Thursday, May 12, 2022

दर्शन

 मनासारखे जेव्हा घडून येतं तेव्हा जे आत्मिक समाधान लाभतं ते शब्दातीत असतं. बरेच दिवसांनी आज शेगावला श्रीमहाराजांचे दर्शनाचा योग आला. त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध अवतीभोवती दरवळतो आहे असा भास व्हायला लागला. कितीवेळा ठरविले पण जाणे काही न काही कारणाने होतंच नव्हते. त्यांच्या दर्शनासाठी त्यांनी आज्ञा केल्याशिवाय शक्य नाही याचा प्रत्यय पुन्हा आला. मनात इच्छा प्रबळ झाली की, अन प्रारब्धात असेल तर लगेच योग येतो दर्शनाचा, तो ही त्यांनी ठरविल्याप्रमाणेच. आपल्या हातात काही नसतं तरी मी मी करायची सवय काही जात नाही.

     जसे जसे शेगांव जवळ येत होते तसे तसे मनाची तळमळ वाढत होती. कोरोना ह्या अदृश्य विषाणू ने सगळ्यांना कोंडून ठेवले होते. पण या सगळ्यावर मात करून दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराजांनी त्यांची माया सावरली अन कवाड उघडले. भक्तांना दर्शनाचा लाभ झाला.

     कोरोना ही एक समज होती समस्त मानव जातीला. माणुसकी दडली होती. तूच तुझे शोधून पाही रे या न्यायाने माणुसकी आणि आपली संस्कृती जी आपल्या पूर्वजांनी आखली आहे ती थोडीफार का होईना शोधण्यात मानवाला यश आले आहे. इथेही मी मी आहेच पण ठीक आहे, आपण कुठे चाललो आहे हे तर कळले. 

     महाराजांच्या दरबारी सगळेच भक्त येतात, तो मनात काही हेतू घेऊनच असे नाही तर केवळ श्रीचरण पाहून कृत्यकृत्य होणारेही असतात.  काही खूप दिवस झाले दर्शन नाही घेतले तर जाऊ या म्हणजे दर्शन ही होईल आणि थोडे घराबाहेर पडल्याचा आनंदही असे गृहीत धरून आलेले तर काही हौशी गौशी असेही असतात. काही नवपरिणीत, लग्न झाल्यानंतर घरचे सगळे म्हणतात म्हणून देवदर्शनाला आलेले. यात काही दर्शनही होईल  आणि एकमेकांचा सहवास मिळेल या विचाराने आलेले असतात. अठरा पगड जातीचे मानवरूपी भक्त जसे त्यांचे दरबारी सेवा रुजू करायला येतात तसेच पशुपक्षी सुद्धा असतातच.

     अशी सगळी वेगवेगळ्या भावभावनांची, प्रवृत्तीची मांदियाळी महाराजांचे दरबारी विसावली होती. दर्शन झालेल्या भक्तांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते तर दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भक्तांच्या मनातली तळमळ त्यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीतून जाणवत होती. प्रसाद घेऊन निघालेले तृप्ततेची अनुभूती अनुभवत होते. निवांतपणे महारांजांचे द्वारी बसून नामस्मरण करत आयुष्याची संध्याकाळ सत्कारणी लागावी या उद्देशाने एकमेकांच्या सहाय्याने कृतार्थ झालेले आजीआजोबा पाहिले अन आपोआपच मन भरून आले. पुन्हा पुन्हा त्या परमात्मा परमेश्वराच्या पायी मनोमन माथा टेकविल्या जात होता.

     मंदिरात आलेल्या प्रत्येकच भक्तांचे मग तो कोणत्याही उद्देशाने महारांजांच्या चरणी आलेला असू दे त्याचे संचित नक्कीच उत्तम असावे म्हणूनच इथे येण्याची बुद्धी झाली. कारण भगवंताने सांगितलेच आहे , भाग्येवीण भक्ती न लाभे  म्हणजे ज्याच्या भाग्यात  असेल त्यालाच दर्शन लाभेल. ऐसें प्रारब्ध घेऊन आलेला भक्तच त्यांचे चरणी विसावण्याचे क्रियामाण कर्म करू शकतो. हेच खरे आहे. 

     विचारांच्या आवर्तनात आणि भक्तांचे निरीक्षण करत करत दर्शनाची आस मनी घेऊन ओळीत मी ही  हळूहळू पुढे सरकत होती.  अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज ...... या गजरात महारांजांचे दर्शन घेतले. काय अर्पण करावे यांना, जे यांनीच आपल्याला भरभरून दिले आहे. दोन हस्तक अन तिसरे मस्तक यांच्या चरणी श्रद्धा आणि भावपूर्वक ठेवले की सगळंच प्राप्त होतं. भौतिकाचे अर्घ्य तर त्यांना नकोच असतं.  विविध सुगंधी फुलांचे  रंगसंगती साधत महारांजांना अर्पण केलेले हार , मध्ये हृदयावर  बेलाची त्रिवेणी, त्याच्या वर आणि खाली जलबेरा ची लाल फुले,  करुणामृताची वर्षाव करणारे डोळे असे रूप डोळा भरून पाहिले. चरणी माथा टेकवतांना कृतार्थतेचे, अश्रू अनावर झाले. सगळ्यांची अशीच अवस्था होत असावी त्याच्या चरणी विसावतांना. पलंग ज्यांचा मेदिनी आणि आकाशाचे पांघरूण असलेल्या, चरचराचा संरक्षक असा ह्या निर्मोही, निराकार परमात्म्याला भक्त त्याला हवे ते सगुण रूप देतात आणि तो ही हे सगळे सोहळे स्वीकारतो.  भक्तीचा आणि भक्तांचा पण भुकेला भक्तवत्सल. 

     डोळ्याचे पारणे फिटावे असे दर्शन शेगावला होतं. मनसोक्तपणे महारांजांशी संवाद साधणे शक्य होतं. यापरिस दुसरे भाग्य कोणते! 


©®रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment