Monday, September 9, 2019

सर्वेषां शुचिर्भवतु

 परवा सकाळी फिरायला निघाले .खूप प्रसन्न वाटत होते .काही अंतर चालून गेल्यावर मात्र रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचा ढीग दिसला. भरपूर साचलेला कचरा ,त्याचा दुर्गंध ,घोंघावणार्‍या माशा बघून राग येऊ लागला.  कितीही प्रयत्न केले तरी आपला कचरा बाहेर -आपल्यापासून लांब टाकला की झाली स्वतःच्या घराची स्वच्छता या सवयीवर अजूनही तोडगा निघत नाही. स्वतःपुरते स्वच्छतेचे नियम पाळून सार्वजनिक स्वच्छता पसरवणे ही मानसिकता साधारण सर्वत्रच आहे ,काही अपवाद वगळता! असा विचार करत असतानाच आणखी एक इसम तिथे आला आणि कचऱ्याची पिशवी त्या ढिगावर भिरकावून निघूनही गेला.
 या गोष्टीचा जरा दुसऱ्या बाजूने विचार केल्यावर लक्षात आले की रस्त्याचा जो भाग स्वच्छ होता त्यावर कोणी कचरा टाकलेला दिसत नव्हता( हेही नसे थोडके) मात्र जिथे पूर्वी टाकलेली घाण दिसली तिथे पुष्कळांनी आपली भर घातली. काय कारण असावे बरे ?सहजआठवले- मागे एकदा टेबलवर  दुधाच्या कपातले  दूध   सांडल्यावर लेकीने मला म्हटले हे नंतर  पुसून घेशील आई .नाहीतरी टेबल खराब आहेच आणि ती खेळायला पळाली. खरंच टेबल आधीच चक्क पूसलेला असता तर तिने ताबडतोब सांडलेले दुधाचे थेंब पुसून घेतले असते. जिथे आधीच डाग अस्वच्छता आहे तिथे निष्काळजीपणा करायला हरकत नाही असा समज सरसकट सर्वांचाच दिसतो. गृहीत धरले जाते काय स्वच्छ ,टापटीप ठेवायला हवे आणि कुठे चालढकल खपुन जाईल ते !
अगदी आतून स्वतः कोणी यावर चांगले काम केले किंवा पूर्वीची अस्वच्छता घालवून स्वतः पुन्हा ती न करण्याचे ठरवले तर बहुदा त्याची "गांधीगिरी" म्हणून टर उडवली जाते. हल्ली यात बऱ्याच अंशी बदल होत असले तरी हवी तशी गती अजूनही आलेली नाही हे पण मान्य करायलाच हवे. 
आपला परिसर ,वस्तू इत्यादी  बाबतचे हे सत्य मनुष्याच्या  बाबतही कसे लागू होते बघा !सद्गुणी व्यक्तीचा आदर सर्वत्र होतो .त्याचे गुण आवर्जून उल्लेख करून एकमेकांना सांगितले जातात. पुढच्या पिढीला त्यांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला दिला जातो. चुकून कोणी त्या व्यक्तीवर टीका केली, हेतुपुरस्सर खोट्या गोष्टींचा प्रसार केला तरी इतरांकडून ते स्वीकारल्या जात नाही. एवढी गुणी व्यक्ती असे करणे शक्यच नाही यावर जनमानस ठाम असते. आधीच स्वच्छ प्रतीमा असल्यावर कुठे बारीकसा डाग त्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसला तरी तो दुर्लक्षिला जातो किंवा त्याचे समर्थन केल्या जाते. क्वचित प्रसंगी तो दुर्गुण खरा असला तरी सद्गुणांच्या वाहत्या प्रवाहात तो धुतल्या जातो म्हणा ना!
 याविरुद्ध ज्या दुर्गुण- गढूळ मन, डागाळलेली कृती, सदोष व्यक्तिमत्व असते तिथे ते अजूनच मलीन करण्याचे काम इतरांकडून केले जाते .व्यक्तीच्या आचार विचारातून जी प्रतिमा सर्वत्र तयार होते ती अशुद्ध, दुर्गुणी ,इतरांकडून स्वीकार न करण्यासारखी आणि काही प्रमाणात अधिकाधिक अशुद्ध करता येण्यासारखी अशीच सर्वांना वाटते. त्या व्यक्तीने एकदा प्रयत्न करून भागत नाही . तर वारंवार स्वतःचे वर्तन स्वतःचे विचार तपासत अचूक निर्णय घेत राहणे हेच केवळ स्वतःची ओळख विशुद्ध व्यक्ती म्हणून करण्यासाठी गरजेचे असते. एकदा नाही तर सातत्याने याचे पुरावे मिळत गेल्यावरच त्या व्यक्तीची इतरांकडून स्वीकृती होऊ शकते .सार्वजनिक स्वच्छता एकदा करून भागत नाही, तसेच वैयक्तिक शुद्धी वारंवार करावी लागते. दृढ निग्रह, तीव्र इच्छाशक्ती, लक्ष्य ठरवून त्यावरच प्रयत्न केंद्रित ठेवणे योग्य मार्गदर्शनात स्वतःला कौशल्याने लक्ष्य गाठायला कार्यरत ठेवणे यासारख्या गोष्टींचे सातत्य राहिले तर निश्चित त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक दिशेने बदलूशकते- अधिक आरसपानी घडू शकते.
 पूर्वापार सांगितलेले यम ,नियम, आसन ,प्राणायाम ,प्रत्याहार, धारणा, ध्यान ,समाधी हे योग साधण्याचे आठ मार्ग कौशल्याने ,सचोटीने अवलंबून सार्वजनिकच नाही तर वैयक्तिक शुद्धी सुद्धा नक्कीच मिळवता येईल .गरज मात्र या क्षणापासून सुरुवात करण्याची आहे!

No comments:

Post a Comment