यावर  तिचे सगळी नऊवारी मालूताई ला दिले होते त्यातल्या एक नऊवारी   च्या काठाला अस्सल चांदीची तार होती.ते नऊवारी फ़ाटल्यावर त्याची तार काढून ,तिनी  चांदीचे छोटे लोटी भांड बनऊन आम्हा सहा बहिणीना  दिले ,जेंव्हा की आम्हाला त्या नऊवारी  बद्दल काहीहि माहिती नव्हतं .आज जिथे भाऊ भाऊ इस्टेटी साठी एकमेकांशी  भांड़तात त्या पार्श्वभूमीवर तीच हे वागण तिला वेगळयच ऊंचीवर नेऊन ठेवत. 
तीन नातींची लग्न झाली (अजुन तिघि रहिल्यात) दोन नातसुना आल्या ,पणतु झाला अश्या सर्वार्थने फुलत जाणाऱ्या संसाराची तृप्ति मालूताई दादांच्या चेहऱ्यावर बघण हा एक आनंददायी अनुभव होता.पण ...
दुर्दैवाने भूतान ट्रिप तिची शेवटची ट्रिप ठरली.भूतान हुन निघायच्या दिवशी ति आजारी पडली ,पूर्ण पिवली पडली होती ,काविळ असेल अस वाटलेल तिच दुखण लिवर कैंसर निघाल .तिला शेवटपर्यंत कैंसर झालाय हे सांगितल नव्हत ,पण माझ्यामते तिला थोड़ी बहुत कल्पना आलीच असेल.वय 87 असल्याने केमो सहन झाल नसत ,त्यामुळे ताप आला की एन्टीबियोटिक दे ,पोट दुखल पेन किलर दे ,ईतपत च उपचार शक्य होते .4- 5 ऑक्टोम्बर पासून ति अंथरुणाला ख़िळली .2 महीने खुप त्रास झाला.सतत कामात असणारी मालूताई अशी बेड वर पडलेली बघण सगळ्यासाठी खुप धक्कादायक होता. 26 dec.ला  साकेत ,अन 1 jan.ला रुजुता च लग्न होता ,तिला त्याबद्दल खुप उत्सुकता होती ,मी भेटायला गेले तेंव्हा तिला बोलताना पण थकवा येत होता ,म्हणुन मला म्हणाली  तूच बोल अन सांग संगीता कड़े लग्नाची  काय काय  तयारी सुरु आहे ते. या दोन्ही लग्नासाठी तिच रिजर्वेशन झाल होत  अन दोन्ही कड़े तीचा सक्रिय सहभाग असता ,पण दुर्दैवाने ति येऊ शकणार नव्हती .शेवटी शेवटी तर त्रास खुपच वाढला ,पोटात सारख पाणी व्हायला लागल पोट दुखायच ,दु:खाने सारखी कंन्हायची.या काळात घरच्या सगळ्यानीच तिची मनापासून सेवा केली आरती अभय च विशेष कौतुक! ,25 dec,  तर खुप सीरियस झाली होती पण तिची इच्छाशक्ति जबरदस्त असावी  दोन्ही लग्न सुरळीत पार पडेपर्यंत  कॅन्सर च्या राक्षसाला  थोपऊन धरल,26 च लग्न तर पार पडल पण कॅन्सर ने पोखरलेली तिची अशक्त कुड़ी किती काळ तग धरणार ! 1 jan.सकाळी 2.30 ला तिचे देहावसान झाले।अर्थात आम्ही सगळे लग्न घरी असल्याने ही बातमी लग्न पार पडल्यावर संध्याकाळी आम्हाला सांगितली. आज न उद्या ही बातमी येणार हे माहित होता पण तरी प्रत्यक्षात बातमी ऐकल्यावर मात्र,कोणीच ते सहन करू शकल नाही.वयाच्या 87 व्या वर्षी पर्यन्त सतत कार्यरत असणारी मालुताई आजारी पडते काय अन तीन महिन्यात  काळाच्या पडदया आड़ जाते काय ,सगळच अनाकलनीय आहे.

28 dec.ला तीचा वाढदिवस होता ,त्यादिवशी तिची सगळे नातावंड नागपुरला जमले होते , सगळ्यांना तीनी गिफ्ट  दिली ,अन पराग बरोबर मुम्बई ला आम्हा सगळ्या बहीणींसाठी सोन्याची चेन पाठवली.ही तिची कृति ,ती आमच्यावर तिच्या मुलां -नातावडांन एवढंच प्रेम करायची याचा परत एकदा पुरावा देऊन गेली.
हे प्रेम पुढच्या पिढीतही असच राहिल अशी मला खात्री आहे.
22 Dec. ला तीच वर्षश्राद्ध झालं.अजूनही तीच जाण खर वाटत नाही.🙏