" अरे, आपल्या घरात ना खूप कपाटं झालीयेत , आपण काही कपाटं कमी करू " एक दिवस सकाळी सकाळी ( रविवार सकाळ हं )मी हे जाहीर करून टाकलं . हातात मोबाईल , कानाशी tv असल्याने पहिला प्रयत्न अर्थातच वाया गेला पण मला त्याची सवय असल्याने मी परत तोच डायलॉग ' अरे' च्या ऐवजी ' अहो' टाकून म्हटला , अपेक्षित परिणाम झाला ,
'अं , कुठे आहेत इतकी कपाटं ?आणि सामान आहे नं त्यात ? ' असा प्रतिवाद करून डोळे परत मोबाईल मध्ये गुंतले पण मी " आज मै हार नहीं मानूंगी " च्या मूड मध्ये होती त्यामुळे ,
' अरे सामान कमी करू मग , उगीचच जागा आहे म्हणून ठेवल्या जातंय , ती कपाटं पण जुनी , खराब दिसतायेत आता ' असे म्हणून मुद्दा लावून धरला .
" बरं आधी सामान काय कमी होतंय ते बघ , मग ठरवू ."
हे असे संवाद प्रत्येकच घरात हमखास होतच असतील . आमच्या घरात जितकी माणसं आहेत त्याच्या दुप्पट लहानमोठी कपाटं आहेत . माझ्या आजे सासुसासऱ्यांच्या काळातली सुदधा 2 कपाटं आमच्याकडे आहेत तरी ह्यात स्वयंपाकघरातली कपाटं धरलीच नाहीत . पूर्वी आपल्या मध्यमवर्गीय घरांमधून गोदरेजचं एकमेव कपाट असायचं आणि त्यात एका कुटुंबाचे सगळे कपडे अगदी सणासुदीला घालायचे सुद्धा आरामात मावायचे शिवाय कपाटातल्या खालच्या कप्प्यात इतर सटरफटर समान , कलाकुसरीच्या वस्तूंना लागणारा कच्चा माल , लोकरीचे गुंडे हे सगळं असायचं , आता हे लिहितांना सुध्दा माझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये आणि तुमचंही " अरेच्चा , खरच की" असं होतंय , बरोबर ना ? ' मिनीमालिझम ' हे आपण तेव्हा सहज पाळत होतो आणि आता ते पाळायचे फक्त ठरवतो आहे पण अजून जमत नाहीये हे खरं .
फार पूर्वी वाडा संस्कृती असताना घरात माणसं जास्त तसे सामानही जास्त असे पण त्यात कपडे हा ऐवज मुळातच कमी असे आणि बंद कपाटापेक्षा फडताळ , ट्रंक , डबे , गाठोडी , बोचकी , खुंट्या ह्यातून वस्तू , दागदागिने ठेवण्याची पद्धत होती . घरातल्या कर्त्या पुरुषाच्या नावे फक्त एक बंद कपाट असे . पुढे 'हम दो हमारे दो ' चा काळ आला तशी कुटुंब छोटी व्हायला लागली आणि संसार साधारण 3 खोल्यांमध्ये ( खरंतर अडीच) सामावू लागला . शहरी वातावरणामुळे घरं आटोपशीर ठेवण्याकडे कल वाढत गेला मग भिंतीतल्या कप्प्याना , माळ्यांना साड्यांचे झुळझुळीत पडदे आले आणि कपडे , महत्वाची कागदपत्रं , दागिने ठेवण्यासाठी गोदरेज चे कपाट घराघरात अवतीर्ण झाले . त्याकाळी लग्नात सगळ्यांनी मिळून हे कपाट अहेर म्हणून देण्याची जणू पद्धतच पडली . कपाटाच्या वर " चि. सौ. का. ......ताईला " असे लिहून पुढे नावाची जंत्री असणारी कपाटं मी माझ्या लहानपणी बघितलेली आहेत अर्थात ह्या कपाटांचं उपयोगीत्व निर्विवाद आहे . 'गोदरेजचं कपाट ' आणि ' पार्ले जी ' ची बिस्किटं ह्या दोन गोष्टी जगाच्या अंतापर्यंत राहणार असं माझं ठाम मत आहे .
पुढे साधारण 1990 नंतर हा मध्यमवर्ग हळुहळू उच्चमध्यमवर्गात जाऊ लागला , उपग्रह वाहिन्यांच्या कृपेने जग जवळ येऊ लागले . स्त्रिया आर्थिकदृष्ट्या काहीशा स्वतंत्र होऊ लागल्या , समाजातला तिचा वावर वाढला आणि ' तिच्या ' सोयीनी , आवडीने घरांची रचना होऊ लागली . बैठी ,अंगण असलेली घरं कमी होऊ लागली , महानगरातून तर जवळपास नामशेष झाली आणि त्यांची जागा फ्लॅटसंस्कृतीनी घेतली . इनमिन 4 खोल्यांमध्ये अख्खा संसार ठेवायचा आणि परत सगळं कसं टिपटॉप दिसलं पाहिजे म्हणून मग जागा मिळेल तिथे कपाटं झाली , माळ्याच्या जागी कपाटं , बेडच्या , सोफ्याच्या आत कपाटं , स्वयंपाकघरात खास तिथल्या वस्तू ठेवायला म्हणून त्या पद्धतीने केलेली कपाटं शिवाय ते unbeatable गोदरेजचं कपाट असतंच आणि ह्या सगळ्यात तुडुंब भरलेलं सामान . मग कधीतरी महत्प्रयासाने त्यातलं काही सामान कमी केल्या जातं आणि थोड्याच दिवसात दुप्पट भरलं जातं आणि ते मनातलं मिनीमालिझम कुठेतरी माळ्यावरच्या बंद कपाटात ठेवून द्यावं लागतं , आपल्या बायकांचा जीव तर साड्या , ड्रेस , दागिने ह्यात इतका अडकलेला असतो की खरंतर आपल्याला काहीच कमी करायचं नसतं पण नवं घ्यायचं तर असतं . माझ्या एका मैत्रिणीने ह्यावर एक भन्नाट आयडिया शोधून काढलीय ती लोकांना कपाटं भाड्याने देणार आहे , आपण दागिने जसे लॉकरमध्ये ठेवतो तसे तिच्याकडे जायचं आणि आपले जुने पण हवे असलेले कपडे त्यात ठेवायचे , काहीसं हटके असलेलं तिचे हे स्वप्न लौकर पूर्ण होवो हीच कामना .
मी मात्र ह्यावर माझ्या पद्धतीने मार्ग शोधलाय , मी कपाटंच कमी करण्याचं ठरवलंय . मागच्या रविवारी मी 2 कपाटं रिकामी केली पण ती घराबाहेर जाण्याच्या आता त्यात परत काहीतरी भरल्या गेलं , अर्थात
कपाटं रिकामी करण्याचे श्रम एका वेगळ्याच अर्थाने सार्थकी लागले , एक जुनं antique म्हणावं असं कपाट मी माझ्या बहुमूल्य पुस्तकांसाठी मिळवलं आणि आपल्या पुस्तकांसाठी एक स्वतंत्र कपाट असावं हे माझं कधीचं स्वप्न पूर्ण झालं .
आज परत भंगारवाला दिसला मी परत अहोंना आवाज दिला पण हाय रे कर्मा !!..., "सध्या तुला काही त्याची अडचण होतेय का ?...नंतर बघू...." असे म्हणून माझी बोळवण करण्यात आली पण मी ठरवलंय ना , " मैं हार नहीं मानूंगी " त्यामुळे प्रयत्न चालू ठेवावे लागतील बघूया यश कधी येतंय ते
No comments:
Post a Comment