डिसेंबर मधे ,लोकांच्या मनात ट्रिप ला जाण्याचे वगैरे विचार येण्याइतपत कोविड चा प्रादुर्भाव कमी झाला! त्याच दरम्यान सिन्नर च्या डॉक्टर क्षत्रिय चा फोन आला, 'फेब्रुवारी मध्ये मालदीव ला जायचं का?'
फुकेत क्राबी टूर केला तेंव्हाच मालदीव चा प्लॅन बनला होता ,पण कोविड मुळे एक वर्ष असच गेलं.
आत्ता पण फेब्रुवारी पर्यंत वॅक्सिंन होईल
असा अंदाज होता ,त्यामुळे त्यांना हो म्हंटल. बुकिंग डॉ.क्षत्रिय च करणार होते.
डिसेंबर ,जानेवारी काही न काही कारणाने गडबडीत गेले ,त्यामुळे बुकिंग नक्की कधी कोण कोण येणार,मुंबई ला कधी जायचं, परत कधी येणार हे ऐकून होते,पण लक्षात रहात नव्हतं.
फेब्रुवारी उजाडला, आता मात्र तयारीला लागावं लागणार होतं.
त्यातून तनु ची एंगेजमेंट 27 फेब.ला सांगलीला करायची ठरली. त्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचं (मालदीव) मग रायबाच (एंगेजमेंट) अस करून चालणार नव्हतं !
कारण मालदीवला 16 ला निघून 22 ला अकोल्याला येणार अन लगेच 25 ला सांगलीसाठी निघणार होतो.
मधे वेळ कमी होता ,त्यामुळे दोन्ही लग्न (तयारी)एकाच वेळेला करावी लागणार होती.
एकीकडे मिनी ड्रेस ,शॉर्टस,स्कर्टस सनस्क्रीन तर दुसरीकडे साडी ,ब्लॉउज,बांगड्या ,टिकली,
अश्या परस्पराविरोधी आघाडीवर लढाई सुरू होती.
लढाई वगैरे असे मोठे शब्द वापरलेत खरे, पण प्रत्यक्षात मात्र ,सगळी तयारी आरामात वेळेआधीच पार पडली.
काही बारीक सारीक काम फक्त बाकी होते.
मालदीव ला जाताना भरायच्या फॉर्म्स ची लिंक ग्रुप वर आली होती, ते काही फार किचकट काम असेल असं वाटलं नाही, सुभाष ते बघणार होता.
फॉर्म्स बघून मात्र तो वैतागून म्हणाला ,'कुठून मालदीव ट्रिप ठरवली अस झालं,कोरोना संपेपर्यंत विदेशात ट्रिप काढायलाच नको होती'.किती प्रकारचे फॉर्म्स आहेत हे !'
मी म्हंटल मला प्रिंटआऊट काढून दे मी बघते ते सावकाश. जाताना एकच हेल्थ declaration फॉर्म होता.येताना मात्र 2,3 फॉर्म्स होते.
फार काही कठीण नव्हतं पण तो ऑनलाइन भरायचा असल्याने नीट जमेल की नाही अस सुभाष ला वाटत होतं.
आरोग्य सेतू पण आवश्यक होतं.
RTpcr टेस्ट departure च्या 96 तास आधी करायची होती.आणि हा health declaration फॉर्म departure च्या 24 तास आधी भरायचा होता.
Rtpcr टेस्ट ,कुठे 96 तास तर कुठे 48 तास आधी लिहिलं होतं,ते एक confusion होता, एजंट ला विचारून ते क्लिअर झालं.
गुरुवारी मुंबई हुन फ्लाईट होत ,सोमवारी RTPCR साठी सॅम्पल दिलं. सॅम्पल मुंबई ला पाठवून रिपोर्ट मंगळवार संध्याकाळ पर्यंत द्यायचा प्रयत्न करतो ,अस लॅब वाल्या नि सांगितलं. रिस्क नको म्हणून आम्ही IMA ला जाऊन ही सॅम्पल देऊन आलो.दोन पैकी एक तरी रिपोर्ट वेळेत मिळावा हा उद्देश!
मंगळवारी रात्री पर्यंत दोन्ही रिपोर्ट आले नाहीत ,आम्ही मुंबईसाठी बुधवारीच गीतांजली नि निघणार होतो.
त्यात दोन दिवस आधी ,खेळताना माझा पाय लचकला, x-ray काढला,fracture नव्हतं ,पण दुखणं बरच पूरणार होत.
तिथे किती फिरावं लागणार आहे माहिती नव्हत (itinerary पहिली नव्हती अजूनही).
लंगड्या पायांनी कस फिरायचं?हे एक टेन्शन, रिपोर्ट आले नाहीत हे पण एक टेन्शन होतच !अन आले तर,रिपोर्ट निगेटिव्ह येतील की नाही? पोसिटीव्ह आले तर कुठलं मालदीव अन कुठलं काय, सगळं मुसळ केरात !
या सगळ्या शक्यता गृहीत धरून ,'जे जे होईल ते ते पहावे' उद्या काय होईल ते बघू ,असा विचार करून शांतपणे झोपलो.
जीवन मे बार बार जाना मालदीव..
सकाळ उजाडली तीच मुळी आनंदाची बातमी घेऊन.रात्री उशिरा आमचे रिपोर्ट आले अन ते ही निगेटीव्ह.बाकी येणाऱ्या मेंबर्स चे(सिन्नर,नासिक,कर्नाल,अकोला असे आम्ही 28जण होतो) रिपोर्ट पण निगेटिव्ह असल्याचं ग्रुप वर कळलं. एक बाजी जिंकली होती.लगेच नऊ वाजता हेल्थ declaration फार्म सबमिट केला. त्याचा कोड पण आला, हुश्श!
आता निश्चिन्त झाल्यामुळे बाकी गोष्टी सुचायला लागल्या.आमचा कोविड चा बुस्टर डोस त्याच दिवशी होता. तो पण घेतला आणि गीतांजली नि मुंबई ला निघालो.
रात्री हॉटेल ला पोचेपर्यंत 11 वाजले.
सकाळी 9 च फ्लाईट ,होत 5.30 ला एअरपोर्ट ला पोचलो.बाकी सगळे पोचले होतेच. अंजु विनायक, अन सिन्नर चे क्षत्रीय सोडले तर बाकी कोणी ओळखीचं नव्हतं ,पहिले सगळ्यांशी ओळख करून घेतली.
एअरपोर्ट वरचे बाकी सोपस्कार पार पडून बरोबर नऊ ला फ्लाईट निघालं.
डोक्याला मेहेंदी असणारे अन हाताला मेहेंदी असणारे असे ठळकपणे दोन ग्रुप फ्लाईट मध्ये होते. तीन तास वेळ लागणार होता ,प्रत्यक्षात पाऊण तास आधीच मालदीव ला पोचणार असल्याची घोषणा झाली.
5 लाख लोकसंख्या असलेला मालदीव देश म्हणजे हिंदी महासागरा मधे असलेली 1200 बेटांची साखळी आहे.
यातल्या दोन एकशे बेटावर वस्ती अन अंदाजे तेवढ्याच बेटांवर रिसॉर्ट आहेत.बाकी ठिकाणी शेती होते. मुख्यत्वे पर्यटनावर इथली इकॉनॉमी अवलंबून आहे.हा इस्लाम धर्मीय देश असून, दिवेही ही त्यांची भाषा,जी बऱ्यापैकी उर्दू शी साधर्म्य सांगणारी आहे.
इथे मल्याळी पण बरेच आहेत.रुपाहिया हे इथलं चलन ,पण डॉलर मधे व्यवहार जास्त चालतात.
माले एअरपोर्ट ला आम्ही उतरलो. एअरपोर्ट खूपच छोटंआहे.immegration ला फार वेळ लागला नाही.हेल्थ declaration फॉर्म बद्दल तर कोणी विचारलही नाही. RTPCR report ला मात्र पासपोर्ट एवढं महत्व होत, तो सगळीकडे दाखवावा लागला.
तिथून बाहेर आलो ,समोरच निळ्याशार समुद्राचं दर्शन झालं. पुढचे तीन दिवस, आपले डोळे निळे झाले की काय ,अशी शंका येण्याइतपत हा निळा रंग सतत सोबतीला होता.
तिथून स्पीड बोटनी ,नकाई ढिगरि या आमच्या रिसॉर्ट ला निघालो.जवळ जवळ दीड तास लागला पोचायला.
रिसॉर्ट खुपच सुंदर होत.पोचल्या पोचल्या, एकदम चवदार,रंगीबेरंगी welcome drink नी आमचं स्वागत झालं. मग एका चुणचुणीत मुलींनी ,रिसॉर्ट बद्दल सगळी माहिती दिली।काय फ्री आहे ,कशाचे चार्जेस लागतील ,लंच डिनर ब्रेकफास्ट कुठे लागेल हे सगळं सांगितलं.स्नॅक्स आणि ड्रिंक्स (हार्ड ,सॉफ्ट दोन्ही) तिथे कितीही घ्या ,फ्री होत. वेलकम ड्रिंक म्हणून दिलेला ज्युस मात्र परत मिळाला नाही।दुसऱ्या दिवशी तसाच ज्युस बनऊन आणायला सांगितला,तर आपका वेलकम खतम ,ज्युस खतम अस उत्तर मिळाल!
लंच ची वेळ होऊन गेली होती ,त्यामुळे आम्ही पिझ्झा आणि ज्युस वर ताव मारला .
थकलो होतो त्यामुळे रूम कडे निघालो. रेस्टॉरंट पासून बरच चालावं लागलं रूम पर्यंत पोचायला.
रूम पाहून सगळा थकवा पळाला, लहान मुलासारखं आनंदानी उडी मारली (मनातल्या मनात )!
रूम तर सुंदरच होती, त्याची रचना पण कल्पकतेने केली होती. बेड समोर पूर्ण फ्रेंच डोअर होते. अन रूम मधून बाहेर एक ओपन प्लॅटफॉर्म होता,तिथे दोन बीच चेअर,दोन आरामदायक मोठ्या खुर्च्या ,एक लोखंडी टेबल अन दोन लोखंडी खुर्च्या होत्या.अन समोर, निळ्या रंगाच शेड कार्ड उलगडून ठेवल्यासारखा, दिसणारा अथांग समुद्र! बर समुद्राचं पाणी पण इतकं स्वछ की पडलेली टाचणी सुद्धा दिसेल.अतिशय देखणा समुद्र आहे इथला.
सौंदर्याचं विश्लेषण करू नये त्याचा फक्त आस्वाद घ्यावा असं म्हणतात, त्यामुळे तिथे तर नाही पण परत आल्यावर ,तिथल्या निळ्या क्रिस्टल क्लिअर पाण्याबद्दल वाचलं। सॉल्ट कन्टेन्ट ,व सूर्यप्रकाश भरपूर, प्रदूषण नाही त्यामुळे तिथे algi ची वाढ होत नाही, शिवाय खाली असणारी शुभ्र वाळू यामुळे तिथलं पाणी स्फटिकसारखं स्वछ आहे.
समुद्र आकाशाला रिफ्लेक्ट करतो ,मालदीव ला नेहमीच स्वछ नीळ आभाळ असत, तसच पाण्यात असणारे phytoplankton microbs जे bioluminescent आहेत ,निळा प्रकाश सोडतात म्हणून इथलं पाणी निळसर छटा असलेलं आहे।(सौजन्य -- गुगल काकू).
असो-
आम्हाला सगळ्यात आवडलेली जागा म्हणजे रूम बाहेरचा प्लॅटफॉर्म ! रूमपेक्षा जास्त वेळ आम्ही इथेच घालवला.
थोडा आराम करून तयार होऊन रिसॉर्ट बघायला निघालो.
हे रिसॉर्ट एक इटालियन माणसाचं आहे ।इथला स्टाफ पण बऱ्यापैकी इटालियन होता. साधारण पाच एकर च हे बेट. समुद्रापासून फक्त पाच सहा फूट उंचीवर आहे,पण इथे भरती किंवा सुनामी च्या वेळेला ही रिसॉर्ट पर्यंत पाणी येत नाही असं कळल. इथे 34 वॉटर विला, 27 बीच विला आहेत। वॉटर विला समुद्राच्या बऱ्यापैकी आत, Y आकारात बांधल्या आहेत ,त्यामुळे रूम च्या समोर अन मागे दोन्ही कडे समुद्र।
सगळीकडे सपीठासारखी पांढरी शुभ्र वाळू ,नारळाची व बाकी पण अनेक झाड होती.फोटो साठी अनेक स्पॉट कल्पकतेने तयार केले होते.प्री वेडिंग,पोस्ट वेडिंग फोटोशूट करणारे बरेच कपल तिथे दिसले. त्यांच्या कडे पाहून आमचं पण छान मनोरंजन झालं.
रेस्टॉरंट मध्ये भरपूर सोफे ,चेअर मांडून ठेवलेले होते. वायफाय रूम मध्ये नसल्यामुळे इथेच लोकांचा डेरा असायचा. त्याच्या बाजूला जेवणासाठी टेबल खुर्च्या मांडल्या होत्या.सगळीकडे फक्त वर छप्पर ,पण आजूबाजूला कुठेही भिंती नव्हत्या.समुद्र हा इथला USP ,तो सगळीकडून ठळकपणे दिसेल याची काळजी घेतलेली !बीच वरही खुर्च्या टेबल लावलेले होते.
या रिसॉर्ट वरच तीन दिवस आम्हाला राहायचं होत.कुठे जायची घाई नाही ,काही धावपळ नाही.खायचं प्यायचं ,मनात येईल तेंव्हा आराम करायचा, छान तयार व्हायचं अन ढीगभर फोटो काढायचे! एकदम निवांत !
आम्ही तर जास्तीत जास्त वेळ रूम बाहेर च्या प्लॅटफॉर्म वर घालवला.बाहेर ऊन असल तरी वार खूप गार असायचं. सकाळचा चहा ,आराम ,दुपारचा चहा -स्नॅक्स, गाणी लावून डान्स करण गप्पा ,सगळं एका कोणाच्यातरी रूम मध्ये जमून ,इथेच केलं।
रात्री शांत वातावरणात, बाहेर बसायचं ,चांदण्यांनी भरलेलं आकाश ,समोर समुद्र ,फक्त लाटांचा आवाज! कधी साथीला मोबाईल वर लावलेल्या जुन्या गाण्याचा आवाज!
'सुख म्हणजे नक्की काय असत?' याच जणू हे उत्तर .इतकं भारी वाटायचं न की बास !
संध्याकाळ, आकाशात चाललेला विविध रंगांचा खेळ आणि सनसेट बघत बीच वर घालवायची. एक दिवस तर बीच वर गाणी लावून सगळ्यांनी डान्स केला. दोन तीन हनिमून कपल पण जॉईन झाले, खूप धमाल आली!
तिथल्या समुद्रात शार्क खूप आहेत.एक दिवस फिश फीडिंग बघायला गेलो,मांसाचे तुकडे टाकले ,की मोठं मोठाले शार्क ते घ्यायला गर्दी करायचे।एकमेकांच्या अंगावर उडया मारून मांसाचा तुकडा खाण्याची त्यांची धडपड असायची। तिथल्या शार्कस ला माणसाची सवय आहे ,ते काही करत नाहीत।किनाऱ्याच्या अगदी जवळ सुद्धा ते आरामात दिसून यायचे.
तिथे स्नोरकेलिंग ,स्कुबा डायव्हीग ,कयाकिंग हे पण सगळं होत।
आपण स्नोरकलिंग करू म्हणून अंजु मागे लागली. फुकेत ला समुद्राच्या मध्यभागी बोट नेऊन स्नोरकलिंग करायचं होतं.लाईफ जॅकेट वगैरे घालूनही माझी हिम्मत झाली नव्हती ,पोहता येत नाही त्यामुळे पाय टेकले नाही की भीती वाटते (आपले पाय नेहमी जमिनीवर असावे याची मी स्ट्रॉंग सपोर्टर आहे
).तिथून आल्यावर आपण पोहणं शिकायचं अस ठरवून स्वीमिंग सुरू ही केलं आणि कोविड मुळे ,3,4 दिवसात ते बंद ही पडलं.
मागच्या अनुभवावरून मी अंजु ला नाहीच म्हंटल पण तिनी ऐकलं नाही . शेवटी ऑफीस ला जाऊन बुकिंग केलं.सगळा जामानिमा करून तयार झालो ,आमची ट्रेनर सरीन नावाची गोड मुलगी होती. मला भीती तर खूप वाटत होती।समुद्रात आत जाण्याआधी तिनी श्वास कसा घ्यायचा ,पाणी आत गेल तर कसं काढायचं वगैरे समजावून सांगितलं.पाण्यात डोकं घालून ट्रायल घ्यायला लावली ,पण मी लगेच डोकं वर काढायची. मला नाही जमत मी परत जाते अस दोघींनाही म्हणाले. शेवटी सरीन म्हणाली ,"पैसे तर तुम्हाला तसेही परत मिळणार नाहीत, डोकं वर ठेऊनच तुम्ही या ,फिश दिसली की मी सांगते मग डोकं आत टाका, एक तरी फिश तुम्ही बघा मग परत जा." शेवटी हो नाही करत तयार झाले।रबरी ट्यूब ला घट्ट धरून तिच्या मागे समुद्रात दूरवर गेले ,तिनी आवाज देऊन खाली बघायला सांगितलं.खाली पाहिलं मात्र अन मग संमोहित झाल्यासारखं स्वतःला निळ्या दरीत झोकून गपगुमान तिच्या मागे जायला लागले. काय अद्भुत विश्व होत समुद्राखालच! रंगीबेरंगी, वेगवेगळे डिझाइन अंगावर मिरवणारे,लहान मोठे मासे ,सुंदर आकाराचे कोरल्स ,एक शार्क पण दिसला. हे सगळं इतकं सुंदर बघत असतानाही मधेच ,मनातली भीती डोकं वर काढायची, की मी पण पाण्याबाहेर डोकं काढून किनारा जवळ आला का बघायचे.एकदा तर ,'अंजु मला परत जायचं अस पण म्हंटल ,पण अंजु नि माझ्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी किनारा आला ,अन मला हायस वाटलं।)! भीती पायी आपल्याला सौंदर्याचा नीट आस्वाद घेता आला नाही ,याची रुखरुख अजूनही वाटतेय.
जाण्याचा दिवस जवळ आला. परत जाताना स्पीड बोटी ऐवजी सी -प्लेन नी एअरपोर्ट ला जाऊ असा विचार आम्ही केला होता .सी प्लेन 20 मी. तच पोचवत ,बोटी नि दीड तास लागतो.पण त्याच्या तिकिटांची चौकशी केली तर एकाच तिकीट चौदा हजार पडणार होत.हे ऐकल्यावर स्पीड बोटींनी समुद्राचं सौंदर्य बघत जायला जास्त मजा येईल यावर सगळ्यांच एकमत झालं.
दोन दिवस आधीपासून सगळीकडे परत lockdown होतंय अशा बातम्या कानावर पडत होत्या ,पण मेंदू पर्यंत त्या पोचत नव्हत्या. परतीचे वेध लागल्यावर मात्र मुंबई ला rtpcr करून थांबवून ठेवलं तर काय करायचं ,पोसिटीव्ह आलो तर कसं होईल, engagment ला जाता नाही आलं तर कसं?असे प्रश्न पडायला लागले.पण सुदैवाने मुंबई एअरपोर्ट वर rtpcr करून त्यांनी घरी जाऊ दिल ,रिपोर्ट चा मेसेज येणार होता.ते रिपोर्ट पण निगेटिव्ह आले.आम्ही सुखरूप अकोल्याला पोचलो.
अशी कोविड च्या छायेत केलेली मालदीव ट्रिप सुफळ संपूर्ण झाली.
जीवन मे एक बार नाही बार बार मालदीव ला जायला नक्की आवडेल !
No comments:
Post a Comment