Friday, April 15, 2022

व्यंकटेश स्तोत्र.... एक उत्कट काव्य!

 मला आठवतं माझी आई अंघोळ करून आली की व्यंकटेश स्तोत्र म्हणायची.अजूनही ती म्हणते.लहानपणी तिचं ऐकून ऐकून आपोआपच ते पाठ झालं आणि थोडं मोठं झाल्यावर रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की आई आम्हाला ते म्हणायला लावायची.

         पुढे काॅलेजमध्ये शिकायला गेल्यावर मराठी साहित्य हा विषय मोठ्या आवडीने घेतला आणि या विषयाला मिळालेल्या चांगल्या प्राध्यापकांमुळे भाषेतले साहित्य आणि साहित्यातलं सौंदर्य थोडं थोडं समजायला लागलं.त्यावेळी रोज व्यंकटेश स्तोत्र म्हणता म्हणता त्यातल्या वाङमयीन सौंदर्याची चुणूक हळूहळू कळायला लागली.मग पुन्हा पुन्हा स्तोत्र म्हणून त्यातलं सौंदर्य लुटायचं हाच उद्योग झाला.
         तोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणजे देविदासांनी विष्णुला प्रसन्न करून घेण्यासाठी केलेली आराधना एवढंच फक्त माहिती होतं.पण व्यंकटेश स्तोत्रातील रसाळ भाषा, उपमा-दृष्टांतांची उधळण देविदासांच्या उच्च कवित्वाची साक्ष देते.
          "अठरा भार वनस्पतींची लेखणी|
          समुद्र भरला मषि करुनि|
          माझे अवगुण लिहिता धरणी|
          तरी लिहिले न जाती||"
      असे जेंव्हा देविदास आपल्या अवगुणांचे वर्णन करतांना म्हणतात तेंव्हा त्यांच्या अलौकीक काव्यप्रतिभेचे दर्शन घडते. परमेश्वरासमोर आपला कमीपणा वर्णन करतांना देविदास म्हणतात'अहो मी केवढा अवगुणी! माझ्या अवगुणांचे वर्णन करण्यासाठी अठरा भार (हजार तोळे) वनस्पतींची अर्थात एवढी प्रचंड लेखणी केली,शाई म्हणून समुद्राचं पाणी वापरलं आणि लिहिण्यासाठी कागद म्हणून अवघ्या धरणीचा उपयोग केला तरी ते पुरेसे ठरणार नाही.'अतिशयोक्तीचा इतका उत्तम आणि समर्पक उपयोग या स्तोत्राला वाङमयीन उच्चतेवर नेऊन पोहोचवतो.

      परमेश्वराशी थोडासा वाद घालताना तर कवीच्या प्रतिभेला स्फुरण चढते.स्वतःचं दारिद्र्य दूर करण्यासाठी देविदास जेव्हा भगवान विष्णूंना आळवतात तेव्हा,
             "लक्ष्मी तुझे पायातळी |
             आम्ही भिक्षेसी घेऊनी झोळी |
             येते तुझी ब्रिदावळी |
             कैसी राहील गोविंदा ?"
     लक्ष्मी तुझ्या पायाशी बसते आणि आम्ही तुझे भक्त म्हणविणारे हातात भिक्षेची झोळी घेऊन फिरतो.अशाने तुझा मोठेपणा राहील का?असा रोखठोक प्रश्न परमेश्वराला विचारून कवी मोकळा होतो. पुढे तो म्हणतो,
          "कुबेर तुझा भांडारी |
          आम्हा फिरविसी दारोदारी |
          यात पुरुषार्थ मुरारी |
          काय तुजला पै आला?"
  तू आमचा पालनकर्ता साक्षात विष्णू आणि तुझा भांडारी कुबेर.असे असताना माझ्या सारखे तुझे भक्त भिक्षेसाठी वणवण फिरतात,यात हे व्यंकटेशा तुला फार मोठा पुरुषार्थ वाटतो का? असे म्हणताना देविदासांनी केलेला विरोधालंकाराचा उपयोग किती समर्पक वाटतो पहा.
            " द्रौपदीसी वस्त्रे अनंता |
            देत होताही भाग्यवंता |
            आम्हालागी कृपणता |
            कोठून आणिली गोविंदा?"
  अर्थात द्रौपदीला वस्त्रे पुरवताना तू दाखवलेली उदारता योग्यच होती.पण आम्हाला देताना तू इतका कंजूस का होतोस? दोन भक्तांमध्ये इतका भेदभाव? असे टिकास्त्र परमेश्वरावर सोडताना देविदासांना कोणतीही भीती वाटत नाही.

            एकामागून एक येणारी दृष्टातांची माला हे ज्ञानदेवांच्या कवित्वाचं वैशिष्ट्य आहे.एखादं तत्व सांगताना वाचकाला एक दृष्टांत भावतो न भावतो,पटतो तोच दुसरा, तिसरा आणि अनेक! देविदासांच्या या व्यंकटेश स्तोत्रात सुध्दा स्वतः ची अयोग्यता परमेश्वराला सांगताना ते लिहितात,
            " उडदामाजी काळे गोरे|
            काय निवडावे निवडणारे|
            कुचलिया वृक्षाची फळे|
            मधुर कोठोनि असतील|
            अराटी लागी मृदुता |
            कोठोनि असेल कृपावंता |
            पाषाणाची गुल्मलता |
            कैशियापरि फुटतील ||"
   अर्थात उडदामध्ये काळे -पांढरे निवडणे शक्य आहे का? काजरा या कडू, विषारी फळे येणाऱ्या वृक्षाला गोड फळं कुठून येतील? काटेरी झाडाला मृदुता येऊ शकेल का? किंवा दगडाला कधी अंकुर फुटतो का? म्हणजेच मी हा असा नखशिखांत अपराधी,पापानी भरलेला पण आता मी तुला शरण आलो आहे.तेंव्हा आपल्या या भक्ताची लाज तुला राखावीच लागेल.कारण तुझ्या या केविलवाण्या भक्ताचा अपमान म्हणजे शेवटी तुझाच अपमान नाही का? म्हणून देविदास पुढे म्हणतात,
   " समर्थाचे घरीचे श्वान | त्यास सर्वही देती मान |तैसा तुझा म्हणवितो दीन | हा अपमान कवणाचा?"


        माझ्यासारख्या आकंठ पापात बुडालेल्या भक्तावर जर तुझी कृपा झाली तर माझं सगळं पाप धुतल्या जाईल, हे व्यंकटेशाला सांगताना कवीने दिलेले दृष्टांत अभ्यासण्यासारखे आहेत.
            " नीच रतली रायासी |
            तिसी कोण म्हणेल दासी |
            लोह लागता परिसासी |
            पूर्वस्थिती मग कैची?
            गावीचे होते लेंडवोहळ|
            गंगेसी मिळता गंगाजळ |
            कागविष्ठेचे झाले पिंपळ|
            तयासि निंद्य कोण म्हणे?"
    असे एकामागून एक सरस आणि समर्पक दृष्टांत देविदास सहज पणे देऊन जातात आणि पुन्हा श्री विष्णूला विचारतात की अशा मला जर तू आपला भक्त मानलं आहेस तर मग
             "कन्या देउनिया कुळ|
             मग काय विचारावे |"
  अत्यंत मौलिक आणि व्यवहारिक सिध्दांत कुठलाही आव न आणता किती सहजपणे सांगितला आहे.शेवटी भक्ताची आर्त हाक ऐकून भगवान विष्णू जेव्हा कवीच्या अंतःकरणात प्रकट होतात तेव्हा व्यंकटेशाच्या मूर्त स्वरूपाचे देविदासांनी केलेले वर्णन (श्लोक ५४ते५९) तर त्यांच्या प्रतिभेचा अप्रतिम फुलोर वाटतो.
        श्री विष्णूची सुंदर,निळसर नखं " इंद्रनिळाचिये परी" म्हणजे इंद्रनील रत्नासारखी दिसतात आणि 'करकमळ' "रातोत्पलाचिये परी" अर्थात लाल कमळाप्रमाणे वाटतात.व्यंकटेशाच्या मुखाचे
        " दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती|
        जिव्हा जैसी लावण्यज्योती|"
असे वर्णन करून श्रीहरीच्या नाकाचे वर्णन किती आगळ्या पद्धतीने केले आहे पहा.
          "सरळ सुंदर नासिक|
          जेथ पवनासी झाले सुख|"
   पुढे श्रीहरींच्या नेत्रांकडे पाहून कवी म्हणतात,
       "  त्रिभुवनीचे तेज एकवटले|
       बरवेपण सिगेसि आले|
       दोन्ही पातयांनी धरिले|
       तेच नेत्र श्रीहरीचे||"
   इथे देविदासांच्या कल्पनाशक्तीने सुध्दा परमोच्च बिंदू गाठला आहे असे म्हणावेसे वाटते.
       कोणतंही स्त्रोत्र म्हंटलं की भक्तीरसाने ओथंबलेलं ! नाना तऱ्हेने परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न असतो. ऋषिमुनींनी, संतांनी रचलेल्या स्तोत्रांत भक्ती, श्रध्दा, आर्तता, आत्मविश्वास या सगळ्याबरोबर जाणवते ती त्यांची ओसंडून वाहत असलेली काव्यप्रतिभा! याच दृष्टिकोनातून व्यंकटेश स्तोत्राकडे पाहण्याचा हा एक प्रयत्न!


गिरिजा गिरीश कानडे

No comments:

Post a Comment