चलो खामोशियों की गिरफ्त में चलते है
पहिल्या भागाच्या शेवटी आपण म्हणजे आम्ही.. फिलाडेल्फियात पोचलो होतो. तिथे एका उत्तम हॉटेलमध्ये आमची एक रात्र राहण्याची सोय केलेली होती नंतर आम्हाला आपापल्या पहिल्या होस्टकडे सुपूर्द केले जाणार होते. सकाळी आमच्या स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम झाला. उपस्थितांमधली जांभळा टी शर्ट,काळा स्कर्ट घातलेली, साडेपाच फूट उंच, कपाळ झाकणारी बॉयकट असलेली, चाळीशी ओलांडलेली, तरतरीत नाकाची आणि चमकदार डोळ्यांची गोरीपान लिन मी आपोआप ओळखली. तिनेही ’मोहानी ?’ असं विचारून मला एकदम मिठी मारली. आपला एक आठवडा नक्की छान जाणार एवढे मला जाणवले. कार्यक्रम आटोपताच मी आणि तिच्या कारने सुसाट वेगाने तिच्या घरी पोचलो.
संध्याकाळी ती मला क्लबहाऊसला पूर्वनियोजित कार्यक्रमाला घेऊन गेली. मी सिल्क साडी नेसल्यावर वाटेने जाताना ’आता वाटतेस तू भारतीय, मला नेसवशील का एकदा साडी, ही सुटण्याची भिती नाही का वाटत, रोज नेसावी लागते का तिकडे साडी, तुझी सासू पण नेसते का, मुलगी नेसेल का, त्यांच्या छोटया साड्या मिळतात का, केवढ्याची असते ही" असा तिचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. सासू रोज नेसते, मी क्वचित, मुलगी लग्नात नेसेल बहुतेक, शंभर रू.पासून काही हजारांपर्यंतही मिळते इ. उत्तरे मी दिली. तेव्हा शिल्पा शेट्टीचं हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गीअर ने जाहीर कार्यक्रमात चुंबन घेतल्यामुळे भारतात बराच गदारोळ झाला होता. (ती रिचर्डची फॅन) तुमच्याकडे सिनेमात हे चालतं का? असेल तर मग प्रत्यक्षात केलं तर तिने का नाराज व्हावं असं मला लिनने विचारल.. व्यावसायिक नटी ही प्रत्यक्षात 'available' असते असा चुकीचा संदेश यातून जातो म्हणून ही निदर्शनं झाली असं मी तिला पटवून सांगितलं...आणि मग तेव्हा तरी शिल्पा शेट्टी आणि भारतीय संस्कृती याची सांगड मला घालावी लागली.
रात्री मी खोलीत गेले तर टेबलवर एक चिट्ठी ’मला तू फार आवडलीस..तुझी लिन’. आपण अशी कबुली एखाद्या व्यक्तीला सहज नाही देऊ शकत, नाही का!
लगेचच व्होकेशनल डे होता त्यामुळे नेटवर्कींग बघायला मी फिलाडेल्फियातल्या काही कंपन्यांमधे जाऊन आले, आमचे दुपारचे जेवण तर तिथल्या शाही क्लबमधे होते. चांदीचे काटे चमचे वगैरे.. संध्याकाळी लिनला मी त्याचं वर्णन सांगताना म्हटलं ’एखाद्या पिसांची हॅट घालून झगा फलकारत येणार्या राणीचीच काय ती कमी होती’. (मग पुढच्या प्रत्येक जेवणाबद्दल लिन ’was it a 'queen coming’ luncheon?' असं हमखास विचारी). तिने मला झुम्पा लाहिरी लिखीत आणि तब्बू अभिनीत ’द नेमसेक’ पाहिल्याचे सांगितले. अमेरिकेतील वास्तव्यासाठी तडजोड करणार्या कुटुंबाची ती कथा आणि त्यातली सांस्कृतिक दुविधा व मुळांपासून दुरावण्याची व्यथा तिने इतक्या छान शब्दात मांडली की मी (पुलाव करता करता) ऐकतच राहिले. ती म्हणाली की अक्खी अमेरिका अशीच आहे, कुणी आयरिश कुणी इटालीयन कुणी मेक्सिकन but we say we are american.
रात्री आमच्या गप्पा उर्फ ’भारत को जानो’ कार्यक्रम सुरू असायचा. जाण्याआधी झालेल्या कार्यशाळेमुळे आमचे ’FAQ’ अगदी घोटून तयार होते तरी सांस्कृतिक फरकामुळे काही वेळेस समजावून सांगताना माझी ’फॅ फॅ’ उडायची :) उदा: जेवणाआधी त्या सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून एकत्र एक प्रार्थना म्हटली. मी ही नंतर हात जोडून ’वदनी कवळ’ म्हटले. लगेच त्यांनी अर्थ विचारला... मी सार नीटच सांगितले पण ’पूर्णब्रह्म’ वगैरे...! माझी पंचाईत होतेय हे लक्षात आलं की ती मिस्कील हसायची...आणि ’ok ok ,got the essence’ हा मग आमचा परवलीचा शब्द झाला.
चार्ली आपल्या राजकारणाबद्दल विचारायचा.. भारताशी संबंधित ’मुंबई, गांधी आणि नमस्ते’ हे तीनच शब्द त्यांना त्याआधी माहीत होते. आपल्याला मात्र त्यांच्या हॅलोविन पासून सबवे पर्यंत आणि बोस्टन टी पार्टी पासून मोनिका ल्युएन्स्कीपर्यंत सगळं कसं माहीत याचं त्यांना प्रचंड आश्चर्य वाटायचं.. ते दोघे पक्के डेमोक्रॅट. तेव्हा तिकडे ओबामा आणि हिलरी च्या जंगी प्रचारसभा सुरू होत्या. बुश सरकारला फक्त ओरबाडून खाणं माहीत होतं म्हणून अमेरिका समृद्ध असली तरी समाधानी नाही असं ती सांगायची. माझ्यासाठी तिने ’इंडीया एब्रॉड’ वाचायला आणलं होतं. वृत्तपत्रात एकाच वेळेला ऐश्वर्या-अभिषेकचं पंचतारांकित लग्नं आणि दुसरीकडे भारनियमनाच्या बातम्या.. How do you manage to live between extremeties? असं ती विचारी.
चौथा दिवस असेल. ठरलेले कार्यक्रम उरकून अगदी थकून मी घरी आले तर लिन मंद प्रकाशात रेड वाईनचे घुटके घेत सुडोकू सोडवत बसली होती. क्लेअर अजून आली नव्हती त्यावरून डेटींगचा विषय निघाला. लिन म्हणाली "मी तिला सांगितलय की, कार तू आताही चालवू शकतेस पण सरकार परवाना देत नाही. कारण त्यासाठी हवी असलेली समज तुझ्याकडे नाही, अपघाताचा धोका जास्त, डेटींगचही तसच आहे." मग तिला तिचे डेटींगचे दिवस आठवले, दोघांचाही एक एक प्रेमभंग उर्फ अपघात झालेला मग चार्ली कसा भेटला...दर वेळेला लाल ऐवजी पिवळाच गुलाब कसा देत असे असे काही काही किस्से सांगताना तिला एकदम आपल्या ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीचे कोडे पडले. तू लग्नाआधी नवर्याला किती वेळा भेटलीस? मी म्हणाले ,'एकदोनदा'. मग ती म्हणाली "आणि लग्न करून या (एकदोनदाच भेटलेल्या) माणसाच्या तू थेट घरीच राहायला गेलीस?" मी म्हणाले "असच असतं आमच्यात :)" (ती बेशुद्ध पडू नये म्हणून मी तेव्हा घरात आजेसासू-सासरे यांच्यासह ९ माणसे राहत होती हे सांगितले नाही) ती माझ्याकडे अशी काही पाहत होती की मला आपण पानं गुंडाळलेली आदिवासी स्त्री आहोत असे वाटू लागले. मग मी तिला विचारले "तुम्ही पारखून घेऊन लग्न करता ना, मग तरी ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर का मोडतात. मला वाटतं, नाती आणि त्यांचा टिकाऊपणा या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत. कोणाची पद्धत योग्य आणि कोणाची अयोग्य हा मुद्दाच नाही, तुमचे विचार, विश्वास आणि शेवटी नशीब यावरच त्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं."
लिन कधी कधी तिच्या मुलींना कामाच्या जागी घेऊन जात असे.. take your kid to work at times म्हणजे त्यांना कष्टाची कदर होते असे तिचे म्हणणे. त्याआधी तिची धाकटी मुलगी ATM मधे विचारायची ’is there enough money in the 'wall' to buy this?'. मी पाचव्या दिवशी ’आमिश ’खेड्याला भेट देऊन आल्यावर तर तिने त्यांची ’निसर्गाकडे नेणारी जीवनपद्धती’ मुलींना पुढे बसवून माझ्याकडून ऐकायला लावली. ते अमेरिकेत राहूनही कार न वापरता आणि TV न पाहता जगतात कसे याचे त्या मुलींना कोडे पडले होते.
माझी जुळी मुलं कशी वागतात, भारतीय पालकत्वाच्या कल्पना काय याबद्दल लिन विचारायची.. मी न सांगताही मला घरची, मुलांची आठवण येते आहे हे ओळखायची. मग मी तिला शिकवलेला इंडीयन टी(उकळून) करून आणायची अन नि:शब्द बसायची किंवा कधी मी तिला ५/७ मराठी वाक्य शिकवली होती ती भयंकर उच्चारात (मॅला बुक ल्हागली, दन्नावाद वगैरे) बोलून मला हसवायची. मग मला म्हणावं लागायचं ’ok ok ,got the essence’.
तर ते येणार म्हणून मी तिला माझी साडी नेसवली. ब्लाऊज ऐवजी काळा स्लीव्हलेस टीशर्ट घालून, साडीचा पदर हातावर घेऊन ती राजकन्येच्या तोर्यात जिन्यावरून खाली उतरली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चार्लीने तिचं want to marry you again वगैरे म्हणत अमेरिकन पद्धतीने कौतुक केलं. आम्ही एकमेकांना भेटी दिल्या.
सकाळी निरोप घेताना चार्लीला मी राखी बांधली, त्याचा अर्थ सांगितला. दौरा संपण्याच्या दिवशी आम्ही पुन्हा भेटणार होतो तरीही त्यांचे घर सोडताना माझे डोळे पाणावले. लिन माझ्याकडे पाहतच नव्हती.. चार्लीनेच मला ठरल्या जागी पोचवले. नंतर पुढचा प्रवास, अनुभव, वेगवेगळ्या होस्टसचं आतिथ्य, आम्ही पाहिलेली स्थळं सगळं मी तिला फोनवर सांगायचे किंवा मेलमधे लिहायचे. माझी कार्यक्रम पत्रिका तिने किचनमधे डकवून ठेवली होती. मैत्री सहवासातून फुलते हे खरं असलं तरी ती सहवासाच्या लांबीवर अवलंबून नसते. नाहीतर फक्त एका आठवडयात माझ्यात आणि लिनमधे हा अनोखा बंध निर्माण झाला नसता. लिनच्या शब्दात सांगायचं तर "I especially remember the times we sat in the living room talking after Charlie and the girls went to bed. We learned so much about each other's lives and beliefs. It doesn't matter to me how long we go between returning emails....we are friends for life! "
आपल्यापैकी बऱ्याच जणांना संगीताची आवड असते. त्यातल्यात्यात "गाणी ऐकणं" हा बहुतेकांचा छंद असतो. सुमधुर संगीत नेहमीच हौशी मनाला आनंद आणि उ भारी देत असतं. एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवत असतं. काही गाणी तर अशी असतात, त्यातील शब्द धड समजणारे नसतात, अर्थ देखील असतोच असे नाही;पण चाल, रिदम, आणि एकूणच ती गाणी ऐकल्यावर माणूस त्यात रंगून जातो. काही गाणी मात्र आयुष्याचा सारा सारच सांगून जातात .पुस्तकी ज्ञान नसलेल्या बहिणाबाई "अरे संसार, संसार म्हणत पूर्ण संसाराचं तत्वज्ञान सांगून जातात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर---- चटके,मग ते अग्नी चे असोत, उन्हाचे असोत वा दुःखाचे--- तव्याचा चटका लागल्याशिवाय भाकरी ची गोडी कळत नाही, तसेच दुःखाचे चटके सोसल्याशिवाय सुखाची चव चाखता येत नाही,हे त्या शाळा कॉलेजात न गेलेल्या बाईने किती सहज सांगून टाकले. आयुष्य हे चुलीवरल्या कढइतले कांदे पाहे म्हणत म्हणत काही गाणी "जिदगी के रंग कई रे " म्हणत जीवनाची सफर घडवून आणतात,तर काही गाणी "जिंदगी, कैसी है पहेली हाये, कभी ये हसाये, कभी ये रुलाये---"म्हणत वास्तवाची जाणीव करून देतात . तर काही "सुख दुःख दोनो, असलेल्या जीवनाच्या नावेची ओळख करून देतात. थोडक्यात, जीवनात सुख,दुःख, आशा,निराशा हे खेळ सतत सुरूच असतात.. अशी कितीतरी उदा. देता येतील; पण हल्ली माझ्या मनात घोळत असलेलं आणि माझ्या मनाचा ताबा घेतलेलं असं गाणं म्हणजे "आशा" सिनेमातील----
" *ढ*"
अर्थातच सगळ्या परिस्थितीत स्वतःला सहज बदलवू शकणारेही बघतोच आपण आजूबाजूला. नक्कीच त्यांचे आयुष्य तुलनेने सहज, सोपे जात असणार ह्यात शंकाच नाही. रुजणं शब्दावरून मग सहजच मनात आले की अगदी जुन्या काळामध्ये मुलामुलींची फार लवकर लग्न व्हायची त्यामुळे बालवयातच सासरी आलेल्या मुलींना त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला रुजवून घेणे तितकेसे कठीण जात नसे नंतर नंतर म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडा बदल झाला. मुलींची लग्न वयाच्या वीस-बावीस च्या वयात व्हायला लागलीत त्यामुळे थोडा त्यांना सासरी जमवून घ्यायला किंचित वेळ लागू लागला पण तरीही लहानपणापासून शेवटी सासर हेच तुझं खरं घर आहे असं मनावर पक्क बिंबवले गेले असल्याने बहुतांश जणीनी हे सहज मान्य केले आणि विनातक्रार रुजल्या. त्यानंतरची पिढी म्हणजे सध्याची तरुण पिढी (आपल्या मुला-मुलींची पिढी) ह्यामध्ये आणखी थोडा बदल झाला आता मुलं किंवा मुली अजून जास्त परिपक्व झाल्यानंतर लग्न व्हायला लागलीत. कदाचित त्यामुळेही असेल पण “थोडं तुझं थोडं माझं” असं म्हणत व्यवस्थित संसार होतांना दिसत आहेत, (अर्थात अपवाद असताच म्हणा!) आजकालच्या मुलामुलींना हे तेवढं कठीण जात नाही कारण बहुतेक सगळीकडे राजाराणीचे संसार असतात. दोघेही समजदार पणा दाखवत "थोडं तुझं,थोडं माझं" करत एकमेकांशी जुळवून घेत गोडीगुलाबीने, गुण्यागोविंदाने राहतांना दिसतात. त्यात बहुतांश ठिकाणी दोघेही नोकरी करणारेच असतात. त्यामुळे खूप कमी वेळ एकमेकांच्या सहवासात राहतात. अर्थात स्वतंत्र मनोवृत्तीमुळे थोडे फार संघर्ष अटळ असतात पण ते त्यांचे निभावतात. आणि ह्या पिढीमध्ये मुलांच्या विश्वामध्ये, संसारामध्ये आई-वडिलांनीही स्वतःला थोडं बदलवत रुजवून घेतलेलं आहे. यानंतरच्या पिढीमध्ये मात्र काय होईल सांगता येत नाही. मला तरी वाटतं "थोडं तुझं,थोडं माझं" असा सुवर्णमध्य न गाठता "तू तुझं नी मी माझं" ह्या प्रकारात जर सर्व व्यवहार चालणार असतील तर बाकी कठीण आहे! कारण संसार सुरळीत चालण्यासाठी हे एकमेकांच्या विश्वात “रुजणं” दोघांनाही व्यवस्थित जमलं तरच संसार रुपी रोपटे छान सुंदर बहरणार हे नक्की ! अगदी टेन ओ क्लॉक सारखे !
तसं पाहिलं तर अगदी शाळेत पहिल्यांदा जाणाऱ्या मुलालाही त्या नव्या वातावरणात रुजावंच लागतं आणि थेट रिटायर्ड झालेल्या आजोबांनाही नव्याने आपल्या स्वतःच्याच घरात पुन्हा रुजावंच लागतं! थोडक्यात काय तर रुजणं म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेता येणं! सध्याच्या आमूलाग्र बदललेल्या युगात सगळं नवीन तंत्रज्ञान नीट माहिती करून घेणं आणि वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य रीतीने वापर करणं म्हणजे तरी काय शेवटी? स्वतःला डिजिटली रुजवण्याचाच एक प्रकार ! आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांवर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जितकं सहज स्वतःला रुजवता येतं तितकं तुमचं आयुष्य कमीअधिक सोपं होत जातं हे निश्चित! रुजणं टेन ओ क्लॉक चं असो का तुमचं आमचं ! शेवटी तात्पर्य एकच हो!
एक मुलगी परवा भेटायला आली. इंग्लिश शिकायचंय म्हणाली. कोर्सबद्दल चौकशी केली. मीही तपशीलवार माहिती दिली. तिचा लगेच प्रश्न, " एका महिन्याच्या कोर्सनंतर मला पूर्ण इंग्लिश येईल ना? म्हणजे मी काहीही वाचू शकेन, समजू शकेन ना? आणि मी दुसऱ्यांना इंग्लिश शिकवू सुद्धा शकेन ना?"
" फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अँड मोस्ट इम्पॉर्टन्ट इंप्रेशन " असं म्हणण्याच्या पद्धतीनुसार व्यक्ती नेहमीच आपलं इंप्रेशन जपण्याकरता स्वतःला टिपटाप ,नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते .आपणसुद्धा प्रथमदर्शनी कुठलीही व्यक्ती बघून पेहेराव, राहणीमान यावरून तिच्या व्यक्तीमत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत असतो . एखाद्या व्यक्तीचे कपडे , रंगरंगोटी ,वेशभूषा - केशभूषा बघून काही एक मत आपलं त्या व्यक्तीबद्दल तयार होत असतं . गंमत म्हणजे कित्येकदा नावांवरून, आडनावावरूनही आपण व्यक्तीबद्दल मनातल्या मनात अंदाज बांधायला लागतो. खरं तर हा आपल्या मनाचा एक वेगळाच खेळ असतो आणि कधी कधी आपण लावलेले अंदाज साफ चुकलेले आहेत असं नंतर आढळून येतं .मला व पु काळे यांच्या कथाकथनातलं एक वाक्य आठवतं की " ज्यांचं आडनाव पटवर्धन असतं ते एक्झॅक्टली रीसबुडांसारखे का दिसतात ? " तर असंच आपण बांधलेल्या आडाख्यांचंही होतं .
एकूणच काय तर समोर येणाऱ्या माहितीवरून आपण थोडंफार अनुमान लावण्याचा प्रयत्न करत असतो ,की एकूण हे व्यक्तिमत्व कसं असेल? म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करणं किंवा तिच्याबद्दल न बोलताच जाणून घेणं यासाठी देहबोली विज्ञानाचा उदय आणि विकास झाला आहे .त्यात आता एका नवीन संकल्पनेचा उदय गेल्या काही वर्षांपासून झाला आहे. ही संकल्पना आहे " डिजिटल बॉडी लैंग्वेज " नावाची. डिजिटल बॉडी लैंग्वेज म्हणजे काय ?आणि त्यावरून एखाद्या व्यक्तीबद्दल आपण अनुमान कसे लावतो ? याचे रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे व्हाट्सअपच्या डीपी वरून किंवा फोनच्या स्टेटस वरून आपण व्यक्तीबद्दल काही विशिष्ट अनुमान लावतोच की नाही?एखादी व्यक्ती हसतमुख,मनमिळावू असेल किंवा नाही हे एकदा पाहिलेल्या फोटोवरून ठरवण्याचा प्रयत्न करतोच की नाही?खरं तर आपण सर्वोत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आहोत असं भासवण्याचा प्रयत्न कळत नकळत सगळेच करत असतात. भेटीतून असो की डीपी,फेसबुक प्रोफाईल असो ,फ्रेश दिसायला,खूष दिसायला सगळ्यानाच आवडत असतं.
अलीकडे फोनचा डीपी, फेसबुकचे प्रोफाईल याबाबत लोक बरेच जागरूक असायला लागले आहेत,काळजी घेऊ लागले आहेत. विशेषतः युवापिढीत याबाबत खूप निरनिराळ्या कल्पना आहेत . मी माझ्या विद्यार्थी समूहामध्ये खूपदा असं बघितलं आहे की ,जेव्हा कॉलेजमध्ये शांतता आणि एकांत असतो ,अशावेळी काही मुलं मुद्दाम कॉलेजला येतात , मग अंगणातल्या हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उभं राहून ; पिलरला टेकून किंवा चक्क गाडीच्या सीटवर लोळून, गॉगल लावून ,गॉगल काढून, कमरेवर हात ठेवून ,वगैरे वगैरे फोटो काढले जातात आणि हे फोटो काढण्यासाठी मुलं आपल्याबरोबर आपल्या मित्रांनाही घेऊन येतात .आणि मग काढलेल्या फोटोतून त्यातल्या त्यात " हॉट " फोटो सिलेक्ट करून तो डीपी म्हणून, फेसबुक स्टेटस म्हणून ठेवला जातो . त्याला अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळतात. पण हे समाधान दोन किंवा तीन दिवस टिकतं.आणि मग परत शांत वेळेला कॉलेज गाठावं लागतं ,नवनवीन डीप्यांची सोय करण्यासाठी !! मी जाता येता असे लडिवाळ " सोहळे "अनेकदा पाहिले आहेत. युवा पिढी मधील मित्र-मैत्रिणी या फोटोंवरून खरोखरच एकमेकांबद्दल अंदाज बांधत असतात .तसही फोटो काढणार्या व्यक्तीला आपला टार्गेट ग्रुप माहित असतो .कोणासाठी हे फोटो स्टेटस मध्ये डीपी मध्ये ठेवले आहेत, याची त्या व्यक्तीला पूर्ण जाणीव असते. त्यांना खूप अपेक्षित फीडबॅक सुद्धा बरेचदा मिळत असतात. पण त्यामुळे होणारी गंमत अशी आहे की " हॉट " नसणारी मुलंमुली सुद्धा " हॉट" वाटू लागतात . तसंच कुटुंबवत्सल नसणारी व्यक्ती सुद्धा फार प्रेमाने कुटुंबातील व्यक्तींसोबत रहात आहे ,असा अंदाज लावता जातो .काही महाभाग(त्यांना खरंच या कला अवगत आहेत असे सन्माननीय अपवाद सोडून) स्टेटस मध्ये स्वतःचं गाणं किंवा नृत्य टाकून आपण प्रचंड खूष असल्याचा संदेश देत असतात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अगदीच याविरुद्ध असते . डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान नेमक्या या तफावतींवर काम करतं.कधी पुस्तकांचा ढीग फोटोत दिसतो ,तर कधी घाम येईपर्यंत व्यायाम केल्याचा अविर्भाव असतो.पण खरंच दमछाक होईल इतका अभ्यास,व्यायाम केला असतो का? तर मुळीच नाही! खरीखुरी चित्रणं यात नसतात बोचदा.मला तर आज पर्यंत कोणतीही व्यक्ती डीपी किंवा स्टेटस मध्ये नाराज किंवा उदास पाहिल्याचंही आठवत नाही. याचा अर्थ असा आहे का की कोणीच नाराज किंवा उदास कधीच नाही ? प्रश्नच आहे खरा! . " भावासाठी क्काssय पन " असं स्टेटस ठेवणारा मुलगा प्रत्यक्षात आपल्या भावाशी,मित्राशी कडकडून भांडणारा असू शकतो . " रिलेशनशिप्स आर मोअर इम्पॉर्टंट दॅन इगोज् " असं स्टेटस् ठेवणारा माणूस प्रत्यक्षात मात्र भयंकर रागीट- अहंकारी आणि त्यामुळे नाती तोडून टाकणाराही असू शकतो. कडेवर- खांद्यावर आपल्या छोट्या मुलीला घेऊन हौसेनी फोटो काढून तो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवणारा माणूस, आपल्या मुलीच्या संगोपनाची,तिला सांभाळण्याची जबाबदारी घेत असेलच, असं सांगता येत नाही. लॉकडाऊनच्या काळात तर केर काढण्याचे ,स्वतः चहा करत असल्याचे - स्वयंपाक करत असल्याचे फोटो(विशेषतः पुरुषांचे) मुद्दाम स्टेटस मध्ये किंवा फेसबुक वर शेअर केले गेले . याचा अर्थ ही माणसं घरातली जबाबदारी घेत असतीलच असं सांगता येत नाही . " नाssssद नाssssय करायचा!! " असं स्टेटस ठेवणारी माणसं प्रत्यक्षात भित्रट,पळपुटी नसतील हे कशावरून? पुलंच्या कथाकथनात एक किस्सा आहे की, त्यांच्या मित्राने ट्रीपला गेल्यावर , नेपाळी गुरखा लोक जवळ ठेवतात तशी कुकरी आणली ! पु लं यावर मिष्कील टिपणी करतात," की पोस्टमनला पाहून चळाचळा कापणारा आमचा हा मित्र या कुकरीचं काय करणार आहे ? हे देवच जाणे! पण येता-जाता ज्याला-त्याला ती कुकरी दाखवून शूरपणाचा आव आणून त्यानी आम्हा सगळ्यांना मात्र अगदी वात आणला होता !" अगदी अशाच प्रकारे मैत्रीचा ,सिंसियर असल्याचा, कुटुंबवत्सल असल्याचा ,आणि विशेषतः खूप आनंदी असल्याचा मुखवटा घालून , तसं भासवून माणसं कधीकधी वात मात्र खरंच आणत असतात. डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान या खऱ्या खोट्याची शहानिशा सहजतेनी करू शकतं. खऱ्याखुऱ्या भावना फोटोत चित्रित केल्या असत्या, आणि त्यासकट फोटो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवले असते, तर सुशांतचं उद्या काय होणार आहे? हे आदल्या दिवशीच्या त्याच्या फोन स्टेटस वरूनच आपल्याला कळलं नसतं का? यावरून आपण नक्कीच विचार करू शकतो.
काही लोक उधार उसनवार स्टेटस ठेवतात .एकदा मी माझ्या मैत्रिणीचे स्टेटस वाचले त्यात सुंदर अशा निसर्गदृश्याखाली काहीतरी मनाला स्पर्श करणारा मेसेज लिहिला होता. मात्र मी त्या फोटोवर बोटे टेकवून थोडं स्क्रीनवर हलवून पाहताच वरच्या भागात मला माझ्या मैत्रिणीच्या नावाबरोबर " राजा ,नागपूर " अशी अक्षरं ओव्हरलॅप झाल्यासारखी दिसली .मी माझ्या मैत्रिणीला
," राजा ... फ्रॉम नागपूर कोण आहे ? "असं विचारताच ती भडकली. मी तिची मैत्रीण असताना ,तिला न सांगता, मी तिच्या ओळखीच्या " राजा ,नागपूर " ला कसं काय ओळखते? असं वाटून ती माझ्याशी कडकडून भांडायला लागली.मी शांतपणे जरा वेळ तिचं आकांडतांडव ऐकून घेतलं आणि हसून तिला सांगितलं की " राजा कोण हे मला माहीत नाही,पण त्या राजाचं स्टेटस तुला आवडलेलं दिसतंय . कोणाचं आवडलेलं स्टेटस , स्वतःच्या फोनचं स्टेटस म्हणून ठेवायचं असलं , तर, स्क्रीनशॉट काढल्यावर निदान नीट क्रॉप तरी करायला नको का? तुझं स्टेटस पाहून ते तुझं नाही तर कुठल्याशा राजाचं आहे,हे कळतंय ना सुंदरे !! " तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं ,की मला काय म्हणायचं आहे !
एकदा एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी एका व्यक्तीच्या स्टेटस मध्ये पाहिला, त्याचीही गोष्ट सांगूनच टाकते. ऑलरेडी लावलेलं आणि छान वाढलेलं,आळं करून ठेवलेलं झाड होतं ते ,ज्याच्या जवळ ही व्यक्ती पोझ देऊन " फावडं " घेऊन उभी होती. आणि खाली वाकून ती समोरच्या मुलांना विचारत होती की "रेडी का रे? " मग व्हिडिओमध्ये न दिसणाऱ्या मुलांचे, "हो हो " असे आवाज आले . आणि मग वृक्षारोपणवाल्या व्यक्तीने जीव नसल्यासारखं उगाच काहीतरी जमिनीला त्या फावड्याने खाजवायला सुरुवात केली . लगेच वर पाहून " झालं का रे?" असं पण विचारलं .पुन्हा मुलांनी " हो " म्हटलं .आणि व्हिडिओ बंद झाला. हा व्हिडिओ निदान थोडा एडिट करायचा, किंवा आपण व्हिडिओ लोकांसमोर पाठवतोय तर निदान स्वतःच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरतं तरी नीट वागायचं नं? एवढं सुद्धा भान व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीला नसतं का? यातून तुम्ही किती नाटकी आहात हे देखील कळतं आणि तो नाटकीपणा झाकायचा तुम्ही प्रयत्न सुध्दा करत नाही आहात, हे देखील कळतं .
म्हणूनच या जगाला " आभासी जग " असा शब्द देणार्याचं कौतुकच केलं पाहिजे. एकूणच हा सगळा वरवरचा मामला आहे, आभासाचा पसारा आहे . ज्याला या आभासी जगातलं व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षातलं व्यक्तिमत्त्व यातलं अंतर कळत नाही, त्याची फसगत नक्की होऊ शकते.
हा आभासाचा पसारा जरा तरी आवरता यावा म्हणूनच डिजिटल बॉडी लैंग्वेज नावाचा अभ्यास उदयाला आला असावा .डिजिटल बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही डिजिटल माध्यमातून जगाला कसं दिसण्याचा किंवा काय भासवण्याचा प्रयत्न करत आहात , त्याचा तर अभ्यास केला जातोच ,पण सत्यता - वास्तव आणि आभासी चित्र यातील गॅप्स शोधण्याचा प्रयत्नही केला जातो. उदाहरणार्थ हसर्या चेहर्याकडे बघतांना व्यक्तीच्या ओठांची टोकं वर वळली आहेत का? आणि डोळे जरा बारीक होऊन डोळ्याभोवती हलकी तरी रेषांची जाळी दिसते आहे का ? यावरून फोटोतील स्मितहास्य हे खरंखुरं हास्य आहे की नुसतं " स्माईल प्ली ssssज " वालं हास्य आहे , याचा पत्ता अभ्यासकांना बरोब्बर लावता येतो. उभं राहण्याची पद्धत कशीही असली तरी हात कसे आणि कुठे ठेवले आहेत ? हाताची बोटं,हालचाली, चेहऱ्यावरचे भाव , डोळे या सगळ्या गोष्टीं एकमेकांशी मॅच होत आहेत किंवा नाही ? यावरून व्यक्तीच्या संदेशातील खरेखोटेपणा शोधता येतो .
डिजिटल बॉडी लँग्वेजचे अभ्यासक डिजिटली प्रदर्शित केलेल्या छबीचे नीट विवरण करू शकतात. याबरोबरच लॅपटॉप वापरताना सुद्धा एखादी व्यक्ती कुठल्या पद्धतीने बोटं कि-बोर्ड वर फिरवते, किंवा टेबलावर तिनी तिचं कोपर कसं टेकवलेलं असतं ,किंवा स्क्रीन वरचे मेसेज वाचताना व्यक्तीचे चेहऱ्यावरचे भाव कसे कसे असतात , या वरून सुद्धा डिजिटल लैंग्वेज अभ्यासकांना एकूण एक पत्ता व्यक्तिमत्वाबद्दल लागत असतो. एखाद्या ई मेल किंवा मेसेजला व्यक्ती काय उत्तर देते किंवा उत्तरच देत नाही किंवा उत्तर द्यायला किती वेळ घेते यावरून सुद्धा अभ्यासक अंदाज लावतात ,आणि निष्कर्ष काढतात. एखाद्या व्यक्तीचा व्हीडीओ बारकाईने पाहून, त्यातल्या व्यक्तीच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव, डोळे बघून , त्या व्यक्तीबद्दल एक ठाम मत तयार करू शकतात. कार्पोरेट सेक्टरमध्ये तर आता इंटरव्यू पॅनलवर डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी करणारा माणूसही असतो. तो उमेदवाराच्या ईमेल आयडी मध्ये किती स्टार्स,कोणते नंबर्स आहेत, इथपासून तर उमेदवाराच्या फोनच्या, फेसबुकच्या प्रोफाइल फोटो- स्टेटस पर्यंत सगळ्याचा अभ्यास करून त्या व्यक्तिमत्वाबद्दल पक्के अंदाज लावू शकतो . किती वेळात कशाप्रकारे कोणकोणत्या मेसेजेस आणि ई मेलला कशी उत्तर पाठवली आहेत ,यावरूनही अंदाज लावू शकतो. मेलमध्ये वापरलेली भाषा आणि शब्द यावरून स्वभावाबद्दल अंदाज बांधू शकतो . ऑनलाइन इंटरव्यू मध्ये व्यक्ती कॅमेर्याला कसे फेस करतेय,त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ,डोळे काय बोलतात ? यावरून व्यक्तिमत्वाची नीट पारख करू शकतो. लॅपटॉप, माऊस किंवा मोबाईल या वस्तू उमेदवार कसा हाताळतो ? त्याच्या बोटांची पकड कुठे कशी आहे ? यावरून तो पुढे कितपत जबाबदारीने काम करेल, याचाही अंदाज लावता येतो .आणि याच सगळ्या अभ्यासाला ' डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी' असं म्हणतात .या विद्याशाखेचा बोलबाला असण्याचेच दिवस आहेत सध्या.तेव्हा आता आपण फोन कसा वापरतो? कीबोर्ड कसा हाताळतो? आपला डीपी काय आहे ? स्टेटस काय आहे ? कोणी त्यावर कौतूक किंवा कमेंट केल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो? आपण नेमकं काय भासवण्याचा प्रयत्न करतो? याकडे जरा बारकाईने बघू यात का यानंतर??म्हणजे बघायलाच हवं......
( लेखातील सर्व अनुभव आणि प्रसंग काल्पनिक आहेत .कोणाला कुठल्या घटनांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!?!.......)
तिच्या वस्त्रानं सारी दुनिया झाकली
ओरिसानंतर कित्येक ठिकाणांना भेटी दिल्या, पण ओरिसात भेटलेले लोक, त्यांच्या आठवणी या नेहमीच एका खास कप्प्यात राहिल्या. त्या विसरणे अशक्य!
निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली.
घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता.
माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो. विमानात सीटबेल्ट कसे वापरावे हे हवाईसुंदरी सांगते मात्र तिथले टॉयलेट कसे वापरावे हे काही कोणी शिकवले नव्हते पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)
क्रमश: