याविषयी अनेकांनी खूप छान लेख लिहीले आहे. मी नवीन आणखी काय लिहिणार? पण मिनिमलिझम चा प्रत्यय मात्र मी घेतला. नुकतेच शिफ्टिंग केेले त्यावेळी. पुण्याला शिफ्ट व्हायचे हे जेव्हा ठरले तेव्हा अक्षरशः भोवळ आली होती. तीन मजली घरातील पसारा आवरणे अंगावर काटा आणणारे होते. आणि हा पसारा काही थोडाथोडका नाही तर 30, 40 वर्षाचा होता. घरातील व्यक्ती कमी होत गेली आणि घर मोठे मोठे होत गेले. आणि मग जाणवू लागले की इतके मोठे घर नको गं बाई! आवरता आवरता नाकी नऊ येत होते. फिरून फिरून पाय दुखत होते. काळानुरूप आपणही आपल्यात बदल हे केलेच पाहिजे. आजच्या काळातील एक परवलीचा शब्द अपडेट करणे अगदी तसेच अपडेट वेळोवेळी होणे आवश्यक आहे. इथे मनात विचार आला खरचं गरज नसताना आपण किती फाफटपसारा वाढवत नेतो. हा पसारा आवरताना मी एक सूत्र लक्षात घेऊन हे काम केले. ते सूत्र असे कि मागच्या एक वर्षात हे सामान आपल्याला किती वेळा लागले? याचे उत्तर "एकदाही नाही" असे आले कि ते सामान, वस्तू discard करायच्या. तरीही मी बरेच आवरत आणले होते पण भांडी, गाद्या, दुलया, फर्निचर, पलंग, पंखे अरे बाप रे ही यादी संपणार नाही. शिवाय भंगार जे प्रत्येक महिन्याला by default एरवी पण जमा होतच असते. अबबबब!
कुटुंबातील सदस्य होते तोपर्यंत तेच घर छान वाटायचं. काळ बदलतो तशा गरजा बदलतात आणि पसारा आवरावा लागतो. गरजवंताला या चीजवस्तू द्यायच्या होत्या पण असे गरजवंत अशावेळी नेमके सापडत नाही. फुकटात मिळाल्याला किंमत रहात नाही असा काहीसा गोंधळ सुरू होता. तरीही शेवटी जास्तीत जास्त वस्तू तशाच दिल्या. सगळ्यात जास्त त्रास भांडी आवरताना झाला. पंक्तीचे सगळे साहित्य घरात होते. ताटांची चळत, मोठी, मोठी पातेली, बरं ती ताटांची चळत एखाद्या मंगलकार्यालयाला द्यावी तर तशा ताटात हल्ली चा बफे होत नाही. भांड्यांची पण पार रया गेलेली. त्यावेळी तशीच गरज होती. एकाच मांडवात तीन लग्न झाले म्हणून आणि महालक्ष्मी च्या प्रसादाला दरवर्षी 100, 100 किंवा त्यापेक्षा जास्त लोक जेवायला यायचे. पण आता काळ बदलला आहे आता पुन्हा असे सामान लागणार नाही.आता असे तीन लग्न घरी होणे नाही आणि सणवारही इतक्या मोठ्या प्रमाणावर होत नाही हे नक्की. आताशा पाहुणे पण येणे कमीच झाले आहे. पूर्वी सारखे महिना महिना राहणे आता होणे नाही. म्हणून हा आवरलेला पसारा आता वाढणार नाही याची मी खूप काळजी घेते आहे. माझ्या नंतर तो पसारा आवरायचा त्रास कोणालाही होऊ नये ही माफक अपेक्षा आहे. जगण्यासाठी फारच कमी गोष्टी लागतात हे आता जाणवू लागले आहे. बाकी सब मोह माया है. जैन धर्मातील एक अतिशय उत्तम आणि आवश्यक सूत्र अपरिग्रह! अपरिग्रह म्हणजे अंतरंगातून ममत्वभाव सोडणे. व्यक्ति, वस्तूंचा त्याग करून जगणे आपल्या सारख्या सांसारिकांना शक्य नाही म्हणून मग कमीतकमी गरजा आणि कमीतकमी सामान ठेवणे त्यातल्या त्यात करू शकतो. कोणत्याही वस्तू ची किंवा कुठल्याही सामानाची खरेदी करताना नीट विचार करून खरचं याची आवश्यकता आहे का? हे पडताळून पाहावे.
आणखी एक गोष्ट म्हणजे फारच आवश्यक गोष्ट खरेदी करावी लागली तर प्रथम जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावायची मगच नवीन वस्तू घरात आणायची. जोपर्यंत भागतय तोपर्यंत चलने दो हा एक उपाय करून बघता येईल. जीवनाचा काय भरवसा म्हणून आपला पसारा आवरून ठेवलेला चांगला. म्हणजे एक पाउल मिनीमलिझम कडे जाईल. असे एक एक पाऊल जाणे जमले कि आपोआप माझा मिनिमलिझम साध्य होईल असे वाटते. आहे त्या परिस्थितीत चित्तवृत्ती समाधानी ठेवणे अतिशय गरजेचे आहे. हौसेला मोल नाही म्हणतात. परंतु मोल मोजल्या शिवाय हौस पूर्ण कशी होणार? कुठेतरी थांबायला हवेच आहे नाहीतर हौसमौजेला तर अंतच रहात नाही. ज्याला कुठे थांबायचे हे कळते तो खरा सुखी मनुष्य! जी व्यक्ती संतुष्टपणा ही सवय करून घेईल ती व्यक्ती मिनिमलिझम नक्की अमलात आणू शकते.
Less is more ही उक्ति आणि युक्ति कायम लक्षात ठेवून येथून पुढचा प्रवास.
No comments:
Post a Comment