Tuesday, September 15, 2020

श्रीमंती

 ओरिसानंतर कित्येक ठिकाणांना भेटी दिल्या, पण ओरिसात भेटलेले लोक, त्यांच्या आठवणी या नेहमीच एका खास कप्प्यात राहिल्या. त्या विसरणे अशक्य!

               अकोला ते ओरिसा हा जवळपास 36 तासांचा रेल्वे प्रवास! (त्यावेळी आमची विमान प्रवासास अजून सुरुवात झाली नव्हती.) एवढा लांबचा प्रवास, बाहेरचे खाणे टाळायचे, म्हणून घरून खूप काही खाण्याचे पदार्थ सोबत घेतले होते, अर्थात टिकतील असे! प्रवास तर छानच झाला. आम्ही पुरीला उतरल्यावर, हॉटेलमध्ये गेलो फक्त आणि मला जो काही ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला, तंत्रच बिघडले पूर्ण पोटाचे! आम्ही रूम मध्ये जस्ट गेलो होतो, तर ते हॉटेल बॉय एक-दोनदा येऊन गेले काहीना काही कामासाठी, झालं, त्यांनाही कळलं की माझी तब्येत बिघडलीय . मी एका तासात पार गळून गेले. संध्याकाळी मला तर बाहेर जाणे शक्य नव्हते पण मी मुलांना म्हटलं की तुम्ही तिघे जाऊन या, फिरायला आलोय आपण इथे! कसतरी पटवलं त्यांना! तेवढ्यात हॉटेलचे मॅनेजर स्वतः आले आणि म्हणाले की मॅडमची तब्येत खूप बिघडल्याचं समजलं, डॉक्टरांना इथे बोलवायचं की तुम्ही जाता डॉक्टर कडे? मी सोबत कोणाला तरी पाठवतो. मी म्हटलं, नको मी आता आराम करते, मग वाटलं तर पाहू. ही पहिली झलक ओरिसाची! घरच्यासारखी प्रेमाने विचारपूस, लगेच न मागता मदतीचा हात! खूप बरं वाटलं.....
                दुसऱ्या दिवशी साईट सिइंग मध्ये कोणार्कचं सूर्य मंदिर इत्यादी होतं. त्यामुळे त्रासाकडे दुर्लक्ष करून जायचंच, असं मी ठरवलं. एका मोठ्या बिसलेरीत इलेक्ट्रॉल पावडर टाकली व दिवसभर त्या पाण्यावर राहिले, पण सगळीकडे फिरले. हॉटेलला परतलो तर ते दोघे हॉटेल बॉय होतेच तिथे उभे! म्हणाले,"मांजी, कैसी तबियत है आपकी अब?"(मी ४३चीच होते बरं का तेव्हा, आणि दिसतही होते फार तर ऑंटीसारखी) पण तिथे मांजी म्हणण्याची पद्धतच आहे, तेही बंगाली एक्सेंट मध्ये! मी पण लगेच त्यांना, तबियत तो कल से ठीक है. लेकिन सुबह से कुछ खाया नही मैने! (कडकडून भूक लागली होती तेव्हा) तर लगेच प्रेमाने म्हणाले,"मांजी अब आराम से गरमागरम रोटी खाना, सिर्फ चावल मत खाना, फिर आप को और अच्छा लगेगा!"परक्या ठिकाणी अशी विचारपूस! मला तर त्यानेच बरं वाटायला लागलं.

            दुसऱ्या दिवशी साईट सिइंग आटोपून हॉटेलवर आलो आणि लगेच डिनर झाल्यावर फोन करायला म्हणून बाहेर पडलो (तेव्हा मोबाईल फोन सर्रास वापरात नव्हते.) मला आईला आणि निकिताला,मैत्रिणीला फोन करायचा होता. मी बाहेर पडताना पर्स वगैरे काही घेतली नव्हती. शंभराची एक नोट घेऊन बाहेर पडले होते .फोन करून झाल्यावर फोनचं बिल द्यायला गेले तर म्हणाले, सुट्टे नाहीत! म्हटलं, शेजारच्या दुकानातून आणा.कारण माझ्याकडे नाहीत सुट्टे! तर चट्कन म्हणाले," ठीक आहे उद्या आणून द्या पैसे!" मी अवाक्!  मी कोण कुठली माहित नाही. तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये उतरलाय?असा साधा प्रश्नही हा माणूस विचारत नाही. कमाल आहे !मलाच ते पटेना. पण काही नाही. उद्या आणून द्या पैसे, हेच उत्तर पुन्हा मिळालं. शेवटी आम्ही दुकानातून बाहेर पडलो.

मग तसेच चक्कर मारत पुढे गेलो तर, काही दुकाने बंद झाली होती,तर काही बंद होत होती. मला कोणीतरी सांगितलं होतं की,हैदराबाद सारखेच इथेही  pearls छान मिळतात. पण इथे मला वाटतं,पर्यटकांचे प्रमाण कमी असल्याने आपल्याला इतकी माहिती नाही. मी म्हटलं,बघायला काय हरकत आहे? मुकुंद सोबत नाहीयेत तर ,चान्स घ्या!नाहीतर उगाच काहीतरी घेत बसू नको ,अकोल्याला जाऊन डस्टबीनचे धन होईल इ.ऐकावे लागले असते.
             आम्ही एका छोट्याशा दुकानात शिरलो.त्यानेpearl, rice pearl चे सेट दाखविले.त्यातला एक मला खूप आवडला.दुकानदारांना बरोबर कसं कळतं ना की आपल्याला काय आवडलय ते! मांजी, ले लिजीए, ज्यादा सोचिए मत्! (माझे बार्गेनिंग चे कसब पणाला लावून झाले होते) पण मी तर पर्सच नेली नव्हती.मी त्याला म्हटलं की,मी घेईन हा सेट,पण उद्या!कारण मी आता पर्स  नाही आणली तर तो म्हणाला,"पैसे कहा जानेवाले है? सेट आप अभी ले लीजिए और कल बाहर निकलोगे तब पैसे दिजियेगा.नो प्रॉब्लेम!
     आता मात्र हद्द झाली.अरे,या पुरीतील माणसं याच पृथ्वीतलावरची आहेत ना? चाटच पडले मी! एवढी मोठी रक्कम!(फोनची तरी छोटी रक्कम होती) तरी पुन्हा तेच! एकही प्रश्न नाही .इतका विश्वास अनोळखी व्यक्तीवर? डायरेक्ट घेऊन जा सेट! मला राहवलं नाही. मी त्याला म्हटलं,"भाईसाब अगर मै पैसे देने कल नही आई तो आप क्या करोगे? आप कैसे कैसे बिझनेस करते हो? ऐसे अंजान लोगोंपे भरोसा कैसे कर सकते हो? त्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिले,मांजी, आप यहां किसलिये आये हो?जगन्नाथ के दर्शन के लिये ना? हमारा भरोसा उनपें  है और उनके दर्शन के लिए आनेवाला भक्त कभी हमें फसां नही सकता! मी पुन्हा नि़:शब्द!
          दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडल्यावर आधी फोनचे, नंतर त्या दुकानदाराचे पैसे दिले,तेव्हा मला शांत वाटलं.पैसे घेताना तो दुकानदार हसला फक्त!

तसंच आम्ही जगन्नाथाचे दर्शन झाल्यावर, जेवायला एका हॉटेलमध्ये गेलो. देवळात, कडक सोवळ्यात जो जो नेवेद्य केला जातो, खूप पदार्थ खूप प्रमाणात केले जातात रोज! (ते सगळं वर्णन करायचं तर खूपच सांगावं लागेल, असो.) तर तो बाहेरच्या हॉटेलमध्ये प्रसाद म्हणून पोचवला जातो. कांदा-लसूण विरहीत अतिशय चविष्ट असे जेवण, थाळी सिस्टीम मध्ये हॉटेलमध्ये उपलब्ध होते. निकिता तशी मोठी होती, पण खाण्याचा आनंद! म्हणून आम्ही त्या हॉटेल वाल्याला म्हटलं की तीनच थाळ्या द्या. आम्ही चार थाळ्यांचे पैसे देतो. मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक अतिशय रुचकर होता. आम्ही अगदी खुश झालो.
जेवण झाल्यावर बिल द्यायला गेलो, तर पुन्हा तेच अगत्यशील बोलणं,"३ थाली के ही पैसे देना, बच्चीने कुछ  खायाभी नही." अरे, हे ओरिसाचे लोक कुठल्या मुशीतून घडलेत?"
                  हॉटेलच्या खाली ओपन गार्डन मध्ये एक साऊथ इंडियन काउंटर केलं होतं. तिथे सकाळी एक अम्मा यायची. तिच्या हातचे गरमागरम डोसे खातानाही अगदी होमली वाटायचं. आग्रहाने, प्रेमाने मस्त खाऊ घालायची. तसंच तिथे कावड घेऊन एक माणूस यायचा. मी वरून पाहिले, तर त्या कावडीत काय असेल ?असा प्रश्न मला पडला. काय असेल बरं त्यात? तर मस्त चवीचे ताजे ताजे रसगुल्ले! तोही तसाच, टिपिकल ओरिसा!
            जेव्हा आम्ही बाहेर फिरायचो, तेव्हा खूप जाणवायचं ,इथे खूप गरिबी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट विशेष नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. काही भागांमध्ये तर खूप हलाखीची परिस्थिती वाटली. पण असं असूनही, प्रत्येक ठिकाणी जे अनुभव आले, ते पाहून मनाची श्रीमंती काय असते, ते समजलं!

No comments:

Post a Comment