एखाद्या दिवशी एखादा विशिष्ट शब्द, एखाद्या गाण्याची ओळ अचानक मनात उमटते आणि कधी कधी दिवसभर किंवा कधी कधी तर चार - पाच दिवस तेच घोळत राहतं...
तसं झालं बघा...
झालं असं की, नातवाला आंघोळ घालत होते, तर त्याचा हट्ट की पाण्याची बादली डोक्यावर पूर्ण ओत आणि मी आपली सवयी नुसार त्यात थोडं पाणी वाचवायला बघत होते.
"आजी, काय होतं असं केल्याने?' त्याचा प्रश्न...
मी आपली न बोलता त्याच्या अंगाभोवती पंचा गुंडाळू बघत होते.
'सांग नं आजी...' त्यानं माझं तोंड त्याच्याकडे वळवत विचारलं.
काय सांगू त्याला? खरंतर ही सवय लहानपणापासून भिनली होती. तसं आपण का करतो, याचा पण आता विसर पडला होता. पण त्याच्या प्रश्नाने एकदम आठवला 'खरड्या सासरा' हा शब्द!
मुळात हल्ली आमच्या कडेच काय बहुतेक सगळ्या घरांमध्ये 'शाँवर बाथ' घ्यायची पद्धत अवलंबतात. काही 'टब बाथ' ही घेतात पण माझ्या सारखे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे लोक बादली, मग्ग्याचा वापर करून आंघोळ करतात. या 'बाथ' वाल्यांना 'खरड्या सासरा' शब्द, त्याचा अर्थ नि त्यामागचा भाव... कसा माहिती असावा?
त्याक्षणी तरी मी नातवाला तो शब्द सांगू शकली नाही मात्र तेव्हापासून दोन तीन दिवस या ' खरड्या सासरा' शब्दानी माझा पिच्छाच पुरविला.
लहानपणी अशी बादली रिकामी केली की, आईचा ओरडा ऐकावा लागायचा, "अग अग...असं करू नाही. खरड्या सासरा मिळेल नं तुला" आई म्हणायची. बादलीतलं पाणी खरडून खरडून घेऊ नये म्हणून हा धाक!
"खरड्या सासरा मिळेल नं तुला", याचा अर्थ असा असायचा की मग्गा, दिड मग्गा पाणी सुद्धा जो खरडून खरडून घेतो अशा मनोवृत्तीचा, कंजूष, दरिद्री सासरा मिळेल.
या शब्दाचा नीट अर्थबोध झाला नाही तरी पण 'खरड्या सासरा' म्हणजे काही तरी भयंकर आहे आणि ते आपल्या नशिबी नको रे बाबा! या मानसिकतेतून हाताला ती सवयच पडली.
इथे सासरा खरड्या नको असायचा पण जेवताना शेवटी भात घ्यावाच लागायचा आणि तोही वाढताना आई, एकदा वाढणी भरुन आणि लग्गेच त्याच वाढणीने लिंबा एवढा किंवा बोरा एवढा दुसऱ्यांदा वाढायची. कारण काय तर असं केल्याने म्हणे "सासरा श्रीमंत मिळतो".
खरंतर या सगळ्या समजुतीनां तसा काहीच अर्थ नाही. या कृतीमागे संस्कार होते पण ते नुसते न बिंबवता त्यामागे काही तरी धाक निर्माण केलेला होता.
कधी कधी विचार करते धाक निर्माण करण्यासाठी 'सासू' किंवा 'सासरा'च का असावा? खरड्या नवरा किंवा श्रीमंत नवरा का नाही म्हटलं? अथवा ठसका लागल्यावर आढ्यावर :सासुबाईच' का असते?
याबद्दल जेंव्हा विचार करते तेंव्हा लक्षात येतं की, जुन्या काळी लहान वयात लग्न होत. नवरा मुलगा काय करतो? किती कमवतो? यापेक्षा..., तो कुणाचा मुलगा आहे? त्यांच्या घरी वंशपरंपरेने चालत आलेली शेती, संपत्ती किती आहे? याला जास्त महत्व होते.
आणि म्हणूनच सासरेबुवांचे स्टेटस् जास्त महत्वाचे होते. ते चांगले तर संसार सुखाचा! त्यासाठी हा असा धाक मुलींच्या मनावर बिंबवित असावेत. आता मुली सासरच्या काय नवऱ्याच्या पैशावर पण पुष्कळदा अवलंबून नसतात. त्यांचं स्वयंपूर्ण जीवन असतं. मागल्या पिढी सारखं नवराबायकोच्या नात्यात उच्च कनिष्ठ भेद पाळल्या जात नाही. दोघंही बरोबरीत असतात म्हणून तर 'इकडची स्वारी' पासून तर 'ए...' पर्यंतचा प्रवास अगदी सहज शक्य झाला आहे. आता संसार सहजीवनात परिवर्तीत झाला आहे. आणि म्हणूनच 'खरड्या सासरा' किंवा 'आढ्यावरची सासू'च्या धाकाची गरजच राहिली नाही. तसंच न्हाणीघराची जागा 'सुसज्ज बाथरुम'नी घेतली आहे.
काळ बदलला, राहणीमान बदललं, विचारही बदललेत की मग शब्द बाद व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? आठवणीचे गाठोडे बांधून नवं स्विकारणारा पण जुन्यातही रमणारा एखादाच असतो. तशी मी आहे न् म्हणून मला कधीतरी, केंव्हातरी अशी एखादी ओळ, एखादा शब्द आठवतो नि तोच मनात फेर धरू लागतो. जसा आता हा....'खरड्या सासरा! खरड्या सासरा! खरड्या सासरा!'
- सीमा शेटे - रोठे, अकोला.
No comments:
Post a Comment