सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण काय असते, हे दर महिन्याला एकाच ठिकाणाहून काढलेल्या सुर्योदयाच्या या छायाचित्रांवरून स्पष्ट होईल अशी पोस्ट आणि फोटो असे व्हॉटस् अप वर बघितले आणि याचा अनुभव मी पण घेते हे जाणवले. मी तर सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही चा अनुभव घेते कारण दक्षिणेकडे असलेली गॅलरी!
दक्षिणदिशा म्हणजे यमाची दिशा, घराचा दरवाजा दक्षिणेला नको, गॅस दक्षिण दिशेला नको हे आणि असे अनेक नकारात्मक नियम दक्षिण दिशेसाठी वास्तुशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे. पण दक्षिण दिशा सुध्दा तितकीच महत्वाची आणि चांगली दिशा हे स्वतः अनुभवले आहे. एरवी भूगोल आणि दिशा ज्ञानाची माझी दशा कि दुर्दशा मलाच माहीत... शाळेत असताना भूगोल बरोबर मी पण गोल गोल फिरले. त्यातल्या त्यात नैऋत्य, आग्नेय, ईशान्य वायव्य (पहा आजही वायव्य दिशा आठवून आठवून लिहिली... देवाशप्पथ!! ) या दिशा आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता... मला ते राक्षस, राक्षसिणींचे नावे वाटायची आणि ते विकट हसत माझा खातमा करतायत असा भास होऊन मी अजूनच घाबरून गोंधळून जात होते. त्यात भर त्या वार्यांची... नैऋत्य मौसमी वारे, खारे वारे, मतलई वारे... अरे वा रे वारे! भूगोल वार्याला उभे करीत नव्हता. ग्रहतारे ते तर बिचारे एका जागी स्वस्थ बसले नाहीत आणि मला पण स्वस्थ बसू दिले नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो स्वतः भोवती फिरतो अरे फिरु द्या ना त्यांना आमचा मेंदू का गरगर फिरवता असे विचारावे वाटायचे पण शाळकरी वयात कधी हिंमत झाली नाही. असो. पण दक्षिणेकडील गॅलरीत उभे राहून जेव्हा मी सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर विहंगम दृष्य रोज पाहू लागले, खास करून सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात असतो तेव्हाच हे दृष्टीसुख घेता येते त्यामुळे भूगोला विषयी आवड, उत्सुकता निर्माण झाली. आकाशातला तो सुंदर, मनमोहक नजारा एकीकडे पश्चिमेला सूर्य अस्ताला क्षितिजावर सोनेरी, तांबडा होऊन निरोप घेण्याच्या घाईत आणि पूर्वेला निळसर राखाडी आकाशात चंद्राची नाजूक, कोमल कोर हसून आपल्याकडे बघत असते कळतच नाही हिचे स्वागत करावे की सूर्याला निरोप द्यावा... कधी कधी शुक्राची तेजस्वी चांदणी पण चंद्रकोरी सोबत असते. इतके विस्तीर्ण, अथांग आकाश मी कधी पाहिलेच नव्हते जितके मी ते इथे अनुभवते आहे. आकाशाचे मन मोहून टाकणारे रंग, आकार नुसते बघत रहावे... तरी मन भरत नाही. हळूहळू मला दिशा ज्ञान समजू लागले आणि समजले नाही तरी आता ताण नाही कारण मोबाईल मध्ये कंपास आहे माझ्या मदतीला.
23 सप्टेंबर आणि 22 मार्च हे दोन दिवस समान दिवस रात्रीचे असतात. त्यानंतर सूर्य जसजसा उत्तरेला सरकतो तसतसा दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. तुम्ही म्हणाल हे भौगोलिक ज्ञान का बरं सांगते पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा मी सूर्याला एका टेकडीवरून दुसर्या टेकडीवर रोज हळूहळू खाली घसरतांना बघते... रोज थोडा थोडा खाली येत येत तो मार्च च्या शेवटी दिसेनासा होतो पूर्णपणे उत्तर गोलार्धात जातो, आणि आमची गॅलरी सुनी सुनी वाटायला लागते. 23 सप्टेंबर नंतर पुन्हा दक्षिण गोलार्धात शिरणे सुरू होते. काही दिवस असे सुने गेले आणि उन्हाची तीव्रता वाढायला लागली की मग मात्र ही थंड गॅलरीच आवडू लागते. मन चंद्रोदय आणि चंद्रास्ताचा आनंद घेवू लागते.पण चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळांमध्ये खूप बदल असतात सूर्या सारख्या ठरलेल्या नसतात. त्यामुळे चंद्राचे दर्शन अनिश्चित असते. पूर्ण हिवाळा घरावर सूर्याचा प्रेमळ उबदार स्पर्श साथ देतो तर उन्हाळ्यात थंडावा. आधी कधी असा अनुभव आलाच नाही, आधी याच्या उलट हिवाळ्यात थंडगार घर आणि उन्हाळ्यात अक्षरशः भट्टी असायची हे असे काही भौगोलिक कारण लक्षातच आले नाही (त्या द्रुष्टीने कधी विचारच केला नाही. ) त्यामुळे हा वेगळा सुखद अनुभव विस्मयचकित करून गेला. दक्षिण दिशेची गॅलरी किंवा खिडकी ही उत्साहवर्धक असते हे लक्षात आले. शेवटी आपल्या मानण्यावर सगळे अवलंबून असते मन चंगा तो सब चंगा. दिशेनी काही फरक पडत नाही हे पुन्हा अधोरेखित झाले.
लडाखचे सोनम वांगचुक (थ्री इडियट्स फेम फुंगसुक वांगडू) यांनी लडाखला भारतीय सैनिकांसाठी तंबू बनवले ते दक्षिण दिशेचा वापर करूनच बनवले. हे असेच तंबू त्यांनी गलवानला पण बनवले. कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान सीमेचे संरक्षण करतात त्यांच्यासाठी हे उबदार तंबू वरदान ठरले आहे. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या उन्हाचा शास्त्रीय पध्दतीने वापर केला त्यामुळे तंबूतले तपमान चक्क 14 डिग्री सेल्सिअस इतके राहते जेव्हा की बाहेर उणे 14 डिग्री सेल्सिअस इतके असते. कितीतरी इंधन बचत झालीच परंतु प्रदुषणाचे प्रमाण अगदी कमी झाले. शिवाय जीव घेण्या थंडीपासून सैनिकांची सुटका झाली. हे वाचल्यावर मला दक्षिण दिशेबद्दलचा दृष्टीकोन बदलला. कुठलीही नैसर्गिक गोष्ट मुळात चांगलीच असते माणूस त्याला त्याच्या सोयीनुसार लेबलं लावून वाईट ठरवून टाकतो. हं फक्त दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये हे एकच कारण वैज्ञानिक आहे कारण चुंबकीय लहरी किंवा बल हे उत्तर दक्षिण असते. सगळ्या भौगोलिक घटना मग ते ग्रहण असो, उल्कापात असो, गुरू /मंगळ जवळ येणे असो किंवा चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे असो ह्या नैसर्गिक घटना मनात कुतूहल निर्माण करतात आणि दृष्टीसुख तर देतातच पण या अफाट पसार्यातल्या आपल्या यत्किंचित अस्तित्वाची जाणीव करून देतात.
"भूगोल हे काही दैव नाही पण ते दैवाच्या जवळ जाणारे आहे. लहान मोठ्या प्रमाणात ही भौगोलिक परिस्थिती आपल्या उत्पाकतेला, आनंदाला आणि सृजनशीलतेला आकार देऊन जाते चालना देवून जाते." असे एक छान वाक्य गुगल वर वाचले होते मी आणि ते मला योग्य वाटले. आपला परिसर, आजूबाजूचे वातावरण याचा उपयोग करून चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात अंर्तभूत करणे म्हणजे भूगोल. जे सोनम वांगचुक यांनी केले. नैसर्गिक संसाधनांचा मानवी जीवनासाठी उपयोग करतांना त्या नैसर्गिक साधनांना कुठल्याही प्रकारची हानी न पोहचवता त्याचा वापर करणे म्हणजे भूगोल.
वेगवेगळ्या समाजाचा, संस्कृतीचा अभ्यास करणे म्हणजे भूगोल. त्या त्या प्रदेशात असणारे उपलब्ध पर्याय, धान्य यावर आपले जगणे अवलंबून असते. त्याप्रमाणे सण, रिती पध्दती आपोआप निर्माण होतात आणि पुढेही सुरू राहतात.
सूर्य, चंद्र, ग्रहतारे नेमून दिलेल्या मार्गावरून वर्षोनुवर्षे न चुकता, न कंटाळता जात आहे. म्हणून पृथ्वीवर सगळे सुरळीत सुरू आहे. (दिवस /रात्र) आपले जीवन खर्या अर्थाने व्यवस्थित आहे छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण नाराज न होता जीवनातल्या, निसर्गातल्या आश्चर्यचकित करणार्या घटनांचा आनंद घ्यावा. अशीही यमाची दिशा खरंतर आपल्याला जीवनाचे शाश्वत सत्य सांगते. छोट्या नचिकेताला जन्म मृत्यू चे गूढ उलगडून सांगणारा यम खरंतर ज्ञानी, विद्वान आहे आणि आपण उगाच या सत्यापासून पळत असतो. ॐ दक्षिण दिशाय् नमः! ॐ दश दिशाय् नमः!
अंजली
No comments:
Post a Comment