दर वर्षीप्रमाणे यंदाही जून महिना सुरू झाला तेव्हा अंगावर काटा आला ....10 विचा निकाल लागणार आणि कॉलेज मध्ये 11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार! आता तुम्ही म्हणाल त्यात अंगावर काटा येण्यासारखे काय आहे बॉ? तर आम जनतेसाठी खरंच तसं काही नाही पण कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्षातील सगळ्यात कठीण कालखंड कोणता असेल तर तो 10 विचा निकाल लागल्यापासून आवश्यक प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंतचा!
सरकारने प्रत्येक गावाच्या प्रत्येक गल्लीत भाजीबाजाराप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांना (क.म.)परवानगी दिल्याने प्रवेश संख्येचा भस्मासुर निर्माण केला आणि प्रवेश क्षमता पूर्ण न केल्यास तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा काय तलवारच ठेवली जणू. मग काय प्रवेश क्षमता पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क.म. च्या शिक्षकांना तारेवरची छे.. छे.. तलवारी वरची कसरतच करावी लागते. त्यासाठी प्रत्येक क.म. च्या शिक्षकांचा वेगळा फंडा.कुणी 11 वी 12वी च्या tution classes शी टाय अप करतो तर कुणी शाळांशी !
यामधून आपसात निर्माण होणाऱ्या चकमकी अनिवार्य ! मला तर परिसरात दिसणारी प्रत्येक नवतरुणी प्रवेशासाठी आपल्याच शोधात फिरतेय की काय असं वाटतं
.आणि 20 ऍडमिशन पूर्ण झाल्याची स्वप्न रोज पडतात
. मला वाटायचं हे फक्त मलाच वाटतं. पण माझ्या लक्षात आलं की क.म.च्या प्रत्येकच शिक्षकाला असंच वाटतं म्हणे
.आमच्या संस्थेच्या परिसरात 3 क.म. आहेत . पैकी आमचा व्यावसायिक अभ्यासक्रम विभाग आणि कला,वाणिज्य,विज्ञान विभाग यांची प्रवेश प्रक्रिया एकाच हॉल मध्ये असते . त्यामुळे संघर्षाची हमी
🏼. हॉल मध्ये येण्यासाठी हॉल ला 800 खिडक्या 400 दार ! मग काय त्यातील एक लकी दरवाजा अडवून आम्ही अंधश्रद्धा वगैरे जोपासून बैठक व्यवस्था करतो . अर्थातच दुसऱ्या पार्टी चा तोच प्रयत्न असतो की हॉल मध्ये येणाऱ्या व्यक्तीला पहिले तेच दिसावे . आणि इथून सुरू होतो आमचा पकडापकडीचा खेळ ! म्हणजे मला तर रोज भाजीबाजारात भाजी विकायला बसल्यासारखंच वाटतं. भाजीवाले आपली भाजी किती ताजी आणि छान आहे व दुसऱ्या भाजीवल्याकडे जाऊ नये म्हणून लोकांचे लक्ष वेधून घेतात."या साहेब इकडे भूत आहे तिकडे" हे वाक्य कर्कश्य आवाजात भाजीबाजारात मी नेहमी ऐकते. याच धरतीवर आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी "ए शुक शुक" अशी हाक मारून आमचा व्यावसायिक अभ्यासक्रम,कला ,वाणिज्य शाखे पेक्षा किती श्रेष्ठ आहे हे प्राण कंठाशी आणून विद्यार्थ्यांना सांगत असतो.
हे असं आमच्या अभ्यासक्रमाचा प्रचार करण्याची प्रक्रिया 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय निरोप समारंभ असतो तेव्हापासून सुरू होते. मग online निकाल लागल्यावर त्यांचे फोन नम्बर मिळवून फोन वर मनधरणी केली जाते . मग निकाल वाटपाच्या दिवशी प्रत्यक्ष सावज टिपून पुन्हा एकदा कळकळीने सांगितल्या जातं . पण या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरची रेष हलली तर शपथ!
निर्विकार पणे हे विद्यार्थी राजकारणी मंडळीही लाजतील असे आश्वासन देऊन सांगतात ठीक आहे आमच्या पालकांना घेऊन आम्ही उद्या ,परवा येऊ. प्रत्यक्षात मात्र यापैकी एखाद दुसरीच ऍडमिशन होते बाकी विद्यार्थी हॉल मध्ये दुसऱ्या पार्टी कडे ऍडमिशन घेण्यासाठी आमच्यापासून तोंड लपवून दबक्या पावलाने 400 दारांपैकी एका दारातून येतात आणि कला किंवा वाणिज्य शाखेला प्रवेश घेतात ,आम्ही मात्र तोंड पाडून तोंडचा घास पळवल्यासारखं बघत बसतो
.नाही म्हणायला या घटनाक्रमात चुकून कधीतरी बदल होतो ,जेव्हा विद्यार्थी दारातून आत येतो तेव्हा त्यांची नी आमची नजरानजर चुकून झालीच तर आम्ही "ह बोला काय म्हणताय ?"असं ओळखीचं हसून विचारलं की येतात बिचारे केविलवाणे चेहरे करून आमच्याशी बोलायला! मग आम्ही नव्या जोमाने त्यांना पुन्हा आमच्या अभ्यासक्रमाचे महत्व आणि फायदे पटवून देण्याचा क्षीण प्रयत्न करतो ,काही ऐकून घेतात आणि उद्या पुन्हा विचार करून सांगतो म्हणतात तर काही तोंडावरच तुमच्या अभ्यासक्रमाला काही value नाही म्हणतात
🏼,तर काही निक्षून सांगतात "पण आम्हाला आर्टच घ्यायचं न" आणि काही महाभाग ज्यांना 36 ते 45 टक्के गुण असतांना(विज्ञान आणि गणितात ATKT असलेले सुद्धा) पालक म्हणतात"तस पोरगी/पोरगा लै हुशार आहे पन परीक्षेच्या वेळी बिमार पडल्याच्याने मार्क कमी पडले ,खेड्यावर भेटते ना ऍडमिशन, science ले नंबर लागते पोराचा"मग काय आमची दांडी गुल ! आमचे चेहरे बघण्यासारखे होतात. बरं प्रकरण एवढ्यावरच थांबलं तर ठीक!आमचं नशीब याही पुढे ढेप खातं जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना हाक मारुन बोलावतो तेव्हा ते दुरूनच हात लांब करून नाही ची खूण करून चक्क "नाही येत" म्हणून आमचा पोपट करतात

परवाचा किस्सा तर कळसच झाला 🤦🏼♀. एक 41 टक्के गुण असणाऱ्या मुलीच्या आईशी निकाल लागल्यावर फोन करून संपर्क केल्या वर "माझ्या मुलीला शिवाजी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचाय पण मी दिवसभर नोकरी करते त्यामुळे तिच्याकडे लक्ष राहणार नाही पण तुमच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला तर शिस्तीत राहील असं माझ्या शेजारणींने सांगितलं मग मला काळजी वाटणार नाही म्हणून मी तिला उद्या TC घ्यायला पाठवते आणि तुम्ही तुमच्या भाषेत तिला समजावून सांगा ती ऐकेल"असे आश्वासक बोल ऐकल्यावर मन मोरपिसासारखं हलकं झालं ! चला ही ऍडमिशन पक्की आहे याची खात्री पटली. प्रत्यक्षात मात्र पुढचे 2 दिवस मुलगी आली नाही . मी पुन्हा संपर्क केला तेव्हा आईने सांगितले "मुलीची तब्येत बिमार आहे . तुमच्या सीट फुल तर नाही ना होणार? 3-4 दिवसांनी पाठवलं तर मिळेल ना तिला ऍडमिशन?" मी ही माझ्या ऍडमिशन जणू ओसंडून वाहतायत या थाटात " मी तिची एक जागा नक्की राखून ठेवते ,तुम्ही काळजी करू नका,तिला बरं वाटलं की पाठवा" त्याच बरोबर शाळेत चौकशी करून खात्री केली ,चुकून तिने परस्पर TC तर नाही नेली ना याची . पुन्हा एक आठवडा रिकामा गेला आमची एकही ऍडमिशन नाही झाली .मग आठवण येऊन मी या आईला फोन करून मुलीच्या तब्येतीची चौकशी केली तर "आत्ताच मुलीला पाठवते ,तुम्ही आहात ना कॉलेज मध्ये ?आज तिची ऍडमिशन करूनच टाका ,मी पैसे घेऊन पाठवते"त्यावर मी " तिला आधी ऑफिस मध्ये TC घ्यायला पाठवा ,मी तिची TC काढून ठेवते"असे सांगितल्यामुळे आई गदगद झाली आणि मी निश्चिन्त ! कारण ती मुलगी हॉल मध्ये आली तर दुसऱ्या पार्टी ला आयतेच ताट मिळाले असते म्हणून हा मार्ग काढला आणि मी किती हुशार आहे या भावनेने मी सुखावले
. आहाहा आज खात्रीने एक ऍडमिशन होणार ,तीही पूर्ण विषयात पास असलेली ! सोन्याहून पिवळं
मग काय मी एका कागदावर प्राचार्यांकडून सही घ्यायला म्हणून ऑफिस मध्ये गेले असता ती मुलगी आली तिला म्हंटले तू या बाबूंकडून TC घे आणि इथेच थांब मी बाजूच्याच केबीन मधून प्राचार्यां ची सही घेऊन आलेच एक मिनिटात त्याला ती अज्ञाधारकपणे "हो"म्हणाली . मी सुद्धा एक मिनीटातच परतले तर मुलगी गायब
जमीन खा गयी या आसमान निगल गया?
तिथे असलेल्या चपराश्याला विचारले तर तो म्हणाला "मॅडम तुम्ही ज्या मुलीशी बोलल्या ती मुलगी आत्ताच चप्पल हातात घेऊन धूम पळाली " आता बोला?

No comments:
Post a Comment