काही व्यक्ती कळत नकळत तुम्हाला खूप काही देऊन जातात, तुम्ही नाही विसरू शकत अशा व्यक्तींना! माझ्याही आयुष्यात एक विशेष स्थान असलेली अशी व्यक्ती म्हणजे आमचे सिनकर सर!
काही वर्षांपूर्वी मुलुंडला वॉक करीत असताना, एक शाळेतली मैत्रीण भेटली, बोलता-बोलता सरांचा विषय निघाला, तर म्हणाली की तुझा फोन नंबर दिला तर चालेल का सरांना? म्हटलं, जरूर दे! आणि तेव्हापासून सरांचे नियमित फोन, वाढदिवसाला आणि लग्नाच्या वाढदिवसाला येणे सुरू झाले. मला खूप आनंद झाला, इतक्या वर्षानंतर सरांशी बोलता आले तेही मोकळेपणाने! कारण आधी कधी त्यांच्याशी कामाव्यतिरिक्त बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती. आता थोडसं सरांविषयी---
मी दहावीत गेले आणि maths साठी ट्युशन लावायची असे ठरले, खरंतर काही जरूर नव्हती, शाळेत बऱ्यापैकी शिकवायचे व तेव्हा आतासारखे ट्युशन चे फॅडही नव्हते. पण पैकीच्या पैकी मार्क्स मिळावेत, आणि या सरांविषयी खूप चांगले रिपोर्ट होते
म्हणून ट्युशन लावली. सर त्यावेळी इंजिनियरींग झाल्यावर चांगल्या नोकरीची संधी असताना, क्लासेस घेत होते. अत्यंत कडक शिस्तीचे! उदाहरण द्यायचं तर, सकाळी ६.३० वाजता मुलुंड (पूर्व) इथे आमचा क्लास असायचा, आम्ही मुलुंड (पश्चिम) ला राहायचो. इतक्या सकाळी उठून, ब्रिज क्रॉस करून पायी जायचो. एक मिनिट उशीर चालायचा नाही, लगेच शिक्षा ठरलेली.
Class-test मध्ये त्यांनी एक marks ठरवलेले असायचे, त्यापेक्षा कमी मार्कस मिळाले, तर तो पेपर एकदा, दोनदा, तीनदा असा लिहावा लागायचा. कारण एकच..... Perfection. मला इतका वैताग यायचा, बरेचदा ट्युशन सोडायचा विचार मनात यायचा. पण त्यांच्या शिकवण्यात अशी काही जादू होती की, मी तो क्लास काही सोडू शकले नाही.
पुढे अकरावीत मी पोदार कॉलेज, माटुंगा तिथे ॲडमिशन घेतली. मुंबई युनिव्हर्सिटीत अकरावी-बारावीला, कॉमर्सलाही maths विषय होता. माझं कॉलेज ५.१५ ला सुटायचं, म्हणजे अगदी ऐन गर्दीच्या वेळी. तेव्हा रिक्षा-टॅक्सी चा काही प्रश्नच नव्हता. माटुंग्याला कॉलेज ते स्टेशन, मुलुंड ला स्टेशन ते क्लास, आणि लोकल प्रवास करून कधी कधी क्लासमध्ये पोचायला उशीर व्हायचा. उशीर झाला की तासभर हातात वही घेऊन उभ्याने लिहायचं, geometry सुद्धा! थंडी,पाऊस असे कोणतेही एक्सक्यूज चालायचे नाही. मी एकदा हिम्मत करून, सरांना माझ्या अडचणी सांगितल्या, ज्या माझ्या कंट्रोल च्या बाहेर होत्या. पण सर म्हणाले, तुझे genuine कारण असेलही, पण एकदा तुला concession दिलं की, इतरांना मी काय उत्तर देऊ? तसं चालणार नाही, नियम म्हणजे नियम!
एकदा तर मजाच झाली. एका फ्लॅटमध्ये आमचा क्लास व्हायचा. त्याला दोन दारं होती, एका दाराने आम्ही विद्यार्थी आत जायचो, तर दुसऱ्या दाराने सर! एकदा सर क्लासच्या आत पाऊल टाकणार, तेवढ्यात त्यांनी मला येताना पाहिलं. दोन्ही हात दाराला, आणि एक पाऊल वर असे मी आत शिरेपर्यंत उभे राहिले. मी मनोमन त्यांना थँक्स म्हंटले. असे होते आमचे सर!
अतिशय सोपी शिकवण्याची पद्धत! Perfection वर भर! तशाच सवयी आपोआप लागायच्या विद्यार्थ्यांना! कौतुक कधी तोंडावर करायचे नाहीत आमच्या! खूप म्हणजे खूप धाक वाटायचा, पण तितकाच आदरही!
दहावीच्या बोर्ड परिक्षेच्या वेळी सेंटरवर सपत्नीक, आम्हाला शुभेच्छा द्यायला आले होते, त्यांना पाहून सगळी मुलं आनंदली. नमस्कारासाठी खाली वाकल्यावर माझ्या पाठीवर जोरात थाप मारून, ही सत्तीकर! एवढंच पत्नीला म्हणाले, आपण काय ते समजून घ्यायचं. अशी माया, प्रेम मिळायला भाग्य लागतं.
2-3 वर्षांपूर्वी मला समजलं की सर दरवर्षी शेगावला येतात. मी खूप आग्रह केला, तर एक दिवस अकोल्याला माझ्या घरी दोघेही आले,"साधूसंत येती घरा. ..चा अनुभव मी घेतला.
आताचे सर वेगळेच होते.आधीचा कडकपणा पार गळून गेला होता. फणसा सारखे भासले. ...
त्यांनी सांगितले की,कोकणातील अतिशय गरीब, पण हुशार अशा शाळकरी मुलांना मदत देण्यासाठी, सुभद्राबाई स. निधी ही संस्था स्थापन केली आहे. त्याला आर्थिक हातभार लावलाय, सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी! तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल,त्या संस्थेचा एकूण निधी काही कोटी झालाय आता!दाते, सर्व सरांचे लाडके विद्यार्थी! Wa app मुळे संपर्क सहज साधला जातो. सर स्वतः वरचेवर कोकणात जाऊन ती जबाबदारी पार पाडतात. (आताही त्यांचा जबरदस्त फिटनेस आहे ) सर्व विद्यार्थ्यांना गाढ विश्वास आहे की सरांना दिलेल्या रकमेचा योग्य विनियोगच होणार.
मुलुंड -ठाणे इथे यशस्वीपणे क्लासेस चालवल्या नंतर, आता मनाने निवृत्त न होता,सामाजिक भान जपून कार्य करणाऱ्या आमच्या सिनकर सरांना, कोटी कोटी प्रणाम.
No comments:
Post a Comment