मागे व्हाट्सअप वर एक जोक वाचला,"नवरा बायको विभक्त होतात त्याला घटस्फोट म्हणतात ,तर लग्नाला घटस्थापना का म्हणू नाही!"
जोक वाचून हसायला आल आणि सहज मनात विचार आला,घटस्थापना केल्यावर रिवाजाप्रमाणे नऊ दिवस देवीचा मुक्काम आपल्या घरात असतो.पण लग्न ह्या घटस्थापनेत सात जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलेले नवरा बायको किती दिवस एकत्र राहतील हा आज काल संशोधनाचाच विषय आहे.
खूप पूर्वी आईच्या पोटात असतानाच लग्न ठरवल्या जायचे. त्यानंतर बाल विवाहाची प्रथा सुरू झाली.
तेंव्हा लग्न वडीलधारी मंडळीच ठरवायचे.मुला मुलींच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता.
हळू हळू मुलाच्या पसंतीचा विचार केला जाऊ लागला, पण मुलीला मात्र वडील म्हणतील त्या मुलाशी निमूटपणे लग्न करावे लागे.
पुढे स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला,स्त्रिया धीटपणे आपली मत मांडायला लागल्या,लग्न ठरवताना त्यांचे मत विचारात घेतल्या जाऊ लागले.
पण या स्त्रीमुक्तीच्या वाऱ्यात काही स्त्रिया भरकटल्या.
असो ,मुला मुलीच्या एकमेकांबद्दल च्या अपेक्षा आणि अटी हा स्वतंत्र विषय होईल!
तर ,दोघांच्याही पसंतीने, एकमेकांची आवड -निवड घरदार ,जन्म कुंडली ,इतकंच काय मेडिकल कुंडली जमतेय की नाही हे पाहून मग लग्न व्हायला लागलीत.
दोघांच्याही मनासारखा जोडीदार मिळाल्याने सगळेच संसार सुखनैव व्हायला हरकत नव्हती.किंवा पिक्चर मधे दाखवतात तस ,'they lived happily forever'
असा प्रत्येक संसाराचा happy ending व्हायला हवा होता.
पण प्रत्यक्षात काय दिसत! आजची ताजी आकडेवारी सांगते की घटस्फोटाचे प्रमाण पूर्वीपेक्षा दिवसें दिवस वाढते आहे.
प्रामुख्याने घटस्फोट होतात ते जोडीदाराने केलेल्या शारीरिक किंवा मानसिक छळामुळे किंवा विवाहबाह्य संबंधांमुळे!अशा परिस्थितीत घटस्फोट घेणं योग्यही आहे.
पण यापैकी काहीही कारण नसताना ,सगळं काही व्यवस्थित असताना ही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
नुकताच एक सिनेमा बघितला,त्यातली नायिका सुखवस्तू घरातली व स्वतः उद्योजिका असते.सासू, नवरा प्रेमळ असतात.अशी ही नायिका सगळं काही आलबेल असताना पण नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय ,आपले आई वडील व सासू समोर सांगते.
सासू तिला विचारते ," क्या वो तुम्हे मारता है?" नायिका नाही म्हणून मान हलवते. " क्या वो तुम्हे शॉपिंग के लिये पैसे नाही देता?"
या वेळेला नायिकेच्या डोळ्यात जी अगतिकता दिसते ती बरच काही सांगून जाते ,जणू ती म्हणतेय,'कस सांगू मी तुम्हाला फक्त पैसा आणि चांगली वागणूक म्हणजे सगळं नाही.एक चांगला जोडीदार, मित्र म्हणून अजून ही काही हव असत.मला ते शब्दात सांगता येत नाहीये ,पण मी सुखी नाही या संसारात'.
आमच्या नात्यातील एका मुलीबाबत असच काहीस घडलं,त्या नायिकेची अन या मुलीच्या दुःखाची जातकुळी एकच असावी अस मला आता वाटतंय.
प्रेमविवाह असो वा छत्तीस गुण जुळवून केलेलं लग्न!
प्रत्यक्षात जेंव्हा संसार सुरू होतो ,तेंव्हा लक्षात येत की,जोडीदाराशी भावनिक ,मानसिक पातळीवर संवाद साधता येत नाहीये.सगळं काही असूनही काही तरी आहे जे खटकतय. विसंवाद नसला तरी संवादाची वानवा आहे.काही तरी मुठीतून निसटुन गेल्याची भावना मनात येते आणि मग घुसमट होते.आजची पिढी प्रॅक्टिकल आहे.आयुष्य एकदाच मिळत त्याचा पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे हा त्यांचा फंडा!
त्यामुळे कुठेतरी अपूर्णत्वाची भावना देणारा संसार त्यांना नकोसा होतो,आणि त्याची परिणीती घटस्फोटा त होते.
मागे एक वाक्य वाचले होते,"Nothing under the sun is right or wrong".
क्षणभर नवीन पिढीची ही दिल मांगे मोअर वाली वृत्ती मान्य केली,तर मग दुसऱ्या जोडीदाराचे काय?त्याची / तिची काय चूक!
'One day we are everything
The next day we are nothing
Some day they prey ti get us
The another day they regret to love us!'
अशी त्यांची भावना होत असेल.
एका जोडीदाराला अपूर्ण ,निरस, वाटणारा संसार दुसऱ्याला परिपूर्ण वाटू शकतो।
काय करावं मग त्यांनी?
घुसमटलेल्या संसारातून मोकळा श्वास घ्यावा की सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या जोडीदाराबरोबर तडजोड करत आयुष्य घालवाव?
काय चूक ,काय बरोबर!
मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटत?
|
No comments:
Post a Comment