"अरे कुंभकर्णा, ऊठ आता, 12 वाजत आले दुपारचे !काय होणार आहे या नविन पिढीचं?रात्र -रात्र जागायचं आणि दिवसा अशा झोपा काढायच्या! "
हा प्रसंग हल्ली बहुतेक घरात पहायला मिळतो. कारण नविन पिढीला अभ्यास करायचा असतो तो रात्रीच ! बरं सुट्टी असेल तर मग तर त्यांना रात्री खूपच कामं असतात. उदाहरणार्थ. .Web series, Facebook, Twitter, instagram,wa app chat etc.etc.......नविन पिढी कशाला, माझ्या मित्र -मैत्रिणींपैकी कित्येकजण रात्री wa app वर 2.30, 3 वाजता पोस्ट टाकतात,तर काहीजण पहाटे चार वाजता! म्हणजे काहींना निद्रानाश तर काहींना झोप कमी!
तर," झोप "! आपल्याला कल्पना नाही, पण या एका झोपेमुळे आपल्या तब्येतीवर किती परिणाम होतो. रात्रीचे जागरण, काहीजणांना job म्हणून, business चा भाग म्हणून, विद्यार्थीदशेत अभ्यासासाठी करावे लागते. तसेच कलाकारांना नाटक, सिनेमा, गाणं यासाठी रात्रीची जागरणं होतात, पण ती unavoidable असतात. पण त्यामुळेच काही कलाकार व्यसनांच्या आहारी जातात. पण सामान्य लोकांमध्येही अलीकडे निद्रानाश हा विकार बळावत चाललाय.
त्याची कारणे काय असावीत बरं? मला तर नेहमीच वाटतं, की सकाळी उठल्यापासून झडझडून कामं करावीत, नेहमी चांगले positive विचार करावेत, म्हणजे रात्री पाठ टेकल्याबरोबर झोप लागते. बरोबर आहे ना? आता मानसिक तणाव खूप वाढलेत,घरी, कामाच्या ठिकाणी, सगळीचकडे!त्यामुळे आपण मनानेच खूप थकतो. मला सांगा, घरी सगळी कामं आटोपून शेतात दिवसभर कष्ट करणारीला झोपेचा कधी problem येत असेल?
दुसरा प्रकार म्हणजे अति झोप! तीही वाईटच! रात्री शांत व भरपूर झोप झाल्यावरही पुन्हा दुपारी पडदे वगैरे ओढून, रात्रीचा फिल तयार करून, गाढ दोन-दोन तास झोपणारे पाहिले की आश्चर्य वाटते. सकाळी लवकर उठायला आवडत नाही, व दुपारी झोपायला खूप आवडते, अशा प्रकारच्या मंडळींचा एक दावा असा आहे की आम्ही चान्स मिळेल तेव्हा झोपून एनर्जी स्टोअर करून ठेवतो, व योग्यवेळी योग्य तिथे वापरतो. उगाच सकाळी उठून खूडबूड करून घरादाराची झोप खराब करायची ?(आणि काय मोठे तीर मारतात सकाळी लवकर उठणारे?) ही त्यांची मते!
दुपारी जेवल्यानंतर वामकुक्षी घेतल्याने आपण फ्रेश होतो, हे मात्र नक्की! पण काहींची वामकुक्षी तासनतास चालते अशा लोकांना पाहणाऱ्यांनाच डिप्रेशन येतं.
वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची दिशा यावर बरीच माहिती मिळते. डोके कोणत्या दिशेला असावं, पाय कोणत्या दिशेला असावेत, त्याचा झोपेवर होणारा परिणाम, शुभ दिशा वगैरे. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, पण मोठ्या शहरांमध्ये स्क्वेअर फिट चा भाव पाहता, लाखो रुपये खर्चून फ्लॅट घेताना, आपली आर्थिक सोयच पहावे लागते. मग कुठली दिशा अन् काय!
झोप लवकर व शांत लागावी, यासाठी खूप उपाय सुचवले जातात, वेगवेगळ्या शास्त्रानुसार!. जसे झोपण्यापूर्वी हातापायांना कोमट तेलाने मालिश करा किंवा मध घालून गरम दूध प्या. रात्री तिखट, तेलकट खाणं टाळा, कोमट तेलाने डोक्याला मालिश करा, सकाळी लवकर उठून पायी फिरायला जा.झोपताना बेडवर अरोमा थेरपी आॅईलचे दोन-चार थेंब शिंपडा, तसेच जायफळ, (भारतीय खाद्यसंस्कृतीतील गोड पदार्थांची चव वाढवणारे) असेच गुणकारी. यात आढळणारे trimyristin घटक शरीरातील स्नायू व चेतासंस्था आरामदायक स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते.
लहान बाळांना आपण अंगाई गीते म्हणून झोपवतो. म्हणजेच म्युझिक थेरपीचा मोठा परिणाम झोपेवर होतो! मला तर आताही झोप लागत नसली की,अशी music थेरपी कोणीतरी apply करावी असं वाटतं खरं सांगा, तुम्हालाही असेच वाटतं नां?काश्! ऐसा होता! पण त्या गोष्टीची नुसती कल्पना करायची आणि गप् झोपून जायचं!
इतक्यात मोदींच्या कमी झोपण्या बद्दल व त्यांच्या दिनचर्ये बद्दलच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. खरोखरच मोदी हे एक अजब रसायन आहे हे नक्की! कारण इतकी कमी झोप त्यांना पुरते, आणि सकाळी उठून ते तेवढेच फ्रेश दिसतात व तेवढ्याच उत्साहाने सर्व जबाबदाऱ्या, कामे पार पडतात. अगदी अशक्य वाटतं सगळं!
माझ्या परिचयात पण असे काही जण आहेत, ज्यांना अगदी कमी झोप पुरते. भाग्यवानच म्हणायचे त्यांना! नाहीतर आम्हाला जरा जरी झोप डिस्टर्ब झाली की दिवसभर आळसटलेले, निरुत्साही वाटत राहते.
तर मैत्रिणींनो, अशा या झोपेच्या वेगवेगळ्या सवयी! माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की, आम्ही दोघेही झोपताना छान चहा करुन पितो, (बापरे) झोप उडवण्यासाठी चहा माहित होता, हे नवीनच! चहाने अॅसिडिटी वाढते , इ.ला फाटा देणारे!
इंग्रजीत म्हण आहे की," Early to bed and early to rise, makes a man healthy, wealthy & wise"-आपल्याकडेही," लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे" ,म्हणतातच.
पण ही लवकर उठायची सवय लागणार कशी? कारण झोप अपुरी झाली तर दिवसभर निरुत्साही वाटेल.
जर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येत असेल, तर दररोज सकाळी थोडा वेळ आधीचा गजर लावा, म्हणजे हळू हळू लवकर उठायची सवय लागेल.
"What the most successful people do before breakfast" या पुस्तकाच्या लेखिका लाॅरा वंडरकॉम म्हणतात, सकाळचा वेळ आपला स्वतः चा असतो जो आपल्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून झोप आवरुन, लवकर उठणे जरूरी!
चला, झोपते आता! बरीच रात्र झालीय ! नाहीतर म्हणाल," लोका सांगे ब्रह्मज्ञान-----!"
No comments:
Post a Comment