नुकताच एक प्रसंग घडला, माझी मैत्रीण अध्यक्ष असलेल्या एका संस्थेने गरीब मुलांसाठी शाळेचे साहित्य अन जुने गेम्स वगैरे देण्याचे आवाहन केले. तो मेसेज मी बाकी व्हाट्सअप ग्रुप वर पाठवला. ओळखीच्या एका वहिनींनी स्कूलबॅग्स ,वाटरबॅग्स ,टिफिन, शूज, माझ्याकडे आणून दिले.
संस्थेचा प्रोजेक्ट लांबणीवर पडल्यामुळे ते सामान माझ्याकडे बरेच दिवस पडुन होते.
माझ्या कामवाल्या मावशी रोज ते बघत असतील.एक दिवस त्यांनी विचारलं,"हे मी नेलं तर चालेल का?" मी म्हंटल "अग ने न त्यात काय!" पण नंतर म्हंटल "थांब जरा,ज्यांनी हे सामान आणून दिलंय त्यांना एकदा विचारू दे".म्हणून ज्यांनी सामान दिल होत त्या वहिनींना फोन केला. त्या म्हणाल्या, 'एखाद काही नेऊ दे त्यातल,बाकी सगळं मात्र त्या संस्थेलाच द्यायचंय.त्यांची फारशी इच्छा दिसली नाही म्हणून मग मी शोधून माझ्या कडलीच एक बॅग अन पाण्याची बाटली कामवाल्या मावशीना दिली.
काही दिवसांनी मैत्रीण ते सामान घेऊन गेली.
एकदा भेट झाल्यावर तिला विचारलं ,झालं का तुमचं सामान वाटप!
"हां,चालू है,आपने दिया हुआ सामान, मेरे बाई ने मांगा तो मैने उसे ही दे दिया,वो भी तो गरीब ही है ना!"
अरेच्चा! मी त्या वहिनींच्या इच्छेचा विचार करून माझ्या कामवाल्या मावशींना नाराज केलं,आणि हिनी मात्र कसलाही विचार न करता देऊन टाकलं!
अर्थात तिनी काहीच चुकीचं केलं नव्हतं, शेवटी कोणीही दिलेल दान गरजू पर्यंत पोचणं महत्वाचं! मग ती बाई, माझी असो तिची, किंवा अजून कोणाची!
या प्रसंगानंतर मनात आलं ,दान देताना ते कोणाला,कोणत्या प्रकारे,कोणत्या स्वरूपात करायचं याबद्दल प्रत्येकाच्या मनात काही आयडिया फिक्स असतात.
कोणी एखाद्या संस्थेशी जोडल्या गेले असतात,उदा.कोणी मूक बधिर मुलांसाठी कोणी अंध मुलांसाठी,कोणी अनाथ मुलांसाठी कोणी गोरक्षण साठी काम करत.त्या संस्थेबद्दल,तिथल्या लोकांबद्दल त्यांना विशेष आपुलकी असते.त्यांच दुःख जवळून पाहिल्यामुळे,भावनिक गुंतवणूक होते।आणि त्यामुळे साहजिकच तिथे दान करण्याकडे त्यांचा कल असतो.
मला स्वतःला,आई वडील नसलेल्या मुलांबद्दल विशेष आपुलकी वाटते.
आई -वडील दोघंही किंवा दोघांपैकी कोणी एकही असलं,तरी ते मुलांसाठी काय वाट्टेल ते करून त्यांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
अनाथ मुलांच्या बाबतीत, बाकी गोष्टींचा अभाव तर असतोच पण माया ममता,प्रेम हे सुद्धा त्यांच्या वाट्याला येत नाही. ते तर आपण देऊ शकत नाही .मग निदान बाकी गोष्टी त्यांना सहजसाध्य व्हाव्या हा त्यामागचा उद्देश!
बाहेर लोकांना ब्लॅंकेट,छत्र्या, वाटण्यापेक्षा जे लोक आपल्यासाठी काम करतात,मेहनत करतात त्या स्टाफ चा त्यावर पहिला हक्क!अस सुभाष च मत.
कोणी अन्नदान श्रेष्ठ मानत ,कोणी देहदान!
असा प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो.
दान कोणाला द्यावं याबाबतीत जस प्रत्येकाच वेगळं मत,तसच केलेल दान लोकांना सांगावं की नाही,याबद्दल पण मतांतरे आढळतात.
जुन्या काळी अस म्हणायचे,'उजव्या हातांनी दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळायला नको'.पण आजकाल जाहिरातीचा जमाना आहे.आपण करतो ती प्रत्येक गोष्ट जगाला कळली पाहिजे हा आजचा फंडा!
मग त्यात काही,पेपर मधे फोटो छापून येण्यापुरत दानधर्म करणारे असतात, काही कण भर देऊन मण भर दिल्याचं दाखवणारे असतात.काही मात्र, केलेलं दान गुप्त ठेवतात .तर काही लोक दुसर्यांना प्रेरित करण्याच्या हेतूने दानधर्म केल्याची जाहिरात करतात.
दुसऱ्यांनी केलेला दानधर्म बघून का होईना ,पण एकंदरीत, दानधर्म करणाऱ्यांची संख्या पाहिले पेक्षा नक्कीच वाढली आहे.
देणारे हात हजारो झाले असले तरी घेणारे हात ही लाखो करोडो आहेत!
त्यामुळे कोणत्याही प्रकारे असो पण फारशी चिकित्सा न करता,शक्य असेल तेवढं अन शक्य असेल तिथे,'देणाऱ्याने देतच राहावे' हे मात्र खरे !
No comments:
Post a Comment