Monday, May 6, 2019

महाराणी ताराबाई

( चार एक वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाच्या नवरात्र व्याख्यानमालेत मला वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. विषय होता,"महाराणी ताराबाई". त्यावेळी बराच अभ्यास करून मी काही माहिती संकलन केली होती. ती माहिती आणि त्यावरून माझ्या नोंदी-मतं असं एक व्याख्यान तयार झालं होतं. या भाषणाच्या नोटस् परवा अचानक सापडल्यात. तेंव्हा ते तुम्हा सर्वांसमोर लेखरूपात मांडावं, असं मला वाटलं नि यावेळी मी ब्लाॅगसाठी हाच विषय निवडला. वाचा नि जाणून घ्या इतिहासाची ही काही पानं...........)

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की शिवाजी महाराजांनी मराठी राज्य स्थापना सतराव्या शतकात केली. प्रमुख चार शत्रू होते,मोगल-आदिलशहा-सिद्धी-पोर्तुगीज या सर्वांचा बिमोड करत हिंदूंच्या सार्वभौम राज्याची  स्थापना त्यांनी केली. 1674 चा राज्याभिषेक सोहळा आणि 1680 मधला महाराजांचा मृत्यू... हा सर्व घटनाक्रम आम्ही आजवर असंख्य वेळा ऐकला आणि मालिकांमध्ये पाहिला आहे. 
त्यानंतरची औरंगजेबाच्या दक्षिण प्रदेशांमध्ये दाखल होण्याची हकीकत आपल्याला माहित आहे. त्याच्याशी संभाजी महाराजांनी दिलेल्या झुंजीची आणि नऊ वर्षाच्या संघर्षानंतर 1689 यावर्षी पकडल्या जाण्याची व हाल हाल होऊन मारल्या गेल्याची तसंच येसूबाई आणि शंभू पुत्र शाहू शहेनशहाच्या कैदेत असण्याची वर्णनं अंगावर शहारे येत आपण ऐकली आहेत. केवळ  मराठाच नव्हे तर इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हे सांगताना, ऐकताना, पहाताना एकीकडे अभिमान वाटतो तर दुसरीकडे दुःखाने काळीज पिळवटुन जातं. इथवरच्या घटना आपल्याला तोंडपाठ आहेत. यानंतरचा इतिहास मात्र फारसा माहित नाही. तो माहित असणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असली तरी अगदीच  नाही असंही नाही.  1689 नंतर काय झालं? तर भोसल्यांच्या घरात 'पालथा जन्मलेले' आणि 'पातशाही पालथी करेल' अशी ज्यांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली गेली ते राजाराम आणि त्यांच्या तीन राण्या मागे उरल्या. 1689 ते 1700 पर्यंत अकरा वर्षाचा काळ राजारामांनी मोगलांशी लढा दिला. पण सतत धावपळ त्यांना सोसली नाही. त्यांची मुळातली नाजूक प्रकृती अधिक खालावली आणि 2 मार्च 1700 मध्ये त्यांचे निधन झाले. ही वार्ता कळताच मराठीशाही मध्ये शोककळा पसरली तर मुघलशाही मध्ये आनंदाचे उधाण आले. ज्या मराठी राज्यावर अधिराज्य गाजवण्याचे स्वप्न घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, ते स्वप्न आता  साकार होणार होतं. कारण आता मागे उरल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या  असहाय्य विधवा सुना आणि नकळत्या वयातील नातू! सेना सरदार होते...पण निर्नायकी! नेत्या शिवाय भांबावलेले ते शूर वीर काय करणार? जास्तीतजास्त एखादे वर्ष लढू शकतील आणि मग विजय मिळवून आपण परत आपल्या राजधानीला जाणार...या मनोराज्यात तो दंग झाला.

हाय रे किस्मत! मराठे कोणत्या मुशीतून आले आहेत, याचा त्याला अंदाज आला नाही. औरंगजेब याच मातीत मिसळला पण त्याला मराठ्यांवर विजय मिळविता आला नाही. कोणताही पुरुष नेता नसतानाही हे घडले होते. ते कसे? 1707 यावर्षी औरंगजेबाचे निधन झाले. त्याची आकांक्षा, लालसा, इच्छा सर्व धुळीला मिळविणारं व्यक्तिमत्व कोणतं होतं? ती होती एक स्त्री! साधीसुधी नव्हे मुत्सद्दी कणखर आणि शौर्य शालिनी! अशी ही स्त्री म्हणजे शिवरायांची सून आणि राजारामांची पत्नी ताराराणी! फक्त कोणाची सून, मुलगी, पत्नी, माता, आजी एवढीच तिची ओळख आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधायला मुळातून तिचं चरित्र आपल्याला वाचावं लागतं. She was a clever, intelligent women & had obtained reputation असं तिचं वर्णन तारीख-ए- दिलकुशा या फारसी पुस्तकात भीमसेन सक्सेना यांनी लिहिलं आहे.  
"ताराबाई बुद्धिमान व शहाणी सैन्याची व्यवस्था व राज्यकारभार याबाबत मोठा लौकिक" अशी मोगली इतिहासकार काफीखान यांनी लिहिलेली नोंद आहे.
 "दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी 
ताराबाई राम राणी | भद्रकाली कोपली
 राम राणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली 
प्रलयाची वेळ आली | मुगल हो सांभाळा"
.... असे कवींद्र गोविंद यांनी कवन केले आहे. तर परशुराम चरित्र काव्य यामध्ये,
"ताराबाई धैर्य पुरुषा शूरत्व आणि बळे घेओनी नृप राम स्वामी सह तेजे प्राप्त झाली दळे"
 असे तिचे वर्णन 'परशुरामांची चरित्र काव्यात आहे.

  ही ताराराणी तळबीड, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील देशमुख हंसाजी मोहिते यांची कन्या! हंसाजी पराक्रमी. ते शिवाजींचे सेनापती होते. चिपळूणच्या युद्धात त्यांनी पराक्रम गाजविल्यामुळे 'हंबीरराव' ही त्यांना पदवी मिळाली होती. ते सोयराराणी साहेबांचे भाऊ. त्यांना शिवराज्याभिषेकानंतर  8 महिन्यानी एक कन्या झाली. नाव ठेवलं, सीता! कदाचित पुढचा  वनवास हासुद्धा सिते प्रमाणेच तिच्या नशिबात असावा. 'कॅरेक्टर इज द डेस्टिनी'.... माणसाचा स्वभाव हीच त्याची नियती! त्याच्या दुःखाचे ती कारण असते, असं म्हटल्या जातं. सोयराबाई आणि संभाजी महाराज यांच्यात सख्या नव्हतं. पण संभाजी आणि हंबीर रावांमध्ये मात्र जवळीकता होती. महाराजांच्या मृत्यूनंतरच्या वेगवान घडामोडीत हंबीररावांनी संभाजींना साथ दिली. 
सोयरा पुत्र राजारामांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत  जानकीबाई बरोबर विवाह झाला होता. सोयराबाईंच्या मृत्यूनंतर संभाजींनी राजारामांचा विवाह मोहिते कन्येशी ठरवला. ही मुलगी लहानपणापासून तडफदार नि लढाऊ बाण्याची होती. घोड्यावर बसणे. दांडपट्टा चालवणे, ही तिची आवड होती. सोबत मुळाक्षरांची ओळख सुद्धा करून घेणे सुरू होतं. लग्न झालं तेव्हा आठ वर्षाची सीता आणि तेरा वर्षाचे राजाराम होते. लग्न झाल्यावर ती सीता ची तारा- ताराची ताराऊ-ताराबाई- ताराराणी झाली. तसंच राजकारणाच्या  पटावरील चालींचा भाग म्हणून घाटगे घराण्यातील राजस बाई ताराबाईंची सवत म्हणून भोसले घराण्यात आली. (जी पुढे ताराबाईंच्या वनवासाला कारणीभूत ठरली) हे दोन्ही विवाह संभाजी महाराजांच्या पुढाकाराने झालेत. त्यानंतरच्या आयुष्यात राजारामांनी अंबिका बाईंशी विवाह केला. शिवाय त्यांच्या अनेक नाटक शाळा होत्या. त्यातली सगुणाबाई राजारामांना अत्यंत प्रिय अशी नाटक शाळा होती. 

 संभाजीमहाराजांच्या  नजर कैदेत रायगडावर पाच सहा वर्ष राहावे लागले तेव्हा ताराराणीने कळत नकळत त्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरविले होते. युद्ध कौशल्य आणि त्याचं तंत्र तिने जाणून घेतलं होतं. ताराराणीचं वय नकळतं! पण येसूबाईंचा सहवास आणि संभाजींची तडफ यातून ही हुशार मुलगी खूप काही शिकत गेली. तिने आपली आत्या, सोयराराणी हिचे हाल बघितले होते... तेही नकळत तिच्या मनावर परिणाम करून गेले. या सगळ्याचा तिच्या मनावर प्रभाव पडला आणि पुढील आयुष्यावर देखील त्याचा परिणाम झाला. संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत सापडले रायगडाला वेढा पडला. सर्वांना प्रतापगडावर पाठविण्याचा निर्णय झाला. येसूबाईंनी राजारामांचा मंचकारोहण विधी करून घेतला. प्रतापगड-पन्हाळा-विशाळगड-वेंगुर्ला बंदर- खुष्की या मार्गाने  बिदनूर आणि शेवटी जिंजी असा दगदगीचा प्रवास झाला. इकडे येसूबाई आणि शंभू पुत्र शाहू मोगलांच्या अटकेत सापडले.  संभाजींच्या मृत्यूनंतर  राजाराम मंचकारोहण विधीद्वारे राज्याचे  प्रमुख होते आणि राज मंडळ सुद्धा अस्तित्वात होते. राजाराम जिंजीत...! कुटुंबकबिला मात्र दक्षिणेत होता. तेव्हा राजमंडळाची प्रमुख म्हणून ताराबाई रामचंद्र अमात्य यांच्यासह जातीने सर्व कारभार पहात होती. तिची जरब पूर्ण कारभारावर होती. "शिवरायांची सून खरी" अशी तिच्याबद्दल नोंद तत्कालीन कागदपत्रांमध्ये आहे. जिंजीच्या वास्तव्यात ताराबाईंना मुलगा झाला. शिवाजी त्याचे नाव! अंबिकाबाईना मुलगी झाली. मात्र ती लगेच मरण पावली. त्याआधी सगुणाबाईना कर्ण नावाचा मुलगा झाला.  तो राजारामांचा अत्यंत लाडका होता. त्यामुळे मुळातच कणखर असणारी तारा अधिकच करडी झाली.  तिने आपलं सर्व लक्ष मुत्सद्देगिरी आणि राजकारण यावरच केंद्रित केलं होतं. दरम्यान जिंजीला मोगली सैन्याचा वेढा पडला. राजाराम निसटले पण तीनही बायका, दोन मुलं, दोन मुली, अनेक नाटक शाळा, कर्मचारी अशी चार हजार माणसं मोगलांच्या ताब्यात सापडले. पुढे बऱ्याच वाटाघाटी होऊन राजस्त्रियांची सुटका करण्यात आली. (याठिकाणी मनात काही प्रश्न उभे राहतात इतिहासात फक्त घटनांची नोंद असते कार्यकारण भाव नसतो तो तज्ञ अभ्यासक वाचक लावत असतात. असो.)

 काही काळानंतर राजसबाईंना मुलगा झाला. ज्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जो पुढे ताराबाईंच्या दुःखाचे कारण झाला. या काळातही ताराबाई न्यायनिवाड्याचे काम करत होत्या. अगदी मातब्बर सरदारांमधला तंटाही त्यांनी सामोपचाराने निकालात काढण्याची नोंद कागदोपत्री आहे. 'ताराबाईंनी पतीच्या हयातीतच आपला पौरुषी कार्योत्साह आणि बुद्धिमत्ता निदर्शनास आणून दिली होती', असे इतिहास तज्ञ जदुनाथ सरकार यांनी लिहिले आहे. त्याच काळात तिने राज्यकारभाराची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्यास प्रारंभ केला.
 अखेर दगदग सहन न होऊन राजाराम महाराजांचे निधन झाले. मरेपर्यंत आपण मंचकारोहणाद्वारे गादीवर आल्याची त्यांना जाणीव होती. मरतानाही त्यांच्या मनात शाहूच्या सुटकेचाच विचार होता.  अंबिकाबाई सती गेली. त्यावेळी ताराबाई पंचवीस वर्षाची आणि राजसबाई तेवीस वर्षाची  होती. आता या असहाय्य विधवा स्त्रिया काय करणार?  या विचाराने औरंगजेब खूप आनंदात होता. पण मराठ्यांचे पाणी त्याला माहीत नव्हते. मरेंगे पर हटेग नही... असे ते मरहट्टे होते. स्वातंत्र्याचा स्फुलींग ज्यांनी तनामनात चेतविला त्या शिवरायांची सून, ताराराणी दक्षिणेच्या नभांगणातील दैदिप्यमान असा तारा... अस्तित्वात होता, हे त्यानं लक्षात घेतलं नव्हतं. हा होता 1675 ते 1700 पर्यंतचा इतिहास! हा पहिला कालखंड... ज्यामध्ये ताराराणीच्या अस्तित्वाची चुणूक अधून मधून जाणवत होती. त्यानंतरचा 1700 ते 1707  हा दुसरा कालखंड... त्यात फक्त आणि फक्त ताराराणीचा प्रभाव इतिहासावर आहे. असं काय केलं तिनं?

 राजारामांच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न तिने केले. कर्णाला राजा करण्याचे घाटत असताना आक्रस्ताळेपणा न करता पण आडून आडून निष्ठावान सरदारांची चाचपणी सुरू केली. पण कर्ण तीन आठवड्यातच देवीची लागण होऊन मरण पावला. इतरांची तयारी नसताना काहीजणांना दुखावून सुद्धा तिने शिवाजीची मुंज करून घेतली आणि राज्यभिषेक करविला. राजकारण आणि युद्धक्षेत्र दोन्हीवर बाईची जबरदस्त पकड होती. सैन्याचे डावपेच, नेतृत्व आखणीचे गुण इतके जबरदस्त होते की बादशाही सैन्याची सुद्धा दाणादाण उडाली होती.  इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी तिचे वर्णन करताना लिहिले आहे की "मोगल सैन्याला शौर्य दाखविण्याची संधी नाही, त्यांना लढण्याला अवसर राहिला नाही, टिकून राहणे त्यांच्यासाठी शक्य नाही आणि त्यांना पळण्याची सुद्धा शक्ती नाही" असं काय केलं ताराराणीने? तर शक्य तितका  किल्ला लढवायचा  मनुष्यहानी टाळायची शिबंदी संपत आली की वाटाघाटी करून शत्रूकडून भरपूर पैसे घेऊनच किल्ला शत्रूच्या स्वाधीन करायचा. किल्ला जिंकल्याचा आनंद शत्रूला मिळू द्यायचा नाही आणि मोगलांची पाठ वळताच पुन्हा किल्ला काबीज करायचा. असे शिस्तबद्ध नियोजित संघटन कौशल्य हे या राणीचं वैशिष्ट्य होतं. खानदेश- वऱ्हाड- माळवा- गुजरात- तेलंगणा- तामिळनाडू- कर्नाटक सर्वत्र धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, हिंदुराव घोरपडे, कृष्णा सावंत, निंबाळकर इत्यादी सरदार धुमाकूळ माजवत होते. त्यांचा बंदोबस्त करायला मोगली सैन्य जाईपर्यंत ते दुसऱ्या भागात निघून गेलेले असत. सारावसुली, शत्रू प्रदेशात लूट हे सुरू होतं. एकाच वेळी उत्तर- दक्षिण आणि पश्चिम भागात लढणं मोगली सैन्याला जड जात होतं. त्यात या प्रदेशातला प्रतिकूल निसर्ग... यामुळे बादशहाचे हजारो सैनिक गारद झाले. शिवाय लाखो रुपयांची संपत्ती नष्ट होऊ लागली. आपली उभी हयात राजकारण मुत्सद्देगिरी नी शह-काटशह करण्यात घालवलेला मातब्बर मुरब्बी बादशहा शहेनशहा आणि  अवघी पंचविशीच्या उंबरठ्यावरील राजकीय  रणांगणात नुकताच प्रवेश केलेली वीरांगणा यांचा तो सामना होता.
 ताराराणी  हिमतीची खरीच!  एकीकडे आक्रमण तर दुसरीकडे बचावात्मक धोरण अवलंबून मुलासाठी सप्तहजारी मनसब आणि देशमुखी  हक्क मागून,  त्या बदल्यात सात किल्ले  देण्याची तयारी... अशा वाटाघाटी तिने सुरू ठेवल्या. औरंगजेब मात्र बिनशर्त माफीचा  तगादा  लावून बसला होता. 
ताराराणीने या स्वातंत्र्यलढ्यात आपला जीव ओतला. प्रत्यक्ष रणांगणावर, लष्करी तळावर, एका किल्ल्यावरुन दुसऱ्या किल्ल्यावर ऊन- वारा- पाऊस कशाचीही तमा न बाळगता  ही राणी तळपत होती.  सैन्याच्या व्यथा जाणून घेत होती. आपल्या अधिकाऱ्यांच्या शौर्या बद्दल शाबासकी देत होती. या सगळ्या काळात बहुतेक वेळा पन्हाळा हेच तिचं आश्रयस्थान होतं. या पन्हाळ्याचे तिच्या आयुष्यात विशेष स्थान होते. या कर्तबगार राणीच्या शौर्याचे वर्णन इटालियन प्रवासी निकोल्लो मनुची यानेही केले आहे. केवळ औरंगजेबाच्या हट्टामुळे होणारे मोगलांचे नुकसान आणि ताराराणी या मराठी राणीचे संघटन चातुर्य याच्या नोंदी मनुचीने केल्या आहेत. 1707मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. मोहम्मद आझम-शाह-आलम गादीवर बसला. दिल्ली कडे जाता जाता मात्र त्यानं मराठ्यांमध्ये दुफळीचं बीज टाकलं. इथून सुरू होतो ताराराणीचा तिसरा कालखंड...! 1707 ते 1761  म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत...

हा दैदिप्यमान तारा हळूहळू कसा निस्तेज होत गेला...तो घटनाक्रम कोणत्याही इतिहास प्रेमीसाठी  वेदनादायी आहे. अंतर्मुख करणारा आहे. शाहआलम यांनी संभाजी पुत्र, शाहू यांची सुटका केली आणि मोगलांचे मांडलिक म्हणून त्यांना मराठी राज्यात परत पाठवले. (मनात प्रश्न उभा राहतो की हे औरंगजेबाला का सुचले नसेल पण पुन्हा तेच इतिहासात नोंदी आहेत कारणं नाहीत) मोठ्या निकराने लढा देऊन राखलेलं राज्य असं सहजासहजी दुसऱ्याला देणार कसं? 'राखील तो चाखिल' या न्यायाने ते राजारामांच्या वारसांकडे असावं, ही ताराबाईंची भूमिका! तर दुसरीकडे 'थोरल्यांचा हक्क' ही परंपरागत मनोवृत्ती! (यामुळेच तर राजारामांनी सुद्धा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला नव्हता.) यामध्ये अवघे  मराठे ओढले जाऊ लागले. धनाजी जाधवांसारखे पराक्रमी सरदार तटस्थ राहू इच्छित होते. तर खंडेराव दाभाडे यांच्यासारखे शूरवीर ताराबाईंच्या बाजूने उभे राहिले. भरीस भर हा शंभू पुत्र नाहीच, तो तोतया आहे... अशी आवई ताराबाईंनी उठवून दिली. सर्वत्र संशयाचं गोंधळाचं वातावरण होतं. दोन स्वामींच्या  निष्ठेत घुसमटलेल्या 'शंकर नारायण' या सचिवांनी तर हिरकणी खाऊन आत्महत्या केली. शाहूंनी त्याच्या मुलाला नारोशंकरला पुढे सचिव म्हणून नेमले. तोरणा- राजगड- रोहिडा- चंदनवंदन- पावनगड -वसंत गड हे किल्ले हस्तगत करत, शाहूंनी आपला अंमल बसविला. स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. तर इकडे ताराबाईंनी पन्हाळ्यावर स्वतंत्र गादी निर्माण केली. तेच कोल्हापूर संस्थान! सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणाहून कारभार चालत होता. त्यातच अचानक राजसबाई आणि संभाजी यांनी ताराबाई आणि पुत्र शिवाजी याला कैद केली व आपली राजवट सुरू केली. (हे कसे घडले हे एक गूढच आहे पण ते घडले) त्यातच शिवाजी देवी लागण होऊन मृत्यू पावला. सून भवानी बाईला मुलगा झाला. राजाराम त्याचे नाव! त्याला दगाफटका होऊ नये म्हणून बाईंनी त्याला कोकणात पाठवला आणि तो मेला म्हणून  सर्वत्र सांगितले.  संभाजी आणि शाहू यांच्या मधील लढाईनंतर ताराबाईंची मुक्तता झाली. आता त्या साताऱ्याला राहू लागल्या. शाहू आजारी पडले. त्यांना मूलबाळ नाही म्हणून दत्तकाचा शोध सुरू झाला. यावेळी बाईंनी आपला नातू राजाराम याला पुढे केले. शाहू पत्नी, सकवारबाई यासाठी तयार नव्हती. शाहूच्या मृत्यूनंतर तीने अधिक काही अडथळा आणू नये म्हणून तिला सती जाण्यास भाग पाडले. "सकवार राहिल्यास राज्याचा डोहणा करेल, राज्य बुडवील. सकवारबाई साहेबास सती घालवावी न जातील तर बळे न्यावी" अशा ताराबाईंच्या हस्ताक्षरातील नोंदी आहेत.

 राजाराम गादीवर आले पण अनुभवी ताराबाईंच्या सल्ल्याने जाण्याऐवजी पेशव्यांच्या आहारी गेले. ताराराणींनी अखेर त्यांना नजर कैदेत ठेवले. ताराबाई आणि पेशव्यांमधला संघर्ष वाढता राहिला. ताराराणींना उमाबाई आणि यशवंतराव दाभाडे येऊन मिळाले. निजामाची सुद्धा मदत घेण्याचे प्रयत्न झाले. रामराजे हे आपल्या वंशाचे नाहीत असे त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. कोल्हापूरच्या संभाजींना गादीवर बसवा, असेही त्या म्हणू लागल्या. पुढे पेशव्यांच्यात आणि त्यांच्यात समेट झाला. तरी ताराबाईंच्या मनातील त्यांच्याबद्दलचा राग गेला नव्हता आणि छत्रपतींच्या घराण्यातील या धाडसी स्त्री बरोबर उघड शत्रुत्व पेशव्यांना  पेलवण्या सारखे नव्हते. या सगळ्या घडामोडींमध्येही सामान्य जनतेच्या गरजांकडे ताराराणींचे काटेकोर लक्ष होते.
 अशा या अस्थिर वातावरणात, वयाच्या 86 व्या वर्षी 1761 शाली ताराराणी यांचं निधन झालं. जीवन संपलं. कर्तृत्व मागे उरलं. एखाद्या राजपुरूषाप्रमाणे तडफ गाजवणा-या या राणीचे कार्य.... 1) करवीर संस्थान निर्मिती
2) वेगवेगळ्या मार्गांनी कर जमा करून स्वराज्यासाठी त्याचा विनियोग, याला शिवाजी नीती असं नाव त्यांनी दिलं होतं.
3) सैन्याचा पगार अपुरा पडल्यास वतन देण्यास आरंभ केला.
4) युद्धात कामी आलेल्यांच्या नातेवाईकांना मोकासा जमिनी दिल्या.
5) दरोडेखोरी लुटमारी यापासून संरक्षण दिलं.
6) बेरडांना पायबंद घातला.
7) धार्मिक कार्यासाठी सहकार्य केलं.
 हे त्यांचं महत्त्वाचं कार्य!
 प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या या स्त्रीचं वर्णन  अशा प्रकारे केलेलं आहे....
  •राजाराम यांच्यापेक्षा बायको समर्थ होती - गो. स. सरदेसाई, इतिहासकार 
  •काफीखान तिच्या चातुर्याची  वाखाणणी करून तिनं राज्य विस्तार कसा केला ते नमूद करतो.
 •  Tarabai was a stronger ruler than her husband- भीमसेन सक्सेना (तारीख-ए-दिलकुशा) 
 कर्तृत्वाच्या ऐन शिखरावर उभे राहण्याचे सद्भाग्य आणि सावत्र मुलगा व पुतण्याच्या नजर कैदेत 35 वर्ष राहण्याचे दुर्भाग्य लाभलेली,  तरीपण खंबीर आणि दृढनिश्‍चयी मनाच्या या स्त्रीचं जीवन चरित्र वाचल्यावर आपलं मन नकळत काही बाबी टिपत जातं... 
 ▪इतरांच्या आणि तिच्या लढायांमधला फरक आपल्याला जाणवतो. शिवाजी महाराजांना रक्ताच्या नात्याशी फार मोठा संघर्ष करावा लागला नाही, त्या कटकटी सांभाळायला त्यांची आई समर्थ होती. 
▪संभाजींना तो करावा लागला. पण ते राज्याचे वारस...! हे सर्वांनी मान्य केले होते.
▪ राजारामांना फक्त शत्रूंशी मुकाबला करावा लागला.
▪ याउलट ताराराणी यांची अवघी हयात रक्ताच्या नात्याशी संघर्ष करण्यात गेली. 
▪अंगी कर्तुत्व असूनही परंपरागत मानसिकतेचा फटका त्यांना बसला.
▪ त्यांनी हे राज्य टिकवले  म्हणून टिकले, हे कोणी लक्षातच घेतलं नाही. 
▪ नवऱ्यानं केलेली प्रतारणा बाजूला सारून,  मुलाच्या मृत्यूचं दुःख गिळून, नातवाच्या नाकर्तेपणाला वेसण घालून ही बाई ताठ जगली. तिला जर घरच्यांची साथ मिळती तर  इतिहास वेगळा असता. पण तसे घडायचे नव्हते.
 दुसरी एक नोंद...
 त्या काळातली चरित्र वाचलीत तर जाणवतं मराठ्यांनी मुलीचा जन्म कधी नाकारला नाही. ती सन्मानानं जन्माला आली. इतकंच नव्हे तर पुरुषी समजल्या जाणाऱ्या कलांमध्ये पारंगत होत राहिली.  मग ते तिरंदाजी असो की घोडेस्वारी अथवा मुळाक्षरांची ओळख तिला करून देत असत.  राजकारणाच्या कामात, सदरेच्या कामकाजात, न्याय निवाड्याच्या प्रकरणात स्त्रीला सहभागी करून घेतल्या जायचं. असं होतं तर मग आता का आम्ही मुलीचा जन्म नाकारतो आहोत? तिला का दुय्यम स्थान देतो? जरा विचार करायला हवा. मोगलांच्या अटकेत राहूनही परत आलेल्या स्त्रियांना सन्मानाने वागविणारी त्या काळातली चरित्र वाचली की आजच्या काळातली स्त्रीची असहाय्यता ठळकपणे जाणवते.

 खरं म्हणजे, शेवटी इतिहास काय असतो? तर... घडून गेलेल्या घटना तपासून त्यापासून बोध घेणे आणि पुढे जाणे. पुढे जाताना एक सूत्र लक्षात ठेवायला हवं आहे की, कोणत्याही शहराचा इतिहास हा दगड विटांच्या इमारतीत नसतो. तो इथल्या सामान्य जनांच्या डोळ्यात वाचायचा असतो. डोळे वाचायचे तर ते निर्मळ असावेत. निर्मळ डोळे तेव्हाच दिसतात, जेव्हा आमचं मन सुंदर असतं. मन सुंदर तेव्हाच असतं, जेंव्हा मनात माणुसकी वसत असते. ती चिरंतन राहू द्या, वृद्धिंगत होऊ द्या, हीच अपेक्षा!

No comments:

Post a Comment