आपल्यापैकी बऱ्याच जणांना संगीताची आवड असते. त्यातल्यात्यात "गाणी ऐकणं" हा बहुतेकांचा छंद असतो. सुमधुर संगीत नेहमीच हौशी मनाला आनंद आणि उ भारी देत असतं. एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवत असतं. काही गाणी तर अशी असतात, त्यातील शब्द धड समजणारे नसतात, अर्थ देखील असतोच असे नाही;पण चाल, रिदम, आणि एकूणच ती गाणी ऐकल्यावर माणूस त्यात रंगून जातो. काही गाणी मात्र आयुष्याचा सारा सारच सांगून जातात .पुस्तकी ज्ञान नसलेल्या बहिणाबाई "अरे संसार, संसार म्हणत पूर्ण संसाराचं तत्वज्ञान सांगून जातात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर---- चटके,मग ते अग्नी चे असोत, उन्हाचे असोत वा दुःखाचे--- तव्याचा चटका लागल्याशिवाय भाकरी ची गोडी कळत नाही, तसेच दुःखाचे चटके सोसल्याशिवाय सुखाची चव चाखता येत नाही,हे त्या शाळा कॉलेजात न गेलेल्या बाईने किती सहज सांगून टाकले. आयुष्य हे चुलीवरल्या कढइतले कांदे पाहे म्हणत म्हणत काही गाणी "जिदगी के रंग कई रे " म्हणत जीवनाची सफर घडवून आणतात,तर काही गाणी "जिंदगी, कैसी है पहेली हाये, कभी ये हसाये, कभी ये रुलाये---"म्हणत वास्तवाची जाणीव करून देतात . तर काही "सुख दुःख दोनो, असलेल्या जीवनाच्या नावेची ओळख करून देतात. थोडक्यात, जीवनात सुख,दुःख, आशा,निराशा हे खेळ सतत सुरूच असतात.. अशी कितीतरी उदा. देता येतील; पण हल्ली माझ्या मनात घोळत असलेलं आणि माझ्या मनाचा ताबा घेतलेलं असं गाणं म्हणजे "आशा" सिनेमातील----
Friday, December 11, 2020
कभी धूप,तो कभी छाव
"अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है
कोई लुट जाता है
कोई लूट जाता है----"हे गाणं.
किती यथार्थ ओळी, नाही? प्रत्येकाचं प्राक्तन वेगळं, प्रत्येकाचे भोग वेगळे, प्रत्येकाच्या वाट्याला येणारी सुख-दुःख वेगळी, आनंद वेगळा आणि येणाऱ्या अडचणी देखील वेगळ्या. आपल्या हिश्यात जे , जसे येईल ते, तसेच स्वीकारावे लागते. हे प्रत्येकाला समजते, पण उमगत नाही हेच सत्य आहे. कुठलाही कठीण प्रसंग ओढवला, मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण झाली तर आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडणारे वाक्य म्हणजे, "हे माझ्याच वाट्याला का? , माझ्याच हीश्यात यायच्या होत्या सर्व अडचणी? मीच कोणतं असं पाप केलंय, की कुणाचं काही घोडे मारलंय म्हणून माझ्या वाट्याला हे असलं काही यावं?-----वगैरे,वगैरे-- --- तेच आनंदात, सुखात असताना माणूस असे सहसा कधीच म्हणणार नाही की माझ्याच वाट्याला इतके सुखाचे क्षण का म्हणून? हा असा आनंद, असे सुख जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवे. मग आपणच स्वतःचं समर्थन करून घेणार की शेवटी हा प्राक्तनाचा भाग आहे. ज्याचे भोग त्यालाच भोगावे लागतात. असो. "आशा" मधलं लता दीदींनी गायलेलं हे गाणं--- त्यातील ह्या आर्त ओळी मनाला स्पर्शून जातात. "
कोई लुट जाता है
कोई लूट जाता है ---" ह्यातील दोन्ही ओळीतील "लूट" हा शब्द परस्परविरोधी अर्थ असलेला, पण जगण्यातील अवघा अर्थ, सारांश सांगून जाणारा---
लुट --- कुणी लुटलं जातं, असहाय्य पणामुळे, तर कधी परिस्थिती मुळे, कधी स्वभावामुळे. मोठा मासा लहान माश्याला गिळतो, तसे कमजोर व्यक्ती नेहमीच बलशाली व्यक्तींपुढे लाचार ठरतात. कधी मनाने तर कधी शरीराने. सर्वस्व गमावून बसायची वेळ येते,होत्याचं नव्हतं होऊन जातं---लुटलाच जातो ना माणूस?
लूट--- हिसकावून घेण्याची, बळजबरी गोष्टी प्राप्त करून घेण्याची क्षमता असलेली माणसे असतात काही. ते मागचा पुढचा किंवा योग्य अयोग्य असा कुठलाही विचार करण्या पलीकडे गेलेली असतात. एखादी गोष्ट हवी असल्यास कुठल्याही मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. ह्या गाण्यात जरी "संवेदनशील" मनाचा संदर्भ विचारात घेतला असला तरी शेवटी तो दोन परस्परविरोधी मानसिकतेत असलेला फरक आहे, हे लक्षात येते. कुणी लुटलं जातं तर कुणी लुटून नेतं---- अपना अपना हिस्सा है
अपना अपना किस्सा है-------
हे झालं गाण्यांच्या संदर्भात. पण माणूस देखील कधी कधी नकळतपणे असं काही बोलून जातो की ऐकणारा अंतर्मुख झाल्याशिवाय रहात नाही. क्वचित हेतुपुरस्सर तर क्वचित अजाणतेपणी, पण विचार करायला भाग पाडतील अशी काही वाक्ये बोलली जातात.
त्या दिवशी आम्ही उभयता आमच्या कामानिमित्त रामदास पेठ मध्ये निघालो होतो. रस्त्याने जाताना ह्यांच्या मित्राच्या डॉक्टर मुलांच्या हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन मिनिटं थांबलो, हे त्यांच्या मित्रांसोबत बोलले आणि आम्ही पुढे निघालो. मी सहजच म्हटले की ह्या लॉक डाउन च्या काळात चांगले काम लागले की तुमच्या मित्राला. बांधकामावर लक्ष ठेवण्याचे. लक्ष ठेवणेही होते आणि टाईम पास ही. त्यावर हे जे बोलून गेले त्यामुळे मी विचारात पडले. हे म्हटले, "तसेही उतारवयात बाप हा मुलाच्या घराचा वॉचमनच असतो." आम्हाला स्वतःला काही पूर्वानुभव असण्याची शक्यता नाही कारण आमच्या लेकाचे अजून लग्न व्हायचेय आणि आम्ही आमच्याच घरात वास्तव्यास आहोत.
पण नकळतपणे जेव्हा अशी वाक्यं बोलली जातात, तेव्हा त्यात खरोखर काही खोलवर अर्थ दडलेला आहे का हा चाळा ही मनाला लागून जातो. आणि मग सुरू होते, विश्लेषण--- आसपासच्या व्यक्तींविषयी, जवळच्या नात्यांविषयी--- बाप आणि वॉचमन ? छे: कसंसच वाटतं नाही? खरं सांगायचं तर कधी कधी "बाप" ह्या व्यक्तिरेखे विषयी कीव यायला लागते. कारण झाडून सारे कवी, लेखक, चित्रकार, "आई"च्याच प्रेमात बुडालेले असतात; पण बाप मात्र बहुतांशी दुर्लक्षितच असतो. त्याची मुलांवरची माया, प्रेम, काळजी करणं हे सगळं पडद्याआड दडलेल्या कालावंतागत असतं. कदाचित त्याला मोकळेपणी, उत्स्फूर्तपणे व्यक्त होता येत नसल्यामुळे किंवा आपलं प्रेम बोलून दाखवता येत नसल्यामुळे म्हणा; पण तो कितीही झटत असला मुलांसाठी, तरी मुलांना आईची ओढ जास्त वाटते, तीच अधिक जवळची वाटते, हा बहुतेक घरातील अनुभव आहे. आणि उतारवयात करण्यासारखे फारसे नसल्याने,शारीरिक क्षमता कमी झाल्याने किंवा रिकामपण खायला येत असल्याने---अशा बऱ्याच कारणांमुळे तो आपला वेळ आवडत्या आणि नावडत्या कामातही घालवायला बघतो. ह्या सगळ्यात बाजारहाट करणे, नातवंडांना सांभाळणे, त्यांना बागेत खेळायला घेऊन जाणे, शाळेत नेऊन सोडणे, घराकडे आणि पर्यायाने नातवंडांकडे लक्ष देणे ही कामे ओघानेच अंगावर घेतली जातात, किंवा स्वखुषीनेही केली जातात; पण म्हणून का तो वॉचमन?
असा विचार येताक्षणी मला नजरेसमोर "ह्यांचा " लेकाच्या दाराशी केविलवाणे होऊन बसलेला चेहरा दिसायला लागला आणि अगदी भडभडून आले. छे: आयुष्यभर रुबाबात राहिलेला, स्वतःच्या मनाने ,स्वतःच्याच मर्जीने जगलेला माणूस, मग तो कुणी का असेना, अगदी कुणीही---- शेवटपर्यंत त्याला मानानेच जगता यायला हवं, वॉच मन ही कल्पनाच खूप विसंगत आहे. मी घरी आल्यावर निवांतपण असताना हे सगळं बोलून दाखवलं ह्यांच्या जवळ,तर खो खो करून हसायलाच लागले.
"अरे देवा! धन्य आहेस बाई तू. कुठला विषय कुठे नेतेस? अग, मी तर अगदी सहजच बोलून गेलो."
मी पण मनातल्या मनात कबूल केलं ,"मला पण तर सवयच आहे ना, विनाकारण डोक्याला हात ?? मारून घयायची🤦♀️नव्हे, काम लावून घयायची. आदत से मजबूर, काय करणार?"
आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. सरळ, साधं आयुष्य क्वचितच कुणाच्या वाट्याला येतं. हार-जीत, यश-अपयश, सुख -दुःख--सारख्याच ताकदीने पेलायला नी पचवायला मनही खंबीरच हवं. दुसऱ्याला सांगणं जितकं सोपं तितकंच स्वतः आचरणात आणायला कठीण अशा ह्या गोष्टी असतात.
असो.
तर एकंदरीत हे असं आहे. कुठल्या गाण्यावरून, कुठल्या वाक्यावरून मन कुठे कुठे उड्या मारून येईल आणि कधी कशावर डोके आपटून घेईल, नेम नाही. तुमच्या बाबतीतही होतं का हे असं? कारण नसताना, फेरफटका?
माणिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment