Monday, September 16, 2019

श्रद्धा आणि परंपरा

कधी कधी मला स्वतःचाच इतका राग येतो, मी नेमकी कशी आहे? हे माझं मलाच नीटसं कळलेलं नाहीये. मला माझं स्वतःचं वेगळं असं मत बहुतेकदा मांडता च येत नाही, की मला माझं असं काही मतच नाही? प्रत्येक बाबतीत दोलायमान स्थिती असते, की हे पण बरोबर आहे, त्याच वेळी ते पण बरोबर असूच शकतं.😃 इकडली स्वारी तर नेहमीच म्हणते, तू सदानकदा इतकी confused का असतेस?. खरंय, मला कोणताच निर्णय झटकन घेता येत नाही आणि एकांगी तर नाहीच नाही. पण त्यावर मी स्वतःचेच समाधान करून घेते की मी कोणत्याही बाबीचा सर्व दृष्टीने विचार करते. मला नाण्याच्या दोन्ही बाजू पटतात, म्हणूनच गोंधळ होत असावा; पण मग हे बरोबर की चूक? कदाचित ह्याच कारणामुळे मी फारशी कुणावर नाराजही होत नाही वा गैरसमजही करून घेत नाही. पण हे नेहमीच योग्य ठरते असे मात्र नाही. खूपदा मनःस्ताप ही होतो. आपल्याला नाण्याच्या दोन बाजू एकाच वेळी कशा पटू शकतात? त्यामुळे आपण कुठल्याही एका बाजूने न्याय देण्यात कमी पडतो. आता येते मूळ मुद्द्यावर. 

       माझ्या आईकडे म्हणजे माहेरी देवा धर्माचं, पूजे आरचेचं फार स्तोम नव्हतं. सोवळे ओवळे तर अजिबातच नव्हते. ताई आप्पा दोघेही नोकरी करत होते. ( आम्ही आईला ताई आणि वडलांना आप्पा म्हणायचो)  हो, पण दानधर्म, तेही सत्पात्री दान हा प्रकार मात्र निश्चित होता.  मला आठवते, दाराशी आलेला भिकारी कधीही उपाशी गेला नसेल.  ताई, आप्पांसाठी तो अतिथीच असे.  माझे बाबा खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ( आई, वडील दोघेही शिक्षक होते) जेवणावळी चे आयोजन करत असत. माझा मोठा भाऊ देखील, जो प्राचार्य होऊन निवृत्त झाला, सुरुवातीच्या काळात गरीब मुलांना मोफत शिकवत असे. इकडे सासरी देखील दानधर्म होतो, पण खूपदा त्याचा अतिरेक होतो.  न झेपतील, इतक्या पूजा, भागवत पारायण, त्या निमित्ताने भरमसाठ खर्च----   सासूबाईंच्या दरवर्षी श्रावण महिन्यात कसली ना कसली तरी लाखोली वाहण्याचया कार्यक्रमात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पूर्ण घर पिळून निघते. एक लाख पारिजात ची फुले, एक लाख मातीचे शिवलिंग, एक लाख बेलाची पाने--- मग हे त्या एकट्या करू शकत नाही म्हणून अख्ख घरच कामाला लागणार. फुले वेचून आणा, ओली माती आणा, त्याचे कणिक भिजवतो तसे भिजवून छोटे छोटे शिवलिंग तयार करा, ते पाटावर रचून मोजायचे काम करा, बेल निवडून, मोजून ठेवा, एक ना दोन.  सासऱ्यांचे श्राद्ध असेल त्या दिवशी घरातील मंडळींसह ( घरातीलच मेंबर्स त्यावेळी 20 ते 22 होते).  बाहेरची 5 ते 7 मंडळी जेवायला बोलवायची, जे नाही आले त्यांच्या घरी घरपोच डबा पोचवायचा.  म्हणजे घरातील बायकांनी 4/5 वाजेपर्यंत किचन मधेच अडकून रहायचे.  आता काळा नुसार बऱ्याच बाबतीत बरेच बदल होत आहेत. पण त्यावेळी मला वाटायचे, हा पैसा एखाद्या गरीब, होतकरू पण हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला तर? पण परंपरेचया नावाखाली माझा आवाजही दबला जात असे.  घरात कुळाचार असेल तर घरातील बायका अंघोळ करूनच सर्व कामे करणार, इतपत ठीक आहे; पण मधेच जर नवऱ्याचे, मुलांचे कपडे धुवावे लागले( कामवाली चया गैरहजेरीत)  तर पुन्हा अंघोळ करून कामाला लागायचे.  अर्थातच, अंघोळ झाल्यावर मग शिळ्या कपड्यांना  स्पर्श ही करायचा नाही, अंथरुणाला स्पर्श करायचा नाही--- बापरे बाप!  सुरुवातीला मला हे सगळं फारच जड गेलं. आमच्या सासूबाई जेव्हा भागवताला बसत, तेव्हा दिवसभर बाथरूम ला देखील जात नसत.  अजूनही माझ्याकडे महालक्समी साठी येताना माझ्या जावा परत अंघोळ करून येतात आणि सगळी पूजा आटोपल्याशिवाय बाथरूमला जात नाहीत. अजून एक नियम होता, होता अशासाठी म्हणते की मी तो नियम आता पाळत नाही, तो असा की महालक्समी च्या त्या 3 दिवसात घरातील अन्न बाहेर जाऊ द्यायचे नाही. म्हणजे वाया गेले तरी चालेल पण कुणाला द्यायचे नाही. या आणि अशा कितीतरी गोष्टी मला पटत नसल्या तरी त्यांची श्रद्धा, घरची परंपरा म्हणून मी करत आले; पण आता मी बरेच बदल करायला किंवा स्वतःपुरते बदलायला शिकले आहे.  जसे की श्रावण महिन्यात मी फक्त एकच बेल शिवाला वहाते, " एक बिल्वम शिवार्पण म" म्हणत. कारण राजेश्वरातल्या मंदिरात वाहिलेल्या बेलांवरून लोक चालतात, चढवलेल्या पाण्यावरून चिकट झालेल्या जागेवरून घसरतात.  घरचया, मंदिरातल्या देवाला फुले वहाण पण मी बंद केलयं. माझ्या सोयीनुसार, तब्येतीनुसार मानस पूजा करते. मनापासून दोन्ही हात जोडून देवाची क्षमा मागते, "हे देवा, चुकले असेल तर माफ कर" .  सगळ्यात मोठा अनुभव आम्ही गया ला गेलो होतो तेव्हा आला. पितृदोष नाहीसा व्हावा म्हणून आपण इतकं काय काय करायला तयार असतो; पण तिथले एक एक प्रकार पाहिल्यावर श्रद्धा, परंपरा, ह्या सगळ्या गोष्टीतील फोलपणा जाणवतो . प्रयाग संगमावर तर पुजारी तिथेच पाण्यातच थुंकी टाकतात आणि तिथले पाण्यातले नारळ उचलून परत तेच आपल्याला विकतात. 5 ते 10 हजार पर्यंत रकम मागतात आणि नाही म्हटलं तर तुमचे पितर असेच भटकत रहातील, त्यांना कधीही मोक्ष मिळणार नाही म्हणून आपल्याला धमकी देखील द्यायला कमी करत नाहीत. असो.प्रयाग ला संगमावर स्नान करण्यासाठी सासूबाईनी तेव्हा खूप आग्रह केला; पण आमच्या समीरने मला नाहीच करू दिली, त्या क्षणी देखील मी द्विधा मनस्थितीत होते. तेव्हा काय  हा आगाऊ पणा, किंवा मायलेक भलतेच हुशार समजतात स्वतःला, काय हा नास्तिक पणा, अशा तर्हेचे बोल नक्कीच लावले गेले असणार.  ह्या नास्तिक पणाचया कल्पनेवरून लोकप्रभामधील एक लेख आठवला त्यातले सार फक्त इथे देण्याचा मोह आवरता घेता येत नाहीये, तो असा

  "नास्तिक म्हणजे दुर्जन नव्हे.. नास्तिक आपले विचार कुणावरही लादत नाहीत. देव,ईश्वर, परमेश्वर म्हणाल तर ह्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं कोण आहे? तरी देखील बहुसंख्य लोक त्याला मानतात.याचे कारण त्याच्या भीतीने तरी मानवजात सुरक्षित रहावी. नास्तिक "चार्वाक" आपलाच ना?  आस्तिक म्हणवणार्यांनीच मानवाला स्वर्ग देऊ केला; पण त्यासाठी इतरांना मारण्याची, मरणाची अट घातली. जो आस्तिक जन्माला येताना ना तृण आणू शकला, ना तृण निर्माण करू शकला, तो म्हणे स्वर्ग- नरक चा निवाडा करणार. धर्माने नास्तिकाना नाकारलेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, " जेथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून ईश्वरी प्रयत्न सुरू होतात. आस्तिक, नास्तिक एक जीवन प्रवासच आहे, स्वतः अनुभवायचा."   एकंदरीतच  बऱ्याच ठिकाणी परंपरा आणि श्रद्धेच्या नावाखाली खूप चुकीचया गोष्टी केल्या जातात आणि भिडस्त स्वभावामुळे त्या पटत नसल्या तरी स्वीकारल्या जातात. जाता जाता अजून एक खंत व्यक्त करते आणि थांबते. महालक्समी च्या वेळी जे राशीचे धान्य असते, ते आणि बाहेरून आलेले, ते सर्व वापरून तेवढया लोकांना बोलावून जेऊ घालायचे. . मी ह्या बाबतीत खूप प्रयत्न करू न पाहिला की हे धान्य आपण एखाद्या आश्रमाला देऊया; पण आजतागायत मी त्यात यशस्वी झाले नाही.🙏😊

 माणिक नेरकर.

Thursday, September 12, 2019

देणाऱ्याने देत जावे...

नुकताच एक प्रसंग घडला, माझी मैत्रीण अध्यक्ष असलेल्या एका संस्थेने गरीब मुलांसाठी शाळेचे साहित्य अन जुने गेम्स वगैरे देण्याचे आवाहन केले. तो मेसेज मी बाकी व्हाट्सअप ग्रुप वर पाठवला. ओळखीच्या एका वहिनींनी स्कूलबॅग्स ,वाटरबॅग्स ,टिफिन, शूज, माझ्याकडे आणून दिले.
संस्थेचा प्रोजेक्ट लांबणीवर पडल्यामुळे ते सामान माझ्याकडे बरेच दिवस पडुन होते.
माझ्या कामवाल्या मावशी रोज ते बघत असतील.एक दिवस त्यांनी विचारलं,"हे मी नेलं तर चालेल का?" मी म्हंटल "अग ने न त्यात काय!" पण नंतर म्हंटल "थांब जरा,ज्यांनी हे सामान आणून दिलंय त्यांना एकदा विचारू दे".म्हणून ज्यांनी सामान दिल होत त्या वहिनींना फोन केला. त्या म्हणाल्या, 'एखाद काही नेऊ दे त्यातल,बाकी सगळं मात्र त्या संस्थेलाच द्यायचंय.त्यांची फारशी इच्छा दिसली नाही म्हणून मग मी शोधून माझ्या कडलीच एक बॅग अन पाण्याची बाटली कामवाल्या मावशीना दिली.
काही दिवसांनी मैत्रीण ते सामान घेऊन गेली.
एकदा भेट झाल्यावर तिला विचारलं ,झालं का तुमचं सामान वाटप! 
"हां,चालू है,आपने दिया हुआ सामान, मेरे बाई ने मांगा तो मैने उसे ही दे दिया,वो भी तो गरीब ही है ना!"
अरेच्चा! मी त्या वहिनींच्या इच्छेचा विचार करून माझ्या कामवाल्या मावशींना नाराज केलं,आणि हिनी मात्र कसलाही विचार न करता देऊन टाकलं!
अर्थात तिनी काहीच चुकीचं केलं नव्हतं, शेवटी कोणीही दिलेल दान गरजू पर्यंत पोचणं महत्वाचं! मग ती बाई, माझी असो तिची, किंवा अजून कोणाची!
या प्रसंगानंतर मनात आलं ,दान देताना ते कोणाला,कोणत्या प्रकारे,कोणत्या स्वरूपात करायचं याबद्दल प्रत्येकाच्या मनात काही आयडिया फिक्स असतात.
कोणी एखाद्या  संस्थेशी जोडल्या गेले असतात,उदा.कोणी मूक बधिर मुलांसाठी कोणी अंध मुलांसाठी,कोणी अनाथ मुलांसाठी कोणी गोरक्षण साठी काम करत.त्या संस्थेबद्दल,तिथल्या लोकांबद्दल त्यांना विशेष आपुलकी असते.त्यांच दुःख जवळून पाहिल्यामुळे,भावनिक गुंतवणूक होते।आणि त्यामुळे साहजिकच तिथे  दान करण्याकडे त्यांचा कल असतो.
मला स्वतःला,आई वडील नसलेल्या मुलांबद्दल विशेष आपुलकी वाटते.
आई -वडील दोघंही किंवा दोघांपैकी कोणी एकही असलं,तरी ते मुलांसाठी काय वाट्टेल ते करून त्यांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
अनाथ मुलांच्या बाबतीत, बाकी गोष्टींचा अभाव तर असतोच पण माया ममता,प्रेम हे सुद्धा त्यांच्या वाट्याला येत नाही. ते तर आपण देऊ शकत नाही .मग निदान बाकी गोष्टी त्यांना सहजसाध्य व्हाव्या हा त्यामागचा उद्देश!
बाहेर लोकांना ब्लॅंकेट,छत्र्या, वाटण्यापेक्षा जे लोक आपल्यासाठी काम करतात,मेहनत करतात त्या स्टाफ चा त्यावर पहिला हक्क!अस सुभाष च मत.
कोणी अन्नदान श्रेष्ठ मानत ,कोणी देहदान!
असा प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो.
दान कोणाला द्यावं याबाबतीत जस प्रत्येकाच वेगळं मत,तसच केलेल दान लोकांना सांगावं की नाही,याबद्दल पण मतांतरे आढळतात.
जुन्या काळी अस म्हणायचे,'उजव्या हातांनी दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळायला नको'.पण आजकाल जाहिरातीचा जमाना आहे.आपण करतो ती प्रत्येक गोष्ट जगाला कळली पाहिजे हा आजचा फंडा! 
मग त्यात काही,पेपर मधे फोटो छापून येण्यापुरत दानधर्म करणारे असतात, काही कण भर देऊन मण भर दिल्याचं दाखवणारे असतात.काही मात्र, केलेलं दान गुप्त ठेवतात .तर काही लोक  दुसर्यांना प्रेरित करण्याच्या हेतूने  दानधर्म केल्याची जाहिरात करतात.
दुसऱ्यांनी केलेला दानधर्म बघून का होईना ,पण एकंदरीत, दानधर्म करणाऱ्यांची संख्या पाहिले पेक्षा नक्कीच वाढली आहे.
देणारे हात हजारो झाले असले तरी घेणारे हात ही लाखो करोडो आहेत!
त्यामुळे कोणत्याही प्रकारे असो पण फारशी चिकित्सा न करता,शक्य असेल तेवढं अन शक्य असेल तिथे,'देणाऱ्याने देतच राहावे' हे मात्र खरे !
  

Wednesday, September 11, 2019

झोप

"अरे कुंभकर्णा,  ऊठ आता, 12  वाजत आले  दुपारचे !काय  होणार आहे  या  नविन  पिढीचं?रात्र -रात्र  जागायचं  आणि  दिवसा  अशा  झोपा  काढायच्या! "
हा प्रसंग  हल्ली  बहुतेक  घरात  पहायला  मिळतो. कारण नविन  पिढीला  अभ्यास  करायचा  असतो  तो  रात्रीच ! बरं  सुट्टी  असेल तर  मग  तर  त्यांना  रात्री  खूपच  कामं  असतात. उदाहरणार्थ. .Web series, Facebook, Twitter, instagram,wa app chat etc.etc.......नविन  पिढी  कशाला, माझ्या  मित्र -मैत्रिणींपैकी कित्येकजण  रात्री  wa app वर 2.30, 3 वाजता  पोस्ट  टाकतात,तर काहीजण  पहाटे  चार वाजता! म्हणजे  काहींना निद्रानाश  तर  काहींना  झोप  कमी!
तर," झोप "! आपल्याला  कल्पना नाही, पण या एका  झोपेमुळे आपल्या  तब्येतीवर  किती  परिणाम होतो. रात्रीचे  जागरण, काहीजणांना job म्हणून, business चा  भाग म्हणून, विद्यार्थीदशेत अभ्यासासाठी करावे  लागते. तसेच  कलाकारांना  नाटक, सिनेमा, गाणं  यासाठी  रात्रीची  जागरणं  होतात, पण ती unavoidable  असतात. पण  त्यामुळेच  काही  कलाकार  व्यसनांच्या आहारी  जातात. पण  सामान्य  लोकांमध्येही  अलीकडे  निद्रानाश  हा  विकार  बळावत  चाललाय.
 त्याची कारणे  काय  असावीत  बरं? मला तर  नेहमीच वाटतं, की  सकाळी  उठल्यापासून झडझडून  कामं करावीत, नेहमी  चांगले  positive  विचार  करावेत, म्हणजे  रात्री  पाठ  टेकल्याबरोबर झोप  लागते. बरोबर आहे  ना? आता  मानसिक  तणाव  खूप  वाढलेत,घरी, कामाच्या ठिकाणी, सगळीचकडे!त्यामुळे  आपण  मनानेच  खूप   थकतो. मला  सांगा, घरी  सगळी कामं  आटोपून  शेतात दिवसभर  कष्ट  करणारीला झोपेचा कधी  problem  येत  असेल?

 दुसरा प्रकार म्हणजे अति झोप! तीही वाईटच! रात्री शांत व भरपूर झोप झाल्यावरही पुन्हा दुपारी पडदे वगैरे ओढून, रात्रीचा फिल तयार करून, गाढ दोन-दोन तास झोपणारे पाहिले की आश्चर्य वाटते. सकाळी लवकर उठायला आवडत नाही, व दुपारी झोपायला खूप आवडते, अशा प्रकारच्या मंडळींचा एक दावा असा आहे की आम्ही चान्स मिळेल तेव्हा झोपून एनर्जी स्टोअर करून ठेवतो, व योग्यवेळी योग्य तिथे वापरतो. उगाच सकाळी उठून खूडबूड करून घरादाराची झोप खराब करायची ?(आणि काय मोठे तीर मारतात सकाळी लवकर उठणारे?) ही त्यांची मते!
दुपारी जेवल्यानंतर वामकुक्षी घेतल्याने आपण फ्रेश होतो, हे मात्र नक्की! पण काहींची वामकुक्षी तासनतास चालते अशा लोकांना पाहणाऱ्यांनाच डिप्रेशन येतं. 
वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची दिशा यावर बरीच माहिती मिळते. डोके कोणत्या दिशेला असावं, पाय कोणत्या दिशेला असावेत, त्याचा झोपेवर होणारा परिणाम, शुभ दिशा वगैरे. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, पण मोठ्या शहरांमध्ये स्क्वेअर फिट चा भाव पाहता, लाखो रुपये खर्चून फ्लॅट घेताना, आपली आर्थिक सोयच पहावे लागते. मग कुठली दिशा अन् काय!
झोप लवकर व शांत लागावी, यासाठी खूप उपाय सुचवले जातात, वेगवेगळ्या शास्त्रानुसार!. जसे झोपण्यापूर्वी हातापायांना कोमट तेलाने मालिश करा किंवा मध घालून गरम दूध प्या. रात्री तिखट, तेलकट खाणं टाळा, कोमट तेलाने डोक्याला मालिश करा, सकाळी लवकर उठून पायी फिरायला जा.झोपताना बेडवर अरोमा थेरपी आॅईलचे दोन-चार थेंब शिंपडा, तसेच जायफळ, (भारतीय खाद्यसंस्कृतीतील गोड पदार्थांची चव वाढवणारे) असेच गुणकारी. यात आढळणारे trimyristin घटक शरीरातील स्नायू व चेतासंस्था आरामदायक स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते.

लहान बाळांना आपण अंगाई गीते म्हणून झोपवतो. म्हणजेच म्युझिक थेरपीचा मोठा परिणाम झोपेवर होतो! मला तर आताही झोप लागत नसली की,अशी music थेरपी  कोणीतरी apply  करावी  असं  वाटतं  खरं सांगा, तुम्हालाही असेच वाटतं नां?काश्! ऐसा होता!          पण त्या गोष्टीची नुसती कल्पना करायची आणि गप् झोपून जायचं!
इतक्यात मोदींच्या कमी झोपण्या बद्दल व त्यांच्या दिनचर्ये बद्दलच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. खरोखरच मोदी हे एक अजब रसायन आहे हे नक्की! कारण इतकी कमी झोप त्यांना पुरते, आणि सकाळी उठून ते तेवढेच फ्रेश दिसतात व तेवढ्याच उत्साहाने सर्व जबाबदाऱ्या, कामे पार पडतात. अगदी अशक्य वाटतं सगळं!
माझ्या परिचयात पण असे काही जण आहेत, ज्यांना अगदी कमी झोप पुरते. भाग्यवानच म्हणायचे त्यांना! नाहीतर आम्हाला जरा जरी झोप डिस्टर्ब झाली की दिवसभर आळसटलेले, निरुत्साही वाटत राहते.
तर मैत्रिणींनो, अशा या झोपेच्या वेगवेगळ्या सवयी! माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की, आम्ही दोघेही झोपताना छान चहा करुन पितो, (बापरे) झोप उडवण्यासाठी चहा माहित होता, हे नवीनच! चहाने अॅसिडिटी वाढते , इ.ला फाटा देणारे!
इंग्रजीत म्हण आहे की," Early to bed and early to rise, makes a man healthy, wealthy & wise"-आपल्याकडेही," लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे" ,म्हणतातच.
पण ही लवकर उठायची सवय लागणार कशी? कारण झोप अपुरी झाली तर दिवसभर निरुत्साही वाटेल.
जर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येत असेल, तर दररोज सकाळी थोडा वेळ आधीचा गजर लावा, म्हणजे हळू हळू लवकर उठायची सवय लागेल.
"What the most successful people do before breakfast" या पुस्तकाच्या लेखिका लाॅरा वंडरकॉम म्हणतात, सकाळचा वेळ आपला स्वतः चा असतो जो आपल्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून झोप आवरुन, लवकर उठणे जरूरी!
चला, झोपते आता! बरीच रात्र झालीय ! नाहीतर म्हणाल," लोका सांगे ब्रह्मज्ञान-----!"

स्मिताचे असणे! ....


अतिशय सौंदर्यसंपन्न अशा अभिनेत्रींच्या रांगेत 'स्मिता पाटील' हे नांव फिल्मी राजवटीत जरा आडवळणाच वाटत असलं तरी ते नांव समोर येताच आजही त्या सावळ्या मादक रुपाची ,त्या भेदक खोल काळ्याभोर डोळ्यांची, साध्याशाच पण उठावदार वेशभुषेची जिने समस्त रसिकजनांवर भुरळ घातली ,मला वाटत नाही तिला कोणी आजही विसरु शकले असतील. आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणार्या स्मिताला खरे तर आपण अभिनेत्री होऊ असे कदापिही वाटले नाही कारण तिच्या मनात तशी महत्त्वाकांक्षाच नव्हती. सुरुवातिला दूरदर्शनवर बातम्या देणे हाच तो काय पडद्याशी, तिचा आलेला संबंध!....

             सावळेपण म्हणजे शुद्ध भारतियपण !जे अतिशय देखणं असु शकतं हे कळलच मुळात स्मितामुळे.कदाचित् गोरेपणाला अतिमहत्त्व देणार्या या आपल्या देशात आणि या इंडस्ट्रीतही  आपल्या या रंगाला उजळ माथ्याने मिरवणारी ही तेज तर्रार अभिनेत्री रसिकांना लाभावी हे रसिकांच भाग्यच  म्हणाव लागेल!.....
     स्मिताला स्वतःच्या सडसडीत बांध्यांचा विलक्षण अभिमान होता.आणि आपल्या काळ्याभोर डोळ्यात जणू सगळच सामावण्याची ताकद  होती.
      
      साँवली सलोनी तेरी झीलसी आँखे
       इनमे न जाने कहाँ खो गया है मेरा दिल

बस !..या ओळींनी तिच्या सौंदर्याची पुरती ओळख आपल्याला होते. 
       हिरोईनींसाठी सिनेमा म्हणजे  केवळ सुंदर दिसणं ,सिनेमा म्हणजे केवळ नाचगाण करणं,सिनेमा म्हणजे फक्त आणि फक्त शोभेची बाहुली होऊन राहणं या सगळ्या प्रचलित व्याख्येला सुंदर वळण देणारी अभिनेत्री ठरली ती स्मिता !.....आता कळला शब्दांमधला फरक ! प्रथम म्हणाले मी हिरोईन आणि नंतर म्हणाले अभिनेत्री. अभिनेत्री जी जीवंत अभिनय करणारी प्रत्येक चरित्रात प्राण ओतून ते पात्र रसिकांच्या मनःपटलावर कोरणारी.........
        जिला आपण अभिनेत्री होऊ हेच ध्यानीमनी नव्हतं आणि अचानक तिचा  ftii चा सहाध्यायी मित्र जब्बारच्या 'सामना'मधून बारिकशी चमकण्याची संधी मिळाली आणि नंतर श्याम बेनेगलांनी तर तिचं सोनच केलं!  एखाद्या रत्नपारख्यानी अगदी दुर्मिळ रत्नाची पारख करावी तसंच !......आणि तिचं समांतर चित्रपटातून चित्रपसृष्टीत पदार्पण झालं.
     स्मिता म्हणजे समुद्राच्या लाटा!.... ज्या ऊत्तम दर्यावर्दीनेच पेलाव्यात, स्मिता म्हणजे झंझावात!...... वार्यालाही सळो की पळो करुन सोडणारा ,स्मिता म्हणजे सळसळती उर्जा !........सुर्यालाही मागं टाकणारा .काय आणि किती ,,,,.,!किती आणि कसे सांगावे !....शब्दांच्या चिमटीत न पकडता  येणार नांव म्हणजे स्मिता आणि फक्त स्मिताच !.....
     अशा या महान तारकेचा चित्रपटप्रवेश 'चरणदासचोर ,[च्या माध्यमातूनृ जरा उशिराच झाला. त्यानंतर निशांत, अंकुर,मंथन अशा विविध विषयांना हात घालणार्या चित्रपटातून तिने ठसा उमटविला  भूमिका प्रथम असो वा दुय्यम अभिनयाची खोली अगदी मनापासून गाठून तळ शोधण्याच्या स्मिता सतत प्रयत्नरत असायची. मंथन मधली तोंडात पदर डोळ्यात भरगच्च काजळ भरलेली काठेवाडी स्त्री असो की,जैत रे जैतमधली अंगात चोळी आणि कमरेला घट्ट गुडघ्यापर्यंतच्या पातळातली चिंधी ,वा चक्रमधील पाठकोर्या पाठीतली अम्मा असो वा उंबरठामधील कडक कॉटनच्या साडीतली ध्येयवेडी सुलू किंवा अर्थमधली दुभंगलेल व्यक्तिमत्त्व आणि वेदनामय आयुष्याला सामोरी जाणारी कविता असो .त्या भूमिका म्हणजेच' स्मिता!' त्याजागी दुसरा चेहरा असणे नाही इतके ठासिव मुद्रा उमटवणारे तिचे एकेक पात्र आपल्याला दिसते.
  तिनं आपल्या एकटीच्या बळावर चित्रपटसृष्टीतल नायिकेच स्थान बदललं आणि हो आपला सर्वाधिक व्यवसायिक कलाकार अमिताभबच्चनदेखील तिच्यासोबत नमक हलाल,शक्ती चित्रपटांमध्ये काम करताना विशेष आनंदीत झाले होते. त्यांची जोडी बरीच हॉट दिसत होती.
   स्मितान आपल्याला नवीन भारतीय स्त्रीची व्याख्या शिकवली .तिनं अत्यंत सुक्ष्मपणे आणि तरलतेन स्त्री सौंदर्याची नवीन परिभाषा मांडली.ती आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर नर्गिस मिनाकुमारी या महान कलाकारांच्या  रांगेत जाऊन बसली.वैयक्तिकरित्या तिला यांच्याही वरच स्थान देईन कारण ती चित्रपटसृष्टीतल्या तोचतोचपणापासून अस्पर्शित होती.तिन चाहत्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या सर्व अपेक्षापूर्ण केल्या. केवळ संख्येनेच नाही तर गुणवत्तेतदेखील स्मिताचा कणाखरपणा,तिची तळमळ,तिचाअंतरंग ढवळून टाकणारा प्रामाणिकपणा आणि तिची प्याशन हे सगळं तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अजोड हिस्सा होता आणि म्हणूनच ती '  स्मिता '  होती!!!

Monday, September 9, 2019

सर्वेषां शुचिर्भवतु

 परवा सकाळी फिरायला निघाले .खूप प्रसन्न वाटत होते .काही अंतर चालून गेल्यावर मात्र रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचा ढीग दिसला. भरपूर साचलेला कचरा ,त्याचा दुर्गंध ,घोंघावणार्‍या माशा बघून राग येऊ लागला.  कितीही प्रयत्न केले तरी आपला कचरा बाहेर -आपल्यापासून लांब टाकला की झाली स्वतःच्या घराची स्वच्छता या सवयीवर अजूनही तोडगा निघत नाही. स्वतःपुरते स्वच्छतेचे नियम पाळून सार्वजनिक स्वच्छता पसरवणे ही मानसिकता साधारण सर्वत्रच आहे ,काही अपवाद वगळता! असा विचार करत असतानाच आणखी एक इसम तिथे आला आणि कचऱ्याची पिशवी त्या ढिगावर भिरकावून निघूनही गेला.
 या गोष्टीचा जरा दुसऱ्या बाजूने विचार केल्यावर लक्षात आले की रस्त्याचा जो भाग स्वच्छ होता त्यावर कोणी कचरा टाकलेला दिसत नव्हता( हेही नसे थोडके) मात्र जिथे पूर्वी टाकलेली घाण दिसली तिथे पुष्कळांनी आपली भर घातली. काय कारण असावे बरे ?सहजआठवले- मागे एकदा टेबलवर  दुधाच्या कपातले  दूध   सांडल्यावर लेकीने मला म्हटले हे नंतर  पुसून घेशील आई .नाहीतरी टेबल खराब आहेच आणि ती खेळायला पळाली. खरंच टेबल आधीच चक्क पूसलेला असता तर तिने ताबडतोब सांडलेले दुधाचे थेंब पुसून घेतले असते. जिथे आधीच डाग अस्वच्छता आहे तिथे निष्काळजीपणा करायला हरकत नाही असा समज सरसकट सर्वांचाच दिसतो. गृहीत धरले जाते काय स्वच्छ ,टापटीप ठेवायला हवे आणि कुठे चालढकल खपुन जाईल ते !
अगदी आतून स्वतः कोणी यावर चांगले काम केले किंवा पूर्वीची अस्वच्छता घालवून स्वतः पुन्हा ती न करण्याचे ठरवले तर बहुदा त्याची "गांधीगिरी" म्हणून टर उडवली जाते. हल्ली यात बऱ्याच अंशी बदल होत असले तरी हवी तशी गती अजूनही आलेली नाही हे पण मान्य करायलाच हवे. 
आपला परिसर ,वस्तू इत्यादी  बाबतचे हे सत्य मनुष्याच्या  बाबतही कसे लागू होते बघा !सद्गुणी व्यक्तीचा आदर सर्वत्र होतो .त्याचे गुण आवर्जून उल्लेख करून एकमेकांना सांगितले जातात. पुढच्या पिढीला त्यांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला दिला जातो. चुकून कोणी त्या व्यक्तीवर टीका केली, हेतुपुरस्सर खोट्या गोष्टींचा प्रसार केला तरी इतरांकडून ते स्वीकारल्या जात नाही. एवढी गुणी व्यक्ती असे करणे शक्यच नाही यावर जनमानस ठाम असते. आधीच स्वच्छ प्रतीमा असल्यावर कुठे बारीकसा डाग त्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसला तरी तो दुर्लक्षिला जातो किंवा त्याचे समर्थन केल्या जाते. क्वचित प्रसंगी तो दुर्गुण खरा असला तरी सद्गुणांच्या वाहत्या प्रवाहात तो धुतल्या जातो म्हणा ना!
 याविरुद्ध ज्या दुर्गुण- गढूळ मन, डागाळलेली कृती, सदोष व्यक्तिमत्व असते तिथे ते अजूनच मलीन करण्याचे काम इतरांकडून केले जाते .व्यक्तीच्या आचार विचारातून जी प्रतिमा सर्वत्र तयार होते ती अशुद्ध, दुर्गुणी ,इतरांकडून स्वीकार न करण्यासारखी आणि काही प्रमाणात अधिकाधिक अशुद्ध करता येण्यासारखी अशीच सर्वांना वाटते. त्या व्यक्तीने एकदा प्रयत्न करून भागत नाही . तर वारंवार स्वतःचे वर्तन स्वतःचे विचार तपासत अचूक निर्णय घेत राहणे हेच केवळ स्वतःची ओळख विशुद्ध व्यक्ती म्हणून करण्यासाठी गरजेचे असते. एकदा नाही तर सातत्याने याचे पुरावे मिळत गेल्यावरच त्या व्यक्तीची इतरांकडून स्वीकृती होऊ शकते .सार्वजनिक स्वच्छता एकदा करून भागत नाही, तसेच वैयक्तिक शुद्धी वारंवार करावी लागते. दृढ निग्रह, तीव्र इच्छाशक्ती, लक्ष्य ठरवून त्यावरच प्रयत्न केंद्रित ठेवणे योग्य मार्गदर्शनात स्वतःला कौशल्याने लक्ष्य गाठायला कार्यरत ठेवणे यासारख्या गोष्टींचे सातत्य राहिले तर निश्चित त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक दिशेने बदलूशकते- अधिक आरसपानी घडू शकते.
 पूर्वापार सांगितलेले यम ,नियम, आसन ,प्राणायाम ,प्रत्याहार, धारणा, ध्यान ,समाधी हे योग साधण्याचे आठ मार्ग कौशल्याने ,सचोटीने अवलंबून सार्वजनिकच नाही तर वैयक्तिक शुद्धी सुद्धा नक्कीच मिळवता येईल .गरज मात्र या क्षणापासून सुरुवात करण्याची आहे!

Sunday, September 8, 2019

पर्युषण


प्रत्येक धर्माची शिकवण सारखीच आहे फक्त मांडणी वेगवेगळी आहे. आज थोडसं जैन तत्वांबद्दल जाणून घेऊया. चातुर्मास सुरू झाला की लगेच भाद्रपद महिन्याचे वेध सुरू होतात. लगेच कॅलेंडर बघून पर्युषण पर्व कधी पासून सुरू होतय ते बघितले जाते. पर्युषण पर्व कसा, कुठे करायचा, एखाद्या तिर्थक्षेत्री जर जायचे असेल तर तशी तयारी सुरू केली जाते. जैन धर्मातील सर्वात पवित्र  पर्व म्हणजे पर्युषण किंवा दशलक्षण पर्व होय. परि म्हणजे पूर्ण रुपाने उषण म्हणजे एका जागी स्थिर राहणे. वर्षातून एकूण तीन वेळा हे पर्व असते परंतु भाद्रपद शुध्द पंचमी पासून चतुर्दशी पर्यंत हे पर्व सर्वत्र मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरे केले जाते. कारण पूर्वीच्या काळी पावसाळ्यात प्रवास करणे अवघड होते साधनांची सुलभता पण नसल्याने व्यापार आदि कार्य आपोआप कमी होत असत. अहिंसक वृत्तीचा समाज असल्याने  धर्म आदेशानुसार चार महिने साधू, मुनी विहार थांबवून एकाच ठिकाणी राहतात. मुनींचा सत्संग जास्त वेळ लाभत असे. वेळही उपलब्ध असे म्हणून भाद्रपद महिन्यात हे पर्व साजरे केले जाते. वास्तविक प्रत्येकाने सदैव या आत्म्याच्या दहा गुणांची शिकवण घेऊन आत्म्यामध्ये वीतराग भाव जतन करणे अपेक्षित आहे. धर्म तर आत्म्यामध्ये प्रगट होतो तिथी, वारात नाही.  365 दिवसांची उर्जा, प्रेरणा या भक्तिपूर्ण आणि सश्रद्ध,मंगलमय अशा दिवसात मिळवली जाते. या पर्वाचा संबंध खेळ खेळून, प्रसाद खाऊन सण साजरा करण्याशी नसून त्यागाशी आहे. या दिवसात यथाशक्ती संयम, नियम, व्रत, उपवास, पूजाअर्चा करतात. स्वाध्याय आणि तत्वचर्चेला अधिकांश वेळ देतात. हे पर्व भोगमय नसून त्यागमय आहे. त्याची महानता त्यागामध्येच आहे.

 
पर्युषण पर्वाला दशलक्षणधर्म पर्व पण म्हणतात. आत्माला दुःख देणारे कर्ममल दूर सारण्यासाठी 10 उपाय सांगितले आहे. आत्म्याचा मूळ गुणधर्म काय आहे ते या दहा तत्त्वात सांगितले आहे. १- उत्तम क्षमा २ - उत्तम मार्दव ३ - उत्तम आर्जव ४ - उत्तम शौच ५ - उत्तम सत्य ६ - उत्तम संयम ७ - उत्तम तप ८ - उत्तम त्याग ९ - उत्तम आकिंचन्य १० - उत्तम ब्रम्हचर्य. हे ते दहा गुण आहेत.
वरील दहा लक्षणांना जोडलेला 'उत्तम' शब्द सम्यक् दर्शन, ज्ञान, चरित्र होय. (Right belife, Right knowledge, Right character/ behavior) यानां रत्नत्रय असं समर्पक नाव आहे. या रत्नत्रयींचे तत्व समजून उमजून पूजाअर्चा करतात. मोक्षाच्या इच्छेने अथवा नरकाच्या भितीने नव्हे तर इष्ट अनिष्टाच्या पलिकडे जाऊन कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून, समतोल साधून आपल्यात हे गुण आणण्याचे प्रयत्न केले जावे ही शिकवण दिली जाते. 
१)उत्तम क्षमा - क्रोधाचा अभाव होणे हा क्षमा धर्म आहे. क्रोध करण्याचे कारण उत्पन्न झाले तरी जो क्रोध करत नाही तो क्षमा धर्मधारी आहे. हा आत्म्याचा  मूळ स्वभाव आणि महान गुण आहे. म्हणून म्हणतात क्षमा विरस्य भूषणम् 🙏
२)उत्तम मार्दव - मृदोर्भावः मार्दवं. मनाचा कोमलपणा. ज्ञान, कुल, रूप, बुध्दी, तप, बल यांचा अभिमान न करणे हा मार्दव धर्म आहे.
३)उत्तम आर्जव - ऋजोर्भावः आर्जव. सरळ स्वभावाला आर्जव म्हटले आहे. हा गुण समजून घेतांना मन वचन काया हे माध्यम उपयोगात आणवे लागते. मन में होय सो वचन उच्चरिये वचन होय सो तन से करिये। पण हे कसं हवं तर शुध्द हवं. विचार उच्चारले तर फुलांचा वर्षाव व्हावा आणि कार्यान्वित झाले तर जगाचे कल्याण व्हावे.
४) उत्तम शौच - शुचेर्भावः शौच. लोभाचा त्याग करणे शौच धर्म आहे. समस्त पापाचे मूळ लोभ आहे. फक्त पैशाचा लोभ म्हणजे लोभ असे नसून लोभ अनेक प्रकारचा आहे. यशाचा, नावाचा, कामभोग इ. इ. २५ प्रकार आहेत. लोभाच्या आहारी जाऊन मनुष्य अनेक चुकीच्या गोष्टी करतो आणि स्वतः चे पतन करून घेतो.  
५) उत्तम सत्य - ऋतं सत्यं। न ऋतं अनृतं, असत्यं।सत्य हे नेहमी शिवरूप, कल्याणकारी, सुंदर आहे. स्थूल किंवा सूक्ष्म खोटे बोलू नये. हित - मित व प्रिय वचन बोलावे. कठोर अप्रिय बोलायची वेळ आली तर बोलूच नये. मौनम् सर्वार्थ साधनम्। 
६) उत्तम संयम - मन - वचन - कायेच्या अशुभ प्रवृत्तींचा त्याग करणे, इंद्रियांना ताब्यात ठेवणे हा संयम धर्म आहे. सयंम दोन प्रकारचा आहे. १- प्राणी संयम - सर्व जीवांच्या रक्षणाचे भान ठेवणे. २- पाच इंद्रियांना आणि मनाला नियंत्रित ठेवणे.
७) उत्तम तप - इच्छानिरोधस्तपः अर्थात इच्छांचा निरोध करणे हे तप आहे. तप्यते इति तपः ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवल्यामुळे शुध्द होते त्याप्रमाणे आत्माआपल्या ज्ञानरूपी अग्नि मध्ये तापवून शुध्द होतो.
८) उत्तम त्याग - अनुग्रहार्थ स्वस्यतिसर्गो दानं अनुग्रह बुध्दीने स्वतः च्या मालकीच्या वस्तू देणे म्हणजे दान करणे. सत्पात्रांना चार प्रकार चे दान देणे हा देखील उत्तम त्याग आहे. दानाचे चार प्रकार - १-आहारदान २- औषध दान ३- ज्ञानदान ४- अभयदान. परंतु दान आणि त्याग परस्परविरोधी गोष्टी आहेत. दाना मध्ये एवढे देऊन किती ठेवले हा विचार केला जात नाही. त्यागामधे किती ठेवले हे बघितले जाते. काही वस्तू, गोष्टी अशा आहेत की त्याचा त्याग होतो दान होत नाही, काही अशा आहेत की त्यांचे दान होते त्याग होत नाही. काही अशा देखील आहे त्याचे दानही होते आणि त्यागही होतो. उदाहरणार्थ राग, द्वेष, आई, वडील, स्त्री, पुत्र यांना त्यागता येते, दान देता येत नाही. ज्ञान आणि अभय दान देता येते पण त्यागता येत नाही. औषध, आहार रूपया इ. त्यागही करता येते आणि दान पण करता येते.
९) उत्तम आकिंचन्य - मम इदं इति अभिसंधीनिवृत्तिःआकिंचन्य। कोणत्याही वस्तूंचा, व्यक्तिंचा, इतर गोष्टींचा अपरिग्रह म्हणजे आकिंचन्य आहे.  माझे शरीर आणि आत्मा वेगळे आहेत तर दुसर्‍या कोणत्याही वस्तू माझ्या कशा असू शकतात?
१०)  उत्तम ब्रम्हचर्य - ब्रम्हाणि आत्मनि चर्यते इति ब्रम्हचर्य। आत्म्याचे आत्म्यात लीन होणे ते ब्रम्हचर्य होय.
दशलक्षण पर्वानंतर लगेच दुसर्‍या दिवशी क्षमावली असते. दहा दिवसांच्या कडक उपवासा नंतर सुंठसाखर आणि नारळाचे तुकडे देऊन क्षमा मागायची आणि करायची असते. वैरभाव, मनोमालिन्य मिटवण्याची संधी वर्षातून एकदा मिळते. वैरभाव तर एक दिवसही ठेवण्यासारखा नाही. विकारांना जिंकणे हीच खरी वीरता आहे. क्षमा विरस्य भूषणम् म्हणून म्हटलं आहे.
या पर्वाची अनादिअनंता शास्त्रसंमत आणि युक्तिसंमत आहे. ज्ञानानंद स्वभावी असूनही आत्मा अज्ञानी व दुःखी आहे. म्हणून क्षमादि उत्तम गुण असलेले हे पर्व!  एका विशिष्ट संप्रदायाचे लोकच साजरा करीत असले तरी ते सांप्रदायिक पर्व नाही, तर सर्वांसाठी आहे. कारण आत्मा तर सर्वांचा सारखाच आहे. आत्मा गरीब श्रीमंत, उच्चनीच, जाति-धर्म याच्या पलीकडे आहे एकसमान आहे. म्हणून आत्म्यातील विकारी भावनांचा त्याग करून उदात्त, अविकारी भावनांचे ग्रहण हा या पर्वाचा आधार आहे जो सर्वांनाच हितकारी आहे. म्हणून हे पर्व सांप्रदायिक नसून सर्व प्राणीमात्रांना सुखकारक, सन्मार्गदर्शक आहे.
या तत्त्वांचा विचार येतो तेव्हा ते वैज्ञानिक आधारावर सांगितले आहे हे लक्षात येते. रात्री भोजन त्याग, पाणी गाळून पिणे, तिन 'म'कारांचा त्याग (मद्य, मास, मध) अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, पाच औदुंबरांचा त्याग (वड, पिंपळ, उंबर, पाकर, अंजिर), रोज देवदर्शन करणे इत्यादी गोष्टींचे पालन करणे म्हणजे हे तत्व आत्मसात करणे. यातील सर्व गोष्टी चांगल्या आणि योग्य आहेत. वैज्ञानिक आहे. आरोग्यकारक आहे. आत्म्याचे  दहा गुण जे सांगितले ते तर्कसंगत आहे. त्यात कुठेही खोटेपणा नाही. अतिरेक नाही तर या दहा गुणांमुळे आत्म्याचे खरे स्वरूप समजायला मदतच होते. कर्मकांडात न जाता केवळ तत्वांकडे जर आपण लक्ष दिले तर  जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगता येईल. हे तत्त्व इतके पुरातन असूनही आजही काळसुसंगत आहे किंबहुना या कलीयुगातच याची जास्त गरज आहे.
कर्मकांडात, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा यामध्ये वेळ घालवणे पटत नाही परंतु सामान्य लोकांना चांगल्या वागणूकीचे शिक्षण देण्यासाठी याचाच आधार होता. त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना शहाणं करणे हा या कर्मकांडांचा उद्देश होता. यामध्ये माणसे गुंतली तर निदान काही काळ तरी वाईट प्रवृत्तींपासून परावृत्त होतील या चांगल्या भावनेने रुढी परंपरा, प्रथा सुरू झाल्या. पण त्याचं खूपच अवंडबर माजले. विपरीत परिणाम झाले. त्याचे स्वरूपच बदलून गेले आणि ते  इतके भयावह झाले की नको तो धर्म नको ती पूजाअर्चा. सगळी शांतता, शिकवण, समाधान पार रसातळाला गेलं.
पिढ्यानपिढ्या कर्मकांड करून लोकं आता तरबेज झाले, शहाणे झाले. आता पुढची पायरी म्हणजे तत्व सोप्या शब्दात सांगून आत्मभान देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जेणे करून धर्माचे अवडंबर कमीत कमी होईल आणि            " माणुसकी" हा एकच धर्म या पृथ्वीवर राहील.

Saturday, September 7, 2019

हा सूर अनाहत

"सुनकर यह गायन
आज न जाने क्यों करता मन
सदा इसे मै सुनता रहता
सदा इसे वह गाता जाता"

हरिवंशराय बच्चनजींच्या या ओळी म्हणजे गानरसिक आणि आशा भोसलेंच्या नात्याचे जणू प्रतिबिंब! आपल्या सर्वांच्या आयुष्याला व्यापून उरणारं हे सूरवैविध्य नुकतंच ८ सप्टेंबर रोजी ८६ वर्षाचं झालं. केवळ कालमापनाचे दंडक लावायचे म्हणून आपण इतकी वर्ष झाली, तितकी वर्ष झाली...असे म्हणतो पण आजही त्याच जोमानं हा आवाज सळसळत्या उत्साहाने गाणी सादर करतो तेंव्हा आपण थक्क होतो. असं काय आहे या आवाजात? 
काय नाही या आवाजात? सुरेलता! टिकून राहणारा दमसास! भाव ओतून गाण्याची शैली! सुस्पष्ट उच्चार! आणि अचूकतेचा ध्यास! या सर्व गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय इथे आहे.
आशा भोसले! मास्टर दिनानाथ मंगेशकरांचं लाडकं हबं! लतादिदींची आशू! पं. हृदयनाथ, उषाची आशाताई! मंगेशकरांचा स्वरवारसा तिला लाभला तसाच संघर्ष सुद्धा करावा लागला. 
1944 साली 'माझं बाळ' या मराठी चित्रपटात लताजींबरोबर आशा सर्वप्रथम पडद्यावर झळकली. 'चला चला नवबाला' गाण्यात तिचा आवाज होता. तेंव्हापासून तर आजतागायत ती गातेय नि रसिक मुग्ध होताहेत. 
लहानपणी टाॅमबाॅय सारखी राहणारी आशा मस्तीखोर होती. तोच खेळकर, मिश्किलपणा तिच्या स्वरात वेळोवेळी डोकावतो.

कभी शाखो सब्जा ओ बर्गपर
कभी गुंचा ओ गुलोखारपर
मै चमनमे चाहे जहाॅ रहूॅ
मेरा हक है फस्ले बहारपर

जिगर मोरादाबादींची ही गजल जणू आशाजींचं मनोगत आहे. 
अथक साधना, संघर्ष नि परिश्रम यातूनच हे जीवन साकारलंय. शास्त्रीय बैठक तसंच शब्द, तालाचं भान आणि कष्ट करण्याची वृत्ती या सगळ्यांचा मिलाप म्हणजे आशा भोसले!
हवेची एखादी मंद झुळूक जशी सुखद गारवा देऊन जाते तसाच आशाचा आवाज आहे. जणू सतारीची तार छेडल्यावर निघणारा मधुर स्वर! कोणत्याही प्रकारच्या गाण्यात चपखल बसणारा !
गाण्यातील काही शब्दांवरची जागा उंच उडत्या पाखराला टिपणारी, पंचमाला भोज्या करून येणारी असते तिथवर हा आवाज कधी, कुठे, कसा पोहचला हे मिटणा-या पापणीलाही कळणार नाही इतकी लवचिकता आशाताईंच्या आवाजात आहे. कोणत्याही सप्तकात लीलया वावरणारा असा हा बेफाम पण भावमधुर आवाज आहे. आवाज फाटल्याचा आभास निर्माण करणारी याॅडलिंगची किमया आशाताई सहज करतात. माणिक वर्मांनी आशाच्या आवाजाला "नाट्यमय आवाज'" ही उपमा दिली आहे. सार्थ उपमा आहे. डोळे बंद करा आणि आशाचं गाणं ऐका. नजरेसमोर दृश्य उभं राहतं. 'अनेकींना आपला आवाज देणारी आशा भोसले पार्श्वगायिका नाही तर ती पुरोगायिका आहे', असं पु. ल. देशपांडें याचं मत योग्यच आहे. 
आशाताईंच्या इतका व्हर्सटाईल आर्टिस्ट अपवादानंच आढळतो.  पण सुरुवातीला त्यांच्या आवाजातील ही जादू जाणवत नव्हती. कारण प्रारंभीच्या काळात तोंड नीट न उघडता गायल्यामुळे त्यांचे उच्चार बरोबर येत नसत. पण स्वतःतील हे दोष लक्षात आल्यावर त्यांनी शमशाद बेगम आणि गीता दत्तचं निरिक्षण करायला सुरुवात केली. मनाशी पक्का निश्चय केला आणि प्रयत्नपूर्वक आपली गायन पद्धती बदलली. आणि मगर सुरू झालं आशा पर्व!

अंबर की एक पाक सुराही
बादल का एक जाम उठाकर
घुंट चांदनी पी है हमने
बात कुफ्रकी कि है हमने

अमृता प्रीतमच्या लेखणीतून व्यक्त झालेला हा जीवनानुभव आशाजींच्या गाण्यातून आम्हाला मिळतो.
आज ८६ व्या वर्षी सुद्धा हा आवाज तितकाच तरूण वाटतो जितका तो 70 च्या दशकात होता. गीतकारांच्या शब्दांना न्याय देणारा, संगीतकाराचा सूर अचूकतेनं रसिकांपर्य॔त पोहचवणारा हा आवाज आहे.

न जाने किसकी चटखने थी
ये आवाज आयी
और अहसास दरारों मे
कैसे जा पहुॅचे

अनेक संगीतकार, विविध सहगायकांसह हा आवाज आमच्या सुखदुःखात साथ संगत करतो आहे. स्वतःच्या आयुष्यातील अनेक कडूगोड आठवणींची स्पंदनं गाण्यात उमटू न देता रसिकांच्या श्रुति धन्य करत आहे, असा हा आवाज, 

हा सूर अनाहत कोठून आला येथे?
हा सूर जिथे तरंगे तेथे गाणे उमटे
हा अखंड अविरत अथक वाहता राहे
हा सूर जणू रसिकांचे हृदगत आहे

Happy Birthday आशाताई!

 - सीमा शेटे (रोठे), अकोला

(फोटो सौजन्य : गुगल)

Sunday, September 1, 2019

खोपा..!

पहाटे फिरायला निघाली नेहमीप्रमाणेच. रात्री केव्हातरी खूप पाऊस पडून गेला असावा. आभाळ अजूनही भरून आलेले दिसत होते आणि गार  वारा सुटला होता. वाऱ्यामुळे ढग कसे भराभर पळत होते ते बघतांना गम्मत वाटत होती. ह्या सगळ्या सुंदर वातावरणाचे प्रतिबिंब साहजिकच मनातही उमटले अन कस अगदी आतून खूप प्रसन्न वाटलं! ही पहाटेची वेळ, ज्यावेळी रस्त्यावर अजून गजबज सुरु झालेली नसते ती माझ्या मोठी आवडीची! त्या शांत, प्रसन्न वेळी आपल्याच  तंद्रीत फिरायला जायला मला फार आवडतं. ती वेळ असते आपलाच आपला स्वतःशी संवाद करण्याची. अश्यावेळी खरंच मनात खूप छान छान  कल्पना येतात. आजकाल तर कुठलेही दृश्य दिसलेतरी डोक्यात ह्याचं पेंटिंग कसं  दिसेल हेच आधी डोक्यात येतं.  वयानुसार नादिष्टपणा वाढतो म्हणतात ना!  ते अगदी खरं असावं बहुतेक. तर अशी स्वतःशीच संवाद करत जात होती तर रस्त्याच्या कडेला एक भला मोठा  गाळलेल्या रेतीचा ढीग दिसला. कालच्या पावसाने ती  रेती ओलीगच्चं होऊन मस्त काळीभोर झालेली होती. ती मऊमऊ, काळीभोर ओली रेती बघताच पटकन त्यात पाय खुपसून छानसा खोपा बनवण्याची एक उर्मी दाटून आली मनात अन मन भुर्रकन उडून बालपणात गेले. 

तेव्हा अशा ओला रेतीत खोपा बनवणे म्हणजे कोण आवडीचा खेळ असायचा! एकाने पाय रोवून उभे राहायचे अन दुसऱ्याने त्यावर रेती थापत जायचे. भरपूर थापून झाले कि मग अलगद हळूहळू त्यातून पाय बाहेर काढायचा. तो पाय बाहेर काढणं सुद्धा मोठं स्किल असायचं बरंका  ! हळुवार काढावा लागायचा. अजिबात धमुसळेपणा नाही चालायचा.  शेवटी  मग थोडासा फिनिशिंग टच द्यायचा की झाला सुरेखसा खोपा  तय्यार! मग मोठ्या कौतुकाने दाखवायचा इतरांना. दुसऱ्या कुणाचा आपल्यापेक्षाही सुंदर झालेला दिसला कि क्षणभर हिरमुसल्यासारखं व्हायचं थोडंस  पण लगेच दुसऱ्याच क्षणी नवा खोपा  बनवण्यात गुंगून जायचं! हे तिथपर्यंत चालायचं जोपर्यंत घराघरातून दादा,ताई किंवा लहान भावंडांची “आई बोलावतेय ...” ही हाक कानावर नाही यायची!  आई बोलवतेय किंवा बाबा आवाज देताहेत म्हटल्यावर बाकी निघावंच लागायचं. तेवढा आईबाबांचा धाक प्रत्येकाला असायचाच. जाताजाता आपणच एवढे मेहनतीने बनवलेले खोपे पायानी मोडून  टाकायचे आणि उद्या अजून मोठ्ठा खोपा बनवायचं स्वप्न डोळ्यात घेऊन घरी परतायचं. 

आता वाटतंय किती छान दिवस होते न ते ! निरागस , निष्पाप आणि निरपेक्ष सुद्धा! आजचा खोपा  तिथल्यातिथे विसरून उद्या आणखी सुंदर खोपा बनवण्याचं स्वप्न बघायचं ! वाटलं आपण असे किती जुने खोपे कुरवाळण्यात आयुष्य वाया घालवतो! आपसूकच केशवसुतांच्या “तुतारी” ची आठवण झाली.  “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून अथवा पुरून टाका...” मनात आलं केशवसुतांप्रमाणे मागचे खोपे मागेच मोडून  उद्या बनवायच्या आणखी सुंदर खोप्याचा विचार करता आला असता सगळ्यांना तर आणखी काय हवे हो मग .? --

मधुमती वऱ्हाडपांडे 
अकोला