Monday, July 15, 2019

पाऊस सृजनाचा

साद पावसाची आली शहारली माती
      भुई  सवे आभाळाची जुळे आज प्रीती

शांता शेळके यांच्या या काव्याने पावसाच्या सुरुवातीला कवी मनाने किती सुंदर शब्दात स्वतःला व्यक्त केले आहे! त्याचप्रमाणे

                पावसाची सर आता नुकतीच बरसली
                आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली

     किती सुंदर कल्पना !नुकत्याच आलेल्या पावसाने जुन्या स्मृती जाग्या झाल्या.🌧🌧 ओसाड ,कोरडे झालेले मनाचे कप्पे पुन्हा बहरले. आनंद -उत्साहाची हिरवळ सर्वत्र दरवळू लागली. निसर्गाने कात टाकली तसेच मनानेही नवी उभारी घेतली. या सर्व प्रसन्नते बरोबरच पावसाची किंवा वर्षा ऋतु ची सुरुवात ही प्रत्येकाला निरनिराळ्या प्रकारे महत्त्वाची आहे. सगळ्यात मोठा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा असतो. डवरणी ,नांगरणीनंतर नवीन बियाणे पेरायचे तर पाऊस हवा .मान्सून सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू होते. एक उत्साह संचारतो. पावसात भिजत ,संपन्नतेचं हिरवगार स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघत शेतकरी तयार होतो.🌱🌱
  निसर्गप्रेमींची लगबग वेगळी सुरू होते. निसर्ग संवर्धन ,वृक्षारोपण इत्यादीकरिता काम करणारे सर्वजण जबाबदारीने त्यासाठी जागरूकता कार्यक्रम घेण्यात मग्न होतात .तळमळीने प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतात. काही मनमौजी याबरोबरच पावसाळी सहलीचे बेत आखून तयार ठेवतात.🌈🌈 निसर्गाने मरगळ झटकून पुन्हा सृष्टी हिरवीगार करण्याचे प्रयत्न सुरू केलेले असतात त्याच प्रमाणे ही मंडळी मनाची मरगळ झटकून एकत्र येऊन वर्षा उत्सव आनंदाच्या देवाण-घेवाणीने साजरा करण्यास पुढे होतात.
 गमतीचा भाग म्हणून हवामान खात्याच्या अंदाजावर अनेक विनोद केले जातात .उदाहरणार्थ पर्जन्यमान चांगले राहील मात्र हवामान खात्याने त्यांचे अनुमान देणे बंद ठेवावे लागेल !🤣इत्यादी .परंतु खरंच हवामान खात्यालाही निरनिराळ्या शास्त्रीय पद्धती वापरून पावसाचा अंदाज मापणे ,इतर संलग्नित खात्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी माहिती पुरवणे यासारखी महत्त्वाची कामे पावसाळ्याच्या सुरुवातीला अधिक काटेकोरपणे करावी लागतात .प्रत्येकच वेळी पाऊस हा कवी कल्पनेतील सुखद अनुभव देणारा असेल अशी खात्री देता येत नाही. विपरीत परिस्थिती मध्ये म्हणजे अति पर्जन्यमान ,वादळ ,अत्यल्प पर्जन्यमान, इत्यादी प्रसंगी सरकारी यंत्रणेला पूर्वतयारी नियोजनपूर्वक करावी लागते. एकीकडे राजकारणी मंडळींचे पावसाळी अधिवेशनाचे मनसुबे रचल्या जात असताना दुसरीकडे दुर्गम भागातील लोकांना, कच्ची घरे असणाऱ्या लोकांना शाकारणी करून परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान पेलावे लागते. आषाढ संपून श्रावण सुरू होताना निसर्गातील हा बदल पुढच्या अनेक बदलांना आपल्या सोबत घेऊनच येतो. त्यामुळे घरातल्या कर्त्या अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींना एकीकडे सणवारांची नांदी ऐकू येते तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या तब्येतीच्या  कुरबूरींसाठी बटवा तयार ठेवावा लागतो .चातुर्मासातील प्रमुख सणांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्याप्रमाणे घरोघरी पूर्वतयारी केली जाते. त्याच प्रमाणे सर्दी पडसे, पोट दुखी इत्यादी झाल्यास घरी प्रथमोपचाराची औषधे लक्षात ठेवून आणून ठेवली जातात .त्याचप्रमाणे या ऋतु मुळे होणाऱ्या लहान-मोठ्या आजारपणामुळे वैद्यकीय व्यावसायिकांना "ओवर टाइम" करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते .हा त्यांचा "सीझन" असतो.
 पावसाळ्याच्या सुरुवातीला लक्षणीय बदल घडतात ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यात .नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवातही याच वेळी होते. मग पूर्णवेळ खेळण्याचा उद्योग संपवून अर्धवेळ अभ्यास करण्यासाठी मुलांना तयार राहावे लागते .नवीन वह्या पुस्तके ,गणवेश, नवीन शिक्षक ,नवीन वर्गमित्र यांची उत्कंठा असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल जाहीर होऊन पुढच्या प्रवेशासाठी वेगळीच धांदल सुरू होते.
 जसे मानवी विश्वात वर्षा ऋतुची सुरुवात एवढे सगळे बदल घडवून आणते तसेच पशुपक्ष्यांचा सुद्धा याला अपवाद नाही .🐿🕊पक्षी घरटे बांधून तयारीला लागतात नवस्रुजनाच्या ! छोटे प्राणी, कीटक खाद्याची सोय करून ठेवतात पुढे येणाऱ्या वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी .खरंच पावसाळ्याची सुरुवात किती किती प्रकारे आपले आयुष्य बदलत असते. असेच बदल आपल्या मनातही जाणीवपूर्वक केले गेल्यास पुढचे सगळेच ऋतू ,संपूर्ण आयुष्य समृद्ध करता येते .नवीन विचारांची पेरणी, दुखऱ्या नात्यांची शाकारणी, नकारात्मक विचारांचा निचरा, आनंदाच्या साधनांची साठवण करून ठेवण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच म्हटलंय
          पहिल्या पावसात शिवार दरवळतं सुगंधात
           हिरवगार स्वप्न उभारी घेतं धरतीच्या मनात


                                                                वर्षा देशपांडे 

Saturday, July 13, 2019

Mission Admission -"या भाऊ इकडे भूत आहे तिकडे"

दर वर्षीप्रमाणे यंदाही जून महिना सुरू झाला तेव्हा अंगावर काटा आला ....10 विचा निकाल लागणार आणि कॉलेज मध्ये 11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार! आता तुम्ही म्हणाल त्यात अंगावर काटा येण्यासारखे काय आहे बॉ? तर आम जनतेसाठी खरंच तसं काही नाही पण कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्षातील सगळ्यात कठीण कालखंड कोणता असेल तर तो 10 विचा निकाल लागल्यापासून आवश्यक प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंतचा!
    सरकारने प्रत्येक गावाच्या प्रत्येक गल्लीत भाजीबाजाराप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांना (क.म.)परवानगी दिल्याने प्रवेश संख्येचा भस्मासुर निर्माण केला आणि प्रवेश क्षमता पूर्ण न केल्यास तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा  काय तलवारच ठेवली जणू. मग काय प्रवेश क्षमता पूर्ण करण्यासाठी प्रत्येक  क.म. च्या शिक्षकांना तारेवरची छे.. छे.. तलवारी वरची कसरतच करावी लागते. त्यासाठी  प्रत्येक क.म. च्या शिक्षकांचा वेगळा फंडा.कुणी 11 वी 12वी च्या tution classes शी टाय अप करतो तर कुणी शाळांशी ! 
     यामधून आपसात निर्माण होणाऱ्या चकमकी अनिवार्य ! मला तर परिसरात दिसणारी प्रत्येक नवतरुणी प्रवेशासाठी आपल्याच शोधात फिरतेय की काय असं वाटतं😂.आणि 20 ऍडमिशन पूर्ण झाल्याची स्वप्न रोज पडतात😝. मला वाटायचं हे फक्त मलाच वाटतं. पण माझ्या लक्षात आलं की क.म.च्या प्रत्येकच शिक्षकाला असंच वाटतं म्हणे😛.आमच्या संस्थेच्या परिसरात 3 क.म. आहेत . पैकी आमचा व्यावसायिक अभ्यासक्रम विभाग आणि कला,वाणिज्य,विज्ञान विभाग यांची प्रवेश प्रक्रिया एकाच हॉल मध्ये असते . त्यामुळे संघर्षाची हमी👍🏼. हॉल मध्ये येण्यासाठी हॉल ला 800 खिडक्या 400 दार ! मग काय त्यातील एक लकी दरवाजा अडवून आम्ही अंधश्रद्धा वगैरे जोपासून बैठक व्यवस्था करतो . अर्थातच दुसऱ्या पार्टी चा तोच प्रयत्न असतो की हॉल मध्ये येणाऱ्या व्यक्तीला पहिले तेच दिसावे . आणि इथून सुरू होतो आमचा पकडापकडीचा खेळ ! म्हणजे मला तर रोज भाजीबाजारात भाजी विकायला बसल्यासारखंच वाटतं. भाजीवाले आपली भाजी किती ताजी आणि छान आहे व दुसऱ्या भाजीवल्याकडे जाऊ नये म्हणून  लोकांचे लक्ष वेधून घेतात."या साहेब इकडे भूत आहे तिकडे" हे वाक्य कर्कश्य आवाजात भाजीबाजारात मी नेहमी ऐकते. याच धरतीवर आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी  "ए शुक शुक" अशी हाक मारून आमचा व्यावसायिक अभ्यासक्रम,कला ,वाणिज्य शाखे पेक्षा किती श्रेष्ठ आहे हे प्राण कंठाशी आणून विद्यार्थ्यांना सांगत असतो.
हे असं आमच्या अभ्यासक्रमाचा प्रचार करण्याची प्रक्रिया 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय निरोप समारंभ असतो तेव्हापासून सुरू होते. मग online निकाल लागल्यावर त्यांचे फोन नम्बर मिळवून फोन वर मनधरणी केली जाते .  मग निकाल वाटपाच्या दिवशी प्रत्यक्ष सावज टिपून पुन्हा एकदा कळकळीने सांगितल्या जातं . पण या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरची रेष हलली तर शपथ! 😂निर्विकार पणे हे विद्यार्थी राजकारणी मंडळीही लाजतील असे आश्वासन देऊन  सांगतात ठीक आहे आमच्या पालकांना घेऊन आम्ही उद्या ,परवा येऊ. प्रत्यक्षात मात्र यापैकी एखाद दुसरीच ऍडमिशन होते बाकी विद्यार्थी हॉल मध्ये दुसऱ्या पार्टी कडे ऍडमिशन घेण्यासाठी आमच्यापासून तोंड लपवून दबक्या पावलाने 400 दारांपैकी एका दारातून येतात आणि कला किंवा वाणिज्य शाखेला प्रवेश घेतात ,आम्ही मात्र तोंड पाडून तोंडचा घास पळवल्यासारखं बघत बसतो😔.नाही म्हणायला या घटनाक्रमात चुकून कधीतरी बदल होतो ,जेव्हा विद्यार्थी दारातून आत येतो तेव्हा त्यांची नी आमची नजरानजर चुकून झालीच तर आम्ही "ह बोला काय म्हणताय ?"असं ओळखीचं हसून विचारलं की येतात बिचारे केविलवाणे चेहरे करून आमच्याशी बोलायला! मग आम्ही  नव्या जोमाने त्यांना  पुन्हा आमच्या अभ्यासक्रमाचे महत्व आणि फायदे पटवून देण्याचा क्षीण प्रयत्न करतो ,काही ऐकून घेतात आणि उद्या पुन्हा विचार करून सांगतो म्हणतात तर काही तोंडावरच तुमच्या अभ्यासक्रमाला काही value नाही म्हणतात🙆🏼,तर काही निक्षून सांगतात "पण आम्हाला आर्टच घ्यायचं न" आणि काही महाभाग ज्यांना 36 ते 45 टक्के गुण असतांना(विज्ञान आणि गणितात ATKT असलेले सुद्धा) पालक म्हणतात"तस  पोरगी/पोरगा लै हुशार आहे पन परीक्षेच्या वेळी बिमार पडल्याच्याने मार्क कमी पडले ,खेड्यावर भेटते ना ऍडमिशन, science ले नंबर लागते  पोराचा"मग काय आमची दांडी गुल ! आमचे चेहरे बघण्यासारखे होतात. बरं प्रकरण एवढ्यावरच थांबलं तर ठीक!आमचं नशीब याही पुढे ढेप खातं जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना हाक मारुन बोलावतो तेव्हा ते दुरूनच हात लांब करून नाही ची खूण करून चक्क "नाही येत" म्हणून आमचा पोपट करतात😇😩

परवाचा किस्सा तर कळसच झाला 🤦🏼‍♀. एक 41 टक्के गुण असणाऱ्या मुलीच्या आईशी निकाल लागल्यावर फोन करून संपर्क केल्या वर "माझ्या मुलीला शिवाजी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचाय पण मी दिवसभर नोकरी करते त्यामुळे तिच्याकडे लक्ष राहणार नाही पण तुमच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला तर शिस्तीत राहील असं माझ्या  शेजारणींने सांगितलं मग मला काळजी वाटणार नाही म्हणून मी तिला उद्या TC घ्यायला पाठवते आणि तुम्ही तुमच्या भाषेत तिला समजावून सांगा ती ऐकेल"असे आश्वासक बोल ऐकल्यावर मन मोरपिसासारखं हलकं झालं ! चला ही ऍडमिशन पक्की आहे याची खात्री पटली. प्रत्यक्षात मात्र पुढचे 2 दिवस मुलगी आली नाही . मी पुन्हा संपर्क केला तेव्हा आईने सांगितले "मुलीची तब्येत बिमार आहे . तुमच्या सीट फुल तर नाही ना होणार? 3-4 दिवसांनी पाठवलं तर मिळेल ना तिला ऍडमिशन?" मी ही माझ्या ऍडमिशन जणू ओसंडून वाहतायत या थाटात " मी तिची एक जागा नक्की राखून ठेवते ,तुम्ही काळजी करू नका,तिला बरं वाटलं की पाठवा" त्याच बरोबर शाळेत चौकशी करून खात्री केली ,चुकून तिने परस्पर TC तर नाही नेली ना याची . पुन्हा एक आठवडा रिकामा गेला आमची एकही ऍडमिशन नाही झाली .मग आठवण येऊन मी या आईला फोन करून मुलीच्या तब्येतीची चौकशी केली तर "आत्ताच मुलीला पाठवते ,तुम्ही आहात ना कॉलेज मध्ये ?आज तिची ऍडमिशन करूनच टाका ,मी पैसे घेऊन पाठवते"त्यावर मी " तिला आधी ऑफिस मध्ये TC घ्यायला पाठवा ,मी तिची TC काढून ठेवते"असे सांगितल्यामुळे आई गदगद झाली आणि मी निश्चिन्त ! कारण ती मुलगी हॉल मध्ये आली तर दुसऱ्या पार्टी ला आयतेच ताट मिळाले असते म्हणून हा मार्ग काढला आणि मी किती हुशार आहे या भावनेने मी सुखावले😂😄. आहाहा आज खात्रीने एक ऍडमिशन होणार ,तीही पूर्ण विषयात पास असलेली ! सोन्याहून पिवळं😂
         मग काय मी एका कागदावर प्राचार्यांकडून सही घ्यायला म्हणून ऑफिस मध्ये गेले असता ती मुलगी आली तिला म्हंटले तू या बाबूंकडून TC घे आणि इथेच थांब मी बाजूच्याच केबीन मधून प्राचार्यां ची सही घेऊन आलेच एक मिनिटात त्याला ती अज्ञाधारकपणे "हो"म्हणाली . मी सुद्धा एक मिनीटातच  परतले तर मुलगी गायब😳जमीन खा गयी या आसमान निगल गया?🤔😩 तिथे असलेल्या चपराश्याला विचारले तर तो म्हणाला "मॅडम तुम्ही ज्या मुलीशी बोलल्या ती मुलगी आत्ताच चप्पल हातात घेऊन धूम पळाली " आता बोला?🤔😫

Friday, July 12, 2019

सिनकर सर

काही व्यक्ती कळत नकळत तुम्हाला खूप काही देऊन जातात, तुम्ही नाही विसरू शकत अशा व्यक्तींना! माझ्याही आयुष्यात एक विशेष स्थान असलेली अशी व्यक्ती म्हणजे आमचे सिनकर सर!
       काही वर्षांपूर्वी मुलुंडला  वॉक करीत असताना, एक शाळेतली मैत्रीण भेटली, बोलता-बोलता सरांचा विषय निघाला, तर म्हणाली की तुझा फोन नंबर दिला तर चालेल का सरांना? म्हटलं, जरूर दे! आणि तेव्हापासून सरांचे नियमित फोन, वाढदिवसाला आणि लग्नाच्या वाढदिवसाला येणे सुरू झाले. मला खूप आनंद झाला, इतक्या वर्षानंतर सरांशी बोलता आले तेही मोकळेपणाने! कारण आधी कधी त्यांच्याशी कामाव्यतिरिक्त बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती. आता थोडसं सरांविषयी---
              मी दहावीत गेले आणि  maths साठी ट्युशन लावायची असे ठरले, खरंतर काही जरूर नव्हती, शाळेत बऱ्यापैकी शिकवायचे व तेव्हा आतासारखे ट्युशन चे फॅडही नव्हते. पण पैकीच्या पैकी मार्क्स मिळावेत, आणि या सरांविषयी खूप चांगले रिपोर्ट होते
म्हणून ट्युशन लावली. सर त्यावेळी इंजिनियरींग झाल्यावर चांगल्या नोकरीची संधी असताना, क्लासेस घेत होते. अत्यंत कडक शिस्तीचे! उदाहरण द्यायचं तर, सकाळी ६.३० वाजता मुलुंड (पूर्व) इथे आमचा क्लास असायचा, आम्ही मुलुंड (पश्चिम) ला राहायचो. इतक्या सकाळी उठून, ब्रिज क्रॉस करून पायी जायचो. एक मिनिट उशीर चालायचा नाही, लगेच शिक्षा ठरलेली.
Class-test   मध्ये त्यांनी एक ‌ marks ठरवलेले असायचे, त्यापेक्षा कमी मार्कस मिळाले, तर तो पेपर एकदा, दोनदा, तीनदा असा लिहावा लागायचा. कारण एकच..... Perfection. मला इतका वैताग यायचा, बरेचदा ट्युशन सोडायचा विचार मनात यायचा. पण त्यांच्या शिकवण्यात अशी काही जादू होती की, मी तो क्लास काही सोडू शकले नाही.
                    पुढे अकरावीत मी पोदार कॉलेज, माटुंगा तिथे ॲडमिशन घेतली. मुंबई युनिव्हर्सिटीत अकरावी-बारावीला, कॉमर्सलाही maths विषय होता. माझं कॉलेज ५.१५ ला सुटायचं, म्हणजे अगदी ऐन गर्दीच्या वेळी. तेव्हा रिक्षा-टॅक्सी चा काही प्रश्नच नव्हता. माटुंग्याला कॉलेज ते स्टेशन, मुलुंड ला स्टेशन ते क्लास, आणि लोकल प्रवास करून कधी कधी क्लासमध्ये पोचायला उशीर व्हायचा. उशीर झाला की तासभर हातात वही घेऊन उभ्याने लिहायचं, geometry सुद्धा! थंडी,पाऊस असे कोणतेही एक्सक्यूज चालायचे नाही. मी एकदा हिम्मत करून, सरांना माझ्या अडचणी सांगितल्या, ज्या माझ्या कंट्रोल च्या बाहेर होत्या. पण सर म्हणाले, तुझे genuine कारण असेलही, पण एकदा तुला concession दिलं की, इतरांना मी काय उत्तर देऊ? तसं चालणार नाही, नियम म्हणजे नियम!
        एकदा तर मजाच झाली. एका फ्लॅटमध्ये आमचा क्लास व्हायचा. त्याला दोन दारं होती, एका दाराने आम्ही विद्यार्थी आत जायचो, तर दुसऱ्या दाराने सर! एकदा सर क्लासच्या आत पाऊल टाकणार, तेवढ्यात त्यांनी मला येताना पाहिलं. दोन्ही हात दाराला, आणि एक पाऊल वर असे मी आत शिरेपर्यंत उभे राहिले. मी मनोमन त्यांना थँक्स म्हंटले. असे होते आमचे सर!
            अतिशय सोपी शिकवण्याची पद्धत! Perfection वर भर! तशाच सवयी आपोआप लागायच्या विद्यार्थ्यांना! कौतुक कधी तोंडावर करायचे नाहीत आमच्या! खूप म्हणजे खूप धाक वाटायचा, पण तितकाच आदरही!
        दहावीच्या बोर्ड परिक्षेच्या वेळी सेंटरवर सपत्नीक, आम्हाला शुभेच्छा द्यायला आले होते, त्यांना पाहून सगळी मुलं आनंदली. नमस्कारासाठी खाली वाकल्यावर माझ्या पाठीवर जोरात थाप मारून, ही सत्तीकर! एवढंच पत्नीला म्हणाले, आपण काय ते समजून घ्यायचं. अशी माया, प्रेम मिळायला भाग्य लागतं.
2-3 वर्षांपूर्वी  मला समजलं की  सर दरवर्षी  शेगावला  येतात. मी खूप  आग्रह केला, तर एक दिवस अकोल्याला  माझ्या  घरी दोघेही आले,"साधूसंत येती घरा. ..चा अनुभव मी घेतला. 
आताचे सर वेगळेच होते.आधीचा कडकपणा  पार गळून  गेला होता. फणसा सारखे  भासले. ...
          त्यांनी  सांगितले  की,कोकणातील  अतिशय  गरीब, पण हुशार  अशा  शाळकरी मुलांना  मदत  देण्यासाठी, सुभद्राबाई स. निधी  ही संस्था स्थापन केली आहे. त्याला  आर्थिक  हातभार लावलाय, सरांच्या माजी  विद्यार्थ्यांनी! तुम्हाला वाचून  आश्चर्य वाटेल,त्या  संस्थेचा एकूण  निधी काही  कोटी  झालाय आता!दाते, सर्व  सरांचे  लाडके विद्यार्थी! Wa app मुळे  संपर्क  सहज  साधला  जातो. सर स्वतः वरचेवर  कोकणात जाऊन  ती जबाबदारी पार  पाडतात. (आताही  त्यांचा  जबरदस्त  फिटनेस  आहे ) सर्व  विद्यार्थ्यांना गाढ  विश्वास आहे  की सरांना  दिलेल्या  रकमेचा  योग्य  विनियोगच होणार. 
      मुलुंड -ठाणे  इथे यशस्वीपणे  क्लासेस  चालवल्या  नंतर, आता  मनाने निवृत्त  न होता,सामाजिक  भान  जपून कार्य  करणाऱ्या  आमच्या  सिनकर सरांना, कोटी कोटी प्रणाम.

दोष ना कुणाचा..



Wednesday, July 10, 2019

सेल्फी

३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी मागची मध्यमवर्गी पिढी. एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी. आजची नागरी पिढी नुसत्या डोळ्यांऐवजी मोबाईल कॅमेर्‍याच्या लेन्समधून दिसेल तेवढयाच जगाकडे बघणारी. बसता उठता चकचकीत सेल्फी काढणारी. क्लिक करो, पोस्ट करो, लाईक करो, भला उसके लाईक्स मेरे लाईक्स से जादा कैसे, फिर क्लिक करो... या चक्रात गुरफटलेली. पण कायम फिलिंग हॅपी विथ अमुकतमुक. 

याचा अर्थ मागची पिढी फार गुणी आणि आजची वाईट असा नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की अजून दहा वर्षांनी येत्या पिढीला हे सेल्फी प्रकरण अगदी जुनाट आणि बावळटपणाचं वाटू शकेल. आज मात्र सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी म्हणजे अर्थात स्वत:च स्वत:चा काढलेला फोटो. जवळ स्मार्ट्फोन असेल तर कुणाला ’फोटो काढून द्या ना हो’ म्हणत त्यांचा कॅमेरा सेट होईतो जबडा दुखेतो ’चीsssज’ करुन हसायची गरज नाही. तरुणाईला त्यांचं दैनंदिन जीवन सेल्फीमधून दाखवायला आवडतंय. ते आत्ता काय करतायत, कुठे आहेत, काय खातायत, काय अनुभवतायत हे सारं ते सेल्फीतून शेअर करतात तर मध्यमवयीन लोक फक्त विशेष प्रसंगी काहीशा ताणलेल्या, घाबर्‍या चेहर्‍याने सेल्फी काढतात. अनेकांना त्यासाठी कॅमेर्‍यात नेमके कुठे पाहावे ते कळत नाही. काहीही असलं तरी सेल्फी काढल्यावर त्यात स्वत:ला बघण्यातली मजा काही औरच. 

रॉबर्ट कॉर्नेलिस या अमेरिकन छायाचित्रकाराने १८३९ मध्ये एकदा तांत्रिक खटाटोप करुन स्वत:चा फोटो काढला होता. त्याला पहिला सेल्फी म्हणता येईल. १९९० मध्ये कोडॅक कंपनीने स्वप्रतिमा घेता येईल असा एक कॅमेरा बाजारात आणला. २००२ मध्ये ’सेल्फी’ हा शब्द ऑस्ट्रेलियन इंटरनेट फोरमवरच्या एका पोस्टमध्ये पहिल्यांदा वापरण्य़ात आला. २००३ मध्ये पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेर्‍यासह म्हणजेच सेल्फी सुविधेसह सोनी एरिक्सनचा पहिला मोबाईल फोन बाजारात आला. २०११ मध्ये चर्चेत आलेल्या ’इन्स्टाग्राम’ या सोशल मिडीयामुळे सेल्फीला हवे तसे इफेक्ट देऊन ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’ करण्य़ाची सोय झाली. २०१२ मध्ये वापरातला हा सर्वात लोकप्रिय शब्द असल्याची नोंद टाईम मॅगॅझिनने घेतली होती तर २०१३ मध्ये या शब्दाचा थेट ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्य़ात आला. सेल्फीची लोकप्रियता इथेच न थांबता पार अंतराळात जाऊन पोचलीय. रोव्हर यान मंगळावर गेले तेव्हा त्यातील अंतराळवीरांच्या सेल्फी नासाने प्रसिद्ध केल्या होत्या. 

मनात येईल तेव्हा, हवा तसा स्वत:चा फोटो घेता येणं आणि इंटरनेटद्वारे लगेच तो शेअर करता येणं हे सेल्फीचं वैशिष्ट्य. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात १३ ऑस्कर सेलेब्रेटींनी काढलेला ग्रुप सेल्फी शब्दश: वार्‍याच्या वेगाने शेअर झाला. कार्यक्रम संपायच्या आत त्याच्या रिट्विटच्या संख्येने बराक ओबामांनी अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर काढलेल्या सेल्फीच्या रिट्वीट्सचा विक्रम मोडला होता. भारताचे पंतप्रधान मोदी असोत किंवा स्वीस, पोर्तुगालचे अध्यक्ष, सेल्फीचा अचूक उपयोग राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमानिर्मितीसाठी करुन घेणारे अनेक जण दिसतात. ग्रुप सेल्फी किंवा ग्रुफी हे सेल्फीचं इतरांनाही सामावून घेणारं बहिर्मुख रुप.

सेल्फीचा मोह आवरणं सगळ्य़ांनाच अवघड. मुख्यमंत्र्यांची पत्नीही त्याला अपवाद नाही. नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई-गोवा क्रुजवर त्यांनी सेल्फी काढले. यावरील विरोधकांच्या टीकेला ’आता आमचं वयच सेल्फी काढण्याचे आहे, मग त्यात गैर काय? माझ्या पत्नीने एक व्यक्ती म्हणून काय करायचे हे मी ठरवत नाही’ असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. यादृष्टीने महिलांच्या बाबतीत विचार केला तर एक चांगलं स्थित्यंतर लक्षात येतं. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. अर्थात या फोटोंच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणार्‍यांचं प्रमाण फारच कमी त्यामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढलंय हे ही खरं. 

सुरुवातीला स्वत:ला फोटोत निरखून पाहण्याचं नैसर्गिक कुतूहल मग छंद आणि मग वेड हे टप्पे वेगाने पार करत ’सेल्फीग्रस्त’ झालेले अनेक जण सभोवताली दिसू लागलेत. जगाला दाखवण्य़ालायक आपल्याजवळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे आपला मुखडा असं कित्येकांना वाटू लागलं आहे. स्वकेंद्रित जगणार्‍या, आत्मविश्वासाचा अभाव असल्याने सतत लक्ष वेधून घेण्याची वृत्ती असलेल्या लोकांना सारखे सेल्फी पोस्ट करावेसे वाटतात असं मनोविश्लेषक म्हणतात परंतु सतत फोटो पोस्ट केल्याने प्रतिमा खालावते असा निष्कर्ष फेसबुकने एका पाहणीत काढला आहे. समाजशास्त्रज्ञ प्रा. गेल डाईन यांच्या मते स्वत:हून वारंवार सेल्फी पोस्ट करणार्‍या बहुतेक स्त्रिया, पुरुषांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने सेल्फी घेतात. त्यांच्या मते सेल्फीचे वाढते वेड हे पॉर्न संस्कृतीचा प्रभाव वाढत चालल्याचे द्योतक आहे.
मुलांचं अतिरेकी सेल्फीप्रेम हे कित्येक पालकांच्या काळजीचा विषय ठरलं आहे. हे लिहितानाच बातमी वाचतेय, सिंहगडावर फिरण्यासाठी आलेला तरुण कड्यावरून सेल्फी काढण्याच्या उत्साहात अडीचशे फूट खोल दरीत कोसळला. १५ मार्च २०१४ रोजी चालत्या गाडीच्या टपावर सेल्फी काढताना वीजेचा धक्का बसून मृत्यु झाल्याची पहिली नोंद आहे. त्यानंतर जगभरात आजवर किती जणांनी केवळ आपली छाप पडावी म्हणून ’हटके’ सेल्फी काढताना जीव गमावले याची गणती नाही. दुसरीकडे, समोर कुणीतरी बुडतो आहे तेव्हा त्याला वाचवायचं सोडून हे रोमहर्षक(!) दृश्य स्वत:च्या छबीसह कॅमेर्‍यात टिपण्याची विचित्र वृत्ती वाढते आहे. 

सेल्फी ही गंमत आहे, सुविधा आहे, एक झकास तंत्र आहे, आयुष्य नाही हे भान त्यासाठी येणं गरजेचं आहे. प्रथमपुरुषी, ’मी’ ला गोंजारणारी कोणतीही गोष्ट आपल्याला आवडते. त्यापलिकडे जाऊन ’मी’ चा परिघ रुंदावणारा, एखादा प्रश्न सूचकतेने मांडणारी पार्श्वभूमी असलेला, कलात्मकता दाखवणारा सेल्फी सुद्धा काढता येईल की. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife सारख्या टॅगचा वापर करुन आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य सेल्फीद्वारे शेअर करण्याचं आवाहन नुकतच एका फोनकंपनीने केलंय. फोटो सजवणारे अ‍ॅप डिलिट करुन स्वत:ला आहोत तसं स्वीकारुन सोशल मिडीयावर असं निखळ आणि निर्भेळपणे वावरता आलं तर तो खरा सेल्फी. आतला सेल्फी. आपला सेल्फी.

 नार्सिसस नावाचा एक रुपवान शिकारी होता. त्याने म्हणे एका तळ्य़ात आपले प्रतिबिंब पाहिले. आपल्या रुपावरच्या अतिरेकी प्रेमामुळे त्याची नजर अगदी जीव जाईतो त्यावर खिळून राहिली. तहानभूक हरपून आपल्या प्रतिमेकडे एकटक पाहणार्‍या नार्सिससचं शरीर नष्ट होऊन पुढे त्याजागी एक फूल उमललं. हा नार्सिसस ग्रीक लोककथेतला पण आपल्या प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात एक नार्सिसस दडलेला असतो. त्याच्यावर ताबा मिळवण्य़ाचा प्रवास म्हणजेच जगणं. या प्रवासात स्वत:च्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही, त्यातच गुंतून राहणं मात्र चूक आहे. तेव्हा आपल्या आतल्या नार्सिसस उर्फ कौतुकराव किंवा कौतिकाबाईंना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला तर ’पाऊट’ न करताही आपला सेल्फी नि:संशय देखणा निघेल.

HOME SWEET HOME

जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा----हिंडायला जा, तीर्थयात्रेला जा, नातेवाईकांकडे जा; पण एका  ठराविक कालावधीनंतर तुमचे पाय  आपसूक घराकडेच वळतात, आपल्या हक्काच्या घराकडे. कारण "आपलं घर ते आपलं घर" असतं.
     एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो, तेव्हा निसर्गाचे विविध, नयनमनोहर आविष्कार आपल्याला खुणावत रहातात. काही तर वेड लावतात अक्षरशः. निसर्गाच्या ह्या  छटांमध्ये  डोंगर-दऱ्या, उंचच्या उंच झाडे, रंगबिरंगी फुले, वेगवेगळे पक्षी,प्राणी  आपल्याला साद घालत असतात. कुठे नितळ,स्वच्छ,सुंदर पाणी,तर कुठे खळाळनारा ओघ,कुठे मस्तवाल,तर कुठे आक्रमक असणारा पाण्याचा प्रवाह----धरण,धबधबे,,झरे, ओढे--पाण्याची पण किती विविध रूपे पाहायला मिळतात.
अर्थातच, जंगल, समुद्र,देवालये,ह्या प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य आपल्या ठिकाणी निराळं. तरीही---असे  असून देखील  तुम्ही त्यात कायम रममाण होऊ शकत नाही,हे तितकेच खरे. नातेवाईकांकडे गेल्यानंतर, अगदी आपल्या जिवलग व्यक्तींकडे गेल्यानंतरही, कितीही समाधान वाटत असले, कितीही सुख सुविधा  असल्या तरी आपल्या घराची वाट मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपल्याच संकेतांचे संकेत शोधत असते.
    थोडक्यात, कितीही हिंडलो, फिरलो, तरी आपल्या स्वतःच्या घराची ओढ स्वस्थ बसू देत नाही.  मला वाटतं, स्त्रियांना ही ओढ पुरुषांपेक्षा जरा जास्त प्रमाणात असावी. कारण पुरुषांपेक्षा तुलनेने त्या घरात जास्त वेळ असतात आणि जास्त प्रमाणात गुंतलेल्या सुद्धा.   एका स्त्री साठी तिचं माहेरचं घर किती महत्वपूर्ण असतं हे तिच्या शिवाय कुणीच सांगू शकणार नाही. ज्या घरात सगळं लहानपण घालवलेले असतं, ज्या शाळेत मैत्रिणींसोबत धिंगा मस्ती केलेली असते, ज्या उंबरठ्यावर वेळोवेळी ठेचा लागलेल्या असतात, आईच्या हातचा धपाटा आणि बाबाचा ओरडा खाल्लेला असतो, त्या जागेतील सगळ्या आठवणी सुगंधी कुपीत दडलेल्या असतात.
 लग्न झाल्यानंतर एक अल्लड बालिका अचानक गृहिणी होते आणि हा नवीन पदभार सांभाळताना नवीन घरातही गुंतत जाते, आपलं घर म्हणत.     
      इतकी लांबलचक प्रस्तावना करण्यामागचा उद्देश म्हणजे, मी नुकताच अकोला-पुणे-मुंबई-पालघर-अकोला असा 8 दिवसाचा प्रवास करून घरी परतले. आयुष्यात प्रथमच प्रवास केला,तोही 8 दिवसांचा अशातला मुळीच भाग नाही.प्रवास भरपूर केला,अगदी 17 दिवसांचा सुध्धा(तरुण वय आणि वयाचा उत्साह असताना) ; पण ह्यावेळी तिव्रतेने जाणवलं की स्वतःच्या घराइतकी सुरक्षित आणि मन मानेल तशी जगण्याची दुसरी हक्काची कुठलीही जागा नाही.  हा उतारवयाचा , कमी झालेल्या सहनशक्तीचा परिणाम असू शकतो कदाचित.  
     एकतर 5 महिन्यापूर्वीच माझा अपघात झालेला, त्यामुळे एक हात अवघडल्या सारखा,आणि मी सुरुवातीपासूनच मूलखाची घाबरट, वेंधळी. (आता जे आहे ते आह  ) सतत कसलं ना कसलं टेंशन बाळगणारी, सतत  कसली ना कसली काळजी करणारी. माझी मुलं तर मला "टेंशन की दुकान" म्हणतात.बऱ्याचदा तर , ही बाई कसली येडी आहे,असं म्हणायलाही मागे पुढे पहात नाही.असो. तो एक जुना सिनेमा होता मेहमूदचा,'पारस' नावाचा,त्यातील मेहमूद सारखी गत होते माझी खूपदा. असं केल्याने तसं होईल का? तसे केल्याने तसे तर होणार नाही?  ह्या वेळी पूर्ण प्रवासात माझ्या तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी पण खूप होत्या, त्यात पाऊस. पुण्यात तरी रिपरिप पण मुंबईत? धो धो बरसत होता, एकसारखा.

पावसात रस्ता क्रॉस करायची भीती, high way वर. टॅक्सी, कॅब, रिक्षाने जायचीही भिती---ड्राइवर ला पावसात समोरच नीट दिसलाच नाही तर? कुठे धडकला तर? मधेच गाडी बंद पडली तर? गाड्या late होऊन मधेच कुठे अडकून पडलो तर? बापरे! काय करू मी स्वतःचं? कहर वाटेल पण आम्ही taxit असताना एक जोडपे two व्हिलर वरून high way वरून जात होते. मागे बसणाऱ्या बाईच्या डाव्या हातात अगदी लहान मूल आणि उजव्या हाताने ती चक्क दात कोरत होती. तिच्यापेकशा तिच्या हातातल्या बाळाचं मलाच इतकं टेंशन आलं की विचारता सोय नाही. मी मनाशी म्हटलं च्यायला, आपण कमी रहदारीच्या रस्त्यावरही पाठीमागे बसताना जीव सांभाळून गाडीला पक्के धरून(नवऱ्याला धरून बसलेले आवडत नाही म्हणून गाडीला)  बसतो आणि ही बया इतकी बिनधास्त कशी? असो.  डर का सिलसिला लंबा चलता रहेगा.  शेवटी अकोल्याला येतानाही हिसका बसलाच. आमची ट्रेन कुर्ला वरून (L t t) होती,शालिमार एक्सप्रेस. रात्री 10 ची.  घरातून 9 लाच निघालो. लेकीच्या घरापासून स्टेशन वर जायला hardly 15 ते 20 min लागतात.  पण तिथे ब्रिज चे काम सुरू असल्याने ट्रॅफीक जॅम आणि खूप slow चालत होती. जावयाने कॅब बुक केलेली ऐन वेळी कॅन्सल झाली. इकडे एकही रिक्षावाला तयार होत नव्हता. ट्रेन
सुटेल की काय अशी काळजी वाटायला लागली. शेवटी एक रिक्षावाला डबल भाड्यात तयार झाला.

पण पुढून turn घेण्या आधीच त्याने अचानक गर्रकन रिक्षा वळवली आणि काही कळायच्या आत wrong side ने दामटायला सुरुवात केली.माझे तर पाच गेले दोन राहिले अशी गत झाली. एकतर हायवे, समोरून एकामागोमाग एक फूल स्पीड ने गाड्या येताहेत आणि आमचा हिरो "अक्षयकुमार" बन के side side ने मार्गक्रमण करतोय.पुढे लेफ्ट side ला वळायचे होते तेव्हा त्याने असा काही turn मारला , क्षणभर वाटले, संपले आता सगळे. आता काही अकोला परत दिसत नाही, ना आपले घर. पोलिसाची जोरदार थाप पडली रिक्षा वर; पण आमचा हिरो कसला जुमानतो? तो जे सुसाट सुटला, ते थेट L T T स्टेशनवरच.आम्ही हुश्श करत खाली उतरलो. 20 min अगोदरच पोचलो होतो.रिक्षा वाल्याचा करामतीतून वाचलो आणि माणिक बाईंची करामत सुरू झाली. सरकत्या जिन्याने वर जात असताना काय घोळ झाला न कळे. तसेही "घोळ आणि माणिक" ह्यांचं समीकरण माझ्या बऱ्याच मैत्रिणींना पाठ झालंय. मला काहीतरी वेगळं जाणवलं आणि मी चक्क उलट्या दिशेने खाली यायला लागली. ( हा देखील भिती चाच एक भाग)  नशीब, मागून समीर येत होता. त्याने हातातल्या सामानसुमान सह पकडलं आणि सुखरूप वरती घेऊन आला.  मी जरा स्थिरावल्यावर त्याला म्हटलं, बापरे, काय डेंजर रिकशा चालवली त्या  भैताड ने तर मला म्हटला, मॉम,तू काय कमी डेंजर नाही आहेस. काय करत होतीस कल्पना तरी आहे का तुला?  अकोल्याला जर ही सुविधा झालीच तरी तू आपली सरळ जिन्याने वा लिफ्ट ने जाशील. खाली मान घालून चुपचाप ऐकून घेतले. दुसरा पर्याय तरी होता कुठे? देवाला प्रार्थना केली, देवा, आता एकदाचे सुखरूप आम्हाला आमच्या घरी पोचू दे.   इथे ह्या विषयाच्या अनुषंगाने अजून 2 गोष्टी नमूद कराव्या वाटतात. 1)- आळंदीला आमच्या ह्यांनी मला एका हाड वैद्यकडे नेले होते( मी बरीच हाड हाड करून थकली तरी) त्या वैद्याने 15 min त माझी अशी काही हाडे मोडली की साक्षात "तो" आठवला. एकंदरीतच अघोरी प्रकार होता तो. ( त्या क्षणाला वाटले नवरा कुठल्या जन्माची खुन्नस काढतोय काय जाणे) पण नंतर मात्र बऱ्यापैकी रिलीफ जाणवला.  
2)- दादर वरून कुर्ल्याला येताना लोकल मध्ये चढताना दुखऱ्या हाताला जोरदार झटका बसला आणि चप्पलही तुटली.  
 काही का कारणे असू देत पण कधी एकदा आपल्या घरी जातो असे ह्यावेळी तरी मला सारखे वाटत होते.  आणि दुखले खुपले, अडचणी निर्माण होत असल्या की प्रकर्षाने जाणवते. 
     तसेही काही गोष्टी तरी नक्कीच अशा आहेत ज्या आपण फक्त स्वतःच्या घरीच करू शकतो जसें आडवे तिडवे ताणून देणें----  असो. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.  माझा अनुभव तरी असा आहे। . आणि तुमचा?🙏


माणिक नेरकर.

Sunday, July 7, 2019

स्मरणक्षण



मला वाटते ग नवा जन्म घेऊ
नवे श्वास गुंफू, नवे गीत गाऊ
जुना गाव राही कुठे दूर मागे
नव्या पावलांना नवा मार्ग देऊ 

शान्ताबाईंच्या या कवितेच्या ओळींमध्ये नव्याची ओढ आहे. हे असं आयुष्यात नवं काही तरी घडत राहणं, ही प्रत्येक माणसाची भावनिक नि मानसिक गरज आहे. जगाच्या या पसा-यात किंवा संपूर्ण विश्वाच्या संदर्भात... क्षणांच्या अविरत साखळीत या नवीन क्षणांचं स्थान, अत्यंत अल्पजीवी किंवा नगण्य आहे. पण आपल्या मनात ते महत्वाचे असतात. मात्र काही क्षण असेही असतात की जे विश्वाच्या एखाद्या नव्या पर्वाचा प्रारंभ करणारे असतात. 1913 साली अशाच एका नव्या पर्वाची सुरूवात झाली होती. 
अर्थात त्याची बीजं पेरल्या गेलीत ती, 1896 या वर्षी! 7 जुलै 1896 हा तो दिवस होता, ज्यादिवशी ल्युमिअर बंधूंनी तयार केलेला सिनेमा मुंबईत झळकला आणि ध्येयवेड्या दादासाहेब फाळकेंना एका नव्या पर्वाचा मार्ग खुणावू लागला. 'चित्रपट' नावाचे नवे विश्व साकारू लागले. 'शाम्बरिका खरोलिका' सारख्या चित्र चलत करणा-या प्रयोगापासून तर 'किनेटोस्कोप' वर लघुपट तयार करण्यापर्यंत अनेक प्रयोग सुरू झाले
यानंतरच्या टप्पा होता, पहिला कथनात्मक चित्रपट अर्थात फीचर फिल्म बनविण्याचा...! ते बनविण्याचं श्रेय सुद्धा एका मराठी माणसालाच जातं. आर.जी. अर्थात दादा तोरणे यांनी 'पुंडलिक' चित्रपट बनवला. विशिष्ट कथानक रचून त्याला चेहरा देण्यासाठी कलाकार घेण्याचा आणि त्या कलाकारांना कॅमेरासमोर उभं करून चित्रण करण्याचा तो पहिला प्रयत्न होता. दोन आठवडे प्रेक्षकांची गर्दी खेचणारा, बाॅक्स ऑफिस फुल्ल करणारा चित्रपट 'पुंडलिक'! 
   त्यानंतर आला सलग 23 दिवस चाललेला आणि महाराष्ट्राच्या सिमा ओलांडून इतर भागात पोहचलेला पहिला चित्रपट, 'राजा हरिश्चंद्र'. वर्ष होतं 1913!
1913 ते 2019 या अवधीत, चित्रपट सृष्टीत ब-याच घडामोडी झाल्यात, अनेक बदल घडलेत.
मूकपटानंतर 1931 साली बोलपट युग अवतरले. कृष्णधवल पासून तर रंगीत डीजिटलपर्यन्त, 70 एम एम पासून सिनेमास्कोप पर्यंत नवंनवे प्रयोग पचवत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा गाजतो आहे. 'परंपरेचे पुननिर्माण म्हणजे कला' हे तत्व अंगिकारत पुढे जातो आहे.

प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी
कसले तरी गाणे गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो
गाणे गातात
देणे देतात
झडून जातात
झाडे नुस्ती नुस्ती
नुस्ती राहतात

आरती प्रभूंच्या या कवितेप्रमाणेच काहीसे चित्रपट क्षेत्राचे आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक, गायक, अभिनेते आणि कोण कोण...विविध पक्षी या चित्रपटसृष्टीरूपी झाडावर कुठून कुठून आलेत. विसावलेत. आणि आपला ठसा उमटवून निघून गेलेत. जीवनाच्या सर्वांगांना व्यापून असलेल्या 'दिक्' आणि 'कला' या तरल तत्वांना घेऊन सिनेमा हा प्रकार 'नादतत्वा'च्या संगतीने, स्वर आणि ताल वादनाच्या साथीने मानवी भावभावनांचा कोलाज आजही निर्माण करतो आहे. 
कलावंत आणि रसिक हे दोन महत्वाचे दुवे या सिनेमा नावाच्या आकर्षणाने जोडले गेले आहेत. 
     कला आपल्या अवतीभवती असते. सोबत करते. नव्या वाटा सुचवते. नवे जगणे सांगते. म्हणून तर आतबाहेर कलेचा संचार झालेली मंडळी या रूपेरी पडद्याद्वारे सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवितात. प्रत्येक कलावंत म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईत असतो. काही एका चित्रपटापुरते तर काही ध्रुवता-याप्रमाणे अढळ आहेत!
सिनेमा आमचा श्वास आहे. सिनेमा आमच्या स्वप्नजगतातील भास आहे. सिनेमा आमच्या कलाकारांच्या कलागुणांचा ध्यास आहे.

हे कुठले रस्ते आपण घडवित जातो
वळणावर कुठली वळणे तुडवित जातो
जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी
हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो

अशी नव्याकडे वाट जात आहे पण सोबतीला जुन्याचाही आठव आहेच. आठवणींच्या या कुपीतून ओघळलेले हे होते चारदोन स्मरणथेंब! खास तुमच्यासाठी...! ते आजच का उलगडलेत तर जाणवले की हा जुलै महिना आहे आणि 1896 साली याच महिन्याच्या 7 तारखेला एका नव्या क्षणांचे रोपण झाले होते. त्या आठवणींना हलकासा उजाळा देत पुढच्या क्षणांना सामोरे जाण्यासाठी हा लेखनप्रपंच!

- सीमा शेटे (रोठे), अकोला

Friday, July 5, 2019

माझा सखा



P