Saturday, September 12, 2020

गच्ची

 




गेल्या जवळजवळ सहा महिन्यांपासून आपण सगळेच कोरोनाकाळ अनुभवतो

आहोत. आता ’ रोज मरे त्याला कोण रडे’ अशा काहीशा स्थितप्रज्ञ स्थितीला
आपण सगळेच येऊन पोहचलेलो असलो तरी काही घटना आपल्याला हादरवून टाकतात हे
खरेच. घराबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आपल्या प्रत्येकाचं जग
ह्यामुळे आकुंचन पावलं आहे. आता हळुहळु सगळं सुरळीत करण्याचे प्रयत्न
सुरु झालेत पण प्र्त्येकाच्याच मनात अस्वस्थतेचं मळभ काही काळ राहणार हे
निश्चित !
           ह्या नवीन परिस्थितिशीही आपण हळुहळु जुळवुन घ्यायला लागलो
आहोत . प्रत्येकाचं आपलं रुटिन सेट झालंय . कोरोना काळापासुन माझ्या
नव्हे आमच्या तिघांच्याही रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलीय ती आमची
गच्ची !


          तसं बैठ्या घरात राहणार्‍याला गच्चीचं नाविन्य नाही पण
सहनिवासात राहणार्‍या आम्हाला गच्ची कोरोनाकाळात प्रिय झाली. दिवस दिवस
घरात बसून राहिल्यानंतर संध्याकाळी आमचे पाय आपोआप जिन्याकडे वळायचे. तसं
इथे रहायला येऊन आम्हाला जवळपास पंधरा वर्ष झालीत , आमच्या सहनिवासाच्या
जवळ एक लग्नाचे कार्यालय आणि लॉन आहे , सुरवातीला आदित्य लहान असतांना
त्याला तिथला बॅंड आणि नेत्रदिपक रोषणाई दाखवायला आम्ही गच्चीवर जायचो पण
अर्थातच  नंतर त्यातलं नाविन्य कमी झालं , मग सहभोजन , कोजागिरी ,
नववर्षाचा स्वागत कार्यक्रम अश्या काही कारणांनी गच्चीचा सहवास घडायचा पण
नंतर कोण एव्हढं 4 जिने चढुन जाईल असा विचार करुन हळुहळु ते कमी होत गेलं
आणि मधल्या 7,8 वर्षात तर हे सगळं बंदच झालं .
          कोरोनाकाळ सुरु झाला आणि बाहेरचा व्यायाम घरात आला
.उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरचा व्यायाम झाला की संध्याकाळची मोकळी हवा
खायला म्हणून गच्चीवर जाणं सुरु झालं . इतर काही शेजारी पण यायचे मग जरा
वेळ गप्पाटप्पा करुन परत सगळे आपापल्या घरात . आजुबाजुला असे अनेक
सहनिवास असल्याने तिथले लोकही संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी गच्चीवर यायचे
, मी त्यांना ’ गच्चीवरचे शेजारी ’ म्हणते . मग ’ भोचकपणा ’ किंवा ’
चौकसपणा ’ नावाचा जो एक गुण [?] आपल्या सगळ्यांमधे असतो त्याला जागुन ,
"आज ही एकटीच दिसतेय , मैत्रीण आली नाही वाटतं!" , " बाप रे! हे घर
खटल्याचं दिसतंय , बरीच मंडळी असतात वरती " अशी माझी स्वगतं चालत असत.
          मग काही दिवसांनंतर इमारतीच्या वरच्या भागावरुन ही कुठली इमारत
असेल असे आमचे ’ओळखा पाहू’ चे खेळ चालायचे आणि मग काही कामानिमित्त बाहेर
पडल्यावर ती इमारत अगदी खालपासून वरपर्यंत पाहिली जायची . जसजसा उन्हाळा
सरुन पावसाळ्याची चाहूल लागली तसतसे निसर्गातले अनेक जादुई विभ्रम
दिसायला लागले. विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले, एकदोनदा तर चक्क
सातपुड्याचे दर्शन झाले.
         

आकाशात तर काय रोजच जणू जादुचे प्रयोग सुरु झाले . रोज

वेगवेगळी रंगसंगती , आकार साधून आकाश जणू नटुन बसलेले असायचे. कधी नुसतेच
पांढरेशुभ्र ढगांचे पुंजके इतस्ततः भटकत असायचे तर कधी त्यांची जागा
काळेकुट्ट ढग घेत, कधी हेच काळे ढग सोनेरी जर लेवुन यायचे. लाल , गुलाबी
, केशरी, करड्या रंगाच्या इतक्या विविध छ्टा पाहिल्यावर आपल्याला रंगकाम
येत नाही ह्याचे मला वैषम्य वाटत असे. निसर्गाइतकी अद्भूत रंगसंगती
पाहिल्यावर " ये कौन चित्रकार है ?" असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक नाही
का ? , ह्या सगळ्या जादुई पार्श्वभूमीवर अस्ताचलावरचे ते देखणे सुर्यबिंब
तर डोळ्याचे पारणेच फेडायचे.
          पावसाचा जोर वाढल्यावर हळुहळु गच्चीवरचे प्रेक्षक कमी होऊ
लागले पण आम्ही मात्र नियमित जायचो. आता दिवस हळुहळु लहान व्हायला लागलाय
पण कधीकधी चांदण्यांची खडी पसरलेल्या निरभ्र आकाशाखाली बसणं किंवा
अभ्राच्छादित आवरणाखाली बसून इतस्ततः पसरलेले ते पुंजके बघत राहणं हे
स्थळकाळाचे भान विसरायला लावणारं आहे हे खरे. आपल्यातली सगळी नकारात्मकता
जणू ह्या विश्वाच्या अथांग पोकळीत गुडुप होते आहे आणि तिथली चिरंतन चेतना
आपल्या ठायी जन्म घेते आहे असा अनुभव निसर्ग आपल्याला नेहमीच देतो .
          काही काळाने सध्याची सगळी परिस्थिती सुरळीत होईल , आपण परत
आपल्या व्यापात गुरफटुन जाऊ , वाया गेलेला काळ भरुन काढण्याच्या
निमित्ताने कदाचित दुप्पट वेगाने धावायला लागु. स्पर्धेत अव्वल
येण्याच्या मिषाने अष्टौप्रहर काम करु त्या नादात गच्चीवर जाणं कमी होत
होत हळुहळु बंद होईल, पण ती कायमच स्मरणात राहिल. अस्वस्थतेचा काळ परत
आला तर निसर्गाकडे उघडणारं हे दार आपल्या जवळच आहे ही हमी मात्र त्यामुळे
कायम राहिल

No comments:

Post a Comment