"नाळ" हे शीर्षक वाचून, या लेखाचा संबंध नागराज मंजुळेच्या "नाळ" चित्रपटाशी आहे की काय? कदाचित तुमच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे. पण वाचकहो... सुरूवातीलाच शपथेवर स्पष्ट करते की, एका नामसाधर्म्या पलिकडे या लेखाचं त्या चित्रपटाशी कोणतंही साम्य नाही. मग ते नाही तर काय आहे? खरं सांगू का? याक्षणी मलाही स्पष्टपणे माहित नाही. एक धूसरसं कल्पनाचित्र मनात उमटलंय. त्याला शब्दबद्ध करायचा हा प्रयत्न आहे.
त्यांचं झालं असं की परवा, नवरात्रात गावी जायचं होतं. पण सध्या शासकीय कृपेने म्हणा अथवा वरुण कृपाप्रसादे म्हणा... सगळीकडेच रस्ते देदणादण उडविणारे आहेत. गावाकडे जाताना तर अधिकच हलाहल करतात. त्या आंतरराष्ट्रीय रस्त्यांवरुन आपली चार चाकी नको तर सरकारी लाल डब्बा अधिक सोयीचा, असा सूज्ञ विचार करुन 'एष्टी' नामक वाहनावर दृष्टी ठेवत स्थानकावर उभे होतो. गाव ज्या तालुक्यात आहे त्या नावाचा उल्लेख असणारा फलाट नि बाकडे पकडून बसायचा विचार होता. पण सोबतच्या अनुभवी सोबतीणीने तसे करू दिले नाही. नजर भिरभिरत ठेवून, कान उद् घोषणेकडे रोखून, तोंडानं माझ्याशी गप्पा मारणा-या तिच्या या "त्रि-अवधानी" कौशल्याचं नाही म्हटलं तरी मला कौतुक वाटत होतं. पाच-दहा मिनिटे झाली असतील अचानक तिने मला ओढत नेले. थोडावेळ कळले नाही पण मग लक्षात आले की आपल्याला हवी ती ही एष्टी मैदानात उभी आहे. सवा-या उतरताहेत तोच चपळाईनं तिने दुसरा क्रमांकाचा बाक पकडला. 'पहिला रिकामा असताना तो का सोडलास?', या माझ्या प्रश्नावर शांतपणे तिने सांगितले की तो वाहकासाठी म्हणजे कंडक्टरसाठी राखीव असतो. आम्ही बसलेल्या जागेवर काही लिहिले आहे का? ते बघायला अभावितपणे नजर वर गेली तर तेथे चक्क विधानसभा नि विधानपरिषद सदस्यांसाठी राखीव लिहिले होते. माझा नजरेचा रोख न् देहबोली तिला लगेच कळली. मला हात धरून खाली बसवत ती म्हणाली,"बस इथेच. कोणी येत नाही" गाडी सुरु झाली. मला वाटले निघाली. पण छे....! ती फलाटावर लागली. तेथे माझ्यासारखे नवखे चढले. मोक्याच्या जागा आधीच बळकावलेल्या पाहून चरफडले. मला आता सोबतीणीचा प्रचंड आदर वाटू लागला. किती तिला ज्ञान! किती तिची दूरदृष्टी! धन्य तिचे त्रि-अवधान!
आता तुम्ही म्हणाल की, या सगळ्या एष्टी पुराणाचा नि 'नाळ' शीर्षकाचा काय संबंध? नसला तर काय झाले? यालाच तर भुमिका बांधणे म्हणतात नं? भलेही काही जणं त्याला 'नमनाला घडाभर तेल' असं हिणवतील पण आपण आपलं सोडायचं नाही...सांगत सुटायचं! वाचणारा वाचतो नि कधी अर्थ लावतो तर कधी बोल...! हं...! गाडी निघाली. सोबतीणीच्या चपळाईने खिडकीजवळची जागा मिळाली होती. रस्ता नेहमीचा होता. सगळ्या ओळखीच्या खुणा त्याच होत्या पण तरी नेहमी स्वतःच्या गाडीने करत असलेला प्रवास आणि आजचा हा जनपरिवहन प्रवास... दोन्हीत काही वेगळेपण होतं. ठिकठिकाणी असणारे विनंती थांबे, नवखे प्रवासी... बुजरे! तर डेलीवाले... सराईत! त्यात विद्यार्थी आणि शिक्षक अधिक! गाडीनं रेल्वे फाटक ओलांडलं. भौरद फाटा सोडून डाबकीला भोज्ज्या करत एष्टीनं पुढला रस्ता पकडला न् वाचकहो, तिथेच माझ्या मनात या लेखाचा कोंब रुजला.
तो कसा? लेख पुढे वाचाल तेंव्हा त्याचा उलगडा होईलच. डाबकी ओलांडत असताना का कोण जाणे पण श्रीराम पाटील यांची आठवण आली. त्यांची ती, त्यांच्या वर्णाशी मिळतीजुळती काळी टोपी, किंचित स्थुल बांधा झटक्यात नजरेसमोर आला. पाठोपाठ त्याकाळात त्यांचा कसा राग यायचा, तेही आठवलं. खरंतर राग यायचं तसं काही कारण नव्हतं पण ते दर चार आठ दिवसांनी एखादं स्थळ सुचवायला घरी यायचे नि कोणत्याही नवतरूणीप्रमाणे तेंव्हा मला लग्न करायचं नव्हतं. आईला मात्र ते भावाप्रमाणे जवळचे वाटायचे कारण त्याकाळात लग्न ठरविण्यासाठी कोणतेही डाॅट कॉम नव्हते तर या अशा मध्यस्थ संस्थाच असायच्या. अशा अनेकांचे दोनाचे चार करून देण्यात त्यांचा हातखंडा होता. अर्थात आमच्या बाबतीत तो उपयोगी पडला नाही म्हणा. कारण आमचे भले आम्ही स्वतःच करून घेतले होते. पण खरंच त्या मामांनी कित्येकांचे संसार मार्गी लावून दिले होते.
आता डाबकी कधीच मागे पडलं. गायगावची खुण असणारे पेट्रोल टॅन्क दिसायला लागले तसे श्रीराम पाटलांच्या आठवणी मागे पडल्या नि गायगावचे दिनकरभाऊ दिसू लागले. हे गाव मावशींचं गाव. तशा मला अकरा मावशी! पण त्यातल्या मी केवळ तिघींना प्रत्यक्ष बघितलं होतं. इतर आठ मावशांप्रमाणेच ही मावशी पण मी कधी बघितली नाही. कारण माझ्या जन्माच्या कित्येक वर्षं आधी ती हे जग सोडून गेलेली. मात्र तिला झालेल्या भयंकर सासुरवासाच्या कथा ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो होतो. त्यामुळे गायगाव म्हटले की ती मावशीची न पाहिलेली खाष्ट सासू उगाचच डोळ्यासमोर उभी ठाकते. तसंच दिनकरभाऊंच्या मुलीच्या लग्नात माडीवरचं भलं थोरलं मधमाशांचं बदकन् पडलेलं पोळं नि झालेली पळापळ आठवते.
आठवणींचा पिंगा फेर धरत होता. गणपतीला नमस्कार करून सावरत असतानाच नाथ महाराजांचा मठ, तलाव सदृश्य काळ्या दगडातील बांधकाम दिसू लागलं. अरेच्चा! निमकर्दा आलं की...! "हे इथून असं उजव्या हाताला वळलं की माझ्या माहेराची वाट आहे", सोबतीणीला मी म्हणाले. ती काही न कळून बघायला लागली. कळणार तरी कसं? आज माझं माहेर मुंबईत स्थिरावलं आहे. पण मूळ तर इथलंच आहे नं...! क्षणभर उगाचच वाटलं, आपले बाबा याच रस्त्यावरून गेले-आले असतील. तेंव्हा, त्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला म्हणून सगळं घरदार सुशिक्षित झालं, हे आई न् चुलत भावांकडून कितीतरी वेळा ऐकलेलं, ते आजही लक्षात आहे. याच रस्त्यावर आमच्या प्रिय मावशीचं टाकळी गाव आहे. मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात तिनं चुलीवर केलेल्या चवदार स्वयंपाकाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत असते. कासामावशी जणू आईची प्रतिमाच! दोघींमध्ये प्रचंड साम्य. तेच सारखेपण सुमनताईतही उतरलं आहे. आई नेहमी सांगायची की, म्हशीचं आवंदुध पिवून ती अशी दणकट झाली आहे, न् दुधाचा तोच स्फटीक गोडवा वात्सल्याच्या रूपात तिच्यात आहे.
मायेच्या या धाग्यात गुंतत असताना एष्टीनं एक वळण घेतलं. बाहेर बघितलं तर मोरगाव! नकळत अंगावर रोमांच उभे राहिले. हे गाव मी कधीच आतून बघितलं नाही. इथल्या लोकांचाही कधी प्रत्यक्ष परिचय झालेला नाही. पण तरी सुद्धा जशी बाळगुटी घ्यावी तशा या गावाशी निगडीत हकिकती ऐकल्या आहेत. म्हणून हे गाव कधी परकं वाटलंच नाही. मोरगाव आणि मोरगावची वाघिण इतकी वर्ष झालीत तरी आमच्या हाडीमासी रूतलेली आहे. गम्मत होती का राव? स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षं आधी एखाद्या स्त्री मध्ये इतकी तडफ असावी? मोरगावची वाघिण... म्हणजे माझ्या जीजीची (मोठ्या काकूची) आई. ती अतिशय तडफदार होती. कोर्टाच्या खटल्यांसाठी इथून घोड्यावर बसून, स्वतः चालवत नागपूरला जायची. तिच्या हातात बंदूकबिंदूक असायची. सोबत एखादा नोकर... तिच्या शौर्याच्या कथा ऐकताना, तिची जरब कशी होती, याच्या हकिकती ऐकताना अंगावर मूठभर मांस चढायचं.
हे काय? उरळची शाळा! बाबा याच शाळेत तर शिकलेत. लोणाग्रावरून हेल्यावर बसून उरळ पर्यंत येणारे बाबा कसे दिसत असतील? याचं कल्पना चित्र आजवर अनेकदा रंगवलेलं ते आताही मनातल्या मनात रेखाटणं सुरू होतं. न् निंबा फाटा आला. कृष्णाभाऊंचं गाव निंबा! ते कधी बघितलं नाही पण फाट्यावरून असंख्य वेळा जाणं येणं झालंय. वळण घेत एष्टी पुढे निघाली. इथेच तर तीस वर्षांपूर्वी माझा भयंकर अपघात झाला होता. आजही शरिरावर ती चिन्ह मिरवावी लागताहेत.
कारंजा...! रामचंद मामाचं गाव! हा मामा का बरं? हे अनेक वर्ष समजत नव्हतं. तो धोतर नेसायचा पण कपाळाला गंध लावायचा, बोटांना रंगोटी करायचा आणि लचकत चालायचा. हा असा का? हे कळत नव्हतं. त्याचे सख्खे सुद्धा त्याला हिडीसफिडीस करायचे. त्याच्या भावाबरोबर त्याचा शेतीसंबंधी काही वाद होता. मात्र आमच्या घरात त्याला आपुलकी, ओलावा जाणवायचा त्यामुळे तो अधूनमधून यायचा. आला की, गावच्या ब-याच गोष्टी सांगायचा.
अंदूरा, अडसूळ पार करून नयनाच्या मनात्री पर्यंत आलो. पंचगव्हाण फाट्यानं श्रीधर महाराजांबरोबर झालेल्या अध्यात्मिक वादाची आठवण करून दिली. आता थोडं अंतर की आमचा फाटा येणारच होता. आज तिथे मुलं दुचाकी घेऊन हजर असतील पण पूर्वी धुरळा उडवत येणा-या एष्टी कडे नजर ठेवत, गाडी न् बैल दोन्ही सजग असत. त्रास होवू नये म्हणून त्या बैलबंडी किंवा छकड्यात गाद्या गिर्द्या टाकून तयार असायची. फाट्यावरच्या पाणपोईवर माणसं नि बैल पाणी पिऊन तृप्त व्हायचीत.
करायचीत, व्हायचीत, न्यायचीत...हा सगळा भूतकाळ झाला. वर्तमानाला भूतकाळात राहता येत नसलं तरी रमायला आवडतं. हा सगळा आठवणींचा गोफ विणला जाताना, मी लेखाला, "गोफ आठवणींचा" असं शीर्षक का दिलं नाही? त्याला नाळ का म्हणतेय? असा प्रश्न साहजिकच मनात येऊ शकतो. तर वाचकहो, या पूर्ण प्रवासा दरम्यान मला सारखं जाणवत राहिलं की आजवर प्रवास खूप केला. अनेक वाहनातून, विविध गावं ओलांडत कधी मुक्काम करत हा प्रवास झाला. पण ती गावं मला अनोळखी होती. मात्र मायेच्या धाग्यानं, प्रेमानं, मातीशी नातं सांगणारी ही गावं... या गावांसंदर्भातल्या बहुतांश आठवणी या आईनं सांगितलेल्या, तिच्या संबंधातून आलेल्या आहेत. तिच्या नाळेतून ते आमच्या पर्यंत आलं. त्यावर आमचं पोषण झालं. त्या नाळेद्वारेच प्रत्येक गावाशी भावबंध जुळले. आईकडून आमच्या पर्यंत आणि आता आमच्या कडून पुढल्या पिढीपर्यंत! हा बंध 'नाळ' बंधच तर म्हणावा लागेल नं? म्हणून या लेखाचे शीर्षक नाळ!
- सीमा शेटे (रोठे), अकोला.
(फोटो सौजन्य : गुगल)
No comments:
Post a Comment