Friday, November 8, 2019

"तो" माझ्या नजरेतून



प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, त्याची प्रत्येकाकडे बघण्याची नजर वेगळी. प्रत्येकाला त्याचे येणारे अनुभव, दर वेळी वेगळे. त्याला प्रत्येकाचे येणारे अनुभवही दर वेळी वेगवेगळे.  कुणाच्या दृष्टीने तो अगदी आपल्यातीलच, घरातीलच फॅमिली मेंबर असावा, तसा; तर कुणाच्या दृष्टीने तो फक्त एक तिऱ्हाईत व्यक्ती, इच्छित स्थळी सुखरूप पणे नेऊन  आणि आणून सोडणारा. 
   आता हा "तो" कोण हे कदाचित  वाचकांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. तर आजच्या आपल्या ह्या लेखाचा नायक, "ड्राइवर" अर्थात चालक,हा कित्येक दिवसंपासून माझ्या मनाच्या कोपऱ्यात घर करून होता. खरं सांगायचं तर मला त्याच्यावर एक मोठी  कादंबरी च लिहायची इच्छा होती; पण माझी लिखाणाची झेप, निरीक्षणाचा आवाका, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या वेगाच्या मानाने कमी पडल्या. म्हणून तूर्तास तरी ह्या छोट्याशा लेखावरच समाधान मानून घेतेय. तुम्हा वाचकांवरही उगाच अत्याचार नको ना व्हायला.😊
असो. 
        त्या दिवशी "बालविकास शाळेतील दिवाळीचा कार्यक्रम  आटोपून मी घरी यायला निघाले. अर्ध्या रस्त्यापर्यंत प्रतिभाने सोबत केली नंतर मी रिकशा करून निघाले. रिक्षा वाल्याने रस्त्यात अजून एक सवारी घेतली. बाई हाश हुश करत अगदी सांभाळून बसली. असेल पस्तिशीच्या आसपास. चेहऱ्यावर प्रचंड चिंता, ताण--- --" भैय्या, जरा आरामसे चलाना---" (ड्राइवर च्या चेहऱ्यावरचं लिहिलेलं असतं का माहीत नाही पण लोक सामान्यतः त्याच्याशी हिंदीतूनच बोलतात. इथे तर ही बाईच हिंदी  भाषिक होती म्हणा.)    " आरामसेही चला रहा हूं बेहेनजी.  लेकिन बैलगाडी मैने कभी चलाई नहीं" त्याची विनोद बुद्धी( फालतू) अचानक जागी झाली.  मग माझ्या शेजारी सहप्रवासी सुरू झाली. "वो क्या है ना, मेरे घुटनेका  ऑपरेशन हुवा है,   accident भी हुवा था तबसे मुझे  डर सा लगने लगा है---" तिने अपघाताचे नाव काढताच मलाही चेव आला. मी पण मग आपली तडाखेबंद हिंदी सुरू केली.  " वहीच तो ना. मेरा भी छे महिने पेहेले जोरदार accident हुवा. मुझे तो  अब घरसे बाहेर पडनेमेभी डरच लगता है--- क्या बतावू, किती तकलीफ सहन करनी पडी बावा--- " आणि मग आमची गाडी रुळावरून घसरत अकोल्याची ट्रॅफिक, अकोल्याचे रस्ते, लोकांचा  गाड्या चालवतानाचा, पायी चालतानाचा हलगर्जी पणा, किंवा बेताल पणा, रिक्षा वाल्यांचे नियम तोडून चालवणे ह्यावर आंतरराष्ट्रीय  पातळीवरील ( आमच्या दृष्टीने)  पण निरर्थक चर्चा सुरू झाली. रिक्षा वाला गालातल्या गालात हसतोय, असा मला  मनातल्या मनात भास झाला.
परवा देखील असेच झाले. आम्ही तिघी जणी, मी,कल्पना आणि दीप्ती आमच्या मैत्रिणीकडे, विद्या कडे जात होतो, रिक्षा ने. रस्त्यात अशाच गप्पा सुरु होत्या, आजकाल रस्त्याने जाताना किती भीती वाटते, रहदारी काय झालीये, गाड्या कशा बेफाम धावतात वगैरे वगैरे. मुख्य म्हणजे आपण घरच्या (फॅमिली) ड्राइवर सोबत असलो (पाठीमागे, बाजूला, कुठेही) तरीही आपल्या सूचना, सल्ले सुरूच असतात, 'हळू जरा, सांभाळून जरा, समोर बघाल----  शेवटी गाडी चालवणारा वैतागून म्हणतो, माझी आई, तूच का चालवत नाहीस गाडी? आणि काय ते घाबरट बायकांना किंवा बसल्या जागी, फुकटचे आणि निरर्थक सल्ले देणाऱ्या महाभागां ना  माहीतच असणार.😄 आमच्या पांचट गप्पा ऐकून शेवटी "तो" म्हटला, मॅडम, आम्हाला बरोबर अंदाज असतो, वाहन कसे चालवायचे ते. रोजचेच काम त्यातून आमचं पोट पाणी त्याचयावरच तर अवलंबून आहे ना? आमची देखील माणसं घरी वाट पहात असतात .  तो हे बोलला आणि माझ्या डोळ्यासमोर आला, पहाडी  प्रदेशात, डोंगराळ प्रदेशात वाहन चालवणारा चालक.  दिल्ली ते लेह लद्दाक, शिमला, मनाली,  सारख्या हिमालयीन प्रदेशात, जिथे अत्यंत कठीण वाटा, अवघड वळणे, अरुंद रस्ता, एकेरी मार्ग---- अशा दुर्गम भागात जे प्रवाशांना सांभाळून घेऊन जातात, त्यांना तर सलाम च करायला हवा. बद्रीनाथ- केदारनाथ  ला , अमरनाथ,  गंगोत्री- जमनोत्री ला जाऊन आलेली लोकं परतल्यानंतर जे पूजन करतात आणि भोजन घालतात, ते देव दर्शन करून आलो म्हणून पेक्ष्याही सही सलामत घरी आलो ह्यासाठीच असावे. पेहेलगाम ला गेलो होतो, तेव्हा तर मनात सतत देवाचा धावा सुरू होता. एकीकडे खोल खोल दरी, दुसरीकडे उभ्याच्या उभ्या डोंगर कडा, रस्ता अरुंद,  शिमल्याला जातानाही तसेच, आणि रोहतांग, ला , गुलबर्ग लाही तसेच. कसे काय इतक्या सराईतपणे ही जमात वाहन चालवते, त्याचं नवल आणि कौतुकही वाटल्यावाचून रहावत नाही.  खरे तर आपण पर्यटनाला, तिरथाटनाला निघालेली मंडळी, सर्वात प्रथम ह्या लोकांचेच पाय धरायला हवेत. कारण त्या संपूर्ण प्रवासात आपलं आयुष्य आपण त्यांच्याच स्वाधीन केलेलं असतं, नाही का? इतक्या अवघड मार्गावरून प्रवाशांना नेणारा हा ड्राइवर पाहिला, आठवला की पौराणिक काळातील युद्धभूमीवर योद्धया चे सारथ्य करणाऱ्या सारथीचीच आठवण होते.
  राम-रावणाच्या युद्धात जेव्हा रावणाचा मृत्यूकाल जवळ आला असे त्याच्या सारथी ला जाणवले, तसा त्याने रावणाचा रथ युद्धभूमिपासून दूर पळवत नेला. पण रावण अर्थात क्रुद्ध झाला. त्याला तो स्वतःचा अपमान वाटून सारथ्यला त्याने चांगलेच फटकारले. त्यावेळी सारथी रावणाला  म्हणाला, " महाराज, मी सदैव तुमचे हित चिंतले आहे.तुमच्या रक्षणाचाच विचार मी करीत असतो. माझे घोडेदेखील थकून गेले होते. अशा स्थितीत युद्धभूमीवर रहाणे मला  अमंगलकारक वाटले. मी सारथी आहे आणि सार्थ्याने शुभाशुभ लक्षणांचा, रथाच्या हालचालींचा अंदाज घेऊन देशकाळाचे भान ठेवायला हवे.   युद्धभूमीवर एका कुशल सारथी ने आपले कान, डोळे, मन सर्वत्र लक्ष ठेवूनही स्थिर ठेवणे जास्त गरजेचे असते."  किती यथार्थ आहे. आणि  हेच नियम एका कुशल चालकाला देखील लागू होतात. 'त्याने' कायम आपले कान, डोळे, मन शाबूत ठेवूनच वाहन चालवले पाहिजे, मग ते वाहन कोणते का असेना. स्वतःचे वाहन आहे आणि स्वतःची माणसं सोबत आहेत, तेव्हा तर सांगायची गरजच नसते; पण भाडोत्री चालकांनी देखील भान ठेवून वाहन चालवणे आणि प्रवाशांच्या जिविताची काळजी करणे तितकेच महत्वाचे आणि गरजेचे असते. तरच तो चालक आपल्या "कर्माला" न्याय देतोय असे म्हणता येईल. असो.
चार चाकी वाहन चालवणारा कोणताही  चालक असो, त्याला  वेस ओलांडली की सगळं व्यवधान बाळगावे लागते. कायम सावध असावं लागतं. समोरून येणारे वाहन, मागून येणारे वाहन, रस्त्यातील खड्डे, चढ,उतार, अनवधानाने समोर येणारी मुकी जनावरे--- अशा कितीतरी गोष्टींकडे त्याला लक्ष ठेवावे लागते. त्यानुसार  गाडीचे ब्रेक, एक्ससिलेटर, वेग सगळंच सांभाळून चालवणारा ड्राइवर म्हणूनच मला नेहमीच महान वाटत आला आहे. 
      अजून एक गोष्ट नेहमी मनात येते, ती ही की ही एकच व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तींविषयी किती तर्हेतर्हेचे अनुभव घेत असेल नाही?  त्याच्या वाहनात बसणाऱ्या व्यक्तींची मानसिकता, स्वभाव, त्याच्या कडे बघण्याची दृष्टी ह्या सगळ्या बाबी भिन्न असू शकतात.  कुणाच्या गप्पा कोणत्या विषयावर, कुणाचा इंटरेस्ट कशात, हे सगळं त्याला  अनुभवताना मजा येत असेल का? की तो बोअर होत असेल?विशेषतः " लेडीज स्पेशल ट्रिप" नेताना गाडीतील बायकांची कलकल, गोंधळ, त्यांचे पीजे, त्यांच्या गप्पांचे विषय, हे सगळं एका कानी, मनी झेलणारा, "तो" त्याला  वर्षतून किमान एकदा तरी 'शांतता अवॉर्ड' ने सन्मानित करायला हरकत नसावी. कुणी त्याला बाहेरगावी नेताना फॅमिली मेंबर सारखी ट्रीटमेंट देत असेल  म्हणजे त्याचे खाणे, पिणे, रहाण्याची व्यवस्था,  हे सगळं विचारात घेतलं जातं असेल, इतकंच काय, त्याची पुरेशी झोप, विश्रांती झाली आहे की नाही हे पाहिले जात असेल, तर कुणाच्या दृष्टीने तो फक्त एक "तिऱ्हाईत" म्हणजे त्याचे त्याचे बघून घेईल. आपल्याला काय करायचे? अशी विचारधारा असणारेही त्याला भेटत च असतील. मला आठवते, सुरुवातीच्या काळात आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स(चार फॅमिलीज) एकत्र देव दर्शनाला,  जायचो. तेव्हा अर्थातच कॉमन गप्पा, कॉमन विषय असायचे . नंतर नंतर  फॅमिलीज  सेपरेट झाल्या तसे प्रत्येक फॅमिली वेगळा प्रवास करती झाली. ओघानेच विषयही बदलले.  ह्या गप्पा मारतानाही माझ्या मनात "त्याचा" विचार हटकून असे आणि अजूनही असतो. आपल्या, किंवा मुलांच्या गप्पा ऐकून तो काय विचार करेल वगैरे. 😄 बोलत असताना त्यामुळेच आपल्यासोबत एक अगदीच अनोळखी(बहुदा)  व्यक्ती आहे तेव्हा तिचे अस्तित्व गृहीत धरूनच आपणही बोलले पाहिजे, असे मला प्रामाणिकपणे वाटत आलेले आहे.  खूप जणांना सवय असते, बाहेरगावी रिक्षा त बसल्या बसल्या ते त्याच्याशी पूर्व जन्मीचे नाते असल्याप्रमाणे गप्पा मारायला लागतात. आमचे "हे" तर हमखास त्याला त्याची ओळख विचारणारच.  "कहासे हो? बिहारके लगते हो" किंवा  किती वर्षापासून चालवतोय रे भाऊ?भागते का तुझे?" वगैरे वगैरे.. मग मुलं सोबत असली तर आम्ही एकमेकांकडे पाहून इशारा करणार किंवा ह्यांना नजरेने गप्प करणार. तर अशी आहे एकंदरीत "त्याची" कहाणी, मज्जा, वस्तुस्थिती,  आपबती---- जे समजाल आणि समजून घ्याल, ते.  
    पण विचार करायला लावणारा प्राणी आहे की नाही? सांगा बुवा आता तुम्हीच.🙏😊

  माणिक नेरकर, अकोला.

No comments:

Post a Comment