"फिर तेरी कहानी याद आई
फिर तेरा पसाना याद आया---"
लता चे सुरेल स्वर वातावरणात घुमत होते आणि अचानक धक्का लागल्यागत झाले. अरेच्चा! हे वहिदा दिलीप कुमारला म्हणतेय की आपणच आपल्या "त्या कोरोना " ला म्हणतोय? होय, नाईलाजाने का होईना, आपलाच म्हणावं लागतंय त्याला. जळू सारखा चिकटून जे बसलाय, जायचं नावच घेत नाहीये.
गेल्या वर्षी ह्याच दिवसात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती की त्याने. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी साधर्म्य असणाऱ्या घटना जर पुन्हा नव्याने घडत असतील किंवा त्याच त्याच घटना परत परत घडत असतील, तर "इतिहासाची पुनरावृत्ती" होतेय, असं आपण सहज म्हणून जातो.खरं सांगायचं तर इतिहासाची पुनरावृत्ती ही संकल्पनाच काहीशी चुकीची वाटते. चुकांची पुनरावृत्ती हा शब्द प्रयोग ठीक आहे; पण इतिहासाच्या बाबतीत? इतिहास हा एकदाच घडत असतो, क्वचितच घडत असतो आणि तो घडवला जातो, प्रयत्नपूर्वक. जसा शिवाजी महाराजांनी घडवला, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घडवला. हजारो क्रांतिसूर्यानी घडवला. अशा इतिहासाची नोंद मग अख्खे जग घेत असतं, असा इतिहास मनावर कोरला जातो आणि कागदावर उतरवला जातो, पुढील पिढीसाठी प्रेरणादायी, संस्मरणीय ठरावा, म्हणून.
घटनांची पुनरावृत्ती होतेय, हे मात्र जाणवतंय. कोरोना ने परत डोके वर काढायला सुरुवात केलीये, डोकेच नाही तर अख्खा च्या अख्खा मानगुटीवर येऊन बसलाय आणि म्हणूनच "इतिहास" आठवला.

गेल्या वर्षी जानेवारी पासून हलके हलके वारे वाहू लागले होते त्याचे मार्च नंतर कधी झंझावाती वादळात रूपांतर झाले, कळले देखील नाही. सुरुवातीला काहींनी त्याला हलक्यात घेतले, टरही उडवली, मजा घेत स्वतःची करमणूक ही करून घेतली. काही मात्र सतत घाबरलेले, भेदरलेल्या अवस्थेत राहिले. मृत्युच्या भीतीनं, आप्तेष्टांच्या दुरावण्याच्या भीतीनं, दूर असलेल्यांच्या काळजी च्या भावनेनं। ------ हा संपूर्ण कालखंड म्हटलं तर निराशाजनक, दुःखदायक, म्हटलं तर परीक्षा पहाणारा ठरला. माणसांनी स्वतःच्या डोळ्यादेखत आपल्याच माणसांचे मरण पाहिले, जिवंतपणीच क्षणा क्षणा चे मरण "एकाकी " जगणार्यांनी अनुभवले. आपलं कोण, परका कोण हे ओळखायला शिकले.
निवांत क्षणी जसे निसर्गाचे विविध रंग अनुभवले,तसेच माणसाच्या अंतरंगातील रंगही शोधून झाले. टाळेबंदीमुळे गावाकडे परतणारे मजुरांचे लोंढेच्या लोंढे पाहिले, तशी रस्त्यावरील भयाण, करुण शांतता देखील अनुभवली.
खूप काही शिकवून देऊन, घेऊन गेला हा कोरोना---- छे: गेला कुठे अजून? एखादा हरत चाललेला खेळाडू जसा पूर्ण ताकदीनिशी ,सगळा जोर एकवटून पुन्हा लढण्यासाठी उठून उभा रहातो, तद्वतच पुनरागमन झाले त्याचे

अर्थात, आता परिस्थितीत जरा बदल झालाय, हे नक्की. संकटांशी सामना केल्यानंतर जी ताकद अंगी येते, ती आता बहुतेकांमध्ये आली आहे. काही "लस" घेऊन "शक्तिमान" झाल्यागत वावरत आहेत. पूर्ण वर्षभराच्या अनुभवातून, सततच्या कानावर पडणाऱ्या उपदेशांच्या डोसातून, बघून, वाचून, ऐकून---- लोकांची भीती, दडपण आणि त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झालीये. तरीही पुनरावृत्तीची आठवण करून देणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत. तेच ते कोरोना वरील पाचकळ विनोद, तीच गृहिणींची घरातील कामात बुडून जाण्याची वेळ, सुगरणीं चा पदर खोचून पुनश्च ऊतू आलेला कमालीचा ऊत--- रोजच्या अपडेट्स देणाऱ्या कोरोना च्या धक्कादायक बातम्या आणि त्यामुळे अजूनच वाढलेला वातावरणातील ताण-----
असे असले तरी बहुतेक जणांना ह्यातील "गंभीरता" जाणवलेली च नाहीये. मास्क घालण्याविषयी, ठराविक अंतर पाळण्याविषयी अजूनही काही महाभाग सहजतेने घेत आहेत, इतकंच काय पण "लस" घेण्यासाठी देखील काही साशंकता दाखवत आहेत. बिचाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांनी दिवसरात्र मेहनत करून, सर्व कौशल्य पणाला लावून लोकांच्या भल्याचा विचार करत जीव तोडून काम केले आणि आपण?----
आपल्याला तर प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर व्यवस्थेवर फोडण्याची वाईट सवय झालेली असते; पण ह्या व्यवस्थेची निर्मिती तरी कोण करतं? आपणच ना?
कोरोना परत आलाय. कशासाठी? ह्याचसाठी तर नसेल? आपल्याला निसर्गाचे संकेत ओळखता यायला हवेत,म्हणून? पर्यावरण, स्वच्छता ह्यांचे महत्व आपल्याला पटावे म्हणून? निव्वळ स्वतःचा जीव वाचवणं हेच उद्दिष्ट असू नये ,म्हणून? ह्या कोरोना च्या महामारीने आपल्याला काही काळातच जीवनाचे किती रंग दाखवून दिले? सत्याची दाहकता पटवून दिली, नात्यांचे महत्व----- ते पटलं आहे का पण? बऱ्याच जणांनी ह्या खडतर काळात नात्यांची जवळीक अनुभवली, नात्यांमधील निखळ आनंद लुटला; पण---पण तरीही आजही वर्तमानपत्राचे प्रत्येक पान किमान एका तरी नातेसंबंधांचा खून झालेला दाखवते. आजही "पवित्र, निखळ" समजली जाणारी नाती अक्षरशः क्रूर पणे पायदळी तुडवली जाताहेत. क्रौर्याची परिसीमा गाठली जातेय, क्षुल्लक कारणावरून अत्यंत जवळच्या नात्याचा गळा दाबला जातोय. मग काय शिकलो आपण कोरोना पासून? पर्यावरण दूषित होऊ नये म्हणून जेवढा प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याहीपेक्षा जास्त, नाती दूषित होऊ नयेत म्हणून करायला हवंय.
" नफरत है निगाहोमे
देहेशत है फिजाओमे
ये कैसा जेहेर फैला---
दुनिया की हवाओमे "
30 ते 35 वर्षा पूर्वीची ही रचना, आजही फारसा फरक पडलेला नाहीये, उलट हवा अजूनच गढूळ होत चाललीये.

ह्या कोरोना च्या महामारीने "नात्यांची जपणूक "करायचा जरी धडा दिला माणसाला, तरी भरपूर आहे. आज बहुतांश नात्यात इतकी छिद्रे झालेली आहेत,की बारीक रफू करावा लागेल की काय अशी शंका येऊ लागली आहे.
"चांगली नाती ही झाडासारखी असतात. सुरुवातीला त्यांची काळजी घयावी लागते;पण एकदा का बहरली, की आयुष्यभर सावली देतात, परिस्थिती कोणतीही असली तरी----" कधीतरी वाचलेल्या ह्या वाक्यात किती यथार्थता आहे, हे अनुभवाशिवाय पटणार नाही.
म्हटले तर "विस्मरण" ही फार चांगली गोष्ट आहे. मनाला यातना देणाऱ्या, वेदना देणाऱ्या गोष्टी विसरता यायलाच हव्यात; पण त्या मागची पार्श्वभूमी , कारणं ती मात्र विसरली जाऊ नयेत.
"Life gives us 2 gifts. 1st is "chance" and second is "choice"to select the best one for life" ---(कुणाचं वाक्य आहे माहीत नाही. माझं नक्कीच नाही.

)
"कोरोना" हा आपला "चॉईस" असूच शकत नाही, नाहीच आहे; पण तो एक "बेटर चान्स" नक्कीच होऊ शकतो. स्वतःला सुधारण्याची, स्वतः मध्ये बदल घडवून आणण्याची एक "संधी".
नाहीतर मग आहेच आपलं, येरे माझ्या मागल्या --- आणि असच होत राहिले तर कोरोना आला काय आणि गेला काय, एकदा आला काय किंवा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आला काय----काही फरक पडणार नाही. आपल्याला कोरोना देखील "सवयीचा एक भाग "होऊन जाईल.
वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
माणसाने माणूसपण जपण्याची , नात्यांना योग्य तो न्याय देण्याची वेळ----अजूनही गेलेली नाहीये.एकदा का हातातून वेळ आणि संधी निसटली की मग काहीच शिल्लक उरत नाही, माणसाचं "मी पण " देखील.
जगा, पण खरेपणाने जगायला शिका.
"जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगण्यास काही झरे पाहिजे
नदी कुठे मी मागतो अमृताची?
मला फक्त पाणी खरे पाहिजे--" (ज्ञानेश वाकुडकर)
प्रत्येक माणसाची अशीच तळमळ राहिली तर----? ?


माणिक.
No comments:
Post a Comment