Monday, December 14, 2020

अशी ही लपवालपवी

 


चलो खामोशियों की गिरफ्त में चलते है 

बातें ज्यादा हुई तो जज्बा़त खुल जायेंगे

आपल्या खऱ्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणं कठीण नाही पण त्यासाठी तशी इच्छा हवी .इतरांना खरा /खरी मी समजू नये असा प्रयत्न बहुतेकांचा असतो. "खुली किताब" होणे प्रत्येकालाच काही पटत नाही.
आम्ही परवा नवी कार घेतली पण काही सांगत बसलो नाही बुवा सगळ्यांना! मागच्या आठवड्यात मुलाला अजिबात बरे नव्हते, धावपळ करून दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. कळवले नाही कोणाला अजून!!
 म्हणजे दुःख झाले तरी लपवालपवी, आनंदाचे क्षणही चोरट्या सारखे अनुभवणे असे काहीसे बदलत्या जमान्यातील बदलत्या लोकांचे वागणे झाले आहे.

काय काय लपवले जाते बहुतेकांकडून? पूर्वी अनुभवास आलेले वाईट प्रसंग, सध्या एखाद्या अडचणीच्या परिस्थितीतून जात असू तर ते ,दुःख किंवा राग यासारख्या भावना ,आपले एखाद्या व्यक्ती किंवा प्रसंगाविषयी चे मत, आपल्या गरजा ,कमतरता एवढेच नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वातील एखादा पैलू लपवून इतरांसमोर नं आणण्याची गरज बहुतेकांना सतत वाटत असते.
पूर्वीपासूनच हा स्वभाव विशेष एक मानसिक गरज म्हणूया अशी आहेच.अलिकडच्या काळात त्यात खूप जास्त भर पडली आहे. शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा "इमोजी" टाकणं जास्त सोपं वाटतंय .चार शब्द लिहिण्यापेक्षा एक "लाईक" ठोकला की खरे मत कळायला मार्ग नाही.  शिवाय आम्ही सहभागी आहोत हे दाखवायला मोकळे. तर अशा मोकळेपणाने व्यक्त नं होण्याची कारणे काय असू शकतील ते समजून घेऊया.
एखादा प्रसंग किंवा कामाबद्दल लाज वाटून ती लपवण्याची इच्छा होते .कारण बुद्धी सांगत असते हे योग्य नाही पण मनाला भुरळ पडलेल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. मग त्या इतरांपासून लपवून ठेवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. उदाहरणार्थ एखादे व्यसन.

आपण काही सांगितले तर इतरांच्या त्यावर प्रतिक्रिया काय येतील या भीतीने, त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्याच्या अंदाजाने, राग येण्याच्या शक्यतेने, लपवून ठेवलेले /नं सांगितलेलेच बरे असे वाटते.
बरेचदा इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे सगळ्यांना आपण आवडावे म्हणून एखादी दुखरी नस -एखादी कमजोर कडी पडद्याआडच ठेवली जाते.
स्वतःला कमी लेखून ,स्वप्रतिमा चांगली नसल्याने ,आत्मविश्वास कमी, म्हणूनही काही गोष्टी आवश्यक असूनही न सांगणे /मागणी न करणे आणि मनातच ठेवणे असे वर्तन घडते.
वेदनादायक अनुभव इतरांना सांगताना आपली चिंता वाढणे ,मन:स्वास्थ्य बिघडण्याच्या धास्तीपोटी ते आतच दडवून ठेवून वरवर सर्व आलबेल दाखवण्यासारखे उदाहरण दिसतेच.
असुरक्षिततेची भावना ,कोणीही भरवसा ठेवण्यासारखे नाही या विचाराने गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याची सवय जडते.

पूर्वी एकमेकांशी संपर्काची माध्यमं कमी असूनही बहुतेकांना एखाद्याची अंतर्बाह्य माहिती असायची. हल्ली संपर्काची माध्यमं वाऱ्याच्या वेगाने काम करूनही बरेचदा इतरांच्या वरवरच्याच गोष्टी माहिती असतात किंबहुना तेवढ्याच दुसऱ्या पर्यंत पोहोचवल्या जातात.
पण अशा भावना /मतं/ घटना लपवून अनेक तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दिसतात. एक तर ते सतत लपवण्याची काळजी, कोणाला कळणार तर नाही ना याची भीती वाढतच जाते. आपली भावनिक शक्ती यात प्रचंड प्रमाणात खर्ची पडते.
इतरांशी बोलताना वरवरचे बोलणे किंवा सुरक्षित वाटणाऱ्या विषयांवरच संवाद साधणे म्हणजे थोडक्यात "हवापाण्याच्या गप्पा" मारणे यांनी आपसातील नाते घट्ट राहणे शक्य होत नाही. परस्परांमध्ये विश्वास जवळीक, आत्मीयता निर्माण होत नाही. भावनांचा ओलावा न राहता व्यावहारिक कोरडेपणा तेवढा असतो. आपल्यासाठी असुरक्षित मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक वातावरण आपणच तयार करत असतो आणि पर्यायाने एकटे पडत जातो.
संशोधनानेही सिद्ध झाले आहे की खरे व्यक्त न होण्याच्या, इतरांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्ये अकाली मृत्यूचे तीस टक्के आणि कर्करोगाचे सत्तर टक्के अधिक प्रमाण दिसते.

आपली व्यक्त होण्याची, इतरांशी संवाद साधण्याची सवय हळूहळू वाढवता येऊ शकते. काही मानसिक विकारांनी किंवा अनुवंशिक कारणांनी ही सवय सहजपणे बदलता येत नसल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने, समुपदेशनाने यात निश्चित बदल घडवून आयुष्य अधिक सहज आणि समाधानी करता येऊ शकते.
लेखनाच्या विशिष्ट पद्धतीने आपल्या सवयींच्या बाहेर छोट्या-छोट्या पायर्‍यांनी पडता येते. आत्मविश्‍वास वाढवून अधिक सहानुभूतीपूर्वक सर्वांशी नाते ठेवण्यास यातून मदत होते.

Connection is the energy that exists between people when they feel seen, heard and valued. 

योग्य वेळी योग्य व्यक्ती जवळ योग्य पद्धतीने व्यक्त होणे आणि त्यातून आपसातील संबंध जवळिकतेचे ठेवणे महत्त्वाचे आहे.

Sunday, December 13, 2020

अमेरिका डायरी 2- पहिला आठवडा- लिन आणि मी

पहिल्या भागाच्या शेवटी आपण म्हणजे आम्ही.. फिलाडेल्फियात पोचलो होतो. तिथे एका उत्तम हॉटेलमध्ये आमची एक रात्र राहण्याची सोय केलेली होती नंतर आम्हाला आपापल्या पहिल्या होस्टकडे सुपूर्द केले जाणार होते. सकाळी आमच्या स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम झाला. उपस्थितांमधली जांभळा टी शर्ट,काळा स्कर्ट घातलेली, साडेपाच फूट उंच, कपाळ झाकणारी बॉयकट असलेली, चाळीशी ओलांडलेली, तरतरीत नाकाची आणि चमकदार डोळ्यांची गोरीपान लिन मी आपोआप ओळखली. तिनेही ’मोहानी ?’ असं विचारून मला एकदम मिठी मारली. आपला एक आठवडा नक्की छान जाणार एवढे मला जाणवले. कार्यक्रम आटोपताच मी आणि तिच्या कारने सुसाट वेगाने तिच्या घरी पोचलो.


अमेरिकेतील वास्तव्या्चे व एकूण कार्यक्रमाचे वेळापत्रक आम्हाला भारतात जेव्हा मिळाले त्यापाठोपाठ मला ’लिन’चा इ-मेल आला होता. मी शाकाहारी आहे की मांसाहारी, मला कशाची ऍलर्जी आहे का, पाळीव प्राणी आवडतात का, मी मद्य घेते का, असल्यास आवडता brand कोणता(!) ((असा मेल आपल्याला का आला नाही याचे आमच्या टीममधील एकाला फार दु:ख झाले..), माझ्या कुटुंबात कोण कोण असतं, माझे छंद.., मी नक्की काय करते अशी भलीमोठी प्रश्नावली होती त्यात. पूर्वग्रह ठेवून जायचे नाही असे ठरवूनही प्रत्यक्ष भेटीपूर्वीच माझे मत अनुकूल झाले तिच्याबद्द्ल कारण इतर होस्ट्सचे मेल अगदीच औपचारिक होते. उत्तरात मी पण तिला छोटी प्रश्नावली पाठवली. त्यामुळे ती एमबीए असून तिचा घर ’आतून’ रंगवण्याचा व्यवसाय आहे (!), ती विवाहीत असून नवरा, दोन मुली (आणि कुत्री ऍबी)सह फिलाडेल्फियाजवळच्या एका गावात राहते एवढी माहिती मला तिच्याबद्दल अगोदरच होती.


ठराविक अमेरिकन पद्धतीचे राखाडी घर, शुभ्र दरवाजा...पण लॉनची निगा नीट राखलेली नाही, दाराशी आपोआप उगवलेली चारदोन रंगीबेरंगी ट्युलिप्स सोडली तर सगळे उजाड, दगडी पायर्‍या आणि जरा तिरकी झालेली ’चर्च’ लिहीलेली लाकडी पाटी. आत खालच्या मजल्यावर दिवाणखाना, स्वैपाकघर आणि जेवणाची खोली..वर दोन,तीन बेडरूम्स!.घरात प्रचंड पसारा, वस्तूच वस्तू, एकही टेबल रिकामे नाही. बरेच कॉफीचे मग, कागद, पुस्तकं...पण त्यामुळे मला एकदम हुश्श झाले. नीट आवरलेल्या घरात शिस्तीचे जे दडपण येते ते नव्हतेच इथे. तिने चीज आणि पीचच्या फोडी समोर आणून ठेवल्या. मी पहिला तुकडा उचलताच तळघरातून ऍबीच्या जोरदार भुंकण्याचा आवाज आला. मी कुत्र्यांना घाबरते असे कळवल्याने तिला तिकडे डांबले होते. तिचा तो निषेधाचा सूर असावा. ऍबीशी काहीतरी अनाकलनीय बोलत बोलत मला वर नेऊन तिने माझी खोली दाखवली, तिच्या टीनएजर मुलीला (क्लेअर) त्यासाठी धाकटीची(कॅल्सी) खोली शेअर करायला लागल्याचे मला लक्षात आले. ही खोली कशीबशी आवरलेली दिसत होती...लिन म्हणाली, "आज मला खालचं कार्पेट प्रथमच दिसतय.""दोन्ही मुली होईपर्यंत पहिली चार वर्ष मी घरीच होते, नंतरची चार वर्ष नवरा चार्ली घरी होता (त्यांचं आधी ठरल्याप्रमाणे (काश !! :)-मी मनात)) आता दोघही काम करतो त्यामुळे आवरणं काही होत नाही" अशी त्या पसार्‍यामागची कहाणी तिने ऐकवली.

संध्याकाळी ती मला क्लबहाऊसला पूर्वनियोजित कार्यक्रमाला घेऊन गेली. मी सिल्क साडी नेसल्यावर वाटेने जाताना ’आता वाटतेस तू भारतीय, मला नेसवशील का एकदा साडी, ही सुटण्याची भिती नाही का वाटत, रोज नेसावी लागते का तिकडे साडी, तुझी सासू पण नेसते का, मुलगी नेसेल का, त्यांच्या छोटया साड्या मिळतात का, केवढ्याची असते ही" असा तिचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. सासू रोज नेसते, मी क्वचित, मुलगी लग्नात नेसेल बहुतेक, शंभर रू.पासून काही हजारांपर्यंतही मिळते इ. उत्तरे मी दिली. तेव्हा शिल्पा शेट्टीचं हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गीअर ने जाहीर कार्यक्रमात चुंबन घेतल्यामुळे भारतात बराच गदारोळ झाला होता. (ती रिचर्डची फॅन) तुमच्याकडे सिनेमात हे चालतं का? असेल तर मग प्रत्यक्षात केलं तर तिने का नाराज व्हावं असं मला लिनने विचारल.. व्यावसायिक नटी ही प्रत्यक्षात 'available' असते असा चुकीचा संदेश यातून जातो म्हणून ही निदर्शनं झाली असं मी तिला पटवून सांगितलं...आणि मग तेव्हा तरी शिल्पा शेट्टी आणि भारतीय संस्कृती याची सांगड मला घालावी लागली.


सकाळी उठून मी किचनमधे गेले, लिनचा कॉफी करताना फोटो काढला तेव्हा दचकून तिने ’बरं झालं देवा, मी मेकअप केला होता..’ (साडेसहाला !!)अशी अस्फुट किंकाळी फोडली. थोड्या वेळाने खाली उतरलेल्या तिचा नवरा चार्लीशी ओळख करून दिली, मी त्याला भेटीदाखल गांधींचं ’सत्याचे प्रयोग’ दिलं. (त्याची वाचनाची आवड तिने कळवली होती) त्याबद्द्ल आभार मानून त्याने लगेच मुलींचा डबा (पुन्हा काश!!!:)-मी मनात) म्हणजे पीनट बटर सॅंडविच करून फॉईलमधे गुंडाळलं, क्लेअर ते घेऊन आणि मला ’हाय’ व ’बाय’ करून गेली देखील. कॅल्सी काहीतरी चघळत लोळत टीव्ही पाहत होती (हिचे उच्चार काही मला आणि माझे तिला..शेवटपर्यंत समजले नाहीत पण ती फार गोड हसायची). मी तयार होऊनच खाली उतरले होते, लिन म्हणाली "चल, मी तुला तुझ्या आजच्या कार्यक्रमाला नेऊन पोचवते." तिने डिकीत रंगाचे डबे,बटणाने लांबी कमी जास्त होणारे ब्रश, घडीची शिडी असे काही बाही सामान टाकले, एक जुनी रंग सांडलेली हाफ पॅंट घातली आणि आम्ही निघालो. मला आमच्या ग्रुपमधे सोडून ती तिच्या रंगकामाला पसार झाली. आम्ही एक विद्यापीठ, कॅथेड्रल वगैरेंना दिवसभर भेटी देऊन डिनर करून परतलो तेव्हा लिन अप्रतिम पोषाखात हसर्‍य़ा चेहर्‍याने गाडीजवळ उभी होती, "दमलीस का?" म्हणत तिने जवळपास मला उचलूनच गाडीत ठेवले. खरं तर ती एक सबंध घर (आतून) रंगवून आली होती.. एमबीए केलंयस मग हा विचीत्र व्यवसाय का निवडलास ,विचारलं तर म्हणाली "मला आवडतो म्हणून! पुढे बदलीन सुद्धा!" (आता लिन स्टेशनरीच्या व्यवसायात आहे)

रात्री मी खोलीत गेले तर टेबलवर एक चिट्ठी ’मला तू फार आवडलीस..तुझी लिन’. आपण अशी कबुली एखाद्या व्यक्तीला सहज नाही देऊ शकत, नाही का!

लगेचच व्होकेशनल डे होता त्यामुळे नेटवर्कींग बघायला मी फिलाडेल्फियातल्या काही कंपन्यांमधे जाऊन आले, आमचे दुपारचे जेवण तर तिथल्या शाही क्लबमधे होते. चांदीचे काटे चमचे वगैरे.. संध्याकाळी लिनला मी त्याचं वर्णन सांगताना म्हटलं ’एखाद्या पिसांची हॅट घालून झगा फलकारत येणा‍र्‍या राणीचीच काय ती कमी होती’. (मग पुढच्या प्रत्येक जेवणाबद्दल लिन ’was it a 'queen coming’ luncheon?' असं हमखास विचारी). तिने मला झुम्पा लाहिरी लिखीत आणि तब्बू अभिनीत ’द नेमसेक’ पाहिल्याचे सांगितले. अमेरिकेतील वास्तव्यासाठी तडजोड करणार्‍या कुटुंबाची ती कथा आणि त्यातली सांस्कृतिक दुविधा व मुळांपासून दुरावण्याची व्यथा तिने इतक्या छान शब्दात मांडली की मी (पुलाव करता करता) ऐकतच राहिले. ती म्हणाली की अक्खी अमेरिका अशीच आहे, कुणी आयरिश कुणी इटालीयन कुणी मेक्सिकन but we say we are american.

रात्री आमच्या गप्पा उर्फ ’भारत को जानो’ कार्यक्रम सुरू असायचा. जाण्याआधी झालेल्या कार्यशाळेमुळे आमचे ’FAQ’ अगदी घोटून तयार होते तरी सांस्कृतिक फरकामुळे काही वेळेस समजावून सांगताना माझी ’फॅ फॅ’ उडायची :) उदा: जेवणाआधी त्या सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून एकत्र एक प्रार्थना म्हटली. मी ही नंतर हात जोडून ’वदनी कवळ’ म्हटले. लगेच त्यांनी अर्थ विचारला... मी सार नीटच सांगितले पण ’पूर्णब्रह्म’ वगैरे...! माझी पंचाईत होतेय हे लक्षात आलं की ती मिस्कील हसायची...आणि ’ok ok ,got the essence’ हा मग आमचा परवलीचा शब्द झाला.

चार्ली आपल्या राजकारणाबद्दल विचारायचा.. भारताशी संबंधित ’मुंबई, गांधी आणि नमस्ते’ हे तीनच शब्द त्यांना त्याआधी माहीत होते. आपल्याला मात्र त्यांच्या हॅलोविन पासून सबवे पर्यंत आणि बोस्टन टी पार्टी पासून मोनिका ल्युएन्स्कीपर्यंत सगळं कसं माहीत याचं त्यांना प्रचंड आश्चर्य वाटायचं.. ते दोघे पक्के डेमोक्रॅट. तेव्हा तिकडे ओबामा आणि हिलरी च्या जंगी प्रचारसभा सुरू होत्या. बुश सरकारला फक्त ओरबाडून खाणं माहीत होतं म्हणून अमेरिका समृद्ध असली तरी समाधानी नाही असं ती सांगायची. माझ्यासाठी तिने ’इंडीया एब्रॉड’ वाचायला आणलं होतं. वृत्तपत्रात एकाच वेळेला ऐश्वर्या-अभिषेकचं पंचतारांकित लग्नं आणि दुसरीकडे भारनियमनाच्या बातम्या.. How do you manage to live between extremeties? असं ती विचारी.

चौथा दिवस असेल. ठरलेले कार्यक्रम उरकून अगदी थकून मी घरी आले तर लिन मंद प्रकाशात रेड वाईनचे घुटके घेत सुडोकू सोडवत बसली होती. क्लेअर अजून आली नव्हती त्यावरून डेटींगचा विषय निघाला. लिन म्हणाली "मी तिला सांगितलय की, कार तू आताही चालवू शकतेस पण सरकार परवाना देत नाही. कारण त्यासाठी हवी असलेली समज तुझ्याकडे नाही, अपघाताचा धोका जास्त, डेटींगचही तसच आहे." मग तिला तिचे डेटींगचे दिवस आठवले, दोघांचाही एक एक प्रेमभंग उर्फ अपघात झालेला मग चार्ली कसा भेटला...दर वेळेला लाल ऐवजी पिवळाच गुलाब कसा देत असे असे काही काही किस्से सांगताना तिला एकदम आपल्या ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीचे कोडे पडले. तू लग्नाआधी नवर्‍याला किती वेळा भेटलीस? मी म्हणाले ,'एकदोनदा'. मग ती म्हणाली "आणि लग्न करून या (एकदोनदाच भेटलेल्या) माणसाच्या तू थेट घरीच राहायला गेलीस?" मी म्हणाले "असच असतं आमच्यात :)" (ती बेशुद्ध पडू नये म्हणून मी तेव्हा घरात आजेसासू-सासरे यांच्यासह ९ माणसे राहत होती हे सांगितले नाही) ती माझ्याकडे अशी काही पाहत होती की मला आपण पानं गुंडाळलेली आदिवासी स्त्री आहोत असे वाटू लागले. मग मी तिला विचारले "तुम्ही पारखून घेऊन लग्न करता ना, मग तरी ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर का मोडतात. मला वाटतं, नाती आणि त्यांचा टिकाऊपणा या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत. कोणाची पद्धत योग्य आणि कोणाची अयोग्य हा मुद्दाच नाही, तुमचे विचार, विश्वास आणि शेवटी नशीब यावरच त्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं."

लिन कधी कधी तिच्या मुलींना कामाच्या जागी घेऊन जात असे.. take your kid to work at times म्हणजे त्यांना कष्टाची कदर होते असे तिचे म्हणणे. त्याआधी तिची धाकटी मुलगी ATM मधे विचारायची ’is there enough money in the 'wall' to buy this?'. मी पाचव्या दिवशी ’आमिश ’खेड्याला भेट देऊन आल्यावर तर तिने त्यांची ’निसर्गाकडे नेणारी जीवनपद्धती’ मुलींना पुढे बसवून माझ्याकडून ऐकायला लावली. ते अमेरिकेत राहूनही कार न वापरता आणि TV न पाहता जगतात कसे याचे त्या मुलींना कोडे पडले होते.

माझी जुळी मुलं कशी वागतात, भारतीय पालकत्वाच्या कल्पना काय याबद्दल लिन विचारायची.. मी न सांगताही मला घरची, मुलांची आठवण येते आहे हे ओळखायची. मग मी तिला शिकवलेला इंडीयन टी(उकळून) करून आणायची अन नि:शब्द बसायची किंवा कधी मी तिला ५/७ मराठी वाक्य शिकवली होती ती भयंकर उच्चारात (मॅला बुक ल्हागली, दन्नावाद वगैरे) बोलून मला हसवायची. मग मला म्हणावं लागायचं ’ok ok ,got the essence’.


अक्रोड, मध वापरून केलेला गोड पिझ्झा ही तिची खासीयत.. मी निघायच्या आदल्या रात्री माझी भेट व्हावी म्हणून तिने सासूसासर्‍यांना जेवायला बोलावले होते... तिच्या सासूने तिच्या पहिल्या प्रसूतीनंतर बाळाला पाहण्याआधी माझी सून कशी आहे असं विचारलं होतं आणि लिनला कायमचं जिंकलं होतं. त्यांना काही दिवसांनी old age home मधे जावं लागेल याची तिला खंत वाटायची (पण त्यांच्यात तसच असतं.. आणि खरं तर अलिकडे आपल्यातही) आता तर ते खूपच थकलेत. त्यांच्याबद्दल तिने मधे एका मेल मधे लिहिलं होतं We are what is known as the Sandwich Generation - we are still raising our own kids, but we are trying to help, care for our parents.

तर ते येणार म्हणून मी तिला माझी साडी नेसवली. ब्लाऊज ऐवजी काळा स्लीव्हलेस टीशर्ट घालून, साडीचा पदर हातावर घेऊन ती राजकन्येच्या तोर्‍यात जिन्यावरून खाली उतरली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चार्लीने तिचं want to marry you again वगैरे म्हणत अमेरिकन पद्धतीने कौतुक केलं. आम्ही एकमेकांना भेटी दिल्या.

सकाळी निरोप घेताना चार्लीला मी राखी बांधली, त्याचा अर्थ सांगितला. दौरा संपण्याच्या दिवशी आम्ही पुन्हा भेटणार होतो तरीही त्यांचे घर सोडताना माझे डोळे पाणावले. लिन माझ्याकडे पाहतच नव्हती.. चार्लीनेच मला ठरल्या जागी पोचवले. नंतर पुढचा प्रवास, अनुभव, वेगवेगळ्या होस्टसचं आतिथ्य, आम्ही पाहिलेली स्थळं सगळं मी तिला फोनवर सांगायचे किंवा मेलमधे लिहायचे. माझी कार्यक्रम पत्रिका तिने किचनमधे डकवून ठेवली होती. मैत्री सहवासातून फुलते हे खरं असलं तरी ती सहवासाच्या लांबीवर अवलंबून नसते. नाहीतर फक्त एका आठवडयात माझ्यात आणि लिनमधे हा अनोखा बंध निर्माण झाला नसता. लिनच्या शब्दात सांगायचं तर "I especially remember the times we sat in the living room talking after Charlie and the girls went to bed. We learned so much about each other's lives and beliefs. It doesn't matter to me how long we go between returning emails....we are friends for life! "

Friday, December 11, 2020

कभी धूप,तो कभी छाव

 आपल्यापैकी बऱ्याच जणांना  संगीताची आवड असते. त्यातल्यात्यात "गाणी ऐकणं" हा बहुतेकांचा छंद असतो.  सुमधुर संगीत नेहमीच हौशी मनाला आनंद आणि उ भारी देत असतं. एका वेगळ्याच विश्वात नेऊन  ठेवत असतं. काही गाणी तर अशी असतात, त्यातील शब्द धड समजणारे नसतात, अर्थ देखील असतोच असे नाही;पण चाल, रिदम, आणि एकूणच ती गाणी ऐकल्यावर माणूस त्यात रंगून जातो. काही गाणी मात्र आयुष्याचा सारा सारच सांगून जातात  .पुस्तकी ज्ञान नसलेल्या बहिणाबाई "अरे संसार, संसार म्हणत पूर्ण संसाराचं तत्वज्ञान सांगून जातात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर---- चटके,मग ते अग्नी चे असोत, उन्हाचे असोत वा दुःखाचे--- तव्याचा चटका लागल्याशिवाय भाकरी ची  गोडी कळत नाही, तसेच दुःखाचे चटके सोसल्याशिवाय सुखाची चव चाखता येत नाही,हे त्या शाळा कॉलेजात न गेलेल्या बाईने किती सहज सांगून टाकले. आयुष्य हे चुलीवरल्या कढइतले कांदे पाहे म्हणत म्हणत काही गाणी "जिदगी के रंग कई रे " म्हणत जीवनाची सफर घडवून आणतात,तर काही गाणी "जिंदगी, कैसी है पहेली हाये, कभी ये हसाये, कभी ये रुलाये---"म्हणत  वास्तवाची जाणीव करून देतात . तर काही "सुख दुःख दोनो, असलेल्या जीवनाच्या नावेची ओळख करून देतात.  थोडक्यात, जीवनात सुख,दुःख, आशा,निराशा हे खेळ सतत सुरूच असतात.. अशी कितीतरी उदा. देता येतील; पण हल्ली माझ्या मनात  घोळत असलेलं आणि माझ्या मनाचा ताबा घेतलेलं असं गाणं म्हणजे "आशा" सिनेमातील----

"अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है
कोई लुट जाता है
कोई लूट जाता है----"हे गाणं.
 किती यथार्थ ओळी, नाही? प्रत्येकाचं प्राक्तन वेगळं, प्रत्येकाचे भोग वेगळे, प्रत्येकाच्या वाट्याला येणारी सुख-दुःख वेगळी, आनंद वेगळा आणि येणाऱ्या अडचणी देखील वेगळ्या.    आपल्या हिश्यात जे , जसे येईल ते, तसेच स्वीकारावे लागते.  हे प्रत्येकाला समजते, पण उमगत नाही हेच सत्य आहे.  कुठलाही कठीण प्रसंग ओढवला, मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण झाली तर आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडणारे वाक्य म्हणजे, "हे माझ्याच वाट्याला का? , माझ्याच हीश्यात यायच्या होत्या सर्व अडचणी?   मीच कोणतं असं पाप केलंय, की कुणाचं काही घोडे मारलंय म्हणून माझ्या वाट्याला हे असलं काही यावं?-----वगैरे,वगैरे--  --- तेच आनंदात, सुखात असताना माणूस असे सहसा कधीच म्हणणार नाही की माझ्याच वाट्याला इतके सुखाचे क्षण का म्हणून?  हा असा आनंद, असे सुख जगातल्या प्रत्येक  व्यक्तीला मिळायला हवे. मग आपणच स्वतःचं समर्थन करून घेणार की शेवटी हा प्राक्तनाचा भाग आहे. ज्याचे भोग त्यालाच भोगावे लागतात.  असो. "आशा" मधलं  लता दीदींनी गायलेलं हे गाणं--- त्यातील ह्या आर्त ओळी मनाला स्पर्शून जातात. "
कोई लुट जाता है
कोई लूट जाता है ---" ह्यातील दोन्ही ओळीतील "लूट" हा शब्द परस्परविरोधी अर्थ असलेला, पण जगण्यातील अवघा अर्थ, सारांश सांगून जाणारा---
लुट --- कुणी लुटलं जातं, असहाय्य पणामुळे, तर कधी परिस्थिती मुळे, कधी स्वभावामुळे. मोठा मासा लहान माश्याला गिळतो, तसे कमजोर व्यक्ती नेहमीच बलशाली व्यक्तींपुढे लाचार ठरतात. कधी मनाने तर कधी शरीराने.  सर्वस्व गमावून बसायची वेळ येते,होत्याचं नव्हतं होऊन जातं---लुटलाच  जातो ना माणूस?
लूट--- हिसकावून घेण्याची, बळजबरी गोष्टी प्राप्त करून घेण्याची क्षमता असलेली माणसे असतात काही.  ते मागचा पुढचा किंवा योग्य अयोग्य असा कुठलाही विचार करण्या पलीकडे गेलेली असतात. एखादी गोष्ट हवी असल्यास कुठल्याही मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. ह्या गाण्यात जरी "संवेदनशील" मनाचा संदर्भ विचारात घेतला असला तरी शेवटी तो दोन परस्परविरोधी मानसिकतेत असलेला फरक आहे, हे लक्षात येते. कुणी लुटलं जातं तर कुणी लुटून नेतं---- अपना अपना हिस्सा है
अपना अपना किस्सा है-------

 हे झालं गाण्यांच्या संदर्भात. पण माणूस देखील कधी कधी नकळतपणे असं काही बोलून जातो की ऐकणारा अंतर्मुख झाल्याशिवाय रहात नाही.  क्वचित हेतुपुरस्सर तर क्वचित  अजाणतेपणी, पण विचार करायला भाग पाडतील अशी काही वाक्ये बोलली जातात.
 त्या दिवशी आम्ही उभयता आमच्या    कामानिमित्त रामदास पेठ मध्ये निघालो होतो. रस्त्याने जाताना ह्यांच्या मित्राच्या डॉक्टर  मुलांच्या हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन मिनिटं थांबलो, हे त्यांच्या मित्रांसोबत बोलले आणि आम्ही पुढे निघालो. मी सहजच म्हटले की ह्या लॉक डाउन च्या काळात चांगले काम लागले की तुमच्या मित्राला. बांधकामावर लक्ष ठेवण्याचे. लक्ष ठेवणेही होते आणि टाईम पास ही. त्यावर हे जे बोलून गेले त्यामुळे मी विचारात पडले. हे म्हटले, "तसेही उतारवयात बाप हा मुलाच्या घराचा  वॉचमनच  असतो." आम्हाला स्वतःला काही पूर्वानुभव असण्याची शक्यता नाही कारण आमच्या लेकाचे अजून लग्न व्हायचेय आणि आम्ही आमच्याच घरात वास्तव्यास आहोत.😊पण नकळतपणे जेव्हा अशी वाक्यं बोलली जातात,  तेव्हा त्यात खरोखर काही खोलवर अर्थ दडलेला आहे का  हा   चाळा ही मनाला लागून जातो. आणि मग सुरू होते, विश्लेषण--- आसपासच्या व्यक्तींविषयी, जवळच्या  नात्यांविषयी--- बाप आणि वॉचमन ? छे: कसंसच वाटतं नाही?  खरं सांगायचं तर कधी कधी "बाप" ह्या व्यक्तिरेखे विषयी कीव यायला लागते. कारण झाडून सारे कवी, लेखक, चित्रकार, "आई"च्याच प्रेमात बुडालेले असतात; पण बाप मात्र बहुतांशी दुर्लक्षितच असतो. त्याची मुलांवरची माया, प्रेम, काळजी करणं हे सगळं  पडद्याआड दडलेल्या कालावंतागत असतं. कदाचित त्याला मोकळेपणी, उत्स्फूर्तपणे व्यक्त होता येत नसल्यामुळे किंवा आपलं प्रेम बोलून दाखवता येत नसल्यामुळे म्हणा; पण तो कितीही झटत असला मुलांसाठी, तरी मुलांना आईची ओढ जास्त वाटते, तीच अधिक जवळची वाटते, हा बहुतेक घरातील अनुभव आहे.  आणि उतारवयात करण्यासारखे फारसे नसल्याने,शारीरिक  क्षमता कमी झाल्याने किंवा रिकामपण खायला येत असल्याने---अशा बऱ्याच कारणांमुळे तो आपला वेळ आवडत्या आणि नावडत्या कामातही घालवायला बघतो. ह्या सगळ्यात बाजारहाट करणे, नातवंडांना सांभाळणे, त्यांना बागेत खेळायला घेऊन जाणे, शाळेत नेऊन सोडणे, घराकडे आणि पर्यायाने नातवंडांकडे लक्ष देणे ही कामे ओघानेच अंगावर घेतली जातात, किंवा स्वखुषीनेही केली जातात; पण म्हणून का  तो        वॉचमन?😔  असा विचार येताक्षणी मला नजरेसमोर  "ह्यांचा " लेकाच्या दाराशी केविलवाणे होऊन बसलेला  चेहरा दिसायला लागला आणि अगदी भडभडून आले. छे:  आयुष्यभर रुबाबात राहिलेला, स्वतःच्या मनाने  ,स्वतःच्याच मर्जीने जगलेला माणूस, मग तो कुणी का  असेना, अगदी कुणीही---- शेवटपर्यंत त्याला मानानेच जगता यायला हवं,  वॉच मन ही कल्पनाच खूप विसंगत आहे. मी घरी आल्यावर निवांतपण असताना हे सगळं बोलून दाखवलं ह्यांच्या जवळ,तर खो खो करून हसायलाच लागले. 
"अरे देवा! धन्य आहेस बाई तू. कुठला विषय कुठे नेतेस? अग, मी तर अगदी सहजच बोलून गेलो." 
 मी पण  मनातल्या मनात कबूल केलं  ,"मला पण तर सवयच आहे ना, विनाकारण डोक्याला हात ?? मारून घयायची🤦‍♀️नव्हे, काम लावून घयायची.  आदत से मजबूर, काय करणार?"
 🙆‍♀️😔😃 असो. 

 आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. सरळ, साधं आयुष्य क्वचितच कुणाच्या वाट्याला येतं. हार-जीत, यश-अपयश, सुख -दुःख--सारख्याच ताकदीने पेलायला नी पचवायला मनही खंबीरच हवं. दुसऱ्याला सांगणं जितकं सोपं तितकंच स्वतः आचरणात आणायला कठीण अशा ह्या गोष्टी असतात. 
 असो.😊
तर एकंदरीत हे असं आहे. कुठल्या गाण्यावरून, कुठल्या वाक्यावरून मन कुठे कुठे उड्या मारून येईल आणि कधी  कशावर डोके आपटून घेईल, नेम नाही. तुमच्या बाबतीतही होतं का हे असं? कारण नसताना, फेरफटका?😃
 माणिक

Sunday, November 15, 2020

" *ढ*" (ढ - ढोकळ्याचा)

 " *ढ*" 

       (ढ - ढोकळ्याचा) 
ढोकळा आणि मी आमचं पूर्व वैमनस्य असावे अशी खात्री पटायला लागली आता माझी. केव्हाही, कितीही काळजी घेतली तरी तो काही नीट होत नाही. कधी रुसून चपटा होतो तर कधी अति उत्साहात उतू जातो.
इडली, डोसे आणि माझं अनेक वर्षांपासून मैत्र आहे. जीवाभावाचे इडली, डोसे नेहमीच मला साथ आणि हात देत आले आहे. ढोकळ्याची मनधरणी करावी लागेल जरा. एरवी सुगरणपणाच्या (सुरळीच्या वड्या, पुरणपोळी, जिलबी, समोसे इ. इ. इ.) कसोटीत पास होणारी मी ढोकळ्यापुढे पूर्ण शरणागती पत्करली आहे.

 रेसिपीतल्या आणि मैत्रिणींनी दिलेल्या टिप्स चे काटेकोर पालन करूनही यावेळी पण दगाफटका झालाच.
तर झाले असे की गृपवर एका मैत्रिणीने केलेल्या ढोकळ्याचा चवदार फोटो बघून आणि ढोकळा याविषयी चॅटिंग करून, वाचून ढोकळ्याच्या पिठासारख्या फसफसलेल्या उत्साहाने मैत्रिणीला विचारून डाळ, तांदूळ भिजवले. मारे मैत्रिणीला भिजवलेल्या डाळ तांदूळाचा फोटो टाकला आणि लिहलं wish me ढोकळा छान होऊ दे. तिने मला शुध्द मनाने शुभेच्छा दिल्या. (ही मैत्रिण ढोकळा एक्सपर्ट आहे) पण हाय रे मेरी किस्मत! ढोकळा पात्राच्या थाळ्या काही केल्या सापडेना. थाळ्या शोधण्याची ही दुसरी वेळ होती. सामान  unpack करतांना कुठे ठेवल्या होत्या आठवेच ना, म्हणून माझे ढोकळा करणे आपोआपच बंद झाले होते, नव्हे मी जाणूनबुजून तिकडे दुर्लक्ष करीत होते. तसही बिघडतो म्हणून  मला काही उत्साह पण नव्हता करण्यात. पण पुन्हा एकदा मैत्र करून पहावे म्हणून भिजवले होते. डाळी तांदूळ भिजवायच्या आधीच मोठी थाळी कढईवर बसवून खात्री करून घेतली की यात ढोकळा शंभर टक्के होणार. मगच भिजवले. plan A आणि plan B असे दोन्ही plan तयार करुनच  पुन्हा एकदा कुठलाही धोका होऊ नये म्हणून ढोकळा पात्राच्या खास थाळ्या शोधत होते. अतिशय काळजीपूर्वक, सोयीच्या ठिकाणी, सहज हाताशी सापडतील अशा जागी मी त्या थाळ्या ठेवल्या होत्या आणि पार विसरले.  
शोधून कंटाळले आणि कढईत पाणी घालून एका दुसर्‍या मोठ्या थाळीत वाफायला ठेवला.... (Plan A) full confidence के साथ । पण ढोकळा बडा धोकेबाज निकला रूसून चपटाही झाला नाही आणि उत्साहात ओसंडून वाहीला पण नाही यावेळी नवीन प्रकार आरंभला शिजायचे नाव नाही बेट्याचं! मला ते अर्धवट शिजलेले पिठाचे काय करावे सूचेना. काढून 'कुकरात' शिजवता येईना.  काही सूचत नव्हते. सकाळी नाश्त्यासाठी सुरू केलेला ढोकळा दुपारच्या जेवणात पण तयार होऊ शकला नाही... शेवटी नाद सोडून दुपारी वामकुक्षी घेण्याचा प्रयत्न केला पण झोपेतही तेच न शिजलेला ढोकळा!

शेवटी उठले आणि जसा जमेल तसा कुकरच्या डब्यांमध्ये भरला आणि शिजवला एकदाचा कसाबसा. सुबक वड्या त्यावर खमंग फोडणी सगळं सगळं स्वप्नवतच राहीले. मग ते शिजलेले ढोकळ्याचे पिठ थंड झाल्यावर अलगद मिक्सर ला फिरवून त्यातले गोळे मोकळे करून घेतले.... आणि कढईत आपण उपमा करतो तशीच खमंग फोडणी करून पाण्याचा शिपका मारून मस्तपैकी वाफ दिली... आणि प्लेटमध्ये कोथिंबीर घालून सर्व्ह केली... नवीन नावाने ढोपमा! पण चवीला मात्र खरचं छान लागला. मग दुसर्‍या दिवशी त्यात कांदा घातला फोडणीत मग तर अजून छान झाले. अशा प्रकारे काही वाया गेले नाही यातच मला समाधान! पदार्थ जर बोलू लागले तर ढोकळा  नक्की *" ढ "* गोळा म्हणून मला हसेल... काय साधा ढोकळा नाही करता येत? त्या दिवशी ढोकळ्याचा "ढसका" (धसका) घेतला मी आणि पुन्हा कधीही त्याच्या वाटेला जायचे नाही असे ढामपणे (ठामपणे) ठरवले. ज्या ढोकळा थाळ्या न सापडल्याने इतका मनःस्ताप आणि कष्ट मी सहन केले ते एकदिवस साफसफाई करताना ओट्याच्या वरच्या कपाटात अचानक सापडल्या .... माझा आनंद थाळीत मावेना... माझा ढामपणा डळमळीत झाला आता ढोकळा पिठासारखाच माझा ढोकळा करण्याचा उत्साह फसफसून आला आहे... बघूया कधी मुहूर्त लागतो ढोकळा करायला.... 
अंजली

"रुजण्या" वरून सहजच


 मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट सिस्टिम मध्ये त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस. आमच्या गॅलरीतून त्यांची विरुद्ध बाजूची गॅलरी व्यवस्थित दिसते. सुंदर सुंदर फुलं बघून मन प्रसन्न होतं नेहमीच.  त्यांच्या गॅलरीत सतत कुंडयांची भर पडतांना दिसायची. शेवटी  इतक्या कुंड्या झाल्या की त्यांनी त्यातल्या  बऱ्याचशा कुंड्या गच्चीवर आणून ठेवल्या. आता गच्चीवरचं  फिरणं अजूनच प्रसन्न व्हायला लागलं. त्यात त्यांनी दोन मोठ्ठ्या थम्प्स अप च्या बाटल्यांना गोल गोल छिद्र करून त्यात माती भरली अन प्रत्येक छिद्रात ऑफिस टाइम (टेन ओ क्लॉक) ची एक एक काडी लावलेली. सकाळी 10 च्या सुमारास त्या राणी कलरच्या पिटुकल्या फुलांनी भरलेल्या बॉटल्स इतक्या सुंदर दिसायच्या की मलाही मोह आवरला नाही. मी त्यातल्या दोनतीन  काड्या तोडल्या अन आमच्या हॉल च्या खिडकीत एका छोट्याश्या बोळक्यात दिल्या टोचून.  पावसाळी हवा असल्याने म्हणा किंवा काय माहिती तीन चार दिवसातच  त्या इतक्या छान भराभरा वाढल्या अन त्या दिवशी बघते तर काय! तीन पिटुकली टवटवीत  फुलं मस्त डोलताहेत मजेत! सहजच  विचार आला मनात की  किती पटकन, विनासायास ही रुजली नवीन मातीत, नवीन जागेत. आणि इथेही उधळून देताहेत आनंद सभोवती. जागा बदलली, माती बदलली म्हणून कुठ्ठे कुरकुर नाही, खेद नाही, कुढणं नाही की नाखुषी नाही. गच्चीवर आनंदाची उधळण होतीच त्यांची अन तिथून उचललं तरी बहरणं सुरूच! आणि ह्याउलट  आपण केवढे सवयीचे गुलाम! अगदी सकाळच्या टूथपेस्ट पासून आपल्याला कुठ्ठे, कुठ्ठे म्हणून बदल सहन होत नाही. टूथपेस्ट तीच हवी, चहा तोच अन त्याच चवीचा आवडणार, दूध अमुक एकच, वर्तमानपत्राची सुध्दा सवय झालेली. बदलून बघितला की, “छे बुवा! हयात काही राम दिसत नाही. आपला नेहमीचाच बरा शेवटी” असंच म्हणणार हे पक्के! दिवसभरात कितीतरी गोष्टी असतात आपल्या “अमुकच हवं” वाल्या. अगदी सकाळच्या टूथपेस्टपासून  ते थेट  झोपायची जागा, उशी आणि पांघरूण पर्यंत सर्व! माणूस शेवटी सवयीचा गुलामच!  वाटलं ह्या टेन ओ क्लॉक ला गुरु करून कुठेही पटकन ऍडजस्ट होणं शिकायला हव माणसांनी. किती सोपं होईल सगळ्यांचं आयुष्य! 

अर्थातच सगळ्या परिस्थितीत स्वतःला सहज बदलवू शकणारेही बघतोच आपण आजूबाजूला. नक्कीच त्यांचे आयुष्य तुलनेने सहज, सोपे जात असणार ह्यात शंकाच नाही. रुजणं शब्दावरून मग सहजच मनात आले की अगदी जुन्या काळामध्ये मुलामुलींची फार लवकर लग्न व्हायची त्यामुळे बालवयातच सासरी आलेल्या मुलींना त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला रुजवून  घेणे तितकेसे कठीण जात नसे नंतर नंतर म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडा बदल झाला. मुलींची लग्न वयाच्या वीस-बावीस च्या वयात व्हायला लागलीत त्यामुळे थोडा त्यांना सासरी जमवून  घ्यायला किंचित वेळ लागू लागला पण तरीही लहानपणापासून शेवटी सासर हेच तुझं खरं घर आहे असं मनावर पक्क बिंबवले गेले असल्याने बहुतांश जणीनी हे सहज मान्य केले आणि विनातक्रार रुजल्या. त्यानंतरची पिढी म्हणजे सध्याची तरुण पिढी (आपल्या मुला-मुलींची पिढी) ह्यामध्ये आणखी थोडा बदल झाला आता मुलं किंवा मुली अजून जास्त परिपक्व झाल्यानंतर लग्न व्हायला लागलीत. कदाचित त्यामुळेही असेल पण “थोडं तुझं थोडं माझं” असं म्हणत व्यवस्थित संसार होतांना दिसत आहेत, (अर्थात अपवाद असताच म्हणा!) आजकालच्या मुलामुलींना हे तेवढं कठीण जात नाही कारण बहुतेक सगळीकडे राजाराणीचे संसार असतात. दोघेही समजदार पणा दाखवत  "थोडं तुझं,थोडं माझं" करत एकमेकांशी जुळवून घेत गोडीगुलाबीने, गुण्यागोविंदाने  राहतांना दिसतात. त्यात बहुतांश ठिकाणी दोघेही नोकरी करणारेच असतात. त्यामुळे खूप कमी वेळ एकमेकांच्या सहवासात राहतात. अर्थात स्वतंत्र मनोवृत्तीमुळे  थोडे फार संघर्ष अटळ असतात पण ते त्यांचे निभावतात. आणि ह्या पिढीमध्ये मुलांच्या विश्वामध्ये, संसारामध्ये आई-वडिलांनीही स्वतःला थोडं बदलवत रुजवून घेतलेलं आहे. यानंतरच्या पिढीमध्ये मात्र काय होईल सांगता येत नाही. मला तरी वाटतं "थोडं तुझं,थोडं माझं" असा सुवर्णमध्य न गाठता "तू तुझं नी मी माझं"  ह्या प्रकारात जर सर्व व्यवहार चालणार असतील तर बाकी कठीण आहे! कारण संसार सुरळीत चालण्यासाठी हे एकमेकांच्या विश्वात  “रुजणं” दोघांनाही व्यवस्थित जमलं तरच  संसार रुपी रोपटे छान सुंदर बहरणार हे नक्की ! अगदी टेन ओ क्लॉक सारखे !

तसं पाहिलं तर अगदी शाळेत पहिल्यांदा जाणाऱ्या  मुलालाही त्या नव्या वातावरणात रुजावंच लागतं आणि थेट रिटायर्ड झालेल्या आजोबांनाही नव्याने आपल्या स्वतःच्याच घरात पुन्हा रुजावंच लागतं! थोडक्यात काय तर रुजणं म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेता येणं! सध्याच्या आमूलाग्र बदललेल्या युगात सगळं नवीन तंत्रज्ञान नीट माहिती करून घेणं आणि वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य रीतीने वापर करणं म्हणजे तरी काय शेवटी? स्वतःला डिजिटली रुजवण्याचाच एक प्रकार ! आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांवर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जितकं सहज स्वतःला रुजवता येतं तितकं तुमचं आयुष्य कमीअधिक सोपं होत जातं हे निश्चित! रुजणं टेन ओ क्लॉक चं असो का तुमचं आमचं ! शेवटी तात्पर्य एकच हो!


Wednesday, October 14, 2020

अधीर झालोया, मग बधीर झालो

एक मुलगी परवा भेटायला आली. इंग्लिश शिकायचंय म्हणाली. कोर्सबद्दल चौकशी केली. मीही  तपशीलवार माहिती दिली. तिचा लगेच प्रश्न, " एका महिन्याच्या कोर्सनंतर मला पूर्ण इंग्लिश येईल ना? म्हणजे मी काहीही वाचू शकेन, समजू शकेन ना? आणि मी दुसऱ्यांना इंग्लिश शिकवू सुद्धा शकेन ना?"

मला हसावं की रडावं ते कळेना. 
आजकाल प्रत्येकाला सगळं काही इन्स्टंट हवं आहे. त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी आहे. पण कष्ट बिष्ट घेणे ही संकल्पना त्यांना माहीत नाही. संयम, धीर वगैरे शब्द त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार झाले आहेत. सगळं काही मनात येताच पुरं व्हावं अशी अपेक्षा नव्हे, मागणी आहे. 'आज आत्ता ताबडतोब' हा एकच काळ समजतो आहे, जाणवतो आहे. 

आज जगून घ्या, पुढचं कुणी पाहिलंय? यासारखे विचार सोशल मीडियावर व्हायरलच नव्हे, पॉप्युलर होत चालले आहेत. हा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या व्यक्तीने ज्या उद्देशाने मांडला असेल, तो फार वेगळा असावा. भूतकालाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर वागवणारे किंवा भविष्याची  सतत चिंता करत वर्तमानातील आनंद उपभोगू न शकणारे काही लोक असतात. त्यांनी आपल्या आणि इतरांच्या वर्तमान आनंदाची विनाकारण वाट लावू नये यासाठी असे विचार त्यांना सांगितले जातात. 

मात्र याचाही अतिरेक करणारे अनेक जण अवतीभवती असतात. याच अतिरेकी विचारसरणीचं बाय प्रोडक्ट म्हणजे इन्स्टंट चा आग्रह. एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणं, थांबणं यांना मान्यच नाही. साधं स्वयंपाक करताना सुद्धा पदार्थ शिजायला जो वेळ लागतो, तो द्यायची यांची तयारी नाही. मुलांना सगळं काही लगेच आलं पाहिजे, हे म्हणणारे यांचेच चुलतभाऊ असतात. आम्ही गावातल्या बेस्ट क्लास ला मुलाचं नाव टाकलंय, चांगले वीस हजार रुपये ताबडतोब भरलेत, मग तो साठ टक्क्यांवरून नव्वदवर लगेच पोहचला पाहिजे. यात त्या मुलाची बुद्धी, आकलनक्षमता, विषयाची आवड इ गोष्टी गौण असतात. मग पालकांची बुद्धी इ. चा तर विचारच करायचा नाही. पैसा फेको, तमाशा देखो, असं प्रत्येकच बाबतीत झालंय.

आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे ही केवढी जबाबदारी ची गोष्ट. मात्र त्यातही घाई. एकदा एका पालकत्वाच्या सेमिनारमध्ये मी पालकांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. एका पालकाने मला 'कमर्शियल आर्ट ' हे क्षेत्र मुलींसाठी कसं आहे आणि त्या क्षेत्रात त्यांच्या मुलीला नेमक्या काय आणि किती संधी उपलब्ध असतील याची माहिती मागितली. मी मुलीचा बॅकग्राऊंड, आवड इ ची चौकशी केली. त्यांनी मला तिची चित्रं (त्यांच्या भाषेत just a few sketches, showing her genius) दाखवली. मग "हा मोर बघा, मॅडम ,आणि ही तिची आवडती मांजर. विमान बघा कसलं काढलंय" इ सुरू झालं. मला त्यातलं काहीही ओळखता येईना. मात्र आपली चित्रकलेची समज इतकी कमी असेल, यावरही माझा विश्वास बसेना. शेवटी मी त्यांना विचारलं, 'ती सध्या काय करते' , तर त्यांनी अभिमानाने 'जस्ट सेकंडला गेलीय' असं सांगितलं. तरी मी निर्लज्जपणे "कुठे? जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये का?" असं विचारलं तर ती इयत्ता दुसरीत गेलीय आणि आत्तापासूनच करिअरची दिशा निश्चित करणं कसं आवश्यक आहे इ ज्ञान मज पामराला प्राप्त झालं. 

जी गोष्ट करिअरची, तीच लग्नाची. लग्न करायची घाई, मग ते मोडायचीही घाई. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यासाठी कितीतरी काळ लागतो, पण तेवढा वेळ आहे कुणाकडे? 
रस्त्याने दुचाकी चालवताना एवढा वेग, की जणू काही यांच्यावाचून भारत चीन संबंधातली आंतरराष्ट्रीय बैठक खोळंबलीय. मग कुणाला कट लागला, कुणी ज्येष्ठ नागरिक घाबरून गेले तर ते सर्व 'स्लो' असतात, हा निष्कर्ष निघतो. 

या अशा लोकांची मानसिकता आधी 'अधीर झालोया, मग बधीर झालोया' अशी होत चाललेली दिसते. मनोवेगाच्या वारूवर सैराट झालेले हे लोक आहेत. मीडिया आणि सोशल मीडिया मधून त्यांच्या विचारप्रवाहाला खतपाणी मिळतंय. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला सुरू आहे? 

नाही, मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे, फक्त मला अभ्यासपूर्ण उत्तर हवंय.

Tuesday, October 13, 2020

बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है.....???

 " फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अँड मोस्ट इम्पॉर्टन्ट इंप्रेशन " असं म्हणण्याच्या पद्धतीनुसार व्यक्ती नेहमीच आपलं इंप्रेशन जपण्याकरता स्वतःला टिपटाप ,नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते .आपणसुद्धा प्रथमदर्शनी कुठलीही व्यक्ती बघून पेहेराव, राहणीमान यावरून तिच्या  व्यक्तीमत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत असतो .  एखाद्या व्यक्तीचे कपडे , रंगरंगोटी  ,वेशभूषा - केशभूषा बघून काही एक मत आपलं त्या व्यक्तीबद्दल तयार होत असतं . गंमत म्हणजे कित्येकदा नावांवरून, आडनावावरूनही आपण व्यक्तीबद्दल मनातल्या मनात अंदाज बांधायला लागतो.  खरं तर हा आपल्या मनाचा एक वेगळाच खेळ असतो आणि कधी कधी आपण लावलेले अंदाज साफ चुकलेले आहेत असं नंतर आढळून येतं .मला व पु काळे यांच्या कथाकथनातलं एक वाक्य आठवतं की " ज्यांचं आडनाव पटवर्धन असतं ते एक्झॅक्टली  रीसबुडांसारखे का दिसतात ? " तर असंच आपण बांधलेल्या आडाख्यांचंही होतं .

           एकूणच काय तर समोर येणाऱ्या माहितीवरून आपण थोडंफार अनुमान लावण्याचा प्रयत्न करत असतो ,की एकूण हे व्यक्तिमत्व कसं असेल? म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करणं किंवा तिच्याबद्दल न बोलताच जाणून घेणं यासाठी देहबोली विज्ञानाचा उदय आणि विकास झाला आहे .त्यात आता एका नवीन संकल्पनेचा उदय गेल्या काही वर्षांपासून झाला आहे. ही संकल्पना आहे " डिजिटल बॉडी लैंग्वेज " नावाची. डिजिटल बॉडी लैंग्वेज म्हणजे काय ?आणि त्यावरून एखाद्या व्यक्तीबद्दल आपण अनुमान कसे लावतो ? याचे रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे व्हाट्सअपच्या डीपी वरून किंवा फोनच्या स्टेटस वरून आपण व्यक्तीबद्दल काही विशिष्ट अनुमान लावतोच की नाही?एखादी व्यक्ती हसतमुख,मनमिळावू असेल किंवा नाही हे एकदा पाहिलेल्या फोटोवरून ठरवण्याचा प्रयत्न करतोच की नाही?खरं तर आपण सर्वोत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आहोत असं भासवण्याचा प्रयत्न  कळत नकळत सगळेच करत असतात. भेटीतून असो की डीपी,फेसबुक प्रोफाईल असो ,फ्रेश दिसायला,खूष दिसायला सगळ्यानाच आवडत असतं.
               अलीकडे फोनचा डीपी, फेसबुकचे प्रोफाईल याबाबत लोक बरेच जागरूक असायला लागले आहेत,काळजी घेऊ लागले आहेत. विशेषतः युवापिढीत याबाबत खूप निरनिराळ्या  कल्पना  आहेत . मी माझ्या विद्यार्थी समूहामध्ये खूपदा असं बघितलं आहे की ,जेव्हा कॉलेजमध्ये  शांतता आणि एकांत असतो ,अशावेळी काही मुलं मुद्दाम कॉलेजला येतात , मग अंगणातल्या हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उभं राहून ; पिलरला टेकून किंवा चक्क  गाडीच्या सीटवर लोळून, गॉगल लावून ,गॉगल काढून, कमरेवर हात ठेवून ,वगैरे वगैरे फोटो काढले जातात आणि हे फोटो काढण्यासाठी मुलं आपल्याबरोबर आपल्या मित्रांनाही घेऊन येतात .आणि मग काढलेल्या फोटोतून त्यातल्या त्यात "  हॉट "  फोटो सिलेक्ट करून तो डीपी म्हणून,  फेसबुक स्टेटस म्हणून ठेवला जातो . त्याला अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळतात. पण हे समाधान दोन किंवा तीन दिवस टिकतं.आणि मग परत शांत वेळेला कॉलेज गाठावं  लागतं ,नवनवीन डीप्यांची सोय करण्यासाठी !! मी  जाता येता असे लडिवाळ  " सोहळे "अनेकदा पाहिले आहेत. युवा पिढी मधील मित्र-मैत्रिणी या फोटोंवरून खरोखरच एकमेकांबद्दल अंदाज बांधत असतात .तसही फोटो काढणार्‍या व्यक्तीला आपला टार्गेट ग्रुप माहित असतो .कोणासाठी हे फोटो स्टेटस मध्ये डीपी मध्ये ठेवले आहेत, याची त्या व्यक्तीला पूर्ण जाणीव असते. त्यांना खूप अपेक्षित फीडबॅक सुद्धा बरेचदा मिळत असतात.  पण त्यामुळे  होणारी गंमत अशी  आहे की " हॉट " नसणारी मुलंमुली सुद्धा " हॉट"  वाटू लागतात . तसंच कुटुंबवत्सल नसणारी व्यक्ती सुद्धा फार प्रेमाने कुटुंबातील व्यक्तींसोबत रहात आहे ,असा अंदाज लावता जातो .काही महाभाग(त्यांना खरंच या कला अवगत आहेत असे सन्माननीय अपवाद सोडून) स्टेटस मध्ये  स्वतःचं गाणं किंवा नृत्य टाकून आपण प्रचंड खूष असल्याचा संदेश देत असतात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अगदीच याविरुद्ध असते . डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान नेमक्या या तफावतींवर काम करतं.कधी पुस्तकांचा ढीग फोटोत दिसतो ,तर कधी घाम येईपर्यंत व्यायाम केल्याचा अविर्भाव असतो.पण खरंच दमछाक होईल इतका अभ्यास,व्यायाम केला असतो का? तर मुळीच नाही! खरीखुरी चित्रणं यात नसतात बोचदा.मला तर आज पर्यंत कोणतीही व्यक्ती डीपी किंवा स्टेटस मध्ये नाराज किंवा उदास पाहिल्याचंही आठवत नाही. याचा अर्थ असा आहे का की कोणीच नाराज किंवा उदास कधीच नाही ? प्रश्नच आहे खरा! . " भावासाठी क्काssय पन " असं स्टेटस ठेवणारा मुलगा प्रत्यक्षात आपल्या भावाशी,मित्राशी  कडकडून भांडणारा असू शकतो . " रिलेशनशिप्स आर मोअर इम्पॉर्टंट  दॅन इगोज्  " असं स्टेटस् ठेवणारा माणूस प्रत्यक्षात मात्र भयंकर  रागीट- अहंकारी आणि त्यामुळे नाती तोडून टाकणाराही असू शकतो.  कडेवर-  खांद्यावर आपल्या छोट्या मुलीला घेऊन हौसेनी फोटो काढून तो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवणारा माणूस, आपल्या मुलीच्या संगोपनाची,तिला सांभाळण्याची जबाबदारी घेत असेलच, असं सांगता येत नाही. लॉकडाऊनच्या काळात तर केर काढण्याचे ,स्वतः चहा करत असल्याचे - स्वयंपाक करत असल्याचे फोटो(विशेषतः पुरुषांचे) मुद्दाम स्टेटस मध्ये किंवा फेसबुक वर शेअर केले गेले . याचा अर्थ ही माणसं घरातली जबाबदारी घेत असतीलच असं सांगता येत नाही . " नाssssद  नाssssय  करायचा!!  " असं स्टेटस ठेवणारी माणसं प्रत्यक्षात भित्रट,पळपुटी नसतील  हे कशावरून?  पुलंच्या कथाकथनात एक किस्सा आहे की, त्यांच्या मित्राने ट्रीपला गेल्यावर , नेपाळी गुरखा लोक जवळ ठेवतात तशी कुकरी आणली ! पु लं यावर मिष्कील  टिपणी करतात,"  की पोस्टमनला पाहून चळाचळा कापणारा आमचा हा  मित्र या कुकरीचं काय करणार आहे ? हे देवच जाणे! पण येता-जाता ज्याला-त्याला ती कुकरी दाखवून शूरपणाचा आव आणून त्यानी आम्हा सगळ्यांना मात्र अगदी वात आणला होता !"  अगदी अशाच प्रकारे मैत्रीचा ,सिंसियर असल्याचा, कुटुंबवत्सल असल्याचा ,आणि विशेषतः खूप आनंदी असल्याचा मुखवटा घालून , तसं भासवून माणसं कधीकधी वात मात्र खरंच आणत असतात. डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान या खऱ्या खोट्याची शहानिशा सहजतेनी करू शकतं.  खऱ्याखुऱ्या भावना फोटोत चित्रित केल्या असत्या, आणि त्यासकट फोटो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवले असते, तर सुशांतचं उद्या  काय होणार आहे?  हे आदल्या दिवशीच्या त्याच्या फोन स्टेटस वरूनच आपल्याला कळलं नसतं का? यावरून आपण नक्कीच विचार करू शकतो.


              काही लोक उधार उसनवार स्टेटस ठेवतात .एकदा मी माझ्या मैत्रिणीचे स्टेटस वाचले त्यात सुंदर अशा निसर्गदृश्याखाली काहीतरी मनाला स्पर्श करणारा मेसेज लिहिला होता. मात्र मी त्या फोटोवर बोटे टेकवून थोडं स्क्रीनवर हलवून पाहताच वरच्या भागात मला माझ्या मैत्रिणीच्या  नावाबरोबर " राजा ,नागपूर " अशी अक्षरं ओव्हरलॅप झाल्यासारखी  दिसली .मी माझ्या मैत्रिणीला
," राजा ... फ्रॉम नागपूर कोण आहे ? "असं विचारताच ती भडकली.  मी तिची मैत्रीण असताना ,तिला न सांगता, मी तिच्या  ओळखीच्या "  राजा ,नागपूर "  ला कसं काय ओळखते? असं वाटून ती माझ्याशी कडकडून भांडायला लागली.मी शांतपणे जरा वेळ तिचं आकांडतांडव ऐकून घेतलं आणि  हसून तिला सांगितलं की " राजा कोण हे मला माहीत नाही,पण त्या  राजाचं स्टेटस तुला आवडलेलं दिसतंय . कोणाचं आवडलेलं स्टेटस , स्वतःच्या फोनचं स्टेटस म्हणून  ठेवायचं असलं , तर, स्क्रीनशॉट काढल्यावर निदान नीट  क्रॉप तरी करायला नको का? तुझं स्टेटस पाहून ते तुझं नाही तर  कुठल्याशा राजाचं आहे,हे कळतंय ना सुंदरे !! "  तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं ,की मला काय म्हणायचं आहे !                     
                एकदा एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी एका व्यक्तीच्या स्टेटस मध्ये पाहिला, त्याचीही गोष्ट सांगूनच टाकते.  ऑलरेडी लावलेलं आणि छान वाढलेलं,आळं करून ठेवलेलं झाड होतं ते ,ज्याच्या जवळ ही व्यक्ती पोझ देऊन  " फावडं "  घेऊन उभी होती. आणि खाली वाकून ती समोरच्या मुलांना विचारत होती की "रेडी का रे? "  मग व्हिडिओमध्ये न दिसणाऱ्या मुलांचे,  "हो हो "  असे आवाज आले . आणि मग वृक्षारोपणवाल्या व्यक्तीने जीव नसल्यासारखं उगाच काहीतरी जमिनीला त्या फावड्याने खाजवायला सुरुवात केली . लगेच वर पाहून " झालं का रे?" असं पण विचारलं .पुन्हा मुलांनी " हो " म्हटलं .आणि व्हिडिओ बंद झाला. हा व्हिडिओ निदान  थोडा एडिट करायचा, किंवा आपण व्हिडिओ लोकांसमोर पाठवतोय  तर निदान स्वतःच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरतं तरी नीट वागायचं नं?  एवढं सुद्धा भान व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीला नसतं का?   यातून तुम्ही किती नाटकी आहात हे देखील कळतं आणि तो नाटकीपणा झाकायचा तुम्ही प्रयत्न सुध्दा करत नाही आहात, हे देखील कळतं .
       म्हणूनच या जगाला " आभासी जग " असा शब्द देणार्‍याचं कौतुकच केलं पाहिजे. एकूणच हा सगळा वरवरचा मामला आहे, आभासाचा पसारा आहे . ज्याला या आभासी जगातलं व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षातलं व्यक्तिमत्त्व यातलं अंतर कळत नाही, त्याची फसगत नक्की होऊ शकते.

 
          हा आभासाचा पसारा जरा तरी आवरता यावा म्हणूनच डिजिटल बॉडी लैंग्वेज नावाचा अभ्यास उदयाला आला असावा .डिजिटल बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही डिजिटल माध्यमातून जगाला कसं दिसण्याचा किंवा काय भासवण्याचा प्रयत्न करत आहात , त्याचा तर अभ्यास केला जातोच ,पण सत्यता - वास्तव आणि आभासी चित्र यातील गॅप्स शोधण्याचा प्रयत्नही केला जातो.  उदाहरणार्थ हसर्‍या चेहर्‍याकडे बघतांना व्यक्तीच्या ओठांची टोकं वर वळली आहेत का? आणि डोळे जरा बारीक होऊन डोळ्याभोवती हलकी तरी रेषांची जाळी दिसते आहे का ? यावरून फोटोतील स्मितहास्य हे खरंखुरं हास्य आहे की नुसतं " स्माईल प्ली    ssssज " वालं हास्य आहे , याचा पत्ता अभ्यासकांना बरोब्बर लावता येतो. उभं राहण्याची पद्धत कशीही असली तरी हात कसे आणि  कुठे ठेवले आहेत ? हाताची बोटं,हालचाली, चेहऱ्यावरचे भाव , डोळे या सगळ्या गोष्टीं एकमेकांशी मॅच होत आहेत  किंवा नाही ? यावरून व्यक्तीच्या संदेशातील खरेखोटेपणा शोधता येतो .
      डिजिटल बॉडी लँग्वेजचे अभ्यासक डिजिटली प्रदर्शित केलेल्या छबीचे नीट विवरण करू शकतात. याबरोबरच  लॅपटॉप वापरताना सुद्धा एखादी व्यक्ती कुठल्या पद्धतीने बोटं कि-बोर्ड वर फिरवते, किंवा टेबलावर तिनी तिचं कोपर कसं टेकवलेलं असतं ,किंवा स्क्रीन वरचे मेसेज वाचताना व्यक्तीचे चेहऱ्यावरचे भाव कसे कसे असतात , या वरून सुद्धा डिजिटल लैंग्वेज अभ्यासकांना एकूण एक पत्ता व्यक्तिमत्वाबद्दल लागत असतो.  एखाद्या ई मेल किंवा मेसेजला व्यक्ती काय उत्तर देते किंवा उत्तरच देत नाही किंवा उत्तर द्यायला किती वेळ घेते यावरून सुद्धा अभ्यासक अंदाज लावतात ,आणि निष्कर्ष काढतात. एखाद्या व्यक्तीचा व्हीडीओ  बारकाईने पाहून, त्यातल्या व्यक्तीच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव, डोळे बघून , त्या व्यक्तीबद्दल एक ठाम मत तयार करू शकतात.  कार्पोरेट सेक्टरमध्ये तर आता इंटरव्यू पॅनलवर डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी करणारा माणूसही असतो. तो उमेदवाराच्या ईमेल आयडी मध्ये किती स्टार्स,कोणते नंबर्स आहेत, इथपासून तर उमेदवाराच्या फोनच्या, फेसबुकच्या प्रोफाइल फोटो-  स्टेटस पर्यंत सगळ्याचा अभ्यास करून त्या व्यक्तिमत्वाबद्दल पक्के अंदाज लावू शकतो . किती वेळात कशाप्रकारे कोणकोणत्या मेसेजेस आणि ई मेलला कशी  उत्तर पाठवली आहेत ,यावरूनही अंदाज लावू शकतो. मेलमध्ये वापरलेली भाषा आणि शब्द यावरून स्वभावाबद्दल अंदाज बांधू शकतो . ऑनलाइन इंटरव्यू मध्ये व्यक्ती कॅमेर्‍याला कसे फेस करतेय,त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ,डोळे काय बोलतात ? यावरून व्यक्तिमत्वाची नीट पारख करू शकतो.  लॅपटॉप, माऊस किंवा मोबाईल या वस्तू  उमेदवार कसा हाताळतो ? त्याच्या बोटांची पकड कुठे कशी आहे ? यावरून तो पुढे कितपत जबाबदारीने काम करेल, याचाही अंदाज लावता येतो .आणि याच सगळ्या अभ्यासाला ' डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी'  असं म्हणतात .या विद्याशाखेचा बोलबाला असण्याचेच दिवस आहेत सध्या.तेव्हा आता आपण फोन कसा वापरतो?  कीबोर्ड कसा हाताळतो? आपला डीपी काय आहे ? स्टेटस काय आहे ? कोणी त्यावर कौतूक किंवा कमेंट केल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो? आपण नेमकं काय भासवण्याचा प्रयत्न करतो? याकडे जरा बारकाईने बघू यात का यानंतर??म्हणजे बघायलाच हवं......

( लेखातील सर्व  अनुभव आणि प्रसंग काल्पनिक  आहेत .कोणाला कुठल्या घटनांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!?!.......)

सितादही


पिका मंदी पिक प-हाटी पिकली

तिच्या वस्त्रानं सारी दुनिया झाकली

             - लोककवी डॉ. विठ्ठल वाघ
   
प-हाटी...! कापूस...! व-हाडचं लेनं...! पांढरं सोनं...! ज्याच्या माथी इथला शेतकरी राजा होतो..., तो कापूस! 
कापूस म्हणजे पानावरील चुना
कापूस म्हणजे उरूस
कापूस म्हणजे चंद्राचं कमळ
कापूस म्हणजे लक्ष्मीचं रूप
कापूस म्हणजे विधात्याने निर्माण केलेले मातीच्या वैभवाचे रूप
    असा हा कापूस शेतात आंगोपांगी बहरतो. बोंडाच्या आडून टचटचून बाहेर पडलेला हा पांढराशुभ्र साज नजरेला सुखावतो, तेव्हा शेतकऱ्याला वेध लागतात ते त्याच्या वेचण्याचे! कापसाचा वेचा करायचा तर त्यासाठी तयारी करावी लागते. तयारी कशाची? मुहूर्ताची! सितादहीची!  सितादही हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा, वाटलं होतं बोलणार्‍यांनं चुकीचा उच्चारला असेल. पण चूक त्यांची नव्हती. माझ्या शहरी मानसिकतेचा तो घोटाळा होता. माझ्या नागरी मनाला हे प्रादेशिक वैशिष्ट्य माहितीच नव्हतं. निसर्ग आणि भूमी यांच्याशी असणारं नातं कुठेतरी दुरावलेलं असताना ग्रामजीवनातील हा 'सितादही सोहळा' मला कसा माहीत असावा?
    खरंय! आमची रसरशीत जिवंतपणा असणारी ग्रामसंस्कृती हरवत चालल्याची तक्रार आम्ही नेहमी करतो आणि तिचे धागेदोरे शोधायचे तर फक्त ओवी गीतांपर्यंतच जाऊन थांबतो. पण त्याही पलीकडे असणाऱ्या या ग्राम लोकरितींचा आम्ही फारसा शोध घेत नाही. काय नाही या लोकरितीत? कृषी जीवन आणि निसर्गाच्या एकरुपत्वाचं दर्शन त्यात होतं. त्यातूनच निर्माण होतात समाजधारणा आणि लोकजीवनाच्या श्रद्धा परंपरा!त्याचं परिवर्तन होत असतं, 'सितादही' सारख्या ग्राम पूजाविधीमध्ये! हे लोकसंस्कृतीचे पूजाविधी आहेत. यात निसर्गातले दगड, माती, पान-फुल, साल यांचा आपसूक समावेश झालेला दिसतो. माणसाला जगण्याची उमेद देणारे हे विधी असतात. ते संस्कृतीच्या आधारे समाजाला सुख-समृद्धी प्रदान करण्याची परंपरा निर्माण करत असतात. भूमी हीच या विधीमध्ये केंद्रस्थानी असते. तिला स्त्री रूप समजून तिची पुजा करण्याची प्रथा व-हाडातच नव्हे तर सर्वत्र आढळते.
     मराठवाड्यात ती पौष/ माघात 'नव्याची पुनव' म्हणून साजरी होते. "चावर चावर चांगभले" म्हणत, भूमीला नैवेद्य नारळ अर्पण करत हा पूजा विधी संपन्न होतो. तर कर्नाटकात नव्या ज्वारी-बाजरीचे पीक घेऊन अंगावर घोंगडे पांघरून, "वलऽघे, वलऽघे" असा उद्घोष करत शेताला प्रदक्षिणा घातली जाते. ओरिसात 'नुआखाई' म्हणजे हंगामातील पहिल्या भाताची कापणी करताना कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. ही नुआखाई भाद्रपदात केली जाते. त्यावेळी भात आणि खीर भूदेवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे. द. ता. भोसले यांच्या लोकसंस्कृती विषयक पुस्तकात  हे विधी वाचताना मला कुठेतरी 'सितादही'शी त्याचं साम्य जाणवलं. म्हणून मग मी शोध घ्यायला सुरुवात केली.

किती करावं कवतिक मन हरिकलं बाई
आज माझ्या वावरात आहे गड्या सितादही
अशी प-हाटी फुलली आंगोपांगी बहरली
त्यात शोभून दिसते माही ईठाई माऊली
दहीभाताचं हे बोनं वावरात शिपडलं
काया धरतीच्या पायी आज नारय फोडलं
शिरनी वाटताना मन हुरळून जाई
ओटी कापुस येचता याद माहेराची येई
                            - मीराताई ठाकरे

 

   ही कविता सितादहीचा पूजाविधी सांगत होती पण त्याचा कार्यकारणभाव मात्र कळत नव्हता. विचार करता लक्षात आलं की, आपल्या कृषी जीवनात भूमीचे महत्त्व आहे तसंच स्त्रीचं सुद्धा महत्त्व आहे. फ्रेझर म्हणतो, स्त्री मनुष्याला जन्म देते, तिच्या ठिकाणी सुफलीकरणाची अद्भुत शक्ती असते.  'A fruitful woman makes plants fruitful, a barren woman makes them berren'  हे तत्व कृषी जीवनात महत्त्वाचं मानलं गेलं असावं. म्हणूनच शेतीत काही पूजा विधि हे स्त्रियांकडून, विशेषतः लेकुरवाळ्या स्त्रियांकडून करून घेतले जातात. त्यापैकी एक आहे, सितादही!
शेताच्या मालकिणीनं ही पूजा करायची, असा संकेत आहे. ही पूजा दशमी, बारस, बुधवार किंवा रविवार या दिवशी करतात. ज्या दिवशी कापूस वेचा करायला सुरुवात करायची आहे, त्याच्या आदल्या दिवशी ही घरधनीन गायीच्या दुधाचं छान प्रकारे दही विरजवायला ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे विरजलेलं घट्टसर दही आणि मऊसर शिजवलेला भात तसंच, शेतात काम करणाऱ्या स्त्रियांच्या जेवणाची शिदोरी... अशी तयारी करून, हे सगळं घेऊन शेतात जातात. तिथे गेल्यावर सात गोटे (छोटे छोटे दगड) एका रांगेत ठेवल्या जातात. त्या गोट्यांना न्हाऊ माखू घालून त्यांची पूजा केली जाते. कणकेचे सात दिवे, सात नैवेद्य ठेवले जातात. आरती केल्या जाते. प-हाटीच्या दोन झाडांच्या आधारे झोळीचा, पिवळ्या कापडाचा पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात प-हाटीच्या फुलाचा गोपा करून ठेवतात. पिवळ्या कपड्याचे सात छोटे छोटे तुकडे करून त्यात कापसाचे बोंड टाकून गाठोडे बांधतात. ते सात गाठोडे पाळण्या शेजारी ठेवल्या जातात. नंतर प-हाटीच्या झाडाची खणानारळाने ओटी भरली जाते. घर मालकीण आणि शेतात वेचा करायला आलेल्या मजूर बायका ही पूजा करतात. "घर धनधान्यानं भरून जाऊ दे" हे मागणं मागतात. दहीभाताची शितं शेताच्या चारी बाजूला फेकतात आणि त्यावर पाणी शिंपडतात. काही ठिकाणी अशा प्रकारची पूजा एकाच शेतात करण्याची प्रथा आहे. कोरकू आदिवासी मात्र अशा प्रकारची पूजा त्यांच्या प्रत्येक शेतात करतात. हा सगळा पूजा विधि मला, माझी जावू शोभा, नणंद गंगाबाई, सत्यभामा आणि भाच्चे सून रजनी यांनी सविस्तर सांगितला. शोभाला त्यामागचा कार्यकारणभाव माहित नव्हता. पण सत्यभामा म्हणाली की, "हे सात दगड म्हणजे सप्तमातृका शक्तीचे प्रतीक आहेत. आपल्या संस्कृतीत... साती आसरा, मरीआई, म्हसोबा, वेताळ बाबा, सिदोबा अशा देव-देवता कोणत्याही प्रकारचं अरिष्ट निवारण व्हावं, म्हणून  लोकमानसाने स्वीकारलेल्या आहेत. त्यातीलच सात आसरांचे प्रतीक म्हणून हे सात दगड मांडले जातात. त्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा म्हणजे जी आसरा माता असते तिचीच पूजा! त्याचंच हे रूप आहे. गंगाबाई म्हणाल्यात की, "ही जी दहीभाताची शितं शेताच्या चारी बाजूला फेकली जातात त्यावरूनच हे शितं व दही असं म्हटल्या जात असावं. "सितला दहीच ते अपभ्रंश रूप होत होत 'सितादही' झालं असावं", असं माझी भाच्चे सून, रजनी म्हणाली. दहीभातच का? तर गंगाबाई सांगतात, "त्याचा रंग पांढरा आहे आणि कापूसही पांढरा असतो. या दही भाताप्रमाणेच शेतभर कापूस दरवर्षी फुलावा, ही मनोकामना या पूजेद्वारे करत असावेत." 
     कापसाच्या झाडाला पाळणा बांधून गोपा का करत असावे? तर त्यामागे लोकजीवनात रुजलेली सितेच्या जन्मकथेची श्रद्धा आहे.
     कारणंं काहीही असो, पण ग्रामीण भागातला हा एक महत्वाचा पूजाविधी आहे. पूजा झाल्यावर नारळ फोडून त्याची 'शेरणी' म्हणजे प्रसाद वाटला जातो. नंतर कापूस वेचायला प्रारंभ होतो. पहिला वेचा, किलो दीड किलोचा एका पिवळ्या कापडात बांधतात. त्याला 'लोथ' म्हणतात. ती 'लोथ' जपून घरी आणल्या जाते. घरातला सगळा कापूस विकल्या जाईपर्यंत ती 'लोथ' जपतात.  दिवसभराचा वेचा झाला की कापूस घरी आणल्या जातो. पहिल्या दिवशी तागड्या गोट्याची पूजा केली जाते आणि कापूस मोजतात. दिवसभराची मजुरी मजुरांना मिळते. घरी आणलेली ती 'लोथ' जपून ठेवल्या जाते. त्यातील कापसाचा उपयोग देवासाठी वाती तयार करण्यासाठी होतो.

संसाराचा गाडा कापसाच्या माथी
उजळती वाटा जळताना वाती
    - लोककवी डॉ. विठ्ठल वाघ

या 'लोथ' बद्दल सांगत असतानाच माझा पुतण्या सचिनला एकदम राशीच्या पूजेची आठवण आली. आता 'सितादही'च मला माहिती नव्हती तर राशीची पूजा कुठून माहित असेल? मग गंगा बाई म्हणाल्या, "पूर्वी थ्रेशर वगैरे नव्हते तेव्हा शेतात खळं तयार करायचे. त्याद्वारे ज्वारी तयार व्हायची. शेतात ज्वारीचा गंज लागला की घरातून पाटी दिवा आणि शेणाचे पाच पांडव व एक धुरपदी करून न्यायची. ते दसऱ्याला आधीच तयार केले जायचे. वाळून तयार असायचे. मग ही पाटी ज्वारीच्या गंजावर ठेवून त्याची पूजा केली जायची. तो दिवा तिथे ठेवून त्या पाटीत पोहरा 2 पोहरे ज्वारी भरून, परत त्यावर दिवा ठेवून ते घरी आणलं जायचं. शेणाचे पाच पांडव आणि एक धुरपदी अंगणात एका बाजूला ठेवून त्यांची पूजा केली जायची आणि पाटी भरून आणलेली ज्वारी, देवाधर्मासाठी आंबील करायला किंवा दान देण्यासाठी उपयोगात आणल्या जायची. दसऱ्यापासून या रास पूजेची तयारी केल्या जायची... ते गाई गोंदणाच्या पूजे पूर्वी पूर्ण व्हायची", गंगाबाई हे सांगत असतानाच आमच्या सचिनला आठवलं की, किसन आबा ही ज्वारी धानो-याच्या देवाला पाठवायचे. मात्र आता ते 'खळं' ही राहिलं नाही आणि ती 'रासपूजा' ही होत नाही. ही प्रथा जरी नामशेष झाली असली तरी 'सितादही' मात्र आजही सर्वत्र मनोभावे केल्या जाते. 
   नव्याचं आकर्षण आणि जुन्याचा अभिमान हा मानवी स्वभाव आहे. निसर्ग पूजेच्या निमित्तानं तो जपल्या जातो आहे. तसंच या लोकरितीच्या निमित्तानं पूजा अर्चने द्वारे मिळणारे भूमीचे आशीर्वचन लोक मनाला सुखावताहेत. समृद्धी आणि सृजन प्रक्रियेशी निगडीत या लोकरिती म्हणजे पुढल्या पिढीसाठी जगण्याच्या वाटा ठरत आहेत...
                           -सीमा शेटे (रोठे), अकोला.

Tuesday, September 15, 2020

श्रीमंती

 ओरिसानंतर कित्येक ठिकाणांना भेटी दिल्या, पण ओरिसात भेटलेले लोक, त्यांच्या आठवणी या नेहमीच एका खास कप्प्यात राहिल्या. त्या विसरणे अशक्य!

               अकोला ते ओरिसा हा जवळपास 36 तासांचा रेल्वे प्रवास! (त्यावेळी आमची विमान प्रवासास अजून सुरुवात झाली नव्हती.) एवढा लांबचा प्रवास, बाहेरचे खाणे टाळायचे, म्हणून घरून खूप काही खाण्याचे पदार्थ सोबत घेतले होते, अर्थात टिकतील असे! प्रवास तर छानच झाला. आम्ही पुरीला उतरल्यावर, हॉटेलमध्ये गेलो फक्त आणि मला जो काही ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला, तंत्रच बिघडले पूर्ण पोटाचे! आम्ही रूम मध्ये जस्ट गेलो होतो, तर ते हॉटेल बॉय एक-दोनदा येऊन गेले काहीना काही कामासाठी, झालं, त्यांनाही कळलं की माझी तब्येत बिघडलीय . मी एका तासात पार गळून गेले. संध्याकाळी मला तर बाहेर जाणे शक्य नव्हते पण मी मुलांना म्हटलं की तुम्ही तिघे जाऊन या, फिरायला आलोय आपण इथे! कसतरी पटवलं त्यांना! तेवढ्यात हॉटेलचे मॅनेजर स्वतः आले आणि म्हणाले की मॅडमची तब्येत खूप बिघडल्याचं समजलं, डॉक्टरांना इथे बोलवायचं की तुम्ही जाता डॉक्टर कडे? मी सोबत कोणाला तरी पाठवतो. मी म्हटलं, नको मी आता आराम करते, मग वाटलं तर पाहू. ही पहिली झलक ओरिसाची! घरच्यासारखी प्रेमाने विचारपूस, लगेच न मागता मदतीचा हात! खूप बरं वाटलं.....
                दुसऱ्या दिवशी साईट सिइंग मध्ये कोणार्कचं सूर्य मंदिर इत्यादी होतं. त्यामुळे त्रासाकडे दुर्लक्ष करून जायचंच, असं मी ठरवलं. एका मोठ्या बिसलेरीत इलेक्ट्रॉल पावडर टाकली व दिवसभर त्या पाण्यावर राहिले, पण सगळीकडे फिरले. हॉटेलला परतलो तर ते दोघे हॉटेल बॉय होतेच तिथे उभे! म्हणाले,"मांजी, कैसी तबियत है आपकी अब?"(मी ४३चीच होते बरं का तेव्हा, आणि दिसतही होते फार तर ऑंटीसारखी) पण तिथे मांजी म्हणण्याची पद्धतच आहे, तेही बंगाली एक्सेंट मध्ये! मी पण लगेच त्यांना, तबियत तो कल से ठीक है. लेकिन सुबह से कुछ खाया नही मैने! (कडकडून भूक लागली होती तेव्हा) तर लगेच प्रेमाने म्हणाले,"मांजी अब आराम से गरमागरम रोटी खाना, सिर्फ चावल मत खाना, फिर आप को और अच्छा लगेगा!"परक्या ठिकाणी अशी विचारपूस! मला तर त्यानेच बरं वाटायला लागलं.

            दुसऱ्या दिवशी साईट सिइंग आटोपून हॉटेलवर आलो आणि लगेच डिनर झाल्यावर फोन करायला म्हणून बाहेर पडलो (तेव्हा मोबाईल फोन सर्रास वापरात नव्हते.) मला आईला आणि निकिताला,मैत्रिणीला फोन करायचा होता. मी बाहेर पडताना पर्स वगैरे काही घेतली नव्हती. शंभराची एक नोट घेऊन बाहेर पडले होते .फोन करून झाल्यावर फोनचं बिल द्यायला गेले तर म्हणाले, सुट्टे नाहीत! म्हटलं, शेजारच्या दुकानातून आणा.कारण माझ्याकडे नाहीत सुट्टे! तर चट्कन म्हणाले," ठीक आहे उद्या आणून द्या पैसे!" मी अवाक्!  मी कोण कुठली माहित नाही. तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये उतरलाय?असा साधा प्रश्नही हा माणूस विचारत नाही. कमाल आहे !मलाच ते पटेना. पण काही नाही. उद्या आणून द्या पैसे, हेच उत्तर पुन्हा मिळालं. शेवटी आम्ही दुकानातून बाहेर पडलो.

मग तसेच चक्कर मारत पुढे गेलो तर, काही दुकाने बंद झाली होती,तर काही बंद होत होती. मला कोणीतरी सांगितलं होतं की,हैदराबाद सारखेच इथेही  pearls छान मिळतात. पण इथे मला वाटतं,पर्यटकांचे प्रमाण कमी असल्याने आपल्याला इतकी माहिती नाही. मी म्हटलं,बघायला काय हरकत आहे? मुकुंद सोबत नाहीयेत तर ,चान्स घ्या!नाहीतर उगाच काहीतरी घेत बसू नको ,अकोल्याला जाऊन डस्टबीनचे धन होईल इ.ऐकावे लागले असते.
             आम्ही एका छोट्याशा दुकानात शिरलो.त्यानेpearl, rice pearl चे सेट दाखविले.त्यातला एक मला खूप आवडला.दुकानदारांना बरोबर कसं कळतं ना की आपल्याला काय आवडलय ते! मांजी, ले लिजीए, ज्यादा सोचिए मत्! (माझे बार्गेनिंग चे कसब पणाला लावून झाले होते) पण मी तर पर्सच नेली नव्हती.मी त्याला म्हटलं की,मी घेईन हा सेट,पण उद्या!कारण मी आता पर्स  नाही आणली तर तो म्हणाला,"पैसे कहा जानेवाले है? सेट आप अभी ले लीजिए और कल बाहर निकलोगे तब पैसे दिजियेगा.नो प्रॉब्लेम!
     आता मात्र हद्द झाली.अरे,या पुरीतील माणसं याच पृथ्वीतलावरची आहेत ना? चाटच पडले मी! एवढी मोठी रक्कम!(फोनची तरी छोटी रक्कम होती) तरी पुन्हा तेच! एकही प्रश्न नाही .इतका विश्वास अनोळखी व्यक्तीवर? डायरेक्ट घेऊन जा सेट! मला राहवलं नाही. मी त्याला म्हटलं,"भाईसाब अगर मै पैसे देने कल नही आई तो आप क्या करोगे? आप कैसे कैसे बिझनेस करते हो? ऐसे अंजान लोगोंपे भरोसा कैसे कर सकते हो? त्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिले,मांजी, आप यहां किसलिये आये हो?जगन्नाथ के दर्शन के लिये ना? हमारा भरोसा उनपें  है और उनके दर्शन के लिए आनेवाला भक्त कभी हमें फसां नही सकता! मी पुन्हा नि़:शब्द!
          दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडल्यावर आधी फोनचे, नंतर त्या दुकानदाराचे पैसे दिले,तेव्हा मला शांत वाटलं.पैसे घेताना तो दुकानदार हसला फक्त!

तसंच आम्ही जगन्नाथाचे दर्शन झाल्यावर, जेवायला एका हॉटेलमध्ये गेलो. देवळात, कडक सोवळ्यात जो जो नेवेद्य केला जातो, खूप पदार्थ खूप प्रमाणात केले जातात रोज! (ते सगळं वर्णन करायचं तर खूपच सांगावं लागेल, असो.) तर तो बाहेरच्या हॉटेलमध्ये प्रसाद म्हणून पोचवला जातो. कांदा-लसूण विरहीत अतिशय चविष्ट असे जेवण, थाळी सिस्टीम मध्ये हॉटेलमध्ये उपलब्ध होते. निकिता तशी मोठी होती, पण खाण्याचा आनंद! म्हणून आम्ही त्या हॉटेल वाल्याला म्हटलं की तीनच थाळ्या द्या. आम्ही चार थाळ्यांचे पैसे देतो. मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक अतिशय रुचकर होता. आम्ही अगदी खुश झालो.
जेवण झाल्यावर बिल द्यायला गेलो, तर पुन्हा तेच अगत्यशील बोलणं,"३ थाली के ही पैसे देना, बच्चीने कुछ  खायाभी नही." अरे, हे ओरिसाचे लोक कुठल्या मुशीतून घडलेत?"
                  हॉटेलच्या खाली ओपन गार्डन मध्ये एक साऊथ इंडियन काउंटर केलं होतं. तिथे सकाळी एक अम्मा यायची. तिच्या हातचे गरमागरम डोसे खातानाही अगदी होमली वाटायचं. आग्रहाने, प्रेमाने मस्त खाऊ घालायची. तसंच तिथे कावड घेऊन एक माणूस यायचा. मी वरून पाहिले, तर त्या कावडीत काय असेल ?असा प्रश्न मला पडला. काय असेल बरं त्यात? तर मस्त चवीचे ताजे ताजे रसगुल्ले! तोही तसाच, टिपिकल ओरिसा!
            जेव्हा आम्ही बाहेर फिरायचो, तेव्हा खूप जाणवायचं ,इथे खूप गरिबी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट विशेष नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. काही भागांमध्ये तर खूप हलाखीची परिस्थिती वाटली. पण असं असूनही, प्रत्येक ठिकाणी जे अनुभव आले, ते पाहून मनाची श्रीमंती काय असते, ते समजलं!

Sunday, September 13, 2020

अमेरिका डायरी- प्रयाण

 


ग्रुप स्टडी एक्स्चेंज (सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान)च्या मुलाखतीसाठी मी नाशिकला गंजमाळ हॉलमध्ये पोचले. हायफाय माहौल दिसत होता. सूटबूट आणि सिल्क साड्या इकडून तिकडे झोकात वावरत होत्या. काही जण बुद्धासारखे आढयाकडे टक लावून पाहत होते. मोबाईल प्रकरण तेव्हा दुर्लभ असल्याने काही पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. मग माईकवरुन घोषणा झाली की हा प्रकल्प अमेरिकेसाठी असल्याने, निवड झालेल्यांना अमेरिकन कुटुंबांसोबत एकट्याने राहायचं असल्याने आणि तिकडच्या १०,१२ क्लब्जमध्ये सादरीकरण करायचं असल्याने लेखी फेरी, उत्स्फूर्त वक्तृत्व फेरी, मुलाखत आणि पुढचे सगळे सोपस्कार पूर्णपणे इंग्लीशमधून होतील. मध्येच हिंदी, मराठीचा टेकू घेतला तर तुम्ही बाद. सगळ्यांच्या घशाला आता थोडी कोरड पडली. ४,५ सूट आणि साड्या तर ताडकन उठून चालत्या झाल्या. वक्तृत्व फेरीत काही जण हातात आलेली विषयाची चिठ्ठी वाचून दीर्घ श्वास घेऊन एकदम एक्झिट घेते झाले. चला, तेवढीच स्पर्धा कमी. तरी ७० जण उरले. मला ’करप्शन’ विषय आला होता. मनात ’हर हर महादेव’ म्हणून मी काय ते बोलून आले. बहुतेक जण चांगले बोलले. शेवटी ९ जणांच्या पॅनेलने प्रत्यक्ष मुलाखत घेतली. भारताचा आणि अमेरिकेचा इतिहास, करंट अफेअर्स, तुम्ही आयुष्याकडे कसे बघता, तुमचे आदर्श कोण, तेच का?, अवांतर कौशल्ये कोणती, काही लॉजिकल आणि वैयक्तिक प्रश्न असे स्वरुप होते. ४-४ च्या दोन टीम आणि प्रत्येकी २ स्टँड बाय असे फक्त बारा जण निवडले जाणार होते. 

निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली. 

घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्‍या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता. 

माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो. विमानात सीटबेल्ट कसे वापरावे हे हवाईसुंदरी सांगते मात्र तिथले टॉयलेट कसे वापरावे हे काही कोणी शिकवले नव्हते पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)


गाडी, आपलं, विमान फ्रँकफुर्टला (फ्रँकफर्ट म्हणायचं म्हणे) म्हणजे जर्मनीत पोचले. ४ तास हॉल्ट होता. अगदी पॉश पण अवाढव्य एसटी स्टँड असावे तसे लोक बाकावर, खाली कुठेही बसले होते. काळे, करडे, निळे, तपकिरी एवढेच कपड्यांचे रंग. तिथे कॉफी विचारली. किंमत ऐकून मनात गुणाकार केला, डोळे पांढरे केले आणि काचेतून दिसणारे देखणे लखलखते शहर पाहत गप्प बसलो. नाहीतर काय नुसतं काळं गरम पाणीच असतंय अशी मनाची समजूत घातली. इथे पुढच्या फ्लाईटचे चेक-इन धिप्पाड अमेरिकन अधिकारी करत होते. नियमबाह्य गोष्टी भल्यामोठ्या डस्टबीनमध्ये अक्षरश: फेकून देत होते. लोक कुई-कुई करुन काही सांगू लागले की मानगूट धरुन बाजूला करत. वैशाली आणि सरांचे जास्त वजनाचे बरेच  महागडे कॉस्मेटिक्स त्यात फेकले गेले. अमेरिकेने ट्वीन टॉवर हल्ल्यापासून ब्रोकन विंडो सिक्युरिटी ठेवलीय. म्हणजे काचेवरचा साधा तडा सुद्धा ते बॉबस्फोटाइतका गंभीर मानतात त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. अगदी शाहरुख खानला सुद्धा त्यांनी संशयावरुन तपासणीसाठी बाजूला बसवून ठेवल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अखेर हे दिव्य आटोपून एकदाचे विमान सुटले आणि आमचे वर्‍हाड फिलाडेल्फियाला सुखरुप पोचले. (19 April 2007)


क्रमश: 

Saturday, September 12, 2020

गच्ची

 




गेल्या जवळजवळ सहा महिन्यांपासून आपण सगळेच कोरोनाकाळ अनुभवतो

आहोत. आता ’ रोज मरे त्याला कोण रडे’ अशा काहीशा स्थितप्रज्ञ स्थितीला
आपण सगळेच येऊन पोहचलेलो असलो तरी काही घटना आपल्याला हादरवून टाकतात हे
खरेच. घराबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आपल्या प्रत्येकाचं जग
ह्यामुळे आकुंचन पावलं आहे. आता हळुहळु सगळं सुरळीत करण्याचे प्रयत्न
सुरु झालेत पण प्र्त्येकाच्याच मनात अस्वस्थतेचं मळभ काही काळ राहणार हे
निश्चित !
           ह्या नवीन परिस्थितिशीही आपण हळुहळु जुळवुन घ्यायला लागलो
आहोत . प्रत्येकाचं आपलं रुटिन सेट झालंय . कोरोना काळापासुन माझ्या
नव्हे आमच्या तिघांच्याही रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलीय ती आमची
गच्ची !


          तसं बैठ्या घरात राहणार्‍याला गच्चीचं नाविन्य नाही पण
सहनिवासात राहणार्‍या आम्हाला गच्ची कोरोनाकाळात प्रिय झाली. दिवस दिवस
घरात बसून राहिल्यानंतर संध्याकाळी आमचे पाय आपोआप जिन्याकडे वळायचे. तसं
इथे रहायला येऊन आम्हाला जवळपास पंधरा वर्ष झालीत , आमच्या सहनिवासाच्या
जवळ एक लग्नाचे कार्यालय आणि लॉन आहे , सुरवातीला आदित्य लहान असतांना
त्याला तिथला बॅंड आणि नेत्रदिपक रोषणाई दाखवायला आम्ही गच्चीवर जायचो पण
अर्थातच  नंतर त्यातलं नाविन्य कमी झालं , मग सहभोजन , कोजागिरी ,
नववर्षाचा स्वागत कार्यक्रम अश्या काही कारणांनी गच्चीचा सहवास घडायचा पण
नंतर कोण एव्हढं 4 जिने चढुन जाईल असा विचार करुन हळुहळु ते कमी होत गेलं
आणि मधल्या 7,8 वर्षात तर हे सगळं बंदच झालं .
          कोरोनाकाळ सुरु झाला आणि बाहेरचा व्यायाम घरात आला
.उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरचा व्यायाम झाला की संध्याकाळची मोकळी हवा
खायला म्हणून गच्चीवर जाणं सुरु झालं . इतर काही शेजारी पण यायचे मग जरा
वेळ गप्पाटप्पा करुन परत सगळे आपापल्या घरात . आजुबाजुला असे अनेक
सहनिवास असल्याने तिथले लोकही संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी गच्चीवर यायचे
, मी त्यांना ’ गच्चीवरचे शेजारी ’ म्हणते . मग ’ भोचकपणा ’ किंवा ’
चौकसपणा ’ नावाचा जो एक गुण [?] आपल्या सगळ्यांमधे असतो त्याला जागुन ,
"आज ही एकटीच दिसतेय , मैत्रीण आली नाही वाटतं!" , " बाप रे! हे घर
खटल्याचं दिसतंय , बरीच मंडळी असतात वरती " अशी माझी स्वगतं चालत असत.
          मग काही दिवसांनंतर इमारतीच्या वरच्या भागावरुन ही कुठली इमारत
असेल असे आमचे ’ओळखा पाहू’ चे खेळ चालायचे आणि मग काही कामानिमित्त बाहेर
पडल्यावर ती इमारत अगदी खालपासून वरपर्यंत पाहिली जायची . जसजसा उन्हाळा
सरुन पावसाळ्याची चाहूल लागली तसतसे निसर्गातले अनेक जादुई विभ्रम
दिसायला लागले. विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले, एकदोनदा तर चक्क
सातपुड्याचे दर्शन झाले.
         

आकाशात तर काय रोजच जणू जादुचे प्रयोग सुरु झाले . रोज

वेगवेगळी रंगसंगती , आकार साधून आकाश जणू नटुन बसलेले असायचे. कधी नुसतेच
पांढरेशुभ्र ढगांचे पुंजके इतस्ततः भटकत असायचे तर कधी त्यांची जागा
काळेकुट्ट ढग घेत, कधी हेच काळे ढग सोनेरी जर लेवुन यायचे. लाल , गुलाबी
, केशरी, करड्या रंगाच्या इतक्या विविध छ्टा पाहिल्यावर आपल्याला रंगकाम
येत नाही ह्याचे मला वैषम्य वाटत असे. निसर्गाइतकी अद्भूत रंगसंगती
पाहिल्यावर " ये कौन चित्रकार है ?" असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक नाही
का ? , ह्या सगळ्या जादुई पार्श्वभूमीवर अस्ताचलावरचे ते देखणे सुर्यबिंब
तर डोळ्याचे पारणेच फेडायचे.
          पावसाचा जोर वाढल्यावर हळुहळु गच्चीवरचे प्रेक्षक कमी होऊ
लागले पण आम्ही मात्र नियमित जायचो. आता दिवस हळुहळु लहान व्हायला लागलाय
पण कधीकधी चांदण्यांची खडी पसरलेल्या निरभ्र आकाशाखाली बसणं किंवा
अभ्राच्छादित आवरणाखाली बसून इतस्ततः पसरलेले ते पुंजके बघत राहणं हे
स्थळकाळाचे भान विसरायला लावणारं आहे हे खरे. आपल्यातली सगळी नकारात्मकता
जणू ह्या विश्वाच्या अथांग पोकळीत गुडुप होते आहे आणि तिथली चिरंतन चेतना
आपल्या ठायी जन्म घेते आहे असा अनुभव निसर्ग आपल्याला नेहमीच देतो .
          काही काळाने सध्याची सगळी परिस्थिती सुरळीत होईल , आपण परत
आपल्या व्यापात गुरफटुन जाऊ , वाया गेलेला काळ भरुन काढण्याच्या
निमित्ताने कदाचित दुप्पट वेगाने धावायला लागु. स्पर्धेत अव्वल
येण्याच्या मिषाने अष्टौप्रहर काम करु त्या नादात गच्चीवर जाणं कमी होत
होत हळुहळु बंद होईल, पण ती कायमच स्मरणात राहिल. अस्वस्थतेचा काळ परत
आला तर निसर्गाकडे उघडणारं हे दार आपल्या जवळच आहे ही हमी मात्र त्यामुळे
कायम राहिल