Saturday, March 13, 2021

आमची जनाबाई!

 ऊन्हाळा !......सुट्टी म्हंटले की, पहिले आठवण होते ती आजोळची!.......चंद्रपुर माझं आजोळ !..दर सुट्टीतला नेमच जणू आजोळी जाण्याचा. त्या काळी तसही फार भटकंती करावी असं सामान्यांच्या घरात फारस घडत नसे .फारफार तर ऊन्हाळ्यात असणार्या नातेवाईंकाकडील लग्नाला हजेरी लावणे व आजोळी जाणे हे दोनच पर्याय समोर असतं. त्यातही चंगळ!.... ही आजोळीच व्हायची म्हणून मनात त्यालाच पहिला नंबर असायचा.

        उन्हाळ्याचे ते दिवस !...त्यातही चंद्र्पुरचा उन्हाळा ..तो सहन करण्याची ताकद कशी कोण जाणे पण तो देवच देत असे. घरात एकमेव काळा पंखा तो आजोबांच्या दिमतीत असलेला आणि आमच्याकडे त्याची मान वळतपर्यंत पुन्हा घर्मधारांनी शरिरावर ताबा घेतलेला असायचा पण ,त्यावरही एक मस्त उपाय होता.... आमच्याकडे हातपंखे असायचे,ते मुठीत घेऊन मस्त गरगर फिरवत बसायचो .....संध्याकाळी मात्र मस्त मजा असायची ......  !                                                       आमची जनाबाई उर्फ जनी म्हणजे जणू "नाम्याचीच जनी "  सतत कामात मग्न असलेली. तर ही जनाबाई संध्याकाळी दररोज घरासमोरच्या लांबलचक अंगणात झाडून मस्त सडा टाकायची तेही दारासमोरच्या विहिरीच पाणी काढून!....आहा ..तापलेल्या जमिनीचा मस्त खरपूस वास घेत.... तीने हातात घेतलेल्या चरवीची लयबद्ध हालचाल आणि पायाचे तालबद्ध तंत्र सांभाळत पाणी शिंपडताना बघण्याची मोठीच मजा वाटे. ..........नंतर मस्त नारळाच्या दोरीच्या खाटा टाकून गाद्या पसरविल्या जाई आणि त्यावर पांढर्या  स्वच्छ चादरी आंथरलेल्या ! हे सगळं जनीच करायची....बस्..!ते आंथरायचाच अवकाश की आमचे त्यावर लोळणे सुरु झालेच म्हणून समजा .तिकडून आमच्या आडदांड मनुमामाचा.... पोट्टे होsss....असा आवाज येताच आमचा ससा होऊन जायचा आणि गपगुमान बैठे खेळ,गप्पा टप्पा ,जरा सांजेची वेळ झाली की, शुभंकरोतीसह, हरिपाठ, रामरक्षा ....तालासुरात म्हणणे सुरु ! जोपर्यंत घरातुन जेवणासाठी हाकारा होत नाही तोपर्यंत !...नंतर जेवण झाल्यावर खाटेवर पडल्या पडल्या कधी तारे मोजायचो तर कधी गाण्याच्या भेंड्या! ....आणि हो एक मजा सांगायचीच राहिली आमच्याकडे छोटिशी खटोली होती ,घडवंची होती  त्यावर वयोमानानुसार झोपायचा नंबर लावला जाई. अर्थात खटोलीवर लहानांचाच नंबर लागे. आणि घडवंची बसकी पूर्ण लाकडी असल्याने पाठीला कडक लागे म्हणून आम्ही मुले तरी त्यावर झोपायचं टाळायचोच.
      सकाळ मात्र व्हायची ती जनीच्या सड्याच्या सपक! सपक!....आवाजाने सकाळी सहावाजताच ही अंगणाच्या झाडलोट आणि सड्यासाठी हजर ....ती होताच आजीने केलेल्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणारी सायवानातील जनी अजुनही डोळ्यासमोरुन जात नाही.तीचा सदैव हसरा चेहराच कायम डोळ्यासमोर येतो. तीचं घर अगदीच हाकेच्या अंतरावर त्यामुळे किती चकरा होत होत्या हे मोजुनही सांगता यायचे नाही. हा गंमतीचा भाग सोडला व विचार केला तर आजच्या कामवाल्या बाईंशी तीची तुलना होणं अशक्यच!................................                आता सडासारवणानंतर ती घरी जाऊन आंग धुऊन  पारोशी भांडी घासायला हजर. !.......त्यातही तिच्या दिमतीला असणारा लवाजमा म्हणजे भांडभर चिंच,भांडभर चुलीतली राख, सोबतीला नारळाची घासणी..ह्या सगळ्यांना सोबत घेऊन सगळी पितळीची  भांडी लख्ख चकचकीत घासून   फडक्यानी पुसुन हात लावुन लावुन कोरडी करुन ओसरीवर पसरुन ठेवणार हा तिचा नित्यनेम, कारण आजीच सोवळं !....दुपार झाली की मात्र माझी आजी चुलीच्या शेवटच्या धगीवर परत भाताचा गंज शिजायला ठेवायची. सगळी जेवणं झाल्यावर हा कुणासाठी असा प्रश्न मनात पडत असतानाच माझी मोठीआई(आजी)जनेsssssअसा मोठ्याने तिला ऐकू जाईल असा हाकारा करायची व नानी आली वं म्हणतं पुढ्यात हजर ......आजी तिच्या हातात तो ताज्या वाफाळत्या भाताचा  गंज व सोबत काही शीळपाकं उरलेल पण द्यायची त्यात तिच्या अख्ख्या कुटुंबाला म्हणजे ते दोघ नवरा बायको आणि त्यांचा मुलगा दिपक यांना पुरायचं. तो साधारण आमच्याच वयाचा त्यामुळे आमच्यासोबत कधीमध्ये खेळायचापण.!....

   आमची जनी खरोखर वेगळीच होती. काळी सावळी पण नाकडोळे ऊठून दिसणारी बुटक्या बांध्याची. गुडघ्यापर्यंत नेसललं पातळ घट्ट पायाला चिपकल्यागत नेसालेली .केसाचा मोठा आंबाडा त्यावर फुल खोचलेलं कंपल्सरी. ते मग कण्हेरीचही चालायच तिला, कपाळावर ठसठशीत कुंकू रेखलेली आमची जनी एखाद्या घरंदाजबाईसारखी दिसायची !.....आब राखून वागणं हा तिचा स्वभाव होता.स्वच्छता ,नीटनेटकेपणात  जराही कमी नव्हती.पांढर्या मातीने सारवलेलं तिच छोटसच पण सुबक घर तर इतकं देखणं होत की बसं !......की,तीने आरसा लटकवलेल्या ठिकाणी केलेली बशींच्या तुकड्यांची वेलबुट्टी अजुनही डोळ्यासमोर येते. पण तिच्या आणखी एका गुणाचा उल्लेख इथे करावसा वाटतो . तो म्हणजे  ती तिच्या आईची एकुलती एकच मुलगी ती लग्नाळू  झाली तेव्हा तिला एका स्थळाकडून होकार आला ,तो चांगला कम्पाऊंडर आहे असं सांगितलेल म्हणून तीथे तीच लग्न झालं पण तो निघाला हाॕटेलात कपबश्या विसळणारा हरकाम्या !....ही मानी !...तो खोटारडा निघाला म्हणुन तडक माहेरी निघून आली ती तडक माझ्या आजीकडेच  आणि तिला सगळी हकीकत सांगितली  .जेव्हा तिचा नवरा तिला घ्यायला आला तेव्हा त्याकाळात माझ्या आजीने व तीने जायला चक्क नकार दिला .हे त्याकाळातलं केवढं मोठं धाडस केलं होतं दोघींनीपण अर्थात यामागे कारण असं होतं की, तिला अगदी लहानपणापासुन आजीने पाहीलं होतं ती तिच्या आईचा पदर धरुन पूर्वी आईसोबतच कामाला यायची आणि आई गेल्यावर तिचा वारसा हीने चालवला त्यामुळे तशी जबाबदारी आता आजीची असल्याने तिने तिला मायेने पाठिंबा दिला होता . पुढे तीचं शंकर वाढयाशी लग्न झाल ंपण दुर्दैवाने तोपण हल्ल्याच निघाला. तिच्या सुख दुःखाच्या सगळ्या गोष्टी फक्त आजीजवळच बोलायची जणू आजीची ती लेकच होती.  आता ती एकटीच संसाराचा गाडा हाकत होती.अगदी हसत हसत गोडीने. माझ्या लग्नाच्यावेळेसपण आईने तिला आणले होते. नंतर हळू हळू माझा संपर्क कमी झाला . आई सांगते की नंतर तिचा शेवट फारच दुःखात गेला .मुलगा सुन चांगले वागवत नव्हते म्हणाली .पणआजही तीची आठवण येताच मायेचा कढ आल्याशिवाय रहात नाही खरचं आमची जनी  ,                                     
"नामयाच्या जनीसारखी तिच्या नानीची जनी होती".

@अर्चना मुळ्ये.

No comments:

Post a Comment