Friday, November 15, 2019

मे(रा)नोपॉज

कावळा शिवला ,पाळी आली ,MC ,टमाटर फुटला....,अशा नानाविध नावानी ओळखली जाणारी ,मेंस्ट्रुअल सायकल ,प्रत्येक स्त्रिच्या जीवनाच अविभाज्य अंग आहे.
वयाच्या अंदाजे 15 -16 व्या वर्षी सुरु होणारी आणि दर महिन्यात अवचित भेट देणारी ही सखी ,वयाच्या साधारण  45- 50 व्या वर्षी आपला निरोप घेते.
माझी अन पाळी ची पहिली भेट झाली (ओझरती म्हणू हव तर) मी चौथीत असताना,पुसद ला.
माझी मैत्रीण होती कल्पना,ती आठवी ला होती (मैत्री ला वयाच अंतर नसतं म्हणतात ते खरय ) मी तिच्याकडे रोज खेळायला जायचे ,एक दिवस गेले तर तिनी सांगितले मी आता  खेळणार नाही 3-4 दिवस , मला कावळा शिवला आहे .तरी मी तिच्याशी बोलत बसले ,निघाले तर ति मला सोडायला बाहेरपर्यन्त येत होती ,तेवढ्यात तिची आई ओरडली ,तो पायावर ओघळ आलाय तो धुऊन घे आधी ,तिच्या पायावर लाल रंगाचा रक्ताचा ओघळ होता ,तिचा चेहरा कावरा बावरा झाला ,ती आत गेली.
,मुळात चौकस स्वभाव नसल्याने ,आई ला किंवा तिलाही ह्याबद्दल कधी विचारले नाही,हा प्रसंग मी विसरुनही गेले .
पुढे साधारण सातवी ला असताना आई ने मला याबद्दल जुजबी माहिती दिली आणि अस काही
झाल तर सांग म्हणाली . मधे 1- 2 वर्ष गेले ,दहावी ला असताना आम्ही गाइड च्या कॅम्प ला गेलो ,तिथे मैत्रीणींची कुजबुज सुरु होती ,एका मैत्रीणीची विशेष काळजी घेतली जात होती ,तिची सगळी काम बाकी मैत्रीणी करत होत्या ,मला काय ते कळत नव्हत पण इतक्या जवळच्या मैत्रीणी
मला डावलुन कुजबुज करतायत ह्याच तेंव्हा खुप वाइट वाटल होत.
मग तो दिवस उजाडला, दहावी संपता संपता माझी पाळी आली ,खुप  वेगळ फीलिंग होत ते ,शब्दात मांडता न येणार !
कल्पना ला  शिवलेला कावळा ,गाइड कैम्प मधे मैत्रीणीला मिळलेली स्पेशल वागणूक ,अजुन कुठे कुठे झालेला याचा उल्लेख सगळ झर्रकंन डोळ्यासमोरून गेल .
वर्षभर, पाळी ची तारीख जवळ आली ,की नको वाटायच ,पण हळू हळू कहि वाटेनास झाल ,सवय झाली त्याची .
प्रामाणिकपणे सांगायचं तर मला कधी  पाळी चा फारसा त्रास झाला नाही ,मामुली पोट ,पाठ दुखण,थोड़ी बहुत चिड़चिड़ ,बास एवढंच!त्यामुळे पण या सखीशी लवकर सख्य जमल.
बघता बघता 30 ,वर्ष आम्ही गुणयागोविंदाने नांदलो .
48 वर्षाची झाले अन आता कधी पण पाळी जाईल अशी लक्षण दिसायला लागले .
मेंनोपॉज ! हा स्त्री च्या जीवनताल एक थांबा आहे ,ठहराव आहे ,अस बरच काही वाचल होत.मेंनोपॉज मधे खुप त्रास होते असही ऐकले होत,त्यामुळे भीति वाटत होती.शिवाय ज्या मैत्रिणी या फेज़ मधून जात होत्या ,त्यांचे ही अनुभव फेर धरून, खुर्ची का मिर्ची जाशील कैसी म्हणत सभोवति नाचत होते.
अचानक छाती धडधडायला लागते ,एकटेपणा वाटतो ,थोड़ ही काही झाल की डोळ्यात पाणी येत ,हाड़ ठिसुळ होतात.....एक ना अनेक प्रत्येकीचे अनुभव वेगळे ! 
1 पूर्ण वर्षभर पाळी आली नाही ,अन माझ्या मेंनोपॉज वर शिक्कामोर्तब झाल.
दोघही मुलं पण त्या वर्षी, एकाच वेळी बाहेरगावी शिकायला गेले,त्यामुळे आता आपल काही खर नाही अस वाटल. पण एखाद्या संकटाचा सामना करायला आपण सुसज्ज असाव ,अन ते संकट अगदी मामूली निघाव ,अस काहीस या बाबतीत झाल.
या सखी नी जस असताना मला काही त्रास दिला नाही ,तस जाताना पण निमुटपणे निघुन गेली .
सकाळी बॅडमिंटन ,मग दुकान ,तिथुन आल की लगेच खाली गोडाउन ला बसायच ,मग गाण्याचा क्लास ,तिथुन आल्यावर ट्रीट ला चक्कर , 3 - 4 bc ग्रुप ,प्रेरणा क्लब हा सोशल वर्क करणारा ग्रुप,अस सगळ व्यस्ततेच कवच भोवती आखुन घेतल्यामुळे फार काही जाणवल नसाव .तरी पण हे कवच भेदुन येणारा एखादा चुकार रिकामा क्षण त्रास देतोच.त्याशिवाय,
कधी न होणारी अॅसिडिटी आता व्हायला लागली आहे,खाणयापिंण्याच्या वेळेत बदल झाला तर त्रास होतो ,अचानक गर्मी होते तर दुसऱ्या क्षणाला थंडी वाजते,आजुबाजूला अनेक जण बोलत असतील तर त्रास होतो ,बॅडमिंटन खेळताना रिफ्लेक्सेस कमी झालेत हे जाणवत  मूड स्विंग आहेत..,अरेच्चा! काहि त्रास नाही म्हणता म्हणता ,यादी बरीच मोठी झाली की !
पण आपल्या सहवासात बरेच वर्ष असणारी गोष्ट ,मग ती आवडती असो की नावडती ,आपल्या आयुष्यातुन जाताना थोड़ा बहुत त्रास तर होणारच न !
या वर्षभरात ,वाचन जे बंदच झाल होत ,ते सुरु केल,थोड़ थोड़  लिखाण सुरु केल ,रिफ्लेक्सेस कमी झालें तरी खेळण्यात कुठे कमी पडत नाहीये ( ग्रुप मधे सगळे जेंट्स असल्याने,ही शक्यता जास्त होती ) हे लक्षात आल्यामुळे खेळण ही सुरु ठेवल. डान्स आणि स्विमिंग शिकायचा विचार आहे .
एकूण जमा खर्च मांडला तर पाळी येण अन मेनोपॉज़ दोन्ही फारस त्रासदायक ठरल नाही.त्यामुळे मेनोपॉज़ हा पॉज न ठरता ,अनेक नवीन गोष्टीची सुरुवात ठरावा अस वाटतय.

आनंदाच्या शोधात...

आनंद म्हणजे नेमकं काय? सतत छान वाटत राहणं म्हणजे आनंद? मग एखाद्या दारुड्याला
भरपूर दारू प्यायला मिळाली तरी छान वाटतं, त्या भावनेला आनंद म्हणता येईल का? नाही. मग हवं ते
करता/ घेता येण्याची कुवत मिळवणं म्हणजे आनंद? पण मग ज्यांच्याकडे ही कुवत आहे, ते सदैव
आनंदीच असायला हवेत. ते तसे नसतात. मग आनंद म्हणजे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट? पण आनंद हे
जर अंतिम उद्दिष्ट मानायचं तर संपूर्ण आयुष्य त्याशिवाय जगायचं? नाही नाही; फारच घोळ होतोय.
मला वाटतं आनंद हा आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून आयुष्याच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असायला
हवा.
Aristotle च्या मते केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं नव्हे, तर अलम मानवजातीच्या
अस्तित्वाचं प्रयोजन म्हणजे आनंद!
आता खरं सांगायचं तर आयुष्य हा सुख- दु:खाच्या टप्प्यांनी बनलेला प्रवास आहे. कालिदास
म्हणतो त्यानुसार आत्यंतिक सुख किंवा दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नसतं. जीवनाचं चक्र कधी खाली
तर कधी वर जात असतं. सुख आणि दु:ख दोन्ही क्षणकाल टिकणारे असतात, सुखाचे क्षण तुलनेने
लवकर गेल्यासारखे आणि म्हणून जास्त क्षणभंगुर वाटतात इतकंच. मनुष्य सुखाच्या क्षणांना घट्ट धरून
ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते नकळत कधी निसटून जातात ते कळतच नाही. एक उर्दू शायर म्हणतो,
‘बार बार रफू करते रहते हैं जिन्दगी की जेब को हम, कमबख्त फिर भी गिर ही जाते हैं खुशीके कुछ
लम्हे...’ म्हणजे देणारा लाख देईल हो, पण घेणाऱ्याची झोळी तर धड हवी, ती आपली असते कायम
फाटकी!
आनंदाची आणखी एक गंमत असते. एका व्यक्तीला ज्यात आनंद वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच
असं नसतं. त्यामुळे आनंद कशात असतो याची व्याख्या करणंही शक्य नाही. एखाद्या व्यक्तीला
वाचनाची आवड असते. तिची मैत्रीण नेमकी “एवढं काय वाचत असतेस? जरा लाईफ एन्जॉय कर ना
आमच्यासारखं!” असं म्हणते तेव्हा तिला हसावं की रडावं हेच कळत नाही. एवढंच नाही, तर आज ज्या
गोष्टीतून आनंद मिळतो, त्या गोष्टीचा त्याच व्यक्तीला कालांतराने कंटाळा येऊ शकतो. दहा वर्षांपूर्वी
एकमेकांची सोबत सतत हवीशी वाटणारे नवराबायको एकमेकांना कंटाळतात आणि मग “ह्यांची सुटी
नकोच असं वाटतं आताशा, रोजचाच दिवस जास्त बरा जातो.” असं वाक्य एखादी गृहिणी बोलून जाते.
किंवा ‘आई तू ऑफिसला जाऊ नकोस’ म्हणून मागे लागणारी मुले ‘ती ऑफिसला गेलेलीच बरी’ असे म्हणू
लागतात. (त्यामागची कारणे शोधायला स्वतंत्र लेख लिहायची गरज आहे, इथे ती चर्चा नको.)
आनंद विकत मिळत नाही. तो तसा मिळाला असता, तर फक्त श्रीमंत लोक आनंद दिसले असते.
मात्र लक्ष्मी ज्यांच्या घरी पाणी भरते, अशा व्यक्तींच्या जीवनातही आनंद असतोच असं नाही. वैभवाच्या

झगमगाटात त्यांच्या डोळ्यांतली दु:खाची छटा लपत नाही. याउलट एकाच खोलीत संसार मांडलेल्या, घाम
गाळल्यावाचून भाकर न दिसणाऱ्या व्यक्तींचा चेहराही आनंदाने फुललेला दिसून येतो.
आनंद कशातही असेल, तरी तो व्यक्तीसापेक्ष आहे, हे मान्य करायलाच हवं. कधीकधी आनंद
कशात मानावा हे परंपरा ठरवतात. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत. या संदर्भात मला एक भुलाबाईचं गाणं
नेहमी आठवतं. मुलींना खेळात अधेली सापडते. त्या अधेलीचा उपयोग कसा व्हावा हे पुढच्या गाण्यात येत
जातं – सर्वप्रथम ‘अधेली देऊ वाण्याला’. स्त्रीजवळ पैसा असला तर पहिला उपयोग ‘वाण्याकडे जाणे’ ! बरं
वाण्याकडे जाऊन काय करायचं तर ‘वाण्या वाण्या शोपा दे’ , शोपा स्वतःला खाण्यासाठी नाहीतच, तर
‘शोपा देऊ गाईला’ ! त्या शोपांच्या मोबदल्यात गाय दूध देईल. ते तरी मुली पिणार का? तर नाही; ‘दूध
देऊ बगळ्याला!’ बरं दुधाच्या मोबदल्यात बगळा चक्क पंख देतोय, तर ते घेऊन आकाशात भरारी घ्यावी
असा विचार करायचा नाही. तर ‘पंख देऊ राजाला’. आणि राजाकडून काय घ्यायचं तर ‘गोंडे’. बरं, हे गोंडे
लेऊन मुली समारंभात, गावात मिरवणार का? तर नाही, ‘तेच गोंडे लेऊ , सासरी जाऊ’ म्हणजे सगळा
उठारेटा करायचा तो सासरी जायला. मुलींचा आनंद अधेली स्वत:ला वाटेल तशी खर्च करण्यात नाही, दूध
पिऊन सशक्त होण्यात नाही, पंख पसरून भरारी घेण्यात नाही, गोंडे लेऊन मिरवण्यात नाही, तर तो आहे
(खरं तर असावा असा आग्रह आहे) सासरी जाण्यात. शिवाय हे सासर देखील कसं असतं, तर कुचूकुचू
काट्यांच्या वाटेवरलं ! असा प्रिस्क्राईब केलेला आनंद हे स्त्रीचं प्राक्तन होतं.
एखाद्याचा आनंद हा कशात असावा हे सांगणं चुकीचं असलं, तरी कशात नसावा हे सांगायची
बरेचदा गरज पडते. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याची फजिती करण्यात, विध्वंसक कृत्ये करण्यात आनंद
नसावा. हॉटेलमधील वस्तू चोरण्यात, बसेसच्या सीट्स फाडण्यात, सार्वजनिक बागेतील उपकरणे
निष्काळजीपणे वापरून खिळखिळी करण्यात आनंद नसावा. एखाद्याच्या आयुष्यातील दुखरा कोपरा
मुद्दाम पकडण्यात, नको इतके खाजगी प्रश्न विचारून बित्तंबातमी काढण्यात, इतरांना तुच्छ लेखण्यात
आनंद नसावा. गरिबापुढे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यात, एकाकी व्यक्तींसमोर भरल्या घराचे गोडवे
गाण्यात, हरलेल्याला हिणवण्यात आनंद नसावा. यातून फक्त अहंकार सुखावतो. आणि अहंकार
सुखावण्यातून मिळणारा आनंद हा आसुरी आनंद असतो.
एकूण काय, आनंद हा कस्तुरीसारखा असतो. मनुष्य आनंदाच्या शोधात वणवण भटकतो एखाद्या
कस्तुरीमृगासारखा. ती त्याच्या नाभीतच दडलेली आहे हे त्याला माहीतच नसतं. तो तिला इतरत्र शोधत
बसतो . मनुष्यही आनंद असाच बाहेर शोधत बसतो आणि त्याला तो सापडत नाही. तो त्याच्या मनातच
दडलेला असतो आणि म्हणत असतो, “तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी.”

Thursday, November 14, 2019

ED ची नोटीस

कार्यालयातील रोजचीच काम आपल्या गतीने सुरू होती,त्यात नवीन काही काम आलेली होती, आणि ती प्राध्यान
तत्वावर पूर्ण करायची होती,त्यामुळे जुन्या नव्या कामांची सांगड कशी घालायची याच विवंचनेत असतांना
आस्थापनेतील शिपाई आला आणि माझ्या हातात 1 कागद देत म्हणाला , “मॅडम ईडी ची नोटीस आहे” .मी एकदम
उडालेच कस शक्य आहे ? . आतापर्यंत पेपर मध्ये वाचले होते त्याप्रमाणे ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे करणाऱ्यानांच ईडी
चे बोलावणे येते असे वाटले होतेआणि माझ्यासारख्या त्यापैकी 1 चा आकडाही न पार करणारीला नोटीस ह्या
विचारांचा कल्लोळ मनात उभा राहिला, तेवढ्यात तो परत म्हणाला मॅडम घेताय न नोटीस ? मी भीतीयुक्त
आश्चर्य ने ती ,सही करून वाचायला घेतली आणि हसूच आले ,ती ईडी म्हणजे इलेकशन ड्युटी ची नोटीस होती
आणि त्यात मला पोलिंग ऑफिसर च्या पहिल्या प्रशिक्षणासाठी बोलावणे आले होते .
यापूर्वी कधीही हा योग आला नव्हता ,माझी ही पहिलीच ड्युटी होती.लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवाची मी
भागीदार होणार होती. मनात उत्सुकता,काळजी याचे मिश्रण झाले होते.कार्यालयात बहुतेक सर्व मैत्रिणींना ड्युटी
आलेली होती, त्यामुळे अनुभवी मैत्रिणींनी धीर दिला.
आणि आम्ही सगळ्या पहिल्या प्रशिक्षणासाठी दिलेल्या स्थळी पोहोचलो, तिथे व्यवस्थित सूचना फलक लावले होते
परीक्षा केंद्रावर जशी विद्यार्थ्यांची गर्दी असते तसा जनसागर गायकवाड सभागृहात लोटला होता.साधारणतः ५० -६०
अधिकाऱ्यांसाठी १ टेबल या प्रमाणे काही काही अधिकारी तिथे बसले होते, त्याच्याकडे याद्या होर्या त्यात आपले नाव
पाहून उपस्थिती नोंदवायची होती. नंतर वरच्या सभागृहात प्रशिक्षण होते. आम्ही दोघी तिघी मैत्रिणी सही करून
सभागृहात पोहोचलो आणिलगेच प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रशिक्षण चालू केले,ते निवडणूक कामाची पार्श्वभूमी,त्याचा
संपूर्ण तपशील,तसेच ती बजावताना घेण्याची काळजी, त्यातील गांभीर्य व त्या अनुषंगाने घ्यावयाची जबाबदारी
याबद्दल कळकळीने सांगत होते, त्याबद्दल ऐकतांना जाणवले की किती व्यवस्थित सांगड घातली गेली आहे
जबाबदाऱ्यांची ,वेगवेगळ्या विभागात कार्य करणारे , यापूर्वी कधी या कामाचा अनुभव असलेलें ,नसलेले विविध लोक
हे जबाबदारीचे काम अतिशय उत्कृष्ठ करतात .साधारणतः ५ लोकांची टीम एक मतदान केंद्रावर कार्यरत असते
त्यांच्या जोडीला पोलीस दलातील शिपाई, होमगार्ड पण असतात त्याचे काम बूथ च्या बाहेरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे
असते.अशा 5 ते 10 बूथ ची जबाबदारी 1का क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे असते तो विभाग स्तरावरील मुख्य अधिकारी
आणि केंद्राध्यक्ष यामधील दुवा असतो. बुथमधील ५जणांची टीमचा PRO हा कॅप्टन असतो त्याचे काम बाकी टीम
कडून काम करून घेणे आणि लेखी रिपोर्ट सादर करणे असते पण त्याची जबाबदारी त्या बुथ पुरती पूर्ण च असते.
दोन क्रमन्कचा चा पोलिंग ऑफिसर मतदाराचे नाव यादीत चेक करतो व त्याने दाखवलेल्या valid ओळखपत्राद्वारे
त्यांची ओळख पटवतो.३ रा पोलिंग ऑफिसर त्या ओळखपत्राचे नाव व नंबराची एक वहीत नोंद घेतो आणि त्याची
चिट्ठी बनवून ४ थ्या पोलिंग ऑफिसर कडे देतो . त्याचे काम 100 चिठयांचा 1 गठ्ठा अशाप्रकारे गठ्ठे तयार करणे
हे असते आणि प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी cpu चे बटण दाबणे हे असते . आणि ५ व अधिकारी बोटाला
शाई लावण्याचे काम करतो . हे सर्व ऐकून वाटले की खरच किती बारीक बारीक कामाचा तपशील नोंद करून ही
यंत्रणा अस्तित्वात आली असेल , भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणूक
प्रक्रिया अपवादात्मक परिस्थिती सोडता, यशस्वीपणे पार पडणाऱ्या या यंत्रणेची कमाल च आहे. आतापर्यंत मतदान
प्रक्रियेचा फ्रंट साईडने अनुभव घेतला होता आणि आता बॅक एन्ड ने चालणारी कामे अनुभवायला मिळणार होती.

प्रमुख निवडणूक अधिकाऱ्याचे training संपल्यावर प्रत्यक्ष hands on training साठी जवळच असलेल्या एका शाळेत
गेलो आणि तिथे cpu (central processing युनिट) , vvpat आणि evm यांची जुळणी करण्याचे प्रात्यक्षिक करून
पाहिले आणि मगच घरी गेलो.
अंदाजे 15 दिवसांनी 2रे ट्रेनिंग लागले . सकाळी मला एका unknown नंबर वरून कॉल आला आणि पलीकडल्या
व्यक्तीने विचारले की शितलजी बात कर रही है? मी हो म्हणाली. त्याने सांगितले की तो आमच्या टीम चा PRO आहे
आणि ट्रेनिंग ला भेटू या असे म्हणाला. पहिल्या ट्रेनिंग चीच पुनरावृत्ती झाली पण फक्त आम्हाला आम्ही कोणत्या
विभागात काम करणार आहोत हे कळले. नंतर hands on traning च्या वेळी इतर सहकाऱ्यांची ओळख झाली आणि
आम्ही प्रत्यक्ष कुठे काम करायचं आहे या विचारांमध्ये आपापल्या घरी गेलो.
21 तारखेला प्रत्यक्ष मतदान होते, आणि आम्हाला 20 तारखेला सकाळी 9 वाजता संभाजी स्टेडियम मध्ये reporting
करायला सांगितले होते,आदल्या दिवशी पर्यंत पाऊस सुरू होता त्यामुळे चिखल सर्वत्र होता आणि त्यादिवशी पण
पावसाची रिपरिप चालूच होती,अशा परिस्थितीत संभाजी स्टेडियम वर पोहोचले , आणि ऑर्डर वरचा टीम क्रमांक
शोधायला लागले तेव्हा आमच्या टीम चे PRO भेटले आणि त्यांच्या बरोबर टीम ची बूथ ऑर्डर घ्यायला एका टेबल
वर गेलो ,तिथे कळले की आमचा टीम क्रमांक च बदलला आहे परत समोर आलो आणि दर्शनी फलकावर लावलेली
यादी पाहू लागलो तेव्हा PRO यांच्या नावासमोर दुसरा टीम क्रमांक दिसला ,परत त्या क्रमांक नुसार दिलेल्या टेबल
वर ऑर्डर घ्यायला गेलो तर त्यात फक्त त्यांचेच नाव होते आणि बाकी सर्व टीम बदलली होती, माझे नाव दुसऱ्या
टीम मध्ये add झाल्याची शक्यता होती, परत दर्शनीय भागात येऊन नोटीस फलक पाहिला. माझ्या टीम चे नाव
कुठेच नव्हते तसेच माझा नंबर पण नव्हता, मग आता काय करायचे याचा विचार करत असतानाच माझ्या
कार्यालयातील काही सहकारी भेटल्या, त्यांचे पण असेच झाले होते , मग आम्हाला अधिक चौकशी केली असताना
कळले की आम्ही राखीव अधिकारी आहोत , आम्हाला कोणताही बूथ allot झाला नाही , आम्ही थोडे बाजूला ऊभे
राहून ज्यांना बूथ allot झाले आहेत त्यांची सामान म्हणजे evm machine, vvpat, cpu व इतर लावणारे साहित्य
नेण्याची गडबड पाहत राहिलो. साधारण 1 .30 वाजेपर्यंत त्याची गर्दी आटोपली, त्यानंतर आम्ही जेवढे लोक उरलो
होतो त्यांना हॉल मध्ये एका ठिकाणी जमा व्हायला सांगितले आणि बाजूला क्षेत्रीय अधिकारी उभे होते , ज्याच्या कडे
अंदाजे 5 ते 10 बूथ होते आणि त्यापैकी काही बूथ मधील टीम मधला एखादा सदस्य नव्हता त्याच्या बदल्यात
दुसऱ्या सदस्याची मागणी करत होता आणि त्याच्या requirement प्रमाणे त्या विभागाचे मुख्य निवडणूक अधिकारी
राखीव सदस्यातून निवड करून त्याची मागणी पूर्ण करत होते . मला आणि अजून एक सदस्याला ला अशा एक
क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे परत राखीव सदस्य म्हणून दिले. त्यांना फक्त 1 PRO हवा होता पण त्याच्या सोबत आम्ही 2
जण फ्री मिळालो त्यांना. मग त्याच्या सोबत आम्ही जीप मध्ये आणि इतर 5 बूथ च्या टीम बस मध्ये असे
निघालो आणि 1का शाळेवर पोहोचलो तेव्हा कळले की त्याच शाळेत 5 बूथ आहेत आणि तेवढंच बूथ क्षेत्रीय
अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्राखाली आहेत. शाळा kinder garden private होती . सगळ्या बूथ मध्ये सामान लावणे
,चीठ्या बनवणे, फलक लावणे इ काम सुरू झाले ,काही सामान आणण्यासाठी परत आमची स्टेडियम ला 1 चक्कर
झाली आणि संध्याकाळी महिला कर्मचार्यांना घरी जाण्याची सूट मिळाली, घरी पोहोचले तर मुलाने surprise cake
आणला होता (त्यादिवशी माझा वाढदिवस होता��) त्याच्याशी बाबांशी गप्पा झाल्या आणि इतर मैत्रिणी , नातेवाईक
यांचे फोन आले ,त्यामुळे दिवसभराचा शारिरिक व मानसिकथकवा दूर झाला .

दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता परत शाळेत पोहोचली तेव्हा मौक पोल सुरू झाले होते . ते संपले आणि ठीक 7
वाजता मतदानाला सुरुवात झाली. मी शाळेच्या रेसिपशन लाच बसले होते , तिथे तैनात असलेली 1 पोलीस महिला
शिपाई आणि 1 पुरुष शिपाई याची ड्युटी लोकसभा इलेकशन वेळी त्याच बूथ ला झाली होती ,त्यांनी मागचा
अनुभव सन्गितला की कसे काही लोकांनी गडबड केली कारण त्याचे मतदान ह्या मतदान केंद्राच्या दुसऱ्या उपकेंद्रावर
होते. हळूहळू लोक येत होती आणि BLO पण येऊन बसलेले होते पाऊस रिमझिम चालूच होता , 1 blo आपल्या 9
वि तल्या मुलाला घेऊन आला होता मदतीसाठी, येणारे लोक , जॉगिंग , सायकलिंग करून मतदानाला येत होते आणि
बाहेर आल्यावर कर्तव्याचे पालन केले आहे तो ‘ सेल्फी तो बनता है यार’ असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. अनि
सेल्फ़ि चे पण कर्तव्य पार पाडत होते. पाऊस थांबला आणि हळू हळू गर्दी वाढू लागली .काही छोटे मुलं मुली पण
उत्साहाने आपल्या पालकांबरोबर आली होती ,एकजण माझ्यासोबत बसली ,तिचे पालक रांगेत उभे होते. वय वर्ष 5
तिला गमतीने सहज विचारलं ,”तुला करायचे नाही का मतदान ? तर तिने जे उत्तर दिले ते ऐकून मी थक्कच झाले
ति म्हणाली.” बटण दाबून उमेदवाराला मतदान करतात आणि ज्याला जास्त मतदान होते ते जिंकतात .” तिच्या
बाजूला साधारण तिच्याच वयाचा 1 मुलगा मोबाइल वर गेम खेळत होता , ते पाहून पोलीस शिपाई म्हणाला अरे
मोबाइलला ने डोळे खराब होतात , मेंदू खराब होतो ,तर लगेच ही म्हणांली मी नाही खेळत मोबाइलल वर ,आम्ही
तिचे कौतुक केले तर लगेच “पण माझी आई खेळते मोबाइल वर गेम ‘” अस सांगून आमची दांडीच उडवली.
दुपारनंतर मी 1 बूथ वर reliever म्हणून गेली आणि बोटाला शाई लावण्याचे काम केले, त्यात पण अनेक नमुने
पाहायला मिळाले , एक मुलींनी तर please जरा बारीक आणि सरळ शाई लावण्याची विनंती केली तिला सेल्फी
काढायची होती. एकजण त्याचे आधार कार्ड तिथेच विसरला. एक तर पासपोर्ट विसरला
काहींच्या इलेकशन कार्ड मध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत्या त्यामुळे ओळख पटवणे कठीण जात होते,काही लहान मूल
पालकांबरोबर आत येत होती आणि आमच्यापण बोटाला शाई लावा म्हणून हट्ट करीत होती,
या सगळ्या सोहळ्यात मात्र मतदारांचा उत्साह , मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याचे त्याला पूरक साहाय्य आणि त्यात
काही उमेदवारांची शेलेब्रिटी स्टाईल एन्ट्री यांची सरमिसळिने निवडणूकीचे वातावरण रंगात आले होते आणि जसे जसे
घडाळ्या चा काटा 6 कडे सरकू लागला तसा मतदारांच्या रांगा वाढू लागल्या आणि कर्मचाऱ्यांच्या अंगात अजूनच
स्फुरण चढले. घडाळ्यात 6 वाजले आणि निवडणुकीचा बिगुल वाजला . आता बाकिचे बूथ मधिल लोक evm सिल करणे,
बाकिचे सोपस्कार करणे अशि कामे करु लागलि, मला परत संभाजी स्टेडियम ला reporting करूनच घरी जायचे होते.
या निवडणुकीच्या चांगल्या अनुभवामुळे माझा मतदान प्रक्रिया योग्य प्रकाराने राबविण्यासाठी किती अधिकारी
,कर्मचारी अविरत काम करीत असतात याचा चांगला अनुभव आला. त्यामागे निवडणूक आयोगाची आखलेली कठोर
कर्तव्य नियमावली हेदेखील कारण असू शकते पण प्रत्येकाने त्याला नेमून दिलेले काम योग्य केले तर अनुशासनाची
भीती राहत नाही हे देखील कळले .
मात्र अजुनहि सरकार स्थापन झालेले नाहि, आणी ते करण्यासाठी होत असलेली सुंदोपसुंदी पाहता, हेच अनुशासनाचे
कठोर नियम आणि कर्तव्य हे ते नियम पारित करणाऱ्यांसाठी का नाहीत ह्या गोष्टीचा विषाद नक्कीच वाटतो

- गौरी

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

एका शाळेच्या बालक दिनाच्या कार्यक्रमातील ही घटना मला बरंच काही शिकवून गेली. सतत गप्पा मारणाऱ्या आणि आपल्या बांगडीशी ती हातातून बाहेर काढून खेळणाऱ्या एका मुलीला शिक्षिकेने शांत बसायला सांगितल्यावरही तिने आपला चाळा सुरूच ठेवला. मग  शिक्षिकेने तिच्या हातातील बांगडी काढून स्वतःजवळ ठेवली. कार्यक्रम संपल्यावर त्या मुलीने माफी मागून बांगडी परत मागितली आणि आज बालक दिन आहे तर आज तुम्ही मला शिक्षा न करता क्षमा करायला हवे असे सांगितले. त्यावर शिक्षिकेने दिलेले उत्तर मार्मिक होते .त्या मुलीला उद्देशून म्हणाल्या- बालक दिनाच्या निमित्ताने क्षमा करावी. मात्र याच निमित्ताने का होईना तुम्ही बालकां सारखे राहायला हवे ना? केवळ आजच नाही तर सर्वच दिवस बालकाची निरागसता असते का तुमच्यात? तुम्ही असे निरागस रहाल तर शंभर वेळा तुमच्या चुकांबद्दल तुम्हाला माफ करण्यात येईल.
   खरंच निरागसता लहान मुलांमध्ये किती बघायला  मिळते हा प्रश्नच आहे. कार्बाईडच्या वापराने वेळेआधी पिकवलेल्या फळां प्रमाणे आजची बालके घाईने मोठी केली जात आहेत .शारीरिक वाढीचे टप्पे वेगाने गाठण्याचे प्रमाण असे आहे की बसती झालेली बालके रांगण्याची पायरी चुकवून सरळ उभी राहायला लागलेली आहेत. मग मानसिक वाढीचे टप्पे ही वेग -अतिवेग धरू लागले आहेत. वयानुसार भाव- विभाव दाखवणारी बालके, लहान मुले शोधावी लागतात. बहुतेक मुलांना माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशी शिकवण कळत-नकळत मिळते आहे. आपली मूठ झाकून दुसऱ्याच्या ओंजळीतले हिसकावून घेणे हे करता येणारी मुलं आजच्या जगात "फिट" आहे म्हणून त्याची पाठ थोपटली जाते.
   सदगुणांना धाब्यावर बसवून षड्रिपुना  आपले दोस्त बनवले जात आहे. दया-क्षमा-शांती ही केवळ स्त्रियांची नावे म्हणूनच माहिती आहेत का असा प्रश्न पडतो .मत्सर मात्र ठासून भरलेला दिसतोय .त्याच्याकडे तेवढे माझ्याकडे एवढेच ?असा असमाधानी सूर कायमच मुलांमध्ये दिसतो. कितीही मिळाले तरी इतरांकडे पाहून त्यावर विरजण पडते आहे .त्यातून मद, उन्मत्त पिढी तयार होते आहे .मला मिळायला हवे, इतरांशी काय करायचे ?सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ बघितला .इमारतीमधील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माणसे भरल्याने ती थांबते. अस्वस्थपणे ती सुरू होण्याची , वर चढण्याची वाट बघत प्रत्येकच व्यक्ती इतरांकडे अपेक्षेने बघते .मात्र स्वतः भार कमी करण्याचा विचार त्यातील कुणालाच येत नाही .अखेर एक कुबडयांच्या आधारे उभी असलेली मुलगी तिथून बाहेर पडते आणि लिफ्ट सुरू होताना बघते. निरागसता न जोपासलेली लहान पिढी  मोठी झाल्यावर अशी उन्मत्त, भावशून्य झाली तर त्यात काय नवल?
  लोभ हव्यास वाढवायला समजुतीचे बीज न पेरले जाणेच कारणीभूत असते ना? " ब्लॅक होल" नावाचा एक लघुपट मध्यंतरी बघितला. एका कागदाच्या मध्यभागी जादुई काळा गोल असतो त्यातून पलीकडच्या वस्तू पर्यंत आरपार पोहोचता येते हे जेव्हा एका व्यक्तीला कळते तेव्हा तो आधी बंद फ्रीजमधले खाद्यपदार्थ हात आरपार घालून काढतो आणि खातो मग त्याच्या वापराने तिजोरीतील धन काढण्याचा मोह त्याला आवरता येत नाही आणखीन आत हात घालून सर्व धन बाहेर काढता काढता तो कधी आत डोकावतो आणि आतच गडप होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही. 
  आपल्या प्रत्येकातील खरा बालक जेव्हा सक्रिय राहील तेव्हाच संपूर्ण मानवजातीचे हित साधले जाईल. यानिमित्ताने ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांच्या एकमेकांशी घडलेल्या संवादा वरील ओळी आठवल्या

    अरे अरे ज्ञाना झालासी पावन 
     तुझे तुज ध्यान कळो आले 

 अध्यात्मिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी स्वतःला स्वतःची ओळख झाल्यावर पावित्र्य येते हे सांगणाऱ्या आहेत .आत्मा आणि परमात्मा यांच्यातील एकरूपता दर्शवणाऱ्या आहेत. अशीच एकरूपता बालक दिनाच्या निमित्ताने आपल्यातील प्रत्येकाने स्वतःतील बालकाशी साधली तर जगणे खऱ्या अर्थाने सुंदर होईल .

     दीपकी दीपक मावळल्या ज्योती
      घरभरी वाती शून्य झाल्या 

  ज्ञानाच्या प्रकाशाने जसे जगातील सर्व गोष्टी उजळून निघतात आणि आपल्या न संपणार्‍या इच्छा नाहीशा होतात तशाच बालसुलभ भावाविशेषांनी आपल्यातील कोमलता जागृत ठेवून षड्रिपूंचे दमन करणे गरजेचे आहे.

    वृत्तीची निवृत्ती अपणांसकट
    अवघेचि वैकुंठ चतुर्भूज

 बालकांच्या शोधक नजरेने चांगल्या गुणांचा मार्ग जोपासत संपूर्ण विश्वामध्ये दैवी गुणांची ज्योत अखंड जागवत ठेवूया.
 बालक दिनाच्या शुभेच्छा!!!

 

Tuesday, November 12, 2019

भेट

मध्यंतरी मला उगाचच सारख उदास वाटत रहायचं ,पावसामुळे असेल  कदाचित् !...सततच्या   आभाळी वातावरणाने मनावर मळभ चढले होते दिव्यावर काजळी धरल्याने अंधुक प्रकाश पसरावा अगदी तसेच.......माणिक म्हणाली होती की अर्चना, आपण जायचे कां गं केकतउमर्याला दिवाळीचा फराळ घेऊन ?.....मी नाही म्हणाले कारण खरोखरच जमत नव्हते माझं तेव्हा कारण दोन दिवसांनी मुलगा,मुलगी,जावई यायचे होते आणि माझी काहीच तयारी झाली नव्हती. ती पण बिचारी शांत बसली कारण माझ्यासारखच आणि दोघी तिघी मैत्रिणींच देखील याच कारणाने जमत नव्हतं. 
       दिवाळी आटोपली होती, पाहुणे  आपआपल्या गावी परतले होते.पुन्हा माणिकने हळूच सूर काढला कां गं मुलींनो चलायच कां? कोण कोण येतय सांगा गं जरा म्हणजे सगळी नीट व्यवस्था करता येईल!....आणि तीथेपण नीट कळवता येईल...............आता तशा सगळ्या मोकळ्या झाल्या होत्या दिवाळीची सुट्टी संपायच्या आत जाऊ गं असं एकीने सुचवलं आणि रविवार पक्का झाला.
        रेल्वेचा प्रवास !.....अकोला वाशिम असा !. या वर्षीच्या सतत सहा महिन्याच्या पावसाने रखरखत्या ऊन्हाच्या झळांना काबुत केले होते. .सर्वत्र हिरवाईचे दर्शन होत होते. त्यामुळे आपोआपच मरगळ दूर झालेली. रिझर्व्हेशन असल्याने प्रवासही सुखकर! गप्पांच्या ओघात वाशिम कधी आले ते कळले देखील नाही.मी ,माणिक,सुषमा,कल्पना आमचं चौकोनी मैत्र निघालो केकतउमराच्या वाटेने.आणखी एका सखीने दिप्तीने तिच्या भाच्याला सांगून आमची चांगलीच सोय करुन दिली होती. त्यांच्याच कारमधून आम्ही निघालो ते थेट त्यांच्या घरी!....
         "चेतन उमरीतकर" अशा खड्या अक्षरातल्या पाटीने  लक्ष वेधून घेतले.आणखी लक्षवेधून घेतले ते त्यांच्या परिसरातल्या दाट वनराईने जणू एखाद्या सहलीच्या  ठिकाणी आपण आलो की काय इतके मनोवेधक होते ते.दाट वनराईत लपलेल घर जसजस जवळ जवळ जात होतो तसतस ठळक होत होतं. सगळ्या झाडांना पाटानं जाणार झुळझुळ पाणी आपल्या लयबद्ध नादाची हळूच जाणिव करुन देत होतं. वड ,पिंपळ,आंबा ,लिंबू,केळी ,जास्वंद असा वनराईंनी सजलेला परिसर आणि तो हिरवाईचा तजेलदारपणा मनाला तिथेच निक्षूण  सांगत होता जणू आम्ही दृष्टीहीन असुनही टवटवीत ताज्या मनाचे आहोत. .. ................................संपूर्ण टिनांच तीन खोल्यांच सुटसुटीत घर आणि घरातील माणसे आपआपल्या कामात गुंतलेले. चेतन "हा पांडूरंग उचितकरांचा १३/१४वर्षाचा जन्मांध मुलगा मोठी बहीण bscकरुन mpscचे लक्षठेवून असणारी. १००वर्षाच्या आसपास असणार्या चुणचुणीत आजी, आई-बाबा आणि देवाने पदरात टाकलेले आणखी १४मुले असा भरगच्च परिवार! विशेष म्हणजे त्यात दोन अंध जोडपी! वय वर्ष११ते २६  असा सगळा भरलाभुरला परिवार   !. .......... आम्ही आलोय याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन आणि डोळ्यातुन ओसंडून वहात होता. आपआपल्यापरिने सगळ्यांनीच आमचे स्वागत अतिशय प्रेमभराने केले. कितीतरी जुनी ओळख असल्यासारखे कुठलाही आडपडदा न ठेवता म्हणजे संकोच न करता गप्पा करु लागले.मला त्यांच्या आनंदाचे सगळे भाव त्यांच्या डोळ्यात दिसत होते. नवीन बांधकाम केलेली इमारत दाखवताना  आणि आम्ही उत्सुकतेने पाहताना जाणवले की,उचितकरांनी सगळ्या मुलांना दैनंदिन व्यवहार, वागणूक,आगतस्वागत,बोलण्यातील आब यात एकदम तरबेज केले होते. प्रत्येकांच्या खोलीत गेल्यावर एक लोखंडी कपाट,एक पलंग त्यावर नीटनेटकी चादर अंथरलेली ,सोपसुपारीचे पानदान असा सगळा सांसारिक रितीभातीचा मेळ बघून माझे डोळे आश्चर्याने अवाक् झाले.
      मनात सहजच विचार डोकावून गेला की आपण सगळ्या गोष्टींची अनुकुलता असुनही छोट्याशा कुंटुबातही कुरबुरी करत राहतो पण हा सगळा पसारा सांभाळताना चेतनच्या आईबाबांना अनेक कसोटीच्या क्षणांना सामोरे जावे लागले असेल अनेक संकंट अचानकच समोर आली असतील पण उचितकर दाम्पत्यांच्या हसर्या सेवाभावी चेहर्याकडे बघून हेच वाटत होते की यांना दैवीशक्तीच मिळाली आहे त्याच शक्तिच्याआधारे ते इतक्या जणांचा आज चिकाटीने सांभाळ करित आहेत.श्री.उचितकरांनी अतिशय हलाखित आणि कष्टातून शिक्षण घेतले .सात भावंडात एकमेव शिकलेले पण कमालिची जिद्द चिकाटी आणि परिस्थितीशी सामना करुन पुढे कसे गेले  हे त्यांनी आम्हाला सविस्तर कथन केले.आता मुलांना उत्साह आला होता. आम्हाला प्रशस्त हॉल मध्ये बसवून वाद्यसामग्रींनी सुसज्ज असलेल्या स्टेजवर सगळीजण बसून प्रत्येकाने सुंदर सुंदर गाणी आमच्यासमोर सादर केली. चेतन तर सिंथेयाझर उत्तम वाजवतो.कुणी ढोलकी,कुणी तबला असे तरबेज .आणि स्वरज्ञान उत्तमच कुठे अडखळण नाही की कुठे निराशा नाही.आम्हाला गाणी ऐकवण्याची अहमहमिकाच लागलेली होती. छोट्या१०वर्षाच्या विजयने तर कमालच केली टाळ्यांच्या रिदमवर जणगणमन इतक सुंदर वाजवल की ,स्वरही फिके पडावेत!... अस माझ्या ऐकण्यात आहे दृष्टीहिनांचा  low scale -m5 इतका स्ट्राँग असतो म्हणून दृष्टीहिनांचा कल गाणं,वादन संगितादी कलेकडे असतो. जसे रविंद्र जैन ,प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यासारखी थोर मंडळी माहितीचआहेत.
   ............नंतर त्या सगळ्यासोंबतच आम्ही जेवणाचाही आस्वाद घेतला आणि आम्ही आणलेली फुल नाहीपण फुलाची पाकळी भेट त्यांच्या सुपूर्द केली. ह्यात आमचा अजिबातच मोठेपणा नाही खरतर त्याबदल्यात आम्हीच त्यांकडून बरच घेऊन चाललो होतो. परतिच्या वाटेला पुन्हा भेटण्यासाठी!


        कळ्यांचे फुलणे माहीत होते
        नव्हते माहीत अंधार असा
         चालत चालत काटे उचलत
            वाटा झाल्या प्रकाशमान !
            वाटा झाल्या प्रकाशमान!!!

@अर्चना मुळ्ये.

Saturday, November 9, 2019

बहुरूपिणी दुर्गा भागवत, चरित्र आणि चित्र.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक शब्दात अंजली कीर्तने मॅडम नी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांची मेहनत अगदी प्रत्येक पानावर जाणवते. लायब्ररीतून आणून वाचले आणि सरळ विकतच घेतले. संग्रही ठेवावे असे पुस्तक.
पुस्तक दुर्गा भागवत यांच्या जीवनावर लघुपट तयार करण्यात आला तेव्हाच लेखिका अंजली कीर्तने यांनी त्या लघुपटाचा प्रवास कसा झाला हे सोबत सोबत लिहून ठेवले. ते हे पुस्तक! मला तर लेखिकेच्या अभ्यासाची कमाल वाटते. दुसरं म्हणजे दुर्गाबाईंवर लघुपट बनवला त्यासाठी लेखिकेचे आभार कारण त्यामुळे इतके छान पुस्तक वाचायला आणि संग्रही ठेवायला मिळाले. किर्तने मॅडमनी आनंदीबाई जोशी , पं. द. वि. पलुस्कर यांचेवर पण लघुपट तयार केले आहे. बरेच पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची ग्रंथसंपदा विविधांगी आणि भरपूर आहे. त्यात चरित्र, लघुकादंबरी, बालकादंबरी, कथासंग्रह, प्रवासवर्णन, लघुपटाची रोजनिशी, वेगवेगळ्या वृत्तपत्रात सदरलेखन, पाऊलखुणा लघुपटाच्या आणि संशोधनपर लेख इत्यादींचा समावेश आहे.
लेखिकेच्या बुध्दीमत्तेला आणि जिद्दीला सलाम!
पुस्तकाची मांडणी पण खूप छान केली आहे. त्यामुळे दुर्गाबाईंचे साहित्य, त्यांचे कार्य, त्यांनी घेतलेली मेहनत, बुध्दीमत्तेचं तेज, अभ्यास सर्व सर्व अगदी व्यवस्थित समजतं. दोन भागात विभागून केलेली मांडणी एकदम पर्फेक्ट आहे. शेवटी 7 परिशिष्ट आहे आणि एक संदर्भ सूची आहे. वरवर नजर टाकली तरी लगेच लक्षात येईल की ती पण किती व्यवस्थित, अचूकपणे दिली आहे. परिशिष्ट सुध्दा वाचनीय झाले आहे. अंजली कीर्तने यांच्या दुर्गाबाईंवरील प्रत्येक लेखाच्या शेवटी स्वतंत्र संदर्भ दिले आहेत. त्या विशिष्ट लेखासाठी कोणती पुस्तके रेफर केली आहे. इतकं परिपूर्ण पुस्तक मी तरी पाहिले नव्हते. त्या प्रत्येक लेखातला सच्चेपणा मनाला भिडतो. दुर्गाबाईंचे आख्खे साहित्य आपल्या संग्रही ठेवण्याचा मोह होतो.
पुस्तक हातात घेतल्यावर मी कितीतरी वेळ ते बघतच बसले. बहुरूपिणी दुर्गा भागवत चरित्र आणि चित्र. दुर्गबाईंचा तरुणपणीचा  ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. फक्त त्यांचं नाव इंद्रधनुष्याचे रंग असतात तसं लिहिलं आहे.  पुस्तक इतकं ताज आहे की मागच्या वर्षी 1 जुलै 2018 ला पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. इतकं ताज पुस्तक हातात घेण्याचा माझा अनुभव पण पहिलाच असल्याने मला त्याच अप्रूप वाटलं. आनंदही झाला आहे.
मनोगत, ऋणनिर्देश हे देखील वाचनीय. काही वाक्ये इथे सांगायचा मोह आवरत नाहीये. "लघुपटनिर्मितीला चालना मिळाली तेव्हा दुर्गबाईंच्या आयुष्याची भैरवी सुरू झाली होती. आणखी थोडा जरी उशीर झाला असता तरी दुर्गाबाई माझ्या हातातून निसटून गेल्या असत्या. माझ्या आयुष्यात कॅमेरा आला म्हणून लेखणी नाउमेद  नाही झाली. या तरल मनाच्या मित्रानं शिपडलं तिच्यावर जादूच पाणी. तिला गवसली चित्रवाणी. मी जगावं कॅमेर्‍याच्या डोळ्याशी भिडवून माझा मनःचक्षू आणि तिनं नोंदवावा प्रवास माझा, असा झाला होता अलिखित करार आमचा. डोळ्यांचा कॅमेरा केल्यावर आजवर अंधुक असलेल्या काही प्रतिमा रेखीव आणि स्पष्ट झाल्या. जीवनप्रीतीनं रसरसलेल्या या शब्दकळावंतीची शतरंगी रूपं पाहून मी मोहरून गेले. ही रूप मी लघुपटात टिपली. सव्वातासाचा लघुपट म्हणजे त्यांच्या जीवनकार्याची आणि मनोज्ञ रूपांची झलक होती. लघुपट पूर्ण झाला तरीही अजून दुर्गाबाईंबद्दल मला खूप काही सांगायचं शिल्लक होतं."
पुस्तकाची दोन भागात विभागणी केली आहे. ती अशी - पहिला विभाग चरित्र आणि दुसरा विभाग चित्र! चरित्र मध्ये दहा भाग. लेखिकेच्या स्मृतीतील दुर्गाबाई आपल्याला भेटतात. लेखिकेच्या कॉलेज जीवनातील भेट ते लघुपटासाठी पहिल्यांदा जेव्हा दुर्गाबाईंना भेटल्या तो प्रसंग आहे. त्या प्रसंगाचे वर्णन - ओठाजवळच्या चुण्या हलल्या. ओठापासून डोळ्यापर्यंत मंदस्मिताची झुळूक पसरली. सुरकुत्यांचं कमळ हसलं. विस्मृतींमधून लोप पावणाऱ्या त्यांच्या स्मृती प्रवाहात मला वाळूच्या कणाएवढंही स्थान असायचं कारण नव्हतं;पण कोणीतरी आपल्याला भेटायला आलं आहे, याचा त्यांना आनंद झाला. स्मृतीभ्रंशांनंतर माणसं दुरावली. नातेसंबंध विरून गेले. वेढून उरलं ते हरवलेपण, एकटेपण, आजारपण. त्यांनी अनुवादित केलेल्या "पो - चू" कवितेच्या ओळी लेखिकेला आठवल्या. "जर शिकलो नसतो मी ताठ बसण्याची नि विस्मरणाची कला
तर कसा सोसला असता मी हा निव्वळ एकटेपणा?"
त्यांच्या सतेज मनाची निशाणी म्हणजे वृध्दत्वाच्या ऐन बहरात त्यांनी लिहलेली नितांतसुंदर कविता - देहोपनिषद.
आयुष्याची झाली रात| मनी पेटे अंतर्ज्योत ||
भय गेले मरणाचे | कोंभ फुटले सुखाचे ||
अवयवांचे बळ गेले |काय कुणाचे अडले ||
फुटले जीवनाला डोळे |सुख वेडे त्यात लोळे ||
मरणा तुझ्या स्वागतास | आत्मा आहे सज्ज ||
पायघडी देहाची ती | घालुनी मी वाट पाही ||
सुखवेडी मी जाहले |देहोपनिषद सज्ज झाले ||
"फोटोसेशन च्या वेळी त्यांच्या समोर पॅड ठेवलं नि त्यांच्या हातात पेन दिलं. लेखणीच्या स्पर्शाने त्या मोहरल्या पण खंतावल्या न उमटणार्‍या शब्दांमुळे! तुमचा अनुभव घेताघेता मला कविता स्फुरल्या ; याचं मला खूप समाधान आहे." असं लेखिका म्हणतात. "जाण्यापूर्वी " या कवितेनेच लेखिका अंजली कीर्तने यांनी हा स्मृतींचा प्रवास थांबवला. "जाण्यापूर्वी काही तरी देऊन जाईन, माझं मी पण या इथे ठेवून जाईन.
माझ्यामागे येणार्‍यांनो इतुकंच करा, पुस्तकाची जुनी पानं उलटून वाचा.
निजलेला शब्दार्थ मनी पुन्हा जागा करा, उद्याच्या आकाशात मला मुक्त करा.
भूमीमध्ये पेरते मी जादूच्या या बिया, उगवत राहीन मी शब्द शब्द माझी काया.
जाण्यापूर्वी काही तरी देऊन जाईन, माझं मी पण या इथं ठेवून जाईन.
असा हा स्मृतींचा प्रवास त्यांचा जन्म, बालपण, त्यांची घरं, शिक्षण, कार्य, त्यांचे परिश्रम, चिकाटी, धैर्य सगळे सगळे प्रसंग वाचताना आपल्याला त्या त्या काळात घेऊन जातात. असे 10 प्रकरण आहे. प्रत्येकाबद्दल लिहणे शक्यच नाही.
चित्र विभागात त्यांच्या अनेक गुणांवर, बहुपेडी व्यक्तीमत्वाबद्दल अनेक प्रसंग सांगितले आहे. उदाहरणार्थ सौंदर्यासक्त या हेडिंग खाली रंगधुंद, नादलुब्ध, सौरभप्रेमी असे उपप्रकरण जोडले आहेत. तसेच भाषाभगिनी, रांधणप्रेमी, पूर्णा, शब्दकळावंती इत्यादि. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविले आहे.
डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नेमक्या शब्दात या पुस्तकाचा सारांश मागच्या पानावर लिहिला आहे. तो इथे सांगितल्या शिवाय पुस्तक किती वाचनीय आहे आणि संग्रही ठेवावे असे आहे ते समजणार नाही.

अंजली 

Friday, November 8, 2019

"तो" माझ्या नजरेतून



प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, त्याची प्रत्येकाकडे बघण्याची नजर वेगळी. प्रत्येकाला त्याचे येणारे अनुभव, दर वेळी वेगळे. त्याला प्रत्येकाचे येणारे अनुभवही दर वेळी वेगवेगळे.  कुणाच्या दृष्टीने तो अगदी आपल्यातीलच, घरातीलच फॅमिली मेंबर असावा, तसा; तर कुणाच्या दृष्टीने तो फक्त एक तिऱ्हाईत व्यक्ती, इच्छित स्थळी सुखरूप पणे नेऊन  आणि आणून सोडणारा. 
   आता हा "तो" कोण हे कदाचित  वाचकांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. तर आजच्या आपल्या ह्या लेखाचा नायक, "ड्राइवर" अर्थात चालक,हा कित्येक दिवसंपासून माझ्या मनाच्या कोपऱ्यात घर करून होता. खरं सांगायचं तर मला त्याच्यावर एक मोठी  कादंबरी च लिहायची इच्छा होती; पण माझी लिखाणाची झेप, निरीक्षणाचा आवाका, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या वेगाच्या मानाने कमी पडल्या. म्हणून तूर्तास तरी ह्या छोट्याशा लेखावरच समाधान मानून घेतेय. तुम्हा वाचकांवरही उगाच अत्याचार नको ना व्हायला.😊
असो. 
        त्या दिवशी "बालविकास शाळेतील दिवाळीचा कार्यक्रम  आटोपून मी घरी यायला निघाले. अर्ध्या रस्त्यापर्यंत प्रतिभाने सोबत केली नंतर मी रिकशा करून निघाले. रिक्षा वाल्याने रस्त्यात अजून एक सवारी घेतली. बाई हाश हुश करत अगदी सांभाळून बसली. असेल पस्तिशीच्या आसपास. चेहऱ्यावर प्रचंड चिंता, ताण--- --" भैय्या, जरा आरामसे चलाना---" (ड्राइवर च्या चेहऱ्यावरचं लिहिलेलं असतं का माहीत नाही पण लोक सामान्यतः त्याच्याशी हिंदीतूनच बोलतात. इथे तर ही बाईच हिंदी  भाषिक होती म्हणा.)    " आरामसेही चला रहा हूं बेहेनजी.  लेकिन बैलगाडी मैने कभी चलाई नहीं" त्याची विनोद बुद्धी( फालतू) अचानक जागी झाली.  मग माझ्या शेजारी सहप्रवासी सुरू झाली. "वो क्या है ना, मेरे घुटनेका  ऑपरेशन हुवा है,   accident भी हुवा था तबसे मुझे  डर सा लगने लगा है---" तिने अपघाताचे नाव काढताच मलाही चेव आला. मी पण मग आपली तडाखेबंद हिंदी सुरू केली.  " वहीच तो ना. मेरा भी छे महिने पेहेले जोरदार accident हुवा. मुझे तो  अब घरसे बाहेर पडनेमेभी डरच लगता है--- क्या बतावू, किती तकलीफ सहन करनी पडी बावा--- " आणि मग आमची गाडी रुळावरून घसरत अकोल्याची ट्रॅफिक, अकोल्याचे रस्ते, लोकांचा  गाड्या चालवतानाचा, पायी चालतानाचा हलगर्जी पणा, किंवा बेताल पणा, रिक्षा वाल्यांचे नियम तोडून चालवणे ह्यावर आंतरराष्ट्रीय  पातळीवरील ( आमच्या दृष्टीने)  पण निरर्थक चर्चा सुरू झाली. रिक्षा वाला गालातल्या गालात हसतोय, असा मला  मनातल्या मनात भास झाला.
परवा देखील असेच झाले. आम्ही तिघी जणी, मी,कल्पना आणि दीप्ती आमच्या मैत्रिणीकडे, विद्या कडे जात होतो, रिक्षा ने. रस्त्यात अशाच गप्पा सुरु होत्या, आजकाल रस्त्याने जाताना किती भीती वाटते, रहदारी काय झालीये, गाड्या कशा बेफाम धावतात वगैरे वगैरे. मुख्य म्हणजे आपण घरच्या (फॅमिली) ड्राइवर सोबत असलो (पाठीमागे, बाजूला, कुठेही) तरीही आपल्या सूचना, सल्ले सुरूच असतात, 'हळू जरा, सांभाळून जरा, समोर बघाल----  शेवटी गाडी चालवणारा वैतागून म्हणतो, माझी आई, तूच का चालवत नाहीस गाडी? आणि काय ते घाबरट बायकांना किंवा बसल्या जागी, फुकटचे आणि निरर्थक सल्ले देणाऱ्या महाभागां ना  माहीतच असणार.😄 आमच्या पांचट गप्पा ऐकून शेवटी "तो" म्हटला, मॅडम, आम्हाला बरोबर अंदाज असतो, वाहन कसे चालवायचे ते. रोजचेच काम त्यातून आमचं पोट पाणी त्याचयावरच तर अवलंबून आहे ना? आमची देखील माणसं घरी वाट पहात असतात .  तो हे बोलला आणि माझ्या डोळ्यासमोर आला, पहाडी  प्रदेशात, डोंगराळ प्रदेशात वाहन चालवणारा चालक.  दिल्ली ते लेह लद्दाक, शिमला, मनाली,  सारख्या हिमालयीन प्रदेशात, जिथे अत्यंत कठीण वाटा, अवघड वळणे, अरुंद रस्ता, एकेरी मार्ग---- अशा दुर्गम भागात जे प्रवाशांना सांभाळून घेऊन जातात, त्यांना तर सलाम च करायला हवा. बद्रीनाथ- केदारनाथ  ला , अमरनाथ,  गंगोत्री- जमनोत्री ला जाऊन आलेली लोकं परतल्यानंतर जे पूजन करतात आणि भोजन घालतात, ते देव दर्शन करून आलो म्हणून पेक्ष्याही सही सलामत घरी आलो ह्यासाठीच असावे. पेहेलगाम ला गेलो होतो, तेव्हा तर मनात सतत देवाचा धावा सुरू होता. एकीकडे खोल खोल दरी, दुसरीकडे उभ्याच्या उभ्या डोंगर कडा, रस्ता अरुंद,  शिमल्याला जातानाही तसेच, आणि रोहतांग, ला , गुलबर्ग लाही तसेच. कसे काय इतक्या सराईतपणे ही जमात वाहन चालवते, त्याचं नवल आणि कौतुकही वाटल्यावाचून रहावत नाही.  खरे तर आपण पर्यटनाला, तिरथाटनाला निघालेली मंडळी, सर्वात प्रथम ह्या लोकांचेच पाय धरायला हवेत. कारण त्या संपूर्ण प्रवासात आपलं आयुष्य आपण त्यांच्याच स्वाधीन केलेलं असतं, नाही का? इतक्या अवघड मार्गावरून प्रवाशांना नेणारा हा ड्राइवर पाहिला, आठवला की पौराणिक काळातील युद्धभूमीवर योद्धया चे सारथ्य करणाऱ्या सारथीचीच आठवण होते.
  राम-रावणाच्या युद्धात जेव्हा रावणाचा मृत्यूकाल जवळ आला असे त्याच्या सारथी ला जाणवले, तसा त्याने रावणाचा रथ युद्धभूमिपासून दूर पळवत नेला. पण रावण अर्थात क्रुद्ध झाला. त्याला तो स्वतःचा अपमान वाटून सारथ्यला त्याने चांगलेच फटकारले. त्यावेळी सारथी रावणाला  म्हणाला, " महाराज, मी सदैव तुमचे हित चिंतले आहे.तुमच्या रक्षणाचाच विचार मी करीत असतो. माझे घोडेदेखील थकून गेले होते. अशा स्थितीत युद्धभूमीवर रहाणे मला  अमंगलकारक वाटले. मी सारथी आहे आणि सार्थ्याने शुभाशुभ लक्षणांचा, रथाच्या हालचालींचा अंदाज घेऊन देशकाळाचे भान ठेवायला हवे.   युद्धभूमीवर एका कुशल सारथी ने आपले कान, डोळे, मन सर्वत्र लक्ष ठेवूनही स्थिर ठेवणे जास्त गरजेचे असते."  किती यथार्थ आहे. आणि  हेच नियम एका कुशल चालकाला देखील लागू होतात. 'त्याने' कायम आपले कान, डोळे, मन शाबूत ठेवूनच वाहन चालवले पाहिजे, मग ते वाहन कोणते का असेना. स्वतःचे वाहन आहे आणि स्वतःची माणसं सोबत आहेत, तेव्हा तर सांगायची गरजच नसते; पण भाडोत्री चालकांनी देखील भान ठेवून वाहन चालवणे आणि प्रवाशांच्या जिविताची काळजी करणे तितकेच महत्वाचे आणि गरजेचे असते. तरच तो चालक आपल्या "कर्माला" न्याय देतोय असे म्हणता येईल. असो.
चार चाकी वाहन चालवणारा कोणताही  चालक असो, त्याला  वेस ओलांडली की सगळं व्यवधान बाळगावे लागते. कायम सावध असावं लागतं. समोरून येणारे वाहन, मागून येणारे वाहन, रस्त्यातील खड्डे, चढ,उतार, अनवधानाने समोर येणारी मुकी जनावरे--- अशा कितीतरी गोष्टींकडे त्याला लक्ष ठेवावे लागते. त्यानुसार  गाडीचे ब्रेक, एक्ससिलेटर, वेग सगळंच सांभाळून चालवणारा ड्राइवर म्हणूनच मला नेहमीच महान वाटत आला आहे. 
      अजून एक गोष्ट नेहमी मनात येते, ती ही की ही एकच व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तींविषयी किती तर्हेतर्हेचे अनुभव घेत असेल नाही?  त्याच्या वाहनात बसणाऱ्या व्यक्तींची मानसिकता, स्वभाव, त्याच्या कडे बघण्याची दृष्टी ह्या सगळ्या बाबी भिन्न असू शकतात.  कुणाच्या गप्पा कोणत्या विषयावर, कुणाचा इंटरेस्ट कशात, हे सगळं त्याला  अनुभवताना मजा येत असेल का? की तो बोअर होत असेल?विशेषतः " लेडीज स्पेशल ट्रिप" नेताना गाडीतील बायकांची कलकल, गोंधळ, त्यांचे पीजे, त्यांच्या गप्पांचे विषय, हे सगळं एका कानी, मनी झेलणारा, "तो" त्याला  वर्षतून किमान एकदा तरी 'शांतता अवॉर्ड' ने सन्मानित करायला हरकत नसावी. कुणी त्याला बाहेरगावी नेताना फॅमिली मेंबर सारखी ट्रीटमेंट देत असेल  म्हणजे त्याचे खाणे, पिणे, रहाण्याची व्यवस्था,  हे सगळं विचारात घेतलं जातं असेल, इतकंच काय, त्याची पुरेशी झोप, विश्रांती झाली आहे की नाही हे पाहिले जात असेल, तर कुणाच्या दृष्टीने तो फक्त एक "तिऱ्हाईत" म्हणजे त्याचे त्याचे बघून घेईल. आपल्याला काय करायचे? अशी विचारधारा असणारेही त्याला भेटत च असतील. मला आठवते, सुरुवातीच्या काळात आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स(चार फॅमिलीज) एकत्र देव दर्शनाला,  जायचो. तेव्हा अर्थातच कॉमन गप्पा, कॉमन विषय असायचे . नंतर नंतर  फॅमिलीज  सेपरेट झाल्या तसे प्रत्येक फॅमिली वेगळा प्रवास करती झाली. ओघानेच विषयही बदलले.  ह्या गप्पा मारतानाही माझ्या मनात "त्याचा" विचार हटकून असे आणि अजूनही असतो. आपल्या, किंवा मुलांच्या गप्पा ऐकून तो काय विचार करेल वगैरे. 😄 बोलत असताना त्यामुळेच आपल्यासोबत एक अगदीच अनोळखी(बहुदा)  व्यक्ती आहे तेव्हा तिचे अस्तित्व गृहीत धरूनच आपणही बोलले पाहिजे, असे मला प्रामाणिकपणे वाटत आलेले आहे.  खूप जणांना सवय असते, बाहेरगावी रिक्षा त बसल्या बसल्या ते त्याच्याशी पूर्व जन्मीचे नाते असल्याप्रमाणे गप्पा मारायला लागतात. आमचे "हे" तर हमखास त्याला त्याची ओळख विचारणारच.  "कहासे हो? बिहारके लगते हो" किंवा  किती वर्षापासून चालवतोय रे भाऊ?भागते का तुझे?" वगैरे वगैरे.. मग मुलं सोबत असली तर आम्ही एकमेकांकडे पाहून इशारा करणार किंवा ह्यांना नजरेने गप्प करणार. तर अशी आहे एकंदरीत "त्याची" कहाणी, मज्जा, वस्तुस्थिती,  आपबती---- जे समजाल आणि समजून घ्याल, ते.  
    पण विचार करायला लावणारा प्राणी आहे की नाही? सांगा बुवा आता तुम्हीच.🙏😊

  माणिक नेरकर, अकोला.

Saturday, November 2, 2019

एक अप्रतिम क्लायमॅक्स…

C:\Users\Vikram\Desktop\images.jpg
काल  रात्री सहजच यु ट्यूब वर जुने पिक्चर कुठले आहेत बघत होते तर "अभिमान" दिसला. थोडावेळ बघू या म्हणत म्हणत केव्हा शेवट आला कळलेच नाही. आणि त्यातला तो शेवटचा सीन! काय अप्रतिम रंगवलाय अमिताभ-जयाने! कितीदाही बघितला तरीसुद्धा डोळे पाणवण्याची जबरदस्त ताकद असलेला! सत्तरीच्या दशकातला, हृषीकेश मुखर्जींसारख्या दिग्गजाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट.  जया-अमिताभच्या सशक्त अभिनयाची जुगलबंदी आणि बिंदू, हंगल,दुर्गा खोटे, डेविड, असरानी सारख्या कसलेल्या सहकलाकारांसह एकूण एक जळून आलेली व्यक्तिरेखा ह्यामुळे हा चित्रपट एक मास्टरपीस ठरतो.
                पती पंत्नीच्या नात्याची हळुवार गुंफण सुरेखपणे उलगडतांना पुरुषप्रधान संस्कृतीतल्या नवऱ्याच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी एक सुंदर कथा. पतीच्या पुरुषी अहंकाराला लागलेली ठेच संसार कसा उध्वस्त  करू शकते हे फार छान रीतीने चित्रित केलय. कारण कितीही म्हटले तरी पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा समाजातून इतक्या सहजतेने नाहीसा होणे थोडे अवघडच. मला तर वाटतं आजच्या तरुण पिढीला , विशेषतः एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या पती-पत्नींना बरेचदा ह्या सिच्युएशन ला तोंड द्यावे लागत असणार. त्यांनी हा चित्रपट  जरूर बघावा. 
           चित्रपटाची थोडक्यात कथा अशी-  सुब्बीर कुमार (अमिताभ) हा मुंबईत राहणारा उभरता, तरुणाई चा लाडका पॉप गायक. शहरात, प्रसिद्धीच्या झगमगत्या जगात वावरणारा. सध्या प्रसिद्धीच्या अत्त्युच्च शिखरावर पोहचलेला. आपल्या गावात राहणाऱ्या मावशीला सहजच भेटायला म्हणून येतो आणि तेथे त्याची भेट उमाशी (जया) होते. उमा एक सुशील, सुंदर पण अतिशय साधी तरुणी. अप्रतिम गळ्याची देणगी मिळालेली. तिचं साधेपणातलं निष्पाप सौंदर्य आणि असामान्य टॅलेंट बघून सुब्बीर तिच्या प्रेमात न पडता तरच नवल! चार पावसाळे पाहिलेल्या मावशीच्या अर्थातच  सगळे लक्षात येते आणि मग शुभमंगल करूनच सुब्बीर उमासह शहरात परत येतो. आल्यावर स्वतः तिला गाण्यासाठी प्रोत्साहित करतो. "मैं सिर्फ तुम्हारे साथ ही गाऊंगी" हा तिचा आग्रहही हळूहळू सुब्बीर मोडून काढतो अन मग उमा यशाची एक एक पायरी ओलांडताना कशी त्याच्याही पुढे निघून जाते हे दोघांनाही कळत नाही. इथे बाकी चित्रपट थोडे वेगळे वळण घेतो. सुरवातीला उमाच्या यशाने अंतर्बाह्य फुलून येणारा सुब्बीर हळूहळू त्याच यशाने नकळत अस्वस्थ व्हायला लागतो. त्याचा हा अस्वस्थपणा, ती न सांगता येणारी तगमग अमिताभ ने फारच सुंदर रंगवलीय. ह्याची परिणीती अर्थातच दोघांच्या दुरावत जाणाऱ्या नात्यात होते आणि नेमके हेच उमाला नको असते. सुब्बीर ची ही तगमग, आतल्या आत होणारी घुसमट सहन न होऊन  शेवटी उमा आपल्या वडिलांच्या घरी परत येते ती गाण्याला आपल्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करूनच! केवळ निखळ आनंदासाठी गाणारी उमा, ते गाणे च आणि जीवापाड प्रेम केलेला सुब्बीर आयुष्यातुन निघून गेल्याने कोलमडून जाते. तरीसुद्धा सुब्बीर आपणाला न्यायला नक्की येईल हा आस मनात बाळगून असते. अहंकाराला ठेच लागलेला सुब्बीर माघार घ्यायला तयार होत नाही. वाट बघून बघून हळूहळू उमाच्या सगळ्या संवेदना गोठत जातात आणि शेवटी एका जिवंत प्रेतासारखी तिची अवस्था होते.
             हे सगळं सहन न होऊन शेवटी सुब्बीर ची मावशी त्याच्याकडे जाऊन त्याची चांगली कानउघाडणी करते अन मग बाकी पश्च्यातापदग्ध सुब्बीर उमाला परत घेऊन येतो. आपली चूक उमगलेला सुब्बीर आता  सगळ्या संवेदना हरवलेल्या उमेला पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. शेवटी त्याला पित्यासमान असणारे त्याचे संगीत दिग्दर्शक त्याला सल्ला देतात की संगीत हा उमाचा आत्मा आहे. ते तिच्या जीवनात परत आले तर ती पुन्हा पहिल्यासारखी होऊ शकते. आणि मग जाणीव पूर्वक एक ‘सूर झंकार’ चा कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमाला सुब्बीर उमाला घेऊन येतो. पहिलच गाणं "देखो ना, तेरे मेरे मिलन की रैना…", जे एकेकाळी दोघांनी आपल्या सुखी संसाराचे स्वप्न रंगवताना गाईलेले असते ते गायला लागतो अन ते स्वर कानी पडताच बाकी, क्षणभर कावऱ्याबावऱ्या  झालेल्या उमेच्या डोळ्यासमोर झर्रकन सगळ्या जुन्या घटना एखाद्या चलतपटा सारख्या तरळून जातात अन उमा उन्मळून पडते, ओंजळीत तोंड लपवून ओक्साबोक्सी रडायला लागते. तिला स्टेज वर आणण्यात येते आणि नाही नाही म्हणत म्हणतच ती सुब्बीरच्या सुरात सूर मिसळून गायला लागते. त्या दृश्यात जया कमालीची सुंदर दिसली आहे. काठापदराची पांढरीशुभ्र साडी, केसांचा जाडजूड अंबाडा, त्यावरून ओढलेला पदर आणि चेहऱ्यावर प्रतिबिंबित होणाऱ्या भावनांचा कल्लोळ! अप्रतिम अभिनय अन साधेपणातलं सोज्ज्वळ सौंदर्य! तिला परत एकदा गातांना बघून कार्यक्रमाला आलेले प्रेक्षकही पाणावलेले डोळे पुसत पुसत  टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करतात आणि चित्रपट इथेच संपतो. ह्या शेवटच्या प्रसंगात जयाने जी अभिनयाची उंची गाठली आहे त्याला तोड नाही. ह्या एका सीन मध्ये ती खरोखरच अमिताभच्याही वरचढ ठरते. थिएटर मध्ये बसलेल्या एकूण एक प्रेक्षकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारा हा भावमधुर असा क्लायमॅक्स! 

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे
अकोला 

फो. . - ९८९०६७९५४०