कधी कधी मला स्वतःचाच इतका राग येतो, मी नेमकी कशी आहे? हे माझं मलाच नीटसं कळलेलं नाहीये. मला माझं स्वतःचं वेगळं असं मत बहुतेकदा मांडता च येत नाही, की मला माझं असं काही मतच नाही? प्रत्येक बाबतीत दोलायमान स्थिती असते, की हे पण बरोबर आहे, त्याच वेळी ते पण बरोबर असूच शकतं.
इकडली स्वारी तर नेहमीच म्हणते, तू सदानकदा इतकी confused का असतेस?. खरंय, मला कोणताच निर्णय झटकन घेता येत नाही आणि एकांगी तर नाहीच नाही. पण त्यावर मी स्वतःचेच समाधान करून घेते की मी कोणत्याही बाबीचा सर्व दृष्टीने विचार करते. मला नाण्याच्या दोन्ही बाजू पटतात, म्हणूनच गोंधळ होत असावा; पण मग हे बरोबर की चूक? कदाचित ह्याच कारणामुळे मी फारशी कुणावर नाराजही होत नाही वा गैरसमजही करून घेत नाही. पण हे नेहमीच योग्य ठरते असे मात्र नाही. खूपदा मनःस्ताप ही होतो. आपल्याला नाण्याच्या दोन बाजू एकाच वेळी कशा पटू शकतात? त्यामुळे आपण कुठल्याही एका बाजूने न्याय देण्यात कमी पडतो. आता येते मूळ मुद्द्यावर.
माझ्या आईकडे म्हणजे माहेरी देवा धर्माचं, पूजे आरचेचं फार स्तोम नव्हतं. सोवळे ओवळे तर अजिबातच नव्हते. ताई आप्पा दोघेही नोकरी करत होते. ( आम्ही आईला ताई आणि वडलांना आप्पा म्हणायचो) हो, पण दानधर्म, तेही सत्पात्री दान हा प्रकार मात्र निश्चित होता. मला आठवते, दाराशी आलेला भिकारी कधीही उपाशी गेला नसेल. ताई, आप्पांसाठी तो अतिथीच असे. माझे बाबा खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ( आई, वडील दोघेही शिक्षक होते) जेवणावळी चे आयोजन करत असत. माझा मोठा भाऊ देखील, जो प्राचार्य होऊन निवृत्त झाला, सुरुवातीच्या काळात गरीब मुलांना मोफत शिकवत असे. इकडे सासरी देखील दानधर्म होतो, पण खूपदा त्याचा अतिरेक होतो. न झेपतील, इतक्या पूजा, भागवत पारायण, त्या निमित्ताने भरमसाठ खर्च---- सासूबाईंच्या दरवर्षी श्रावण महिन्यात कसली ना कसली तरी लाखोली वाहण्याचया कार्यक्रमात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पूर्ण घर पिळून निघते. एक लाख पारिजात ची फुले, एक लाख मातीचे शिवलिंग, एक लाख बेलाची पाने--- मग हे त्या एकट्या करू शकत नाही म्हणून अख्ख घरच कामाला लागणार. फुले वेचून आणा, ओली माती आणा, त्याचे कणिक भिजवतो तसे भिजवून छोटे छोटे शिवलिंग तयार करा, ते पाटावर रचून मोजायचे काम करा, बेल निवडून, मोजून ठेवा, एक ना दोन. सासऱ्यांचे श्राद्ध असेल त्या दिवशी घरातील मंडळींसह ( घरातीलच मेंबर्स त्यावेळी 20 ते 22 होते). बाहेरची 5 ते 7 मंडळी जेवायला बोलवायची, जे नाही आले त्यांच्या घरी घरपोच डबा पोचवायचा. म्हणजे घरातील बायकांनी 4/5 वाजेपर्यंत किचन मधेच अडकून रहायचे. आता काळा नुसार बऱ्याच बाबतीत बरेच बदल होत आहेत. पण त्यावेळी मला वाटायचे, हा पैसा एखाद्या गरीब, होतकरू पण हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला तर? पण परंपरेचया नावाखाली माझा आवाजही दबला जात असे. घरात कुळाचार असेल तर घरातील बायका अंघोळ करूनच सर्व कामे करणार, इतपत ठीक आहे; पण मधेच जर नवऱ्याचे, मुलांचे कपडे धुवावे लागले( कामवाली चया गैरहजेरीत) तर पुन्हा अंघोळ करून कामाला लागायचे. अर्थातच, अंघोळ झाल्यावर मग शिळ्या कपड्यांना स्पर्श ही करायचा नाही, अंथरुणाला स्पर्श करायचा नाही--- बापरे बाप! सुरुवातीला मला हे सगळं फारच जड गेलं. आमच्या सासूबाई जेव्हा भागवताला बसत, तेव्हा दिवसभर बाथरूम ला देखील जात नसत. अजूनही माझ्याकडे महालक्समी साठी येताना माझ्या जावा परत अंघोळ करून येतात आणि सगळी पूजा आटोपल्याशिवाय बाथरूमला जात नाहीत. अजून एक नियम होता, होता अशासाठी म्हणते की मी तो नियम आता पाळत नाही, तो असा की महालक्समी च्या त्या 3 दिवसात घरातील अन्न बाहेर जाऊ द्यायचे नाही. म्हणजे वाया गेले तरी चालेल पण कुणाला द्यायचे नाही. या आणि अशा कितीतरी गोष्टी मला पटत नसल्या तरी त्यांची श्रद्धा, घरची परंपरा म्हणून मी करत आले; पण आता मी बरेच बदल करायला किंवा स्वतःपुरते बदलायला शिकले आहे. जसे की श्रावण महिन्यात मी फक्त एकच बेल शिवाला वहाते, " एक बिल्वम शिवार्पण म" म्हणत. कारण राजेश्वरातल्या मंदिरात वाहिलेल्या बेलांवरून लोक चालतात, चढवलेल्या पाण्यावरून चिकट झालेल्या जागेवरून घसरतात. घरचया, मंदिरातल्या देवाला फुले वहाण पण मी बंद केलयं. माझ्या सोयीनुसार, तब्येतीनुसार मानस पूजा करते. मनापासून दोन्ही हात जोडून देवाची क्षमा मागते, "हे देवा, चुकले असेल तर माफ कर" . सगळ्यात मोठा अनुभव आम्ही गया ला गेलो होतो तेव्हा आला. पितृदोष नाहीसा व्हावा म्हणून आपण इतकं काय काय करायला तयार असतो; पण तिथले एक एक प्रकार पाहिल्यावर श्रद्धा, परंपरा, ह्या सगळ्या गोष्टीतील फोलपणा जाणवतो . प्रयाग संगमावर तर पुजारी तिथेच पाण्यातच थुंकी टाकतात आणि तिथले पाण्यातले नारळ उचलून परत तेच आपल्याला विकतात. 5 ते 10 हजार पर्यंत रकम मागतात आणि नाही म्हटलं तर तुमचे पितर असेच भटकत रहातील, त्यांना कधीही मोक्ष मिळणार नाही म्हणून आपल्याला धमकी देखील द्यायला कमी करत नाहीत. असो.प्रयाग ला संगमावर स्नान करण्यासाठी सासूबाईनी तेव्हा खूप आग्रह केला; पण आमच्या समीरने मला नाहीच करू दिली, त्या क्षणी देखील मी द्विधा मनस्थितीत होते. तेव्हा काय हा आगाऊ पणा, किंवा मायलेक भलतेच हुशार समजतात स्वतःला, काय हा नास्तिक पणा, अशा तर्हेचे बोल नक्कीच लावले गेले असणार. ह्या नास्तिक पणाचया कल्पनेवरून लोकप्रभामधील एक लेख आठवला त्यातले सार फक्त इथे देण्याचा मोह आवरता घेता येत नाहीये, तो असा
"नास्तिक म्हणजे दुर्जन नव्हे.. नास्तिक आपले विचार कुणावरही लादत नाहीत. देव,ईश्वर, परमेश्वर म्हणाल तर ह्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं कोण आहे? तरी देखील बहुसंख्य लोक त्याला मानतात.याचे कारण त्याच्या भीतीने तरी मानवजात सुरक्षित रहावी. नास्तिक "चार्वाक" आपलाच ना? आस्तिक म्हणवणार्यांनीच मानवाला स्वर्ग देऊ केला; पण त्यासाठी इतरांना मारण्याची, मरणाची अट घातली. जो आस्तिक जन्माला येताना ना तृण आणू शकला, ना तृण निर्माण करू शकला, तो म्हणे स्वर्ग- नरक चा निवाडा करणार. धर्माने नास्तिकाना नाकारलेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, " जेथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून ईश्वरी प्रयत्न सुरू होतात. आस्तिक, नास्तिक एक जीवन प्रवासच आहे, स्वतः अनुभवायचा." एकंदरीतच बऱ्याच ठिकाणी परंपरा आणि श्रद्धेच्या नावाखाली खूप चुकीचया गोष्टी केल्या जातात आणि भिडस्त स्वभावामुळे त्या पटत नसल्या तरी स्वीकारल्या जातात. जाता जाता अजून एक खंत व्यक्त करते आणि थांबते. महालक्समी च्या वेळी जे राशीचे धान्य असते, ते आणि बाहेरून आलेले, ते सर्व वापरून तेवढया लोकांना बोलावून जेऊ घालायचे. . मी ह्या बाबतीत खूप प्रयत्न करू न पाहिला की हे धान्य आपण एखाद्या आश्रमाला देऊया; पण आजतागायत मी त्यात यशस्वी झाले नाही.

माणिक नेरकर.