Sunday, July 7, 2019

स्मरणक्षण



मला वाटते ग नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू, नवे गीत गाऊ
जुना गाव राही कुठे दूर मागे
नव्या पावलांना नवा मार्ग देऊ 

शान्ताबाईंच्या या कवितेच्या ओळींमध्ये नव्याची ओढ आहे. हे असं आयुष्यात नवं काही तरी घडत राहणं, ही प्रत्येक माणसाची भावनिक नि मानसिक गरज आहे. जगाच्या या पसा-यात किंवा संपूर्ण विश्वाच्या संदर्भात... क्षणांच्या अविरत साखळीत या नवीन क्षणांचं स्थान, अत्यंत अल्पजीवी किंवा नगण्य आहे. पण आपल्या मनात ते महत्वाचे असतात. मात्र काही क्षण असेही असतात की जे विश्वाच्या एखाद्या नव्या पर्वाचा प्रारंभ करणारे असतात. 1913 साली अशाच एका नव्या पर्वाची सुरूवात झाली होती. 
अर्थात त्याची बीजं पेरल्या गेलीत ती, 1896 या वर्षी! 7 जुलै 1896 हा तो दिवस होता, ज्यादिवशी ल्युमिअर बंधूंनी तयार केलेला सिनेमा मुंबईत झळकला आणि ध्येयवेड्या दादासाहेब फाळकेंना एका नव्या पर्वाचा मार्ग खुणावू लागला. 'चित्रपट' नावाचे नवे विश्व साकारू लागले. 'शाम्बरिका खरोलिका' सारख्या चित्र चलत करणा-या प्रयोगापासून तर 'किनेटोस्कोप' वर लघुपट तयार करण्यापर्यंत अनेक प्रयोग सुरू झाले
यानंतरच्या टप्पा होता, पहिला कथनात्मक चित्रपट अर्थात फीचर फिल्म बनविण्याचा...! ते बनविण्याचं श्रेय सुद्धा एका मराठी माणसालाच जातं. आर.जी. अर्थात दादा तोरणे यांनी 'पुंडलिक' चित्रपट बनवला. विशिष्ट कथानक रचून त्याला चेहरा देण्यासाठी कलाकार घेण्याचा आणि त्या कलाकारांना कॅमेरासमोर उभं करून चित्रण करण्याचा तो पहिला प्रयत्न होता. दोन आठवडे प्रेक्षकांची गर्दी खेचणारा, बाॅक्स ऑफिस फुल्ल करणारा चित्रपट 'पुंडलिक'! 
   त्यानंतर आला सलग 23 दिवस चाललेला आणि महाराष्ट्राच्या सिमा ओलांडून इतर भागात पोहचलेला पहिला चित्रपट, 'राजा हरिश्चंद्र'. वर्ष होतं 1913!
1913 ते 2019 या अवधीत, चित्रपट सृष्टीत ब-याच घडामोडी झाल्यात, अनेक बदल घडलेत.
मूकपटानंतर 1931 साली बोलपट युग अवतरले. कृष्णधवल पासून तर रंगीत डीजिटलपर्यन्त, 70 एम एम पासून सिनेमास्कोप पर्यंत नवंनवे प्रयोग पचवत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा गाजतो आहे. 'परंपरेचे पुननिर्माण म्हणजे कला' हे तत्व अंगिकारत पुढे जातो आहे.

प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी
कसले तरी गाणे गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो
गाणे गातात
देणे देतात
झडून जातात
झाडे नुस्ती नुस्ती
नुस्ती राहतात

आरती प्रभूंच्या या कवितेप्रमाणेच काहीसे चित्रपट क्षेत्राचे आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक, गायक, अभिनेते आणि कोण कोण...विविध पक्षी या चित्रपटसृष्टीरूपी झाडावर कुठून कुठून आलेत. विसावलेत. आणि आपला ठसा उमटवून निघून गेलेत. जीवनाच्या सर्वांगांना व्यापून असलेल्या 'दिक्' आणि 'कला' या तरल तत्वांना घेऊन सिनेमा हा प्रकार 'नादतत्वा'च्या संगतीने, स्वर आणि ताल वादनाच्या साथीने मानवी भावभावनांचा कोलाज आजही निर्माण करतो आहे. 
कलावंत आणि रसिक हे दोन महत्वाचे दुवे या सिनेमा नावाच्या आकर्षणाने जोडले गेले आहेत. 
     कला आपल्या अवतीभवती असते. सोबत करते. नव्या वाटा सुचवते. नवे जगणे सांगते. म्हणून तर आतबाहेर कलेचा संचार झालेली मंडळी या रूपेरी पडद्याद्वारे सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवितात. प्रत्येक कलावंत म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईत असतो. काही एका चित्रपटापुरते तर काही ध्रुवता-याप्रमाणे अढळ आहेत!
सिनेमा आमचा श्वास आहे. सिनेमा आमच्या स्वप्नजगतातील भास आहे. सिनेमा आमच्या कलाकारांच्या कलागुणांचा ध्यास आहे.

हे कुठले रस्ते आपण घडवित जातो
वळणावर कुठली वळणे तुडवित जातो
जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी
हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो

अशी नव्याकडे वाट जात आहे पण सोबतीला जुन्याचाही आठव आहेच. आठवणींच्या या कुपीतून ओघळलेले हे होते चारदोन स्मरणथेंब! खास तुमच्यासाठी...! ते आजच का उलगडलेत तर जाणवले की हा जुलै महिना आहे आणि 1896 साली याच महिन्याच्या 7 तारखेला एका नव्या क्षणांचे रोपण झाले होते. त्या आठवणींना हलकासा उजाळा देत पुढच्या क्षणांना सामोरे जाण्यासाठी हा लेखनप्रपंच!

- सीमा शेटे (रोठे), अकोला

No comments:

Post a Comment