मध्यंतरी एका वक्त्याने त्याच्या भाषणात म्हटले होते की जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे कष्ट करू वर्ग आणि दुसरा कष्ट कसे टाळू वर्ग. माणसांमध्ये तर सगळ्याच बाबतीत वर्गीकरण होऊ शकतं. कारण प्रत्येकाची वृत्ती, प्रवृत्ती भिन्न असणारच. असाच अजून एक महत्वाचा फरक असतो,तो म्हणजे काही जण "टॉप" असतात, नेहमीच, काही "निम्न्न" पातळीवर रहातात, कायमच,आणि काही---- धड टॉप लाही नाही आणि पूर्णतः बॉटम लाही नाही, मधेच लोम्बकळत रहातात, माझ्यासारखे.
गुलजार ह्यांच्या फारच सुरेख पंक्ती आहेत,
" टहनी पर बैठा था वो
डुबनेसे डर लगता था
न तैरा, न डुबा, न उडा
बस,टहनी पर बैठे बैठेही सुख गया"
अगदी इतकी वाईट परिस्थिती जरी नसली आमची आणि सतत धडपड जरी सुरू असली,काहीतरी मिळवण्याची,तरी आम्ही नेहमी असेच लोम्बकळत रहातो, मधल्यामध्ये.
असो.
परवा शीतलच्या सासूबाईंनी इराचा म्हणजे आमच्या गोड नातीचा व्हिडीओ पाठवला, स्पोर्टडे चा. त्यात ती फर्स्ट आली आणि तिला मेडल मिळाले. मुलांचे कौतुक तर असतेच,असते;पण नातवंडांचे अधिक असते, काकणभर तरी, हे निर्विवाद सत्य आहे. इराला स्पर्धेत जिंकताना पाहून ऊर अभिमानाने भरून आला, डोळ्यात कौतुक दाटून आलं आणि नकळत मनात विचारचक्र सुरू झालं, आपल्याला कधी मिळालं होतं,असं पहिलं बक्षीस वगैरे?किंबहुना आपण अशा कितीशा स्पर्धेत भाग घेत होतो?घेत तरी होतो की नाही? मन भूतकाळात शिरत गेलं, आपोआप, मागे-----खूप खूप मागे----.
पहिली ते चवथी मी मराठी,सरकारी शाळेत शिकली. खरं तर आमची आई स्वतःच त्या शाळेत शिक्षिका होती. माझी वर्गशिक्षिका, ढोले बाई आणि आई चांगल्या मैत्रिणी देखील होत्या; पण तरीही माझ्या वर्गशिक्षिकेला माझ्यात फारसं कौतुक करण्यासारखं काही वाटलंच नसावं. तिसरीत असताना आमच्या वर्गाचा नाच बसवला होता बाईंनी, ' माझ्या ठकीचं लगीन, वऱ्हाडी कोण कोण--' त्यात देखील वरमाय किंवा वधुमाय होण्याचा मान मनात असूनही मिळाला नाही, तो मान मिळाला, रंजना कोठारी आणि निलिमा एकतारे ह्या दोघींना. आमची वर्णी,साहजिकच 'वऱ्हाडात'अर्थात, 'जेनेरल वार्ड' मध्ये. परीक्षेत कधीही 'पहिल्या नंबर' चा आनंद घेता आला नाही, काही विषयात उत्तम गती असूनही. कायम दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर, पण पाचच्या आत. नंतर पाचवीत हायस्कूल मध्ये गेली, "द्रौपदीबाई कन्याशाळेत" .फार भारी वाटत होतं. सगळंच वातावरण नवीन; पण मुलीपण माझ्या पेक्ष्या भारीच. शाळेचे कुठलेही कार्यक्रम असोत, सांस्कृतिक, खेळाच्या वा भाषणाच्या स्पर्धा---सतत ही जाणीव होत गेली की आपण कुठेतरी कमीच पडतो, कायमच. आणि एकप्रकारचा 'न्यूनगंड' तयार होत गेला मनात.अभ्यासात मात्र मी बऱ्यापैकी हुशार होती. अगदी गोंधळात देखील माझा अभ्यास छान होत असे. रेडिओ लावून गाणी ऐकताना तर फारच भारी वाटे अभ्यास करायला. पण तरीही इंग्रजीचे सर मला त्यांच्या आवडत्या विध्यार्थीनी पेक्ष्या 1/ 2 मार्क नेहमी कमीच द्यायचे. गणित--अंकगणित आणि बीजगणित तसेच मराठी हे दोन्ही विषय आवडीचे आणि त्यात गतीही चांगली होती. अंकगणितातील गतीच मला आयुर्विम्याच्या (L I C) परीक्षेत यश देऊन गेली,हेही तितकेच खरे म्हणा. नंतर मती कुंठित झाल्याने गती थांबली हे दुर्दैव. असो. नववीत असताना आमच्या शाळेत एक नवीन मुलगी आली होती, निर्मला ठोसर म्हणून. ती अर्थात दुसऱ्या तुकडीत होती. खूप हुशार होती. वार्षिक परीक्षेत अर्थशास्त्र विषयाचा पेपर नेमका फुटला, ती ज्या तुकडीत होती,त्या तुकडीचा. म्हणजे पेपर इंग्रजीचा आणि प्रश्नपत्रिका अर्थशास्त्राच्या विषयाची वाटली गेल्याचे आणि ते लक्ष्यात आल्यानंतर बदल केल्या गेल्याचे आमच्या तुकडीला नंतर समजले. तरी त्या विषयात निर्मलाला 74 आणि मला 75 मार्क्स मिळाल्याने मला स्वर्ग दोन बोटं उरल्याचा भास त्यावेळी झाला होता. 10 वीच्या बोर्ड परीक्षेत ती पहिली आणि मी दुसरी होते, शाळेतून; पण तिथेही हमारी तकदिर मार खा गयी. तोपर्यंत 11 वी मॅट्रिक होती. त्याच वरशापासून 10 वी मॅट्रिक ठरवण्यात आली. म्हणजे आमची 10 वी मॅट्रिक ची पहिली बॅच आणि 11 वी च्या मुलींची मॅट्रिकची शेवटची. सगळी पहिल्या दुसऱ्या नंबर ची बक्षिसे 11 वीतील मुलींना दिली गेली . छान मोठ्ठी निळ्या रंगाची प्लॅस्टिक ची बादली पाहून माझा जीव कसा तिळ तिळ तुटला होता तेव्हा.
वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या,तेव्हाही अस्मादिकांचा सहभाग सहसा नसायचाच. कधी विचार केलाच तर स्टेज वर गेलं की त त फ फ व्हायची. काही मुली तर आयत्यावेळच्या भाषणातही भाव खाऊन जायच्या. च्या मारी, कसं जमायचं त्याना देवच जाणे. आमच्या वरच्या वर्गातल्या ,ललिता गर्गे, सुषमा देवधर, भांडारकर, देशमाने ह्या मुली अशा काही जोशात भाषण ठोकायच्या की ऐकतच रहावं. एकदा "बंद" हा विषय दिला होता,वक्तृत्व साठी. एकीने सुरुवातच अशी भारी केली, " बंद!बंद! म्हणजे काही बुटाचे वा पिशवीचे बंद नव्हेत.तर ह्या बंद च्या मागे दडलेला गभीतार्थ आपण समजून घेतला पाहिजे" 'ओ तेरे की---' मी पण भाग घेतला होता,कारण मी लिहीत छान असे,( असं माझं स्वतःचं मत होतं अर्थात) मग काय, माझा निबंध एकदा चक्क हेडबाईंनी पूर्ण वर्गाला वाचून दाखवला होता. कोणता म्हणून विचारता? "मृत्यु नसता तर ?" इतका कठीण विषय होता तो. तर निबंधाचे कागद हातात घेऊन आमची स्वारी स्टेज वर गेली आणि आमची बोलतीच बंद झाली की हो.समोरच्या कागदांवर ची अक्षरेही धड दिसेनात. त्या भाषणाचा स्तर माझ्या अत्यंत खोल गेलेल्या आवाजामुळे अजूनच खाली आला. निवडणुकीसाठी मत मागताना किंवा policy मिळवताना एखाद्या अभिकर्त्याची व्हावी तशी लाचार अवस्था झाली होती माझी. गायन, वादन, अभिनय ह्या बाबतीत तर बोंब च होती, त्यामुळे आशा कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्याचे धाडस कधी केलेच नाही. हा, म्हणायला एक चिमुकला मानाचा तुरा, जो घरच्यांनी च खोवलेला आठवतो. मी अगदी पाच/सहा वर्षांची असताना " हम प्यार का सौदा करते है एक बार---" हे गाणं मस्त अभिनय करून म्हणजे डोळे वगैरे मोठ्ठे करून म्हणत असे आणि त्यावर नृत्य देखील करत असे( ,घरातल्या घरात) आणि तो नाच बघायला आई शेजारच्या बायकांना बोलावून आणत असे अशी वंदता असल्याचे वडीलधारी मंडळी सांगत बुवा.
'
पण मग सतत न्यूनगंडाची भावना, स्वतःला कमजोर लेखायची सवय ह्यामुळे मागे मागे रहात गेले. आणि त्या नकळत्या वयात तर सगळ्या सुप्त इच्छा मी मनातल्या मनातच पूर्ण करून घेत असे. म्हणजे कल्पनेतच स्वतःला "टॉप" पोझिशन वर ठेवून सगळी बक्षिसे, कौतुक मिळवत असे.स्वप्न रंजनात काय, सगळी बक्षिसे, कौतुकाची थाप आपल्याच मालकीची.
पुढे कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथल्या वातावरणात तर कधीच समरस होऊ शकले नाही. हा, आमचा चार जणींचा गृप होता त्यात आपसात मात्र बरीच मजा केली. त्यात टीचर्स ची टर उडवण्याचा आवडता छंद होता. ही न्यूनगंडाची भावना तोपर्यंत पाठपुरावा करत राहिली, जोपर्यंत मी जॉब साठी L I C त अर्ज केला नव्हता. जॉब साठी क्लास जॉईन केला नासिक मध्ये आणि हळूहळू बदल घडत गेला, धीटपणा येत गेला, माझ्याही नकळत. आत्मविश्वास वाढत गेला.जॉब मिळाल्यानंतरचा सुरुवातीचा ट्रेनिंग चा काळ, जॉइनिंग काळ अतिशय मजेत घालवला. अमळनेरला असताना तर ऑफिस तर्फे मी चक्क नासिक ब्रँच ला कॅरम, थाळीफेक, चेस अशा खेळांमध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा जाऊन आले. आकडेमोड, अकाउंट्स हे आवडीचे विषय असल्याने ऑफिस कामात उत्कृष्टपणे ठसा उमटवता आला.
लग्नानंतर गृहिणी पद संभाळूनही इतकी वर्ष झालीत पण अजूनही मी काही बाबतीत कमीच पडते,असे वाटते. उदा. मला अजूनही उत्तम प्रेस करता येत नाही कपड्याना. कपड्यांच्या घड्या नीट घालता येत नाही. स्वयंपाक उत्तम येत असला तरी पुरणपोळी सारखे अवघड पेपर अजूनही सोडवता येत नाहीत. चाळिसाव्या वर्षी गाडी चालवायला शिकले खरी, पण एक्स्पर्ट सारखी गाडी कधीच चालवता आली नाही. शेवटी आमचे देशपांडे सर म्हणत तसं, "जॅक ऑफ ऑल, बट मास्टर ऑफ नन" अशीच गत आजतागायत आहे. साधं उदा. द्यायचं तर पुस्तक बीसी मधलं वाचन असो किंवा खादाड बीसी मधले कुठले गेम खेळणं असो, आमच्या वाट्याला "बक्षीस" नावाच्या ह्या सांताक्लॉज ने कधीही कृपा केली नाही. तर हे सगळं एकंदरीत असं आहे.
पण शेवटी मी नेहमीप्रमाणे माझ्या मनाची समजूत काढून घेते. सगळीच माणसे सगळ्याच बाबतीत "टॉप" असून कसं चालेल? कुणीतरी "बॉटम" किंवा सामान्य पातळीवर असल्याशिवाय "वरच्या" पातळीवरील लोकांकडे कोण बघणार? तुलना, तुलनेतून जिद्द, जिद्दीतून प्रयत्न आणि प्रयत्नातून यशाचा मार्ग कसा दिसणार? आणि मी भले एखाद्या कामात, एखाद्या कलेत, एखाद्या क्षेत्रात उत्तम नसेनही; पण-------
पण "एक माणूस" म्हणून मी निश्चितपणे उत्तमच आहे ,हे मी स्वतःविषयी स्वतःच खात्रीने सांगू शकेन. 

माणिक नेरकर
अकोला.
No comments:
Post a Comment