गॅलरीतून दिसणारं विस्तीर्ण आकाश, खाली हिरवाकंच शालू ल्यायलेली ताजी टवटवीत आणि वार्याच्या झुळूकीवर डोलणाारी भात शेती! हिरव्या रंगाच्या छ्टा लक्ष वेधून घेतात. त्याचा तो मखमली, मुलायम स्पर्श डोळ्यांना, तनामनाला सुखावून जातो. नजरेच्या टप्प्यात दिसणार्या हिरवी, पोपटी शाल पांघरलेल्या टेकड्या... काय बहारदार निसर्ग! एकटेपणा जरा सुद्धा जाणवू देत नाही हा निसर्ग! शब्देविण संवादू असचं मैत्र असतं त्याचं. त्या टेकड्या म्हणजे आमचं weather forecast department आहे. टेकड्यांवर करडे काळे, पाण्याने गच्च भरलेले ढग दाटून आले कि पाऊस नक्कीच येणार. ढगांच्या दाटीने सहज कळतं पाऊस कितीवेळ पडणार. ते भरलेले ढग बघितल्यावर कळले नभ उतरू आले म्हणजे काय असतं. असं वाटतं ते ढग टेकड्यांशी खेळायलाच खाली उतरले आहेत. धावत जाऊन आपणही सामिल व्हावं का त्यांच्यात आणि उतरलेले ते नभ ओंजळीत घ्यावे. त्याचा स्पर्श, सुगंध अनुभवावा. ढगातून बरसणार्या धारा मी कधी इतक्या जवळून बघितल्या नव्हत्या. ढगाचं /नभाचं ते आवेगात बरसत राहणं आणि रितं झाल्यावर नाहिसं होणं हे फारच विलोभनीय असतं. आणि आता श्रावणात तर लगेच सुंदर पिवळं सोनेरी ऊन पडतं. पाण्याच्या प्रत्येक थेंबात दिसणारे उन्हाचे ते प्रतिबिंब रंगीत आणि मनोहारी जणु हिरे, माणिक, रत्नांचा गालीचा अंथरला आहे. पूर्वेला काळसर ढगाला आलेली चंदेरी कडा आणि त्यावर आलेले ते सुरेख इंद्रधनुष्य! नजर हटत नाही त्या दृश्यावरून! समोर दिसणार्या विस्तीर्ण आकाशामुळे हा नजारा अजून स्पष्ट दिसतो. इंद्रधनूची कमान उंच इमारतींच्या वरून खुणावते आपल्याला. अशावेळी श्रावणाची, निसर्गाची गाणी आपसूक आपल्या ओठांवर येतात. अशाच काही निसर्गाच्या गाण्यांवर थोडसं.
तसे तर अनेक गाणे आहेत निसर्गावर पण या तीन गाण्यातील निसर्ग मला अधिक आवडला. त्यातले शब्द, चाल, संगीत, आवाज सगळे असे काही झकास जमले आहे की अगदी हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
या मराठी गाण्यात - हे जीवन सुंदर आहे नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली. दवात भिजलेल्या वाटेवरती किरणांची रांगोळी काय सुरेख वर्णन. या पूर्ण गाण्यात सकारात्मक आणि नकारात्मक विचार आणि माणसानेच निसर्गाचा ह्रास कसा केला हे तर आहेच पण रुक्षपणा, उपहास, हतबलता जाणवते... त्या ओळी - अहो, आता विसरा हे सगळे.
इथे इमारतींच्या जंगलातला वनवास
त्यातून दिसणार टिचभर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास . हे वास्तव फार विदारक सत्य आहे. माणूस निसर्गापासून दूर दूर गेला आहे. त्याचेच कर्म भोगतो आहे. इतकं असूनही जगण्यातला जिवंतपणा, त्यातला रसरशीतपणा जाणवून आपल्याला पुन्हा उभारी मिळते. पानामधली सळसळ हिरवी अन् किलबिल पक्षांची... इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे. हे जीवन सुंदर आहे... निसर्गाचे हे सुरेल संगीत आपल्याला पण ताल धरायला लावते आणि गाणी म्हणायला भाग पाडते.
तो काय म्हणतो - पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं
कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला आमंत्रण.
तर तीचा विचार पहा हं किती सकारात्मक ऊर्जा देणारा पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा
टपटप पागोळ्यातून अपुल्या ओंजळीत येणारा
जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे... हे जीवन सुंदर* आहे. आजूबाजूला इतक्या नकारात्मक गोष्टी असूनही आपण सकारात्मक, चांगले ते घ्यावे आणि आनंदी रहावे असेच हे गाणं आपल्याला सांगते आहे. तणावविरहीत जगावे. निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो तो निर्मळपणा आपल्यात आणावा.
ये कौन चित्रकार हैं._ या गाण्यातील निसर्ग हिमालयाच्या कुशीतला आहे हे चटकन लक्षात येत. _हरीभरी वसुंधरा पर नीला नीला ये गगन के जिसपे बादलों की पालकी उडा रहा है पवन।दिशाएँ देखो रंगभरी चमक रही उमंगभरी। "बादलों की पालकी "काय मस्त शब्द योजना आहे. नजरेसमोर निळ्याशार आकाशावर पांढरेशुभ्र ढगांचे पुंजके आणि त्यांचे क्षणोक्षणी बदलणारे आकार येतात. *किस ने फूल फूल से किया शृंगार है। कुदरत की इस पवित्रता को तुम निहारलो। इनके गुणों को अपने मन में तुम उतार लो। चमका दो आज लालिमा अपने ललाट की।* या निसर्गाकडून किती गुण घेण्यासारखे आहे ते गुण माणसाने आपल्यात आणले तर मग बघा आपल्या ललाटा वरच्या रेषा कशा चमकतील. आपल्या सारखे भाग्यवान आपणच होणार. निसर्ग प्राणीमात्रांना फक्त देत राहतो कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता. आपणही असे निस्वार्थपणे सगळ्यांशी वागावे.
_तपस्वियों सी है ये पर्वतों की चोटियां। ये बर्फ की घुमरदार घेरदार घाटियाँ ध्वजा से ये हुए है वृक्ष देवदार के । अहाहा काय सुरेख वर्णन केले आहे आणि ते पण नेमक्या शब्दात! नजरेसमोर हिमालचल प्रदेश उभा राहिला. त्यातला तो घुमरदार, घेरदार हे शब्द मला खासच आवडले. हिमाच्छादित मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आणि त्यातले ते वळणदार, नागमोडी घाटातले रस्ते. दुसर्या बाजूला दरीतील उंच उंच देवदार झाडे नजरे समोर येतात. आणि वर अजून एक निरागस प्रश्न _ये किस कवी की कल्पना का चमत्कार है ? चित्रकार तर "तो" आहेच पण हळूवार, कोमल ह्रदयाचा कवी पण बनवलं. क्या बात है. इतका अवर्णनीय निसर्ग निर्माण केला. हे वर्णन ऐकून खुषीच्या लहरी जणू निर्माण होतात आणि मनातले किंतू परंतु दूर पळतात.
असे आणखी एक गाणे आठवले ज्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला आहे आपल्या लहानपणी. दिल ढुंढता है, है फिर वही फुरसद के रातदिन.... ठंडी सफेद चादरों पर, लेट के तारों को देखते रहे छतपर पड़े हुए। आता ते फुरसतीचे क्षणही गेले आणि गच्चीवर, अंगणात झोपण्याचे दिवसही पार बदलून गेले.
आता हे तिसरे गाणे. निसर्गप्रेमी लोकांना या गाण्यातील वर्णनासारखे करावे वाटत असणार नव्हे ते हे करतच असतात. काय आहे ते...
नदी सागराच्या खोल पाण्यात पोहावे
त्या शितल पाण्यात मन हे चिंब भिजावे त्याच्या अथांगपणाने मन काळभर यावे त्या सोनेरी वाळूत चित्र सुंदर रेखावे मावळतीला दूर जहाज एक दिसावे. काय मंडळी आहे ना scenic beauty या ओळीत. लगेच आपल्या डोळ्यासमोर क्षितिजाला टेकलेला सूर्य आणि आणि त्याच्या त्या सुरेख रंगछटा सगळे सगळे अगदी स्पष्ट दिसायला लागते. जणूकाही आपण समुद्र किनार्यावर उभे आहोत.
घनदाट वनातून वाट काढीत चालावे काळ्या दरीत पारीत मन भरून फिरावे
सावलीत झाडाखाली डोळे हलकेच मिटावे
मन स्वछंदी होऊन दूर दूर भटकावे
वार्याच्या गाण्याने मन हरपून जावे.
मला मित्रमैत्रिणीं बरोबर केलेली भटकंती, छोट्या छोट्या सहली सार आठवलं. आपण हा अनुभव कधी ना कधी घेतलेलाच असतो.
हा सारा पसारा घडणार्याशी बोलावे
त्याने दिले हे जे सुख एकवार भोगावे
त्याचे स्वरूप जाणावे त्याचे दर्शन स्मरावे
सगुण निर्गुण निराकार जो कोणी असेल त्याचाच मी एक अंश आहे. आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधयला याहून सोपा मार्ग कोणता असेल? निसर्गाशी तादात्म्य पावणे म्हणजे त्याच्यात मिसळणे असेल का? हाच मोक्ष असेल का? आणि खरचं असं असेल तर मातीतून येशी मातीत मिसळून जाशी... म्हणून म्हणावेसे वाटते या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे... काय सांगावे हा पसारा निर्माण करणारा खरच आपल्याला भेटेलही.
अंजली
No comments:
Post a Comment