चूल म्हटली की एकदम मला माझं लहानपण दिसायला लागतं. अंजनगाव-सुर्जीच्या छोट्याश्या गावातला आमचा तो आलकरींचा वाडा नजरेसमोर येतो. त्यातलंच एक चार खोल्यांचं आमचं बिर्हाड. भाड्याने घेतलेलं. एखाद्या चौकोनाचे चार सारखे खण केल्यासारखं लेआऊट असलेल्या चार लहान लहान खोल्या. त्यातलीच एक कॉर्नरची खोली, म्हणजे आमचं स्वयंपाकघर! त्याच्याच एका कोपऱ्यात आईने विटा अन माती वापरून केलेला एक छोटासा चौकोनी बैठा ओटा अन त्यावर विराजमान असायणाऱ्या छानश्या दोन चुली आणि प्रत्येकीला जोडून असलेली एक एक शेगडी! आलटून पालटून त्या चुली वापरल्या जायच्या. स्वच्छ सारवलेल्या त्या सुबकश्या चुली अन शेगड्या बघून नेहमीच फार प्रसन्न वाटायचं. आई स्वतःच त्या चुली घालायची. आमच्या त्या वाड्याच्या मध्यभागी एक मोठ्ठा पांढऱ्या मातीचा ढिगारा होता. तिथून ती माती आम्ही आईला आणून द्यायचो. चुली घालण्याचा तो सोहळा म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची. केव्हातरी वर्ष दीडवर्षात जेव्हा जुन्या चुली खराब व्हायच्या तेव्हा हा चुली घालण्याचा कार्यक्रम व्हायचा. त्या भिजवलेल्या मऊ मऊ मातीचा गार गार स्पर्श अन थेट आत पर्यंत जाणारा तो मंद सुगंध खूप आवडायचा मला. आम्ही पण मध्ये मध्ये लुडबुड करत छोट्या छोट्या खेळण्यातल्या चुली घालायचो, मातीचे बैल, भाज्या वगैरे वगैरे बनवायचो. खूप मजा यायची.
मला अजूनही ते सगळं अगदी स्पष्ट आठवतं. सकाळी उठल्या उठल्या आईचं सगळ्यात पहिलं काम असायचं ते म्हणजे चुलीला नमस्कार करून, एका कोळश्यावर थोडं रॉकेल टाकून चूल पेटवायचं. मग त्यावर चहाचं आधण चढवायचं. आईचा तो स्पेशल चहा मोठा खासच असायचा. तिला दुसऱ्या कुणाच्या हातचा चहा कधी आवडायचा नाही. भरपूर पत्ती, भरपूर दूध टाकून, भरपूर उकळवलेला, तो दाटसर चहा खरंच मोठा खासच लागायचा. एकदम टपरीवर मिळतो तसा! अन् तिलाही तो भरपूरच हवा असायचा. एका मोठा बसका स्टीलचा पेला भरून ती तो घ्यायची. आम्हालाही काही चहा प्यायला मनाई वगैरे नसायची. त्यामुळे आम्हीही मजेत त्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घ्यायचो. सकाळच्या चहात ती कलमी, सुंठ, मिरे वगैरे टाकून बनवलेला मसाला आणि दुपारच्या चहात गुलाबकळी टाकायची. गुलाबकळी म्हणजेच गुलकंदी गुलाबी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या. त्या चहात टाकल्या की खूप छान स्वाद यायचा चहाला. आम्ही आवडीने प्यायचो. चुलीवरचा सगळाच स्वयंपाक फार रुचकर व्हायचा. लाकडं छान पेटले की त्याचे लालभडक, रसरशीत निखारे पडायचे. लाकडं बाजूला करून एका मोठ्या झाऱ्यावर ते निखारे घेऊन आई ते बाजूच्या शेगडीत टाकायची. मग त्यावर क्रमाने वरण आणि भात शिजायचा. निखारे थोडे विझत आले की पुन्हा त्यावर भर टाकल्या जायची. ते लालभडक, गर्द केशरी रंगाचे रसरसणारे निखारे बघून मला नेहमीच पळसाच्या फुलांचा भास व्हायचा.
आमची साडेअकराला शाळा असायची. आई बरोबर साडेदहा पावणे अकराला कणकेचा पिंडल घेऊन चुलीजवळ बसायची आणि आम्हाला हाक मारायची. बाबा आणि आम्ही तिघे भावंडे आपापली ताटे घेऊन तिच्या भोवताली बसायचो. मला अजूनही लाकडी पाटावर बसून सरसर पोळ्या लाटण्यात मग्न असलेली तिची मूर्ती डोळ्यासमोर येते. चुलीतल्या जाळाचा लालसर गुलाबी प्रकाश तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर फार खुलून दिसायचा. आणि भराभर पोळ्या लाटताना होणारी तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्यांची, एका लयीत होणारी मंजुळ किणकिण कानाला मोठी गोड वाटायची. ती पटापट तव्यावरच्या गरमागरम, मऊसूत पण वरतून छान, खरपूस भाजलेल्या पोळ्या लोणकढे तुपाने माखून आम्हाला एका मागोमाग एक वाढायची. सकाळ, संध्याकाळ दोन्ही वेळेला मस्त अशा गरमागरम पोळ्या खाऊन तृप्तीचा ढेकर देण्यातलं सुख काही औरच होतं! आता विचार केला की वाटतं खरंच किती कष्ट करायच्या जुन्या बायका! आज आमच्या हातापायाशी कामवाल्या बायका असून सुद्धा गरम पोळ्या करून वाढायचे जिवावर येते. एखाद्यावेळेस करावे लागले तरीसुद्धा थकायला होते. कालाय तस्मै नमः! अजून काय?
तर आमची सगळ्यांची जेवण उरकल्यावर मग शेवटी ती स्वतःसाठी एक भाकरी करून घ्यायची. बरेचदा तिच्या त्या टम्म फुगलेल्या भाकरीचा पोपडा तूप मीठ लावून मीच चवीचवीने मटकावून टाकायची. खूपदा ती आमच्यासाठी दुपारी खायला म्हणून मस्त पानगे करून ठेवायची. छोटे छोटे, गोल गोल पानगे निखाऱ्यावर मस्त फुगत जायचे ते बघायला खूपच मज्जा यायची. कधीकधी ती स्वयंपाक आटोपल्यावर लाकडं विझवून उरलेल्या निखाऱ्यांमध्ये पाच सात बटाटे टाकून ठेवायची. त्या मंद निखाऱ्यांवर ते छान खरपूस भाजले जायचे. दुपारी आम्ही ते सोलून, वर तिखट मीठ भुरभुरून, थोडं लिंबू पिळून चवीने फस्त करायचो. तर कधी त्यावर दूधसाखर टाकून त्याची मस्त स्वीट डिश व्हायची. उन्हाळ्याच्या दिवसात अशाच प्रकारे ती त्यात कैऱ्याही भाजायची आणि संध्याकाळी त्यात गूळ टाकून मस्त पन्हं करायची. फ्रिजबीज नव्हते तेव्हा पण माठातलंच थंडगार पाणी टाकून केलेलं ते पन्हं अगदी “अमृताहुनी गोड” असंच लागायचं.
तेव्हा घरोघरी चुलीच असायच्या त्यामुळे लाकडं विकत घ्यावे लागायचे. लाकडाच्या मोळ्या विकणारे मोळीविक्रेते नेहमी दारावरून जायचे. बरेचदा मोळी विकणारा जादा पैसे घेऊन त्यातली जाड जाड खोडं फोडूनही द्यायचा. कधीकधी तर बाबा स्वतः कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडायचे. बिनबाह्यांचे बनियन आणि खाली गुंडाळलेला एक पंचा, अशा वेशातले बाबा लाकडं फोडतांना कसे घामाघूम व्हायचे ते मला अजूनही चांगलेच स्मरते. त्यांचं लाकडं फोडायचं काम झाल्यावर आजूबाजूला उडालेल्या छोट्या मोठ्या झिलप्या गोळा करायचं माझं काम असायचं. ते करतांना कधीमधी एखादी शिळकही बोटात जायची. मग सुई घेऊन ती काढण्याचा एक कार्यक्रम व्हायचा. चूल म्हटल्याबरोबर ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
नंतर काही वर्षांनी म्हणजे मी सातवी आठवीत असताना आमच्या घरी गॅसची शेगडी आली. तेव्हा त्याला बर्शन म्हणायचे. स्टीलची चकचक शेगडी आणि त्याची ती डोळ्यांना सुखावणारी, जादुई भासणारी निळी निळी फ्लेम! कोण अप्रूप तेव्हा वाटलं होतं तेव्हा! शिवाय आईचं काम आता थोडं सोपं झाल्याने फार बरंही वाटलं होतं. एका क्षणात, हवं तेव्हा सुरु बंद होणारी शेगडी! नाही कोळसे, नाही रॉकेल, नाही फुंकणीने फूफू करण्याची गरज! जादूच जणू!
शिवाय आता चुली मुळे होणाऱ्या धूराचाही त्रास कमी झाला. पावसाळ्यात, विशेषतः जेव्हा सलग पाच सहा दिवस झड असायची तेव्हा सगळी लाकडं ओलसर, सरदलेली असायची अन पटकन पेटायची नाहीत. त्यामुळे जास्तच धूर व्हायचा. तो डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरायचे. स्वयंपाक घराच्या वरची कौलं आणि आणि भिंती सुद्धा वरच्या बाजूला काळ्याकुट्ट होऊन जायच्या. नंतर गॅसची शेगडी आल्यावर बाबांनी एकदा स्वतः खपून स्वयंपाकघराला रंग दिला होता. तेव्हा केवढं चकाचक दिसायला लागलं होतं स्वयंपाकघर!
नंतर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सासरी पुन्हा एकदा चुल भेटली. पण थोड्या आधुनिक पेहरावात. घरी गॅस होताच पण स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात चूलपण होती. मुद्दाम सांगण्यासारखं म्हणजे ही एक वेगळीच चूल खास "मगन चूल" म्हणून ओळखली जायची. ती तेथे सेंटर ऑफ सायन्स फोर व्हिलेजेस(CSV) ह्या संस्थेने विशिष्ट शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवली होती. ह्यात एक चूल अन त्याने जोडून एक शेगडी होती. त्यांच्या मध्ये एक मोठे गोल् छिद्र होते. ह्या मधल्या छिद्रातून जास्तीचा जाळ त्या दुसऱ्या शेगडी ला मिळायचा. शिवाय त्याला एक स्पेशल धुराडे लावलेले, ज्यातून सगळा धूर बाहेर जायचा. सुबक फिनिशिंग असलेली ती चूल मला नेहमी नऊवारी नेसणाऱ्या आजींनी सलवार कमीज घातल्यावर जसं वाटेल तशी वाटायची. कुतूहलाने त्याबद्दल माहिती मिळवली तर कळले की ह्या चूलीचे तंत्र तामिळनाडूच्या कल्लूपट्टी येथील गांधीनिकेतन मध्ये विकसित करण्यात आलं आहे. ग्रामीण स्त्रियांच्या सुविधेसाठी तीस टक्के इंधनबचत करणारी ही चूल पर्यायाने पर्यावरणाचे कमीतकमी नुकसान व्हावे ह्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. अजूनही वर्धेच्या मगन संग्रहालयात ही चूल पहावयास मिळते. माझे लग्न झाल्यानंतर तीन-चार वर्ष वर्षे तरी ही चूल घरात विराजमान होती. आमच्याकडे रोज नाही पण सणवारांना बहुदा वापरल्या जायची. पुढे मग तीन चार वर्षांनी घराचे नूतनीकरण करतांना त्या जागी दुसरा ओटा, दुसरी गॅसची शेगडी आली. आणि अश्या रीतीने ही चूलही इतिहास जमा झाली. अश्या या सगळ्या हृदयाच्या कुपीत जपून ठेवलेल्या चुलींच्या स्मृती! अचानकच कधीतरी ह्या कुपीचं झाकण उघडतं अन त्या स्मृतींचा मंद दरवळ नकळतच मला भूतकाळात घेऊन जातो आणि त्याबरोबरच चुलीवरच्या गरमागरम, स्वादिष्ट जेवणाची चव जिभेवर रेंगाळायला लागते!
©मधुमती वऱ्हाडपांडे
No comments:
Post a Comment